मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:27

मराठी भाषेत उत्तमोत्तम कवी, गायक ह्यांना तोटा नाही. आपले थोडेसे अधिकच लाड ह्या बाबतीत झाले आहेत की काय, असंही कधीकधी वाटतं. लता मंगेशकर, भीमसेन जोशी ही नावंच घ्या ना! ह्यातले अनेक लोक आता आपल्यात नाहीत. परंतु 'केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले!' असं गोविंदाग्रजांनी म्हटलं, तसंच ह्या सार्‍यांचंही आहे. ह्यातल्या अनेकांची वयंही झाल्याचं आपल्याला कळत नाही, इतकं त्यांच्या शब्दांत आणि गाण्यांत चैतन्य आहे. सरस्वतीची ही मुलं खर्‍या अर्थाने चिरंजीव झाली आहेत म्हणा ना! असं असलं, तरी रूढार्थाने आपण त्यांची जयंती साजरी करू शकतो, आणि त्यांच्या कलेचा आनंद नव्याने लुटू शकतो, हे तर आहेच. अशीच एक संधी आपल्याला ह्या वर्षी मिळाली आहे. आजपासून १०० वर्षांपूर्वी १९२२मध्ये अनेक तेजस्वी तारे क्षितिजावर उगवले. पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके, वसंत बापट ही त्यातली प्रमुख नावं.

IMG-20220219-WA0015.jpg

'गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी,
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी'

अश्या शब्दांत केशवसुतांच्या नव्या मनूची गुढी उंचावणारे वसंत बापट आजही आपल्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात.

'बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत
तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा
शोध लागत आहे मला
माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला!'

म्हणत चकित होणार्‍या शांताबाई आता कोव्हिडपर्वादरम्यान किती जवळच्या वाटतात!

'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची'

मधला भीमसेन जोशींचा घनगंभीर स्वर थेट विठ्ठलाच्या गाभार्‍यातून मराठी मनाला साद घालतो. ह्या सार्‍यांनी मराठीजनांना किती काय काय दिलं आहे! प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी भीमाण्णांच्या स्वरांशी किंवा शांताबाई-वसंत ह्यांच्या शब्दांशी निगडित असतील. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण त्या इथे लिहूया. ह्यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीची गाणी, कविता ह्यांचा तुमच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव, तुमचे त्याविषयीचे विचार, काही सदाबहार आठवणी ह्यांवर लेख लिहून त्यांना मानवंदना देऊया. तुम्ही लिहिलेलं वाचायला आम्हाला आणि तुमच्या 'समानशील' असलेल्यांना फार आवडेल. त्यामुळे लवकर लेखणी उचला आणि 'शांतविले मी तप्त जीवाला इथे कितीदा तरी, कितिदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी' असं शांताबाई म्हणतात त्या 'माधुरी'विषयी आम्हाला सांगा!

उपक्रमाचे नियम -
०. हे वर्ष (२०२२) पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके, वसंत बापट - ह्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यापैकी कुणाही एकावर लेख लिहिणे हा यंदाचा विषय आहे.
१. प्रवेशिकेतील लेखन कोठेही पूर्वप्रकाशित नसावे.
२. लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३. प्रवेशिका २५/०२/२०२२ पासून पाठवू शकता.
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
५. लेखन पाठविण्याची शेवटची तारीख ०१/०३/२०२२.
६. प्रत्येक प्रवेशिकेला "मराठी भाषा दिवस २०२२" अशी शब्दखूण द्यावी.
७. प्रवेशिका 'मराठी भाषा दिवस २०२२' ह्या ग्रुपमध्ये काढावी. मात्र, ती ग्रुपपुरती मर्यादित न ठेवता सर्वांना दिसेल, अशी ठेवावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक विनंती.
उपक्रमाचे नियम ह्यामध्ये पहिल्या बुलेटवर नक्की काय लिहायचं आहे ते लिहाल का ? पहिल्या पॅरामध्ये अनेक नावं आली आहेत पण त्यापैकी फक्त पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके, वसंत बापट ह्यांच्याबद्दलच लिहायचं आहे ना? तर ते पहिल्या बुलेटमध्ये किंवा आहे त्या मजकूरात बोल्डमध्ये लिहाल का?

सामो, माझं आकलन बरोबर आहे ते माहीत आहे Wink
फक्त सगळ्या बीजभाषणात नक्की करायचं काय ते हरवून जात आहे. विशेषतः मोबाईलवर बघताना खूप स्क्रॉल करावं लागतय.
असो.

>>>
उपक्रमाचे नियम -
०. हे वर्ष (२०२२) पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके, वसंत बापट - ह्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यापैकी कुणाही एकावर लेख लिहिणे हा यंदाचा विषय आहे.
<<< असं स्पष्ट केलेलं दिसतंय आता.

इतर लेख नवीन लेखनात खाली गेले असतील.
( डेस्कटॉपवरून) याच पानावर वर उजवीकडे मराठी भाषा दिवस २०२२ हे ग्रुपचं नाव दिसतंय, त्यावर क्लिक केले की सगळे लेख , उपक्रम, खेळ दिसतात.
फोन - क्रोममधून प्रतिसाद खिडकीखाली दिसणार्‍या मराठी भाषा दिवस २०२२ वर क्लिक करावं लागेल.

भरत +१
प्रज्ञा, लेखाखाली Groups audience: मराठी भाषा दिवस २०२२ असं दिसेल. त्यातल्या 'मराठी भाषा दिवस २०२२' वर टिचकी मारा आणि मग त्यात सर्व लेख दिसतील.

काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.

<हे वर्ष (२०२२) पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके, वसंत बापट - ह्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यापैकी कुणाही एकावर लेख लिहिणे हा यंदाचा विषय आहे.>
एकापेक्षा जास्त लिहिलं तर चालेल का? मला वसंट बापटांबद्दल लिहायचं आहे.