वैषम्य

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 20 December, 2024 - 23:45

वैषम्य

जे समजत होते माझे हातून हरवले आहे
उमजले मला भवताली निर्वात पोकळी आहे

का फुलला आहे केव्हा पारिजात माळावरती
लागले वनाला वणवे राखोळी झाली आहे

बांधून घेतले काही क्षण ओले उरले सुरले
वेड्यागत मागे मग मी का वळुनी बघते आहे?

साम्राज्य लयाला गेले सिंहासन ओके बोके
दगडाच्या सांध्यांमधुनी डोलते लव्हाळी आहे

जाणिवा मनाच्या हळव्या बोथटल्या खुरट्या झाल्या
डोक्यावर माझ्या आता तलवार टांगली आहे

-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे

वैषम्य कवितेच्या निमित्ताने काही गोष्टींचा खुलासा.
आपल्या मनात एखाद्या वस्तू, व्यक्ती, ठिकाणाविषयी आपुलकी इतकी वाढते की आपण त्याची मालकी मिळाली असे मनोमन ठरवून टाकतो. आपल्या मालकीच्या ह्या गोष्टींसाठी अतोनात धडपड करून जिव्हाळ्याने काहीही करायला तयार होतो.
आणि जेव्हा काळ पुढे जातो, असे काही घडते की आपल्याला कळते की आपण मूर्ख ठरलो.
खरे तर आटापिटा करायची काहीही गरज नव्हती. कधीतरी ही जाणीव ज्याच्यांसाठी आटापिटा केला तेच करून देतात. (कदाचित त्यांना तुमचे मालकी गाजवणे जाचक पण वाटत असेल)

ह्या सगळ्या बाबी आपल्या आयुष्याला पण लागू आहेत. आपण काही काळ पृथ्वीवर आलेलो असतो पण सगळे नश्वर असून आपलेच आहे असे समजत गुरफटून जातो. मग अचानक सत्य समोर आले, आत्मभान आले की वाटते ते वैषम्य.

ती भावना ह्या काही ओळींमध्ये पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे. विषाद वाटत असतानाही मनात एक आशा असते की मला इथे थोडे तरी स्थान असेल म्हणून मन/ नजर मागे बघते.
आता सगळेच संपले असे वाटत असते.
मनाच्या जाणीवा ज्या आधी हळव्या होत्या त्यांना बोथट बनवण्याचा प्रयत्न करताना लक्षात येते की, आपल्याला इथे काहीही स्थान नाही. जे आपण आपुलकीने करतो आहे/ केले आहे त्या प्रत्येक कृतीचा कदाचित विपरीत अर्थही समजला जाऊ शकतो ह्या अर्थाने टांगती तलवार हे शब्द वापरले आहेत.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टांगलेली तलवार म्हणजे काहीतरी अत्यवस्थ आजाराचे निदान झालेले आहे का (कवितेतील पात्राच्या म्हणते आहे मी)?
कविता आवडली.

कुमार १, सामो आणि बे फी खूप खूप धन्यवाद.
माझी कविता ३ जणांना आवडली म्हणजे ती थोडी तरी समजत आहे. अवघड किंवा अजिबात समजली नाही अशी झाली असावी असे मला वाटत होते.
सामो मी विस्ताराने नंतर लिहिते. मला नक्की काय अभिप्रेत आहे ते.

छान.
पुढील बदल अधिक आवडले असते.

जे समजत होते माझे हातून हरवले आहे
उमजले मला भवताली निर्वात पोकळी आहे

बांधून घेतले क्षण काही ओले उरले सुरले
वेड्यागत मागे तरीही का नजर लागली आहे

जाणिवा मनाच्या हळव्या बोथटल्या खुरट्या झाल्या
डोक्यावर माझ्या आता तलवार टांगली आहे

सुचवलेल्या बदलांचे स्वागत उ बो.
विधाता वृत्तात लिहिलेली कविता आहे ही.
१ ला आणि शेवटचा बदल बसेल मात्रेत पण २ ऱ्या क्रमांकाच्या बदलात मात्रा हलतील.

>>> पण २ ऱ्या क्रमांकाच्या बदलात मात्रा हलतील.

मात्रा नाही, यती हलेल.

वृत्तात लिहिले असलेत तर 'तरीही' चे 'तरिही' करावे लागेल

(टायपो झाला असेल)

Yes...
तरीही.. तरिही हवा.
पण व्याकरणाच्या दृष्टीने चूक.
बघते अजून काही करता येते का?
एक एक शब्द बसवत बसवत भावना मांडणे काळ सांभाळणे कठीण जाते.
पण मेंदूला मस्त व्यायाम होतो.
अल्झायमर होऊ नये यासाठी कविता लिहिणे उत्तम.

मी एकदम अडाणी आहे, मला वृत्त, मात्रा, यती या विषयात गती नाही. गेयता या एकमेव उद्देशाने हे बदल सुचवले होते. ते मोठ्या मनाने ऐकलेत याबद्दल आभारी आहे.

अल्झायमर होऊ नये यासाठी कविता लिहिणे उत्तम. >> +१
मी सुडोकू सोडवतो.

>>> पण व्याकरणाच्या दृष्टीने चूक.

व्याकरणाचा (वृत्ताचा) उल्लेख तुम्ही प्रथम केलात. ती सुचवणी व्याकरणदृष्ट्या चूक आहे हे मला माहित आहे, पण विधाता वृत्त पाळायचे आहे ना तुम्हाला?

जाता जाता - येथे मी अतोनात लेखन करून लोककृपेने मोठा प्रसिद्ध झालो असलो तरी मी मराठी भाषा फक्त दहावीपर्यंत शिकलो आहे व याची मला नम्र जाणीव आहे.

म्हणूनच आता विचार करून दुसरे शब्द योजून नव्याने लिहिते असे लिहिले ना मी.
कविता चांगली व्हावी म्हणून तुम्ही सुचवलेले बदल स्वागतार्ह आहेत.
मी नक्की प्रयत्न करते.

छान

कविता सुचवलेले बदल करून पुन्हा सादर केली आहे.
काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
मला इथे एक विचारावेसे वाटते.
मनाच्या निरनिराळ्या भावना थोडा अभ्यास करून मी कवितेच्या रुपात मागील वर्षी लिहून काढल्या होत्या. मी त्या मायबोलीवर सादर करू काय? त्या वृत्तात बसवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुम्ही सगळे मला नक्कीच चांगले काहीतरी सुचवाल अशी आशा आहे.
धन्यवाद.

>>>>>.काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
आवडला. खूपच सुंदर.

लव्ह नेव्हर गोज वेस्टेड!!! प्रेम वाया कधीच जात नाही. कधीच नाही. असो.

सामो, प्रेम कधीच वाया जात नसेल तर किती छान होईल. कोणतेही गैरसमज होणार नाहीत. जग साधे सोपे सुंदर बनेल. प्रत्येकजण दुसऱ्याच्या भावनांचा आदर करेल आणि वैषम्य वाटणार नाही...
खरच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ह्यातून इतरांसाठी मनापासून केलेले निस्वार्थ प्रयत्न कधीही वाया जाऊ नयेत.