काय करावे.

Submitted by केशवकूल on 16 January, 2023 - 09:41

आज मी कामानिमित्त बॅंकेत गेलो होतो. काम संपवून बाहेर आलो तेव्हा रस्त्रात एका बाईने मला आडवले. म्हणाली, “अहो, मला जरा नाश्त्यासाठी पैसे द्याल का? सकाळ पासून चहा सुद्धा प्यालेली नाही हो. तेव्हा प्लीज.”
बघितले तर बाई गरीब अजिबात वाटत नव्हती. बऱ्यापैकी साडी नेसली होती. विशेष म्हणजे डोळ्यावर काळा चष्मा होता!. वय असेल चाळीस पंचेचाळीस. एकदा वाटलं करावी मदत. हिला हॉटेल मध्ये नेऊन सरळ जेवण खायला घातले तर?
मी सावध झालो आणि तिला टाळून झपाझप पुढे निघून गेलो. नंतर मात्र मन खात राहिले. बिच्चारी खरच उपाशी असेल का? पैशाचा प्रश्न नव्हता. अनेक कल्पना मनात आल्या. हिने आपल्याला फसवून कात्रीत पकडून लुबाडले तर? ही नंतर जाऊन आपल्या गंगला जाऊन सांगेन, “क्या बकरा मिला आज. मला राईस प्लेट खायला घालत होता...”
आणि हा पण एक किस्सा.
रस्त्यात एक गावाकडचा एक माणूस भेटतो. रस्त्याच्या कडेला एक बाई आणि दोन मुल उकिडवी बसून मुरमुरे खात बसलेले असतात. तो बाप्या जवळ येऊन आपली सॉब स्टोरी सांगतो.
“साहेब अडचणीत आहे. गावी जायचे आहे. पण खिशात एस टी च्या भाड्याला दमडी पण नाही. कोर्टाच्या कामासाठी पुण्याला आलो होतो. तिथेच कोणीतरी पाकीट मारले. काय करू. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. लाज वाटतेय...”
एकदा मी मदत केली होती. पण काही दिवसांनी असाच एक गाववाला भेटला. जवळ जवळ सेम स्टोरी.
माझ्या मायबोलीकर मित्रानो अशा वेळी काय करावे काही समजत नाही. एका बाजूला मदत करायची इच्छा असते. तर दुसऱ्या बाजूला आपण चेहऱ्यावरून एव्हढे बावळट दिसतो का की सगळ्यांना सोडून हे भामटे आपल्यालाच पकडतात.
तर अश्या प्रसंगाला कस सामोर जायचं? ह्या बद्दल आपले विचार वाचायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैसे नाही देत गावी जायला पैसै मागितले तर बोलते चल तिकीट काढून देते, आणि खायला पैसे मागितले तर बिस्कीट पुडा देते घेऊन नाहीतर गाडीत असतोच.

पन्नास-शंभर रूपये देऊन विसरून जाणे. अर्थात हे कधीतरीच. (एकदा आम्ही पाचशे की हजार रुपये असे अक्कलखाती घालवलेले आहेत. बंगलोर ते वर्धा की यवतमाळ ट्रेनचं चौघांचं तिकीट)

मी पैसे देऊन मोकळा होतो. मागच्याच आठवड्यात दोनशे दिले. त्या मुलाने माझा नंबर घेतला. मला आपला दिला. दुसऱ्या दिवशी मी त्याला हाय केले. त्याने मला ब्लॉक केले. मी हा किस्सा विसरूनही गेलो. आता तुमचा धागा आला म्हणून आठवले. पैसे काय येत जात राहतात.डोक्यला कसली भुनभुन नको.

एक मायबोली आयडी या किस्स्याची साक्षीदार आहे. कारण जेव्हा त्या मुलाने माझ्याकडे मदत मागितली तेव्हा मी तिच्याशी कॉलवर बोलत होतो. तिनेच मला आणखी उकसावले. देऊन टाक. नाहीतर उगाच ते डोक्यात राहते.. मलाही तेच सोयीचे वाटते म्हणून मी फारसा विचार न करता फसलो Happy

खर तर मी तिकीट काढते बोलल्यावर नकोच बॉले ते..अजून काढ म्हणणारा भटलाच नाही. पण भेटला तर आता मी नाही म्हणून सांगणार. पैसे नाही बोलणार किंवा आजकाल मी कोणी पैसे मागितले तर ईच्छा नाही द्यायची असे पण सांगते, काय आहे आपले आपले म्हणवणारे पण आपल्याला फसवतात मग आपण उगाचच का टेन्शन घ्याच...चील मारायचं नाय म्हणायचं सरळ ...

आमच्या खारघरला या, त्यांच्या अनेक जागा दाखवतो, किंवा आधी मी गोवंडीला राहत असतांना आमच्या इंस्टिट्यूटहून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेशनला जातांना वाटेत एका किंचित अंधारलेल्या जागी अडवायचे.

आपल्या स्वभावानुसार वागावे.
पैसे गेल्याचे वा आपण फसवले गेल्याचे दुख जास्त त्रास देणार,
की समोरची व्यक्ती खरेच गरजू असू शकते आणि आपण शक्य असूनही मदत केली नाही हा विचार त्रास देणार,
हे ज्याचे त्याने ठरवावे.
बरेचदा आई बाप लहान पोरं अशी कुटुंबेही असतात. कुठून आले असतात माहीत नाही. पण तशीच गरज असावी त्याशिवाय असे वागणार नाहीत हे ही जाणवते. नकार देणे अवघड जाते मला तरी..

ऋन्मेऽऽष सर
आपण म्हणता ते खर आहे. कधी कधी मनात विचार येतो कि आपली नोकरी गेली, हप्ते भरले नाहीत म्हणून जागा गेली, गाडी टो करून घेऊन गेले . नातेवाईकांनी ,मित्रांनी हात वर केले तर गारेजमध्ये पाणी मारायचे काम नाहीतर सोसायटीच्या गेट वर वाचमन चे काम करताना लोक आपल्याशी असेच वागतील का?
पण तशीच गरज असावी त्याशिवाय असे वागणार नाहीत हे ही जाणवते. नकार देणे अवघड जाते मला तरी..>>> अगदी हाच विचार झोप उडवतो.
ऑस्करस्क़ = अक्टिगच्या ऑस्करसाठी पात्र

खरंच यांना गरज नसेल तर तुम्हाला बोलण्यात अडकवून फसवू शकतात. हल्ली भीक मागण्यापुरते फाटके कपडे घालणे, केस वेडेवाकडे करणे, हात पाय मुडपून अपंग होणे. काहीही होतं. कित्येकदा असे भिकारी मरतात आणि बरोबरच्या गाठोड्यात, झोपडीत घबाड सापडतं.
नवी मुंबई/खारघर येथे अशी एक वस्तीच होती. बायका रेल्वेत भिक मागत.
अशात आपल्याला वाटतं खरंच गरजू असेल तर? वाईट वेळ कोणावरही येऊ शकते.

या प्रकाराची कशी हाताळणी करावी? खरंच खूप कठीण आहे.

बिस्कीट वगैरे देणे किंवा रस्त्यावरच्या एखाद्या स्टाॅलवर खाऊ घालणे त्यातल्या त्यात सुरक्षित वाटते...पण पुन्हा प्रश्न येतोच म्हातारी मेली तरी दुःख नाही पण काळ सोकावू नये. मला वाटतं परिस्थितीनुसार वागावं. डोक्याला ताप नको.

त्या त्या क्षणी तुमचं इन्ट्यूशन काय सांगते ते करा. दरवेळी देणे शक्य नसतं. एकदा पैसे दिल्यावर मी माझं कर्तव्य केलं म्हणून सोडून द्या. जास्त विचार करू नका. कधीकधी फसवणूक होते पण स्वतःला दोष देऊन उपयोग नाही. त्या मागच्या भावना महत्त्वाच्या. नंतर जरतर खेळून स्वतः ला त्रास करून घेऊ नये. मी गेलेयं अशा अनुभवातून, त्यामुळे समजू शकते. (माझा भाऊ प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला देत रहातो, त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पाही मारतो , त्यामुळे आमचे वाद झाले आहेत. ) गिल्ट फ्री रहा. त्यांचं नशीब/कर्म त्यांच्याबरोबर. आपल्या जबाबदाऱ्या व सद्भावना आपल्या बरोबर.

असाच किस्सा माझ्याबाबत घडला.
काही दिवसांपूर्वी एकटीच बाहेर जाताना घराजवळच्या रस्त्यावर एका बाईने अडवले, बहिणीच्या का मुलीच्या डिलिव्हरीसाठी गावाहून आले पैसे नाहीत, पोटात काही अन्न नाही,पैसे द्या इ. इ. वाईट वाटले पण आजकाल कॅश ठेवत नसल्याने काही ऑप्शन नव्हता. बाई दिसायला गावाकडची, नऊवारी नेसलेली पण भिकारी नक्कीच वाटत नव्हती. थोड्यावेळाने रात्री उशिरा परत जातांना ती तिथेच होती जाणाऱ्या येणाऱ्यांना पैसे मागत. मग घरी जाऊन जेवणासाठी केलेले मेथी पराठे, बरोबर लोणचं असा तिला नेऊन दिलं तर म्हणे पैसे द्या. तिला सांगितलं की पैसे नाहीत, हे खाउन घ्या. मग घेतला डबा.
परत कधी दिसली नाही ती तिथे.

आपले अनुभव शेअर केल्याबद्दल आभार.
एकूण हा सगळा कॉन/स्कॅॅम प्रकार दिसतो आहे. जमेल तशी मदत करून सुटका करून घ्यावी हे श्रेयस्कर. नाहीतरी भाजीवाले, किराणावाले, भोंदू डॉक्टर (सगळ्या पॅॅथी चे) फार्मा कंपन्या आणि हो पुणेरी रिक्षावाले आपल्याला पदोपदी फसवत असतातच, मग एक डाव ह्यांचा पण.

ऑफिसमधून घरी जात होते . कोथरूडला दुर्गा कॅफेजवळ एक शाळकरी मुलगा भेटला . एकदम गोंधळलेला केविलवाणा , कुठेतरी संस्थेत राहात होता , पुण्यात परीक्षेसाठी आलेला , सगळं हरवलं वगैरे वगैरे . मी बावळट्ट , मला प्रचंड दया आली . पर्समध्ये पाहिलं , १००० ची नोट , बाकी काहीच नाही . दिले त्याला . नंतर ऑफिसमध्ये असंच बोलताना सांगितलं तर वेड्यात काढलं लोकांनी . नंतर कानाला खडा . अजूनही वाटते कदाचित खरंच गरजू असेल . आता मदत करायची असल्यास वस्तू स्वरूपात करते , पैसे नाही .

एकदा मात्र मला भेटलेलं कुटुंब खरोखरच भुकेलेलं होतं Sad इथे आमच्या घराजवळच्या एका दर्शिनीबाहेर भेटला तो माणूस. (दर्शिनी हा उपाहारगृहाचा स्वस्त पण चांगला असा खास बंगलोरचा प्रकार आहे.) त्याने असेच माझ्याकडे खाण्यासाठी पैसे मागितले. मी दिले, त्याला खरोखरच आनंद झाला. मी तिथून निघाले पण मग वळून बघितलं तर त्याने लगेच थोड्या अंतरावर असलेल्या बायकोला बोलावलं होतं, तिच्याबरोबर लहान मूलही होतं. ते तिघेही त्या दर्शिनीमधे शिरले. बायकोला बहुतेक हे आवडलं नसावं, कारण त्याने तिला जरा convince करून आत नेलं. दिसायला गरीब होते पण भिकारी नक्कीच नव्हते. त्यावेळी मात्र मला पैसे दिल्याचं बरं वाटलं होतं.

ते पैसे मागतात कारण त्यांना दारू घ्यायची असते... त्यामुळे असा कोणी असेल तर त्याला देशी दारू दुकानात घेऊन जा... एक पव्वा घेऊन द्या.... गिल्ट राहणार नाही...

च्रप्स
नाही. मी ह्याच्याशी सहमत नाही.
एक तर तो नाटक करत नाहीये. दारू पिणे हा जीवन मरणाचा प्रश्न होऊ शकतो. तो भीक मागण्याचा धंदा करत नाही. पॅंडेमिकमध्ये दारुड्यांचे जे हाल झाले. सरकारला पण पॉलिसी बदलावी लागली. त्यांना पव्व्याची गरज आहे तशीच उपचार आणि कौंसेलिंग ची गरजा आहे.
त्यांचा मजाक उडवू नका.

बहुतांशी स्कॅम असतात. लोणावळ्या ला चिक्कीच्या दुकानांसमोर १ गावकरी दिसणारे जोडपे (मुल पण होते) बस साठी पैसे मागत होते. पैसे दिल्या वर त्याच रस्त्या वरून हॉटेल ला परती ला निघताना पुन्हा ते लोक दिसले. भिक च मागण्या चा हा अजब प्रकार आहे.

आमच्या तल्या एकाने हटकले तर तोंड लपऊन दूर गेला फक्त.

मी जीपे करून देऊन मोकळा होतो. मागच्याच आठवड्यात दोन कोटी दिले. त्या मुलीने माझा नंबर घेतला. मला आपला दिला. दुसऱ्या दिवशी मी तिला हाय केले. तिने मला ब्लॉक केले. मी हा किस्सा विसरूनही गेलो. आता तुमचा धागा आला म्हणून आठवले. पैसे काय येत जात राहतात.डोक्यला कसली भुनभुन नको.याआधी पण कुणाला पाच कोटी दे, कुणाला शंभर कोटी दे असे उद्योग केलेले आहेत. त्यामुळे दोन कोटी किरकोळ होते

एक बॉलीवुड क्वीन या किस्स्याची साक्षीदार आहे. कारण जेव्हा त्या मुलीने माझ्याकडे मदत मागितली तेव्हा मी तिच्यासोबत होतो. तिनेच मला आणखी उकसावले. देऊन टाक. नाहीतर उगाच ते डोक्यात राहते.. मलाही तेच सोयीचे वाटते म्हणून मी फारसा विचार न करता फसलो.
.

हे असे लोक तुमच्यावर काहीतरी फेकून हातातले बॅग पर्स फोन चोरणे/ शारीरिक अपाय करणे/ भूल टाकून बरोबरचे मूल पळवणे हे ही करू शकतात. महा नगरात व हायवे वर एकच रूल डोंट एंगेज.

अमा, तसे करणारे लोकं शक्यतो भीक नाही मागत तर पत्ता विचारतात. वा तुमच्या फायद्याच्या गप्पा मारतात जेणेकरून तुम्ही एंगेज व्हावे. भीक मागायला आले तर लोकं टाळण्याच्या हिशोबात असतात जे त्यांना नको असते.

हायवेवर मात्र मदत करताना विचार जरूर करावा. तिथे चालती गाडी थांबवणे आणि सावज गाडीतून बाहेर काढणे हा हेतू असतो.

नव्या मुंबईत अशी खुप कुटूंबे भेटलेली आहेत. मला पहिल्यांदा दया यायची, पाच दहा रुपाये द्यायचे. पण प्रत्यएकाला देण्याइतपत माझ्याकडे नाही त्यामुळे मी सिलेक्टिव देत होते. जेवायला पैसे द्या म्हटल्यावर सरळ एक मोठा ब्रिटानिया ब्रेड आणि लसुन चटणी विकत घेऊन दिलेली आहे. तितके मी करु शकते. ते केल्यावर मी ते विसरुनही गेलेली आहे.

इथे जागोजागी फसवणारे बसलेले आहेत. पण त्या ९९ फसवणार्यांमुळे एखादा खरेच मदत हवी असलेला माणुस आपल्याकडून वंचित राहु नये म्हणुन मी मला जमेल तितकी मदत करत राहते. मी फसवली जात असणार पण मदत किती करायची व कशी करायची याची मर्यादा मी घालुन घेतलेली आहे, तितकीच फसवणुक होणार. त्यामुळे मदत केल्यावर 'मदत केली की फसवणुक करुन घेतली' हा विचार करत नाही. सुदैवाने तितके मला परवडते.

न्यु जर्सीत एक माणूस कॉफी कॉफी करत ग्लास फिरवत होता. मी ऑल द वे जाउन त्याला कॉफी दिली तर म्हणे साखर घातलीये का? हो म्हटलं तर म्हणे आर यु श्योर?
एकंदर त्याला पैसेच हवे होते.
----------------------
एकाला केळे दिले तर म्हणे केळे खात नाही.
हा होमलेस माणूस, स्टारबक्स बाहेर बसतो. परवा पहाटे ६ च्या आधी स्टारबक्स मध्ये गेलेले तर हा कॉफी पित, स्वतःचा मोबाईल ब्राउझ करत बसलेला.

माझा भाऊ प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला देत रहातो, त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पाही मारतो>>>>>

सेम असेच मीही केलेले आहे, मी कोणाशीही गप्पा मारु शकते. माझ्या मुलीने मला यावरुन अनंत शिव्या घातलेल्या आहेत, मला कोणिही फसवु शकते हे तिचे मत आहे. मी असे रस्त्यावर अनोळखी लोकांशी गप्पा मारत असताना तिने हात धरुन मला फरफटत ओढुन नेलेले आहे Happy Happy

वावे साधना
आप लोग बहुत दरिया दिल है.
आपुनका दिल इतनाभी बडा नही है.
बऱ्याच वेळा माझ्याकडे चिकटवलेल्या नोटा येतात. मी जणू अशा नोटांचा लोहचुंबक आहे. प्रचंड मनस्ताप होतो. प्रश्न १०/५०/१०० रुपयांचा नसतो.
म्हणून मी हल्ली रिक्षाने प्रवास करत नाही. सरळ उबेरची रिक्षा ती देखील प्रीपेड करून बोलावतो. कारण तिथेही कॅॅश घेताना रिक्षावाले अडवतात.

बऱ्याच वर्षांपूर्वी ब्रिजवर सकाळी असेच 1 जोडपे + मुलगा दिसले होते.म्हणाले,गावावरून पाहुण्यांकडे(नातेवाईकांकडे) आली तर घराला कुलूप होते.गावी जायला पैसे नाही.मुलाला वडापाव द्या.घाईत असल्याने दुर्लक्ष केले.संध्याकाळी परत तेच जोडपे! माझ्या पुढच्या माणसाने पैसे दिले.म्हणाला माहीत आहे मला की ते काही खरे नाही.पण भुकेजले असतील म्हणून पैसे दिले.

गावाला जायचं आहे सांगुन ST बस साठी पैसे मागणारे टोपीवाले भेटतात, तसे परत भारतात जायचं आहे सांगुन परतीचे पैसे मागणारे well dressed अंकल ही असतात यावर विश्वास बसेल का?
नेपाळ मध्ये नेपाळी लोकांना जुगार खेळायला बंदी आहे, पण बरेच भारतीय केवळ जुगार (कॅसिनो) मधे नशीब अजमावायला नेपाळला जातात. माझं माहेर काठमांडू ( तेव्हा होतं Sad ) , त्यामुळे काठमांडू एअरपोर्ट वर दुःखद कहाण्या सांगुन भारतीयांना पैसे मागणारे भारतीय आम्हाला सर्रास भेटायचे. कॅसिनो मधे नुसते पैसे नाहीत, तर ज्वेलरी, अगदी बरोबर आणलेल्या वस्तू देखील गमावलेले देशी बंधू (आणि भगिनी देखील) काही तरी सबबी सांगुन पैसे गोळा करायचा प्रयत्न करायचे.

मला फक्त वाईट या गोष्टीचे वाटते कि ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांना अशामुळॆ मदत मिळत नाही .

Pages