Mrs. च्या निमित्ताने.., एका ‘मी’ ची कहाणी....

Submitted by SharmilaR on 25 February, 2025 - 00:44

Mrs. च्या निमित्ताने.., एका ‘मी’ ची कहाणी....

“The Great Indian Kitchen ह्या मल्याळम चित्रपटामध्ये असलेलं कुटुंब पारंपरिक, जुन्या मतांच होतं हे सहज मान्य करता येत होतं. पण ‘mrs.’ मधे, डॉक्टर कुटुंबात एकही मदतनीस नाही..., गळक्या सिंक कडे कुणी लक्ष देणार नाही... हे समजून घेणं अवघड आहे.”

‘The Great Indian Kitchen’ ह्या चित्रपट परिक्षणावर आलेल्या एका लेखावर, त्यातील प्रतिक्रियांवर, आणि त्यानंतर त्यातच आलेल्या ‘Mrs.’ ह्या चित्रपटाच्या प्रतिक्रियांवर मी वरची प्रतिक्रिया लिहिली. पण लिहल्यानंतर लगेच मला जाणवलं, मा‍झ्याच मनात, आत आत दडलेलं काही बाहेर येऊ पाहतंय, पण मीच ते ‘ पण हल्ली काळ बदललाय..’ हे लेबल लावून परत सगळं आत ढकलून देतेय.

काळ हा सगळ्यांवर औषध असतो म्हणतात. मग मलाही तेच औषध लागू पडलंय की काय? पण तसं विसरले तर मी काहीच नाही. फक्त आता मी चश्मा बदललाय. आता माझ्याकडे आहे ती, नवीन काळातील समजून घेणारी, जाणत्या बाईजवळ असायला हवी ती, घरात येणाऱ्या नवीन मुलीच्या स्वागताला उत्सुक असणारी नजर! ज्या नजरेत नवीन सुनेचं कौतुक आहे, अन् तिच्याबद्दल वाटणारी काळजीही आहे. अन् त्याच नजरेने बघत.. अनुभवलेले.. भोगलेले.. मागचं सगळं मागे टाकून, ‘आता नाही असं कुठे घडत..’ असं म्हणत मी ती वरची प्रतिक्रिया लिहिली.

मुलगा नोकरी लागून जरा सेटल वगैरे झाला तेव्हा, ‘अरे.. तू लग्न करणार असशील, तेव्हा मला जरा आधी सांग बरं का.. मला जरा घर ठीकठाक करायचं आहे.. ’ असं त्याला मी वारंवार बजावत होते.

‘तुम्ही माझ्याकरिता नाही मुलगी बघायची. मला भेटेल.., आवडेल.. तेव्हा, अन् माझं विचारांनी माझ्याशी जुळतेय असं वाटेल तेव्हा, मीच सांगेन तुम्हाला. ’ असं मुलाने मला आधीच सांगीतलं होतं. किंबहुना त्याच्या मावस-मामे, चुलत-आत्ये भावंडांमद्धे कुणाचं लग्न बघून-सवरून म्हणजे कांदे-पोहे पद्धतीने ठरवलं, की तो जाम आश्चर्य.., थोडा संताप व्यक्त करायचा, ‘असं दोन चार वेळ बघून भेटून कसं काय ठरवतात लग्न?’ असं म्हणत.
पण मुलाच्या लग्नाचं नसलं, तरी माझ्या घराचं तर मलाच बघावं लागणार होतं ना! तसं घर चांगल्या ‘वर्किंग कंडिशन’ मध्ये होतं. पण नवीन मुलगी घरी येणार म्हटल्यावर, तिच्या स्वागताला घराला ताजेपणा द्यायला हवा की नको? किचनमधल्या जुनकट ट्रॉलीज बदलायला हव्यात. वापरुन वापरुन काळी पडलेली.. जुनी भांडी बदलायला हवी.. त्या मुलीला घरात वावरतांना कसं छान फ्रेश वाटायला हवं.

घरात तेव्हा मी एकटीच रहात होते. शिवाय माझा बराच वेळ खाणारी नोकरीही होतीच. मुलगा आत्ता लग्न करेल की अजून चार वर्षानी.. कशाचीच खात्री नव्हती. म्हणून घराचं सगळंच जरा लांबणीवर पडत होतं.

मुलाने प्रेमात पडून, त्याला हवी तश्शी मुलगी मिळाल्याचं सांगितलं मात्र, (मला तयारीला पुरेसा वेळही दिला) मी कंबर कसून कामाला लागले. तो पर्यंत नोकरीला माझा रामराम ठोकून झाला होता. घराचा आकार तर वाढवता येणार नव्हता, पण आहे तेच घर ताजं-तवानं करायला घेतलं. मग त्याला अन् तिला विडियो कॉल करून भिंतींना त्यांनी सुचवलेले रंग आले.. किचन बदललं.. बाथरूमस नव्याने चकचकीत करून घेतल्या.. ‘जुनं देऊन नवीन घ्या’ च्या धर्तीवर कुकर, फ्राय पॅनस बदलून झाले..

किचन अद्ययावत केलं, तरी घराची गरज म्हणून सुनेला किचन मध्ये यायला लागू नये, ह्याची काळजीही घेतल्या गेली. किचन मध्ये तिला यायचंच असेल तर स्वागत होतं तिचं, पण ते तिची हौस म्हणून! आणि नवऱ्याला (माझ्याच. सुनेच्या नवऱ्याचा काहीच प्रश्न असणार नव्हता!) धमकावून ठेवलं, ‘तिने काहीही केलं, आणि ते आवडलं अथवा नाही, तरी कौतुकच करायच.. मस्तच म्हणायचं. तिने काही केलंच तर ते वेगळ्या चवीचं असणार होतं, कारण आता आमच्या घरात वेगळाच ‘प्रांत’ शिरकाव करणार होता!

सुनेला आल्या आल्या, घर कसं आपलंस वाटायला हवं. मग तिचे लहानपणचे फोटो मिळवून दर्शनी कपाटावर त्याचे कोलाज आले.. तिच्यासाठी स्पेशल कॉफी मग बनला.. तिच्या आवडीचा चहा कॉफी चे ब्रॅंड आणून ठेवण्या पासून ते ती घरात येईल तेव्हा, डब्यांमधे तिच्या आवडीचा खाऊ असायला हवा हे बघितल्या गेलं... मला सुचेल ते.. जमेल ते सगळं आवडीनं अन् उत्साहानं करत गेले मी, ती अगदी थोडेच दिवस ह्या घरात राहणार माहीत असूनही, कारण मुलगा अन ती नोकरी निमित्त उसगावचे रहिवासी होते.

सुनेकरता असं घर सजवणारी काही मी एकटीच नव्हते. माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये.. नातेवाईक.. मित्र मंडळींकडे पण त्यांच्या मुलांची लग्न झाली तेव्हा असंच घडतांना मी बघत होते. काळ बदललाय?

तेव्हा काही ठिकाणी काळ अजूनही थांबला असेल हे लक्षातच नाही आलं. नवीन पिढीचं हवं नको बघण्यात कशी विसरले मी..?

एकेकाळी मीच तर ‘Mrs.’ मधली ‘रिचा’ होते, अगदी पाट्या वरवंट्या पासून ते गळक्या किचन सिंक पर्यन्त! थोडा फार म्हणजे अगदीच ‘उन्नीस-बिस’ म्हणता येईल एवढाच काय तो फरक. म्हणजे अगदीच गळक्या सिंक ऐवजी, केव्हाही तुंबू शकेल असं सिंक.., अन घरात मिक्सर असला, तरीही तो आठवड्यातून एकदाच, सुट्टीच्या दिवशीच फक्त बाहेर काढायचा ही घरातली शिस्त! रोजचं वाटण पाट्यावरच वाटायचं.. !

माझ्या सासरच्या घरात तेव्हा जसं वातावरण होतं.. नवीन सुनेला (अन् ती जुनी झाल्यावरही) जसं वागवल्या जात होतं .. ते तसं नसतं, तर मी आज जशी आहे, तशी नसते कदाचित! ‘अस्स सासर सुरेख बाई ..’ चा काळ नव्हताच तो!

माझ्या स्वभावात बदल होऊन आता आलेला एवढा कोरडेपणा नसता आला, तर तिथे पूर्वीचा गोड हसरा प्रेमळपणा (थोडा तरी) राहीला असता. पूर्वी सततच गुणगुणणारी मी, हळू हळू मिटल्या ओठांची नसती झाले. पण लग्न झालं, तेव्हा मात्र वाटायचं, आयुष्य हे असच तर असतं. समोर येईल ते.. जसं असेल तसं.. स्विकारायचच असतं.

‘पावसानं झोडलं, अन नवरयानं मारलं तर जायचं कुठं ..’ अशा म्हणी ऐकतच मोठ्या झालेल्या पिढीतील मीही एक. आणि इथे तर नवरा मारत पण नव्हता. फक्त घरातलं वातावरण वेगळं.. बंदिस्त.. होतं. वागण्या-बोलण्याची कडक चाकोरी ठरलेली होती. त्यात कुणी म्हणजे अगदी घरच्या (एकुलत्या एक इंजीनियर) मुलानेही बदल केलेले, सुचवलेले चालणार नव्हते. मी तर परकीच! घरात आधी असलेल्या त्रिकोणी कुटुंबाचा माझ्या येण्याने कधी चौकोन झालाच नाही. माझं अस्तित्व हे त्या तीन कोनांच्या मागण्या पुरवणं, त्यांना मीच केलेलं, पण अगदी कडकडीतपणे त्यांच्याच पद्धती वापरुन केलेलं, खाणं-पिणं पुरवणं, घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी निमूटपणे उचलणं एवढच होतं.

सासरच्या घरातला माझं स्थान हे फक्त ‘सर्विस प्रोवायडर’ चं होतं.

त्या कडक वेगळ्या वातावरणावर माहेरून कधी चेष्टेच्या.. कधी कुत्सित.. कधी तिरपागड्या.. कमेन्टस पण यायच्या, ‘स्थळ’ त्यांनीच बघून दिलेलं असलं तरीही! पण माहेरच्यांनी सासरच्यांची उडवणं.. (आणि सासरच्या मंडळींनी सतत माहेरचं ऊणदुणं काढणं हे तर घरोघरी व्हायचचं. लग्न झालेल्या मुलीनेच दोन्ही ठिकाणी आपला गड लढवायचा असायचा, तसंच मीही करत होते. बंडखोरी कधी (चित्रपटांमध्ये सुद्धा) बघितली नव्हती.
घरातल्या चमच्याचीही जागा बदलण्याचं, किंवा माझ्याच (?) खोलीतल्या (पूर्ण घराच्या नव्हेच!) खिडक्या केव्हा लावायच्या अन् केव्हा उघडायच्या हे ठरवण्याचंही स्वातंत्र नसणारी मी, किचन सिंक बद्दल तक्रार ती काय करणार!

मी ‘कमावती’ होते. पण सून कमावती हवी ही तर अटच होती घराची, कारण सासूबाई.. त्यांच्या इतर बहिणी भाच्या.. भाचेसुना सगळ्याच नोकरीवाल्या होत्या. तेव्हा सुनेला नोकरी असणं हा ‘प्रेस्टीज इशू ’ होता ह्या घरचा.

सासूबाई सकाळी साडेसातला घराबाहेर पडायच्या, नवरा तर त्याही आधी गेलेला असायचा. अन् मी सासरेबुवांचा नाश्ता.. सकाळीच जातांना सासुबाईंनी सांगितलेला(च) स्वयंपाक, त्यांच्या पद्धतीने(च), करून साडेनऊला घराबाहेर पडायचे, ते आज संध्याकाळी ‘रिपोर्ट कार्ड’ काय मिळणार ह्या विवंचनेतच. कारण अगदी रोजच ‘आज सकाळी स्वयंपाकात काय चुका झाल्या..’ हे नं चुकता ऐकायला मिळायचं. ह्याला तेव्हा गोंडस नाव हे ‘सुनेला शिकवणं’ होतं. रोजच कुकरची शिट्टी झाल्या नंतर किती वेळाने मी गॅस बंद करायचा ह्यावर पण बाहेरच्या खोलीतून नियंत्रण असायचं. सकाळचं काय चुकलं ते संध्याकाळी ऐकायचं, अन रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं. ‘अगेन मेनू वॉज ऑल्वेज हॅंडेड ओवर टू मी. आय जस्ट हॅड टु फॉलो!!!’

सासर माहेर एकाच जातीचं असलं अन् माहेरी मला स्वयंपाकची चांगली सवय असली तरी ‘दाण्याचा कूट की ओलं नारळ.. तळलं वाटण की कच्च् वाटण.. पुडाची वडी की कोथिंबीर वडी..’ असे बदल होतेच. शिवाय ‘आपल्यात श्रावणी /आषाढी.. शुक्रवारी/शनिवारी.. रविवारी.. असं करायचं असतं..’ ची यादी होतीच. माहेरी मांसाहार कधीतरीच.. समुद्राहार तर कधी बघितलेलाही नाही. इथे तर आठवड्यातून दोनदा मटण मासे व्हायचेच. त्यामुळे पाटी कोरी करून परत गिरवायला लागत होतं.

माझेच काय, पण माझ्यासारखे सगळ्या मुलींचेच दिवस तेव्हा लग्नानंतर सासरच्या पद्धती ऐकण्यात अन् शिकण्यात जायचे. आपल्याला काय आवडतं काय अजिबात आवडत नाही, ह्याचा विचार सुद्धा तेव्हा मुली करायच्या नाही. मुलींना नोकरी करायला तेव्हा ‘घरच्यांची परवानगी’ लागायची. आणि नोकरी ‘घरचं सगळं सांभाळूनच’ करायला लागायची. अन् ह्या सगळ्याबद्दल काही तक्रार करायची असते.. आवाज उठवायचा असतो.. हेच मुळी कुणाला माहीत नव्हतं. लग्नानंतर मुली बदलत होत्या.., बदल मानवत नसले तर स्वत:ला मिटून घेत होत्या.. हे ‘आमच्या काळी कसं सगळं छान छान..मुली कशा गुणी.., किंवा अस्स सासर द्वाड बाई..’ अशा कुठल्याच सुरात सांगायचं नाहीय, तर फक्त वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न आहे.

माझ्या दोन मैत्रिणी ऑफिस मध्ये लंचटाइम मध्ये घरच्या तक्रारींचा सतत पाढा वाचायच्या, तेव्हा एकदा मी त्यांना त्या बद्दल टोकलं, तर त्यातली एकजण म्हणाली, ‘अगं, रोज त्रास होणाऱ्या गोष्टींबद्दल नाही, तर काय चिमण्या कावळ्यांबद्दल बोलायचं का आम्ही?’

आमच्या आधीची पिढी पाणवठ्यावर बोलायची.. कधी जात्यावरच्या ओव्यांमधून तर कधी मंगळागौरीच्या खेळातून व्यक्त व्हायची, आमची पिढी लंच टाइम मध्ये गुजगोष्टी करायची.. पण बंधन झुगारणं फारसं कुणाच्या मनात येत नव्हतं, अगदी ‘मारणारा नवरा’ असला तरीही. बाईने नवऱ्याला सोडणं असो की नवऱ्याने बायकोला.. सगळं एकाच लेबल खाली यायचं, ‘टाकलेली बायको!’

निसर्गनियमनुसार जुनी पाने गळून जातात. नवीन रोपटे मूळ धरते.. पण वेळच्या वेळी रोपट्याला हवं तसं उन्ह पाणी नाही मिळालं.., नाहीतर ते छानच फोफावलं असतं ही खंत राहतेच मनात.

आता माझेच काय, माझ्या आसपासच्या घरातल्या बायका मुलींचेही असं स्वत:ला सतत बदलत जाण्याचे.., त्रास सहन करण्याचे दिवस संपलेत.
आता मुली बदलल्या (म्हणजे खरं तर त्या नवीन घराप्रमाणे स्वत:त बदल करायचे थांबल्यात) ही अतिशय चांगली गोष्ट आहे, तशाच आया-सास्वाही बदलल्या (त्या नवीन मुलीचं त्यांच्या पद्धतीने जगणं मान्य करायला लागल्यात) हा बदल पण स्वागताहरय्ॅ आहे. कारण आम्हाला आता आमच्या मुली आत्ता आहे तशाच हसऱ्या, गोड, स्वत:ची मत ठामपणे मांडणाऱ्या हव्या आहेत. हे बदल कदाचित सगळीकडेच नसतील झाले, म्हणूनच ‘Mrs.’ मधलं कुटुंब मला आजच्या काळातलं नाही वाटलं. कदाचित असतीलही असं काळाच्या बदलाचं वारं नं पोहोचलेली कुटुंब..!

पण काही कुटुंब बदलली नसली तरी आता आजची ‘रिचा’ मात्र बदलली आहे!!!
***************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. आवडला लेख.

बहुदा माझी पिढी तुमच्या आणि तुमच्या सुनेच्या मध्ये (कुठेतरी) येत असावी.
बॉण्डरी सेट करायच्या हे काम दोन्ही बाजूंनी चाले.
एखादी गोष्ट पटली नाही / रुचली नाही तर स्पष्टपणे तसे सांगायला दोन्ही बाजूंना संकोच नसे .( कदाचित व्यक्ती व्यक्तीवर पण अवलंबून असत असावे)
त्यांनी दोन पावलं पुढे उचलली तर आपणही दोन पावलं मागे येऊन समन्वय साधायला कधी संकोच वाटला नाही किंवा फार काही वेगळे केले असेही वाटले नाही.
सिनिअर सिटीझन असलेले ते वयाच्या इतक्या उशीरा बदलणं त्यांच्यासाठी अवघड आहे हे ही कुठेतरी जाणवत गेले असावे..
त्यामुळे तुमची टीम आमची टीम न राहता २-४ वर्षात आपली टीम होऊन गेली असावी.
***

तुम्ही म्हणाल्या आहात तसं लंच टाईम मध्ये घरच्या गप्पा व्हायच्या.

त्यातून जाणवलं, दोन्ही घरे मुंबई किंवा परिसरात ( कोणत्याही जाती, भाषिक, किंवा धर्माचे असले ) असतील तर तिकडचे वातावरण बऱ्यापैकी/ बहुतांशी मोकळे असे.
साऊथ इंडियातील बरीच घरे (अजूनही) अतिशय कर्मठ आहेत.
UP - बिहार मध्ये सासर माहेर, लेन देन, मुलगा मुलगी असे भेद बऱ्यापैकी चालत..
***

हा चित्रपट मी बघितला.. बघतानाच वाटत होते की ही इतक का सहन करत्ये..
ती इतकी स्मार्ट असते तर तिच्या आधीच लक्षात यायला हवं होतं.
निदान नंतर आल्यावर तरी ते कुठे मर्यादा ओलांडतायत हे ओळखून तसे वागायला हवे होते..
अर्थात पण मग तो पिक्चर कसा झाला असता..

छान लिहिलं आहे शर्मिला! सुनेसाठी तुम्हाला आवर्जून असं छान काही तरी करावंसं वाटलं हे आवडलं.
तुमचे आधीचे अनुभव वाचून वाईट वाटलं.
मला काय वाटतं माहिती आहे का, जोपर्यंत मुलीचं लग्न होऊन ती 'सासरी जात राहील', तोपर्यंत खऱ्या अर्थाने नवरा-बायको समानता येणार नाही. मुलीचं लग्न ठरलं की ती आता घरातून बाहेर 'जाणार' (जरी ती आधीच शिक्षणा-कामानिमित्ताने बाहेर रहात असली तरी) आणि मुलाचं लग्न ठरलं की नवीन सून घरी 'येणार' ( जरी मुलगा-सून बाहेर रहाणार असले तरी) असंच आपल्या मनात येतं.
रजिस्टर लग्न असलं तर नाही, पण धार्मिक पद्धतीने केलेल्या लग्नाचे विधीही सगळे याच दृष्टिकोनाने तयार झालेले आहेत. साहजिकच. मी माझा अनुभव सांगते की आधी भले किती स्त्री-पुरुष समानता डोक्यात असली तरी एकदा 'वधूपक्ष' नावाच्या गटात आपण गेलो की आपोआपच मनात स्वतःला खालचं स्थान द्यायला लागतो. मग वरपक्ष नामक गटाने उदाहरणार्थ 'ओटी भरताना पाय वगैरे धुवू नका हं' म्हटलं की 'अरे वा!' असं वाटतं. Happy इथून जी बदलाला सुरुवात होते ती थेट स्वतःला दुय्यम नागरिक समजेपर्यंत जाऊ शकते.
लग्न झालं की नवरा-बायकोने आपापल्या आईवडिलांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्र नवीन घर निर्माण करावं.

लग्न झालं की नवरा-बायकोने आपापल्या आईवडिलांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्र नवीन घर निर्माण करावं

>>>>> + १

धन्यवाद छन्दिफन्दि, वावे, जाई.

@छन्दिफन्दि ,
दोन्ही घरे मुंबई किंवा परिसरात ( कोणत्याही जाती, भाषिक, किंवा धर्माचे असले ) असतील तर तिकडचे वातावरण बऱ्यापैकी/ बहुतांशी मोकळे असे.>> हो असे आमच्या मुंबईच्या नातेवाईकांच्या घरात बघितले आहे असं. त्या घरातील सुनांचा हेवाही वाटायचं तेव्हा.

विदर्भातल्या माझ्या माहेरच्या नातेवाईकांकडे मात्र तेव्हा घरच्या बाईने नोकरी केलेलीच चालत नसे. जी कुणी आसपास एखादी नोकरी करणारी (संसारी ) बाई असायची तिच्याबद्दल तुच्छताच दर्शवली जायची.., ‘मुलांकडे/घराकडे घराकडे नीट लक्ष नसेल देत..’ असं म्हणत.

आमच्याकडे घर आणि नोकरी दोन्ही आघाड्या सांभाळणं अपेक्षित असायचं. नोकरीही शाळेतली किंवा बँकेची असावी हीही अपेक्षा होती. माझी नोकरी ही दोन्ही क्षेत्र सोडून वेगळ्याच ठिकाणी होती.

@वावे
लग्न झालं की नवरा-बायकोने आपापल्या आईवडिलांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्र नवीन घर निर्माण करावं.>> माझ्या मुलाच्या बाबतीत मिही असच ठरवलं होतं आणि तशी त्याच्या माझ्यात नेहमी चर्चाही व्हायची. पण नंतर त्याने परदेशीच जाण्याचं ठरवल्यामुळे ते आपोआपच झालं.

मुलाच्या लग्नात हल्लीच्या प्रथेप्रमाणे आम्हीपण निम्मा आर्थिक भार घेण्याचा हट्टच धरला होता, तो त्या लोकांनी कसाबसा मान्य केला. बाकी त्यांना महाराष्ट्रियन मानपानाच्या पद्धती माहिती नव्हत्या आणि आम्हीही सांगितल्या नाही. विधी म्हणून फक्त फक्त ‘फेरे’ झाले बाकी कोणतेही विधी झाले नाहीत. अगदी तिचं ‘नो मंगलसूत्र’ पण मला मान्य होतं. त्यावर नातेवाइकांनी ‘एखादा काळा मणी तरी..’ वगैरे उपाय सुचवले. पण मी म्हटलं ज्यांच लग्न आहे त्यांच्या मतांचा आणि तत्वाचा प्रश्न आहे तो. नाही तर नाही.

लग्नानंतर १०/१२ दिवसच मुलं भारतात रहाणार होती. मग ‘वरातीबरोबर इथे यायचं.. परत भारत सोडण्यापूर्वी तिच्या माहेरी जायचं..’ अशी दगदग करण्यापेक्षा लग्नानंतर काही दिवस मुलांनी तिच्या घरीच रहाण्याचा पर्याय मुलांकडून आला, अन तोच सोईचा वाटल्याने मुला-सुनेला आमच्याबरोबर घरी आणण्यापेक्षा, त्यांची मुलगी-जावई आम्ही तिथेच ठेवून आलो. चार दिवसांनी मग दोघे आले आणि अमेरिकेत परत जाण्यापूर्वी आम्ही इथेच एकत्र धमाल वेळ घालवला.

@ SharmilaR

दुर्दैवाने “बदलाचं वारं नं पोहोचलेली कुटुंब” देशात अजूनही मेजॉरिटीच आहेत.

तुम्ही स्वत:च्या घरची गोष्ट सहजतेनी सांगितली तरी त्यातून तुमच्या उमदेपणाचे, प्रगल्भतेचे सुखद दर्शन होते आहे. ❤

It is very important not to pass on the baggage of unhappy events and situations and the trauma caused by them. You succeeded, scored high on this point for your nextgen. Kudos.

छान लेख शर्मिला
आणि तुमचे नवीन सुनेचे स्वागत सुद्धा आवडले. स्पेशली तिचे फोटो शोधून कोलाज करून घरात लावणे इंटरेस्टिंग वाटले Happy

वावे संपूर्ण अनुमोदन!
दोन्हीकडच्या आई-वडिलांचे प्रेम सन्मान कायम राखून मुलानी लग्नानंतर आपला नवीन संसार थाटायला हवा. कारण सासरच्या घरात राहणार तर मुलीने त्यांच्या हिशोबाने वागायला हवे हे सुद्धा तार्किक दृष्ट्या बरोबरच आहे. कोणी बाहेरून घरात आले आहे तर बदलायची जबाबदारी त्याची जास्त हे स्वाभाविक आहे. त्यामुळे नवीन घर नवीन संसार हाच यावर उपाय. भले मग जवळच घ्या, शेजारी घ्या, ज्यात एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे तसेच कायम राहतील आणि तोटे जातील.

तसेच आडनाव सुद्धा बदलायची गरज नसायला हवी. बदलले तरी ती भावना कागदोपत्री राहावी. मला कोणी माझे गाव विचारलं तरी मी आईवडील दोघांचे सांगतो. आणि ते मुद्दाम असे नाही तर सहज सांगितले जाते. कारण रक्त दोघांचे अर्धे अर्धे अंगात आहे तर मुलाना फक्त वडिलांचे नाव, गाव, जात, देव, धर्म हा भेद अनाकलनीय आहे. त्यामुळे आमच्या मुलाना पूर्ण नाव सांगताना दोघांची नावे घ्यायला शिकवले आहे. आणि जाती तर बरखास्त आहेत.

तुम्ही पूर्वीच्या अनुभवांचा उत्तम उपयोग करत नव्या पिढीला संसाराची सुंदर सुरुवात करून दिलीत हे खरंच छान आहे.

लग्न झालं की नवरा-बायकोने आपापल्या आईवडिलांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्र नवीन घर निर्माण करावं. >>१००+
किमान काही काळ तरी. दोघांच्याही फायद्याचे ठरतं. मुलांना जबाबदाऱ्या समजतात. आणि आपल्याला काय हवे आहे, कुठे आपण मुरड घालू शकतो आणि कुठे तडजोड नाही याचा अंदाज येतो. मग ज्येनांच्या वयत्परवे किंवा अजून काही कारणांनी एकत्र राहिले तरी मेन टीम पक्की असते.

शर्मिला, तुमच्या उमद्या, खुल्या मानाचे कौतुक वाटते.
अशाच रहा. आनंद दिल्याने अधिक वाढतो.
अनिंद्य यांचा प्रतिसाद ही अगदी छान.
फक्त हे गोड वागणे सुनेकडून कसे स्वीकारले जाते, कसे रेसिप्रोकेट होते तेही महत्त्वाचे आहे. नाहीतर तिची मानसिकता/ अपेक्षा काही वेगळी असायची..

फार आवडला लेख - चिंतन!
अनिंद्य यांच्या प्रतिसादाला +१
भारतात अनेक काळ एकाच वेळी नांदत असतात हे मिसेस पाहून पटले.

तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकून मुलगा सुनेला मोकळे वातावारण दिलेत हा बदल किती मस्तं आहे !
आह होप इतर सासवांनी तुमच्या सारखे बदल एन्करेज करावेत .
छान लिहिलय !

तुमच्या सारखी सासू मिळणं खरंच भाग्य आहे सुनेचं, छान स्वागत केलंत सुनेचं, कोलाज वगैरे नाहीतर स्वतःला सासरी आलेले कटू अनुभव विसरून स्वताला न मिळालेलं स्वातंत्र्य सुनेला देणं सर्वाना शक्य नसतं सहजासहजी घडतही नाही. त्यामुळे तुमचे जास्त कौतुक.

शर्मिला, सर्वप्रथम सुनेच्या मनाचा इतका विचार केल्याबद्दल आणि तिच्या मतांचा आदर केल्याबद्दल तुमचं विशेष कौतुक.
अजूनही ओळखीत, नात्यात हे न करणार्‍या बायका पाहून चुटपुट लागते. हे बदल घडायला हवेत.

तुमची कहाणी वाचून 'बापरे!' असा उद्गार मनात उमटला खरा. कसं जमवून घेतलं असेल तुम्ही?

@ वावे, उत्तम प्रतिसाद. विशेषतः हे पटलंच -
भले किती स्त्री-पुरुष समानता डोक्यात असली तरी एकदा 'वधूपक्ष' नावाच्या गटात आपण गेलो की आपोआपच मनात स्वतःला खालचं स्थान द्यायला लागतो. मग वरपक्ष नामक गटाने उदाहरणार्थ 'ओटी भरताना पाय वगैरे धुवू नका हं' म्हटलं की 'अरे वा!' असं वाटतं. Happy इथून जी बदलाला सुरुवात होते ती थेट स्वतःला दुय्यम नागरिक समजेपर्यंत जाऊ शकते.

मी हा सिनेमा पाहिला नाहीये. पण याचा ओरिजिनल पाहिला होता. तेव्हाच प्रचंड चीड आली होती त्या मानसिकतेची. शर्मिलाताई, तुमच्या सारख्या अजून सासवा होतील तरच काहीतरी होप आहे हे चित्र बदलण्याची.

लेख खूप आवडला. नेहमीप्रमाणेच रंजक आणि भावनेचा ओलावा असलेला आहे. बाकी या अनुभवातून मला जावे लागलेले नाही. मोकळीक होती.

प्रतिसाद आवडल्याचं लिहिणाऱ्यांना धन्यवाद Happy
शर्मिला, सॉरी, तुमचा लेख हायजॅक करायचा नाहीये. फक्त एक स्पष्टीकरण लिहिते. मी नवरा-बायकोचं स्वतंत्र, नवीन घर म्हटलं ते फक्त भौतिक दृष्टीने नाही. ते तर हल्ली नोकरीच्या ठिकाणामुळे, घरातल्या जागेच्या अडचणीमुळे खूप जणांचं असतं. मी मानसिक दृष्टीने म्हटलं. विभक्त कुटुंब जरी असलं तरी आडनाव, चाली-रीती, इतर कित्येक महत्त्वाच्या आणि बारीकसारीक गोष्टींमध्ये ते 'सासर'च असतं.

ती इतकी स्मार्ट असते तर तिच्या आधीच लक्षात यायला हवं होतं.
निदान नंतर आल्यावर तरी ते कुठे मर्यादा ओलांडतायत हे ओळखून तसे वागायला हवे होते..>>>> स्मार्ट तर ती असतेच म्हणून तर वेळीच डिसीजन घेऊन बाहेर पडते. इतका वेळही केवळ ती प्रेमाची माणसं म्हणूनच सहन करते . पण नंतर ते प्रेमही उरत नाही .

मर्यादा ओलांडतायत हे देखील तीच्या सहन करण्यापलीकडे जाते तेव्हा ती ठणकावून नवऱ्याला डान्स चे व्हिडीओज डिलिट नाही करणार असे सांगतेच.शेवटी एव्हढही सहन का करते, तर सोशल कंडिशनिंग, तिच्या आईचा रोल पाहा कळेल.आणि आजही आपल्याकडे एव्हढ्या तेव्हढ्याने लग्न मोडता येत नाहीत . यातही आशा काळे टाइप्स मुलगी असती तर माहेरच्यांनी परत तिला नांदायला पाठवली असती आणि ती गेलीही असती, शेवटी नवीन सुनेच्या जागी परत तीच फुलके करताना दिसली असती . मग चित्रपटाचा शेवट टीपीकल "इंडियन मेंटालिटीचा" झाला असता.

शर्मिला तुमची आणि सुनेची गोष्ट वाचताना, मंगला गोडबोलेंच 'जिथली वस्तू तिथे ' आठवलं..
जमल तर जरूर वाचा / ऐका.. धमाल पुस्तक आहे.

शर्मिला ताई तुस्सी ग्रेट हो. सूनेसाठी एवढी धडपड करणारी सासू पहिल्यांदाच बघतेय.
लग्नानंतर निदान सुरूवातीला काही वर्षं नवरा-बायकोने वेगळं रहावंच. जिथे त्या दोघांचंच equation धड जमायला वेळ मिळत नसेल तिथे सूनेवर बाकी कुटुंबासोबत जुळवून घेताना प्रचंड ताण येतो. यात नवीन सुरू झालेलं नवरा बायकोचं नातं हळूहळू कोमेजायला लागतं. Been there.

धन्यवाद अनिंद्य, ऋन्मेष, माझेमन, छल्ला, जिज्ञासा, दिपांजली, सिमरन, रमड, सामो, अन्जू , वावे, छन्दिफन्दि, मी चिन्मयी.

सगळ्यांनी माझ्या सासुपणाचं जरा जास्तच कौतुक केलं आहे. त्याबद्दल विशेष आभार. मला वाटतं नवीन मुलीला घरात रुळायला सर्वांनी मदत करणं.. तिच्यावर ‘ह्या घरच्या’ पद्धती (वेशभुषे सकट), आणि जावई/नवीन मुलगा त्यांच्या घरी जातो तेव्हा त्याचा फालतू मानपान नं करणं हेच चांगल्या नात्यांचं लक्षण असावं, नाही का?

दुर्दैवाने “बदलाचं वारं नं पोहोचलेली कुटुंब” देशात अजूनही मेजॉरिटीच आहेत.>> विचार करून काही कुटुंब आठवत गेली, तसं पटलं. नातेवाईकांमध्येच अशी उदाहरणं सापडली. दुर्दैवाने काही ठिकाणी ह्याच कारणाने घटस्फोटही झालेत.

It is very important not to pass on the baggage of unhappy events and situations and the trauma caused by them.>> अनुभवच आपला गुरु असतो, कसं वागावं आणि कसं नाही हे शिकवणारा.

मुलीचं आडनाव सुद्धा बदलायची गरज नसायला हवी. >> स्वतंत्र विचारांच्या मुली नाही बदलत हल्ली. पण मागच्याच आठवड्यात एका मैत्रिणीच्या मुलाचे २/३ दिवस चाललेल्या लग्नाला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या सुनेचे पहिले नाव पण बदलले गृहप्रवेश करतांना. अन ती मूलगीही नवीन हाकेला सहज पटकन प्रतिसाद देत होती.

मी मागे कुठेतरी उल्लेख केला आहे, आम्हाला ज्युनिअर कॉलेज मधे शिकवायला कवी ‘वसंत आबाजी डहाके’ होते. त्यांच्या पत्नी ‘प्रभा गणोरकर’ पण आमच्याच कॉलेज मधे होत्या शिकवायला. त्या काळी मंगळसूत्र नं घालणारी अन नाव नं बदलणारी ती पहिली स्त्री मी बघितली होती. पण त्यातून काही शिकण्यापेक्षा त्याबद्दल चालणाऱ्या गॉसिप मध्येच जास्त रस असायचा.

गोड वागणे सुनेकडून कसे स्वीकारले जाते, कसे रेसिप्रोकेट होते तेही महत्त्वाचे आहे. नाहीतर तिची मानसिकता/ अपेक्षा काही वेगळी असायची..>> हे खरे असले तरी मला वाटतं, समजून घेण्याची सुरवात मोठ्यांनी करावी. बाकी कुठल्याही नात्यात.., मैत्रीत वाद भांडणं होणारच.. ते विकोपाला जाणार नाही, मुख्य मनावर ओरखडे उठवणार नाही ह्याची काळजी सर्वांनीच घ्यावी. (बाकी माझं अन माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण होत असतं. पण त्याच्याशी भांडतांना अगदी झोकून भांडता येतं तसं सुनेच्या बाबत नाही होणार. तिथे जाणीवपूर्वक काठाकाठाने जावे लागेल. )

मंगला गोडबोलेंच 'जिथली वस्तू तिथे '>> नक्की वाचेन. मला आवडतं त्यांच लिखाण.

हा रिव्ह्यु छान आहे :
https://youtu.be/73po-dNb5jc?si=CYmWlMfVzY5z2eaW >> बघितला. आवडला. धन्यवाद.

सूनेसाठी एवढी धडपड करणारी सासू पहिल्यांदाच बघतेय.>> तसं खरच नाहीय हो. हल्ली जवळपास सगळीकडेच करतात सुनेची काळजी अन कौतुक. (नियमाला अपवाद असतातच. बदल होतील अशा घरांमध्ये हळूहळू..)

बाकी माझी सून खरच खूपच गोड अन लाघवी मुलगी आहे.

लेखाचा पूर्वार्ध वाचताना मी पुरुष असूनही माझे डोळे भरून आले. खूप लहानपणीची एक आठवण जागी झाली. आमच्या खालच्या मजल्यावर एक कॅथलिक कुटुंब होते. मुलगा, त्याचे आईवडील , आजी आणि तीन बहिणी. त्याचे लग्न होऊन ते जोडपं गेटमधून आत येताना खिडकीतून पाहिलं होतं. एवढ्या लोकांत त्या मुलीला किती एकटं, परकं वाटेल ना असा विचार त्या क्षणी माझ्या डोक्यात आला आणि नंतरही अनेकदा पाठवणीची दृश्य पाहताना येतो. शिवाय ऑफिसात काही कलीग्ज जवळच्या मैत्रिणी झाल्याने त्यांचे अनुभवही ऐकले होते.
त्यामुळे तुम्ही सुनेच्या स्वागतासाठी घर आणि मन सजवताय याचं फार कौतुक वाटलं.

उत्तरार्ध वाचताना मायबोलीवरची माझ्यामुळेच गाजलेली एक कथा आठवली. तिथेही तिथे मी तुमच्या पुढच्या पिढीला तरी असे अनुभव येऊ नयेत अशा शुभेच्छा दिल्या होत्या, तेव्हा तुमच्या आणि तुमच्या सुनेच्या मधल्या पिढीतल्या काहींनी अजूनही कसं सासर द्वाड बाई हा अनुभव येतो, ते सांगितलं.

<आणि नवऱ्याला (माझ्याच. सुनेच्या नवऱ्याचा काहीच प्रश्न असणार नव्हता!) धमकावून ठेवलं, > यामुळेही त्या कथेतले काही संदर्भ जागे झाले. तुम्ही मुलालाही तसं घडवलंत, याबद्दलसुद्धा कौतुक.

कुट्टीच्या कथांतूनही दिसलेला संवेदनशीलता हा तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे.

शर्मिला गोड सासू आहे>>+१ शर्मिला लेख खूप छान आणि कसला आव न आणता लिहिला आहेस.
मला या अशा गोष्टी सहज मुबलकतेने आजुबाजूला फारशा दिसत नसल्याने मान्य करायला जरा लाज वाटते की मी प्रथम लेख वाचला तेंव्हा शंका भावना आली, की हे जरा बढवून लिहिले असावे का? सॉरी शर्मिला.
अनिंद्य & इतर प्रतिसाद पण छान आहेत.

खूपच सुरेख. पिक्चर बघेन नंतर ( मला केव्हाचा indian kitchen बघायचा आहे. आता मिसेस ही बघेन) तू जे काही लिहीलंयस ते अफाट आहे.भरत म्हणाले तसं कुट्टीच्या गोष्टींमधून तुझा संवेदनशील स्वभाव दिसतो. (मी कुट्टी च्या प्रेमात आहे.)
मला सगळ्या प्रतिक्रिया पण खूप आवडल्या त्या वाचताना सुद्धा डोळे भरून आले.
आता मला तुझ्या या लेखाचा खूप आधार वाटतोय .

लग्नानंतर निदान सुरूवातीला काही वर्षं नवरा-बायकोने वेगळं रहावंच. >> हे केलं तरी रिमोट्ली मुलाच्या घरातले स्वयंपाकघर control करणार्‍या सासवा बघितल्या आहेत. अमेरिकेत रहाण्यार्‍या सूनेलाही फोडणी आपल्या पद्धतीची आलीच पाहिजे, याबद्दल आग्रही असणार्‍या सासू असतात.
याच समस्येचं दुसरं टोक म्हणजे हल्ली मुली आणि मुलगे लग्नानंतर भारतीय पदार्थ किंवा घरी स्वयंपाक करणे याला पूर्ण फाटाच देऊ बघतात. आपली इतकी संपन्न, वैविध्यपूर्ण खाद्यसंस्क्रुती यामुळे नष्ट/ सपाट होईल की काय अशी भिती वाटू लागते. दोन्ही पार्टीजनी काहीतरी सुवर्णमध्य काढायची धडपड करणं आवश्यक आहे.

सुरेख, प्रांजळ आणि हृद्य लिहिले आहे. तुम्ही किती प्रेमळ आहात शर्मिला. Happy तुमच्या दोघींचे नाते फुलत बहरत जाणार यात शंकाही नाही.
भरत , तुमच्या पहिल्या परिच्छेदावर- एवढी जाणिवही नसते कुणाला सहसा. त्यामागचा विचार येणारे पुरूष संवेदनशील वाटतात.

Sharmilaa हा स्वतः: मधला माणूस जपल्याबद्दल अभिनंदन!
वावे हा सगळे प्रतिसाद वावा.. म्हणजेच bang on! Perfect लिहिलंय..

मस्त लेख... शर्मिला तुम्ही फार गोड सासू आहात.
हे नातं दोन्ही बाजूंनी असच बहरू दे...
सगळे प्रतिसाद ही फारच छान...

मुलीचं आडनाव सुद्धा बदलायची गरज नसायला हवी. >> स्वतंत्र विचारांच्या मुली नाही बदलत हल्ली..... त्या सुनेचे पहिले नाव पण बदलले गृहप्रवेश करतांना. अन ती मूलगीही नवीन हाकेला सहज पटकन प्रतिसाद देत होती...

>>>>>

माझ्याच पोस्टला तुम्ही हा प्रतिसाद दिलात. पण गंमत म्हणजे माझ्या आता लक्षात आले की माझ्या बायकोचे पहिले नाव सुद्धा बदललेले आहे Happy

Pages