सिनेमा आणि संस्कृती: भाग- १ "लग्न"

Submitted by शर्मिला फडके on 16 June, 2011 - 01:16

सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.

सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. १९१३ साली दादासाहेब फाळक्यांनी पहिला बोलपट प्रदर्शित केला त्यानंतर आज तब्बल ९८ वर्षे लोटली. समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्‍यानचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं उमटत गेलं.

हिंदी सिनेमांमधेही प्रयोग झाले, स्थित्यंतरं झाली, जागतिक सिनेमाच्या तोडीचे दिग्दर्शन, कथा अपवादाने का होईना पडद्यावर दिसल्या, त्या अ‍ॅप्रिशिएटही झाल्या पण मुख्य प्रवाहात बनत रहाणारे सिनेमे आणि ते बघणारे प्रेक्षक कुठेतरी पक्के परंपरावादीच राहिले. स्त्रिया, स्त्री-पुरुष नातेसंबंध, रितीरिवाज, मुले, सणवार, एकत्र कुटुंब पद्धती, खेड्यांमधली जीवनपद्धती, शहरी जीवन, नोकरीधंदा, तरुण पिढी, म्हातारी होत गेलेली पिढी अगदी सगळ्या सगळ्यांवर सिनेमे आले पण त्यांचा मुळ गाभा हा भारतीय समाजजीवनातल्या परंपरांचे गोडवे गाणारा, नात्यांमधल्या घट्ट विणीचे कौतुक करणाराच राहीला.

या सर्व सिनेमांच्या स्टोर्‍या पडद्यावर साकार झाल्या तेव्हा पारंपरिक नाती, रिवाजांचे बोचणारे कंगोरे, टोचणारे कोपरे मोठ्या खुबीने गुळगुळीत केले गेले, चालिरितींना, परंपरांना सोयीनुसार कधी भडक, अवास्तव स्वरुप देऊन तर कधी मवाळ, कुणाच्या धार्मीक, भावनीक संवेदनांना न दुखवेल असं सौम्य करुन सिनेमाच्या पडद्यावर साकार केलं गेलं. तसं केलं की (च) सामान्य प्रेक्षक सुखावतो ह्याची पक्की जाण जणू हे असे सिनेमा बनवणार्‍यांच्या गुणसूत्रांमधे, आणि जुन्या चालिरितींना ग्लोरिफाय करणं म्हणजेच आदर्शवादी भारतीय संस्कृतीची परंपरा पुढे चालवणं अशी जाण ते इथल्या प्रेक्षकांच्या गुणसूत्रांमधे जन्मतःच येत असावी.

साहजिकच मग संस्कृतीचं जे प्रतिबिंब सिनेमांमधे उमटत गेलं ते दिखाऊ, झगमगीत आणि फँटसीचा मुखवटा चढवून. इथल्या काचेच्या चंद्राचं चांदणं कितीही झगमगतं दिसलं तरी राहीलं आभासीच. समाजातल्या काळ्या वास्तवाला उलट एक रुपेरी झिलई चढवण्याची किमया त्यामुळे सहजी शक्य झाली.

या सार्‍याचं अगदी सहजी नजरेसमोर येणारं उदाहरण म्हणजे सिनेमांच्या पडद्यावर आत्तापर्यंत साकार झालेली 'लग्न'. फिल्मी भाषेतच बोलायचं तर 'शादी'.

सिनेमांमधे लग्नाशी संबंधित चित्रपटांची सुरुवातीच्या काळापासून मोठी परंपरा आहे. अगदी आधीचे सामाजिक समस्यांवरचे 'कुंकू' किंवा 'अछुत कन्या' पासून 'वर्‍हडी वाजंत्री' ते 'नवरी मिळे नवर्‍या' ला आणि अलीकडच्या सनई चौघडेसारखे मराठी सिनेमे असोत, बटबटीत पंजाबी लग्न भव्यपणे हिंदी पडद्यावर आणणारे चोप्रा-जोहर असोत किंवा अलीकडच्या काळातले पार्टनर स्वॅपिंगवर आधारीत मल्टिप्लेक्सी मुव्हीज असोत 'लग्न' हीच मुख्य थीम.

हिंदी-मराठीच कशाला? हॉलिवुडच्या सिनेमांमधेही 'वेडिंग' या थीमशी संबंधित चित्रपटांची अक्षरशः भली मोठी यादीच आहे. अगदी १९३५ साली आलेल्या 'द वेडिंग नाईट' पासून २००९ मधल्या 'ब्राईड वॉर्स' पर्यंत. या अशा सिनेमांमधून दिसणार्‍या लग्नांमधे किती तोच तोचपणा आहे, किती वेगळेपणा आहे, दिखाऊगिरी किती आणि वास्तव किती यावर नजर टाकली तर आपोआपच एक मोठा वेगवेगळ्या संस्कृतींचा एकत्रित ओघ त्यातून दिसतोय असं वाटतं.

------------------------------------------

साठ सत्तरच्या दशकातले अगदी मोजके अपवाद वगळता पडद्यावर आलेला प्रत्येक हिंदी सिनेमा कुठेना कुठेतरी लग्नाशीच संबंधित होता. सिनेमातलं सगळं काही शेवटी होणार्‍या लग्नाच्या दिशेनेच चाललेले. त्याचे-तिचे भेटणे, त्यांचे लडाई-झगडे, त्यातूनच मग ती सुप्रसिद्ध मोहोब्बत, प्यार के वादे-इकरार वगैरे. मग लग्न ठरवणे, खानदान की इज्जत, मग अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, हाणामार्‍या, दु:ख, जुदाई मग परत एकत्र येणे आणि या सार्‍या प्रवासानंतर (प्रत्येक टप्प्यावरची प्रसंगांना अनुसरुन गाणी ऐकल्यानंतर अर्थात)एकदाची शेवटी येणारी 'द एन्ड'ची पाटी हिंदी सिनेमाचा प्रेक्षक जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा अर्थ त्याच्या मनात आपोआप 'तो आणि ती सुखाने नांदू लागले' असाच इंटरप्रिट केला जाईल अशीच रचना त्या अख्ख्या सिनेमाची.

काही सिनेमांमधे लग्न अ‍ॅक्चुअली दाखवली आणि तरीही स्टोरी पुढे सरकत राहीली खरी पण तो प्रवास बहू, सांस्,देवर वगैरे नात्यांच्या खाचखळग्यांमधूनच जाणारा राहीला. थोडाफार दर्दभराच हा प्रवास! त्याचाही प्रेक्षक स्वतंत्र. पण तो असतोच. म्हणून मग हा प्रवास.

काही थोडंफार वास्तवाचे भान असणार्‍याच दिग्दर्शकांनी चक्क वैवाहिक जीवन, त्यातले ताण-तणाव, समज गैरसमज वगैरेही दाखवले. किंवा मोडलेली लग्नंही. ती कां मोडली यावर भाष्य,विश्लेषण मात्र फारशी सखोल नव्हती. नातेसंबंधातली गुंतागुंत, गहराई ही कुठे ना कुठे कळत न कळत म्हणा किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या अशा चित्रपटांमधूनही बहुतांशी शेवटी सुखी होणार्‍या लग्नाशीच संबंधीत राहिली.
भारतीय लग्नसंस्कृतीतला पडद्यावरच्या आणि प्रत्यक्ष आयुष्यातही जाणवण्यासारखा बदल झाला गेल्या काही वर्षांमधे.

१९९४ मधे 'हम आपके है कौन' पडद्यावर झळकला. आणि त्यातल्या निशा आणि प्रेमच्या लग्नाने संपूर्ण भारतातल्या लग्नसंस्कृतीतच आमुलाग्र बदल घडवून आणला. तोपर्यंत 'लग्न' हा एक धार्मिक समारंभ म्हणूनच प्रामुख्याने मानला गेलेला. त्या त्या घरांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, सामाजिक प्रतिष्ठेनुसार हे लग्नसमारंभ 'दणक्यात', 'साधेसुधे' 'जेवणावळ-पंगती' सोबत कधी कधी 'रिसेप्शन'ही असणारे असे पार पडत होते. पण मग हा सिनेमा आला आणि लग्नसमारंभ बघता बघता एक 'इव्हेन्ट' झाला. त्याना 'शोकेस'चं स्वरुप आलं. डिझायनर साड्या, प्रोफेशनल मेकप, मेहेंदी-संगित, व्हिडिओ शुटिंग, पंचतारांकित बुफे, स्टेज डेकोरेशन्स, थीम, डिजे, बारात, फुलांच्या पायघड्या, पालखी, बिदाई.. एक ना दोन. शोकेसमधल्या सजावटीला अक्षरशः उत येत गेला. 'HaHK' काय कमी होता म्हणून मग त्यानंतर २००१ साली आला मीरा नायरचा 'मान्सून वेडिंग'. मग २००४ ला गुरिन्दर चढ्ढाचा 'ब्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडिस' आला.

जोहर-चोप्रा ब्रॅन्ड सिनेमे मधल्या काळात येतच होते. यावेळीच परदेशातल्या 'वेडिंग प्लॅनर्स' मंडळींचा यात शिरकाव झाला. एन आर आय मंडळींच्या हौसेमौजेला 'भारतीय लग्नां'मुळे एक नवे झगमगते परिमाणच लाभले आणि बघता बघता ही भारतीय लग्नं जगभरात 'अ बिग फॅट इन्डियन वेडींग' म्हणून 'ब्रॅन्डेड' झाली. मिलियोनेर वेस्टर्नर्स त्यासाठी जयपूर उदयपूरचे महाल, ताज हेरिटेजचे स्वीट्स महिनोनमहिने बुक करुन या 'एक्झॉटिक इव्हेन्ट्स'चा आनंद लुटायला लागली. त्यासाठी भारतातल्या काही शहरांत खास 'वेडिंग मॉल्स' बांधले गेले. भारतातली ही नवी 'लग्न-संस्कृती इतकी भरभराटीला आली की न्यूयॉर्क टाईम्सने तिची दखल ' अकरा बिलियन यूएस डॉलर्स' इतक्या प्रचंड ताकदीची आणि दरवर्षी २५% वेगाने वाढत जाणारी 'वेडिंग इंडस्ट्री' म्हणून घेतली.

असं म्हणतात एखादी परंपरा पिढ्यानपिढ्या वाहती रहाते तेव्हा एक संस्कृती जन्माला येते. भारतीय 'लग्नसंस्कृती' आहे त्या स्वरुपात विकसित व्हायला अशाच अनेक पिढ्या उलटून गेल्या असणार. आणि मग अशी नेमकी कोणती ताकद या हिन्दी सिनेमांमधे होती / आहे की त्यांमुळे ही संस्कृती एका पिढीपेक्षाही कमी काळात अशी आमुलाग्र बदलून जावी?
सिनेमांचा प्रभाव संस्कृतीवर इतका पडू शकतो? की सिनेमा संस्कृती हीच आपली संस्कृती मानणारी एक नवी पिढीच आता उत्क्रांत झाली आहे?

'फादर ऑफ द ब्राईड' सिनेमामधे 'डिझायनर वेडिंग' हवं असा हट्ट करुन बसलेल्या आपल्या मुलीच्या आणि पत्नीच्या भरमसाठ पैशांची उधळपट्टीने हैराण झालेला वधुपिता (स्टीव्ह मार्टिन) म्हणतो," मला वाटत होतं 'लग्नं' हा एक साधासुधा प्रकार आहे. मुलगा आणि मुलगी भेटतात, प्रेमात पडतात, तो तिच्यासाठी अंगठीची खरेदी करतो, ती स्वत:साठी पोशाख निवडते आणि मग ते दोघे 'आजन्म एकत्र रहाण्याच्या' शपथा घेतात. पण असं समजणं ही माझी चूक होती. त्याला दोघांचं 'लग्न होणं' म्हणत असावेत बहुतेक. 'लग्न-समारंभ' हा एक मला सर्वस्वी अनोळखी प्रकार आहे. अनोळखी आणि महागडा." हे वाक्य म्हणणारा स्टीव्ह मार्टिन पाहिला आणि मजाच वाटली. सिनेमांमुळे 'लग्नसंस्कृती' बदलली म्हणताना अजून एका सिनेमातच त्यावरची टीका ऐकायला मिळावी!

ठरवून केलेली लग्न किंवा अ‍ॅरेन्ज्ड मॅरेजेस हे भारतीय समाजपद्धतीमधले एक महत्वाचे, अगदी युनिक असे अंग. भारतीय लग्नसंस्कृती उभारली गेली आहे तीच मुळी दोन कुटुंबांनी आपल्या मुलामुलींची लग्ने जुळवायची आणि दोन कुटुंबांमधले नातेसंबंध दृढ करायचे याच समजुतीच्या पायावर. अर्थातच मग कुटूंब आणि ज्यांची लग्न होणार असतात ते दोघे यांच्यातला संघर्ष लग्न ठरताना आणि झाल्यावरही होणे अटळ असते.
अर्थातच त्यामुळे पटकथाकारांना पडद्यावर रोमॅन्टिक, नाट्यमय प्रसंग, संवाद, गाणी पेरायला पुरेपुर स्कोपही मिळत असे त्यामुळे प्रेक्षकही खुश. गेल्या पिढीतल्या या नायिका नायकावर कितीही जीव तोडून प्रेम केलं तरी 'शादी मां बाप के मर्जीके बिना' होणार नाही हे मान्य करणार्‍या होत्या. अगदी यश चोप्रांच्या रोमॅन्टिक 'कभी कभी' मधली राखीही अमिताभला त्याच्या शायरीचं स्फुर्तीस्थान आपणच आहोत हे माहित असूनही, त्याच्यावर प्रेम करुनही, आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणे नाकारताना अगदी 'आपल्याला तसा अधिकारच नाही' वगैरे सांगत अमिताभला समजावते. यातूनच मग पुढे वेगळ्या धार्मिक, सांस्कृतीक पार्श्वभुमीवरचे, लग्न ठरताना होणार्याश संघर्षांवरचेही चित्रपट प्रचंड गाजले. उदा. एक दुजे के लिये, बॉम्बे.

नव्या पिढीच्या सिनेमांमधुन या संघर्षाचे अधिकच तीव्र पडसाद उमटणे अपरिहार्य होते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांची पुढची पिढी या संघर्षाला कशी सामोरी जाते, भारतीय लग्नसंस्कृतीचा हा अविभाज्य भाग समजावून घेण्याच्या प्रयत्नात त्यांना येणारे यश-अपयश हेही हिंदी सिनेमांमधे दिसले. नागेश कुकनूरच्या हैद्राबाद ब्ल्यूज हा याअर्थाने पहिला प्रातिनिधीक चित्रपट म्हणायला हरकत नाही. विपुल शहाचा 'नमस्ते लंडन' याच संघर्षावर बेतला होता.

झुंपा लाहिरीच्या कादंबरीवर आधारीत, मिरा नायरच्या 'द नेमसेक' मधून याच संघर्षाचा एक वेगळा पैलू अवचित दिसला. सर्वसाधारणपणे स्वैराचारी, मुक्त, संसार मोडणारी बहू दाखवायची तर ती पाश्चात्य असा एक प्रचलित प्रघात हिंदी सिनेमाने रुढ करुन दिला होता त्याला 'द नेमसेक'मधल्या लग्नातून छेद गेला.
आपल्या परदेशात जन्मलेल्या मुलाचे लग्न तिथेच जन्मलेल्या मुलीसोबत करुन द्यायला लागणार हे नाईलाजाने मान्य केलेल्या तब्बूला त्यातल्या त्यात ती मुलगीही भारतीय, अगदी आपल्यासारखीच सुसंस्कृत बंगाली घरातल्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेलीच असावी असं वाटतं आणि आपल्या मुलाचे लग्न ती हट्टाने अशा एका मुलीशी लावून देते. पण नंतर ती मुलगी दुसर्‍याच एका मुलावर आधीपासून प्रेम करत असलेली, पण आईवडिलांच्या आग्रहामुळे लग्न करायला मान्यता देणारी निघते. लग्नानंतरही ती आपलं प्रकरण चालूच ठेवते आणि मग नंतर अपरिहार्यपणे त्यांचा घटस्फोट होतो. मुलगा नंतर एका समजुतदार, त्याच्यावर आधीपासून प्रेम करणार्‍या अमेरिकन मुलीशी लग्न करुन खरा सुखी होतो. 'द नेमसेक'मधे परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबातील इतर सामाजिक बदलांना यशस्वीपणे तोंड देणार्‍या पण लग्नसंस्कृतीमधले पारंपारिकत्व अट्टाहासाने जपायचा प्रयत्न करणार्‍या भारतीयांची मानसिक ओढाताण छान दिसून आली.

क्रमशः--

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.
लेखिकेने निवडलेला विषय भावला. या विषयाबद्दल अभिनंदन !

सिनेमाने संस्कृतीवर प्रभाव टाकलाय असं मला वाटतं. सिनेमापेक्षाही दूरचित्रवाणीने जास्त बदल घडवून आणलेत. विशेषतः डिश अ‍ॅण्टेनाच्या सहाय्याने विदेशी वाहिन्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर समाजाची मानसिकता आणि संस्कृती यात बदल घडून आल्याचं दिसतं. भारतातल्या लोकांना काटकसरी सवयी सोडून चंगळवादी बनवण्यासाठी नियोजनबद्ध असे कँपेनिंग झाले असे आता निश्चित म्हणता येईल. काळाची हीच पावले ओळखून सिनेमातही बदल झाले आणि कुठल्याही गोष्टीला लार्जर दॅन लाईफ बनवून पेश केलं गेलं. राजश्रीनेच बनवलेल्या नदिया के प्यार या सिनेमाचा रिमेक करताना या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेल्या ज्या लोकांना भावल्या आणि सुरू झालं लग्नाचं मार्केटिंग..

हल्ली तर सिरीयलमधल्या लग्नाचंही जसं काही खरंखुरं लग्न असल्यासारखं मार्केटिंग केलं जातं. आमंत्रणं छापली जातात. एखाद्या स्टेडियममधे हा सोहळा वगैरे पार पाडला जातो. सिरीयल्समधल्या अभिनेत्री या ब-याचदा विवाहीत असतात. आपल्याच बायकोच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळण्याचं भाग्य किती नव-यांना मिळत असेल ? ( अर्थात आता तिने सात फेरे मारल्यानंतर पुढचं पाहू असा विचार जुनं द्या नवं घ्या संस्कृतीत वाढलेले आधुनिक नवरे करीत असावेत आणि ते ही (अति)उत्साहाने लग्नाला हजर राहत असावेत. )

सिनेमांचा प्रभाव संस्कृतीवर इतका पडू शकतो? की सिनेमा संस्कृती हीच आपली संस्कृती मानणारी एक नवी पिढीच आता उत्क्रांत झाली आहे?>>>>> खूप अचूक!

गडबड!

नदीया के पार या चित्रपटावरून घेतला आहे ! मुळ चित्रपट मस्त आहे बघायला.
नाहीतर सुरजराव बडजात्या यन्चा बडेजाव अन्गावर येतो.

नदीया के पार या चित्रपटावरून घेतला आहे ! << तो हम आपके है कौन.
डिजे म्हणतेय तो हम दिल दे चुके सनम. त्याची कथा वो सात दिन सारखीच आहे.

की सिनेमा संस्कृती हीच आपली संस्कृती मानणारी एक नवी पिढीच आता उत्क्रांत झाली आहे?<<
जर नाटक, नृत्य आणि गाणं हे आपल्या संस्कृतीचा भाग असेल तर सिनेमा हा संस्कृतीचा भाग होत नाही का?

जर नाटक, नृत्य आणि गाणं हे आपल्या संस्कृतीचा भाग असेल तर सिनेमा हा संस्कृतीचा भाग होत नाही का?>>> होऊ शकण्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे माध्यम इतर सर्व कलांपेक्षा कितीतरी जास्त ताकदीने 'मेक बिलिव्ह' करु शकते, (सिनेमातले लग्न तंतोतंत खर्‍या लग्नासारखेच भासते) त्यामुळे ते वापरणार्‍यांवर जास्त जबाबदारी येते असे नाही का?

तो पुढचा मुद्दा रे आगावा. त्याबद्दल दुमत नाही पण मी फक्त त्या कॉपीपेस्टेड वाक्यावर बोलत होते.

शर्मिला, कितीही लिहिले तरी अनेक चित्रपट राहून जाणारच. मला आठवताहेत त्या २/४ चित्रपटांचा उल्लेख करतोय.
१) बालिका वधू. सचिन आणि रजनी शर्मा.. (लग्नाचा अर्थच न कळलेली, बालिका..बडे अच्छे लगते है...)
२) साहब, बीबी और गुलाम (नवर्‍याला आपलेसे करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारी छोटी बहू)
३) फागुन : वहिदा रेहमान, धर्मेंद्र, जया भादुरी (आपले लग्न अयशस्वी झाल्यावर मूलीच्या संसारात ढवळाढवळ करणारी सासू.)
४) दर्पण : सुनिल दत्त, वहिदा रेहमान (लग्नानंतरही एका विचित्र मानसिक अवस्थेत सापडलेली बायको)

यापैकी कुठल्याच चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण वगैरे नव्हता !

विषयाशी (लग्न) अवांतर पोस्ट असली तरीही लग्न न करता आई झालेल्या नायिकेवर एक अतिशय सुंदर सिनेमा पाहीला. कुंदन शाह सारख्या ताकदीच्या दिग्दर्शकाने "क्या कहना" ला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. त्या वेळेपर्यंत समाजाचीही धारणा बदलत गेली होती.. त्याच वेळेला समाजाचा आरसा म्हणून हा सिनेमा आला असं म्हणुयात.

हम आपके आणि हम दिल दे चुके हे दोन्ही सिनेमे अशक्य वेळा पाहीले आहेत. अनेक कारणे आहेत - माधुरी, ऐश, सलमान, श्रीमंतीचा भपका, साड्या, दागिने, नृत्य, गाणी, मोठाल्या हवेल्या इ. इ. पण हम आपके मधे एकत्र कुटुंबातील मजा छान वाटते - निदान बघायला तरि. Wink पण हम दिल दे चुके म्हणजे एक चेष्ठा आहे. तो वनराज (अजय) चांगला प्रेम करत असतो, स्पेन का कुठेतरी हनीमूनला नेल असत की त्याने बायकोला पण नाही ही बया सगळा ड्रामा करून शेवटी समीरला ठेंगा दाखवते आणि वनराजला स्वीकारते. पण सिनेमा सुंदर दिसतो म्हणून आवडतो.
लेख आवडला. अजुन येउदेत.

Pages