वयोवृद्ध

Submitted by omkar_keskar on 11 May, 2021 - 22:31

पहिल्यासारखं मन आता कशातच रमत नाही
मनात खूप इच्छा असते पण काही जमत नाही.

हातांना आता पूर्वीसारखा पेलत नाही भार,
पेला जरी हातात घेतला तरी थरथरतात फार.

पायऱ्या-जिने फारसे आता चढवत नाहीत भराभर
अहो करणार काय, गुढग्यांनी कधीच केलेत हात वर.

हिरड्यांनी दातांना आता दिला नाही थारा,
त्या कवळीचाच असतो आता तोंडावर पहारा.

विस्मरण इतकं होतं की कधी कधी काही आठवत नाही,
ह्याच भीतीने आमची ही मला कुठे कुठे पाठवत नाही.

जप-तप अन राम-नाम हेच आता चालतं,
देहाचं पिकलं पान आता वाऱ्यानेही हालतं.

वार्धक्याच्या जाणीवेने आता दाटून येतो ऊर,
कुठूनतरी दुरून कानी पडतो भैरवीचा सूर.

कधीतरी वाटतं जगण्यातला आता संपला थरार,
वाटतं प्राक्तनाशी झालेला आता संपला करार.

Group content visibility: 
Use group defaults