संस्कार १ - येतोच... आलोच...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.

आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.

खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.

असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक.
गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).

आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.

तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.

आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.

दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?

हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?

-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.

प्रकार: 

छानचं लिहिलयं. <<< माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.>>> हे फारच क्युट Happy
समोरच्या बद्दल अनादर तर आहेचं त्यामुळे आधीच स्ट्र्गलर्स ना सांगावं कि " I am very particular about my time ". अर्थात त्यानी काही फरक पडेल असं नाही पण काही लोकांची मेंटॅलिटी झालेली असते ( मे बी त्यांना आलेल्या अनुभवांवरून ) कि कोणी वेळेवर हजर नस्तं मग आपण तरी का जा वेळेवर. बहुतेक म्हणूनच तो " IST " चा शिक्का पडलाय आपल्यावर. हळू हळू होपफुली बदलेल परिस्थिती.
जसे जसे जास्ती लोकं सुशिक्षित होतील, परदेशात जातील, सगळी कामे वेळेवर होतील, खूप वेळा खेटे मारायला लागणार नाहीत.

संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.>>>>>>>>>>>>>>>> मस्तच विषय, कारण संस्काराची नेमकी व्याख्या अवघडच आहे, परिस्थितीनुसार संगत मिळते, त्याप्रमाणे आपल्यावर संस्कार होत असतात....... याला अपवाद ही आहेत.

.

.

.

नी, चांगलं लिहीलयस.
मलाही वेळ सांगुन त्यावेळेस न येणार्‍या किंवा फोन करुन उशिरा येतोय हे न कळवणार्‍या लोकांची अतिशय चीड येते. मी स्वतः वेळेच्या १० मिनीटं आधी जाऊन पोहोचते. हे संस्कार माझ्या बाबांचे...

नक्किच पटलं, दुसर्‍याच्या वेळेचा आदर म्हणजे एक प्रकारचा संस्कारच. त्यामुळे आपल्या वेळेचा आदर ही आपोआप राखला जातो. पण सांगितलेल्या वेळेच्या अर्धा-एक तास पुढेच नेहमी वेळापत्रक सुरू असतं. त्यातून हे प्लंबर/केबल/इलेक्ट्रिशियन यांना तर काम नको असते बहुतेक.. आम्हीही हा प्रॉब्लेम खूप वेळेला फेस केला आहे. कधी कधी वाटतं, स्वयंपाक पाणि शिकतो तसं हे ही लगे हात शिकून घ्यावं. उगिच कुणाच्या पाया नको पडत बसायला.. Sad

मला पण दिलेली वेळ तंतोतंत पाळायला आवडते आणि अर्थातच समोरच्याने पाळावी अशी अपेक्षा असते. एका अर्थाने एक गुणविशेष झालाय तो माझा. दिनेशने सांगितलय ना ? मग ते होणारच !!
पण काही जणांच्या बाबतीत वेळ/वचन न पाळणे, हाही गुणविशेष असतोच.
माझ्या भाचीला पुण्यात असाच अनुभव आला. मग तिने मुंबईहून कामगार नेऊन त्यांना घरातच रहायला ठेवले होते.

विचार करायला लावणारा लेख... नी, नेहमीप्रमाणेच विचारांची सुंदर मांडणी. Happy
सगळ्यात जास्त चीड येते ती अशा (दिलेली/ठरलेली वेळ न पाळणाऱ्या) लोकांच्या casual आणि in-general confident स्वभावाची.
एका talk show मध्ये कोणीतरी 'IST' म्हणजे 'Indian Stretchable Time' असं विनोदाने म्हणालं होतं.

आजच पुणे टाईम्स मधे एक सुविचार वाचला "Problem in being punctual is that there's nobody present to appreciate it".
असो. असे प्रसंग पावलोपावली अनुभवतो. साधी गोष्ट आहे सकाळी ऑफिसात जाताना घरासमोरुन गाडीचा रस्ता अस्तो तरी पण वेळेत लोक आपापल्या स्टॉप वर उपस्थीत नसतात. खुप चिडचीड होते अशाने.
एकुणातच वेळ देणे आणी ती पाळली नाही तर फार काही बिघडत नाही अशीच मानसिकता आहे सर्वत्र. Sad

ह्म्म्म.. खरंच्च आहे हे.. आपल्याकडलं वर्क कल्चरच तसंय बहुतेक. कार्पेंटर्स,पेंटर्स ,इलेक्ट्रिशिअन्स ,प्लंबर्सना तर हमखास ठरवलेल्या तारखा, वेळा पाळल्यास आपल्याला काहीतरी पाप पडेलसं वाटून कधी कधी आठवडाभर सुद्धा उशिरा येतात. सतरा ठिकाणची कामं अ‍ॅक्सेप्ट केलेली असल्याने आपल्याकडचं काम अर्धवट रखडवून दुसरीकडे पळतात.. त्यावेळी आपल्याला हताश होऊन त्यांची वाट पाहात बसण्याशिवाय काही पर्याय ही नसतो. एव्हढच नाही तर फोनवर ऑर्डर केलेला किराणा माल घरी पोचवणारा मालक्,'अहो आताच आमचा पोरगा इकडून निघालाय,पोचतच असेल' अशी थाप बिंदासपणे मारतो.
मला पण दिलेली वेळ तंतोतंत पाळायला आवडते.. Happy पण या गोष्टीचे वळण इतर लोकांना कसं लावता येईल बरं ??? त्यांना तर ,थोडा इधर उधर चलता है' ची सवय लागलेली.. Uhoh

हॉटेल ला जेवणाची ऑर्डर केली होती, बराच वेळ काही आलं नाही, दोन वेळा फोन केला 'लडका निकला है' हेच उत्तर, तिसर्‍या वेळेला फोन करुन सांगितल 'मुझे जल्दी चाहिये अगर ऑर्डर निकला नही है तो मै किसे को भेजता हु'.... तर म्हणतो ठिक है भेज दो.

.

योग्य लिहिलयस. पण या लोकांकरता घर तीटपावडरलावून तयार ठेवण्याचं कारण? मला वाटलं तुझ्या कामाशी संबंधित कोणी येणार होतं. असो.

वॉटर फिल्टरवाले, गॅससिलिंडरवाले, फोनवाले, सगळे सांगतानाच सकाळी ११ ते ५ या दरम्यान येऊ असं बिनदिक्कितपणे सांगतात. अरे ही काय विंडो आहे? नी म्हणते तसं आपण रिकामटेकडेच बसलोयत असं त्यांना वाटत की काय. कितीतरी वेळा यावरून वादावादी झालेय. मग ते म्हणणार "आमचा टेक्निशियन फोन करूनच येईल." असा फोन करून येणारा टेक्निशियन कोणाला माहित असल्यास त्याचा जंगी सत्कारच केला पाहिजे. किंवा नेमके आपण नसलेल्या अर्ध्या तासात पुटुकदिशी येऊन एक चिठोरं सोडून जाणार.

मला पण दिलेली वेळ तंतोतंत पाळायला आवडते आणि अर्थातच समोरच्याने पाळावी अशी अपेक्षा असते. एका अर्थाने एक गुणविशेष झालाय तो माझा. दिनेशने सांगितलय ना ? मग ते होणारच !!
>>> हो दिनेशदा. ते मी प्रत्यक्ष अनुभवलय. मानलंच मी तुम्हाला! Happy

या लोकांकरता घर तीटपावडरलावून तयार ठेवण्याचं कारण?<<< बाहेरच्या आंडू पांडू लोकांना घरातल्या वस्तू दिसणे हे मला जाम म्हणजे जाम कैतरीच वाटतं इतकंच. लॉजिक शून्य आहे याला. Happy

mast lekh. pan kadhi kadhi manat iccha asunahi hi vel palta yet nahi. paristhiticha radgana achanak suru hota tyacha kay?

फोन करून कळवणे. वेळ न पाळता येत असल्याबद्दल क्षमा मागणे हे आहेच की. ते ही परिस्थितीच्या रडगाण्याने शक्य नसेल तर परिस्थिती आहे तरी काय?
स्वतः किंवा अतिच जवळची व्यक्ती अपघातात, स्फोटात सापडणे, किडनॅप होणे, मृत्यूमुखी पडणे याहून कुठली परिस्थिती मला दिसत नाही की कळवता येणेही शक्य नसेल अशी. असे प्रसंग सतत होत नसतात. क्वचितच होतात.
कधी वेळेवर न पोचण्याबद्दल फोन करण्याची तुम्हाला सवय असेल आणि एखाद्या दिवशी तुम्ही वा फोन काहीच न आल्यास अर्थातच तुम्ही मोठ्या संकटात आहात हे येणार्‍याला कळू शकतं.
जो कधीच वेळ पाळत नाही, फोन करून कळवण्याचे कष्ट घेत नाही, भेटल्यावर थापा मारतो तो खर्‍या वाईट परिस्थितीत सापडला तरी लोकांना खरे वाटणार नाही.

नीधप , ही ही Happy अगदी बरोबर, हे सुगृहिणी पणा च लक्षण आहे. मला आठवतय, एकदा माझ्या (अमेरिकन) मैत्रिणी च्या आई वडिलांच्या घरी चोरी झाली. ( अमेरिकन मुद्दाम सांगाय्चा मुद्दा हा की कुठ्ल्याही देशात गेलं तरी प्रत्येक गृहिणी ला घर व्यवस्थीत दिसाव अस नेहमी वाटतं.) तर तिचे वडील लगेच ९११ कॉल करायला लागले आणी आई भराभरा घर आवरायला लागली > वडिल थक्कच झाले कि ही सगळा पुरावाच नष्ट करतिये का काय. ते म्हणे कि " What are we having? a welcoming party for the police that our house needs to be spic and span>"

तिची आई maid ज्या दिवशी येणार असेल त्या दिवशी पण घर चकाचक करून ठेवायची. वडिल म्हणायचे कि असं का , तर तिचं लॉजिक कि नाही तर maid ला वाटेल कि हे लोकं किती अजागळा सारखे राह्तात. ही ही Happy

दिलेली वेळ पाळणे हा एक अत्यंत दुर्मिळ होत चालेलेला गुण आहे हे खरं. तसंच तो संस्कारांचा भाग असावा हे ही बरोबर.

आवडला..संपूर्ण लेख आणि प्रतिसादांना जोरदार अनुमोदन....

आपला 'चलता है' अ‍ॅटिट्यूड काही जात नाही Happy

हा विषय पाहून प्रतिक्रिया दिल्यावाचून राहावले नाही. मी गेले २ आठवडे अश्याच अनुभवातून जातेय. नोकरीसाठी मुलाखती घेणे चालू आहे. चक्क अशा ठिकाणीपण लोक वेळ पाळत नाहीत, कळवत नाहीत, येत नाहीत! ह्याचा अर्थ ह्याना नोकरीची गरज नाही, कि असे काही शिष्टाचार पाळायचे असतात, याचीच जाणीव नाही? आणि मग Apply तरी का करतात?
एका महान मुलीने तर ९ ची वेळ दिलेली असताना, ९:३० ला फोन केला ( तो पण माझा कॉल गेल्यावर),
आणि सांगते " मी ११ ला येईन" :हा हा: जशी काय मी रिकामीच आहे हिची वाट बघत!
असे अनेक.

नी,

वेळ पाळणे हे भारतीयांच्या संस्कारात नाही असेच दुर्दैवाने अनुभव आहेत. काही लोकं किमान तसा संदेश आधी/मागाहून पाठवण्याची तसदी तरी निदान घेतात. आणि कामापुरते मामे या जमातीबद्दल तर बोलायलाच नको:)
आश्चर्य वाटेल पण जवळ जवळ सर्व प्रगत पाश्चात्य देशात, कचेर्‍यांमधून (माझ्या अनुभवानुसार) भारतीय लोकं वेळेचे महत्व पाळत नाहीत असे गृहीत धरूनच चालतात.
पण जरा अरबस्तानात काम करून पहा, भारतीय परवडले अशी स्थिती आहे. Happy

Pages