Mrs. च्या निमित्ताने.., एका ‘मी’ ची कहाणी....

Submitted by SharmilaR on 25 February, 2025 - 00:44

Mrs. च्या निमित्ताने.., एका ‘मी’ ची कहाणी....

“The Great Indian Kitchen ह्या मल्याळम चित्रपटामध्ये असलेलं कुटुंब पारंपरिक, जुन्या मतांच होतं हे सहज मान्य करता येत होतं. पण ‘mrs.’ मधे, डॉक्टर कुटुंबात एकही मदतनीस नाही..., गळक्या सिंक कडे कुणी लक्ष देणार नाही... हे समजून घेणं अवघड आहे.”

‘The Great Indian Kitchen’ ह्या चित्रपट परिक्षणावर आलेल्या एका लेखावर, त्यातील प्रतिक्रियांवर, आणि त्यानंतर त्यातच आलेल्या ‘Mrs.’ ह्या चित्रपटाच्या प्रतिक्रियांवर मी वरची प्रतिक्रिया लिहिली. पण लिहल्यानंतर लगेच मला जाणवलं, मा‍झ्याच मनात, आत आत दडलेलं काही बाहेर येऊ पाहतंय, पण मीच ते ‘ पण हल्ली काळ बदललाय..’ हे लेबल लावून परत सगळं आत ढकलून देतेय.

काळ हा सगळ्यांवर औषध असतो म्हणतात. मग मलाही तेच औषध लागू पडलंय की काय? पण तसं विसरले तर मी काहीच नाही. फक्त आता मी चश्मा बदललाय. आता माझ्याकडे आहे ती, नवीन काळातील समजून घेणारी, जाणत्या बाईजवळ असायला हवी ती, घरात येणाऱ्या नवीन मुलीच्या स्वागताला उत्सुक असणारी नजर! ज्या नजरेत नवीन सुनेचं कौतुक आहे, अन् तिच्याबद्दल वाटणारी काळजीही आहे. अन् त्याच नजरेने बघत.. अनुभवलेले.. भोगलेले.. मागचं सगळं मागे टाकून, ‘आता नाही असं कुठे घडत..’ असं म्हणत मी ती वरची प्रतिक्रिया लिहिली.

मुलगा नोकरी लागून जरा सेटल वगैरे झाला तेव्हा, ‘अरे.. तू लग्न करणार असशील, तेव्हा मला जरा आधी सांग बरं का.. मला जरा घर ठीकठाक करायचं आहे.. ’ असं त्याला मी वारंवार बजावत होते.

‘तुम्ही माझ्याकरिता नाही मुलगी बघायची. मला भेटेल.., आवडेल.. तेव्हा, अन् माझं विचारांनी माझ्याशी जुळतेय असं वाटेल तेव्हा, मीच सांगेन तुम्हाला. ’ असं मुलाने मला आधीच सांगीतलं होतं. किंबहुना त्याच्या मावस-मामे, चुलत-आत्ये भावंडांमद्धे कुणाचं लग्न बघून-सवरून म्हणजे कांदे-पोहे पद्धतीने ठरवलं, की तो जाम आश्चर्य.., थोडा संताप व्यक्त करायचा, ‘असं दोन चार वेळ बघून भेटून कसं काय ठरवतात लग्न?’ असं म्हणत.
पण मुलाच्या लग्नाचं नसलं, तरी माझ्या घराचं तर मलाच बघावं लागणार होतं ना! तसं घर चांगल्या ‘वर्किंग कंडिशन’ मध्ये होतं. पण नवीन मुलगी घरी येणार म्हटल्यावर, तिच्या स्वागताला घराला ताजेपणा द्यायला हवा की नको? किचनमधल्या जुनकट ट्रॉलीज बदलायला हव्यात. वापरुन वापरुन काळी पडलेली.. जुनी भांडी बदलायला हवी.. त्या मुलीला घरात वावरतांना कसं छान फ्रेश वाटायला हवं.

घरात तेव्हा मी एकटीच रहात होते. शिवाय माझा बराच वेळ खाणारी नोकरीही होतीच. मुलगा आत्ता लग्न करेल की अजून चार वर्षानी.. कशाचीच खात्री नव्हती. म्हणून घराचं सगळंच जरा लांबणीवर पडत होतं.

मुलाने प्रेमात पडून, त्याला हवी तश्शी मुलगी मिळाल्याचं सांगितलं मात्र, (मला तयारीला पुरेसा वेळही दिला) मी कंबर कसून कामाला लागले. तो पर्यंत नोकरीला माझा रामराम ठोकून झाला होता. घराचा आकार तर वाढवता येणार नव्हता, पण आहे तेच घर ताजं-तवानं करायला घेतलं. मग त्याला अन् तिला विडियो कॉल करून भिंतींना त्यांनी सुचवलेले रंग आले.. किचन बदललं.. बाथरूमस नव्याने चकचकीत करून घेतल्या.. ‘जुनं देऊन नवीन घ्या’ च्या धर्तीवर कुकर, फ्राय पॅनस बदलून झाले..

किचन अद्ययावत केलं, तरी घराची गरज म्हणून सुनेला किचन मध्ये यायला लागू नये, ह्याची काळजीही घेतल्या गेली. किचन मध्ये तिला यायचंच असेल तर स्वागत होतं तिचं, पण ते तिची हौस म्हणून! आणि नवऱ्याला (माझ्याच. सुनेच्या नवऱ्याचा काहीच प्रश्न असणार नव्हता!) धमकावून ठेवलं, ‘तिने काहीही केलं, आणि ते आवडलं अथवा नाही, तरी कौतुकच करायच.. मस्तच म्हणायचं. तिने काही केलंच तर ते वेगळ्या चवीचं असणार होतं, कारण आता आमच्या घरात वेगळाच ‘प्रांत’ शिरकाव करणार होता!

सुनेला आल्या आल्या, घर कसं आपलंस वाटायला हवं. मग तिचे लहानपणचे फोटो मिळवून दर्शनी कपाटावर त्याचे कोलाज आले.. तिच्यासाठी स्पेशल कॉफी मग बनला.. तिच्या आवडीचा चहा कॉफी चे ब्रॅंड आणून ठेवण्या पासून ते ती घरात येईल तेव्हा, डब्यांमधे तिच्या आवडीचा खाऊ असायला हवा हे बघितल्या गेलं... मला सुचेल ते.. जमेल ते सगळं आवडीनं अन् उत्साहानं करत गेले मी, ती अगदी थोडेच दिवस ह्या घरात राहणार माहीत असूनही, कारण मुलगा अन ती नोकरी निमित्त उसगावचे रहिवासी होते.

सुनेकरता असं घर सजवणारी काही मी एकटीच नव्हते. माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये.. नातेवाईक.. मित्र मंडळींकडे पण त्यांच्या मुलांची लग्न झाली तेव्हा असंच घडतांना मी बघत होते. काळ बदललाय?

तेव्हा काही ठिकाणी काळ अजूनही थांबला असेल हे लक्षातच नाही आलं. नवीन पिढीचं हवं नको बघण्यात कशी विसरले मी..?

एकेकाळी मीच तर ‘Mrs.’ मधली ‘रिचा’ होते, अगदी पाट्या वरवंट्या पासून ते गळक्या किचन सिंक पर्यन्त! थोडा फार म्हणजे अगदीच ‘उन्नीस-बिस’ म्हणता येईल एवढाच काय तो फरक. म्हणजे अगदीच गळक्या सिंक ऐवजी, केव्हाही तुंबू शकेल असं सिंक.., अन घरात मिक्सर असला, तरीही तो आठवड्यातून एकदाच, सुट्टीच्या दिवशीच फक्त बाहेर काढायचा ही घरातली शिस्त! रोजचं वाटण पाट्यावरच वाटायचं.. !

माझ्या सासरच्या घरात तेव्हा जसं वातावरण होतं.. नवीन सुनेला (अन् ती जुनी झाल्यावरही) जसं वागवल्या जात होतं .. ते तसं नसतं, तर मी आज जशी आहे, तशी नसते कदाचित! ‘अस्स सासर सुरेख बाई ..’ चा काळ नव्हताच तो!

माझ्या स्वभावात बदल होऊन आता आलेला एवढा कोरडेपणा नसता आला, तर तिथे पूर्वीचा गोड हसरा प्रेमळपणा (थोडा तरी) राहीला असता. पूर्वी सततच गुणगुणणारी मी, हळू हळू मिटल्या ओठांची नसती झाले. पण लग्न झालं, तेव्हा मात्र वाटायचं, आयुष्य हे असच तर असतं. समोर येईल ते.. जसं असेल तसं.. स्विकारायचच असतं.

‘पावसानं झोडलं, अन नवरयानं मारलं तर जायचं कुठं ..’ अशा म्हणी ऐकतच मोठ्या झालेल्या पिढीतील मीही एक. आणि इथे तर नवरा मारत पण नव्हता. फक्त घरातलं वातावरण वेगळं.. बंदिस्त.. होतं. वागण्या-बोलण्याची कडक चाकोरी ठरलेली होती. त्यात कुणी म्हणजे अगदी घरच्या (एकुलत्या एक इंजीनियर) मुलानेही बदल केलेले, सुचवलेले चालणार नव्हते. मी तर परकीच! घरात आधी असलेल्या त्रिकोणी कुटुंबाचा माझ्या येण्याने कधी चौकोन झालाच नाही. माझं अस्तित्व हे त्या तीन कोनांच्या मागण्या पुरवणं, त्यांना मीच केलेलं, पण अगदी कडकडीतपणे त्यांच्याच पद्धती वापरुन केलेलं, खाणं-पिणं पुरवणं, घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी निमूटपणे उचलणं एवढच होतं.

सासरच्या घरातला माझं स्थान हे फक्त ‘सर्विस प्रोवायडर’ चं होतं.

त्या कडक वेगळ्या वातावरणावर माहेरून कधी चेष्टेच्या.. कधी कुत्सित.. कधी तिरपागड्या.. कमेन्टस पण यायच्या, ‘स्थळ’ त्यांनीच बघून दिलेलं असलं तरीही! पण माहेरच्यांनी सासरच्यांची उडवणं.. (आणि सासरच्या मंडळींनी सतत माहेरचं ऊणदुणं काढणं हे तर घरोघरी व्हायचचं. लग्न झालेल्या मुलीनेच दोन्ही ठिकाणी आपला गड लढवायचा असायचा, तसंच मीही करत होते. बंडखोरी कधी (चित्रपटांमध्ये सुद्धा) बघितली नव्हती.
घरातल्या चमच्याचीही जागा बदलण्याचं, किंवा माझ्याच (?) खोलीतल्या (पूर्ण घराच्या नव्हेच!) खिडक्या केव्हा लावायच्या अन् केव्हा उघडायच्या हे ठरवण्याचंही स्वातंत्र नसणारी मी, किचन सिंक बद्दल तक्रार ती काय करणार!

मी ‘कमावती’ होते. पण सून कमावती हवी ही तर अटच होती घराची, कारण सासूबाई.. त्यांच्या इतर बहिणी भाच्या.. भाचेसुना सगळ्याच नोकरीवाल्या होत्या. तेव्हा सुनेला नोकरी असणं हा ‘प्रेस्टीज इशू ’ होता ह्या घरचा.

सासूबाई सकाळी साडेसातला घराबाहेर पडायच्या, नवरा तर त्याही आधी गेलेला असायचा. अन् मी सासरेबुवांचा नाश्ता.. सकाळीच जातांना सासुबाईंनी सांगितलेला(च) स्वयंपाक, त्यांच्या पद्धतीने(च), करून साडेनऊला घराबाहेर पडायचे, ते आज संध्याकाळी ‘रिपोर्ट कार्ड’ काय मिळणार ह्या विवंचनेतच. कारण अगदी रोजच ‘आज सकाळी स्वयंपाकात काय चुका झाल्या..’ हे नं चुकता ऐकायला मिळायचं. ह्याला तेव्हा गोंडस नाव हे ‘सुनेला शिकवणं’ होतं. रोजच कुकरची शिट्टी झाल्या नंतर किती वेळाने मी गॅस बंद करायचा ह्यावर पण बाहेरच्या खोलीतून नियंत्रण असायचं. सकाळचं काय चुकलं ते संध्याकाळी ऐकायचं, अन रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं. ‘अगेन मेनू वॉज ऑल्वेज हॅंडेड ओवर टू मी. आय जस्ट हॅड टु फॉलो!!!’

सासर माहेर एकाच जातीचं असलं अन् माहेरी मला स्वयंपाकची चांगली सवय असली तरी ‘दाण्याचा कूट की ओलं नारळ.. तळलं वाटण की कच्च् वाटण.. पुडाची वडी की कोथिंबीर वडी..’ असे बदल होतेच. शिवाय ‘आपल्यात श्रावणी /आषाढी.. शुक्रवारी/शनिवारी.. रविवारी.. असं करायचं असतं..’ ची यादी होतीच. माहेरी मांसाहार कधीतरीच.. समुद्राहार तर कधी बघितलेलाही नाही. इथे तर आठवड्यातून दोनदा मटण मासे व्हायचेच. त्यामुळे पाटी कोरी करून परत गिरवायला लागत होतं.

माझेच काय, पण माझ्यासारखे सगळ्या मुलींचेच दिवस तेव्हा लग्नानंतर सासरच्या पद्धती ऐकण्यात अन् शिकण्यात जायचे. आपल्याला काय आवडतं काय अजिबात आवडत नाही, ह्याचा विचार सुद्धा तेव्हा मुली करायच्या नाही. मुलींना नोकरी करायला तेव्हा ‘घरच्यांची परवानगी’ लागायची. आणि नोकरी ‘घरचं सगळं सांभाळूनच’ करायला लागायची. अन् ह्या सगळ्याबद्दल काही तक्रार करायची असते.. आवाज उठवायचा असतो.. हेच मुळी कुणाला माहीत नव्हतं. लग्नानंतर मुली बदलत होत्या.., बदल मानवत नसले तर स्वत:ला मिटून घेत होत्या.. हे ‘आमच्या काळी कसं सगळं छान छान..मुली कशा गुणी.., किंवा अस्स सासर द्वाड बाई..’ अशा कुठल्याच सुरात सांगायचं नाहीय, तर फक्त वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न आहे.

माझ्या दोन मैत्रिणी ऑफिस मध्ये लंचटाइम मध्ये घरच्या तक्रारींचा सतत पाढा वाचायच्या, तेव्हा एकदा मी त्यांना त्या बद्दल टोकलं, तर त्यातली एकजण म्हणाली, ‘अगं, रोज त्रास होणाऱ्या गोष्टींबद्दल नाही, तर काय चिमण्या कावळ्यांबद्दल बोलायचं का आम्ही?’

आमच्या आधीची पिढी पाणवठ्यावर बोलायची.. कधी जात्यावरच्या ओव्यांमधून तर कधी मंगळागौरीच्या खेळातून व्यक्त व्हायची, आमची पिढी लंच टाइम मध्ये गुजगोष्टी करायची.. पण बंधन झुगारणं फारसं कुणाच्या मनात येत नव्हतं, अगदी ‘मारणारा नवरा’ असला तरीही. बाईने नवऱ्याला सोडणं असो की नवऱ्याने बायकोला.. सगळं एकाच लेबल खाली यायचं, ‘टाकलेली बायको!’

निसर्गनियमनुसार जुनी पाने गळून जातात. नवीन रोपटे मूळ धरते.. पण वेळच्या वेळी रोपट्याला हवं तसं उन्ह पाणी नाही मिळालं.., नाहीतर ते छानच फोफावलं असतं ही खंत राहतेच मनात.

आता माझेच काय, माझ्या आसपासच्या घरातल्या बायका मुलींचेही असं स्वत:ला सतत बदलत जाण्याचे.., त्रास सहन करण्याचे दिवस संपलेत.
आता मुली बदलल्या (म्हणजे खरं तर त्या नवीन घराप्रमाणे स्वत:त बदल करायचे थांबल्यात) ही अतिशय चांगली गोष्ट आहे, तशाच आया-सास्वाही बदलल्या (त्या नवीन मुलीचं त्यांच्या पद्धतीने जगणं मान्य करायला लागल्यात) हा बदल पण स्वागताहरय्ॅ आहे. कारण आम्हाला आता आमच्या मुली आत्ता आहे तशाच हसऱ्या, गोड, स्वत:ची मत ठामपणे मांडणाऱ्या हव्या आहेत. हे बदल कदाचित सगळीकडेच नसतील झाले, म्हणूनच ‘Mrs.’ मधलं कुटुंब मला आजच्या काळातलं नाही वाटलं. कदाचित असतीलही असं काळाच्या बदलाचं वारं नं पोहोचलेली कुटुंब..!

पण काही कुटुंब बदलली नसली तरी आता आजची ‘रिचा’ मात्र बदलली आहे!!!
***************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिखाण आणि प्रपंचा विषयीचे तुमचे मत...
पुर्वी शिकलेल्या सुनांना सुध्दा एवढा सासुरवास होता. अशिक्षित सुनांना तर होताच पण त्या अशिक्षित सुनेची जेव्हा सासू व्हायची तेव्हा ती सुध्दा आपल्या सुनेला सासुरवास करून त्याचं उट्ट काढायची. तुमच्या सारख्या किती सासवा असतील ज्या सुनेच्याही काही आवडी निवडी असतील आणि त्याची काळजी घ्यावी असा विचार करणा-या. खरं तर आपली सगळी नाती एकमेकाला समजून घ्यायला, सांभाळायला आहेत , नाही तर त्यांना काही अर्थ नसतो. गोतावळ्यात असुन एकटे असतो.

फार सुंदर लिहीलायत लेख . येणाऱ्या सुनेसाठी आवर्जून गोष्टी बदलणारी सासू तुम्ही एकमेव असाल (मी ऐकलेली )
बाकी सर्व येऊन गेलेल्या परिस्थितीकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकताय हि गोष्ट फार छान आहे . कारण हि गोष्ट तशी अवघड आहे .

Pages