वामकुक्षी

Submitted by Meghvalli on 2 March, 2026 - 03:58

दुपारचे जेवण झाले, आता एक डुलकी पाहिजे,
वार्‍याची झुळूक अंगावर अलवार फिरली पाहिजे।

डोळ्यांच्या कडा मिटताच स्वप्नांची सावली यावी,
मनाची सारी धावपळ क्षणभर थांबली पाहिजे।

आकाशी ढग तरंगती, शांत निळी ती छाया,
छपरावर पावसाची चाहूल हलकेच लागली पाहिजे।

घड्याळाचाही काटा जरा मंद फिरला पाहिजे,
या धकाधकीच्या जगातून थोडी विश्रांती मिळाली पाहिजे।

‘मेघ’ म्हणे या भरदुपारी जीवास जरा विसावा पाहिजे,
स्वप्नांच्या या सावलीत निवांत झोप लागली पाहिजे।

शनिवार, २८/२/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users