कुठे क्रृष्ण- राधा कुठे रास आता
तसाही फुलांना कुठे वास आता
विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी ' खास ' आता
मला पनवती अन तुला राहु- केतू
कुठे आपलीही जुळे रास आता
जरी माणसांना असे टाळले मी
भुतांचेच होती तरी भास आता
सदा घेत जा तू तपासून नाडी
मनाचा तनावर अविश्वास आता
भुकेलाच होता भुकेलाच आहे
असा 'देव' तोही इथे ' दास ' आता
लिहिताना चार ओळी तुझी आठवण येते …
का हातातल्या कागदासही सर मखमलीची येते…।
जिंदगी चार दिसाची ,चार दिवसही जगेना …
मनाला या मनांच्या भावना का कळेना…।
हरवून स्वतहा मिळालो कोणाला …
भास भरले मनी श्वासही सापडेना …।
एकटा चालतो मी मार्गावर अखेर काही दिसेना ….
अंधारल्या जगात मजला माझी प्रिया मिळेना…।
ठरवले जेंव्हा जगावे का उगाच आपले ….
घ्यान जरी नसे मजला परतीचे वारे लागले ….
येण्यास परत ती वेळ आलीच नाही ….
वाट पाहता वाट कधी सरलीच नाही…।
मध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग - लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग - तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण्यासाठी दगदग - दगदग
निमंत्रित करतात उदघाटनाने झगमग - झगमग
मुलांना परिचय देतांना वाटते धगधग - धगधग
मुलींची सुंदर दिसण्याचीे असते झटपट - झटपट
लहानाची स्नँकसाठीे आईकडे कटकट - कटकट
ऐका मागून एक स्थळ बघतात पटपट - पटपट
मुलींना प्रश्न विचारताच कापतात लटलट - लटलट
रिफ्रेश होण्यासाठी चहा पितात घटघट - घटघट
स्वप्नातला जोडीदार हुडकण्याची असते खटपट - खटपट
दोन्ही पत्रिका जुळवण्याची असते लटपट - लटपट
प्रत्येक स्थळांना प्रतिसाद देतात झटझट - झटझट
प्रवास व धावपळ यांच्यावरून करतात रटरट - रटरट
आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे (तरही) -
(सोयीसाठी तरहीच्या ओळीत "माझ्या" ऐवजी "त्यांच्या" असा बदल केला आहे).
आजही सार्या स्त्रियांना यातना तितकीच आहे
आजही जखमेत त्यांच्या वेदना तितकीच आहे
माणसाला दूर ठेवा आमुच्यापासून देवा
सर्व प्राण्यांची पुराणी प्रार्थना तितकीच आहे
कोणताही पक्ष सत्ता स्थापन्या आला तरी पण
आम जनतेचीच करतो वंचना तितकीच आहे
'तो' दिवा वंशास आहे 'ती' म्ह्णे की धन पराया - ('तो'=मुलगा, 'ती'=मुलगी)
काल होती आज ही ती धारणा तितकीच आहे
आयुष्याचे अर्थ जसजसे लागत गेले
त्याच्या माझ्या मधले अंतर वाढत गेले
नात्यामध्ये प्रेमभाव अंकुरण्यासाठी
मनातल्या इच्छा-आकांक्षा चिरडत गेले
फ़क्त एवढ्या प्रश्नाचे दे अचूक उत्तर
खपेल का जर तुझ्यासारख़ी वागत गेले ?
उजाडेल केव्हा ना केव्हा या आशेवर
काळोख्या रात्रींच्यासोबत जागत गेले
कुठे विचारा प्रतारणेचा जाब कुणाला ?
एकनिष्ठता अपुल्यावरती लादत गेले
दुःख, वेदना, जखमा नाते सांगत आल्या
कोणाची कोणी ना कोणी लागत गेले
सुप्रिया
तुला समजून घेणारी पुरेशी माणसे नव्हती
तुझ्या नाजूक प्रश्नांच्या नशीबी उत्तरे नव्हती
दिलेली हाक मी.. ऎकू तुला आली नसावी........ का?
तुझ्या-माझ्यामधे इतकी कधीही अंतरे नव्हती
तुझ्या ओल्या रुमालाच्या कडेवर राहिले काजळ
कधी डोळ्यांमधे दिसली कुणाला आसवे नव्हती
अवेळी यायचा होता बहर! शुष्कावल्या झाडा ...
तुझ्या निष्पर्णतेलाही ऋतूंची कारणे नव्हती
तुझ्या हद्दीत आल्याचे तुला वाईट वाटेस्तो
तुझ्या माझ्या घरामध्ये कधीही कुंपणे नव्हती
जयदीप
फोडले आरसे जरी, तुज संगतीत मी राहणे
निळसर डोळ्यातुन तव माझे मला मी जोखणे.
वारसा कुठला तुझा, कुळ तुझे कोणते
नितळत्या काचेपरी, तुज आरपार मी पाहणे.
जाळली केंव्हाच मी जन्मदात्री ती तुझी
मिरवण्या समारंभी, तुज वेश्येसम मी वागणे.
नाही कधी कळले मला हेवा तुझा का वाटतो
सर्वस्व तु दिले मला तुज विषास्तव मी बाधणे.
एकदा तरी मला जिंकवशील का तु कधी
आहेच या जन्मी मला तुज संपलेला पाहणे.
अमृत हे इतके मला पाजु नको रे एवढे
व्हायाचे नाही मला, तुज प्रेतयात्री चालणे.
ते मला विचारी भरु का रे पेला
अन मी आशेने, बोलतो कशाला
जरा दोन घटका घोट घोट घेवू
भले पेटता सुर्य घेवू उशाला
तिला बोलण्याचे धाडसही नाही
उगा दोष देतो रिकाम्या खिशाला
किती दूर जाशी अंदाज नव्हता
एवढ्यात कशी, झोप लागे सशाला
जरा पिऊ देरे ,जगूदे मला तू
बोलताच झाली जाणिव घशाला
किकु
वाट जगण्याची अशी मी वेगळी चोखाळली,
घेतली मागून दु:खे अन सुखे फेटाळली...
शक्य नव्हते तूर्त पदरी श्वापदांना पाळणे,
तेवढ्यासाठीच काही माणसे सांभाळली...!
वाटली नाही जराही नागवी गरिबी कधी,
लोकलज्जेस्तव सुखाची लक्तरे गुंडाळली...
ठेवली साखर जिभेवर सारखी मी एवढी,
शेवटी हडळी, भुतेही भोवती घोटाळली.....
प्रश्न प्रश्नांचे कधीही समजले नाही मला,
फक्त मी सवयीप्रमाणे उत्तरे कुरवाळली...
गर्व शक्तीचा उगाचच वाटला नाही कधी,
मी जरा गाफील झालो, सावली बोकाळली..
तुझ्या डोळ्यातला भाव
मला ठाऊक आहे
तुझ्या स्वप्नातला गाव
मला ठाऊक आहे
तुझे गूढ अगम्य ..
ते देवादिकांसाठी
तुझ्या काळजाचा ठाव
मला ठाऊक आहे.
-- बाळ पाटील