एखाद्या वेळी आपल्या मोबाईलचा रिचार्ज संपतो. आणि अचानकपणे काही निरीक्षणे तुमच्या डोळ्यासमोर येतात. त्यावरूनच काही ओळी लिहायचा प्रयत्न केला आहे:
अचानक रात्री संपतो Recharge, Messages यायचे होतात बंद.
अशावेळी काही सुचत नाही, सगळंच कसं व्हायला होतं मंद.
सरता सरत नाही बघा,ती घड्याळातली वेळ.
कशाचाच राहत नाही, तेव्हा कशालाच मेळ.
माहितीचं आंतरजाल अचानक, बघा थांबल्यासारखं होतं.
जगातच असून बघा अचानक , मग हरवल्यासारखं होतं.
Uploading Downloading बघा सारं कसं ठप्प होऊन जातं.
मनही मनाच्या आत बघा कसं गप्प होऊन जातं.
असल्या आभासी जगाच्या आभासीच साऱ्या वाटा,
किनाराही आभासी येथे आभासीच साऱ्या लाटा.
पूर्वी कशा कधीही-कुठेही मनसोक्त गप्पा व्हायच्या,
आतमध्ये आपल्याही नकळत मनाचा कप्पा व्हायच्या.
सहसा हे चित्र आता फार पाहायला मिळत नाही.
शेजाऱ्याची खबरबात आता पहिल्यासारखी कळत नाही.
त्याच्यासाठी आपण आहोत,की ते आहे आपल्यासाठी.
असल्या आभासी जगात सांगा कोण आहे कोणासाठी.
अगदी सगळं असंच घडेल असं काही नाही.
अपवाद इथेही असूच शकतो,तसं काही नाही.