शुष्क काष्ठे ने आण्या पत्र

Submitted by धनश्री- on 7 May, 2020 - 17:45

समीधाने, संध्याकाळचा वरण-भाताचा कुकर लावुन, देवापुढे उदबत्ती लावली. बाल्कनीतील जाईला पाणी घालून, साठीला आलेली, समीधा जरा खुर्चीवरती विसावली. घरात,शिजलेल्या भाताचा सुगंध, घमघमाट सुटला होता. आज मानसी तिच्या मुलीला घेउन म्हणजे समीधाच्या नातीला घेउन, भेटायला येणार होती. मानसी, समीधाला भेटायला वरचेवर येत असे. त्या दोघी यायच्या आत,तेवढी काही स्तोत्रे म्हणावीत म्हणुन, समीधा जरा विसावली होती. दत्तबावनी वाचता वाचता ती एका ओळीपाशी येउन थांबली, -
"शुष्क काष्ठने आण्या पत्र| थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||
स्वत:शीच हसता हसता, तिचे मन भूतकाळात गेले.

"माझ्या अपेक्षा जगाकडून शून्य आहेत पण तुझ्याकडून नक्कीच आहेत. लग्न का करतो माणूस, एक सहचर मिळावा, साथीदार मिळावा जो की इक्वल फुटिंगवर असेल. आपल्या सुखदु:खात सामील होइलच पण वेळ पडल्यास आपले दोषही दाखवेल." - सुमीत
"अरे पण माझा स्वभाव अतिशय संथ आहे, आय गो विथ द फ्लो. मला प्रवाहाविरुद्ध ऊर फुटेस्तोवर धावायला अज्जिबात आवडत नाही." - समीधा
.
हेच आणि हेच कारण ठरलं त्यांच्या विभक्त होण्याचं. लग्न झाले तेव्हाही समीधाला सोशल सायन्स मधली पदवी घेउन, लहान मुलांकरता काहीतरी करायचे होते. याउलट सुमीत ने इरेला पडून तिच्याकडून संगणकाचा डिप्लोमा करुन घेतला. ज्यायोगे परदेशी जाण्याचे मार्ग खुले होतील. समीधाला विरोध करता आला नाही. उर्जा घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. अगदी स्वत:च्या दूरगामी भल्याकरताही ती भांडण तंटा करणाऱ्यातली नव्हती. पण हळूहळू त्यांच्या विवाहाची कथा अरब-उंटाची कथा बनत गेली. प्रत्येक वेळी सुमीतने आधी मनधरणी मग कटकट व शेवटी धमकीवजा सूचना करायची मग ते व्यायाम असो, खाण्यापीण्यावरील बंधने असो, की अभ्यास असो, करीयर असो, मुलेबाळे असो. समीधाला मोकळेपणाने श्वास काही घेता येत नव्हता. व्यक्ती परफेक्शनिस्ट असली ना की जोडीदाराची जी परवड होते ती तिची झाली. तिचे लहान लहान आनंद हिरावले जात होते. मग ते साय-साखर खाणे असो ..... नको फार फॅटी,
की कलिंगड खाणे असो .......... फार साखर,
फिरायला जाउ या का ........... नको आधी १ तास व्यायाम कर,
जरा साखर झोप घेउ दे का .... नको सकाळी लवकर ऊठणे आरोग्याला उत्तम.
पुस्तके वाचू का ........ नको टेक्निकल , अभ्यासाची पुस्तके वाच, हवी तितकी विकत घेउन देतो तुला,
मूल हवे ............ नको सेटल होउ यात.
दुसरे मूल हवे ............. नको अजुन जबाबदारी नको.

प्रत्येक प्रत्येक प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी.
.
अरे आहे काय!! दुसऱ्यालाही मनासारखं ल्याव, खावं जगावंसं वाटतं, याचा या माणसाला गंधही नाही? जिकडेतिकडे याची ताबेदारी. स्वत: परफेक्शनिस्ट तर आहेच पण इतरांकडूनही त्याच अपेक्षा. भारंभार अपेक्षा. फक्त अपेक्षा. समीधा अपेक्षांच्या भाराखाली दबून गेली. ना तिच्यात बंड करण्याइतकी आक्रमकता होती ना हा अन्याय सहन होत होता. ती आजारी पडू लागली. वरचेवर तिचे व सुमीतचे खटके उडू लागले. जेव्हा कधी भांडण होइ, तेव्हा धुमसत असलेली , कोंडलेली वाफ इतक्या आवेगाने बाहेर पडात असे की आपण इतके कुरुप होउ शकतो याचे तिलाच आश्चर्य वाटे. तोंडावर तर हिंमतच नव्हती, मनात तरी नवऱ्याला शिव्या शाप कुठे देता येतात? शाप लागून त्याची फरफट झाली तर आपली तिप्पट फरफट होणार हे आपण जाणुन असतो. 'नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरील विंचू. ठेचता येत नाही की सहन होत नाही.' सारी उर्जा सामान्य आनंद मिळावण्यातच खर्ची होत होती. तिने पुढे जावे याकरता, सुमीत, जितका तिच्यामागे लागे, तितकी ती आडमुठेपणा करे. सगळं कसं कडू झालेलं होतं, रसहीन शुष्क .... चिपाड. विवाहाला खरच अर्थ राहीला नव्हता. समाजापुढे मिरवण्याचे एक नाते पण त्यात ना रसरशीतपणा, ना ओढ, ना आनंद. फक्त एकतर्फी अपेक्षा, व एकतर्फी विरोध. एका बाबतीत मात्र साम्य होतचं तो म्हणजे हट्ट. त्याचा तिला पुढे ढकलण्याचा, तिचा आहे तिथेच रहाण्याचा. दोघांचा हट्ट, आडमुठेपणा, मैत्रिणींना सांगीतलं तर त्या म्हणायच्या "अगं तो तुझ्या भल्याकरताच सांगतो ना?" मैत्रिणींनाही तिचे दु:ख कळू नये याचा तिला मनस्वी त्रास होइ.
.
सुमीत करीअरच्या क्षेत्रात मात्र वेगाने प्रगती करत होता. नवीन नवीन परीक्षा देत नवी पदे मिळवत, नोकरीची शिडी चढत होता. जेव्हा घरात सुख नसते तेव्हा संपूर्ण उर्जा बाहेर व्यतीत करावी लागल्याने, दिन दुगनी रात चौगुनी त्याची प्रगती भरधाव होत होती. मानसिकदृष्ट्या खचलेली, समीधा,कुठेतरी बौद्धिक दृष्ट्याही मागे मागे पडत जात होती आणि तिलाही हे कळत होते. पण वळत नव्हते. दोन दिशांना दोन प्रवासी चालत असतील तर अंतर वाढतच जाणार. आणि मग एक दिवस असाही उगवला, सकाळी सुमीतने , समीधावरती त्या बातमीचा बॉम्ब फोडला. "माझ्या ऑफिसातील एका स्त्रीवर माझे प्रेम आहे. मला घटस्फोट हवा आहे. आणि तसाही आपल्या संबंधांना औपचारीकतेपलीकडे काही अर्थ नाही हे तुलाही पटतय बरोबर?"
.
समीधा जरी संसाराची फरफट जाणुन होती, तरी, हे अनपेक्षितच होते. विशेषत: वयाच्या ५० व्या वर्षी. जरी दोघांचे आपापले, भक्कम ४०१ के होते, नोकरी होती, घर दोघांच्या नावावरती होते, एकच मुलगी, मानसी तीही आता कॉलेजमध्ये दूर हॉस्टेलवर रहात होती, पण तरी ही .... हा धक्काच होता. कारण हा सेट अप तिने स्वीकारला होता, आता या निष्प्राण विवाहाची तिला सवयच होउन गेलेली होती. जर सुटवंगच व्हायचे तर निदान तरुणपणी तरी व्हायचे. उलट आता जेव्हा म्हातारपण जवळ येणार, तेव्हा आधार लागेल, कोणाची तरी मदत लागेल.
.
'आलिया भोगासी असावे सादर.' मग मात्र तिने धीर केला, सुमीतच्या हट्टासाठी नाही तर आता स्वत:साठी सर्व सर्व करायची संधी होती. मग ते करीयरमध्ये आता होइल तितके, पुढे जाणे असो की स्वत:ची अवांतर वाचनाची, कवितांची एक लायब्ररी सेट करणे असो. ती स्वत:करता, स्वत:च्या टर्मसवरती जगणार होती.
"शुष्क काष्ठने आण्या पत्र|थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||

दत्तप्रभूंच्या कृपेने जर शुष्क काष्ठाला पालवी फुटाली, वांझ गाय दुभती झाली, साठीची नि:संतान स्त्री गर्भार झाली ...... तर , माझं ५० शी त, नवं आयुष्य का नाही सुरु होणार. का नाही माझ्या स्वप्नांना नवचैतन्य मिळणार? आणि अशा निर्धारानेच तिने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. एकटीची वाट! तिच्या टर्मसवरती. तिचे आयुष्य - तिचे नियम. तिच्या चूका, तिचे क्रेडीट. आता यात कोणीही भागीदार नको की कोणी ठेकेदार नको. उरलेलं आयुष्य फक्त मोकळा श्वास घेत काढायचे.
.
दाराची बेल वाजली आणि समीधा वयाला न शोभेलशा चपळपणे, नातीचे व मुलीचे स्वागत करायला उठली. दोघी आल्या की भूक भूक करतील हे तिला माहीत होते. बाल्कनीतल्या जाळीवरुन जाईचा सुगंध घेउन, मंद वारा घरात येत होता. जाईची वेल बहरली होती, फुलापानांनी लगडली होती. सारं घर त्या चैतन्याने, सुगंधाने न्हाउन निघलं होतं. उतारवयात का होइना, फासे अचूक पडले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, वेगळ्या मतांचा तुम्ही खुल्या दिलाने विचार करता याबद्दल अभिनंदन !
कथा लिहितानाच या सगळ्या पैलूंचा विचार करणं शक्य आहे का? अर्थात कथेचा जीव लहान असतो आणि त्यात एकाच पात्राचा विचार आणि प्रवास मांडला जातो. पण म्हणून इतर पात्रांवर अन्याय व्हावा असंही नाही.

अन्य काहींच्या कथांवरचे अनुभव पाहून प्रतिसाद देऊ की नको, असंच वाटत होतं.

अमा, तुम्ही पूर्ण मराठी किंवा पूर्ण इंग्रजीत लिहीत जा ना. तुमचे प्रतिसाद वाचायची इच्छा असते पण शब्दाशब्दाला इंग्रजी आले की दाताखाली दगड आल्यासारखे वाटते आणि मी वाचायचे सोडून देते.

@अमा, काय मोलाचे लिहीले आहेत.
प्रेफेसन्स फॉल्सिफिकेशन बद्दल वाचायला नक्कीच आवडेल.
>>>>>>>अश्या रिलेशन शिप मध्ये अडकलेल्या स्र्रीला नुसते वाट्ते की नवरा किंवा डॉमिनंट पर्सन परफेक्षनिस्ट आहे. पण तसे प्रत्यक्षात नसते. परफ क्षनिस्ट हा ही एक मानसिक आजारच आहे. फ्ले क्झिबल असणे इतरांना, त्यांच्या वेगळ्या चॉइसेसना समजून घेणे, किंवा समजले नाही तरी
तो त्यांचे स्वातंत्र्य म्हणून अ‍ॅक्सेप्ट करणे हा मनाचा मोठे पणा. >>>>> अतिशय पॉवरफुल मनन आहे हे अमा. अशा परिस्थितीत अडकलेल्या स्त्रियांकरता, ऑलमोस्ट समुपदेशन आहे.

अमा तुमचा प्रतिसाद आवडला.
धमक खरे तर स्वभावाचा भाग आहे. मी आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या / माहेरचा आधार असलेल्या/ समाजात मान असलेल्या स्त्रिया अन्याय / भावनिक अत्याचार सहन करताना पाहिल्यात. त्याच वेळी अशिक्षित / आधारहीन / आर्थिक परावलंबित्व असलेल्या खमक्या स्त्रिया सुद्धा पाहिल्यात.
Being emotionally strong has nothing to do with all these situations . These supports are important but secondary !
चर्चा चाललीये म्हणून उगाच माझे विचार मांडले.
धन्यवाद सामो Happy

स्वगतः
@आदिश्री -
आर्थिक स्वातंत्र्य + माहेरचा आधार हा मिडास टच आहे. खरच असे कॉम्बिनेशन प्राप्त असणारी स्त्री नवर्‍याचा जुलूम सहन करत असेल का? मी तर एन्गेजमेन्ट तोडण्याकरता कचरणारे भ्याड आईबाप ऐकून/पाहून आहे जे की मुलीला एकदा उजवलीच काय फक्त एन्गेजमेन्ट झाली की , परत ढुंकुन पहात नाहीत.

Being emotionally strong has nothing to do with all these situations . These supports are important but secondary !...

सहमत.

अन्याय सहन न होणे, अन्याय स्वतःवर किंवा इतरांवर होत असताना गप्प न बसणे ही मानसिक अवस्था आहे. ज्यांना ह्या गोष्टी सहन होत नाहीत ते अन्य आधार असो वा नसो, बोलतातच. ज्यांचा अन्याय सहन करायचा स्वभाव असतो ते कितीही आधार असला तरी कचरतात.

खरच असे कॉम्बिनेशन प्राप्त असणारी स्त्री नवर्‍याचा जुलूम सहन करत असेल का?>>>> असतात भरपूर. त्यांची कारणे वेगळी असतात. जिथे आर्थिक आधार/स्वातंत्र्य असते तिथे प्रतिष्ठा नावाचे डोंगर उभे असतात.

आणि आता सगळ्याच स्त्रियांनी माहेरचा आधार हे कलम आपल्या डोक्यातून काढून टाकायला हवे. आता न्यूक्लियर फॅमिलीत माहेरे राहिलीत तरी कुठे? माहेरचा आधार म्हणजे नक्की काय? भाऊ, आईवडील? यांनी का म्हणून आधार देत बसायचे? त्यांच्या आयुष्यातील प्रश्नही असतीलच त्यांच्याकडे, ते बघणार की आधार देत बसणार? हल्ली पदवीपर्यंत शिक्षण घेतातच लोक. ते वापरून काहीतरी करा व स्वतःचे बघा. कोणाचातरी आधार असेल तरच आम्ही अमुक्तमुक करणार, नाहीतर नाही ह्या विचारसरणीतून सगळ्यांनीच बाहेर यायला हवे.

>>>>>>त्यांच्या आयुष्यातील प्रश्नही असतीलच त्यांच्याकडे, ते बघणार की आधार देत बसणार? - >>>>>>>>>

@साधना -
फेअर इनफ. पण मग हेही तितकेच खरे आहे की मुलीने जर तिचे आयुष्य वेगळे केले. म्हातारपणी लक्ष नाही दिले तर त्यांनी तक्रार करता कामा नये. तुमची इस्टेट तर नकोच नको आणि जबाबदारीही नको - हे मुलींना सांगता आले पाहीजे.

म्हणजे जन्मापासून लग्न होईपर्यंत आईबाबांनी वाढवले याचे काहीच श्रेय नाही? अर्थात आम्हाला जन्माला घाला म्हणून गळ्यात पडत नाहीत हे खरे आहे. पण तरीही मुले जन्माला घातली जातात. जमतील तशी लाडाकोडात/शिस्तीत/दुर्लक्षित वाढली जातात. एकदा ती प्रौढ झाली की त्यांनीही स्वतःचे आयुष्य स्वतः उभे करायला हवे. तेव्हाही आधार हवाच ही भूमिका कितपत योग्य? आधार देण्याच्या मनस्थितीत पालक नसतील तर? कित्येकांचे उमेडीचे आयुष्य संसार चालवण्यात जाते. मुलांची लग्ने करून दिली, आता जरा आमचे बघतो असे वाटणारे पालक असू शकतात. त्यांनी का परत ही जबाबदारी घ्यावी?

आमचे तुम्ही केले तरच आम्ही तुमचे करणार, नाहीतर जा खड्ड्यात हा विचार मानवी नसणार ना? कारण समाज निर्माण झाला तो आधारासाठी. मुले मोठी होईतो त्यांना पालकांचा आधार व नंतर पालकांना मुलांचा आधार. मुलांनी कायम पालकांकडेच आधारासाठी पाहात राहिले कसे होणार? असे न होणे ह्याच अपेक्षेने समाज निर्माण झाला ना?

कथेतील स्त्रीसारख्या लोकांनी तर आधाराची गोष्टच काढू नये अज्जिबात. त्या शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, पण मानसिकरित्या आजारी आहेत व ह्या आजारातून बाहेर पडायचे काम फक्त त्या स्वतःच करू शकतात.

चांगली चर्चा.
वर आधार देणे याच्या अर्थात काहीतरी गल्लत होती आहे का? आधार फक्त पैशाचा द्यावा लागतो असं नाही. मानसिक आधार पण लागतोच. तो द्यायला माहेर वा कोणीही असेल तरी व्यक्तीला आपले आयुष्य सावरायला मदत होते. खरंतर तोच आधार महत्वाचा.

माझी वरची प्रतिक्रिया वाचून पालकांना म्हातारपणी आधार देणे हे मुलांचे कर्तव्य आहे असे वाटेल. पण मला तसे म्हणायचे नाही. एकमेकांना आधार देणे यासाठीच समाज बनला पण हा आधार कुठपर्यंत याचीही काही मर्यादा ठरवून घ्यायला हवी. मुलांनी व पालकांनी.

प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, काहीना दीर्घकाळ आधार लागतो तिथे द्यायला हवा, ही माणुसकी आहे. पण माहेरचा आधार असेल तरच स्त्री स्वतःचा विचार करू शकते, अन्यायाचा मुकाबला करू शकते हे आता 21साव्या शतकात तरी नको व्हायला. आता आधार किंवा नो आधार, स्वतःचे एकच मिळालेले आयुष्य शक्य तितक्या आनंदात घालवायचा हक्क स्त्री पुरुष दोघांनाही आहे व त्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करून तो आनंद मिळवायला हवा.

>>>> तो द्यायला माहेर वा कोणीही असेल तरी व्यक्तीला आपले आयुष्य सावरायला मदत होते. खरंतर तोच आधार महत्वाचा.>>>> + १००१

साधना मला तुमचे पटत नाही. लग्न झाल्यावर हात झटकणारर्‍याव 'स्वतःचे' आयुष्य जगायला निघून जाणार्‍या पालकांची मला चूकीच वाटते. उमेदीची वर्षे नसतील ना द्यायची तर मग अमेरीकेसारखे वागा १६ व्या वर्षी मूल घराबाहेर पडतं, नंतरही मूल कदाचित ढुंकूनही बघणार नाही.

आम्ही गरज असताना 'मानसिक' आधारही देणार नाही, मात्र ,म्हातारपणी आम्हाला आधार लागेल तेव्हा मुलीने हजर हवे, हे पटत नाही.

अवांतर आणि समांतर:
मानसिक आजार किंवा दुर्बलता ही कित्येकदा जन्मजात आणि आनुवंशिक असू शकते. जन्मलेल्या बाळाचा त्यात भाग आणि दोषही नसतो. अशा परिस्थितीत समाजाने मदत करणे, आधार देणे, काऊन्सिलिंग करणे हे अपेक्षित आहे. किंबहुना समाजाचे ते कर्तव्यच आहे. द्विधा व्यक्तिमत्व किंवा एकांगी व्यक्तिमत्व ह्या प्रकारात व्यक्ती शिक्षण घेऊ शकते, आर्थिक स्वावलंबित्व मिळवू शकते पण समंजसता, समतोलवृत्ती, एकांगी आणि पुस्तकी आकलन, दिवास्वप्न पाहणे अशा काही कमतरतांमुळे ती समाजप्रिय होऊ शकत नाही. ही मानसिक रुग्णता इतरांना समजत नाही. रुग्णाकडून नॉर्मल वागणे अपेक्षित असते. नातेवाईकांनाही ह्यांना समजून घेणे कठीण जाते. रुग्णता किती टक्के आहे यावरही खूपश्या गोष्टी अवलंबून असतात. आपण चिडक्या, तिरसट माणसाशी पंगा न घेता बहुधा दुर्लक्षच करतो कारण तो त्याचा स्वभाव असतो, आपण भांडल्याने बदलणारा नसतो. असा स्वभाव असणे हीसुद्धा एक दुर्बलता आहे. वेगवेगळ्या
मानसिक दुर्बलतांशी अगदी निकटचा दीर्घकाळ संबंध आहे, होता. त्यामुळे खूप लिहिता येईल, पण कथेशी आणि प्रतिसादांच्या प्रवाहाशी ते विसंगत ठरेल .
कथा आवडली.

इथली कथा आणि चर्चा दोन्ही वाचनीय!
>>सामो, वेगळ्या मतांचा तुम्ही खुल्या दिलाने विचार करता याबद्दल अभिनंदन !>>+१११११
या कथेतले नवरा-बायकोचे नाते हे जोडीदाराचे नातेच नाहीये. सुमितच्या जोडीदाराबाबतच्य व्यक्त केलेल्या अपेक्षा -"लग्न का करतो माणूस, एक सहचर मिळावा, साथीदार मिळावा जो की इक्वल फुटिंगवर असेल. आपल्या सुखदु:खात सामील होइलच पण वेळ पडल्यास आपले दोषही दाखवेल." आणि त्याचे समिधाशी त्याचे वर्तन यातच मेळ नाहीये. पॅरेंट-चाईल्ड नात्यासारखे हे नाते आहे. माणूस परेफेक्शनिस्ट असणे वेगळे, महत्वाकांक्षी असणे वेगळे आणि दुसर्‍याच्या आयुष्यावर ताबा ठेवणे वेगळे. सुमित त्याचे निर्णय-त्याला जे योग्य वाटते ते समिधावर लादत रहातो आणि ती पॅसिव अ‍ॅग्रेसिव वागायचा प्रयत्न करत विरोध करते. करीअर पासून काय खावे प्यावे इतपर्यंत प्रत्येक बाबतीत हे ताब्यात ठेवणे आहे. आधी मनधरणी आणि मग धमकीवजा सुचना हा एक प्रकारे नात्यातला छळच! त्यातून स्वतःहून बाहेर पडणे समिधाला जमत नाही. सुमितला दुसरे कुणे मिळते आणि मगच समिधाची सुटका होते.

हीरा, आपला प्रतिसाद फार आवडला.
>>>मानसिक दुर्बलतांशी अगदी निकटचा दीर्घकाळ संबंध आहे, होता. त्यामुळे खूप लिहिता येईल, पण कथेशी आणि प्रतिसादांच्या प्रवाहाशी ते विसंगत ठरेल .>>> या धाग्यावर अथवा अन्य धाग्यावर जरुर लिहा ही विनंती.

>>सामो, वेगळ्या मतांचा तुम्ही खुल्या दिलाने विचार करता याबद्दल अभिनंदन !>>+१
हीरा इथे प्लीज लिहा. सासरी शारिरीक इजा झाली तर मुलीला माहेरी चार दिवस तरी ठेवून घ्यावे इतपत समाजात बदल घडला आहे. काही जागी आता मुलगी परत पाठवणार नाही असे माहेरचे ठामपणे सांगतात. पण आजही सासरी मुलीला मानसिक इजा झाली तर त्याबद्दल अनास्था असते. "सोस बाई थोडं" हाच एक उपचार. अंगाला बोट न लावता केवळ मानसिक आघातांनी पार अगदी पी.टी.एस.डी असल्यासारखी अवस्था करून ठेवलेल्या व्यक्ती पाहिल्या आहेत. ह्याबद्दल थोडी जनजागृती होईल तर बरच...

>>>>पॅरेंट-चाईल्ड नात्यासारखे हे नाते आहे. माणूस परेफेक्शनिस्ट असणे वेगळे, महत्वाकांक्षी असणे वेगळे आणि दुसर्‍याच्या आयुष्यावर ताबा ठेवणे वेगळे. सुमित त्याचे निर्णय-त्याला जे योग्य वाटते ते समिधावर लादत रहातो आणि ती पॅसिव अ‍ॅग्रेसिव वागायचा प्रयत्न करत विरोध करते.

स्वाती, यु नेल्ड इट!!! करेक्ट हे विकृत बालक-पालक नातेच आहे. आणि यात चूकी दोघांचीही आहे. अन्याय करणारा जितका तितकाच सहन करणाराही दोषी आहे. जेव्हा तिच्यात धमक होती, अंगात रक्त सळसऴ्अतं होतं, तिने बंड करुन उठा यला हवं होतं त्या काळात ती आतल्या आत पडझड होत राहीलेली आहे. कदाचित तिने १० वेळा माहेरचा (मानसिक) आधार मागीतला असेल, त्यामुळे माहेरचे लोक काही अंशी जबाबदार आहेत.

सिमंतिनी>> +1
बर्याचदा मानसिक छळ हा छळ समजलाच जात नाही. माहेरचे लोक तर याकडे सर्रास सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. पण कोणाची वाट न बघता मुलींनीच यातून जमेल तसा निदान आपल्यापुरता मार्ग काढला पाहिजे.

पण कोणाची वाट न बघता मुलींनीच यातून जमेल तसा निदान आपल्यापुरता मार्ग काढला पाहिजे. >> Happy क्यूटी आपल्या कथेतील नायिका म्हणून मला आवडतात.
पण प्रत्येकीला हे शक्य नसते. जोडीदाराबरोबरचा संसार फसला की सगळ्यात मोठी गोष्ट हरवते ती म्हणजे सेन्स ऑफ बिलाँगिंग किंवा आपलेपणाची भावना. (इथे मालमत्ता अशा अर्थाने नाही तर आपलं म्हणावं अशा अर्थाने 'बिलाँगिंग'). ती शोधत स्त्री/पुरूष आपला जन्म ज्या कुटूंबात झाला तिथे परत येणार. पण तिथेही सेन्स ऑफ बिलाँगिंग नाही सापडला तर विभक्त होण्याची प्रक्रिया लांबणार कारण इतकं मानसिक बळ आणणे कठीण असते. ह्या कथेत सुमितही लवकर विभक्त होवू शकत होता पण तो सेन्स ऑफ बिलाँगिंग अपत्य घरी असे पर्यंत होता. नंतर त्याला विभक्त व्हावे हा विषय करणे सर्वपरीने जमले.

दत्तबावनी हे गुजरातीतच आहे, फक्त संस्कृत शब्द थोडे अधिक आहेत. हे लिहिणारे रंगावधूत स्वामी ऊर्फ गांडा महाराज. गुजरातीत गांडा म्हणजे येडागबाळा. लहानपणापासूनच स्वामींचे विरक्त आणि त्यामुळे विचित्र आचरण होते म्हणून त्यांचे हे नाव पडले. हे स्वामी महाराष्ट्रीय होते पण वास्तव्य गुजरातमध्ये होते. त्यांचे गुरु श्रीमद वासुदेवानंद सरस्वती हे अनेकदा चातुर्मास नर्मदेकाठी गरुडेश्वर येथे व्यतीत करीत. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरातमध्ये त्यांचे अनेक अनुयायी आहेत. रंगावधूत स्वामींनी नर्मदेकाठीच नारेश्वर येथे समाधी घेतली. त्यांची बोलण्याची भाषा किंचित मराठी प्रभाव असलेली गुजराती होती.

Pages