दुर्मिळ आजारांचा प्रादेशिक उद्रेक ( १. GBS)

Submitted by हेमंतकुमार on 24 January, 2025 - 06:26

शेवटचे अद्यतन : १०/२/ २०२५
. . .
गेल्या चार वर्षात (भारतासहित) जगभरात अनेक संसर्गजन्य रोगांच्या साथी येऊन गेल्या. त्या अनुषंगाने संबंधित जिवाणू अथवा विषाणूजन्य आजारांवर स्वतंत्र लेखांतून चर्चा झालेली आहे. प्रस्तुत धागा काढण्याचा उद्देश मात्र वेगळा आहे.
आयुष्यात असंख्य प्रकारच्या आजारांचा सामना आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर करावा लागतो. जे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांच्यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती वारंवार होतच असते. परंतु जे आजार मुळात दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ असतात त्यांच्याबद्दल जनसामान्यांना एरवी माहिती नसते.

कधीतरी अचानक जगाच्या एखाद्या मर्यादित प्रदेशात (गाव, शहराचा भाग) काही आजारांचा अचानक प्रादुर्भाव होतो आणि त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. असे झाले की संबंधित भागातील आरोग्य यंत्रणाना खडबडून जागे व्हावे लागते तसेच नागरिकांनाही सतर्क राहावे लागते. या प्रकारच्या दुर्मिळ आजारांचा जेव्हा केव्हा जगात कुठेही उद्रेक होईल त्यासंबंधी टिपणी करण्यासाठी हा धागा उघडून ठेवत आहे. इथे प्रसंगानुरूप प्रतिसादांमधून कोणीही भर घालू शकता.

या निमित्ताने अलीकडेच पुण्यामध्ये अचानक उद्रेक झालेल्या Guillain-Barré syndrome (GBS) या आजाराची थोडक्यात माहिती लिहून ठेवतो.
आजाराची ठळक वैशिष्ट्ये :

१. हा ऑटो इम्युन प्रकारातील आजार असून त्यामध्ये बाधिताच्या चेतासंस्थेवर परिणाम होतो.

२. साधारणपणे दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे एखादा रुग्ण असे या आजाराचे सरासरी प्रमाण अत्यल्प आहे.

३. तो अधिकतर पन्नाशी ओलांडलेल्या लोकांमध्ये आढळतो.

४. त्याचे नक्की कारण अद्याप अज्ञात आहे परंतु आतापर्यंत समजलेली कारणमीमांसा पुढील मुद्द्यामध्ये येईल.

५. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जिवाणू अथवा विषाणूंचा संसर्ग होतो. त्यातून पचनसंस्था किंवा श्वसनसंस्थेत बिघाड होतो. हा बिघाड त्या संस्थांपुरता मर्यादित न राहता त्यातून ऑटोइम्युन प्रकारची हानिकारक प्रक्रिया होते. त्यातूनच चेतासंस्थेच्या विशिष्ट भागाला (peripheral nervous system) इजा होते.

६. अशा प्रकारे या आजारास कारणीभूत ठरणारे रोगजंतू या प्रकारचे आहेत :
Campylobacter jejuni, Norovirus, COVID-19 विषाणू , Zika, cytomegalovirus, or Epstein-Barr virus.

७. काही वेळेस रुग्णावरील शस्त्रक्रिया किंवा काही लसीकरणानंतर हा आजार झालेला आढळला आहे.

रुग्णाची प्रमुख लक्षणे :

  • खूप अशक्तपणा येणे, चालताना किंवा जिने चढताना पाय अडखळणे,
  • विचित्र प्रकारच्या संवेदनांचे भास होणे - जसे काही त्वचेखाली किडे वळवळणे, स्नायूदुखी.
  • आजाराचे स्वरूप तीव्र झाल्यास डोळ्याच्या स्नायूवरही परिणाम होतो तसेच चघळणे, गिळणे आणि बोलणे या क्रियाही बिघडू शकतात. काही रुग्णांमध्ये नाडीचे ठोके आणि रक्तदाब बिघडतात. तर अन्य काहींमध्ये आजार तीव्र होऊन श्वसन दौर्बल्य आणि पॅरालिसीस सुद्धा होऊ शकते.
    बहुतेक रुग्ण उपचार घेतल्यानंतर कमीअधिक कालावधीनंतर पूर्ववत होतात.

रोगनिदान हे विशिष्ट तज्ञांकडून केले जाते. त्यासाठी चेतासंस्थेच्या शारीरिक तपासणी बरोबरच काही विशिष्ट चेताचाचण्या, पाठीच्या मणक्यातील द्रव तपासणे आणि एमआरआय इत्यादींचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचार : सध्या तरी या आजाराला बरा करणारा रामबाण उपाय सापडलेला नाही. जे उपाय उपलब्ध आहेत त्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि रुग्णाची रिकवरी लवकर होऊ शकते. अशा उपचारांमध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे :

  1. Plasma exchange : यामध्ये शरीरातील दूषित रक्त काही प्रमाणात काढून टाकून त्या जागी थोडा निरोगी रक्तद्रव भरला जातो.
  2. इंजेक्शनद्वारा immunoglobulinचे उपचार

पुण्यातील सद्यपरिस्थिती ( २७/१ )

  • आतापर्यंत ११० जणांना बाधा. त्यातील बहुतेक जण पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आहेत
  • . 73 पुरुष व 37 स्त्रिया. त्यापैकी 13 जणांना व्हेंटिलेटरचे उपचार

  • त्यापैकी काहींना Norovirus तर काहींना Campylobacter jejuni ची बाधा झालेली होती. या जंतूंचा प्रसार दूषित अन्न अथवा पाण्यामार्फत होतो.
  • संबंधित रुग्णांवर योग्य ते उपचार चालू आहेत. सर्वसामान्यांनी वृत्तपत्र/ माध्यमांतील ठळक/भडक बातम्या पाहून घाबरायचे काहीच कारण नाही असे पुण्याच्या न्यूरोलॉजिकल सोसायटीने जाहीर केले आहे. फक्त दूषित अन्न अथवा पाण्याचा संपर्क न येण्याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.

* या आजारावरील उपचार महाग असल्यामुळे पुणे महापालिकेने ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत रुग्णांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
* राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन लवकरच मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे- इति राज्य आरोग्यमंत्री

*************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ninds.nih.gov/health-information/disorders/guillain-barre-sy...

२. https://www.indiatoday.in/health/story/norovirus-campylobacter-bacteria-...

३. वैद्यकीय पाठ्यपुस्तके
* * * * * * *
3/2/2025
पुण्यातील रुग्णांच्या बाबतीत जिवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर प्रतिकारशक्तीमध्ये कोणता बदल झाला असावा की ज्यामुळे जीबीएस उद्भवला, याचा आता शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी 63 रुग्णांचे नमुने काही विशिष्ट अँटीबॉडीज तपासण्यासाठी बंगळुरू येथील NIMHANS कडे पाठवलेत.
पुणे अद्यतन :
खात्रीशीर निदान झालेले रुग्ण 127; त्यापैकी 27 अतिदक्षता विभागात तर 16 व्हेंटिलेटरवर.
27 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
. . .
१०/२/ २०२५
* पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष.
* साथरोग नियंत्रण कायदा प्रभावी होण्यासाठी येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधेयक मांडणार.
......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणी जसे जिवाणू / विषाणू / जंतू मुले दूषित होते तसेच केमिकल मुले पण होते. जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा कचऱयाचे उघड्यावर पडलेले ढीग , फाऊंडरी ची वापरलेली सॅण्ड, साखर कारखान्याचे स्पेंट , सायझिंग चे सॉलिड वेस्ट , यातील घातक केमिकल्स पावसाच्या पाण्याबरोबर लीच होऊन , पिण्याच्या पाण्यात ( नदी , बोअरवेल ) मिसळतात आणि असे पाण्याचे सोर्स दूषित करतात. डायल्युशन इस सोलुशन फॉर पोल्युशन असं या अति XXXXXX लोकांचे ब्रीदवाक्य आहे. १९७० -८० च्या दशकात गुजरात मधील एक कंपनी आपले वेस्ट वाटर जमिनीमध्ये बोरवेल मारून त्यात टाकत होती, बऱ्याच वर्षांनी ते उघडकीस आले , पण झालेले नुकसान भरून यायला कित्येक दशके जातील. Sad

अजून एक जाता जाता , चिकन, मटण आणि मासे यातून सुद्धा असे इन्फेक्शन होऊ शकतात, खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर डिस्कव्हरी चॅनेल वर एक भाग पाहिला होता, एक शाळेत जाणारा मुलगा , कॅम्पिंग मध्ये थोडा अर्धकच्चा मीट पीस खातो आणि बेक्कार आजारी पडतो, तेंव्हा मी पण शाळेत होतो , नेमके डिटेल्स आठवत नाहीत , पण अर्धवट शिजलेल्या मांसामधून जर लार्व्हा पोटात गेल्या तर खूप सिरिअस कंडिशन होऊ शकते, त्यामुळे मांसाहाराच्या बाबतीत हि काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे.

* मिसळतात आणि असे पाण्याचे सोर्स दूषित करतात.
>>> अतिशय महत्त्वाचा मुद्दा.
निपा,
विस्तृत स्पष्टीकरण आवडले. तसेच तुम्ही कार्यमग्न असतानाही माझ्या इथल्या विनंतीला मान देऊन वरचे जे प्रतिसाद लिहिलेत त्याबद्दल मनापासून आभार !

निवांत पाटील सर , खूप छान विश्लेषण आणि स्पष्टीकरण देऊन सोपे करून समजावून सांगितले ह्यासाठी धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी विविध मुद्द्यांना येथे सविस्तर व्यासपीठ दिलंय त्यासाठी विशेष आभार.

निपा छान माहिती.

अर्धकच्चे मांसासारखे. अंडे सुद्धा घातक ठरू शकते का? हाफ फ्राय माझ्या फार आवडीचे. पण खाताना हा विचार मनात येतोच. अर्धे कच्चेच पोटात जातेय.. पण मग असा विचार करतो की निसर्गाने त्याला कवचात सुरक्षितच ठेवले असेल ना..

>>>>>>>त्या कपड्यावर जिवाणूंचा कुंभ मेळा भरलेला असतो.
खूप हसले

>>>>> पण अर्धवट शिजलेल्या मांसामधून जर लार्व्हा पोटात गेल्या तर खूप सिरिअस कंडिशन होऊ शकते,
बाप रे. बाहेर लोकं रेअर वगैरे मीट खातात ते कसे मग? 'वेल डन-मिडिअम-रेअर' मधील.

>>>>>>पण कधीतरी चॉकलेट मध्ये अळ्या, कोल्ड्रिंक मध्ये पाल , झुरळ असल्या बातम्या बघून FDA / FSSAI या सगळ्या अंधश्रद्धा वाटू लागतात आणि आपण आपल्या पोटात चुकीचे काही जाऊ नये याची फक्त प्रार्थना करू शकतो Sad
बाय रे!! याइक्स!!! (यक्क! Happy )

आयसीएमआरचे संचालक डॉ राजीव बहल यांनी 'जीबीएस'संबंधी काही मत व्यक्त केले आहे.

त्यांच्या मते रुग्णांना जंतूसंसर्गातून झालेले जुलाब आणि जीबीएस यांचा परस्परसंबंध आतापर्यंतच्या 40% रुग्णांमध्ये आढळलेला आहे.
Norovirus मुळे झालेले जुलाब आणि जीबीएस यांचा आतापर्यंतच्या ज्ञानानुसार खरंतर संबंध नाही. त्या दृष्टिकोनातून या मुद्याकडे बारकाईने पाहिले जात आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/india/guillain-barre-syndrome-...

पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 127
त्यात पाच बालकांचा समावेश. बालकांवर उपचार चालू असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

2 रुग्णांचा मृत्यू परंतु त्याच्या कारणाची अद्याप खातरजमा झालेली नाही.

या आजाराच्या निमित्ताने घरातील वॉटर प्युरिफायर बदलत आहे . कोणता घ्यावा हा प्रश्न पडला आहे . काही माहिती मिळू शकेल का ? म्हणजे या आजाराचे जंतू मारण्यासाठी त्यात काय फिचर असणे आवश्यक आहे ?

* वॉटर प्युरिफायर बदलत आहे . कोणता घ्यावा ?
हा गोंधळात टाकणारा विषय आहे !

याबाबत भारताच्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचा एक चांगला संदर्भ : https://nihroorkee.gov.in/sites/default/files/nih_water_purifier_drinkin....

आधुनिक पाणी गाळण करणाऱ्या उपकरणांमध्ये खालील दोन प्रकारच्या शास्त्रीय यंत्रणा असू शकतात.
1. UV purification + Ultra-filtration
2. UV purification + Reverse osmosis

भारतात आपण कुठे राहत आहोत आणि तिथल्या पाण्याचा एकूण दर्जा (total dissolved solids in water, TDS) कसा आहे, त्यावर वरीलपैकी कोणती यंत्रणा वापरावी याचा निर्णय घ्यावा लागतो

असे आधुनिक फिल्टर वापरायचे असतील तर वरीलपैकी कुठली यंत्रणा कुठल्या उत्पादनात (ब्रॅंडमध्ये) चांगली आहे या संदर्भात योग्य त्या तज्ञाचा सल्ला घेतलेला बरा.

वरील संदर्भातील काही महत्त्वाचा मजकूर :
There is much confusion about these filters and most often the general public is misguided by the vendor claims. As a result, RO based water purifiers have mushroomed in the market as people think that only RO based purifier ensures safe drinking water, which is true to some extent but RO purifiers are not advisable for all types of waters.

धन्यवाद कुमार१ सर,
मला पुण्यात हवे आहे . मी पुण्यातल्या पाण्याचा TDS इंटरनेट वर शोधायचा प्रयत्न केला पण माहिती मिळाली नाही . जरी मिळाला तरी प्रत्यक्ष नळातून जे पाणी येते त्याचा टीडीएस कळायला हवा (कारण महानगरपालिका ते पाणी प्रोसेस करून पाठवते) जे कि कठीण वाटत आहे . असो .
मी आपण दिलेली लिंक वाचली . त्यातून मला कळलेले महत्वाचे मुद्दे असे .
RO मध्ये मेम्ब्रेन च्या छिद्रांचा आकार तुलनेने लहान असतो . 0.0001-0.001 µm त्यामुळे घातक रसायने, सूक्ष्मजीव गाळले जातातच पण त्याचबरोबर क्षार सुद्धा गाळले जातात . आता ज्या पाण्यात क्षार जास्त आहेत तेथे हे चांगले . पण क्षार कमी असलेल्या पाण्यातून जर कॅल्शिअम, मॅगनेशिअम सारखे क्षार गाळले गेले कि जे शरीराला गरजेचे असतात तर ते नुकसानीचे आहे .
म्हणून जिथे पाण्यात क्षार कमी आहेत तिथे UF (Ultra-filtration) चांगले कि ज्यामध्ये मेम्ब्रेन च्या छिद्रांचा आकार तुलनेने मोठा असतो. (0.01- 0.1µm) यामुळे बरेचसे सूक्ष्मजीव, गढूळपणा गाळला जातो पण क्षार तसेच राहतात.

केंटच्या या व्हिडिओत ते TDS Controller for mineral retention चा दावा करत आहेत .
https://www.youtube.com/watch?v=buY45UohvZE&t=9s

*तरी प्रत्यक्ष नळातून जे पाणी येते त्याचा टीडीएस कळायला हवा>>>> +११
अगदी !
* * *
' पुणे महानगरपालिकेची हद्द' हे विधान देखील आता पाण्याबाबत मोघम ठरेल कारण, मुख्य शहर आणि अलीकडे समाविष्ट केलेली गावे यांचा पाणीपुरवठा-दर्जा कसा वेगळा आहे ते सध्याच्या प्रकरणावरून दिसते आहे.

जुन्या पद्धती वापरून पिण्यासाठी असलेले तुरटी फिरवलेले पाणी नीट उकळवून प्यायले तर त्यात आपल्याला आवश्यक उपयोगी क्षार राखले जातात की फेकले जातात हा एक प्रश्न आणि ....

नगर पालिका किंवा ग्रामपंचायत द्वारे फिल्टर केलेलं पाणी बऱ्याचदा ब्लिचिंग पावडर अतिरिक्त घातलेले आढळते तर हा त्रास कमी होण्यासाठी त्यावर पिण्यापूर्वी काही प्रक्रिया करता येईल का असा दुसरा प्रश्न आहे.

१. तुरटी फिरवलेले पाणी नीट उकळवून प्यायले तर
>>>> तुरटीचे प्रमाण शास्त्रशुद्ध ठेवले तर अगदी थोड्या प्रमाणात असे क्षार कमी होतील.
. . .
२. पाणी बऱ्याचदा ब्लिचिंग पावडर अतिरिक्त घातलेले
>>> जेव्हा क्लोरीनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झालेले असते तेव्हा खालील उपाय करता येतात :

  • संबंधित पिण्याचे पाणी 24 तास उघडे ठेवणे जेणेकरून तो क्लोरीन निघून जातो
  • पाणी पंधरा मिनिटे उकळणे आणि नंतर पूर्ण थंड झाल्यावर पिणे
  • Activated carbon filters चा वापर करून गाळून घेणे

GBS : ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि बदलते स्वरूप

  • सन 1859मध्ये Landry या डॉक्टरांनी प्रथमच 10 रुग्णांमध्ये विशिष्ट प्रकारचा लुळेपणा ( paralysis) दिसल्याची नोंद केली.
  • 1916 मध्ये Guillain, Barré, and Strohl या तीन फ्रेंच डॉक्टर्सनी या विशिष्ट प्रकारच्या चेताविकारावर शिक्कामोर्तब केले.
  • त्यानंतर बरीच वर्षे हा एकच विशिष्ट आजार असल्याची धारणा होती. परंतु कालांतराने त्याचे अनेक बदलते प्रकार (variants) दिसून आले.
  • नुकत्याच घडलेल्या पुण्यातील घटनेत एक 60 वर्षांचा रुग्ण मृत्यूमुखी पडला आहे आणि त्याला झालेला आजार BBE (मेंदूदाह) या अतिदुर्मिळ प्रकारचा होता, ज्याचे जीबीएसशी काही प्रमाणात साधर्म्य असते.

    ( https://indianexpress.com/article/cities/pune/guillain-barre-syndrome-de...)

१५ -२० मिनिटे उकडलेली अंडी चालतात का? ती पूर्ण निर्जंतुक होतात का ? आणि ऑम्लेट करताना किती वेळ फ्राय करायला हवे पूर्ण निर्जंतुकीकरणासाठी? धन्यवाद .

अंडी खाण्याबाबतची सुरक्षितता या संदर्भात एफडीएच्या इथे बऱ्याच सूचना आहेत : https://www.fda.gov/food/buy-store-serve-safe-food/what-you-need-know-ab...

माझ्या मते पाणी उकळायला लागल्यानंतर पंधरा मिनिटं उकडणे हे उत्तम आहे; मी तसे करतो.
आहारतज्ञांनी अधिक भर घालावी

अलीकडील दोन दुर्मिळ आजारांची चर्चा चालू आहे. त्याच्या जोडीला आता एक तिसरा गूढ आजार भारतात उद्भवला आहे.
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात या गूढ आजाराने एकूण 17 बळी घेतलेले आहेत.
सदर रुग्णांना ताप, मळमळ, अतिरिक्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे ही लक्षणे दिसून आली होती.

दिल्लीच्या एम्सच्या वतीने या प्रकरणाची सखोल वैद्यकीय तपासणी चालू असून अन्नातून काही विषबाधा (neurotoxin) झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे
https://www.newindianexpress.com/nation/2025/Jan/22/mysterious-illness-i...

https://www.newindianexpress.com/nation/2025/Feb/01/no-fresh-cases-of-my...

वरील बाधितांच्या मरणोत्तर रासायनिक तपासणीत त्यांच्या शरीरांत cadmium हा घातक धातू आढळून आलेला आहे. संबंधित विषबाधा त्यामुळे झाली असावी
- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग

https://www.ndtv.com/india-news/whats-behind-mystery-illness-that-claime...
. . .
म्हणजेच दूषित अन्न वा पाण्यातून सदर घटना घडलेली असावी असा अंदाज.

शेगावमधील केस गळती प्रकरण
आय सी एम आरच्या संशोधनानुसार संबंधित व्यक्तींच्या बाबतीत सेलेनियम या धातूमुळे त्यांच्या केसांना इजा झालेली आहे.

आतापर्यंत तिथे 300 हून अधिक जणांना ही बाधा झालेली असून स्थानिक जमिनीत सेलेनियमचे प्रमाण बरेच जास्त असावे असा अंदाज बातमीत व्यक्त केला आहे.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/selenium-in-blood-hair...

पुण्यातील निमशहरी वस्तीत अनेक जण कॅनमध्ये पॅकबंद केलेले पाणी पिण्यासाठी वापरत असतात. हे पाणी पुरवठादार त्यावर आर ओ प्रक्रिया केल्याचे सांगतात. परंतु सध्या केलेल्या तपासणीत या आरओ -यंत्रणा देखील सदोष असल्याचे आढळले आहे.
परिणामी त्यातून मिळणारे पाणी रोगजंतुयुक्त आहे.

(बातमी सर्वत्र प्रसिद्ध)

साथरोगतज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांची सविस्तर मुलाखत येथे आहे : https://frontline.thehindu.com/the-nation/public-health/guillain-barr%C3...

त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे

  • बेलगाम शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेला पायाभूत सुविधांचा अभाव, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणांतील गंभीर त्रुटी आणि गतवर्षी पुण्यात आलेल्या झिका आणि डेंग्यूच्या साथी या सर्वांचा एकत्रित सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून आपल्याला प्रस्तुत जीबीएसचे खरे कारण समजू शकेल.
  • एरवी कुठलीही साथ नसताना जीबीएसच्या संख्याशास्त्रानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मिळून प्रतिवर्षी 2,800 रुग्ण आढळणे अपेक्षित असते.

प्रयागराज येथील गंगेच्या प्रवाहात शौचावाटे बाहेर जाणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण धोकादायक पातळीवर गेलेले आहे.
या प्रकरणाची न्यायाधिकरणामार्फत चौकशी चालू असून त्यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्टीकरण मागितलेले आहे.

https://www.indiatoday.in/india/law-news/story/high-level-of-faecal-bact...

‘रडण्याचा आजार’
काँगो देशात गेल्या काही दिवसात एका गूढ आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे अल्पावधीत 60 जणांचा मृत्यू झालेला दिसतो. या आजारात जुलाब, सांधेदुखी आणि तीव्र तहान ही लक्षणे दिसलीत. काही मुलांच्या बाबतीत अतिशय रडणे आणि नाकातून रक्त येणे हे देखील आढळले.
https://www.ndtv.com/health/mystery-crying-disease-kills-over-50-in-cong...(WHO)%2C%20there%20were,Western%20Congo%20and%2060%20fatalities.

तूर्त या आजाराचे कारण अज्ञात असून त्याला ‘रडण्याचा आजार’ असे नाव काही वृत्तसंस्थांनी देऊन टाकले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यात लक्ष घातले असून या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जात आहे ( ? Ebola, dengue, Marburg or yellow fever).

जागतिक पोलिओ निर्मूलन
सध्या जगात फक्त पाकिस्तान व अफगाणिस्तानात हा विषाणू कार्यरत आहे. त्या देशांना मिळणाऱ्या परकीय निधीअभावी तेथील लसीकरण कार्यक्रमावर परिणाम झाला असल्याने या संदर्भात डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे.

https://www.voanews.com/a/7955883.html

Pages