सकाळी अर्धा-एक तास हाताशी सापडतो. कामावर जातानाच्या रस्त्याकडेला एखादा बेंच/कठडा असतो. समोर तुरळक ट्रॅफिक असते. हळहळत जॉगिंग करणारे, आपण टुणटुणीत असल्याचा भास उत्पन्न करणारे काका-लोक असतात. स्वतःस मेंटेन करण्याची प्रतिज्ञा केलेल्या मुली असतात. त्यांचा हेडफोन्समधून कुणाशीतरी चिवचिवाट चाललेला असतो. असेल बॉयफ्रेंड वगैरे. मला त्यातलं काही कळत नाही. आणि मी त्यात लक्षही घालत नाही, कारण अप्सरा वगैरे तशा फारशा कुणी नसतात. जॉगिंग वगैरेतला फोलपणा कळल्यामुळे त्या घरीच मस्त झोपा काढत असतील. एक आपला अंदाज.
बाकी, मी कितीही काळ पुतळ्यासारखा स्तब्ध बसू शकत असल्यामुळे फिरवायला आणलेली कुत्री कधीकधी माझ्या पायांजवळ हुंगत थांबतात. परंतु पुढे त्यांनी काही असभ्य कृती करायच्या आत त्यांच्या मालकिणी त्यांना इंग्रजीतून दम देतात, ओढून नेतात.
हे सगळं बघत, ऐकत राहतो थोडा वेळ. मग उजवा हात शेजारच्या सॅकमध्ये जातो. बोटं चाचपडतात. आकार ऊकार ओळखतात. आणि एक पुस्तक बाहेर येतं. ते तिथं बसून वाचण्यासाठी ठेवलेलं असतं.
सकाळी वाचायची पुस्तकं वेगळी असतात. उदाहरणार्थ प्रकाश नारायण संतांचं 'शारदासंगीत', श्रीनिवास कुलकर्णी- बोकील-थोरो-एलकुंचवारांचे लेख, सोग्याल रिंपोंचेचं 'द तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग ॲंड डाईंग', थिच नॅथ हनचं 'सायलेन्स', शुनरू सुझुकींचं 'झेन माईंड,बिगिनर्स माईंड'..!
पाच-दहा पानं वाचली की एक टवटवीत दिवस सुरू होतो. संत वगैरे झाल्यासारखं वाटतं. आणि दिवसभर कामाच्या ठिकाणी नॉर्मल राहणं निभावता येतं.
संध्याकाळी काही ऊर्जा राहिलेली नसते. तर अशा वेळी वाचू नये, हे आता कळलं आहे. कितीही चांगला मजकूर असला तरी रिबाऊंड होतो. आणि मग आतून तुसड्या कमेंट्स यायला लागतात. चांगल्या पुस्तकांवर उगाच अन्याय होतो.
रात्री मूड असेल तर एखादं पुस्तक..! मितर सेन मीतचं 'तफतीश' 'कठघरा', ज्ञान चतुर्वेदींचं 'स्वांग', ओया बाय्दोरची 'गहाळ', सीताराम सावंतांची 'भुई भुई ठाव दे', सॉमरसेट मॉम, किंवा तुर्की लेखकांच्या अनुवादित कादंबऱ्या..!
पण पहाटेपर्यंत वाचत लोळायची चैन आता आयुष्यातनं कायमची फरार झाली आहे.
मग थेट रविवारी दुपारी..! जेव्हा काळझोपेतनं उठल्यावर कळायचं बंद होतं, तेव्हा मेंदूतला तो सगळा बधिरपणा ड्रिल करायला टोकदार तीक्ष्ण-विनोदी काहीतरी..! किरण नगरकर, जेरी पिंटो, मनस्विनी लता रवींद्र, शिल्पा कांबळे, विक्रम भागवत, आनंद विंगकर, निखिलेश चित्रे वगैरे..!
शिवाय रेनर मारिया रिल्के म्हणून एक जर्मन कवी आहे.
त्याने त्याच्या परिचितांना, वाचकांना, नवोदित लेखकांना, कवींना पत्रं लिहिलीयेत. काहींचे मराठीत-हिंदीत अनुवाद झालेत. साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीची पत्रं आहेत, पण त्यातली धडधड ऐकू येते वाचताना..! जगण्याच्या-लिहिण्याच्या प्रक्रियेकडं फार विलक्षण आत्मीयतेनं बघतो हा माणूस..! कधीकधी मन तुटून तार तार झालेलं असतं, अशावेळी थेरपी म्हणून रिल्केची पत्रं वाचायला घ्यावीत..! त्या पत्रांच्या काठावर शब्दांच्या पलीकडचं काहीतरी उतरलं आहे.
बाकी, आपल्या मराठी लोकांचं पुस्तकांकडे साफ दुर्लक्ष होतं, ह्याचं पूर्वी आश्चर्य वाटायचं. आता तसं काही वाटत नाही. कारण आपण महान लोक आहोत, हे आता मला पटलेलं आहे..! दहावीनंतर मराठीची एक ओळही न वाचतासुद्धा आपण आयुष्यभर आनंदाने बागडत राहू शकतो..! जगातली कुठलीच ताकद आपल्या ह्या मनमौजी स्वातंत्र्यास टोचणी लावू शकत नाही..! कुणी आपल्यावर तशी जबरदस्ती करू शकत नाही..! चुकून अंगावर पुस्तक बिस्तक पडलंच, तर आपण ते पाल पडल्यासारखं झटकून पुढं जाऊ शकतो..! कारण शेवटी आपण एका महान ऐतिहासिक वैचारिक बौद्धिक सांस्कृतिक परंपरेतले लोक आहोत..! नाय का ?
आणि खरंच, असं सगळं अतिसुंदर वातावरण असतानाही, ह्या भाषेत अजूनही नवीन लेखक/लेखिका कसे काय निपजतायत ?
म्हणजे कुठून येतात हे लोक ?? आणि फारच चिवट दिसतात. मराठी डाऊनमार्केट भाषाय, अशी चहुबाजूंनी एवढी हाकाटी उठलीय, तरी हे त्यातच लिहितात. सिनीकल होणार हे ऐन जवानीत..! दुसरं काय..!
आता जगणंच समजा विस्कळीत असल्यामुळे वाचनही विस्कळीत झालं आहे. माझं रूपांतर उडाणटप्पू प्रकारच्या वाचकात झाल्यामुळे मला ही चैन परवडते. एखादा महिना सॅंपलला पकडला तर, तीन-चार पुस्तकं पॅरलली चाललेली असतात.
अलीकडे पुस्तकावर जी के ऐनापुरे हे नाव दिसलं की मी ते घेतो. आधीची अर्धी चतकोर वाचून, पानांचे कोपरे मुडपून ठेवलेली पुस्तकं तशीच राहतात. आणि ते प्रायोरिटीने वाचतो.
लेखक आणि त्याच्या चाहत्यामध्ये जो न उच्चारला गेलेला करार असतो, तो करार ऐनापुरे मोडत नाहीत. विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांचं एखादं पुस्तक वाचून होतं तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढलेला असतो. आणि सध्यातरी हे असं प्रत्येक वेळी होतंय.
बहरहाल, त्यांचा 'नासमाया' हा एक नवीन कथासंग्रह आलाय. सांगली आणि आजूबाजूच्या परिसरातला हा सगळा ऐवज. तिथल्या भाषेचं सगळं सौष्ठव आहे ह्यात. सगळ्या दीर्घकथा आहेत. एकेक कथा पन्नासेक पानांची मजबूत गोळीबंद..! 'सिप्रिया' ही कथा त्यातल्या त्यात फारच..!
म्हणजे वाचताना मेंदूचा हलके हलके विस्तार होत जातो, आणि शेवटी तो कवटीत गच्च बसल्याचं फीलिंग येतं, तसं ते आलं. (नासमाया म्हणजे लांबलेलं मरण, बाई द वे)
शिवाय प्रशान्त बागडांचं 'सात गोष्टींचं पुस्तक' आहे.
बागड जादूगार आहेत. शब्दांना जाणीवेचा स्पर्श करतात. आणि 'अशा' शब्दांचा अक्षरशः पाऊस पाडतात..! तोही हलका हलका भुरूभुरू मंद मंद रिमझिम रिमझिम..! पडत्या पावसात किंवा पावसाआधी, सगळं दाट काळं झाल्यावर वाचायला, हे बरंच बरं आहे.
खरं आयुष्य समजा पोकळ, कोतं, एकारलेलं होतं. म्हणजे एकंदरीत सगळा उन्हाळा असतो आणि हा उन्हाळा समजा बऱ्याच वर्षांपासूनचा असतो. तर मग जाणीवा, संवेदना, भावना, जिव्हाळा यांचा दुष्काळ मिटवण्यासाठी वाचन केलं जात असतं काय..? म्हणजे वाचताना तेवढंच जरा शिरवाळ पडल्यासारखं वाटत असतं काय ?
हे जरा जास्तच पुस्तकी झालं, हे मान्ये. पण आता काही होऊ शकत नाही. I am too old to change now.
(ओकैय.. साऊंड्स कूल.. बट व्हॉट्स दिस सिवराल् ?
इट्स शिरवाळ..! वैराण दुपारी सूर्य थोडावेळ ढगांआड जाण्याची घटना.)
नेहमी प्रमाणे छान!
नेहमी प्रमाणे छान!
आपण पण वाचतो बरका. पण आज जाणीव झाली कि प्रत्येकाचंं विश्व निराळे असते.
तुम्ही उल्लेखिलेल्या पैकी एकाचेही नाव ऐकले नाही. हे मोठ्या गर्वाने नाही लीहितोय. As a matter of fact आहे म्हणून. मी जुन्या लेखकांच्याच प्रेमात अडकलो आहे आणि अजून कित्येक क्लासिक्स वाचायची पडली आहेत. त्यातून सुटेन तर न.
माझ्या विश्वाची थोडी झलक देतो.
मॉबी डिक प्लेग आउटसायडर शर्ली जाक्सन स्लाटरहाउस 5 फेअरवेल टुु आर्म्स अशी बरीच आहेत. हो आणि बाबुराव अर्नाळकर, भाऊ पाध्ये वासूनाका. माहीमची खाडी हे पण वाचतो. हे लिहायचं राहून गेलंं म्हणून.
चला उशीर झाला. वटवट बंद करतो.
आवडला लेख. केशवकुल म्हणतात ,
आवडला लेख. केशवकुल म्हणतात , तसं यातली अनेक नावं माहीत नाहीत.
<ह्या भाषेत अजूनही नवीन लेखक/लेखिका कसे काय निपजतायत ?
म्हणजे कुठून येतात हे लोक ?? आणि फारच चिवट दिसतात. मराठी डाऊनमार्केट भाषाय, अशी चहुबाजूंनी एवढी हाकाटी उठलीय, तरी हे त्यातच लिहितात. सिनीकल होणार हे ऐन जवानीत..! दुसरं काय..>
भारत आणि महाराष्ट्रात अजूनही शिकणार्यांच्या पहिल्या पिढ्या आहेत. त्यांन बौद्धिक सांस्कृतिक परंपरा असलं काही वागवायचं नसतं. त्यामुळे खर्रखुर्र वाचतात.
मराठीत आता बोलीभाषेत लिहिलेली पुस्तक ठळकपणे दिसू लागलीत. याचं हेही कारण असावं. अक्षरं नव्याने गवसलेले लोक स्वतःची जागा निर्माण करतात.
यादीतील काही२-३ लेखक वाचले
यादीतील काही२-३ लेखक वाचले आहेत.
तरी वाचलेल्या पुस्तकांची ओळख टाकत चला इकडे कुठेतरी. निवडायला सोपं जातं. म्हणजे की कोणत्या प्रकारातली वगैरे.
*रामायण/महाभारत यांतील पात्रं आणि नवा प्रकाश - या प्रकारातलं कोणत्याही नावाजलेल्या लेखकांचं वाचत नाही.
*ऐतिहासिक कादंबऱ्या - ऐतिहासिक प्रसंगांवर ललित. नको
* साय फाय - नावाजलेल्या वैज्ञानिकांनाही हे जमलेले नाही.
*सामाजिक कादंबऱ्या - कंटाळा आला. भैरप्पा त्यातले एक. त्यापेक्षा लघुकथा ठीक.
आवडतो घेतो.
बाकी लेख आवडला. खरी पुस्तकं पार्कात सकाळी बेंचावर वाचता म्हणजे ग्रेटच. अप्सरा चित्त ढळू देत नाहीत हे वाचून बरं वाटलं.
सामाजिक कादंबर्या - मला चटकन
सामाजिक कादंबर्या - मला चटकन आठवलेलं नाव - रमेश इंगळे उत्रादकर. माझ्या वरच्या प्रतिसा दातलं प्रमाण भाषे पलीकडे जाणारं आणि मुंबई पुण्याबाहेरचं जग दाखवणारं लेखन.
छान.
छान.
ऐनापुरेंच्या कथासंग्रहाचं नाव नोट करून ठेवलंय. (त्यांचं एकच पुस्तक वाचलंय - रिबोट. बहुधा त्यांचं पहिलं पुस्तक होतं ते. फार आवडलं होतं.)
निखिलेश चित्रेंचं एक नवं पुस्तक आलंय - गॉगल लावलेला घोडा. ते सुद्धा वाचायचं आहे.
@ केशवकूल
@ केशवकूल
प्लेग आउटसायडर आणि तत्सम आहेत, तिजोरीत मंत्र टाकून कडेकोट बंद करून ठेवलीयत..!
काफ्का काम्यू सार्त्र कोसलर ही पिशाच्चं आहेत. माणूस वाचायला लागला की कधी ना कधी ही नावं त्याच्या कानावर येतात. खुणावतात. मग कधीतरी आपण सहज रमतगमत पानं उलटत असताना, हे तिथंच पानांच्या आत आडरानात कुठंतरी दबा धरून बसलेले असतात. माणूस पट्ट्यात आला की अचानक प्रकट होऊन मस्त झपाटतात. म्हणजे आधी एकटाच कुणीतरी येतो, बोकांडी बसतो आणि त्याच्या मागोमाग उरलेले तिघं जण येऊन पार काम तमाम करून टाकतात. म्हणजे माझा तसा अनुभव आहे. ह्या चौघांच्या नावानं चार दिशांना चार कोंबडे उतरवून टाकावे लागतील, असा सल्ला पूर्वी एका सिद्धहस्त देवऋष्यानं दिला होता. पण नंतर तो पण ''कशात काय अर्थ नाय. सगळं बोगस हाय'' असली भाषा वापरायला लागला. बघूया. प्रयत्न करत रहायचं. काय तरी उतारा सापडेलच.
बाकी, भाऊ पाध्येंचा न् माझा सांधा काय जुळला नाय. दोन तीनदा अगदी प्रामाणिक प्रयत्न करून बघितला.. वासूनाका, अनिरूद्ध धोपेश्वरकर वगैरे.. पण ते काय माझ्या टाईपमधलं वाटलं नाय.. त्यामुळे ते राहिलंच..
भरत, srd
सामाजिक कादंबऱ्यांमध्ये राकेश वानखेडेंच्या 'एक दोन चार अ' आणि 'पुरोगामी' ह्या दोन कादंबऱ्या जोरदार आहेत.
<< अक्षरं नव्याने गवसलेले लोक स्वतःची जागा निर्माण करतात.>> हे पटलं. +१
ललिता प्रीति,
'निकटवर्तीय सूत्र' पण बघा ऐनापुरेंचं. बेस्ट.
आणि 'गॉगल लावलेला घोडा' तुफान आहे..! अगदी तातडीने वाचा.
खूप पुस्तक वाचण्यासारखी आहेत.
खूप पुस्तक वाचण्यासारखी आहेत. हे पहा.
Roadside Picnic
Novel by Arkady Strugatsky and Boris Strugatsky
निदान विकी वाचा
https://en.wikipedia.org/wiki/Roadside_Picnic
सुरेख लिहिलं आहे. तुम्ही जे
शब्दांना जाणीवेचा स्पर्श करतात. आणि ...... बरं आहे.
>>>>हे फारच आवडलय.
सुरेख लिहिलं आहे. मी तुमच्याएवढं वाचलेलं नाही. तुम्ही जे पुस्तकात शोधताय ते तुम्हाला एकेदिवशी 'आत' सापडेल. मग पुस्तकांत एवढा रस राहणार नाही कदाचित. एन्ड ऑफ नासमाया..?! तोपर्यंत हेही बरंच बरं आहे.
लेखन आवडले हेवेसांनल. (मी चुकून 'वाचनवेणा' वाचलं होतं आणि तेही चाललं असतं वाटलं.)
--------
भरत, पोस्ट आवडली. सहमत.
अस्मिता,
अस्मिता,
प्रतिसाद आवडला. धन्यवाद
विशेषत: "तुम्ही जे पुस्तकात शोधताय ते तुम्हाला एकेदिवशी 'आत' सापडेल... एन्ड ऑफ नासमाया..?!" ही तर सरळसरळ महाओळ आहे म्हणजे..! _/\_
केशवकूल,
तुम्ही सुचवलेली पुस्तकं पाहिली. यादीत टाकून ठेवतोय. धन्यवाद.