अंतिम सत्य!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

नुकतेच श्री सत्य साई बाबा यांचे निधन झाले. देव त्यांना सद्गती देवो!

अनेक वाहिन्यांवरून त्याबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या कारभार, आयुष्याबदल अनेक गोष्टी पुन्हा दाखवल्या गेल्या. त्यांचे अनेक भक्त आहेत देश, विदेशात, अनेक क्षेत्रातील अन अनेक सामाजिक स्तरात देखील. बाबांचे कार्य मोठे आहे, समाजाकरिता त्यांनी खूप काही केले आहे हे प्रत्त्यक्षात पुट्टपर्थीला जाऊन आलेले सांगतात /मानतात. लहानपणापासून बाबांच्या चमत्कार /जादू इ.च्या कथा ऐकून आहे. बु.प्रा. वाद आणि श्रद्धावाद या दोन गटांत यांवरून कायम वाद आहेच. प्रत्येकाची आपापाली कारणे, स्पष्टीकरणे. त्यापासून मी मुळातच दूर आहे- माझा वैयक्तिक स्वभाव म्हणा. पण चमत्कार, गंडे, दोरे, विभूती इ. सर्व मला वैयक्तिक कधीही अपिल झालेले नाही. "जो काही अनुभव आहे" तो वैयक्तिक असतो अन तो स्वतःला पटल्याशी मतलब, हे मी मान्य करतो. "तसा" काही अनुभव सत्यसाईबाबांच्या बाबतीत मला नसल्याने त्याबद्दल कुठलेच भाषण करणे योग्य नाही. एक आहे- लाखो लोकांच्या सेवा, शिक्षण, आरोग्य यासाठी सुविधा अन पैसा ऊपलब्ध करून देणार्‍या बाबांचे "देवपण" व्यावहारिक अर्थाने निश्चित मान्य केले तरी मग ते सिद्ध करायला कुठल्याही चमत्कार/जादू इ. ची गरज खुद्द बाबांनाही उरत नाही. तसे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता या एका साशंकतेमुळेदेखील मी "त्या" वाटेला गेलो नाही असे मला वाटते. अर्थात यात "अनुभवाविण ज्ञान व्यर्थ आहे" याचा दोष माझा आहे.

पण क्रिकेटचा देव आणि आमचा सर्वांचा लाडका सचिनदेखील बाबांच्या अंतिम दर्शनाला उपस्थित राहिला आणि त्याने त्याचा वैयक्तिक शोक/दु:ख प्रकट केले ही एक बाब कायम स्मरणात राहील. सचिनदेखील शोकमग्न झाला हे पुरेसे आहे. (अर्थात तोही माणूस आहे, त्याला भावना आहेत). एरवी एखाद्या बाबा, बुवा, वा महाराजांनी दिलेली बॅट वापरली म्हणून मी आजवर यशस्वी होत आलो, असे म्हणणारा सचिन नाही. दगडाला लाथ मारून पाणी काढण्याची क्षमता अन प्रयत्न/जिद्द त्याच्याकडे आहे हे त्याने सिद्ध केले आहे. पण असा कर्म/ कर्तृत्व/ प्रयत्न यांवर विश्वास ठेवणारा आजच्या पिढीचा आदर्शदेखील जेव्हा अशा प्रकारे काही वैयक्तिक गोष्टी उघड करतो तेव्हा आयुष्यात "श्रद्धा" याचे स्थान मह्त्वाचे आहे हे मान्य करावे लागते. सचिन प्रमाणेच इतरही प्रथितयश, सुशिक्षीत वगैरे अनेक लोक सत्य साई बाबांचे आशीर्वाद घेत असत हेही ऐकून आहे. तेव्हा थोडक्यात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे.

माझ्यापुरते बोलायचे तर श्री सत्यसाई बाबांनादेखील जीवन-मरणाच्या शेवटच्या संघर्षात, आय.सी.यू. मध्ये ठेवून तज्ञ डॉक्टरांचे ऊपचार घ्यावे लागले हे एक अंतिम सत्य आहे! जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला मृत्यू अटळ आहे, व्यावहारीक संघर्ष सर्वांना अटळ आहे, मग ही एक बाब स्वीकारून मनाने या व्यावहारीक चक्रातून मुक्त झालेला मनुष्य अधिक समाधानाचे, परीपूर्ण, आनंददायी असे आयुष्य जगत असेल काय? प्रयत्न, श्रद्धा, दैव, देव, वगैरे अनेक संकल्पनांचे चवितचर्वण केल्यावर शिल्लक काय रहाते- आयुष्य कसे जगलो, आणि मृत्यूनंतर मागे काय शिल्लक राहिले? कुठे जन्म घेऊ आणि कधी मरण येणार हे माहीत नाही- अंतिम सत्य जर इतके स्वच्छ आणि कटू असेल तर निदान एका आयुष्यात आपल्या बरोबर इतर चार जणांचे कल्याण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर ते आयुष्य "सार्थकी" लागले! त्या अर्थाने आपले चांगले कर्म हेच आपल्या हयातीत अन आपल्या पश्चात असलेली आपली लाईफ इंश्युरंस पॉलिसी आहे असे म्हणावे लागेल. सोन्याची तुला, सिंहासने, इत्यादी रत्नजडीत श्रद्धांचा सोन्याचा बाजार मांडणारे आपण "सोन्यासारखी" माणसे कधी होणार आणि मिळवणार? सत्य साई बाबांच्या जीवन आलेखातून हा संदेश प्रामुख्याने पुढे आला तरी समाधान होईल.

"जन पळभर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहील कार्य काय..."

रच्याकने: श्री सत्त्य साई बाबा यांचे मूळ नाव काय आणि त्यांना ही उपाधी/पदवी कशी मिळाली यावर कुणी प्रकाश टाकू शकेल काय?

(शुध्दलेखन सहाय्यः शैलजा)

विषय: 
प्रकार: 

योग, याबाबतीत अगदी एकमत आहे आपले. कुणी कुणावर श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्या श्रद्धा / अश्रद्धा कुणावर लादणार नाही, कुणाला पटवून द्यायचाही प्रयत्न करणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेला धारेवर देखील धरणार नाही.

हे सगळे माझ्यासाठी, तूम्ही अंघोळीचा कुठला साबण वापरता, या प्रश्नाइतके निरर्थक आहे. म्हणजे माझ्यासाठी ती बाब महत्वाची असू शकते, पण इतरांसाठी नाही.

आणि अंतिम सत्य कुणाला चुकलेय. मग म्हणायचे अवातार होता.. जय हो !

दिनेशदा,
मान्य! पण तसे करूनही श्रध्धेचा बाजार भरायचे काही थांबत नाही.. कुणाची टपरी, कुणाचे छोटेखानी दुकान, तर कुणाचा महाल, कुणाचा मॉल... धंदा तोच आहे!!!

असो.
हा लोकसत्ताचा लेख, उल्लेख न करता बरेच निर्देश केले आहेतः
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152...

अनुमोदन.
आत्ता तर खरे तमाशे सुरू होतील. उत्तराधिकारी, कोर्ट, कचेर्‍या.
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे ही आरोप होते ना त्यांच्यावर?

श्री तेंडुलकरांना पाहून वाईट वाटले. असो.

मूळ नाव : सत्यनारायण राजू. जन्म : २३.११.१९२६
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपण साईबाबां(शिर्डी)चा अवतार असल्याचे घोषित केले.

थोडक्यात स्वयंघोषीत? आणि सर्वांनी ते मान्यही केले का?

असो.
रैना,
खुद्द पंतप्रधान आणि सोनिया मॅडम देखिल ऊपस्थित झाल्यात... आता बोला.. राष्ट्रीय दुखवटा पाळणार का? (एकही संधी सोडत नाहीत! अण्णांच्या आगीत भाजल्यावर ही असली मलमं लावत फिरायचं... दुसरीकडे कलमाडींचा बाजारातील भाव शून्य झाल्यावर त्यांना आता आत टाकलय.. त्यावरही स्वताचा भाव वाढवून घ्यायचा हे असले राजकारण आहे. १% भावना, ९९% बाजार!)
बाकी अशा अनेक वि.वि.आय्.पि. च्या आगमनाने आम भक्त जनांची चांगलीच अडचण झाली असे ईतर वृत्तपत्रात दिले आहे. असो.. जे जे होत आहे ते ते पहावे!

http://www.indianexpress.com/news/the-baba-i-knew-he-will-be-with-us/780...
पंजाबचे सध्याचे राज्यपाल व भारताचे माजी गृहमंत्री ह्यांनी लिहिलेला हा लेख.
तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपयी आणि माजी सरन्यायाधीश पी एन भगवती व रंगनाथ मिश्रा ह्यांनीदेखील एक खुले पत्र लिहिले होते सत्यसाईबाबांवर आरोप बिनबुडाचे आहेत म्हणुन. मला जितके आठवते त्यानुसार हे पत्र सरकारी/पोलिस चौकशी वगैरे व्हायच्या आधीच दिले गेले होते. बहुतेक Indian Skeptic मध्ये ह्यावर काही वाचनीय लेख आले होते.
तसेच १९९३ साली सत्यसाईबाबांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला व त्यात एकूण सहा जण मेले होते (दोन भक्त-सेवक व चार मारेकरी). चारही मारेकरी point-blank range वरून गोळी झाडून मारण्यात आले होते. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी संदिग्ध आहे. फारशी माहिती आजदेखील उपलब्ध नाही.

>>> योग, याबाबतीत अगदी एकमत आहे आपले. कुणी कुणावर श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्या श्रद्धा / अश्रद्धा कुणावर लादणार नाही, कुणाला पटवून द्यायचाही प्रयत्न करणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेला धारेवर देखील धरणार नाही.

हे सगळे माझ्यासाठी, तूम्ही अंघोळीचा कुठला साबण वापरता, या प्रश्नाइतके निरर्थक आहे. म्हणजे माझ्यासाठी ती बाब महत्वाची असू शकते, पण इतरांसाठी नाही. >>>>

हे आर्ग्युमेंट जेव्हा अनेक सश्रद्ध/श्रद्धाळू/अंधश्रद्धाळू बहुमताच्या/बहुसंख्येच्या जोरावर अज्ञेयवादी/अश्रद्धांची वाट लावतात तेव्हा फोल ठरते. म्हणुनच 'आंघोळीच्या साबणाच्या निवडीइतकी' ही गोष्ट क्षुल्लक नाही. आणि श्रद्धाळूंची गर्दी झाली की हे होणे अपरिहार्य कारण मुळात श्रद्धेला तर्काचा आधार नाही. ती भावनेवर आधारीत असल्याने तीत तुम्ही विरुद्ध आम्ही असा भाव असतो. ह्याची ज्वलंत उदाहरने संपूर्ण इतिहासात आढळतात (धार्मिक श्रद्धेची उदाहरणे अधिक दिसतील पण राजकीय-सामाजिक विचार केवळ विचार न उरता पोथिनिष्ठ श्रद्धेत बदलल्यावर पण हेच होते. उदा: साम्यवाद).

मला प्रकर्षाने डॉक्टर अब्राहम कोवूर आठवून गेले...त्यांची अंधश्रद्धेवरची पुस्तकं आठवून गेली..... तो पहीला मनुष्य होता सत्य साईबाबा या कल्ट्च्या विरोधात उभा ठाकणारा... असो. इक कहानी खत्म हुई! माझ्यासाठी तेंव्हांच संपलेली जेंव्हा त्या लहान मुलांच्या छळाच्या अन हत्येच्या कथा आल्यात.. असो !

त्यांचे खरे नाव माहीत नाही पण १९४० साली त्यांनी स्वता:ला साई बाबाचा अवतार म्हणुन घोषीत केले ..
ते स्वयंघोषीत साई बाबा आहेत..

शिर्डी च्या(ओरिजिनल) साईबाबां कडे तेंव्हा १.५ लाख रु. सुध्दा नसतील.. आणी ते गावाबाहेर झोपडी मधे राहत होते..
आजकाल १.५ लाख करोड रु. ची संपत्ती असलेलाच व्यक्ती भारतात साई बाबा होऊ शकतो नाही का? Proud
वरून सोन्या चांदीने सजवलेल्या महालातच राहत होते ना हे साईबाबा..

कोणपण येऊन कोणाशी तुलना करतेय आणी लोक पण (अंध) विश्वास ठेवतात.. Uhoh

आत्ता तर खरे तमाशे सुरू होतील. उत्तराधिकारी, कोर्ट, कचेर्‍या.>>>अगदी .. अगदी.. मग स्वाध्याय पेक्षा लाख पटाने मोठ्ठा तमाशा होणार.. ४ कि ५ उत्तराधिकारी आहेत.. फूल टू एन्टरटेनमेंट!!

अंतिम सत्य तर प्रत्येक वेळेस दिसतच नशीब त्यांच्याच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गेले नाही तर न जाणो ओरड झाली असती.. "महासमाधी' घेतली.. श्रद्धाळू लोकांचा काही भरोसा नाही.. (nothing against them.. but there is a limit to what u believe in )

(nothing against them.. but there is a limit to what u believe in ) >> the sentence is oxymoronic

खरे तर मलाही आश्चर्य वाटलेले सचिन बद्दल एकून. मग वाटले हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्ण आहे. पण तरीही...

>>माझ्यापुरते बोलायचे तर श्री सत्त्य साई बाबांना देखिल जीवन्-मरणाच्या शेवटच्या संघर्षात, आय.सि.यु. मध्ये ठेवून तज्ञ डॉक्टरांचे ऊपचार घ्यावे लागले हे एक अंतीम सत्त्य आह>><<
अगदी अशीच माझ्या मैत्रीणीबरोबर चर्चा चाललेली की इतके चमत्कार करणारा माणूस शेवटी ह्यातून जातोय.. वगैरे.. असो.

विकिपेडियात माहिती मिळाली की, आंध्रचे होते ते वगैरे.. सत्या राजू नाव...

थोडक्यात स्वयंघोषीत? आणि सर्वांनी ते मान्यही केले का? >>>>
बकरी चरायला नेणाऱ्या एका व्यक्तीला साक्षात्कार होतो आणि जगातला ??? क्रमांकावारचा ??? निर्माण होतो.. ह्यावर सगळे विश्वास ठेवतात तर .. ये तो कीस खेत कि ... आणि भावनिक गरज जेव्हा इतक्या सगळ्या संकल्पान निर्माण करायला लावतात त्यात काही तरी तथ्य असेल का . काय सांगता असेल हि.. झुकती है दुनिया ....

but there is a limit to what u believe in ) >> the sentence is oxymoronic>>>> sure . ते हि अगदी खरय.. Happy

सचीन गॉड बद्दलही यातूनच बोध घ्यावा: तो क्रिकेटचा गॉड आहे, त्याचे देवत्व तिथेच ठेवावे. त्याच्याकडुन तिथे शिकण्यासारख्या गोष्टी शिकाव्यात, बाकीच्या अझ्युम करु नयेत.

टण्याला अनुमोदन (दोन्ही पोस्टींना)

टण्या आणि अस्चिगला अनुमोदन.

(योग, तेवढं शीर्षक नीट कर ना. 'अंतिम सत्य' असं हवं ते. सत्त्य असा उच्चार असला तरी तसं लिहीत नाहीत. लेखातही सगळीकडे 'सत्त्य', 'प्रत्त्यक्ष' असं लिहिलं आहेस ते खटकतंय वाचतांना.) Happy

मयताबद्दल चांगले बोलावे असा संकेत आहे.

सत्य साईबाबांवर विश्वास असणे / नसणे ही वैयक्तिक गोष्ट आहे ज्यावर सध्या चर्चा नको असं वाटतं. पुढे कधीतरी होईलच.

तुलना अस्थानी आहे तरी मोह आवरत नाही..
हजारो कोटी रूपये सहजी घशात घालणा-यांचे जर फॅन फॉलोअर्स असू शकतात आणि अशांना कायद्यातून सूट असेल तर भक्ताला त्याचं समाधान स्वतःच्या पद्धतीन आपल्या माध्यमातून होउ देणा-याचा निषेध कुठल्या तोंडानं करायचा ?

सत्य साईंच्या पार्थिवावर उद्या , बुधवारी शासकीय इतमामात दफनविधी केला जणार असून>>>>> हा "शासकीय" मान कोणा कोणाला मिळतो या बाबत काहि मार्गदर्शक तत्वे आहे काय?

दिनेश टण्या आणी आस्चिग ला अनुमोदन. सचिन हा एक उत्तम क्रिकेटपटू आहे इतकेच. त्याने सत्य साईबाबांच्या निधना नंतर आसवे ढाळली तर इतका गजहब करायचे कारण नाही.
योग, तेवढे शीर्षक बदलून त्यात सत्य साईबाबांचा उल्लेख करता आला तर बरे होईल.

निदान एक तरी भोंदु गेला या आनंदात मी रेड वाईन उघडणार इतक्यात श्री श्री रविशंकर यांनी जाहीर केले आहे की सत्य साईबाबा कर्नाटकातल्या मंड्या जिल्यात आणखी सहा वार्षांनी जन्म घेणार! Sad

आत्ता तर खरे तमाशे सुरू होतील. उत्तराधिकारी, कोर्ट, कचेर्‍या>> हे अंतिम सत्य!
आंध्रमधे म्हणे ३ दिवस शासकिय दुखवटाही पाळला. नशिब देशभरात नाही पाळला.

अर्र , म्हणजे पुन्हा कोणीतरी स्वयंघोषित व्हायला मोकळे का?

माझ्या पोस्टचा गैर अर्थ काढला जाईल कदाचित..

मी स्वतः व्यक्तिपूजा, अंधध्रद्धा , भोंदुगिरी यांच्या विरोधातच आहे. पण एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर लगेचच त्याबद्दल नकारार्थी चर्चा सुरू होणं पटलं नाही .. तसच, केवळ विरोधासाठी विरोध असं न पाहता सत्य साईबाबांनी आचार्य धीरेंद्र ब्रह्मचारी, तांत्रिक चंद्रास्वामी यांच्याप्रमाणे आपल्या पोझिशनचा गैरवापर केलाय असं दिसून आलेलं नाही. अशा महाराजांवर विश्वास हा नेहमीच वादाचा विषय राहीला आहे. त्यावर काही काळ उलटून गेल्यावर चर्चा व्हावी इतकंच

अर्थात, उदात्तीकरण होऊ नये ही अपेक्षा आहेच !

>>योग, तेवढे शीर्षक बदलून त्यात सत्य साईबाबांचा उल्लेख करता आला तर बरे होईल.

वि.कु. Happy लेख अंतिम सत्य याबद्दलच आहे.. सत्य साई बाबा हे निमित्त मात्र!

श्यामली,
हम्म्म्म्म बरच काही लिहीता आलं असतं. पण ज्यांना सत्य साई बाबांच्या कार्याबद्दल थेट अनुभव/माहिती आहे, किंवा त्यांच्याबद्दलही काही अनुभव आहे, त्यांच्याकडून अधिक लिखाण अपेक्षित आहे! बाकी "ईतर" गोष्टी मला वाटतं वि.कु. च्या "कल्ट" बा.फ. वर आहेतच... (सत्य साई बाबांबद्दल होते का त्या बा.फ. वर?)

सोनवणे,

प्रश्ण उदात्तीकरण वा टीकेचा नाही. करदाते जनतेचे कोट्यावधी खावून निर्लज्जपणे ढेकर देणार्‍या राजा आणि रावांपेक्षा जनतेच्या कल्याणासाठी कोट्यावधी खर्च करणारे (मग तो ही पैसा करदात्याचा का असेना!) आणि अनेकांच्या आयुष्याला आकार/चांगली दिशा देणारे सत्य साई बाबांसारखे अनेक बाबा केव्हाही स्वागतार्ह आहेत. फक्त त्यातून आपण/भक्तगण काय शिकतो? तो "वसा" आपण घेतो का? का पुन्हा अशी रेडीमेड सेवा देणार्‍या दुसर्‍या बाबांच्या नादी लागतो एव्हडाच प्रश्ण आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती तसे जितके बुवा/बाबा तितके चमत्कार. नापीक जमिनीतून देखिल प्रयोग करून घामाच्या सिंचनाने पिक काढणारे शेतकरी आहेत- तो ही एक चमत्कारच! आदिवासींसाठी मोबाईल फोन हा देखिल एक चमत्कारच ठरेल ! आपण कुठल्या स्तरावर/भूमिकेत आहोत त्यानुसार एखादी गोष्ट आपल्याला चमत्कार वाटू शकते. अशा चमत्कारांनी जनतेचे भले होत असेल तर काही हरकत नाही म्हणावे त्याला "चमत्कार". ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली (कुणि पाहिलय का?) म्हणून ते मोठे की ज्ञानेश्वरी लिहीली म्हणून हे वेगळे सांगायला हवे का?

पण आज सत्य साई बाबा गेले तरी उद्या दुसरे बाबा येतील, नाव वेगळे, बाकी ईतर तोच पसारा. तेव्हा आपला समाज अजूनही या सर्व बाबतीत एकंदरीत किती मागासलेला आहे याचे शल्य आहे, दु:ख आहे.
असो. "आत्मपरिक्षण" गरजेचे आहे, म्हणून हा लेख प्रपंच.

Pages