शशक - १ - दोन पायांचा गणपती – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 September, 2025 - 11:47

गेले कित्येक तास राणी तहानभूक विसरून बाबांसोबत दर्शनाच्या रांगेत उभी होती.
मात्र बाप्पा नजरेस पडताच तिला भरून आले.

त्यांच्या "एका" पायापाशी तिच्याच वयाची दोन मुले बाप्पांसोबत सेल्फी घेत होते. पुन्हा पुन्हा त्या पायावर डोके टेकवत होते.

इतक्यात तिचा नंबर आला..
याचसाठी केला होता..!

तिने अधिरतेनेच बाप्पांच्या "दुसऱ्या" पायाला हात लावला आणि चरणी माथा टेकवणार इतक्यात..

कोणीतरी तिचे बकोट पकडून खेचल्याचे तिला जाणवले...
आईं ग्ग! काही समजायच्या आतच ती मंडपाच्या बाहेर होती.

पाहते तर बाबा आधीच तिथे पोहोचले होते. लक्ष कुठे होते म्हणून तिच्यावरच डाफरत होते.

बाबांकडे दुर्लक्ष करत तिने विस्मयचकित नजरेने त्यांच्याकडे पाहिले. काहीश्या अविश्वासानेच..

पण ते सुद्धा तिला तितकेच हतबल भासले!

– ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एके ठिकाणी वाचलेल्या बातमीवरून हे लिहावेसे वाटले.

सुप्रसिद्ध गणपती मंडळाच्या राजाला दोन पाय आहेत. त्याचा एक पाय श्रीमंतांसाठी आहे तर दुसरा गरिबांसाठी.

एकीकडे पूर्ण समाधान होईपर्यंत आणि ते झाल्यावर देखील केवळ शो ऑफ करायला व्हीआयपी गेस्ट सहकुटुंब पडीक असतात.

तर तिथेच शेजारी दुसऱ्या पायापाशी सामान्य भक्तांना घेतला की फेकला वागणूक मिळते.

शेवटी पैसा बोलतो हे खरे असले तरी, देवाच्या दोन पायांपाशी एकाच फ्रेममध्ये दिसणारी ही समाजातील दरी बघून व्यथित व्हायला होतेच.

मला तो अर्थ घेउन आवडली होती. पण "त्यांच्या" आणि "ते" अवतरण चिन्हांत घातल्याने मला वाटले काही वेगळा गूढ अर्थ असावा.

अच्छा..
आधी मी मूळ शशक वाक्याप्रमाणे त्याच्या असे एकेरी लिहिले होते.. मग वाटले की कोणाला हे मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो असे वाटू नये.. मग त्यांच्या आणि ते केले.. पण काढतो ती आता चिन्हे Happy
अभिप्रायाबद्दल धन्यवाद

छान आहे.
गर्दी एवढी असते की प्रत्येकाला जास्त वेळ देणे शक्य होत नसावे त्यांना. अन्यथा रांगेत खूप वेळ उभारावे लागेल. रांग भली मोठी होईल.

वास्तव मांडलंय.
पण अशा वेळी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेले आठवते मी. अर्थात् लहानपणी नसतं समजलं. "मला देवाला पाहता आले नाही तरी देवाने मला नक्कीच पाहिले असणार."

प्रत्येकाला जास्त वेळ देणे शक्य होत नसावे त्यांना.
>>>>
हो, पण अश्यात व्हीआयपी आणि सेलिब्रिटी एंटरटेन केले गेले की की अजून बँड वाजते.

माझा असा मरता मरता वाचल्याचा अनुभव आहे एका अंगारकी संकष्टीला प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात.. लिहितो कधीतरी..

पण तिथली व्यवस्था चांगली होती.
इथे तर बाजार मांडला आहे सध्या.

छान.
सगळीकडे भक्तीचा बाजार मांडलाय नुसता काही मंडळांनी.
बर्‍याच वर्षांपुर्वी आम्ही पुण्याहुन खास जायचो मुंबईचे सुद्धा हे प्रसिद्ध गणपती.
गेल्या वर्षी एक मैत्रीण म्हणत होती, म्हटलं कशाला कोणाचे हात अंगाला लावून धक्के खावुन घ्या?
पण आता अजिबात नाहीच ; घरचा देव्हार्‍यात आहे ना. बस्स.

वास्तव मांडलंय. >>>>> +११
पण अशा वेळी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेले आठवते मी. अर्थात् लहानपणी नसतं समजलं. "मला देवाला पाहता आले नाही तरी देवाने मला नक्कीच पाहिले असणार." >>>>> हे आवडलं

सिद्धिविनायक ला पण पैसे देऊन वेग वेगळ्या रंग ठेवल्यात.... पूर्वी हे असं नव्हतं.

सगळीकडून फक्त नको ते उचलले जाते असं वाटतं कधीकधी :|

छान लिहीलेय.

मला देवाला पाहता आले नाही तरी देवाने मला नक्कीच पाहिले असणार. >>>हा विचार फारच आवडला प्राची

सिद्धिविनायकला पण पैसे देऊन वेगवेगळ्या रांगा ठेवल्यात.... पूर्वी हे असं नव्हतं.
>>>>>

अच्छा याची कल्पना नव्हती हे कधी झाले. मी शेवटचे जाऊन १२ वर्षे वगैरे झाली असतील.

आता तिथे गर्दी कधी होते? दर मंगळवारी? की दर संकष्टीला की अंगारकी असल्यास?

लालबागच्या राजाची सुद्धा नवसाला पावतो म्हणून मार्केटिंग कधी सुरू झाली हे शोधायला हवे.
आम्ही लहान असताना बिल्डिंग मधली सगळी लहान मुले माझगाव, भायखळा, लालबाग, काळाचौकी, परळचे गणपती बघायला रात्रीचे जायचो ते सारे चालून एका रात्रीत सकाळी उन्ह येईपर्यंत बघून व्हायचे.

लालबागचा राजा तर नुसते त्या गल्लीत चालून जाणे आणि परत येणे इतके सोपे होते. जास्त क्रेझ तर गणेश गल्लीच्या उंच गणपतीची होती

>>>>एका रात्रीत सकाळी उन्ह येईपर्यंत बघून व्हायचे.
किती रम्य बालपण गेलय तुमचं. मजा येते रात्री गणपती बघायला.

रात्रीचे गणपती बघायला, लायटिंग बघायला, रस्त्यावरून फिरायला, गाडीवर पावभाजी, वडापाव खायला आणि डोळ्यावर आलेली झोप चहा पिऊन उडवायला फार मजा येते.

बाकी गणपतीला तिथे रात्र व्हायचीच नाही. किंबहुना दिवसापेक्षा जास्त जाग असायची. रांगा प्रत्येक छोट्या मोठ्या गणपतीला लागायच्या. त्या सुद्धा सेल्फीशिवाय. पण इतकीच रांग की त्यात थोड्या गप्पा थोड्या टवाळक्या व्हाव्यात आणि मनात त्या गणपतीच्या आठवणी राहाव्यात. अर्थात अर्ध्याहून अधिक मंडळात आमच्या येथील मुलांच्या ओळखी असायच्या तर थेट दर्शन व्हायचे. पण ती व्हीआयपी लाईन नाही तर यारीदोस्तीची लाईन असायची. आणि मूळ लाईन सुद्धा काही तासांची नसायची. त्यामुळे पैश्याचा पदाचा फायदा उचलत कोणावर अन्याय करतो असे तितके वाटायचे नाही.

मुंबईसारखे सण जगाच्या पाठीवर कुठे साजरे केले जात नसतील.. याचा एक वेगळा धागा यायला हवा... झाल्यास माझ्याकडूनच.

पुण्यात तर हिराबाग, विश्राम्बागवाडा, नातूबाग, मंडईचा, तुळशीबागेचा, मित्रमंडळ वगैरे गणपती आम्ही रात्री फिरुन पहायचो. फार मजा यायची. सगळे हलते असत. मंडईचा तर कमालीचा गोड, सिद्धी पाय चेपत असलेला, झोपाळ्यावरचा Happy

हो, चाळीत माझ्या शेजारी राहणारा मित्र पुण्याचा होता. त्यांनी जेव्हा तिथे नवीन घर घेतले आणि ते रिकामेच होते तेव्हा आम्ही मित्रांनी गणपतीत चार दिवस पुण्याला मुक्काम ठोकलेला. रात्रीचे फिरून गणपती बघणे व्हायचे. माहोल असायचा. हे अठरा-वीस वर्षांपूर्वीचे. आता काय याची कल्पना नाही.

Whatsapp वर एक fwd होत ==>>>

एक कडवट सत्य.*

*एके काळी लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे....*

चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान .... मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर.... पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.

मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला .... पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं .... अगदी बाप्पांचा आकारही वाढला .... काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.

सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.

*साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग .... पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन .... प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा....*

आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ....

*श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का .... ?*

*नसेल कदाचीत, कारण आता "राजा" अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, "VIP" झाला आहे बाप्पा ....*

आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो .... आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो .... "राजा" ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.

देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?

देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.

*देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.

देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.

देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.

देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.

देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो .... !!

*एक मुंबईकर गणेशभक्त
*|| गणपती बाप्पा मोरया ||*

छन्दिफन्दि
Thanks for sharing.
ती कविता फार फार आवडली.
कोण आहेत हे कवी? कुणाला काही कल्पना?

छान पोस्ट आहे वरची! ज्याने लिहिली त्याच्या वयाचा अंदाज येतो ती पोस्ट बघून..
आम्ही शाळेत असताना जायचो तेव्हा मार्केटचा गणपती साधा असतो म्हणून बरेच जण त्या गल्लीत शिरायला फार उत्सुक नसायचे. मी आवर्जून जायचो कारण आईचे माहेर आणि मामा भायखळ्याचा आणि त्यांना तो जवळचा वाटायचा. त्यामुळे माझ्या आईला जवळचा वाटायचा. त्यामुळे मला जवळचा वाटायचा.

नरे पार्कच्या जत्रेत मी कॉलेजला असताना सुद्धा चार दिवस संध्याकाळचे पडीक असायचो तेथील मित्रांसोबत..
आता मुलांना लालबागला घेऊन जावे असा विचार मनात येत नाही. गर्दीत न्यावे असे वाटत नाही. वाशी आणि माझगाव गणपती दाखवतो.
गर्दी आधीही असायची, त्या परिसराला पूर्ण रात्र जाग असायची. पण इतकीच असायची की उत्सवाचा माहोल बनावा. आता विसर्जनाचे जे इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बघतो ते तर आणखी धडकी भरवणारे असतात. ते सगळे काही फॅड म्हणून आलेले असतात अशातला भाग नाही. त्यांना भक्तीच खेचून घेऊन आली असते. पण तरीही ती भक्ती देखील चुकीच्या मार्गाने जात नाहीये ना असे वाटतेच.

सालाबादाप्रमाणे विसर्जनानंतर भग्न मूर्तींचे अवशेष इथे तिथे विखुरलेले फोटो सोशल मीडियावर फिरायला सुरुवात झाली आहे.
काही जण त्यावर टीका करत आहेत तर काही जण आध्यात्मानुसार प्राणप्रतिष्ठा आणि पार्थिव लॉजिक लाऊन आता त्या भग्न अवशेषात देव नाही त्यामुळे देवाचा अपमान नाही असे समर्थन करत आहेत.

पण आपल्या आप्तेष्टांचे पार्थिव देखील असे उघड्यावर कोणीही लाथाडायला टाकेल याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.

आपल्याकडे कित्येक लोक अवयवदानासारखे पुण्यकर्म देखील या समजातून करत नाही कारण मृत्युपश्चात शरीराची चिरफाड होईल. तीच लोकं देवाबाबत मात्र चलता है एटीट्यूड ठेवतात.

आणि त्यापलीकडे पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा आहेच. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या केव्हापासून वापरल्या जाऊ लागल्या हे शोधायला हवे. आध्यात्म नक्कीच त्यापेक्षा जुने असावे.

पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला ना? अध्यात्म जुने असो वा नसो. टिळकांच्या वेळी प्लास्टर ऑफ पॅरिस होते का ते पहायला हवे.

सामो हो, ते आध्यात्मवाले मी शाळेच्या व्हॉट्स ग्रूप वरून कॉपीपेस्ट केले. त्यात कोणीतरी लिहिले होते की आध्यात्मानुसार यात गैर नाही, विसर्जनानंतर मूर्तीत देव नसतो वगैरे. त्यावर उत्तर म्हणून लिहिलेली पोस्ट इथे कॉपी पेस्ट केली.

प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्ती कधीपासून हे गूगल करून शोधतो.