रसग्रहण स्पर्धा - 'भाषाभान' :: लेखिका - डॉ. नीलिमा गुंडी

Submitted by पाषाणभेद on 15 August, 2011 - 23:46

'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत.

लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे. संपुर्ण पुस्तकात मराठी भाषा वैयक्तिक कारणासाठी म्हणा की इतर कारणाराठी वापरतांना घ्यावयाची काळजी लेखीकेने अत्यंत मार्मिकतेने सांगीतलेली आहे.

डॉ. नीलिमा गुंडी यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यात काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन सहाय्यही केलेले आहे. अशा अधिकारी व्यक्तीकडून भाषेविषयीचे भान होणे हे मराठी वाचकांना एक पर्वणी आहे.

या पुस्तकात मुलांची, माणसांची ठेवलेली नावे, लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याची शक्ती, शुद्धलेखनात होणार्‍या चुका, नवतरूणांची भाषा आदी लेख विभाग १ मध्ये आलेले आहेत.

विभाग २ हा मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात मराठी भाषेचे अभिसरण- एक आव्हान व मराठीची आजची स्थिती ह्या दोन लेखात मराठी भाषेला वैश्विक स्तरावर कसे मोठे करता येईल याचे विवेचन आहे. लेखीकेच्या मते भाषा प्रवाही असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर व व्यावहारीक स्तरावर साधे वाक् प्रचार कशा पद्धतीने शिकविले पाहिजे याचे विवेचन आहे. भाषा 'श्रवण करणे' अन त्याचा उपयोग लेखनात करणे याचे महत्व त्यांनी 'श्रॄतयोजन: भाषेचा वारसा' या लेखात सोदाहरण पटवून दिलेले आहे. 'वाचन: एक भाषिक कौशल्य' या लेखात वाचन करतांना काय काळजी घेतली पाहीजे हे सांगितले आहे. या लेखातील एक उदाहरण द्यावेसे वाटते: वाक् प्रचारात अर्थसौंदर्याचेही भान हवे. उदा. 'त्याची फे फे उडाली' हे वाक्य वाचतांना 'फे फे' चा 'नेने' सारखा आडनाव समजून उच्चार केला, तर वाचणार्‍याचीच फे फे उडत आहे, हे जाणवेल.

स्त्रियांची भाषा या विषयी दोन लेख आलेले आहेत. स्त्रियांच्या भाषेत युगजाणीव व्यक्त करण्याची, वास्तव बदलण्याची सुप्त क्षमता आहे असे लेखीका म्हणते. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ति आणि वल्ली' व 'अपूर्वाई' या दोन पुस्तकांची रसग्रहणे भाषिक अंगाने आलेली आहेत. आपल्या बालसाहित्यात रुढ भाषेच्या अलिकडची पलिकडची भाषा समाविष्ट आहे का? असा प्रश्न त्या 'बालासाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखात विचारतात. खरोखर आपले बालसाहित्य या गुणांनी युक्त आहे का? यशवंतांच्या 'आई' कवितेचे परिष्करण' या लेखात कवि यशवंतांनी 'आई' या कवितेत कसे व का बदल केलेत ते स्पष्ट केले आहे.

'भाषा: व्यवस्थेशी निगडीत प्रतिमा' या लेखात भाषाव्यवस्थेशी निगडीत प्रतिमासॄष्टी मराठी कवितेत कसकशा स्वरूपात आढळते, यांचा सोदाहरण शोध घेण्याचा प्रयत्न आहे. विरामचिन्हे, पुर्णविराम, नाम, सर्वनाम आदी मराठी व्याकरणातील संकल्पना हाती धरून मराठी कवितेचा प्रांत मराठी कवींनी कसा समृद्ध केला आहे हे त्यातील उदाहरणांवरून दिसून येते. अनेक कवींनी मराठीत अशा कविता आधीच लिहीलेल्या आहेत. तरीही अशा कवींची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्या मान्य करतात.

"'म' मराठीचा" या लेखात त्यांनी मराठीचा शिक्षणक्रमात अभ्यास कसा असावा याबाबत मते नोंदवलेली आहेत. आपल्या राजकारण्यांनी अस समाजकारण्यांनी त्या मताचा अभ्यास केल्यास मराठी भाषेसाठी कोणतीही चळवळ उभी करावी लागणार नाही, 'भाष्यलक्षी अभ्यासक्रम' महाविद्यालयांत सर्व शाखांसाठी सुरू करावेत. पहिलीपासूनच मराठी अनिवार्य हवी, आदी त्यांची मते आहेत. "एकंदरीत 'म' मराठीचा' असे बिंबवायला हवे!" हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून जाते.

लेखीकेने दोन भाषाधुरीणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत.

भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर यांची मुलाखत बर्‍याच अंगांनी त्यांच्या कार्याबद्दल झाली आहे.

कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत म्हणजे आजच्या मराठीची अवस्था, शिक्षणपद्धती, मराठीचे व्यावहारीक उपयोजन आदिंची सांप्रत अवस्थेवर ओढलेले आसूड आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या पुस्तकपरीचयात मी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या त्या मुलाखतीतील काही भाग विस्तृत प्रमाणात देत आहे, जेणे करून काही लोकांपर्यंत तरी त्याचे शाब्दीक निखारे पोहोचतील व त्यातून अंगार पेटेल.

-------------------------------------------------------------------
डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या त्या मुलाखतीतील काही भाग:-

"नृत्य, नाट्य, शिल्प आदिं कलेच्या विषयांत विद्यार्थ्याला काहीतरी कला सादर करावी लागते. मराठीचा अभ्यास करणार्‍याला काय साहित्यविषयक कला सादर करावी लागते? त्याचा अभ्यास केवळ वाड:मयाचा अभ्यास, समिक्षा, काव्यशास्त्र, भाषाविज्ञान आदींपुरताच मर्यादित असतो. किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात? काही महाविद्यालयांमध्ये मराठीची केवळ १५० पुस्तके असतांनादेखील तेथे एम. ए. मराठी करण्याची 'सोय' आहे. केवळ विद्यार्थीसंख्या वाढली आहे. गुणात्मक वाढ कमी झाली आहे.मराठी संस्थाच इंग्रजी शाळा सुरू करतात हि उद्विगनतेची बाब आहे. मराठी समाज इंग्रजीला घाबरून गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाला कोठलेच शैक्षणीक धोरण नाही. पक्ष कोठलाही असो. वीसएक वर्षात कमालीची अनागोंदी शिक्षण खात्यात आहे. शाळा पाहिजे- घेवून जा. महाविद्यालय हवे- घेवून जा. व्यावसायीक शिक्षणसंस्था पाहिजे- उशीर कशाला करता असे महाराष्ट्रीय शासनाचे धोरण आहे. शासन या सर्वांतून पैसा कमावते आहे. मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे. शासनाकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती नाही. इतर प्रांतांमध्ये शिक्षणाचे माध्यम त्या त्या प्रादेशीक भाषा आहेत. आपल्याकडे इंग्रजी शाळांमधून लोअरलेव्हल चे मराठी शिकविले जाते. मराठीला प्राधान्य देण्याचे धोरण शासन जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत मराठी सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही.

बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्‍यांना वाटत होते. आता ते प्रमाण कमी झालेले आहे. भाषेच्या विकासात सर्वात महत्वाची गोष्ट असते ताठ कण्याचे सरकार. महाराष्ट्र शासनाचा कणा किती ताठ आहे हे आपण पदोपदी अनुभवतोच आहोत.महाराष्ट्रातील वैचारीक घुसळण याघडीला थांबलेलीच आहे. आपण मराठी आहोत आणि सगळे व्यवहार मराठीतूनच करू असा आग्रह सोडू नका".
या प्रदिर्घ मुलाखतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे त्याने त्याने ही मुलाखत वाचलीच पाहीजे. या मुलाखतीचे जळजळीत अंजन प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून घातले पाहीजे.
-------------------------------------------------------------------

खरे पाहता 'भाषाभान' या पुस्तकाचे नाव 'मराठीचे भाषाभान' असे ठेवायला काहीच हरकत नाही.

वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. वाचकांचे मराठी भाषाविषयक भान तल्लख होण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा लेखीकेला विश्वास वाटतो.

लेखिकेचे मराठी भाषाविषयीचे कुतूहल आणि सामाजिक भान यांना समतोल विचारांचीही यात जोड मिळाली आहे. यातील लेख लालित्यपुर्ण शैलीमुळे वाचकांना आपलेसे करतील आणि चिंतनशीलतेमुळे त्यांना अंतर्मुखही करतील.

'भाषाभान'
लेखिका: डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
प्रकाशक: उन्मेश प्रकाशन, पुणे
प्रकाशन: २००८
किंमत: १५० रू.
पाने: १७१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा पुस्तक परिचय / परिक्षण / रसग्रहण याबद्दल माझ्या मनात गोंधळ उडाला आहे.

तो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करून हे दोनदा वाचलं. पुस्तकाबद्दल उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.

वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. >>> प्रत्यक्ष पुस्तकात यावर काही भाष्य आहे का? (बाकी, ते 'लक्ष्यार्थ' असं हवं ना?)

'अभिधा','लक्षणा','व्यंजना' यांचा उल्लेख प्रस्तावनेत आहे. त्यावर भाष्य किंवा स्वतंत्र प्रकरण पुस्तकात नाहीये. पण तसे नसणे हेच योग्य आहे. कारण ते एक अर्पण केलेले पान आहे. त्यावर उहापोह करणे हे पुस्तकाचे प्रयोजन नाही.

श्री. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखतीत कदाचीत मराठी भाषेबाबतील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजनांबाबत प्रयत्नांची दिशा मिळू शकते.

अवांतर: 'अभिधा','लक्षणा' व'व्यंजना' ही नावे मुलींना देण्याचे फॅड निघेल?

पुस्तक इंटरेस्टिंग वाटते आहे. पण नुस्ती पुस्तकाची ओळख करून दिल्यासारखी वाटते.
हे पहा नवे पुस्तक, लेखक अमूक, प्रकाशक तमूक, प्रकरणे अमूक तमूक असं वाटतंय.
रसग्रहण म्हणजे हे पहा नवे पुस्तक, लेखक अमूक, इत्यादीच्या पलिकडे ' यात ना हे असं असं लिहिलंय ते इतकं भारी आहे , अन ते लिहिलंय ते तर एकदम क्लासच , हे वाचताना असं वाटलं, ते वाचताना डोळे भरुन आले, अमक्या गाण्या/ नाटका / पुस्तकाची आठवण आली' वगैरे असायला हवं असं माझं मत.

बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्‍यांना वाटत होते. >> अनुमोदन.

रसग्रहण म्हणजे हे पहा नवे पुस्तक, लेखक अमूक, इत्यादीच्या पलिकडे ' यात ना हे असं असं लिहिलंय ते इतकं भारी आहे , अन ते लिहिलंय ते तर एकदम क्लासच , हे वाचताना असं वाटलं, ते वाचताना डोळे भरुन आले, अमक्या गाण्या/ नाटका / पुस्तकाची आठवण आली' वगैरे असायला हवं असं माझं मत.
>>>
मेधा, परफेक्ट! Happy