माझी वाट..
तशा रेषा असतात
साध्या सरळ सोप्या
सहज चालून जाता येईल
त्यांच्यावरून
अशा आडव्या..
मीही मजेत चालत असते
त्यांना तसच गृहीत धरून.
कुणीतरी छेद देतं
उगाच..
रेषा होतात उभ्या..
मग सुरू होते ..
‘नन्ही चिटी..’ म्हणत
व्यवस्थेला आव्हान देत
माझी उभी चढण..
हसत.. वाकुल्या दाखवत
उभे असतात
वाटच नाहीशी करणारे
अन् रेषा बदलणारे..
लढत राहते मी
कधी जगाशी.. कधी माझ्याशीच ..
गडद अंधारे पर्यंत.
घे उतरवला सगळा साज श्रृंगार
तयार आहे आता तुझ्या स्वागताला
बरस हवा तितका, हवा तसा
गोठवून टाक माझ्या नसानसांना
कर प्रयत्न, रंग-रूप सारं कर शुभ्र
तुझ्या बोचऱ्या गारठ्याने टोकेरी फांद्या
रंगहिन, रुक्ष, निष्पर्ण, निरिच्छ, निर्विकार
अन वर दे सोडून निर्लेप वस्त्र पांढरं
राहिन लपेटून तेच गारढोण प्रावरण
सुकत आत आत, रुखं रुखं वरून...
काळोखाच्या साम्राज्यातून जन्म घेत असते पहाट क्षणो क्षणी
प्रकाशाला गिळून पुन्हा एकदा पुढे सरकतो अंधार क्षणो क्षणी
अविश्वासाच्या भिंती फोडून अवतरतो विश्वास क्षणो क्षणी
विश्वासाचा बळी घेऊन पुन्हा 'मी' म्हणतो अविश्वास क्षणो क्षणी
दुखा:च्या खोल खायीतून वर येत असते सुख: क्षणो क्षणी
सुख:च्या या संथ जालावर दुखा:चे ही तरंग उठती क्षणो क्षणी
मृत्यूच्या विराट मुखातून जन्म घेत असते जीवन क्षणो क्षणी
जीवन हे पुन्हा एकदा देई मृत्यूस आमंत्रण क्षणो क्षणी
अजय सरदेसाई (मेघ)
19/09/1994 9:00 AM
मी कृष्ण "मेघ", आकाशी विहरुन झाले।
बरसुन आसमंती ते विरणे जगुन झाले।।
भिरभिरला हळुवार नभातून थंड शांत वारा।
गहिवरला नकळत "मेघ",आकाश फिरुन झाले।।
डोंगर दऱ्यां शी माझे आजन्म मैत्र आहे।
त्या दाट हिरवळीशी हितगुज करुन झाले।।
त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।
मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।
आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।
फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।
सोमवार, २६/२/२०२४ , ७:५० PM
अजय सरदेसाई (मेघ)
तास भराच्या योगा नंतर
सगळी गात्र दमली, थकली
आता सगळं हलकं हलकं
मन शांत, एकाग्र ध्यान.
अलगद बंद चंक्षु समोर
एक अलवार ढग तरंगतोय
अन त्यासमोर मी निश्चल.
आसपासचा थंड गार वारा
एक भरून राहिलेली तृप्तता
शांतीचा तो अविरत अनुभव
अस्तित्वा शिवाय लहरत असणं.
हलकेच ढग पुढे येतो
त्याचा न कळणारा स्पर्श
तरीही तन मनाला जाणवणारं
हलकेच अलवार एक चुंबन!
मन कुठेच लागत नाही
निवळुनी नभ सावरले
रानात भरारे वारा
गर्दावा दाटून आला
गंधाळून कंच पिसारा.... 1
पण भुलवित नाही काही
मन कुठेच लागत नाही
त्या दूर दूरशा वाटा
ना खुणाविती ते काही
निश्चलशी डोंगरमाथी
काजळीत बुडूनी राही....2
एकटा उसासून जाई
मन कुठेच लागत नाही
मी स्तब्ध उभा माझ्यात
शोधी ना काही त्यात
तळहात निरखिता नाही
उरले ना तरीही पाही....3
ना खंत न काही सरले
मन कुठेच लागत नाही
कधीकधी वरवर सभ्यपणाचा आव आणुन
प्रेम येतं. अगदी दारावर टकटक करत
आपण म्हणतो "आत्ता वेळ नाही..... मग ये!"
.
"अरे काही काळ-वेळेचं भान? चालता हो!"
.
"लायकी नाही माझी. निघून जा."
.
पण हे बेटं! सभ्यपणाचा बुरखा टाकून,
धटिंगणासारखं आतच घुसतं.
आपलच घर असल्यासारखं,
ताणुन देतं.
खनपटीलाच बसतं
पूर्ण घराची उलथापालथ करुन,
जाताना मात्र, गर्भश्रीमंत करुन जातं.
--------------------------------
तर कधी प्रेम भिजलेल्या मांजराच्या
पिल्लासारखं,
वळचणीला सापडतं.
आपण आत घेतो
आणि हे लळा लावतं
माझ्या अत्यंत आवडीच्या मराठी गाण्याचे विडंबन सादर करतो आहे.
विकल मनाच्या पडवीमध्ये
घण घण घंटा; भरते शाळा
वर्ग तासिका हस्त पुस्तिका
थकवी मास्तर खडू फळा
उंचाविती हात षडरिपू
त्यांना पडती प्रश्न गहन
मागील बाकावर पेंगुळते
रोज भाबडे द्रष्टे मन
रसाळ मोठे विषय विभ्रमी
गृहपाठाची कसरत पुरती
आखीव-रेखीव अक्षर ओळी
डाग शाईचे आत्म्यावरती
घोकून पाढे; प्रश्न उत्तरे
का टक्क्यांचा चुकतो होरा
वाचाळांना वेळ पुरेना
अन् मौनाचा पेपर कोरा..!
***
संदीप खरे व सलील कुळकर्णी यांची पुन्हा एकदा माफी मागून माझ्या अत्यंत आवडीच्या त्यांच्या एका सुंदर कवितेचे विडंबन सादर करतो आहे.