#मराठीकविता

राधिका

Submitted by अर्जुन ..✍️ on 4 September, 2026 - 06:19

हिरव्यागार पठारावरती,
एक अनोखी चाहूल लागली,
एका घनदाट वृक्षाखाली,
एक तरुणी नजरेस पडली.

देखणे ते रूप साजिरे,
कोमल तिची ही काया,
माझ्या मनात फुललेली,
साकार झाली तीच माया.

काळ्याभोर केसांची बट,
गालावर तिच्या रेंगाळली,
माझी नजर नकळत मग,
तिच्याच रूपावर खिळली.

मृगनयनी ती अप्सरा जणू,
या भूतलावर अवतरली,
हाती घेऊन रानफुले,
हळूच माझ्या समीप आली.

क्षणभर ती तिथे थांबली,
आणि गालात हळूच हसली,
“मी राधिका...” पुटपुटून,
दुसऱ्या वाटेने निघून गेली.

शाई विरघळत नाही

Submitted by अर्जुन ..✍️ on 31 July, 2026 - 07:27

माणसे मरणानंतरही जिवंत राहतील,
जी कागदावर आपले शब्द मांडत राहतील.

कवितेच्या ओळी प्रेम करायला शिकवतील,
वाचणारे कलेमध्ये स्वतःचे अस्तित्व शोधतील.

पानाफुलांवर आणि पावसावर अनेक कविता होतील,
पहिल्या पावसात लोक आपला पाऊस शोधतील.

एक कप चहावर अनेक कथा येतील,
आणि अपूर्ण राहिलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील.

एका ओळीने कोणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहतील,
तर एकाच ओळीने कोणाचे आनंदाश्रू वाहतील.

शब्दांनीच अनेक आंदोलने होतील,
रस्त्यावर येऊन आपल्या हक्कासाठी लढतील.

तुझीच आठवण खूप येते

Submitted by अर्जुन ..✍️ on 27 July, 2026 - 05:24

गाण्याच्या सुरावटींमध्ये
तुझी आठवण खूप येते...
कवितांच्या शब्दांमध्ये
तुझंच नाव ऐकू येते.

पावसाची सर कोसळताना
तुझं रूप समोर येते,
मातीचा सुगंध दरवळताना
तुझी आठवण दाटून येते.

निळ्या आकाशाकडे पाहताना
तुझे ते लाजणे आठवते.
सागराच्या लाटांमध्येही
तुझ्या डोळ्यांतील ते प्रेम दिसते.

तुझी वाट पाहताना
वेळही थांबून जाते,
सर्वत्र शांतता असताना
तुझीच चाहूल लागते.

मंद मंद श्वासांमध्ये
तुझी आठवण गहिवरून येते...
माझ्यातला मी शोधताना
तुझीच आठवण खूप येते

राहून गेलेला चहा

Submitted by अर्जुन ..✍️ on 12 July, 2026 - 09:01

पाऊस तर प्रतिवर्षी येतच राहतो,
विजांच्या कडकडाटात
आणि मेघांच्या गर्द छायेत
दिमाखात बरसून जातो.

पण त्या वर्षाचा पाऊस
हृदयस्पर्शी ठरला;
माझ्या अंगणासोबत
अंतरात्माही चिंब भिजवून गेला.

वाऱ्याच्या झंझावातासारखा
तू सामोरा ठाकलास;
लौकिक बंधनांच्या शृंखलांना
सहज छेद देऊन गेलास.

मनात साचलेले अनेक कढ
हळूहळू सुटू लागले,
आणि कधी नव्हे ते मी
स्वतःचा पुनर्शोध घेऊ लागले.

इतकी वर्षे
मी स्वतःच्याच गर्तेत हरवून गेले होते;
दुसऱ्यांच्या आनंदात
स्वतःचा आनंद धुंडाळत होते.

हरवलेली माणुसकी

Submitted by अर्जुन ..✍️ on 9 April, 2026 - 11:24

नको नको देवा पुन्हा, मनुष्यजन्म या पृथ्वीवर,
माणुसकीचा गंध आणि प्रेम, उरले नाही या जगण्यावर।

स्वार्थासाठी ओरबाडून, निसर्ग हा संपत चालला,
“आपलाच हक्क असावा”, असा अट्टाहास का मांडला?

माणूस आता माणूस नाही, अपेक्षांचा तो गुलाम झाला,
जाती-धर्माच्या कुंपणांनी, तुकड्यांत तो विभागला।

डोंगर-दऱ्या अन अथांग सागर, ओसंडून वाहती नदी,
एवढ्या सुंदर पृथ्वीची, कोणालाच का कळेना महती?

सुंदर या वसुंधरेवर, सीमारेषा अनेक आखल्या,
शेजारी असूनही माणसांच्या, कुरापती मात्र वाढल्या।

सत्तेचा सारीपाट

Submitted by अर्जुन ..✍️ on 25 January, 2026 - 07:05

निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले,
नेत्यांना आता लोकशाहीचे वेध लागले.
हौशी आणि नवखे सर्वच आता जागे झाले,
दिवसरात्र लोकांमध्ये घिरट्या घालू लागले.

तिकीट मिळवण्यासाठी रान पेटून उठले,
चौकाचौकांत मोठे-मोठे बॅनर लागले.
अण्णा, अप्पा, दादा आणि ताई,
सारेच आपापल्या कामांचे गुणगान गाऊ लागले.

तिकीट मिळवण्याच्या आशेने,
रस्त्यावर शक्ती प्रदर्शन होऊ लागले.
आपापले धागेदोरे नीट वापरून,
तिकीट मिळवण्यासाठी सर्व रांगेत लागले.

Subscribe to RSS - #मराठीकविता