आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

Submitted by पुरंदरे शशांक on 7 November, 2014 - 04:05

आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

खाली दोन वेगवेगळ्या लेखकांचे लिखाण उद्धृत केले आहे.

१] अ हर्मिट इन द हिमालयाज - लेखक मि. पॉल ब्रंटन - / मराठी अनुवाद - हिमालय नि एक तपस्वी - अनुवादक - श्री. गणेश नी. पुरंदरे - पान क्र. २१६ -२१९
(पॉल ब्रंटन हे एक ब्रिटिश पत्रकार, लेखक. सुमारे १९३१च्या आसपास त्यांनी भारतभर भटकंती केली. यातच ते श्री. रमण महर्षींचे शिष्य झाले. 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' या पुस्तकात त्याचे सविस्तर वर्णन त्यांनी केलेले आहे. पुढे काही पारमार्थिक साधना करावी म्हणून ते हिमालयाच्या सान्निध्यात येऊन राहिले - त्याचे वर्णन 'अ हर्मिट इन द हिमालयाज' या पुस्तकात त्यांनी केलेले आहे. याच पुस्तकातील काही उतारे येथे खाली देत आहे. एका देवदार वृक्षाच्या सान्निध्यात ते काही ध्यान साधना करीत असत. काही काळ गेल्यावर जेव्हा ते ठिकाण सोडायची वेळ येते त्यावेळेस पॉल यांच्या मनात काय विचारतरंग उमटले ते या खालील उतार्‍यातून दिसून येते. )

माझ्या नित्याच्या जागेवर, त्या पर्णराजीवर मी ऐसपैस बसलो. त्या वृक्षाकडे नजर लावण्याचे मला धैर्य होईना. माझ्या गालावर रक्त उसळून आल्याचे मला वाटू लागले. मग मलासुद्धा वाईट वाटले. या वियोगाचे दु:ख मलासुद्धा होऊ लागले.
पण शेवटी मी धीर धरला. वरती वृक्षाकडे पाहून म्हणालो - " हे तरुवरा, मला क्षमा कर. तू जाणतोसच की, हे जीवन अशाश्वत आहे. ओळख, मैत्री यांना केव्हातरी विराम द्यावाच लागतो. या जगाच्या पाठीवर, या वाळवंटात उंटांच्या काफिल्याला मधेमधे रस्ता बदलावाच लागतो. रात्रीचा मुक्काम करावा लागतो. पण माझ्यासारख्याने या तुझ्या सहवासाच्या सुखद स्मृती जपून ठेवल्या पाहिजेत.
हे मित्रा, जीवित क्षणभंगुर आहे. आपल्याला आता एकमेकांचा निरोप घ्यायला पाहिजे. आपण जी मैत्री, जो प्रेमभाव संपादन करतो, ती गमावण्यासाठी करतो. पण आपल्या आत्म्यांची ताटातूट होत नाही. अनंत अवकाशात प्रेमरज्जूंनी त्यांचे पुन्हा मीलन होत असते."

हवेत एक चमत्कारिकशी वार्‍याची झुळूक येऊन गेली.

आणि मग एक फुलपाखरु येऊन माझ्या डोक्यावर थोडा वेळ बसले आणि नंतर त्या देवदार वृक्षाच्या फांदीवरुन दाढीसारख्या लोंबकळणार्‍या एका वेलीवर उतरले. ही फुलपाखरे मोठी सुंदर दिसतात व ती या भागात सर्वत्र आढळतात. त्या वेलीवर ते फुलपाखरु बसलेले पाहून मला मोठी गंमत वाटली. तारुण्य व सौंदर्य हे वार्धक्य व सुबकता यांवर विराजमान झाल्याचे दृश्य दिसले. हे हिमालयातील फुलपाखरु आमच्या युरोपातील फुलपाखरापेक्षा पुष्कळच मोठ्या आकाराचे असते. त्याच्या पंखांवरचा रंग किती गडद दिसतो. भडक रंगाचे वस्त्र ल्यालेल्या एखाद्या खानदानी सुंदर स्त्रीप्रमाणे हे पाखरु दिसते. हे फुलपाखरु वेलीला चिकटून बसते. त्या वेलीवरचा रंग अलगद उचलते व मग कोठेतरी एखादी जागा निवांतपणे बसण्याकरता पसंत करते. माझ्या या प्रयाणाच्या वेळी दुसरे कोणी हजर नाही म्हणून ते येथे हजर झाले की काय न कळे !

सभोवार शांततेचे व स्तब्धतेचे वातावरण दाट होऊ लागले; व जवळपासची वनश्री अधिक स्पष्ट दिसू लागली.

देवदार वृक्षाच्या फांद्या खाली लोंबकळत होत्या. त्यांच्या सुईच्या अग्रासारख्या दिसणार्‍या टोकावर दंवबिंदू जमा झाले होते. ते दंवबिंदू अश्रूंसारखे दिसत होते. ते दृश्य पाहून माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी जमा झाले.

"हे देवदार वृक्षा, तुला मला काही सांगायचे आहे काय ?"

ती गडद स्तब्धता, नि:शब्द शांतता फक्त आणखी एक मिनिटच टिकली. तिचा पुढे भंग झाला. पण शब्दांनी नव्हे, तर एका विचारलहरीने. तो तरंग वातावरणातून माझ्या मेंदूत शिरला.

"तू ज्या दुनियेतून माझ्याकडे आलास ते जग मला माहित नाही. त्या जगातले मला काही समजत नाही. तू आज ना उद्या परत जाणार हे मला माहित होते. तेव्हा तुला मी रोखून कसा धरणार ? एकटेच जीवन कसे जगावे हे मी शिकलो नाही काय ! मी हा असा येथे एकटा उभा आहे. या एकाकी जीवनात सर्व गोष्टी कशा सहन कराव्या हे मी शिकलो नाही काय ? हे सोसाट्याचे वारे व झाडांना उन्मळून टाकणारे विजांचे चमचमाट मी सहन करतोच की नाही ! मला ही सहनशक्ति, हे धैर्य कोठून आले ? हे धैर्य, हे सामर्थ्य माझ्या अंतरंगातून आले. तेथे ते प्रथम सुप्तावस्थेत होते. आता मला कोणाचीही आणि कशाचीही भीती नाही. मरणाचीसुद्धा नाही. तेही आता काही फार दूर नाही. मी स्वावलंबनावर जगायला शिकलो आहे. माझ्या तरुण मित्रा, हेच माझे तुला उत्तर. स्वावलंबी हो. तू कोठेही गेलास तरी मनाने विरक्त रहा. म्हणजे बाह्य जग तुला कमजोर करणार नाही. येथे जी तुला मनःशांती मिळाली आहे, तिची आठवण ठेव. ती तशीच तुझ्याबरोबर धावपळीच्या आयुष्यात एक अत्यंत मौल्यवान ठेवा म्हणून जवळ बाळग. हे धावपळीचे आयुष्य माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हा ठेवा तुझ्याजवळ असला म्हणजे तुझ्यावर कितीही वादळे कोसळोत, तुला भिण्याचे कारण रहाणार नाही. ही गोष्ट सतत ध्यानात ठेव की, तुझ्या अस्तित्वाचे मूळ परमेश्वराकडे आहे. माझी स्वतःची मनःशांती मी तुला प्रदान करतो."

हे त्या देवदार वृक्षाचे अखेरचे शब्द. त्याच्याकडून माझ्याकडे येणार्‍या या संदेशवाहक वायुलहरी यायच्या थांबल्यावर नकळत माझ्यावर काही चमत्कारिक परिणाम होऊ लागला. बाह्य जगातील शांतता माझ्या अंतरंगात प्रवेश करु लागली. मला मोहनिद्रा लागू लागली आणि समाधीसारखी अवस्था येऊ लागली. मी अगदी निश्चल, जमिनीतून उगवणार्‍या झाडासारखा जमिनीस चिकटल्यासारखा झालो. माझे बोट हालेना की हातपाय हालेनात.

ध्यान लावण्याचा मी आपण होऊन प्रयत्न केला नाही, की सैरावैरा धावत असणारे विचार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तरी गुंगीचे औषध दिलेल्या एखाद्या रुग्णासारखा मी असहाय बनलो. फक्त इतकाच फरक की, माझ्या सभोवारच्या पदार्थांची मला चांगलीच जाण होती. माझे मन आत आत कसल्यातरी अत्यंत चुंबकशक्तीच्या आकर्षणाने जोरात खेचून ढकलून दिले जात आहे असे मला वाटू लागले.

हे वृक्षा, माझ्यावर तू ही काय आफत आणली आहेस!

निर्वातस्थानी दिवा जसा संथपणे जळतो, त्याप्रमाणे माझे विचार आता एके ठिकाणी येऊ लागले. खाली दरीत जशी शांतता होती तशी शांतता आता माझ्या मनात वावरु लागली.

डोळ्यांच्या पापण्या मला धड मिटता येईनात की उघडता येईनात. या अर्धवटशा समाधीस्थितीतून बाहेर पडायला मला प्रयत्नही करता येईनात. पण ही अर्धसमाधी अवस्था मला इतकी सुखदायक वाटली, की त्या अवस्थेतून बाहेत पडूच नये असे वाटू लागले.

हा अनुभव इतका उदात्त व आनंददायक, ती अवस्था इतकी इंद्रियव्यापार विसरुन टाकणारी की तिचे वर्णनच मला खरोखरी करता येत नाही. आपले वैयक्तिक अस्तित्व दिव्यत्वातच रोवलेले आहे हे मला नव्यावे कळून आले. या अवस्थेचे हुबेहूब वर्णन करावयाचे म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञासारखे लिहिले पाहिजे आणि अगदी तपशिलात जाऊन विश्लेषण करावयास पाहिजे. पृथक्करण करण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजे सुंदरतेच्या प्रदीप्त अग्नीची नुसती राख करीत बसणे. तरीपण या राखेचे सुद्धा या पार्थिव जगात, जेथे सूक्ष्म जगताचे सौंदर्य अत्यंत दुर्मिळ व दूरचे असते, तेथे स्वागत होईल.
अंतर्मुख दृष्टीने माझे सुख परिपूर्ण करुन टाकले आहे अशा अवस्थेत मी किती वेळ होतो हे माझे मलाच बरोबर नाहित नाही. कदाचित अर्धा तास सुद्धा झाला नसेल. शेवटी परमपुरुषाने माझ्या मनाचा व अंतरंगाचा घेतलेला ताबा सोडून दिला. फक्त माझ्यामधील अतिमानव चिरकाल वास करु शकेल. नाखुषीने का होईना, शेवटी मी उठलो.

मी त्या कड्याच्या कडेवरुन सरपटून गेलो व जपून देवदार वृक्षाच्या खोडापर्यंत दगडांवर व झाडाच्या मुळावर हात टेकीत खाली उतरलो. खोडाच्या सालीची एक लहानशी पट्टी मी काढली आणि परत फिरलो. ती पट्टी माझ्या हिमालयातील एकांतवासाचे जणू स्मृतिचिन्हच.

------------------------------------------------------------------------------------------------------------

२] चकवाचांदण एक वनोपनिषद - लेखक श्री. मारूती चितमपल्ली

श्री. मारूती चितमपल्लींची मोठी बहिण (रेणुका) अक्काचे लग्न झाल्यावर ती दस्तापूरला रहात असे. सोलापूर - हैदराबाद रस्त्यावर नळदुर्गाजवळ हे दस्तापूर नावाचे छोटेसे गाव आहे - सोलापूरहून छत्तीस मैलांवर. तिचे यजमान ग्यानबा उर्फ भावजी यांची मोठी दुकानदारी होती. सुरुवातीस ते सारे कुटुंबिय अतिशय सधन होते. पुढे त्यांच्या व्यापाराला उतरती कळा लागली व ते पार निर्धन झाले. चितमपल्लींच्या मामांनी भावजींना खूप धीर दिला व सोलापूरात काही व्यापारधंदा करण्याचा सल्ला दिला. पण भावजी त्याला तयार झाले नाहीत. त्यांची काही जमीन होती - त्यांनी ठरवले की आता शेतीत लक्ष घालायचे. उभ्या आयुष्यात भावजींनी कधी कुदळखोरे हाती घेतले नव्हते ते भावजी आता बारा बारा तास शेतात काम करु लागले. गावकरी म्हणायचे - "ग्यानबाचे दिवाळे निघाले, तो पागल होऊन शेत उकरत फिरतोय". पण भावजींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शेतात आधी सीताफळं, रामफळांची झाडं लावली. मग पुढे नानाविध आंबे, चिंचा, जांभळी, बोरी, शेवगा, हदगा, कडुनिंब, उंबर, चंदन, आपटा, सौंदड, कारी अशी अनेक झाडे लावली.
यातील प्रत्येक झाडाविषयीचे गूढ ज्ञान भावजींना होते. उंबराच्या झाडाविषयी ते सांगत - "उंबर रातीच्या वेळेस हरेक झाडाची तपासणी करतो. कुणाठिकाणी इजा झाली ते पहातो. मग चंदन राजापुढे उभा रहातो. आणखीन इतरही झाडं जमतात. त्यांना जीव हाय. ज्याच्या त्याच्या गुणधर्माप्रमाणं रुपही हाय."
"सीताफळाचं रुप बाईसारखं. रामफळ पुरुषासारखं. चिंच-बाभळी बायांसारख्या. बोर बाईचा अवतार."

तर या अशा लोकविलक्षण भावजींनी मारुतीरावांना या झाडांसंदर्भात स्वतःचा एक अनुभव सांगितला तो खालीलप्रमाणे - पान क्र. ९३

"पहाट झाली होती. चंद्र मावळला होता. जिकडेतिकडे अंधार. आभाळात चांदण्या दिसत होत्या. उंबराचं झाड माझ्याकडे चालत येत होतं. त्यानं माझ्या मस्तकावर हात ठेवला अन् म्हटलं - 'मी असा इथं एकटा उभा आहे. त्या एकाकी जीवनात सर्व गोष्टी कशा सहन करायच्या हे मी शिकलो. आता मी सहनसिद्ध आहे. ऊन, सोसाट्याचा वारा, झाडांना बेचिराख करणारा विजेचा लखलखाट सारं मी सहन केलं. मला ही सहनसिद्धी व हे धैर्य कोठून आलं ? हे सारं माझ्या अंतरंगातून आलं. मला भीती माहित नाही. मरणाचीसुद्धा. तू आता स्वावलंबी झालास. पण मनानं विरक्त रहा, म्हणजे बाहेरचं जग तुला विचलित करणार नाही. इथं तुला जी मनःशांती मिळाली आहे, तिची आठवण ठेव. ती तशीच तुझ्याबरोबर राहील. आता माझी स्वतःची मनःशांती मी तुला वरदान देतो.'
"नकळत माझ्यावर काही चमत्कारिक परिणाम होऊ लागला. बाहेरची शांतता एखाद्या प्रकाशाच्या झोताप्रमाणं माझ्या मनात शिरत होती. मला मोहनिद्रा येऊ लागली. समाधीसारखी अवस्था होऊ लागली. जमिनीतून उगवणार्‍या झाडासारखा मी जागच्याजागी चिकटल्यासारखा झालो."

"त्या अवस्थेत मी किती वेळ होतो, ते मलाच बरोबर आठवत नाही. सूर्य उगवला होता. मला जाग आली. सूर्याची कोवळी किरणं झाडांच्या शेंड्यांशी खेळत होती. असा सुंदर सूर्योदय मी कधी देखला नव्हता. त्या झाडानं माझ्या मनाचा व अंतरंगाचा घेतलेला ताबा शेवटी सोडून दिला. मी उठलो आणि घरी परतलो."

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

या दोन्ही पुस्तकांचे लेखक पूर्णतः वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले आणि वेगवेगळ्या कालखंडातले. ग्यानबा म्हणजेच भावजी हे सोलापूर जवळच्या अगदी खेड्यातले तर पॉल एक ब्रिटिश लेखक. असे असताना या दोघांचा जो अनुभव तो इतका समान कसा काय हे एक मोठे कोडेच !!

या लेखकांना किंवा ज्या कोणाला असे अनुभव प्रत्यक्षात लाभले त्यांना मी तरी भाग्यवानच समजेन. कारण निसर्गात अनेक रहस्ये दडून बसलेली असताना या मंडळींनी निसर्गाशी केवळ मैत्रीपूर्ण, विनयशील संबंध जोडल्यामुळेच यातील काही काही रहस्ये निसर्गाने आपणहून त्यांच्याकडे तेवढ्याच प्रेमभावाने सुपूर्द केली असावीत असे माझे एक मत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शांकलीने (माझी पत्नी अंजली) हे विलक्षण साधर्म्य असलेले दोन्ही लिखाण मला दाखवले. यावर आमची दोघांची बरीच चर्चाही झाली. मा बो वरील अनेक निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी मंडळींबरोबर हे शेअर करावे हाच एकमेव हेतू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तथागत गौतम बुद्धांनी 'बोधिवृक्षा'खाली म्हणजेच पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ होऊन ज्ञानप्राप्ती केली होती.

खुप खुप मस्त..
दोघ दोन टोकाचे पण अनुभुती अगदी सारखी..
निसर्ग प्रत्येकावर सारखीच माया करतो याच उत्तम अनुभवचित्रण..
चकवाचांदण घेऊन ठेवलयं परिक्षेनंतर वाचायचा मुहुर्त काढलाय Happy
लिंक नि ग च्या धाग्यावर शेअर करण्यासाठी धन्यवाद शशांक Happy

खुप खुप आभार या नितान्तसुन्दर लेखाबद्दल...

तुमचा प्रत्येक लेख माहितीपुर्ण, अभ्यासू आणि अगदी आवर्जुन वाचण्यासारखाच असतो..

असेच वाचत आणि आमच्याशी शेअर करत रहा...

अवान्तर :

माझी आज्जी बोलायची झाडान्शी ..... तिच्या मते झाडे पण बोलत तिच्याशी...
एक हिरवीगार तगर सुकणार आहे हे तिने ४-५ दिवस आधी सान्गितले होते माझ्या आईला... आणि तसेच झाले...

मला स्पष्ट आठवते. आमच्या गावाशेजारील लहान टेकडीवर ज्ञानोबा नावाची व्यक्ती राही. आठवड्यातून एकदोनदा तो वडिलांकडे चक्कर मारी. तासभर गप्पा मारून पुन्हा टेकडीवर जाई. त्याने सर्व टेकडी हिरवीगार केली होती. त्याने खूपदा वडिलांना सांगितले होते की त्याला महिन्यातून चारपाच वेळा एक माणूस भेटतो. रंगाने हिरवागार, उंची सहा सात इंच. तो हवेत तरंगत असे व त्याच्या अंगातून किंचित प्रकाश बाहेर पडे. तो याच्याबरोबर गप्पा मारीत असे. मी औदुंबराचे झाड आहे असं म्हणे. त्याने ज्ञानोबाला खूप झाडांचे औषधी गुणधर्म सांगितले होते. तो वडिलांना विचारी "मी वेडा झालोय का?" कारण सगळे गाव त्याला वेडा म्हणे. पण तो अगदी असाध्य रोग देखील औषधी पाला वापरून बरा करे. त्याने वडिलांना सांगितलेल्या अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत. मी आठवीला असताना ज्ञानोबा औदूंबराच्या झाडाखालीच वारला. तो ज्या झाडाखाली मेला ते झाड दोन तीन महिन्यातच वठले.

अदभूत आणि रोचक अनुभव !

(अरेच्चा हा लेख वाचायचा कसा काय राहिला होता.)
धन्यवाद शाली लेख वर काढल्याबद्दल आणि धन्यवाद शशांक हे लिहिल्याबद्दल

दोघांनाही दोन वृक्षांनी आपापले विचार सांगितलं असं दिसतं. प्रत्यक्षात वृक्षयोनीतील सामूहिक ज्ञान संक्रमित झालेलं असावं. वृक्ष वेगळे धरले तरी योनी एकच आहे. मनुष्याच्या बाबतीत एकाच योनीतील दोन जीव एकमेकांशी भाषेमार्गे संवाद करून विचारांचे आदानप्रदान करतात. वृक्षयोनीत हाच प्रकार थेट होत असावा.

इती- गामा_पैलवान
हे वाचल्यावर हरपेन यांच्या मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडी वरचा लेख आठवला त्यात दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये दोन झाडं एकमेकाशी कशी बोलतात प्रसंगी पाणीदेखील शेअर करतात याविषयी माहिती आहे.
धन्यवाद सुंदर लेखाबद्दल...

हे वाचल्यावर हरपेन यांच्या मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडी वरचा लेख आठवला त्यात दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये दोन झाडं एकमेकाशी कशी बोलतात प्रसंगी पाणीदेखील शेअर करतात याविषयी माहिती आहे.
>>>>
हो मलाही तेच आठवले, मी मागे या विषयावरचे एक इंग्रजी पुस्तकच वाचले होते ज्याचे / लेखकाचे नाव मला आत्ता अजीबातच आठवत नाहीये.

@ हर्पेन
हे सगळं वाचल्यावर माणूस बुद्धिमान म्हणून इतर सजीवांवर किती अन्याय करतो . त्यांना किती गृहीत धरतो असं वाटतं. यासाठीच माणसाला बुद्धी दिली आहे का असा प्रश्न पडतो.

एका झाडावर किड पडली तर ते झाड इतर झाडांना त्याची माहिती पुरवते व इतर झाडे त्याप्रमाणे रसायणे निर्माण करायला सुरवात करतात. किंवा काही झाडे मधमाशांना इतर झाडांचा पत्ता देतात. झाडावर कुऱ्हाड चालवली तर आजुबाजूची झाडे घाबरतात. काही झाडे विशिष्ट झाडांना आपल्या आसपास वाढू देत नाही किंवा काही झाडे इतर वेगळ्या जातीच्या झाडांना वाढायला खास मदत करतात. हे सगळं यापुर्वीच सिध्द झाले आहे. पुर्वी पिकांमधेही अशी वृत्ती आढळायची जी आता नविन बियाणांच्या पिकांमधे आढळत नाही.

काही आदिवासींमधे झाड तोडण्याला परवानगी नसल्याने लाकडांसाठी ते एखादे झाड निवडून त्याचा खुन करतात. रोज ठरावीक वेळी सगळे त्या झाडाभोवती जमुन त्याला शिव्या शाप देतात. लवकरच ते झाड वठते (मरते) हा किस्सा खरा असुन तो सगळ्यांना माहित आहे. गच्वीतल्या बागेत झाडांच्या पानावरुन नुसता हात जरी फिरवला रोज, किंवा त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवला तर त्यांची वाढ लक्षणीय पध्दतीने वाढते हे तर कित्येकांनी स्वतः अनुभवले असेल.

मग प्रश्न पडतो, इतकी सगळी माहिती आपल्याला असताना आपण झाडांची काळजी का करत नाही? किंवा या महितीचा उयोग आपण लागवडीसाठी का करत नाही? आपलं म्हणून असं एखाद वृक्ष या कॅटेगरीत बसणार झाड लावून त्याची का काळजी घेत नाही? येथे असलेल्या कितीतरी जणांचे लहाणपणी शेतात नक्कीच एखादेतरी आवडते झाड असेल. आंब्याचे किंवा इतर कोणतेही. माझे चक्क आवडते झाड म्हणजे एक बाभळ होती. आज्जीला लाडवासाठी डिंक लागे. तो सुट्टीत आम्ही गोळा करत असु. मला त्या बाभळीने कधी निराश नाही केले. आज्जी म्हणायची "या बाभळीला आजकाल जास्त डिंक येतो" मला त्यावेळी खात्रीने वाटायचे की ते झाड माझ्यासाठी जास्त डिंक देते. खरेही असेल.
मग आता सध्या आपला आवडता वृक्ष कोणताच का नाही?

केवळ आणि केवळ हा प्रतिसाद देण्याकरता लॅपटॉप वरून लॉगिन झालेय..
शशांक - थँक्यू सो मच फॉर शेअरिंग.

माझा अनुभव (खरतर अनुभूती) चिरकालीन नाही.. त्या पिरियड करता ती आली आणि मग रोजच्या जगण्यात आठवण ठेवून विरू न गेली.
कदाचित माणूस रोज तिथे राहि ला तर वेगळा अनुभव येऊ शकेल.

२०१६ सालची गोष्ट. कोयनेला नवजाच्या भागात फोरेस्ट एकोसिस्टीम बद्दल शिकायला गेलेले.
व्याघ्रप्रकल्पातला तो भाग तो वर्जिन फोरेस्ट चा आहे. जायला परवानगी लागते.

अतिशय शांत, खालती झरा/ओढा - वरती जुने पुराणे स्थानिक वृक्ष, मधे दगडांची पायवाट.
जवळचं पाणी संपल्यानं आम्ही सगळेजण झर्‍याकडे गेलो.. थंडगार गोड पण स्वच्छ पाणी, भोवताली हिरवीगार झाडी - आठवतानाही फार पीसफुल वाटतय. तिथे स्वर्गीय नर्तक बघायला मिळाला.. (आणि ह्यात काही विशेष आहे हे ही आधी कळले नव्हते, पण पक्षी अति शय सुंदर होता!आणि दर्शन आनंददायक होते)
तिथून मग वर पायवाटेकडे गेलो, झाडांची माहिती घेत घेत वर डोंगरावर चढलो. बाकीचा गृप तिथून पुढे धबधब्याकडे उतरताना मी आणि एक मैत्रिण माघारी वळलो आणि निम्या अंतरावर वेगवेगळ्या दगडांवर डोळे मिटून शांत बसलो.
तिथे एक शब्दही न बोलता बसलेलो असताना मनात जे अनु भवायला आलं ते शब्दातीत आहे.
अलौकिक शांतता - तिथे कुठलीही दुसरी भावना नव्हती, फक्त "असणे" हा एकच भाव उरला होता..एक क्षणभर आठवलं की हा व्याघ्र प्रकल्प आहे, पण दुसर्‍या क्षणी जाणवलं की त्याचीही काळजी वाटली नाही , जरी काही झालं तरी ते होण्याकरता हा क्षण यथायोग्य होता - मनात ज्या प्रकारची भूमिका तयार झालेली त्यात काही झालं तरी ठीकच असे वाटत होते.. फक्त हा क्षण आणि आपले आत्ताचे "असणे" हे दोनच खरे अशी काहीशी मनोभूमिका होती ती. त्यात अपरिहार्यता होती, पण ती वैतागातून आलेली नसून त्या मोठ्या चित्राचा आपण एक भाग असल्याचे जाणवल्याने आलेली होती. त्या क्षणी ते चित्र जसे होते आणि जसे असणार होते परिपूर्ण होते. ते कायम परिपूर्णच असणार होते.

माझ्यातल्या २ वर्षाच्या आईकरता अगदीच वेगळी भूमिका(बाकी कुठल्याही भूमिकेतून सुटणे तुलनेने सोपे वाटते).

इतकं आश्वस्त आणि शांततापूर्ण आयुष्यात खूप कमी वेळा वाटलं असेल !

अशा वातावरणात जे रोज तप/चिंतन करत असतील त्यांना आत्मशोध व्हावा, उपनिषदे स्फुरावित ह्यात कुठलेच आश्चर्य नाही!

घरी आल्या वर रोजच्या जगण्यात हळूहळू ती अनुभूती कमी होत गेली..
त्या क्षणांची आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

@ नानबा,
तुमचा प्रतिसाद वाचतानाही इतकं मस्त वाटत होतं...
प्रत्यक्ष अनुभव तर काय असेल !!
तुम्ही म्हणताय तसेच उल्लेख उपनिषदात आहेत. त्याकाळच्या ऋषिंनी निसर्गातूनच ज्ञान मिळवले. त्यांची निसर्गाशी एकरुप होण्याची कला विलक्षणच म्हणावी लागेल. निसर्गानेच त्यांना अंतर्मुखही व्हायला शिकवले. निसर्ग हाच अद्वितीय गुरु.
मनःपूर्वक धन्यवाद....

शालींनी वर्णन केलेले ज्ञानोबाही ग्रेटच... सध्याही अशी व्यक्तीमत्वे आहेत तर !!
अनेक धन्यवाद शालीजी... Happy

Pages