वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही.
एखादं छानसं चित्र काढायला घ्यावं, ते मनाप्रमाणे जमतही यावं पण मध्येच लहर फिरल्यासारखे त्यात गडद, उदासिन रंग भरावेत आणि मग असंच फाडून फेकून द्यावं असं काहीसं नियतीने गुरुदत्तच्या बाबतीत केल्यासारखं वाटतं कायम त्याचा विचार करताना. पण त्या चित्राच्या राहिलेच्या, अस्तित्वात असलेल्या खुणा इतक्या विलोभनीय आहेत की आयुष्याच्या या कुटील आणि जटील प्रक्रियांचा राग येतो पण गुरुदत्तच्या अलौकिक प्रतिभेची पाळंमुळंदेखिल अशाच कुठल्यातरी गुंतागुंतीच्या प्रक्रियेत असतील हे जाणवुन स्तब्ध व्हायला होतं.
Love is as contagious as a cold. It eats away at your strength, morale... If everything is imperfect in this world, love is perfect in its imperfection असं तो म्हटला खरं पण चित्रपटांवर प्रेम करुनही ते अतिशय perfect बनवले त्याने. कुठेही काही imperfect राहिलं नाही त्या प्रेमात.
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
मला समजलीये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातील मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतीये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....
मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..
कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्या पसार्यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"
simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच.
आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरंजिवी वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..