'जन गण मन' - २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये आणि इंटरनेटवरही!!!

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 January, 2012 - 06:09

काही वर्षांपूर्वी भारत सरकारनं सर्व शिक्षा अभियानाला सुरुवात केली, आणि सगळीकडे ’स्कूल चलें हम’ ऐकू येऊ लागलं. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार, आणि या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून स्वातंत्र्याची पन्नाशी उलटल्यानंतर मोठ्या धडाक्यात हे अभियान हाती घेतलं गेलं. या अभियानाची बर्‍यापैकी भिस्त होती ती शिक्षणसेवकांवर. बी.एड.ची पदवी नसलेल्या, पण शिक्षकांचं काम करणार्‍या या पदवीधारक शिक्षणसेवकांमुळेच अनेक लहान गावांमध्ये मुलं गमभन गिरवू शकली.

JanaGanaMana1.JPG

जन गण मन’ या चित्रपटातले रामचंद्र सोनटक्के हे असेच एक शिक्षणसेवक आहेत. पगार अगदी तुटपुंजा, शहरात मजुरांनाही यापेक्षा अधिक पैसे मिळतात. शिवाय आपल्या गावापासून शेकडो मैल दूर राहायचं, मुलांना शाळेत आणायचं. पण सोनटक्के हे ध्येयानं भारावलेले आहेत. मुलांना शिकवून एक सक्षम राष्ट्र निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ते मुलांमध्ये रमतात. त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना शिकवतात. पण ज्या गावी त्यांची नेमणूक झाली आहे, त्या गावातली पाचपन्नास मुलं शाळेत येतात ती फक्त दुपारचं जेवण शाळेत मिळतं म्हणून. शिक्षणाशी, सर्व शिक्षा अभियानाशी, राष्ट्राच्या सक्षमीकरणाशी या मुलांना काहीएक देणंघेणं नाही.

घरी उपाशी राहावं लागतं, म्हणून काटू आणि बबली हे बहीणभाऊही शाळेत येतात. फासेपारधी समाजातली ही मुलं. अनेक दशकांपासून गुन्हेगारीचा शिक्का माथी बाळगत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनाही पारखा असलेला हा समाज.

मुलांना शिकवण्याच्या ध्यास घेतलेले सोनटक्के मास्तर आणि काटूची मजेदार पण संवेदनशील गोष्ट सांगतो ’जन गण मन’ हा चित्रपट.

आपल्या देशात कायदे आहेत, लोककल्याण साधण्यासाठी असंख्य योजना आहेत. अंमलबजावणी मात्र शून्य. ’जन गण मन’ हा या व्यवस्थेचा खेळकर शैलीत वेध घेतो. शिक्षण, सामाजिक न्याय आणि बदल यांवर भाष्य करतो.

न्यूयॉर्कस्थित संदीप आणि सचिन कदम या भावांनी (गोल्डन ड्रीम्स् प्रॉडक्शन्स् या संस्थेतर्फे) निर्मिलेल्या आणि अमित अभ्यंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रामचंद्र सोनटक्के यांची भूमिका साकारली आहे अष्टपैलू कलावंत नंदू माधव यांनी. चिन्मय संत, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अस्मिता जोगळेकर, संदीप मेहता, उदय सबनीस यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट २६ जानेवारी, २०१२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

JanaGanaMana2.JPG

या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुंडू टीव्हीवर वेबकास्ट म्हणून उपलब्ध होणारा पहिला प्रादेशिक चित्रपट आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी तुम्हांला 'जन गण मन' हे केवळ तुमच्या आसपास नाही, तर तुमच्या संगणकावर, टॅबलेट पीसी अथवा मोबाइलावरदेखील ऐकू येईल. आऊटरीच मोशन पिक्चर्स प्रा. लि. या चित्रपट वितरणात प्रवेश करणार्‍या संस्थेने जिओडेसिक लि.च्या साहाय्याने भारतीय प्रादेशिक चित्रपट वितरणात एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या २६ जानेवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा 'जन गण मन' हा मराठी चित्रपट जगभरातले सिनेरसिक मुंडू टीव्हीवर त्यांच्या संगणकाद्वारे, टॅब्लेट पीसी अथवा मोबाईल फोनाद्वारे पाहू शकतील.

यासाठी तुम्हांला मुंडू टीव्हीच्या संकेतस्थळावर खातं उघडावं लागेल. $३ भरून चोवीस तासांत हा चित्रपट जगभरात कुठेही, कधीही बघता येईल.

चित्रपटातले कलाकार -
नंदू माधव, चिन्मय संत, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अस्मिता जोगळेकर, संदीप मेहता, उदय सबनीस

संकल्पना - मंदार नामजोशी
कथा, पटकथा, संवाद - समीर हेमंत जोशी
दिग्दर्शन - अमित अभ्यंकर
सहदिग्दर्शन - सिकंदर सय्यद
छायालेखन - राजेश खळे
संगीत - डॉ. सलील कुलकर्णी
गीते - संदीप खरे
कार्यकारी निर्माते - आउटरीच मीडिया सर्व्हिसेस प्रा. लि.

jan gan man.jpg
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यासाठी तुम्हांला मुंडू टीव्हीच्या संकेतस्थळावर खातं उघडावं लागेल. $३ भरून चोवीस तासांत हा चित्रपट जगभरात कुठेही, कधीही बघता येईल. >>> हे जबर्‍या आहे. चाललं चांगल तर हाच पर्याय सर्वात भारी ठरणार. शुभेच्छा.

'जन गण मन' हा अप्रतिम चित्रपट पाहीला. मागच्या आठवड्यात प्रदर्शीत झालेल्या 'शाळा' च्या मानाने माध्यमांमध्ये कमी प्रसिध्दी झाली आहे. पण चित्रपट अतिशय हलकाफुलका मात्र तरीही कुठेतरी आतपर्यंत पोहचणारा आहे.

काहीसे ध्येयवेडे सोनटक्के गुरुजी दुर्गम असलेल्या म्हाळुंगेच्या शाळेत बदली झाल्याने अस्वस्थ आहेत. तिथले विद्यार्थी म्हणजे फासेपारधी, कातकरी, ठाकर सारख्या गुन्हेगारी व भटक्या जमातीच्या पालांवरील मोजक्या मुलांची शाळा आहे. सोनटक्के गुरुजींना तालुक्याच्या अथवा मोठ्या शाळेतील चांगल्या 'लेव्हल' च्या मुलांना शिकवून स्वतःला सिध्द करायचे आहे. अनासाये तशी संधी त्यांच्याकडे चालून येते. गटशिक्षण अधिकारी १५ ऑगस्टला शाळेच्या ध्वजवंदन कार्यक्रमाला भेट देणार असल्याचे पत्र येते. गुरुजी स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी म्हाळुंगेच्या मुलांची जोरदार तयारी करुन घेउन साहेबांवर छाप पाडण्याचे नक्की करतात. त्या दृष्टीने १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी सुरु करतात. ही त्यांची तयारी, त्यामधली धमाल, मुलांच्या कौटुंबीक पार्श्वभुमीचे उलगडणारे पदर, गुरुजींचे बदलीच्या प्रयत्नांदरम्यानचे व्यवस्थेचे अनुभव असा चित्रपट पुढे सरकतो. या प्रवासामध्येच गुरुजींना विद्यार्थ्यांची 'लेव्हल' मोजण्याचे मापदंड सापडतात.

गुरुजींचा हा प्रवास आणी म्हाळुंगेच्या शाळेचा १५ ऑगस्ट मात्र प्रत्येकाने अनुभवायला हवा एवढा हृदयस्पर्शी झाला आहे.