प्रलय-०१

Submitted by शुभम् on 22 March, 2019 - 03:05

उपोद्घात

" विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजेन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......!

" महर्षी , कोण ' ती '....? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....? आणि हे कधी , कधी होणार आहे ? मला फार चिंता वाटत आहे ...?

" फार दूर नाही राजन . तुझा मृत्यू , लवकरच तुझा मृत्यू होईल . आणि तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातातून अधम व घोर पापकर्मे घडतील . त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासून तुझा वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल . तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल.....

" महर्षी तुम्ही थोर आहात , तुम्ही महान आहात , तुम्हाला काहीही अशक्य नाही , यातून वाचायचा काहीतरी उपाय असेलच , तुम्हीच मला सुचवा , महर्षी मी काय करू सांगा ? तुम्ही सांगा , तुम्ही सांगाल तसे मी करायला तयार आहे ? महर्षी मला वाचवा , महर्षी माझ्या वंशाला वाचवा , महर्षी हे राज्य वाचवा , सर्व काही तुमच्या हातात आहे....?

राजाने महर्षी च्या पायावर लोळण घेतली . तो हीनदीन झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते . त्याच्या वस्त्राचे त्याला भान नव्हते . त्याची अवस्था दयनीय होती.....!

" या सार्‍या घटना जर टाळायच्या असतील तर त्याला एकच उपाय आहे राजन , या घटनांची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते , ज्य घटनेपासून होते , ज्या व्यक्ती पासून होते ज्या स्थळापासून होते , त्या सर्वांचा नाश...

" राजा समजूनही न समजल्या सारखे म्हणाला " म्हणजे , म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला महर्षी ....? " त्याला हुंदका दाटून आला . तो मुसमुसून रडू लागला . त्याला महर्षीच्या बोलण्याचा अर्थ कळला होता......

राज्यावर येणारे संकट टाळण्यासाठी राजाने आपल्या राजपुत्राला राजमहालात झोपवून तो संपूर्ण राज महाल पेटवून दिला . संपूर्ण महाल जळून खाक होईपर्यंत , त्याची राख आसमंतात विखरून जाईपर्यंत राजा व राणी दोघे ते दृश्य पहात राहिले . त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर जळून राख झाला होता. त्याचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानात भरून राहिला होता . त्याच्या जळालेल्या मांसाचा वास त्याच्या नाकात रुतून बसला होता त्या घटनेने राजावर फार मोठा आघात केला.....

राजाचे संसारावरून , राज्यकारभारावरून मन उडाले . त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारूला . जंगलात एका बाजूला आश्रम बांधून तो राणीसह त्या ठिकाणी राहायला गेला . प्रधान मंडळ कसेतरी राज्य कारभार सांभाळत होते . पण जनतेला त्यांचा राजा हवा होता .. राजा विना राज्य पोरके झाले . राणीला सर्व काही समजत होते . राणीने राजाचे मन वळवायचे प्रयत्न केले पण तिला ते शक्य नव्हते. राज्याची संसारावर ची वासना उडाली होती . त्याच्या सर्वच वासना नष्ट झाल्या होत्या . तो दगडासारखा निश्चल असायचा . तो असुनही नसल्यासारखा होता . त्याच वेळी राणीच्या आयुष्यात तो आला . त्याने राणीला विश्वास दिला . स्थैर्य दिले . सुख दिले आणि राज्याला नवा राजपुत्र दिला . तो फक्त तिलाच दिसायचा . तिलाच जाणवायचा . साऱ्यांना वाटलं हा आपला खरा राजपुत्र , पण तिलाच माहीत होतं तो खरा राजपुत्र नव्हता. त्या राजपुत्राचा राज्याभिषेक सोहळा झाला . त्या नव्या राजपुत्राच्या नावाखाली राज्यांमध्ये राज्य सुरू झाले . पण ते राज्य ना राजपुत्राचे होते , ना जुन्या राजाचे होते , ना राणीचे होते . ते राज्य होते त्याचे . तो त्याच्या मनाप्रमाणे चालवत होता . राणी त्याच्या प्रभावाखाली होती ...

काही वर्षानंतर

सोनेरी नक्षीकाम केलेल्या त्या दारासमोर दोन बलदंड द्वारपाल उभे होते . एक माणूस त्या दारातून पुढे जाताना त्या दोन द्वारपालानी भाले आडवे लावून त्याला जाण्यास मज्जाव केला .

" मला कळत नाही , प्रधानजी तुमच्या सारखे मूर्ख द्वारपाल का म्हणून त्यांच्या सेवेत ठेवतात ? कधी कळणार तुम्हाला काय माहित ....? अरे मी आहे मी , मी हेर पथकाचा प्रमुख ,साधीसुधी वेशभूषा केलेले देखील तुम्हाला कळत नाही ......

तो हेर पथकाचा प्रमुख भिल्लव होता , तो आत गेला . प्रधानजी त्यांच्या मंचका वरती बसून काहीतरी वाचण्यात व्यस्त होते .

" क्षमा असावी प्रधानजी , एक महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे आपणास व्यत्यय आणत आहे.....

" अरे राजाने हेर पथकाकडून आलेली बातमी अर्ध्या रात्री ही ऐकायला तयार असावं , बोल भिल्लवा तू काय बातमी आणली आहेस..?

" महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे .......

" काय म्हणतोयस भिल्लवा तू , महाराज म्हणजे आपले जुने महाराज की राजकुमार......?

" प्रधानजी सत्य कितीही कटू असले तरी ते पचवायलाच हवे . राजकुमार आता राजकुमार राहिले नाहीत ते महाराज आहेत आणि त्याच महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याचा आदेश दिला आहे.......

" भिल्लवा साऱ्यांना माहित आहे , ती काळी भिंत कशासाठी कधी आणि का बांधली गेली होती ते ? महाराजांनाही या गोष्टी माहीत आहेतच . आपल्या राज्याचा जो कुणी राजा होतो त्या राजाला या सार्‍या गोष्टी माहीत असतात , आणि त्या भिंतीपलीकडील शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी राजाची असते. आणि तोच राजा जर असे कृत्य करायला जात असेल तर जनतेने काय करावे......?

" प्रधान जी महाराजांचे म्हणणं आहे की या जुन्या गोष्टी आहेत , आणि या सर्व अंधश्रद्धा आहेत . कितीतरी वर्षापासून ती भिंत तिथेच आहे . त्या भिंतीपासून , भिंतीपलीकडील शत्रूकडून आपल्याला कधीच कोणताच अपाय झाला नाही . एखाद्या वेळेस ती एखादी अख्यायिका असू शकेल , जी कुणीतरी मुद्दाम तयार केलेली असेल.....?

" भिल्लवा काही गोष्टी असतातच आख्यायिकेसारख्या . ज्या गोष्टी हजारो वर्षापासून चालत आलेल्या असतात त्या गोष्टी मागे खरंच काहीतरी गूढ असतं उगाच तळाची माहिती न घेता विहिरीत बुडी मारू नये.....

" भिल्लवा काही जरी झालं तरी या आदेशाचं पालन होता कामा नये , आपल्याला कसेही करूण ती भिंत पडण्यापासून महाराजांना रोखलंच पाहिजे . एक तर महाराज वाईट संगतीत असतील किंवा विचार करण्याची त्यांची क्षमता राहिलेली नसेल , काहीही करून हा निर्णय आपल्याला थोपवला पाहिजे . अन्यथा राज्यावर येणारे संकट थांबवायला कोणी समर्थ असणार नाही.....

" प्रधानजी मला वाटतं यात चिंता करण्यासारखे काही नाही . माझे बरेच हेर त्या भिंतीपलीकडे जाऊन आले आहेत , आणि मीही बऱ्याच वेळा त्या भिंती पलीकडे जाऊन आलो आहे . त्याठिकाणी उजाड जमिनी शिवाय काहीच नाही . ना कोणती वनस्पती आहे , ना कोणता प्राणी आहे , ना कोणती जीव आहे . जीवन नावाची गोष्ट त्या भिंतीपलीकडे अस्तित्वातच नाही . मग आपल्याला कशापासून भीती आहे.....?

" त्यापासूनच आपल्याला खरी भीती आहे भिल्लवा भिंतीपलीकडे जीवन नाही जर ती भिंत पडली तर अलीकडेही पलीकडच्या सारखीच स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.....!

" ते सर्वथैव अशक्य आहे महाराज भिंतीपलीकडे ना कोणती नदी आहे पाण्यासाठी , ना जमीन सुपीक आहे पीक घेण्यासाठी , त्यामुळे त्या ठिकाणी कोणताच प्राणी किंवा जीवन आपल्याला दिसत नाही . मात्र उलट आपल्याकडे सर्व प्रकारची सुबत्ता आहे त्यामुळे आपली स्थिती तशी कधीच होणार नाही.....!

" भिल्लवा तुला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत एकेकाळी तो भागही आपल्यासारखा किंबहुना आपल्याहून अधिक सुबत्ता असलेला होता पण......

प्रधानजींचे वाक्य अर्धवटच राहिलं . मुख्य द्वारा बाहेर तलवारीचा आवाज येत होता . त्या पाठोपाठ दोन किंकाळी ऐकू आल्या . दारावर काहीतरी आपटलं आणि द्वार जोरात उघडले गेले .....

ते राजाचे निवडलेले खास अंगरक्षक होते.
" भिल्लवा पळू नकोस , तू राज्याशी द्रोह केला आहे ....

" भिल्लवा तू इथून निघून जा , तुला कसेही करून ती भिंत पडण्यापासून रोखलंच पाहिजे , अन्यथा मोठा अनर्थ होईल . मी कसेही करून त्यांना थांबवतो , तू निघ पटकन लाखो जणांचे जीवन तुझ्यावरच अवलंबून आहे.....

मागच्या बाजूला असलेल्या द्वाराकडे भिल्लवाने जोरात धाव घेतली . त्याच्या पाठोपाठ एक सैनिक ही गेला . घरातून बाहेर पडत असताना त्या सैनिकाने भिल्लवाच्या पायाला धरून जोरात ओढलं , त्यामुळे भिल्लव खाली आपटला , त्याच वेळी प्रधानजींनी बाजूलाच असलेला भाला घेऊन त्या सैनिकाच्या ह्रदयाचा वेध घेत मारला . त्या सैनिकांने जागेलाच प्राण सोडला . उरलेले चार सैनिक तलवार काढून त्वेषाने प्रधानजी वरती धावून गेले प्रधानजींनीही आपली तलवार काढून त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास उभे ठाकले.....

उरलेल्या एका सैनिकाने कमरेला अडकवलेला शंख काढून जोरात शंखनाद केला . त्याबरोबर बाहेर पडून घोड्यावर स्वार झालेल्या भिल्लावाच्या मागे तीस चाळीस घोडेस्वार लागले............

भिल्लव हा पट्टीचा घोडेस्वार होता . त्याने मुद्दाम हून अरुंद रस्त्यांतून व गर्दीच्या ठिकाणातून त्याचा घोडा घातला, त्यामुळे त्याच्या मागे लागलेल्या घोडेस्वारांना त्याचा पाठलाग करता येणे जवळपास अशक्य होतं . पण ते घोडेस्वार ही काही कमी नव्हते त्यांनीही भिल्लावाचा पाठलाग सुरुच ठेवला पण त्या दोघांमध्ये बरेच अंतर पडले. भिल्लव नगराच्या मुख्य द्वारा पर्यंत पोहोचला . पण मुख्य द्वारही बंद होते . त्या ठिकाणी असलेले सैनिक हे भिल्लवाची वाटच पाहत होते . भिल्लव दिसल्याबरोबर ते सैनिकहीनही मागे लागले . भिल्लवाला सर्वत्र सैनिक दिसत होते . त्याने मुख्य बाजाराच्या दिशेने घोडा वळवला व त्याला टाच दिली . काही क्षणातच तो मुख्य बाजारात पोहोचला . त्या ठिकाणी कायम गर्दी असायची . त्याने घोडा सोडून दिला व तो पायउतार होऊन गर्दीत मिसळला . सैनिकांना घोड्यावरून मुख्य बाजारात फिरता येणे शक्य नव्हते . त्यांनीही घोडा सोडून दिला व ते ही भिल्लवाला शोधायला बाजारात फिरू लागले . भिल्लव वेशभूषा करायला पटाईत होता . एका रेशमी कापड दुकानापुढे तो स्त्रीची वेशभूषा करून कापड पाहण्यात दंग झाला होता. कुणाही सामान्य माणसाला एखादी सुंदर स्त्री कापड घेण्यात व्यस्त आहे असेच वाटले असते . पण त्या सैनिकांना खास प्रशिक्षण दिलेले होते . ते राजाच्या खास तुकडीतील खास सैनिक होते . त्यातील एका सैनिकाने भिल्लवाला ओळखले व तो त्याच्याकडे धावू लागला.....

भिल्लवाला त्याच्याकडे येणारा सैनिक दिसला . त्याने त्याच्या डोक्यावर घेतलेले रेशमी कापड तिथेच फेकून दिले व जोरात धाव घेतली . तो पुन्हा एकदा गर्दीमध्ये मिसळा पण तो सैनिकही त्याच्या मागे धावत होता . त्या सैनिकाने भिल्लवाला एका महालात जाताना पाहिले होते तो सैनिकही त्या महालात घुसला.... पण आत गेल्याबरोबरच त्याला कोणाची तरी मिठी पडली ,

" आमच्या येथे किनइ सैनिकांना खास सूट देण्यात येते ,

तो एक किन्नर आणि त्याने सैनिकाला मिठी मारली होती आणि तो सैनिक एका वेश्यालयात घुसला होता . सैनिकाने किन्नराला जोरात धुडकावून लावले , तो किनऱ्या आवाजात ओरडत सैनिकाला शिव्या देत मागे पडला ,

" तू कोणाला येताना पाहिले का.....?

" पाहिले ना आत्ताच तर तुला पाहिले , तो किन्नर पुन्हा एकदा लाडिक नखर्‍यात येत त्याच्याजवळ जात बोलला....

सैनिकाने त्या किन्नर च्या श्रीमुखात भडकावुन दिली तो किन्नर त्याच्या त्याच्या लाडिक शैलीमध्ये रडू लागला.....

" राज्याच्या हिताचा प्रश्न आहे , तुला मी शेवटचं विचारतो या दारातून कोणी आत आलं होतं का आणि ते कुठे गेलं ....?
किन्नराने मागच्या बाजूच्या एका दरवाज्याकडे बोट करून सांगितलं त्या तिथे एक वेंधळा माणूस गेलाय... बघा सापडतो का ....?

तो सैनिक त्या दाराकडे पळत निघाला .

आता त्या किनाऱ्याला मागून कोणाची तरी मिठी पडली होती . " वा भिल्लवा वा , वेशांतर करायला शिकावं तर ते तुझ्याकडूनच ....

" आणि मी कशाचाही वेषांतर केलं तरी ते ओळखायला शिकाव तुझ्याकडूनच , सरोज " भिल्लवाणने सरोजला पुढे ओढून घेत त्याच्या मिठीत घेतले......

" आज कसं काय हेर पथकाचा प्रमुख या ठिकाणी अवतरला......
" तुला माहित नाही सरोज पश्चिमेकडची काळी भिंत पाडायचा आदेश दिलाय महाराजांनी.....
" पण हे सैनिक तुझ्या का मागे लागलं होते.....?
" प्रधानजीनी मला कसंही करून ती भिंत पाडण्यापासून थांबवायचा आदेश दिलाय....
" म्हणजे देशद्रोही झाला म्हणायचा की तू ....?ते असो काहीतरी , या देशद्रोहाची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे.....
सरोज त्याला ओढत खोलीकडे नेऊ लागली .
" सरोज ही वेळ नाही , आता क्षणाक्षणाची किंमत आहे . मी जर गडबड केली नाही तर लाखो जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे , मला निघायलाच हवं आणि तू मला मदत करणार आहेस.....
" मी आणि तुला मदत हे शक्य नाही भिल्लव , ज्या ज्या वेळी तु माझी मदत मागतो आणि ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी मला नुकसानच होतं....
" सरोज तुझं नुकसान लाखो जीवांच्या किमती एवढं मोठं आहे का....?

पुन्हा एकदा दारावर थाप पडली . दार उघडलं गेलं नाही . पुढच्या वेळेस दारावर जोरजोरात झाडल्याचा आवाज होऊन , शेवटी दार उघडल्याचा आवाज झाला . दार उघडल्याबरोबर सात-आठ सैनिकांची एक टोळी आली व त्या टोळीने भिल्लवाला घेरले.....

इकडे प्रधानजीना बेड्या घालून राजासमोर उभं केलं होतं .

" महाराज तुम्ही लहान असल्यापासून किंबहुना तुमच्या जन्माच्या पूर्वीपासून मी या राज्याच्या सेवेत आहे . या राज्याचं भलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे . म्हणूनच मी तुम्हाला सल्ला दिला होता की ती काळी भिंत पाडू नका... कृपा करा…..

राजा त्याच्या वैयक्तिक कक्षात होता . सुवर्ण पात्रात त्याच्यासाठी खास बनवलेली मदिरा प्राशन करत होता . राजा अजून किशोरवयीन होता , त्याला अजून धड मिसरूडही फुटलेलं नव्हतं .

" बस करा प्रधानजी मला तुमच्या या खोट्या वागण्याचा वैताग आलाय ...!किती दिवस चांगल्यापणाचं पांघरून घेऊन तुम्ही या राज्याच्या विरोधात कट कारस्थान करणार आहात..... मला माहित आहे भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांच्या गटाला तुम्ही रसद पुरवत आहात आणि त्या काळ्या भिंतीचा तुम्ही एक ढाल म्हणून वापर करत आहात . आता हे फार काळ चालणार नाही ती भिंत पाडून त्या पलीकडे असलेल्या देशद्रोह्यांना कंठस्नान घालण्याची वेळ आली आहे आणि सुरुवात तुमच्या पासून होणार आहे ....

" सैनिकांनो घेऊन जा यांना आणि उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर फाशी देऊन टाका यांना.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !!