ग्रामीण शहाणपण

Submitted by राज अज्ञानी on 12 January, 2026 - 00:23

बर्‍याच वर्षांनी एका फॅमिली गेट टूगेदरमधे सहभागी होण्याचा योग आला.

जवळच्या सोयरिकीतल्या मुलाशी एका परराज्यातल्या मुलीने आंतरजातीय विवाह केलेला आहे. राज्य वेगळे म्हणजे जात वेगळी आलीच. यामुळे सांस्कृतिक फरक आलेच. मुलीकडचे अजिबात खूष नव्हते. त्यांनी मुलीशी अनेक वर्षे संबंध तोडले होते. त्या वेळी आम्ही तिला मानसिक आधार दिला. कितीही मानलेली नाती असली तरी ती आई वडलांची जागा घेऊ शकत नाही.

पुढे तिने ज्याच्याशी लग्न केले त्याची मानसिक स्थिती अस्स्थिर झाली. ती पुढे आणखी बिघडली. उपचार चालू झाल्याने धंदा बुडाला. या मुलीने मग नोकर्‍या केल्या. हायर एज्युकेशन घेतले. आता मोठ्या कंपनीत आहे. तिच्या स्वतःच्या मुलाला वाढवले. पण तिचे सासरे सतत तणावात असतात. एका मुलगा बेपत्ता, दुसरा असा आणि एका मुलीच्या संसाराचं काही खरं नाही. त्यामुळे ते फ्रस्ट्रेशन सूनेवर काढत असतात. त्यातच तिच्या घरचे म्हणायचे कि "बघ आम्ही बघून दिलं असतं तर सुखी असतीस"

या कार्यक्रमात तिने हा विषय मन मोकळे व्हावे म्हणून आमच्याजवळ काढला.
माझ्या बायकोने तिला सांगितले कि गावाकडं म्हणतात कि "तुमच्या नशिबात असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा चुकवता येत नाही. तू कुठेही लग्न केले असतेस तरी हे भोग तुला टळलेच नसते"

मी क्षणभर विचारात पडलो. नशीब, भोग हे माझ्या विचारात बसत नाही. बायकोने जे ग्रामीण शहाणपण सांगितले ते वैज्ञानिक दृष्ट्या खरं किती हा संशोधनाचा भाग आहे. पण या क्षणी त्या मुलीची समजूत घालण्याची ताकद त्यात नक्कीच आहे.

मग अशा अनेक गोष्टी आठवत गेल्या. गावाकडच्या शहाणपणाला सत्याच्या कसोटीवर घासून पाहू नये. वेळ मारून नेण्यासाठी समजूत काढण्यासाठी या ज्या समजुती प्रचलित आहेत त्या एखाद्या डॉक्टरने पेशंटला वेळ काळ पाहून सांगावे अशा आहेत असे वाटले.

तुमचे अनुभव आहेत का अशा प्रकारचे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>वेळ मारून नेण्यासाठी समजूत काढण्यासाठी या ज्या समजुती प्रचलित आहेत
पाकीट मारले गेले किंवा तत्सम फटका बसला की, असे म्हणायचे काहीतरी मोठ्ठा अपघात होणार होता, थोडक्यात निभावलं. जे झाले ते चांगलेच झाले.