उस्ताद आमिर खां - पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे गायक

Submitted by षड्जपंचम on 6 December, 2010 - 00:19

टीप : ह्या लेखातील खां साहेबांच्या शिक्षणाबाबतचे, त्यांच्यावरील इतर गायकांच्या प्रभावाबाबतचे संदर्भ कधी आंतरजालावरून वाचलेले, कधी मोठ्या लोकांकडून ऐकलेले असे आहेत.. त्यांच्या गायकीचे विश्लेषण मात्र माझे आहे. फोटो आंतरजालावरून ..

जगात ज्या काही कला आहेत त्यामध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ऐकणारा वर्ग तसा कमीच आहे. पण भारतीय शास्त्रीय संगीतात असणारी खोली, भावपूर्णता, वातावरणनिर्मितीची क्शमता ह्यान्ना तोड नाही. भारतीय संगीत हा संगीताचा अतिशय विकसित असा आविष्कार म्हणता येईल. आणि त्यामुळेच बरेच गायक-वादक, संगीतकार, जाणकार आणि संगीतरसिक शास्त्रीय संगीताला अतिशय मानाचा दर्जा देतात. अशा शास्त्रीय संगीतातील थोर गायक आमिर खां साहेबांबद्दल आज थोडेसे लिहितोय..

मला शास्त्रीय संगीताची आवड (माझ्या मित्रांच्या मते ’वेड’) तशी अलीकडच्या काळात निर्माण झाली. मी जुनी गाणी, भावसंगीत आधीपासून ऐकतोय पण शास्त्रीय संगीताची आवड तशी अलीकडची. तीही अशीच आपोआप. गायला वाजवायला शिकायचं असं ठरवून नाही. ज्यावेळी गाणे ऐकायला सुरूवात केली तेव्हा माझ्या 3-4 जाणकार परिचितांना विचारले होते. कुणाचे गाणे-वाजवणे पहिल्यांदा ऐकावे, कुणापासून सुरूवात करावी इत्यादी. गायनाच्या बाबतीत अनेकांची नावे कळाली. आणि आमिर खां हे नाव प्रत्येकाच्या तोंडून मी ऐकले...

USTAD-AMIR-KHANSAHEB.jpg

आमिर खां साहेबांना मी ज्यावेळी पहिल्यांदा ऐकले ती आठवण मी कधीही विसरणार नाही. तेव्हा शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी शून्य होतो.. (ह्या वाक्यातील शास्त्रीय हा शब्द वगळला तरी चालेल). शास्त्रीय वादन मी थोडे-थोडे ऐकू लागलो होतो आणि आवड ही निर्माण झालेली.. पण शास्त्रीय गाणे म्हणजे काहीतरी 'आ आ उ ऊ' असणार असा स्वत:शीच समज करून मी गायन फारसे ऐकत नव्हतो. जाणकारांच्या आदेशानुसार मी आमिर खां साहेबंचे एक-दोन राग मिळवले होते आणि माझ्या मोबाईल वर कॊपी करून ठेवले होते. ते ऐकायचा योग मात्र बरेच दिवस येत नव्हता. शेवटी तो योग आला. मी असंच निवांत खुर्चीत बसलो होतो. कानाला हेडसेट लावले, आणि त्यांचा दरबारी सुरु केला. थोडीशी आलापी झाल्यावर त्यांनी स्थायी ला सुरुवात केली .... 'ऐरी बीर की ..... ' .... ते 'की ' वर आले आणि माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो.. त्यावेळी मला सम-बिम हा प्रकार अजिबात माहित नव्हता. स्थायी म्हणजे काय हे पण माहित नव्हते. सम ह्या प्रकारचे तालाच्या पहिल्या मात्रेशी काही नाते आहे ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना मला नव्हती. तरीही खां साहेबांनी घेतलेल्या समेला जो अनुभव आला तो मी कधीच विसरणार नाही. कुणाच्या गाण्यामुळे असं काही होऊ शकतं हेच माझ्यासाठी नवल होतं. शास्त्रीय गायनाकडे आकर्षण निर्माण होण्यास खां साहेबांची ती 'हाय-टेक' मैफिल कारणीभूत ठरली. अजूनही खां साहेबांना ऐकताना असा अनुभव येतो. शब्दांच्या पलीकडला..

आमिर खां साहेबांचा जन्म १९१२ साली अकोल्यात झाला. त्यांनी त्यांचे बालपण मात्र इंदोर मध्ये व्यतीत केले. खां साहेबांचे वडील उस्ताद शाहमीर खां हे सारंगिये होते . त्यामुळे घरात लहानपणापासून संगीताचे वातावरण होते. आमिर खां साहेबांचे वडील हेच त्यांचे प्रथम गुरु होत. आमिर खां साहेबांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यामुळे घरापासूनच सुरु झाले. आमिर खां साहेबांचा रियाझ मेरुखंड पध्दतीवर आधारलेला असायचा.. रागविस्ताराच्या दोन पद्धती . एक उपज पद्धत आणि दुसरी मेरुखंड पद्धत. एखाद्या रागाच्या स्वरांच्या शक्य असतील त्या सगळ्या स्वरसामूहांचा रियाझ करण्याची ही मेरुखंड पद्धत. आमिर खां साहेबांच्या आधी ही पद्धत फारशी नावाजलेली किंवा बऱ्याच जणांनी अंगिकारलेली अशी नव्हती . उपज अंगाचे गाणेच जास्त गायले जायचे. खां साहेबांनी मेरुखंड पद्धतीचा बरेच वर्ष रियाझ केला, आणि त्यावर प्रभुत्व मिळवले..

खां साहेबांच्या गाण्यावर मुख्यत: तीन जणांचा प्रभाव मानला जातो. त्यांच्या वेगवान तानांच्या बाबतीत रजब अली खां, सरगम गायनाच्या बाबतीत अमान अली खां , आणि त्यांच्या 'ट्रेड-मार्क' विलंबित खयाल गायनशैली बाबत उ. अब्दुल वाहीद खां (किराणा घराण्याचे दिग्गज अब्दुल करीम खां ह्यांचे भाऊ ). ह्याच तीन गोष्टी नंतर त्यांच्या गायकीतील मुख्य घटक बनल्या.. खां साहेबांनी संगीत समारोह केव्हा द्यायला सुरुवात केली ह्याबद्दल नक्की माहिती माझ्यापाशी नाही. परंतु १९५२ च्या आसपास आमिर खां हे भारतातील सर्वोच्च दर्जाच्या गायकांमध्ये गणले जाऊ लागले होते.

शास्त्रीय संगीतात ज्या गायन-प्रकारांना सर्वात मान दिला जातो ते प्रकार म्हणजे धृपद आणि खयाल. ठुमरी, टप्पे इत्यादी प्रकार उप-शास्त्रीय समजले जातात व खयाल आणि धृपादापेक्षा हलक्या दर्जाचे समजले जातात. आधी धृपद गायन जास्त प्रचलित होते. विसाव्या शतकात (किंवा थोडं आधीच म्हणा) खायालाने धृपादाची जागा घेतली. आजकालच्या कुठल्याही शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत मुख्य घटक म्हणजे खयाल. सव्वा तास जर मैफिल असेल तर एक तासभर मनसोक्त खयाल गायन ऐकवल्यावर कलावंत समारोपाला पाच दहा मिनिटे एखादी ठुमरी, टप्पा, भजन वगैरे गाऊन मैफिल संपवतो.. आमिर खां साहेब हे सर्वार्थाने पक्के खयालीये होते. त्यांनी सार्वजनिक समारंभात कधीही ठुमरी, टप्पा गायला नाही. कधी कधी खाजगी मैफिलीत ते ठुमरी गायचे असे काही लोक म्हणतात . नक्की माहिती उपलब्ध नाही. त्यांची एकाच ठुमरी रेकॉर्ड झाली आहे ती म्हणजे 'पिया के आवन की '.. ही त्यांनी 'क्शुदितो पाषाण' ह्या बंगाली चित्रपटात गायली होती..

खयाल आणि तराना गायकी हाच त्यांच्या आवडीचा भाग होता. त्यामुळे त्यांच्या खयाल, तराना गायकी विषयीच जास्त लिहेन.

947498742_bcfdd6ac09.jpg

खयाल गायनाच्या पद्धतीत विलंबित खयाल (बडा खयाल) आणि त्यानंतर द्रुत खयाल (छोटा खयाल) हे प्रकार गाऊन राग संपूर्णपणे उलगडायचा प्रयत्न करतात. स्थायी, अंतरा ह्याव्यतिरिक्त आमिर खां साहेबांच्या खयालात तीन घटक प्रमुख मानले जाऊ शकतात. बढत, सरगम आणि ताना. आमिर खां साहेब विलंबित ख्याल गाण्यासाठी अति-विलंबित लयीचा वापर करायचे. ताल शक्यतो नेहमी विलंबित झुमरा असायचा. (मी तरी त्यांना विलाम्बितासाठी दुसऱ्या तालाचा वापर केलेलं फारसे ऐकलेले नाही). खां साहेबांची स्थायी गाऊन झाली की सुरु व्हायची त्यांची संथ, आलापीयुक्त जादूमय बढत. त्यांची बढत ऐकणे हा अक्षरश: स्वर्गीय अनुभव म्हणावा लागेल. रागाचा एक एक सूर उलगडत पूर्ण राग ते अतिशय सुरेखपणे उघडत जायचे. त्यांचे विलंबित लयीवर जबरदस्त नियंत्रण होते. इतक्या संथ लयीत राग विस्तार करणे ही अवघड गोष्ट म्हणावी लागेल. त्यांना मुळातच धीरगंभीर, मनात आपला एक ठसा निर्माण करणारा आवाज लाभला होता. इंग्रजीत 'स्प्रिरिचुअल' म्हणतात तसा. गाताना पूर्ण आकारातच गातील असे नाही. त्यांचा स्वरलगाव अतिशय चांगला होता. एखाद्या रागात एखादा स्वर कसा लावला किंवा उच्चारला जावा हे त्यांच्या मनात व्यवस्थित ठसले गेले होते. एकदा राग व्यवस्थित उलगडला की मग ते सरगम गायचे. त्यांची सरगम ऐकताना त्यांनी मेरुखंड पद्धतीवर केलेल्या तयारीची कल्पना येते. त्या रागात चालणारे असे स्वरांचे अनेक सुरेख patterns ते सरगमे च्या द्वारे रसिकांपर्यंत पोहोचवायचे. विलंबित गाऊन झाल्यावर ते द्रुत खयाल सुरु करायचे.. त्यांच्या ताना अतिशय सुरेख असायच्या.. कितीही वेगवान ताना घेतल्या तरी त्यातील स्वर स्पष्ट लागायचे. गमकयुक्त स्वच्छ, स्पष्ट ताना. त्यांचे छूट तानांवर जबरदस्त प्रभुत्व होते.( एखाद्या स्वरानंतर त्याच्याच जवळचा दुसरा स्वर गाण्याऐवजी मधले काही स्वर वगळून एखाद्या स्वरावर थेट उडी घेण्याच्या तान-पद्धतीला छूट तान म्हणतात). त्यांच्या तानांमधील सुस्पष्टता, सुरेख patterns, छूट तानांचा सुरेख उपयोग ही त्यांच्या तानांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. मध्य आणि द्रुत लयीत ते शक्यतो झपताल आणि तीनतालाचा वापर करायचे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत रागाचा भाव कायम राखण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.

खां साहेबांचे बंदिशेच्या शब्दांचे उच्चारण ही चांगले होते.. ते बंदिश शक्यतो रागाला साजेशी अशीच निवडायचे. ते संगीत समारंभात स्थायी पुष्कळ वेळा दोनदा गात असत. कधीकधी विलंबित गाताना ते अंतरा मात्र सोडून द्यायचे. द्रुत लयीत मात्र अंतरा ते शक्यतो गायचे.. त्यांनी तराना लोकप्रिय करण्यात ही महत्वाचे योगदान बजावले. तराना गाताना ते पुष्कळ वेळा फारसी भाषेतल्या शब्दांचा उपयोग करायचे. अनेक गायक तराण्यात पुष्कळ वेळा तबल्याच्या बोलांचा उपयोग करतात. परंतु आमिर खां साहेब शक्यतो तबल्याचे बोल कधी वापरत नसत. त्यांचे ताराण्याचे बोल आणि सुरेख ताना ह्यामुळे त्यांचा तराना ऐकणे हा एक संस्मरणीय अनुभव असतो.

आणि एका गोष्टीबाबत लिहिणे आवश्यक आहे ते म्हणजे खां साहेबांची ताल आणि लयकारी विषयीची मते. आमिर खां साहेबांच्या गाण्यात तालाचा वापर शक्यतो फक्त ठेक्यासाठीच असायचा. तिहाया ते कधी फारसे घेत नसत. तसेच त्यांच्या गायकीत लयकारी फारशी नव्हती. बोल-बनाव, बोलताना इत्यादी लयकारी संबंधीचे प्रकार त्यांच्या गाण्यात दिसत नाहीत. ह्याबाबत काही लोक खां साहेबांवर टीका करतात. ह्याबाबतीत खां साहेबांना लोकांनी जेव्हा विचारणा केली, तेव्हा लयकारी ही माझ्या गाण्याची प्रकृती नाही असे ते उत्तर देत. खां साहेबांचे म्हणणे पटतेही.. कारण हा प्रत्येकाच्या गायनशैलीचा प्रश्न आहे. उदा . जयपूर घराण्यात स्वर व ताल ह्या दोन्हीना किंमत दिली जाते. त्यामुळे जयपूर घराण्याच्या गायक-गायिकांकडून सुरेख लयकारी ऐकायला मिळते. पण आमिर खां साहेबांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यांचा धीरगंभीर आवाज, त्यांची विलंबित गायनशैली ह्यात लयकारीचा भाग किती चांगला लागला असता हाही प्रश्नच आहे. खां साहेबांची गायकी ही मुख्यत: स्वरावर आधारलेली होती. त्यामुळेच ज्या गोष्टी त्यांच्या मते त्यांच्या गाण्यात व्यवस्थित बसल्या नसत्या त्या त्यांनी बाजूला केल्या.

खां साहेबांची अंधपणे भक्ती करावी असे मी म्हणणार नाही. कारण एखादी गोष्ट अशी असते की मनाला खटकल्यागत होते . मलासुद्धा कधी कधी त्यांच्या एखाद्या रेकॉर्डिंग मध्ये सरगमेचा वापर थोडा जास्त झाल्यागत वाटतो. असे चुकूनच एखाद-दुसरे रेकॉर्डिंग असते. पण हे माझे वैयक्तिक मत आहे. खां साहेब इथे चुकले असे म्हणण्याचा बावळटपणा मी करणार नाही. हे म्हणजे काजव्या इतकेसुद्धा तेज नसताना सूर्याची मापे काढण्याचा प्रकार आहे.. आणि माझे संगीताचे ज्ञान खां साहेबांच्या एक अब्जांश सुद्धा नाही...

आमिर खां साहेब एखादा राग गाताना त्याच्याशी पूर्ण समरूप होऊन जायचे. डोळे मिटून फक्त स्वत:साठी म्हणून गायन. लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी गाणे , स्वत:ची तयारी दाखवायचा प्रयत्न करणे असले प्रकार अजिबात नाहीत. उगाच पोकळ gimmicks करून लोकांना आ वासायला लावून रागाच्या चिंधड्या उडवायचे प्रकार नाहीत. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना साथीला म्हणून कधीही घेत नसत. अनेक वेळा तर ते सारंगी, हार्मोनियम ची साथ सुद्धा घेत नसत. बस तानपुरा आणि तबला! त्यामुळे रागाची भाव-निर्मिती ही पूर्णत: त्यांच्यावर अवलंबून असायची. रागाची भाव-निर्मिती हे त्यांचे ध्येय होते आणि ते स्वत: एक माध्यम बनून गायचे. आणि त्याचा परिणाम त्यांना ऐकले की कळतोच! स्वर्गीय ! ते हयात नसले तरी त्यांचे जुन्या काळाचे काही व्हिडिओ यू-ट्यूब वर पाहायला मिळतील. त्यात त्यांची ती मुद्रा पाहायला मिळेल.. ह्याबाबत आमिर खां साहेबांचे एक वाक्य आहे .. 'नगमा वही, जो रूह सुनाये और रूह सुने' !!

आमिर खां साहेबांनी बरेच राग गायले. शक्यतो ते त्यांच्या गायनशैलीला अनुरूप असे राग गायचे. मारवा, दरबारी, मालकौंस, ललत, मेघ, बागेश्री, हंसध्वनी अशा काही रागांना तर त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. अहिर भैरव, बिलासखानी तोडी, श्री, अभोगी, चारुकेशी, मल्हार, यमन असे अनेक राग त्यांनी सुरेख गायले. त्यांचे अनेक राग भारतीय शास्त्रीय संगीतात मैलाचा दगड ठरले आहेत. त्यांच्या गायनशैली ला अनुरूप न वाटणारे देस, दुर्गा, पहाडी, खमाज असे राग शक्यतो ते सार्वजनिक समारंभात तरी गात नसत. अपवाद फक्त त्यांनी गायलेल्या ठुमरी चा (पिया के आवन की)! तीही त्यांनी सुरेख गायली... भैरवी त्यांनी सार्वजनिक समारंभात कधी गायली नाही. हे राग खासगी बैठकीत क्वचित कधीतरी ते गायचे असे मी इंटरनेट वर वाचले आहे. पण रेकॉर्डिंग नाहीये, आणि खात्रीलायक माहिती सुद्धा नाही. आमिर खां साहेबांनी चित्रपटातही गायन केले आहे. बैजू बावरा मधील ’तोरी जय जय करतार’ हे पुरिया धनश्री रागातील गाणे, शबाब मधील ’दया करो गिरिधर गोपाल’ हे मुलतानी मधील गाणे.. अशी अनेक.

आमिर खां साहेबांनी आपल्या गायकीला 'इंदोर घराणा' असे नाव देत नवीन घराणे स्थापन केले. ह्या महान गायकाचा प्रभाव इतरांवर पडला नाही तरच नवल! गायन काय, वादनावर सुद्धा आमिर खां साहेबांचा प्रभाव पडला. तो सुद्धा घराण्याच्या मर्यादा ओलांडून. महान सितारवादक पंडित निखील बनर्जींवर त्यांचा प्रभाव होता. निखीलजींच्या काळजाला भिडणाऱ्या भावपूर्ण आलापात, सुरेख छूट तानांमध्ये ह्या प्रभावाची झलक दिसते. निखील बनर्जींनी त्यांच्या मुलाखतीतही खां साहेबांचा प्रभाव आपल्यावर पडल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. साहजिकच, गायकांमध्ये तर प्रभाव असणारच! गायकांमध्ये पण पंडित भीमसेन जोशी आमिर खां साहेबांना अतिशय-अतिशय मानत असत. मी वसंत पोतदार ह्यांचे 'भीमसेन' नावाचे पुस्तक वाचले आहे. वसंत पोतदारांनी नमूद केले आहे की भीमसेन जोशी आमिर खां साहेबांच्या फोटोकडे सुद्धा पाय करून झोपत नसत. त्या पुस्तकात आणखीही काही प्रसंग आहेत. प्रभा अत्रे आमिर खां साहेबांकडून शिकल्या नाहीत तरी त्या यांना आपल्या गुरु-समान मानतात.. असे अनेक कलावंत आहेत ... सर्व काही लिहिणे शक्य नाही.

अशा ह्या महान देवदूताचा अंत मात्र मनाला चटका लावून जाणारा झाला. ते १३ फेब १९७४ ला एका कार अक्सिडेंट मध्ये कलकत्त्यात स्वर्गवासी झाले. शास्त्रीय संगीत-रसिक पृथ्वीवर स्वर्ग अनुभवायच्या काही क्षणांना मुकले. परंतु त्यांची सी-डी रेकॉर्डिंग्ज तसेच मैफिलींची रेकॊर्डिंग्ज आज बाजारात, आंतरजालवरील संगीत शेअर करणाऱ्या कम्युनिटीज वगैरे मध्ये पुष्कळ उपलब्ध आहेत. त्यांचे संगीत आज सहजपणे उपलब्ध आहे..

मी बऱ्याच गायकांना-वादकांना ऐकतो. आमिर खां साहेबां प्रमाणेच इतरही काही गायक वादक माझ्या 'favourite list' मध्ये आहेत.. त्या सर्वांचे भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे असे म्हणालो तर ते वाक्य अर्धवट ठरेल. त्यांचे माझ्यासारक्या अनेक रसिकांच्या वैयक्तिक जीवनात पण फार मोठे योगदान मानावे लागेल. पु. ल. म्हणायचे की 'आपल्याला एका तरी कलेचे वेड असणे आवश्यक आहे . रोजचा धंदा हा जगण्यासाठी रोजी रोटी मिळवून देईल पण, हे कलेचे वेड हे का जगायचे हे सांगेल.' अगदी पटतं.. दिवसभर की-बोर्ड बडवून मी जेव्हा ऑफिस मधून बाहेर येतो तेव्हा ह्या सर्वांच्या स्वरांमुळेच मनाला प्रसन्नता, शांती प्राप्त होते. मला तर वाटते खां साहेबांसारखे कलाकार नसते तर कदाचित मी आत्तापर्यंत ठार वेडा झालो असतो.

आजसुद्धा सूर्य मावळती नंतरच्या अंधारात, ज्यावेळी नुकतेच काही तारे उगवले असतात.. त्यावेळी सहजपणेच आय-पॉड कानाला लावला जातो .. त्यांचा मारवा सुरु होतो.. एकेका स्वराबरोबर खां साहेब आजूबाजूच्या वातावरणात मिसळतात.. मारव्याचा कोमल ऋषभ कसा लावावा ही जणू जगाला खां साहेबांनी दिलेली शिकवणच असते.. पूर्ण वातावरण मारवा-मय होऊन जायला लागते. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी ती अवस्था असते. त्यांचे रेकॉर्डिंग संपल्यावर आजूबाजूचे वातावरण पूर्ण बदललेले असते. माझ्यासाठी सृष्टीत फक्त त्यांचा मारवा उरलेला असतो. रेकॉर्डिंग संपल्यावरही मनात त्या मारव्याचेच स्वर अनेक तास घोळत असतात. खां साहेब काही क्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेले असतात. त्यांच्या मारव्याचे रूप घेऊन. त्यांचेच वाक्य जगाला समजावून सांगण्यासाठी .. 'संगीत रूह से निकलती है.. और रूह उसे सुनती है'....

गुलमोहर: 

मस्त.... आणि ते अंगावर काटा येणे वगैरे काही काही गायकांच्या बाबतीत सारखे सारखे होत असते... तिच रेकॉर्ड कितीही वेळा ऐकली तरी त्याच जागेवर प्रत्येक वेळेस काटा येतो... त्या ठराविक क्षणी वातावरण निर्मितीच अशी झालेली असते की काटा येतोच...

पुढचा नंबर कोणाचा आहे...

अत्यंत अल्पावधीत तुम्ही जो अभ्यासपूर्ण व्यासंग केला आहे त्यास तोड नाही.
जियो अन आपच्यासारख्या कानसेनांना काय ऐकतोय त्याची शास्त्रोक्त माहिती अशीच मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy
निवडक दहात
Happy

सर्वांनाच,
लेख आवडला हे वाचून छान वाटलं . या वेळी लेख आवडल्याबद्दल धन्यवाद म्हणू शकत नाही .. कारण खां साहेबांनी जे गायलंय त्यातला थोडासा भाग मी वर्णन केला .. त्यामुळे ह्यात माझे काही नाही.

हिम्सकूल जी,
आपला प्रश्न ...
पुढचा नंबर कोणाचा आहे...>>

आवडणारे कलाकार बरेच आहेत . 'favourite list' ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असेल, त्याच्या मनाला काय भिडतं त्यानुसार... ह्या विषयावर मायबोली वर फारसे लेख दिसले नाहीत म्हणून लिहिलं. जसा वेळ मिळेल तसा लिहेन. बाकी लोकांकडूनही कलाकारांवर, रागदारी वर लेख आलेले मला आवडेल . स्पष्ट आणि खरं सांगायचं झालं तर माझं शास्त्रीय संगीतात फार ज्ञान नाही .. माझ्यापेक्षा बरीच जास्त जान असणारे जाणकार लोक मायबोली वर असतील.. त्यांनीही लिहावं म्हणजे आमचं पण ज्ञान वाढायला मदत होईल Happy

मंजूडी ,

मला ते करणं जमलं नाही.. मलाही ते तसं बरोबर वाटलं नाही. पण नाईलाज Uhoh .. आता केलंय .. बाकी लेखात काही चूक आढळल्यास कळवा. Happy

उस्ताद आमीर खान साहेबानी बैजू बावरात दोन गाणी गायली आहेत... तोरी जय जय कर्तार हे टायटल मध्ये आहे...

'आज गावत मन मेरो झूमके' हे तानसेन आणि बैजु यांच्या जुगलबंदीचे गाणे... तानसेनचा आवाज उस्तादजींचा आणि बैजूला आवाज दिला आहे डी व्ही पलुस्कर यानी... उस्ताद खान साहेब हे पलुस्कराना सिनियर होते... गाण्यामध्ये तर तानसेन बैजु समोर हरतो असा सीन आहे... म्हणजे पलुस्करांच्या समोर उस्तादजींची हार असल्यासारखेच.. त्यामुळे नौशादना हे गाणे करताना बरेच टेन्शन होते... पण उस्तादजीनी तानसेनाच्या तंबोर्‍याची तार तुटते तिथे नेमके आपले गाणे थांबवले आणि पलुस्करानी पुढचे आलाप पूर्ण करुन बैजु बावराची जीत करुन दिली, असे कुठेतरी मी वाचले आहे..

( डी व्ही पलुस्कर आमच्या गावचे- कुरुंदवाडचे.. )

होय .. मी ऐकले आहे.. मी हेही वाचले आहे की आमिर खां यांनीच पलुसकरांचे नाव सुचवले होते... पलुस्करांबद्दल त्यांना आदर होता.

दुर्दैवाने पलुस्करांसारखा गायक खूप लवकर जग सोडून गेला.. Sad Sad

छान लिहिले आहे. एखाद्या शास्त्रीय कलाकारांबद्दल काहि वाचले की कधी त्यांचे गायन वा वादन ऐकतो असे होते. या कलाकारांत एखादा श्रेष्ठ ठरवणे कठीण आहे, कारण आपल्या सामान्य लोकांच्या कुवतीबाहेर असलेली तपस्या त्या सर्वांनी पूर्ण केलेली असते.

मला नीट आठवत असेल तर, झनक झनक पायल बाजे मधेही त्यांचे गायन आहे.
माता कालिका, हि अडाणातली चीज पण त्यांचीच ना ?

मला नीट आठवत असेल तर, झनक झनक पायल बाजे मधेही त्यांचे गायन आहे>>
दिनेशदा.. होय. मीही वाचले आहे.. पण ऐकले नाही.. मिळवून ऐकेन. मला वाटते पर्रीकरांच्या संकेतस्थळावर त्याची लिंक आहे..

अडाणा रागात मी त्यांचा एक तराणा ऐकला आहे..

फारच छान माहीती..
आमीर खां चे नाव मी पहिल्यांदा हंगामा ह्या हिंदी चित्रपटात ऐकले होते ते पण परेश रावळ च्या जोक मधे.. Happy
सध्या शास्त्रीय संगीत शिकत आहे.. यमन, खमाज, देस, शिवरंजनी हे राग शिकलो आहे..
आपल्या जवळची फेव्हराईट लिस्ट व्यं. नी. मधे कळवली तर नक्कीच त्याचा फायदा होईल..

षड्जपंचम, एका असामान्य कलावंताबद्दल लिहिलं आहेस. इतक्या महान लोकांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहायला धाडस लागतं. कदाचित माझ्यात ते नाही, म्हणून मला या लिखाणाचं विशेष कौतुक वाटलं. यातली अजून एक गोष्ट मला आवडली ते म्हणजे तुम्ही केलेलं विश्लेषण...ऐकून मला काय वाटलं? मी काय विचार केला हे सांगायचा प्रयत्न ! मस्तच Happy

मला स्वतःला शास्त्रीय संगीतातलं (फॉर दॅट मॅटर एकूणच संगीतातलं !) काहीही कळंत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तरीही ऐकून जे 'हृदयाला भिडतं.. जे मनात घुसतं' (माझ्या ह्या शब्दप्रयोगांची मायबोलीवर चेष्टा होते हे माहीत आहे, पण तरीही त्याशिवाय माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत !) ते मेंदूला लक्षात राहतं .. असाच एक मला आवडलेला, भिडलेला... माझ्या मनावर ठसलेला कलावंत म्हणजे उस्ताद अमीर खां साहेब.

त्यांच्या पूरिया बरोबरच मला आवडलेली त्यांची काही पेशकश म्हणजे मल्हार, मालकंस, चंद्रमधू, रामकली ...... !
ही दहा-पंधरा मिनिटांची जुनी रेकॉर्डिंग्स एका नवीन अद्भुत दुनियेचे दरवाजे उघडतात... ज्या दुनियेतलं काहीही कळत नाही पण अचंबित मात्र व्हायला होतं ... दरवेळी ऐकताना !

फिल्म डिव्हीजनने काढलेली उस्ताद अमीर खां साहेबांच्या जीवनावरची एक लहानशी डॉक्युमेंटरी आहे. जरा हटके आहे, पण अप्रतिम ! कुठे मिळाली तर जरूर पहा. माझ्याकडे मिळायची शक्यता आहे, पहायला हवे.

शिवाय 'इंदौर के मसिहा' नावाचं एक उत्तम पुस्तक आहे त्यांच्या जीवनावर. मला अजूनही खूप शोधून मिळालं नाहीये ते माझ्या कलेक्शनसाठी. हिंदी भाषेतलं पुस्तक आहे. कुणाला मिळालं तर मला कळवा आणि एक कॉपी माझ्यासाठी नक्की नक्की घेऊन ठेवा ! Happy

लेख वाचून मस्त वाटलं .. पण तुझ्या लेखातला एकमेव मला न रुचलेला शब्द म्हणजे "गायक". हा माणूस केवळ एक गायक नव्हता असं मला स्वतःला वाटतं !

किशोर जी ,

व्यं. नी. हा काय प्रकार आहे ?

rar,

आपल्या पोस्ट बद्दल मझी मते ...

हा माणूस केवळ एक गायक नव्हता असं मला स्वतःला वाटतं >>
म्हणूनच मी लिहिलय .. अशा ह्या महान देवदूताचा ...

शिवाय 'इंदौर के मसिहा' नावाचं एक उत्तम पुस्तक आहे त्यांच्या जीवनावर>>
मला वाटते त्यांचे शिष्य अमरनाथ यांनी ते लिहिलंय. निश्चित सांगू शकत नाही..

या लिखाणाचं विशेष कौतुक वाटलं. यातली अजून एक गोष्ट मला आवडली ते म्हणजे तुम्ही केलेलं विश्लेषण...ऐकून मला काय वाटलं? मी काय विचार केला हे सांगायचा प्रयत्न ! मस्तच Happy >>

तुम्हाला ही गोष्ट आवडली ह्या बद्दल धन्यवाद ... खरं सांगायचं तर माझी त्यांच्या गायकीबद्दल सांगायची लायकी नाही.. त्यांच्याबद्दल सगळं एका लेखात लिहिणं शक्य नाही.. मी काही गोष्टी सांगितल्या ... पण ते जन्मभर गाण्यात जगले... मी एक रसिक म्हणून त्यांच्या गाण्याबद्दलच लिहिलं नाही तर खां साहेबांबद्दल बाकी गोष्टी लिहून काय उपयोग !! एका कलावंताची नक्कीच ही इच्छा असते की त्याने निर्माण केलेल्या कलेतील एक छोटासा अंश तरी लोकांना समजावा .. त्यामुळे मी फक्त त्यांचे गाणे समजायचा प्रयत्न करतो... सगळे समजणे आयुष्यात शक्य नाही!!

ज्या दुनियेतलं काहीही कळत नाही पण अचंबित मात्र व्हायला होतं ... दरवेळी ऐकताना >>

या एकाच गोष्टीमुळे काहीतरी कळवून घ्यायची माझी धडपड सुरु असते... मलाही वाटत नाही की मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत.. मी हे आधीच सांगितलाय .. अन आताही हे मी मनापासून सांगतोय.

षडजपंचम
व्य. नी. म्हणजे व्यक्तीगत निरोप..
माझ्या आयडी ला क्लि़क केलेत की तुम्हाला.. माझी विचारपुस टॅब दिसेल तिकडे पोस्ट टाकु शकता..
कंफ्युज केले असल्यास क्षमा असावी Happy

आज मला ही एक लिंक सापडली... मी म्हणेन ४ ते ९ हे भाग, शास्त्रीय संगीतात थोडा वेळ गुंतवलेल्यांना सोपे जातील...

http://sites.google.com/site/amirkhanikhayal/analysisofustadamirkhan%E2%...

आजच लेख वाचला. सुंदर!
आमीर खान साहेबांचे रागेश्री, चारुकेशी, दरबारी कार मध्ये पर्मनंट आहेत Happy

थोडेसे, इतर कलावंतांच्या बद्दल -
पं. हृदयनाथ मंगेशकर खां साहेबांचेच गंडाबद्द शिष्य झाले होते.
आजचे आघाडीचे २ सतार वादक - उ. शुजात खान जे स्वतः उ.विलायत खांचे चिरंजीव आणि उ.शाहिद परवेज यांनी त्यांच्यावर खां साहेबांच्या गायकीचा प्रचंड प्रभाव असल्याचे सांगितलेय.

थोडेसे अवांतर - हिंदी चित्रपट सृष्टी मधील एक कलाकार शहाबाज खान ( द स्वोर्ड ऑफ टिपु सुल्तान मधील हैदर अली) हे खां साहेबांचे चिरंजीव. ते स्वतः सुंदर गातात पण त्यांचे पहिले प्रेम अभिनय असल्यामुळे गाण्याकडे दुर्लक्ष झालेय.

सुरेख लेख.. खाँ. साहेबांचा जन्म आमच्या अकोल्या चा ही नविन माहिती कळाली.
खाँ. साहेबांचा शुध्द कल्याण आणि मधुकौंस माझ्या आणि माझ्या मोठया दीदीच्या खास मर्म बंधातली ठेव आहे.
या निमित्याने अमीर खाँ. साहेब आणि बडे गुलाम अली खाँ साहेब यांच्यात तीव्र व्यावसायिक स्पर्धा होती असं वाचल्याचं आठवतय.

Pages