एखादं छानसं चित्र काढायला घ्यावं, ते मनाप्रमाणे जमतही यावं पण मध्येच लहर फिरल्यासारखे त्यात गडद, उदासिन रंग भरावेत आणि मग असंच फाडून फेकून द्यावं असं काहीसं नियतीने गुरुदत्तच्या बाबतीत केल्यासारखं वाटतं कायम त्याचा विचार करताना. पण त्या चित्राच्या राहिलेच्या, अस्तित्वात असलेल्या खुणा इतक्या विलोभनीय आहेत की आयुष्याच्या या कुटील आणि जटील प्रक्रियांचा राग येतो पण गुरुदत्तच्या अलौकिक प्रतिभेची पाळंमुळंदेखिल अशाच कुठल्यातरी गुंतागुंतीच्या प्रक्रियेत असतील हे जाणवुन स्तब्ध व्हायला होतं.
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण.. ९ जुलै १९२५ ला बेंगलोरमध्ये जन्माला आलेला हा मुलगा पुढे गुरुदत्त नावाने चित्रपट क्षेत्रातला महारथी ठरला.. १९४१-४६ त्याने उदयशंकर यांच्याकडे त्याने ५ वर्षे नृत्य, नाट्य प्रशिक्षण पण घेतलं. त्यावेळी त्याने सादर केलेलम सर्पनृत्य त्याच्या मृत्यूविषयी असलेल्य गूढ ओढीचं प्रतिक होतं का? खरा कलाकार हा नेहमी असमाधानी असतो म्हणतात. पण त्याचं असमाधानी असणं त्याला इतकं अस्वस्थ करुन गेलं का? किंवा का करुन गेलं?उण्यापुर्या ३९ वर्षांचं आयुष्य आणि त्यात सगळं मिळून २० वर्षांचं करीअर. त्यातही सुरुवातीची काही वर्षे किरकोळ भुमिका, सहाय्यक दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक अशी कामं करण्यात गेली.. आणि हा माणुस जगातला एक नामवंत दिग्दर्शक बनला. टाइम्स च्या १० रोमँटीक सिनेमांच्या यादीत त्याच प्यासा आहेच, झालच तर १०० बेस्ट चित्रपटांमध्ये पण त्याचा समावेश आहे आणि तो स्वतः सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक..
गुरुदत्त म्हटलं की खूप पूर्वी लहानपणी कधी बघितलेली त्याची पहिली झलक आजही नजरेसमोर जशीच्या तश्शी उभी रहाते. एक शांत, धीरगंभीर मूर्ती, ठसठशीत चेहरा, विशाल भालप्रदेश, त्याच्यावरच्या नाजुकशा आठ्यांचं जाळं आणि काळेभोर डोळे. त्या नजरेला नजर द्यायचं सामर्थ्य राहु नये, आपल्या आतलं काहीतरी शोषून घेतेय असं वाटायला लावणारी ती नजर. अशी काही वेदना त्याच्या नजरेत आहे की आपसूक नजर खाली तरी झुकावी नाहीतर त्याच्या नजरेतच गुंतून तरी पडावी. त्याच्या चेहर्यावरची ही वेदना कधीच पुर्णपणे नाहीशी झालेली मी तरी पाहिली नाही. अगदी मि. & मिसेस ५५ मध्ये मधुबालासोबतचे नटखट रुमानी प्रसंग करताना पण त्या आठ्या तशाच.. ( and again हे सांगितल्याशिवाय रहावत नाही की हा सिनेमा मधुबालासाठी पाहिलाच पाहिजे. तिने विशीतली अल्लड, लग्नाळलेली, अरागस यौवना अशी काही उभी केलिय की आह..! तिच्या त्यातल्या एका एका वाक्यावर, अदेवर मी हजार जन्म ओवाळायला तयार.. तिच्यावर परत कधीतरी..) पण तिच्यासमोरही हा पठ्ठ्या असा काही उभा राहिलाय की तिच्या त्या अलौकिक वावरापुढे तो अजिबात झाकोळला जात नाही. मोस्ट रोमँटीक जोड्यांमध्ये ही जोडी नक्की..!
फ्रेंच न्यु वेव्ह ची चळवळ अजून व्याख्येत बसायची होती, आकाराला यायचे होती त्यावेळी गुरुदत्तने त्याचा प्यासा बनवला होता. किंबहुना Francois Truffaut चा 400 blows (१९५९), जो खर्या अर्थाने इटालियन निओरीअॅलिझम सिनेमामध्ये प्रयत्नपूर्वक आणणारा प्रयोग म्हणून पाहिला जातो त्याच्या २ वर्षे आधी प्यासा (१९५७) प्रदर्शित झाला होता. 400 blows मधली एका किशोरवयीन मुलाची कथा आणि प्यासामधल्या युवकाची व्यथा ही एकाच पातळीवरची आहे. गुरुदत्त हा खर्या अर्थाने चित्रपटाच्या क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेला, स्वतःची प्रतिभा, विचार असलेला, वेगळ्या वाटा चोखाळणारा एक बुद्धीमान दिग्दर्शक होता. आशियाई सिनेमा त्यावेळी जगात एवढा प्रभावी नसल्यामुळे कदाचित गुरुदत्तचे प्रयत्न व जागतिक पातळीवरील मान्यता मर्यादित राहिली पण त्याहीवेळी त्याचे चित्रपट जर्मनी, फ्रांस आणि जपान मध्ये हाऊसफुल चालत होते हे विशेष.!
'कागज के फूल' हा त्याचा त्याच्या अपेक्षेबाहेर फ्लॉप झालेला एकमेव चित्रपट पण आज हा सिनेमा गुरुदत्तची अजोड कलाकृती म्हणुन पाहिला जातो आणि अर्थातच तो आहे. सिनेमास्कोप चे तंत्रज्ञान पहिल्यांदा हिंदी सिनेमात वापरले गेले ते याच चित्रपटाच्या निमित्ताने. झाली गंमत अशी की त्यावेळी २० सेंच्युरी फॉक्स ही चित्रपटातली प्रसिद्ध कंपनी भारतात काही चित्रिकरण करत होती आणि परत जाताना त्यांच्या लेन्सेस इथेच राहुन गेल्या. त्याचदरम्यान गुरुदत्त 'कागज़ के फूल' साठी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ही बातमी कळाल्याबरोबर लगेच तो आपले सिनेमॅटोग्राफर मुर्थींना घेवुन तिथे पोहचला आणि त्या लेन्सेस त्याने मिळवल्या. त्या चित्रपटात त्याने केलेल्या कॅमेर्याच्या करामती आणि छायाप्रकाशाचा वापर हे कायमच चर्चेत राहिलेले आहेत पण 'वक्तने किया क्या हंसी सितम'च्या वेळी गुरुदत्त विचार करत असताना अचानक सूर्यप्रकाशाची एक तिरीप त्याला दिसली आणि त्याने ठरवलं की असं काहीतरी आपल्याला करायचय आणि मग त्याच्या इच्छेनुसार सेटच्या छतावर सूर्यप्रकाशाचा आणि आरशांचा वापर करुन प्रकाशाचा तो झोत निर्माण केला ज्यात एक झालेल्या गुरुदत्त आणि वहिदाच्या प्रतिमांनी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाची कल्पना त्याला हवी तशी साकारली पडद्यावर. गीता दत्तच्या जादुई आवाज आणि बर्मनदाच्या सूरांच्या पार्श्वभूमीवर कैफी आझमींच शब्द आणि हा छायाप्रकाशाचा केलेला खेळ बघणार्याच्या मनावर कायमचा ठसा उमटवुन जातो हे मात्र खरं..! 'कागज़ के फूल' मधल्या अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल.या चित्रपटात प्रथमच कथा पुढे नेण्यासाठी गाण्यांचा वापर करण्यात आला. ही कथा त्याच्या स्वतःच्या आयुष्याची कथा होती आणि ती स्वत:ची वाटू नये म्हणुन त्याने त्यात अनेक वेळ बदलही केले. त्यातल्या त्याचा आणि वहिदाच्या भेटीचा प्रसंग, वहिदाला पार्टीत पाहिल्यानंतर झालेला त्याचा-तिचा संवाद, त्याचं आणि त्याच्या मुलीचं नातं अशा अनेकानेक गोष्टी माझ्यातरी कायमच्या स्मरणात राहिल्यात.
त्याच्या प्यासाच्या निर्मितीवर एक स्वतंत्र कथा होईल एतक्या गोष्टी त्या चित्रपटाशी निगडीत आहेत. अबरार अल्वीच्या या मूळ कथेचं नाव होतं 'कश्मकश', मूळ नायक होता 'चित्रकार किंवा लेखक', गुलाबोचं पात्र नव्हतंच. अबरार ला माटुंग्याला भेटलेली खरीखुरी गुलाबो गुरुदत्तसमोर त्यांनी मांडली आणि प्यासाची कथा त्याच्या मनात पुर्ण झाली. उच्चभ्रु, पांढरपेशा समाजाच्या तकलादु भावना मांडायला सोन्यासारख्या झळझळीत मनाच्या पण परिस्थितीने वेश्या बनवलेल्या गुलाबोपेक्षा बळकट विरोधी बाजू अजून काय असू शकते? प्यासाचे पहिले काही प्रसंग चित्रित झाल्यावर ते जेव्हा पाहिले गेले तेव्हा सगळ्या लोकांचं मत पडलं की गुलाबोच्या भुमिकेसाठी वहिदा योग्य नाही. तिला बदलण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव पण आला पण त्याने ऐकलं नाही. पुढ कलकत्त्याला जाऊन जेव्हा 'जाने क्या तुने कही' चित्रित झालं, ते पाहिल्यावर मात्र सगळ्यांनी एकमताने निर्वाळा दिल की हीच गुलाबो. बाकी त्या गाण्यात वहिदाने जो काही अभिनय केलाय त्यावर फिदा आपण..! (त्यातली तिची अदाकारी बघून 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल' हे गाणं वहिदा-गुरुदत्त जोडीवर चित्रित झालेलं पहायला काय मजा आली असती राव.! असा विचार कायम मनात येऊन जातो)
'ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या है' म्हणणारा त्याच्यातला नायक आयुष्याकडून बर्याच अपेक्षा करत असावा. त्याची polyamorous relationship ची ओढ मात्र ना गीता दत्त समजू शकली ना वहिदा. काळाच्या पुढे दृष्टी असलेल्या या कलाकाराच्या अपेक्षाही काळाच्या पुढच्या असाव्यात. गुणी आणि सुंदर स्त्रीयांविषयी त्याला कायमच आकर्षण राहिलं त्याच्या आयुष्यभर. विजया-गीता-वहिदा.. आणि यातल्या कोणा एकीला निवडायची त्याची इच्छा नव्हती. खासकरुन गीता-वहिदा मध्ये. एकदा गुरुदत्त म्हणालेला, "लाइफ में यार क्या है। दो ही तो चीज है, कामयाबी और फेल्युअर। इन दोनों के बीच कुछ भी नहीं है। देखो ना, मुझे डायरेक्टर बनना था, बन गया, एक्टर बनना था बन गया, पिक्चर अच्छी बनानी थी, अच्छी बनी। पैसा है सबकुछ है, पर कुछ भी नहीं रहा।"
त्याच्या आयुष्यात त्याने ज्या लोकांना चित्रपटांसाठी निवडलं ते मात्र शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिले. जॉनी वॉकर, अबरार अल्वी, व्ही.के.मुर्ती.. चित्रपटाच्या यशापयशाचा त्याच्या या नात्यांवर काही परिणाम नाही होऊ दिला त्याने. पण अबरार अल्वीने प्रसिद्ध केलेल्या गुरुदत्तच्या आठवणींत त्याने स्वत:विषयीच जास्त लिहिल्याचं ऐकलं तेव्हा परत एकदा या क्षेत्रातल्या मुखवट्यांची चीड आल्यावाचून राहिली नाही. आणि गुरुदत्तच्या जाण्यानंतर त्यांच्या हातून कोणतीही खास कलाकृती निर्माण झालेली नाही हे विशेष.. असो..
'चौदहवी का चांद' आणि 'साहब, बीबी और गुलाम' हे चित्रपट गुरुदत्तने दिग्दर्शित केले नसले तरी त्यांच्यावर गुरुदत्तची छाप स्पष्ट जाणवते. आणि या चित्रपटांशी कायम त्याचं नाव जोडलेलंच रहाणार आहे. त्याने अभिनेता व्हावं अशी काही त्याची खास इच्छा नव्हती. किंबहुना प्यासासाठी त्याने दिलीपकुमारची निवड केलेली (थँक गॉड तो आला नाही आणि गुरुदत्तने तो रोल केला.)
फ्रेंच न्यू वेव्ह ची जी auteur theory होती ती गुरुदत्तला अगदी तंतोतंत लागू होते. सिनेमा बनवण्यात तंत्रज्ञान असलं तरी त्याची सर्जनशीलता सगळ्या प्रकारचे तांत्रिक अडथळे पार करुन झळाळुन उठायला समर्थ होती.
गुरुदत्तने त्याच्या आयुष्यातलं पहिलं स्वतंत्र दिग्दर्शन वयाच्या २६व्या वर्षी केलं. देव आनंदच्या बाझी चित्रपटाचं. तिथुन पुढे १३ वर्षांचा काळ फक्त.. यानंतरही त्याने काही थ्रिलर चित्रपट बनवले. सी.आय्.डी, आरपार, जाल वगैरे. पण गुरुदत्त म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्याने येणारी नावं म्हणजे, प्यासा, कागज़ के फूल, साहिब, बीबी और गुलाम आणि चौदहवी का चांद..!
त्याच्या या वैयक्तिक आयुष्यातल्या अपयशाने पोखरलेला हा प्यासा मि. ५५, १० ऑक्टोंबरच्या रात्री दारुच्या नशेत झोपेच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन एकटा जावा?"गमसे अब घबराना कैसा, गम सौ बार मिला" असं का नाही म्हटला तो त्याच्या खर्या आयुष्यात? का नाही स्वतःची अशी समजूत काढू शकला?
आपल्या मुलांना एकदा भेटू द्यावं म्हणुन गीता दत्त सोबत झालेलं भांडण पुरं पण करता येऊ नये? आपल्या मुलांना भेटता पण येऊ नये त्याला? 'ये इन्सां के दुष्मन समाजो की दुनिया' ही दुनिया कदाचित तुझ्यासाठी नव्हतीच रे कधी.. पण तरी तू आल्यासारखं थोडं थांबायला पहिजे होतंस... त्याचं या जगात येणं आणि जाणं चटका लावुन जाणारं होतं खरं.. त्याच्याविषयी विचार करताना The Shawshank Redemption मधलं एक वाक्य कायम मनात घोळत रहातं,"Andy being gone. I have to remind myself that some birds aren't meant to be caged. Their feathers are just too bright. And when they fly away, the part of you that knows it was a sin to lock them up DOES rejoice. But still, the place you live in is that much more drab and empty that they're gone." जगातून निघुन गेलेल्या गुरुदत्तच्या संदर्भात जग असंच दिसलंय मला कायम..!
हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला..
Submitted by मी मुक्ता.. on 21 April, 2011 - 11:04
गुलमोहर:
शेअर करा
लेख आवडला.
लेख आवडला.
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
आऊटडोअर्स,

खूप जणं आहेत. बघुया किती लिहुन होतय ते..
अरागस असाही शब्द आहे मराठीत. अरागस आणि निरागस दोन्ही समानार्थीच आहेत..
मुक्ता.. अतिशय सुरेख लेख..
मुक्ता.. अतिशय सुरेख लेख.. मुख्य म्हणजे तो तुझ्या शब्दात मांडल्यामुळे जास्ती पोहोचतोय.. तु गुरुदत्तचं केलेलं वर्णन वाचल्यानंतर अगदी वाटून गेलं की तु त्याचा एखादा तरी तशा अदाकारीतला फोटो इथे टाकायला हवा होतास.. पण चल हे काम मी करून टाकते.
बाकी लेखातल्या प्रत्येक न प्रत्येक शब्दाला अनुमोदन.... अजून जितकं लिहित गेली असतीस त्याच्याबद्दल तितकं वाचायला आवडलं असतं...
पुलेशु!!
माझ्या आवडत्या १०त.
प्यासा आणि कागज के फूल दोन्ही
प्यासा आणि कागज के फूल दोन्ही जेव्हा अर्काइव्ह्ज च्या पडद्यावर पाह्यल्या तेव्हा दिग्दर्शकाचा व्हिज्युअल सेन्स म्हणजे काय हे किंचितसं समजायला लागलं..
मुक्ता लेख पुरूवून पुरवून वाचल्यामुळे एवढे दिवस प्रतिक्रिया दिली नाही. लेख छानच.
दक्षिणा, कसा अगदी माझ्या
दक्षिणा,
व्वा... अगदी अगदी हाच फोटो मला टाकायचा होता पण हा क्लोज अप आहे. मी पूर्ण फोटोचा विचार केलेला. लेखात लिहिलेली गुरुदत्तची पहिली आठवणारी प्रतिमा हीच आहे. 'जाने वो कैसे' गाण्यात त्या पुस्तकाच्या कपाटाशेजारी उभा असलेला तो..
(पण मला अजून माबोवर फोटो टाकयचं कळलं नाही आणि नेट स्लो होतं त्या दिवशी मग राहुनच गेलं..
)
कसा अगदी माझ्या मनातला फोटो टाकलात तुम्ही..
आवडत्या १० बद्दल खास आभार..
नीधप,
खात्री होती उशीरा का होईना तुमचा प्रतिसाद येईलच याची.. धन्यवाद.. 
खुप सुंदर लेख.
खुप सुंदर लेख.
छान लेख.
छान लेख.
फारच सुरेख व मनापासुन
फारच सुरेख व मनापासुन लिहीलेला लेख. खुप आवडला.
मुक्ता, मस्स्त लेख, आवडला
मुक्ता, मस्स्त लेख, आवडला
मस्तच!! सहज सुंदर झालाय लेख.
मस्तच!!
सहज सुंदर झालाय लेख. आवडला.
मुक्ता, नेहेमीप्रमाणेच
मुक्ता,
नेहेमीप्रमाणेच दर्जेदार आणि अतिशय सुंदर लेख.. गुरुदत्त फक्त गाण्यांमधूनच भेटत आलाय आज पर्यंत. मूवीज नक्कीच पाहिल्या जातील आता..
लेखाचा शेवट तर अगदीच "...."
)
(नक्की कोणतं विशेषण वापरावं हेच कळत नाहीये..
मनापासून अभिनंदन तुझं..
निशब्द..!
निशब्द..!
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
रुतूवेद,
निवडक १० साठी विशेष आभार.. 
धन्यवाद निवडुंग..
नक्कीच पहा मुव्हीज..
गुरुदत्तच्या गाण्यातून खरतर साहिर, S D, ओ.पी. नय्यर हेच जास्त भेटताट पण.. 
मला खास लक्षात राह्यलेली
मला खास लक्षात राह्यलेली फ्रेम म्हणजे 'आज सजन मोहे..' च्या वेळेला बरंच काही आजूबाजूचं तहसमहस होत असतं. वहिदाचा क्लोजप... तिचा चेहराही विस्कटलेला आणि आर्त...
मागे
प्रेमसुधाsssssssssssss मोरे सावरीयाssssssss सावरीया......
असा सगळा क्रिसेन्डो जमत चाललेला..
अ-श-अ-क-य
इतनी बरसादो जग जलथल हो जाये..
इतनी बरसादो जग जलथल हो जाये..
खरंय संगीताने स्पेस तयार
खरंय संगीताने स्पेस तयार करायची असते नुसती गा जा भ करायची नसते, काही गा जा या गा च सुंदर असतात...
हेच चित्रातही... निगेटिव्ह स्पेस....
हे शिकवलं गुरूदत्तच्या सिनेमांनी...
अगदी... नेमकं बोलता तुम्ही
खरतय गुरुदत्त म्हणे म्युजिकच्या कामात पण बरच काही सूचना द्यायचा. पण या चित्रपटासाठी एस्.डीं नी त्याला काही ढवळाढवळ करु दिली नाही..
ते म्हणजे अॅक्चुअली म्युजिक गाण्याला साथ देतय. गाण्याच्या वरचढ नाही होत, त्याचं सौदर्य वाढवायचच काम करतय संगीत.
जाने क्या ला तर किती कमी इन्स्टुमेंट्स वापरलीत.. 
अगं राणी ते गुरूदत्तला
अगं राणी ते गुरूदत्तला ढवळाढवळ करू दिली नाही गाणं कंपोझ आणि अॅरेंज करण्यात... मी बॅकग्राउंड म्युझिक बद्दल बोलतेय...
हल्ली आपल्याकडे कसं जरा काय झालं की लावा मागे टुंग.. कणभराच्या हजाराव्या भागाइतकं जरी दु:ख झालं तरी लावा मागे बळंच आर्त आलापी... तर तो तसला काय गाढवपणा करायचा नसतो हे गुरूदत्तने शिकवलं.
हल्ली आपल्याकडे कसं जरा काय
हल्ली आपल्याकडे कसं जरा काय झालं की लावा मागे टुंग.. कणभराच्या हजाराव्या भागाइतकं जरी दु:ख झालं तरी लावा मागे बळंच आर्त आलापी... >>>

खरय... याहून हाईट असते कधी कधी.. आता विषय निघालाच आहे म्हणून आठवलं. खुपते तिथे गुप्ते मधला तो जनरली लोकं सेंटी होतात तो फोन कॉल चा पार्ट चालु होता आणि ती बाई विनोदी बोलत होती आणि मागे चक्क आर्त आलापी लावली होती..
असो, तसला काय गाढवपणा करायचा नसतो हे बाकी खरय. आणि हिंदीत ते सांगायचं काम त्याचंच..
तसे विदाउट बॅकग्राउंड स्कोर अशक्य प्रभावी ठरलेले प्रसंग पहायला अजून बरेच दिग्दर्शक आहेत (परदेशात).. 
म्युझिकने स्पेसला कॅरेक्टर
म्युझिकने स्पेसला कॅरेक्टर दिले पाहिजे. बॅकग्राउंड स्कोरनेतर नक्कीच... पण स्पेस जाम करून टाकू नये..

हे गुरूदत्तने शिकवलं पण भारतीय दिग्दर्शकांच्यात हे शिकवणारा तो एकटाच नाहीये बरंका...
रे, घटक यांच्यापासून कासारवल्लींपर्यंत बरेच आहेत.
एकटा नाही पण कमीच.. मलाही
एकटा नाही पण कमीच.. मलाही एवढी मोजकीच नावं आठवली.. रे, कासारवल्ली वगैरे..
आणि शेवटी होतं असं की प्रायोगिक सिनेमात करायच्या गोष्टी म्हणुन मग कमर्शियल वाले त्यातलं चांगलं घ्यायचा कधी प्रयत्नच करताना दिसत नाहीत..
तिथेच तर सगळी गोची आहे. आणि मग नुसतं रें चं कौतूक केलं की काम झालं. आपण आपल्या रुढ वाटेने जायला मोकळे अशी परिस्थिती आहे.. :-| असो..
असो... ताई हा न संपणारा विषय
असो... ताई हा न संपणारा विषय आहे. :०
खरय..
अत्यंत सुंदर लेख!!
अत्यंत सुंदर लेख!!
सुंदर लेख. थोडे फोटो टाकायला
सुंदर लेख. थोडे फोटो टाकायला हवे होते
'मी मुक्ता' आणि 'निधप' ~ एक
'मी मुक्ता' आणि 'निधप'
~ एक सुंदर लेख आणि त्यावरील आपणा दोघीत झालेला तितकाच प्रभावी संवाद वाचल्यानंतर 'गुरुदत्त नावाचे गारुड' किती मोहक आहे हे जाणवतेच तसेच त्यांच्या मृत्युला आज जवळपास पन्नास वर्षे होत आली तरीही त्यांच्यावर लिहिण्यार्यांची आणि ते लेख तितक्याच तन्मयतेने वाचणार्यांची संख्या थकायला तयार नाही. कोणत्याही भाषेतील भारतीय चित्रपट इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाल्यास सत्यजित रे, गुरुदत्त आणि लता मंगेशकर ही तीन नावे प्रत्येकाच्या लेखनाचे अढळ हिस्सा आहेत व राहतील.
'प्यासा' तील विजय ही काही एकटयादुकट्या कविची रामकहाणी नसून नियतीने निर्मिलेल्या कडूगोड अनुभवाची प्रतिकात्मकता रंगविण्यासाठीची एक धडपड पडद्यावर दृश्यस्वरूपात साकारली जाते. विजय एका उध्वस्त पिढीचे प्रतिनिधित्व करतो तर गुलाबो अशा कलंदरावर जीव ओवाळून टाकणार्या वर्गातील स्त्रीचे. मीना तर समाजाच्या हरेक टप्प्यावर सापडणारी. तर प्रकाशकाकडे रॉयल्टीमध्ये दोन पैसे वाढ्वून मागणारे विजयचे हपापललेले दोन भाऊदेखील एका वर्गाची कधीही न संपणारी भूखच अधोरेखीत करतात. गुरुदत्तचे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत, अनेकदा. अन् तेही रात्रीच्या वेळी (मोबाईल बंद करूनच). त्याच्या फ्रेमच्या कृष्णकडा अक्षरशः अंगावर येतात, विशेषतः प्यासा आणि कागज के फूलमध्ये. वहिदा रेहमानसमवेत त्याचे जीवलग नाते लक्षात घेता तिच्यासमवेतची गंभीर दृष्ये हवीहवीशी तर वाटतातच पण "साहिब बिवी और गुलाम" मध्ये पियानोवर तिच्या रियाझाच्यावेळी तिला जाहिरातीचा मसुदा वाचून दाखविता दाखविता 'जेवणासाठी शिधा कोण काढून देते?" हा प्रश्न निरागसतेने विचारताना त्याची भावमुद्रा टिपून घेण्यासारखीच. त्याचवेळी 'मि.अॅण्ड मिसेस ५५' मध्ये त्या लक्षाधिश आणि सौंदर्याची खाण असणार्या मधुबालेला बंद पडलेली गाडी ढकलण्यास सांगून स्टीअरिंगवर बेफिकिरपणे विडीचा झुरका मारणारा गुरुदत्तही खासच !
जीवनातील गंभीरच नव्हे तर हलक्याफुलक्या अनुभवांची प्रतिकात्मकता हेरण्यात (विशेषतः जॉनी वॉकरला काही प्रसंगात नायकापेक्षा जास्त महत्व देण्याची त्याची हातोटी) तिचे कोनेकंगोरे रेखाटण्यात, विविध रंगढंग खुलविण्यात गुरुदत्तच्या कलात्मकतेचे साफल्य वारंवार दिसून येते. 'साहिब.." मध्ये मीनाकुमारी आणि वहिदा रेहमान याना एकदाही समोरासमोर न आणताही दोघीही एकमेकीला पुरेपूर जाणतात ही बाब केवळ संवादाद्वारे स्पष्ट करण्याचे त्याचे कसब विलक्षणच म्हणावे लागेल. कलेची जाणीव गुरुदत्तला नसती तर तो समाजातील विषमतेचे चित्रण करणारा एक प्रवक्ता किंवा प्रचारक बनला असता. पण तसे झाले नाही. 'विजय' चा असो वा सिन्हासाहेबाचा असो, दोघांचाही अंत अटळ तर आहेच पण तितकाच तो पाहणार्याला क्लेशदायक होणार आहे हे माहित असूनही त्या कथानकाची कलात्मकतेची वीण अशी काही बांधली गेली आहे की, चित्रपटाचा शेवट काय आहे हे माहिती असूनची प्रेक्षक गुरुदत्तपासून दूर जाऊच शकत नाही.
खाजगी जीवनातील त्याच्या यशापयाशाचे प्राक्तनात जे काही भोग होते ते त्याने आणि गीता दत्तने भोगले. पण शेवटी कलावंत आणि कारकून यात फरक हा असणारच. त्याने आत्महत्या का केली वा का करावी लागली याचा लेखाजोखा सर्वसामान्यांनी काढण्याची काही आवश्यकता नसते, नसावी. लौकिक अर्थाने त्याचे जीवन अकाली संपुष्टात आले असले तरी त्याची लखलखीत प्रतिमा जी 'मी मुक्ता' सारख्या जाणकारांच्या मनी ठसली आहे ती कधीही मलीन होणार नाही, हेही तितकेच खरे.
@ नीधप : तुम्ही वर प्रतिक्रियेत लिहिले आहे "असो... ताई हा न संपणारा विषय आहे." ~ खरंय. जी.ए.कुलकर्णी 'प्रवासी' कथेत म्हणतात "इतरांचे प्रवास संपतात, रस्ता राहतो; पण आपला मात्र आता रस्ता संपून गेला, आणि प्रवास मात्र चालूच राहणार आहे...." : गुरुदत्त संपून गेले आहेत पण त्यांच्यासंदर्भातील आपला प्रवास मात्र अथकच चालू राहिल, हेच सत्य.
@ मी मुक्ता ~ तुमचा हा लेख सुरुवातीला कामाच्या अत्यंत घाईगर्दीत वाचला गेला होता, त्यामुळे त्याची निवांत पारायणे केल्यानंतरच प्रतिक्रिया देण्याचे मनी नोंदविले होते. त्यामुळे काहीसा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
प्रतीक देसाई, मूळ लेखाइतकेच
प्रतीक देसाई,
हे गुरुदत्त नावाचं गारुड कधीच न उतरणारं हे खरच..
आपण लिहिलेल्या गोष्टीदेखिल शब्दशः खर्या. अनुभूती घ्याव्या अशा.
मूळ लेखाइतकेच आपले अभिप्रायपण अत्यंत वाचनीय असतात हा माझा आजवरचा अनुभव आहे..
'मी मुक्ता' सारख्या जाणकारांच्या>> रसिक म्हणा फारतर. जाणकार म्हणवुन घेण्याइतकी उंची नाही माझी..
गुरुदत्त संपून गेले आहेत पण त्यांच्यासंदर्भातील आपला प्रवास मात्र अथकच चालू राहिल, हेच सत्य>>
अगदी.. हा शोध घेत रहाणं किती सुंदर आहे. 
मस्त... माझा फेव.. आमच्याकडे
मस्त... माझा फेव.. आमच्याकडे आई पक्की मुम्बैकर असल्याने.. सगळे सिनेमे पाहिले गेले लहानपणी.. २००९ला युत्रेख्तला असताना आईसाठी म्हणून सगळ्या त्याच्या डीवीडीझ नेल्या आणि पाहिल्या.. मस्त!
"तेरा जाना दिल के अरमानोका मिट जाना.." असे काहिसे वाटते मला त्याच्या अर्ली एक्झिट बद्दल!
सनि, अश्विनी के..
सनि, अश्विनी के..
धन्यवाद..
जाईजुई,
अगदी.. तेरा जाना इंडस्ट्रीके अरमानोंका लूट जाना असं म्हटलं पाहिजे...
प्रतिक अतिशय सुरेख पोस्ट...
प्रतिक अतिशय सुरेख पोस्ट...
Pages