‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

Submitted by कुमार१ on 14 February, 2019 - 04:20

यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत. या पार्श्वभूमीवर पुलंच्या वैचारिक लेखनाकडे वाचकांचे लक्ष वळवावे या हेतूने हा लेख लिहीत आहे. ‘एक शून्य मी’ हे पुलंचे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहे (सन २००१). हे पुस्तक माझ्या संग्रही असून ते माझे अत्यंत लाडके पुस्तक आहे. हा पुलंच्या नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वैचारिक लेखांचा संग्रह आहे. त्याचा अल्पपरिचय करून देण्यासाठी हा लेख.

PLD.jpg
(चित्रसौजन्य : विकिपीडिया)

या संग्रहात एकून २० लेख संकलित केलेले आहेत. त्यातून पुलंनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा धांडोळा घेतला आहे. त्या सर्व लेखांचा आढावा घेण्याचा माझा इरादा नाही. त्यापैकी मला खूप भावलेल्या लेखांचा परिचय या लेखात करून देतो. एक वाचक म्हणून मला त्यांत काय आवडले ते सांगतो. त्या लेखांची शीर्षके अशी आहेत:

१. मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
२. छान पिकत जाणारे म्हातारपण
३. धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
४. एक शून्य मी

मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
हा लेख मुळात १९६२मध्ये ‘अमृत’ मासिकात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख ‘मराठीपणा’चे जे काही खास गुणधर्म आहेत त्यांच्यावर नेमके बोट ठेवतो. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हे कमीपणाचे आणि इंग्रजीत बोलणे हे प्रतिष्ठेचे हा समज तेव्हाही दिसून येई. त्या अनुषंगाने लेखात एक प्रसंग दिला आहे. पुलंची एक मराठी आडनावाची विद्यार्थिनी सारखे इंग्रजी बोले. तिचे वडील मराठी व आई पंजाबी होती. पण तिला या दोन्ही भाषा येत नव्हत्या. त्यावर पुलंनी तिला एकदा त्याचे कारण विचारले. त्यावर ती, “शीः ! मराठी की गडीनोकरांची भाषा आहे”, असे उत्तरते. त्यावर पुलं तिला “मग तुझ्या आईने गड्यानोकराशी का लग्न केले?” असे विचारून निरुत्तर करतात. महाराष्ट्रातील उच्चभ्रू समाजात मराठी बोलण्याची लाज हा बराच जुना विषय असल्याचे यातून जाणवते.

मराठी माणसाचे काही ठाम गैरसमज, कुरकुरायचे नेहमीचे विषय, व्यवहारातील वागणूक, सांस्कृतिक आवडी आणि काही आवडीचे सिद्धांत या सर्वांचा सुरेख परामर्श या लेखात घेतला आहे. १९६०च्या दशकात साधारण मराठी माणसाचे चित्र म्हणजे कारकुनीत खूष आणि व्यापार-उद्योगात मागे असे होते. ही पार्श्वभूमी पुलंसारख्या लेखकाला अगदी पोषक ठरली. मराठी दुकानदार हे या भूतलावरचे एक अजब रसायन असल्याचे त्यांनी अतिशय रंजकपणे वर्णन केले आहे.
“मराठी माणसाला हसण्याचे वावडे नाही. पण याला अपवाद म्हणजे मराठी दुकानदार आणि मराठी सर्कारी हापिसर !” हे वाक्य त्यांचे निरीक्षण किती मार्मिक होते याची साक्ष आहे. आजही ही परिस्थिती बदलली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल !
मराठींच्या काव्यशास्त्रविनोद आणि संगीतावरील प्रेमाचे पुलंनी दिलखुलास कौतुक केले आहे. तसेच मराठी माणसाच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे त्यांनी आदराने वर्णन केले आहे. ते लिहिताना त्यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा ताजा इतिहास होता. त्याचाही त्यांनी अभिमानाने व कौतुकाने उल्लेख केला आहे.

छान पिकत जाणारे म्हातारपण
हा १९९२मध्ये ‘शतायुषी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आहे. सर्वसाधारणपणे ‘म्हातारपण’ म्हटले की डोळ्यांसमोर एक प्रकारचे सुकलेपण आणि असहायता डोळ्यांसमोर येते. परंतु सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास म्हाताऱ्याना कसे छानपैकी ‘पिकत’ जाता येते, याचे खास पुलं-शैलीतील वर्णन यात वाचायला मिळते. म्हाताऱ्या माणसाला आपण पिकले पान म्हणतो. पण झाडावरचे पिकले पान आणि म्हातारपण यातील फरक पुलंनी फार छान स्पष्ट केला आहे. झाडाच्या पानाला भावना, स्वार्थ, सुखदुःख, अहंकार आणि वासना असे काहीही नसते. पण म्हाताऱ्याना मात्र या सर्व गोष्टींपासून मुक्त होणे जाम जमत नाही.

माणूस जसा मोठा होत जातो तसे त्याच्याकडील अनुभवांची शिदोरी वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या जगण्यात आणि भवतालात बरेच बदल होत जातात. जीवनशैली झपाट्याने बदलत जाते. तरीही आपल्या तारुण्यात आपण जे काही अनुभवले तेच योग्य होते असा सूर बहुतेक म्हातारे काढतात. त्यातूनच “आमच्या वेळी....” या पालुपदाचा जन्म होतो आणि मग ते घरातील इतरांना छळू लागते ! त्याच्या जोडीला भर पडते ती “हल्लीची पिढी बिघडली” या रेकॉर्डची. सतत असे सूर काढणाऱ्यांना आपणच बाप म्हणून वाढवलेली ही पिढी आहे याचा विसर पडतो, याची जाणीव लेखक करून देतो.
काळाबरोबर बदलणे आणि नव्याला आपलेसे करणे हा म्हातारपण सुसह्य होण्याचा मूलमंत्र आहे, हे या लेखातून छान सांगितले आहे. म्हाताऱ्या मंडळींचे खरे काम म्हणजे घराला आनंद पुरवणे. ज्या कुटुंबांत वृद्ध हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करतात, हा लेखातील संदेश तर लाजवाब आहे. एका आजोबांचे प्रसंगचित्र मुळातून वाचण्यासारखे आहे. तसेच आपली शारीरिक वा कौटुंबिक दुख्खे चव्हाट्यावर आणून स्वतःविषयी सहानुभूती मिळवू नये, असेही सुचवले आहे. आजीआजोबा होण्याच्या मार्गावर असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख आहे.


• धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही

हा लेख ‘बुलेटीन’ या नियतकालिकात १९८९मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. लेखाच्या शीर्षकातले पहिले दोन शब्द हे भयंकर नाजूक आहेत हे आपण जाणतो. या विषयांवर लिहायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. अर्थातच पुलंनी ती लीलया पेलली आहे. लेखात सुरवातीस भारतीय समाज हा जात, धर्म वा पंथ यांच्या विळख्यात किती घट्ट अडकला आहे याची खंत व्यक्त केली आहे. आपल्याला वैचारिक श्रमांचा तिटकारा तर आहेच आणि त्याच्या जोडीला निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावही आपल्यात दिसतो. आपण सदैव वास्तव नाकारत जगतो आणि सारा हवाला देवावर नाहीतर दैवावर टाकून मोकळे होतो. तथाकथित पुरोगाम्यांनी बुद्धीप्रामाण्य वाढीस लावण्यासाठी किंवा समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडशी पाउल टाकलेले नाही, हे ते परखडपणे नोंदवतात.

लेखातील एका परिच्छेदात पुलंनी बाबासाहेब आंबेडकरांबद्ल अतिशय आदराने लिहीले आहे. समाजातील विखारी जातीयतेने अस्वस्थ झाल्याने पुलंनी आंबेडकरांचे लेखन आणि त्यांचे खैरमोडे यांनी लिहिलेले चरित्र आवर्जून वाचले. त्या चरित्रातील बाबासाहेबांच्या “मला मायभूमी कुठे आहे?” या वाक्याने आपण अंतर्बाह्य हादरून गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या लेखाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात पुलंनी त्यांची देवधर्माबद्दलची भूमिका सुस्पष्ट केली आहे. ती त्यांच्याच शब्दात देतो:

.....“ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा ह्यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.”....

एका परिच्छेदात त्यांनी संत आणि शास्त्रज्ञ यांची तुलना केली आहे. भारतात संतांची संख्या भरपूर आहे. पण, त्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ अधिक संख्येने जन्मायला हवे होते असे ठामपणे लिहिले आहे. यासंदर्भातले त्यांचे पुढचे वाक्य बहुचर्चित असल्याने ते नोंदवतो:

“ मला कुठल्याही संतापेक्षा अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो”...

समाजात मुरलेल्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यावर त्यांनी कोरडे ओढले आहेत. तसेच काही अंधश्रद्धाना शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. या सगळ्यावर चिंतन केल्यावर त्यांना प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटल्याचे दिसते. या लेखाला त्यांच्या आत्मचरित्राचा स्पर्श झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक जीवनात ते खूप आनंदी व समाधानी होते. पण आजूबाजूस दृष्टीस पडणारे दुखः, दैन्य आणि विसंगती पाहून त्यांना स्वतःचे जगणेच सामाजिकदृष्ट्या असंबद्ध वाटत असल्याचे नमूद करून ते हा लेख संपवतात.

एक शून्य मी
हा लेख ‘मटा’ च्या दिवाळी अंकात १९७४मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पुस्तकाची तब्बल १४ पाने व्यापून राहिलेला हा लेख त्याचा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. किंबहुना त्यामुळेच त्याचे शीर्षक पुस्तकाला दिले गेले असावे. इथल्या सर्व लेखांपैकी मला तो जास्त प्रभावी आणि अंतर्मुख करणारा वाटतो. तेव्हा यावर थोडे विस्ताराने लिहितो.
लेखाच्या शीर्षकावरून पुलंना काय म्हणायचे असावे याचा अंदाज सुजाण वाचकाला येतो. मानवी जीवनातली निरर्थकता ही या लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. लेखाची सुरवातच मोठी आकर्षक व मार्मिक आहे. जेव्हा आपली एखाद्या परीचिताची कुठेही भेट होते तेव्हा आपसूक विचारला जाणारा प्रश्न असतो, “काय चाललंय सध्या?”. तसा हा प्रश्नच बर्ऱ्यापैकी निरर्थक आणि बरेचदा त्याला मिळणारे उत्तर देखील ! हा संवाद खास त्यांच्याच शब्दात देतो:

...’ सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या ?” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छवास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही.’....

हे वाचून क्षणभर आपण स्मितहास्य करतो पण दुसऱ्याच क्षणी सुन्न होतो. हे प्रश्नोत्तर आपल्याला खूप काळ विचार करायला आणि कठोर आत्मपरीक्षण करायला लावते.

पुलंचे सारे आयुष्य संगीत, साहित्य आणि नाटकांना वाहिलेले होते. त्यातून मिळणाऱ्या आनंदात ते रममाण होत असत. पण समाजात आजूबाजूला नजर टाकता जे काही दिसे त्याने ते खूप अस्वस्थ होत. त्यांना सारेच कसे अपरिचित नि अनोळखी भासत होते. शहरी जीवनातली सामाजिक विषमता त्यांना बोचत असे. पुणे ते मुंबई हा नियमित प्रवास डेक्कन क्वीनने करताना आलेले अनुभव त्यांनी विषादाने लिहीले आहेत. कल्याण ते मुंबई या टप्प्यात ट्रेनच्या डब्यातले आणि बाहेर दिसणारे वातावरण किती विरोधाभासी असते ते त्यांनी छान रंगवले आहे. किंबहुना ते एका मध्यमवर्गीयाचे मुक्त चिंतन आहे. या ट्रेनच्या डब्यात जी सूट-बूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची सूज असलेली संस्कृती आहे त्यात तर आपण मोडत नाहीच. त्याचबरोबर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या लोकलच्या त्या जीवघेण्या गर्दीत जमा होण्याचीही आपली ताकद नाही, याची ते कबुली देतात.

हा लेख लिहिताना त्यांनी महानगरी समाजातल्या विविध आर्थिक स्तरांना समोर ठेवले आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि दरिद्री लोक या प्रत्येकाचे विश्व किती भिन्न आणि एकमेकापासून अलिप्त आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवते. यातील एका वर्गाचे सारे सुख कुठलेही प्रश्न न पडण्यात आहे तर विचार करणाऱ्या माणसाकडे प्रश्नचिन्हांखेरीज काहीच नाही, हा विरोधाभास ते नोंदवतात. एकीकडे त्यांना मुंबईच्या एका प्रतिष्ठित देवळातली दर मंगळवारची वाढती रांग दिसते तर दुसरीकडे एका हॉटेलच्या बाहेर रोज मध्यरात्री तिथले उरलेले अन्न मिळवण्यासाठी लागलेली भुकेलेल्ल्यांची रांग. मग या दोन रांगापैकी काय खरे, काय खोटे हे प्रश्न त्यांना छळतात.

आर्थिक व सामाजिक विषमतेनंतर त्यांनी वैचारिक विषमतेचाही आढावा घेतला आहे. समाजातील विविध स्तरांत असलेली वैचारिक दरीही त्यांना खोल वाटते. ज्या माणसांच्या धर्माच्या कल्पनेशी आपले कुठेच नाते जमत नसेल तर ते आपले धर्मबांधव कसे? आणि ज्यांच्याशी आपले कुठलेच वैचारिक साम्य नाही, ते केवळ एकाच देशात राहतात म्हणून देशबांधव तरी कसे?” हे प्रश्न ते वाचकांसमोर ठेवतात.
आजही हे दोन प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात आणि आपण अस्वस्थ होतो. लेखातली पाच पाने देव, कर्मकांड, नवस, अंधश्रद्धा आणि ढोंगबाजी यांना वाहिली आहेत. ती मुळातूनच वाचण्यात मजा आहे. ती वाचल्यानंतर पुलं हे ‘विचारांती नास्तिक’ झालेले गृहस्थ आहेत याची खात्री होते.

एकंदरीत गरीबी-श्रीमंतीतला विसंवाद त्यांना खूपच खटकत असल्याचे दिसते. या संदर्भातला एक प्रसंग मननीय आहे. तो या लेखाचा कळसबिंदू म्हणायला हरकत नाही. पुलं एका किराणा दुकानात गेलेत. तिथे गोड्या तेलासाठी मोठी रांग होती. आता त्या रांगेतल्या एका फाटक्या कपड्यातील मुलीचा नंबर लागतो. ती दुकानादारापुढे छोटी मातीची पणती ठेऊन दहा पैशांचे तेल मागते. त्यावर तो म्हणतो की दिवाळी अजून लांब आहे तरी पणती कशाला आणलीय? त्यावर ती धिटाईने सांगते की तिला ‘खायालाच’ १० पैशांचे तेल हवे आहे. त्यावर तो नकार देतो. मग पुलं मध्यस्थीने त्याला विचारतात की कमीतकमी किती पैशांचे तेल तो देऊ शकेल. त्यावर तो १५ पैसे म्हणतो. मग ते वरील ५ पैशांची सोय करतात आणि त्या मुलीला अर्धी पणतीभर तेल मिळते. याचा खोल परिणाम स्वतःवर कसा झाला ते त्यांनी विषादाने लिहीले आहे. या घटनेनंतर एखाद्या दिवाळीत पणत्यांची आरास पहिली, की ती १० पैसेवाली मुलगी त्यांना प्रकर्षाने आठवते. जणू तिचा प्रचंड आक्रोश त्यांना ऐकू येतो आणि ते हतबुद्ध होतात.

अशा असंख्य अनुभवांतून जाताना त्यांना अनेक प्रश्न मनाशी पडले होते, अस्वस्थता आली होती. शेवटी ते जगणे म्हणजे तरी काय या मूलभूत प्रश्नापाशी येऊन ठेपतात. असा मूलगामी विचार करता करता ते एकदा प्रश्नचिन्हाकडेच ( म्हणजे ?) निरखून पाहतात आणि त्यांना उत्तर मिळते ! या चिन्हाच्या आकड्याखालीच असलेले ‘टिंब’ म्हणजेच ‘शून्य’ हेच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असते असे सांगून ते या सुंदर लेखाची सांगता करतात.

तर असा हा ‘शून्याचा’ लेख. यात पुलंनी स्वतःला शून्य संबोधणे हा त्यांचा विनय आहे. मात्र हा लेख (आणि एकूणच हे पुस्तक) वाचताना आपल्याला त्या शून्याचा अर्थपूर्ण प्रवास घडतो, हे नक्की.

पुलंच्या निधनानंतर प्रकाशित झालेले हे पुस्तक मी आवडीने विकत घेऊन संग्रही ठेवले आहे. दर सहा महिन्यांतून मी त्यातला एखादा लेख पुनःपुन्हा वाचतो आणि तृप्त होतो. हे वाचन माझ्यासाठी एखाद्या ‘बूस्टर’ सारखे असते. त्यातल्या भाषेची खुमारी, लेखनातील सहजता, दंभावर प्रहार आणि वाचकाला अंतर्मुख करण्याची क्षमता हे सर्व काही लाजवाब आहे. तुमच्यातील काहींनी हे पुस्तक वाचले असेलच. तेव्हा तुमचेही प्रतिसाद जाणून घेण्यास उत्सुक !
*****************************************************************************************************
• टीप: हा मर्यादित पुस्तक परिचय करून देताना या लेखात जे काही विचार आणि मते लिहीली आहेत ती सर्वस्वी पु ल देशपांडे यांची आहेत याची नोंद घ्यावी.
• पुस्तक संदर्भ : एक शून्य मी , मौज प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २००६. साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसते नाव लिहिताना पुल (देशपांडे ) असेच पाहिजे.
'लक्ष्मण' वर कुठे अनुस्वार असतो ?
अनुस्वार वर म्हटल्याप्रमाणे वाक्यरचनेनुसारच.

पण त्याचा उच्चार pull सारखा होऊ नये म्हणून पुलं लिहितो ना आपण? पुढे देशपांडे लिहायचं नसेल तेव्हाच अर्थात. म्हणजे ' असं पुलं म्हणाले' असं समजा लिहायचं असेल तर 'असं पुल म्हणाले' असं लिहिणं बरोबर नाही ना? पु.लं. देशपांडे हे चूक, पु.लं. हेही चूक हे मान्यच आहे.

वावे
त्या दुव्यातील यास्मिन शेख यांचा लेख बघा
त्यात त्यांनी वि स खांडेकर हे उदाहरण देऊन पण हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
...

यापूर्वीच्या त्यांच्या एका लेखात अगं मधला अनुस्वार पण चुकीचा आहे ; अग असेच लिहिले पाहिजे असा मुद्दा आला होता.

वावे, कोट्याधीश पुल या पुस्तकाचं मुखपृष्ठ शीर्षकात 'पुल' असाच शब्द दाखवतं. मी पण बऱ्याचदा पुलं असं लिहितो, पण नुसता ल लिहिला की तो अर्धा उच्चारावा असा काही नियम नाही, त्यामुळे पुल हेच बरोबर असावं. तिथे अनुस्वार कधी होईल, तर तो पुले ह्या शब्दाचा बोली उच्चार पुलं असा झाला तर. जसं फुले - फुलं, असे - असं. इथे तसं काही नाही, त्यामुळे अनुस्वार नको.

मला असे वाटते:
त्यांचे लघुनाम लिहिताना आपण पुल एवढेच लिहायचे आणि ल चा उच्चार करताना ल वर आघात द्यायचा.

ह पा +११

मराठी आणि हिंदीत हलंत उच्चारांचा घोळ आहे. त्यामुळे असे प्रश्न येतात. शब्दांच्या शेवटी अकारांत अक्षर आले, तर हमखास त्यातला स्वर गाळून हलंत (व्यंजने) करायची या भाषकांना खोड आहे Wink

शब्दांच्या मध्येही हे प्रकार केले जातातच. चमचा - इथे म हा म् असा उच्चारला जातो.

यास्मिन शेख यांचा लेख वाचला होता मगाशीच. अजूनही मला 'पुलं' चूक वाटत नाही. पु.लं. चूक वाटतं. अर्थात माझ्या वाटण्यावर काय आहे? Happy

असा अजून कुठला शब्द आहे का, ज्याच्या अकारांत अक्षराचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आपण अनुस्वार देतो? (वरची ए चा अ होणारी उदाहरणे सोडून) सापडल्यास त्या नियमात आपण पुलंना बसवून टाकू. हाय काय नाय काय!

हा शेख यांचा आधीचा दुसरा संदर्भ बघा

https://www.loksatta.com/navneet/frequent-mistakes-in-writing-and-speaki...

"पण लेखनात ‘अगं, गं अशी रूपे सर्वत्र आढळतात. ‘ग’ या अक्षराचा आघातयुक्त उच्चार म्हणजे लेखनात ‘ग’वर अनुस्वार असा गैरसमज आपल्या मनात असावा! एक लक्षात घ्यावे, की हे शब्द अगं-अगे, ग-गे असे एकारयुक्त नाहीत. त्यामुळे लेखनात त्या अक्षरावर अनुस्वार देऊ नये. अग, ग असेच लेखन करावे."
...
या मुद्द्यावर आता मी थांबतो. Happy

लेखातलेच एक वाक्य
पुलं एका किराणा दुकानात गेलेत
हे
पुल एका किराणा दुकानात गेलेत
असे लिहिले तर कसेतरीच वाटेल.
पु.ल. एका किराणा दुकानात गेलेत
असे लिहिले तर ?

पु.ल. एका किराणा दुकानात गेलेत
बरोबर.
आजचा यास्मिन शेख यांचा लेख वाचेपर्यंत माझाही बहुतेकांप्रमाणे पुलं असाच गैरसमज होता
....
पु ल, व पु, ह मो... इ लघुरूपे करताना तेव्हाच दोन अक्षरांच्या मध्ये पूर्णविरामाची पद्धत पडली असती तर बरे झाले असते असे वाटते.

अजूनही मला 'पुलं' चूक वाटत नाही. पु.लं. चूक वाटतं. अर्थात माझ्या वाटण्यावर काय आहे? >>> Happy मलाही. कारण पुलं हे आद्याक्षर न राहता सहज वापरले जाणारे नाम का काय म्हणतात ते झाले आहे. वि.स. खांडेकरांचा तत्कालीन साहित्यात केवळ आद्याक्षरावरून अनेकदा उल्लेख होत गेला असता तर कदाचित त्यांच्याबाबतही हेच झाले असते.

बाकी नियम जर आहे तर आहे. पण या अनुस्वारामुळे नक्की काय उच्चार अपेक्षित आहे ते लगेच कळते हे ही खरे आहे.

महाराष्ट्राला आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाचं संबोधन आणि उच्चार अजून नीट ठरवता येत नाही. देशपांडे आता असते तर यावर काय म्हणले असते यावर एक स्पर्धा घ्यायला पाहिजे. Proud

खांडेकर हे खांडेकर असतात. फडके हे फडके. अजून माडगुळकर, माडखोलकर, शिरवळकर, गडकरी, अत्रे, शिरवाडकर, नेमाडे, शेळके, मर्ढेकर आणि इतर शेकडो आपले आपणच असतात आडनावाला चिकटून. देशपांडे हे देशपांडे का नाहीत? तर काहीतरी असेलच ना व्याकरणाच्या आणि प्रोटोकॉल वगैरेच्या बाहेरचं. हे म्हणजे उगाच विषय काढायचा आणि पुलं न वाचलेल्या लोकांना टेक्निकल ग्लिच मध्ये ओढायचं नाटक करून बोलायला लावायचं. पुलं वाचलेलेही लोक ओढले गेले तर उत्तमच. या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या लिखाणात विनोदाच्या पलीकडे अजून काय सापडतं का- हे भिंग घेऊन तपासणारे लोकही येतील कदाचित- हा बोनस.

मग हे तिघे मिळून- सो कॉल्ड 'विनोदी' लेखकाबद्दल गंभीर शहाणपणाने कसं बोलता येईल- याबद्दल लिहिणार बोलणार. नशीब फेसबुक वगैरे आहे. नाहीतर काय केलं असतं?

लेखक महोदयांना सॉरी, जरा वेगळा विषय वर बोललो असं लक्षात आलं.

पण मुळात देशपाड्यांनाच विषयांतराचं वावडं नव्हतं. त्यांना स्तुतीचंही वावडं नव्हतं. लाडकं व्यक्तिमत्त्व आपण नक्की कशामुळे झालो, हे त्यांना कळलं असतं तरी त्यांनी हरकत घेतली नसती. फारतर पेटी पुढे ओढून एक जुनी मनात बसलेली लकेर हलकेच गुणगुणले असते..

*फारतर पेटी पुढे ओढून एक जुनी मनात बसलेली लकेर हलकेच गुणगुणले असते..
>>> +११
हेच त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व !

https://www.maayboli.com/node/12152

नियम १ : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
नियम २ : य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
नियम ३ : नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
नियम ४ : वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

पुलंच्या राजकीय विचारसरणी संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख:

पुलंचे डावे-उजवे : निष्ठा, विचार व वर्तन याबाबतीत ते फारच काटेकोर व चोखंदळ होते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/6124

पुलंच्या राजकीय विचारसरणी संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख:>> वाचला एवढा काही चांगला वाटला नाही. म्हणजे नवे काही गवसले नाही. पुलंच लिखाण डोळसपणे वाचणार्यांना हे सर्व माहीत असतेच. असो हे माझे मत... Happy

लेख पुनःप्रकाशित असला तरी अक्षरनामावर नुकत्याच आलेल्या 'पुल शहरी मध्यमवर्गीय ब्राह्मणी पुरुषसत्ताक साहित्याचे प्रतिनिधी आहेत' अशा आशयाच्या लेखाला उत्तर ठरावा, त्या अर्थाने समयोचितच म्हणायला पाहिजे.

पुलंच्या निधनानंतर अनेक वर्षे अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजूनी हिरिरीने लिहिले जाते.
माझ्या मते हेच पुलंचे यश आहे.

वावे इज ऍबसोल्युटली म्हणिंग द राईट. पु.लं. म्हणाले चूकच, पण पुलं म्हणाले हे पुल म्हणाले पेक्षा बरोबर वाटतं, व्याकरणाच्या कुठल्या ग्रंथात काय लिहिलंय नॉटविथस्टॅंडिंग.
यास्मिन शेख यांचा लेख वाचला. त्यात 'पुल' किंवा 'विस' (without periods) वर भाष्य केलेलं दिसत नाहिये. त्यांनीच दिलेलं उदाहरण वापरायचं झालं तर 'विस महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक आहेत' लिहिलं तर 'कोणते हे वीस लेखक' असाच प्रश्न वाचणाऱ्याच्या मनात येईल.

मोरोबा यांचं बरोबर वाटतंय.
आता काय करावं / कराव ? शुन्यातलं टिंब टाळावं / गाळावं का नाही?
(कन्नड भाषेत लेखी 'कन्नड' लिहितात पण बोलताना 'कन्नडा' असा उच्चार करतात. तसेच शेवटच्या 'र' चा उच्चार 'रा' करतात. )

हे पुस्तक वाचायचं आहे .. काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक महाशय पुलंवर अतिशय संतप्त टीका करत होते , सभ्य भाषेत अर्थात ... पन्नाशीचे गृहस्थ असतील . त्यांना विचारलं , अहो पण तुमचा पुलंवर एवढा राग असण्याचं कारण तरी काय ? तर म्हणतात की - बरं झालं विचारलंत , मला हे सांगायचंच होतं कुणालातरी .. पुलंनी त्यांच्या " एक शून्य मी " या पुस्तकात मध्यमवर्गीय मराठी लोकांचा म्हणजे मध्यमवर्गाचा आणि मराठी माणसाचा दोघांचा अतिशय अपमान केलेला आहे , तेव्हापासून ते माझ्या मनातून उतरले आहेत , खरंतर ते एवढे ग्रेट लेखकच नाहीत त्यांना उगाच मोठं केलं आहे लोकांनी वगैरे वगैरे .

हे वाचून कपाळाला हात लावला . जेलसीचा प्रकार असावा , साहेबांचं लिखाण यदाकदाचित साभार परत आलं असेल .. पण मनातल्या मनात का होईना स्वतःची थेट पुलंशी तुलना करून पुलं खरंतर सुमार लेखक होते असं स्वतःला कन्विन्स करणं म्हणजे ... असो , उपमा सुचत नाही .

पण तेव्हा हे पुस्तक वाचून बघावं तरी नेमकं काय आहे अशी इच्छा झाली होती , त्यावेळी ते आउट ऑफ स्टॉक दिसत होतं , आता उपलब्ध झालं आहे .

अलीकडे आणखी एका स्वयंघोषित लेखकाच्या पुस्तकातली काही पानं वाचली फेसबुकवरच .. पुलं देशपांडे आणि ब्राह्मणी मानसिकता असं काहीतरी नाव असावं .... त्यात अगदी व्यक्ती आणि वल्लीतले विनोदी प्रसंग घेऊन त्यांची आपल्या दृष्टीकोनातून चिरफाड करून भयंकर अर्थ काढले आहेत . यांचा राग नाही येत , दया येते .. अशा दृष्टीने जगाकडे बघताना ते कसं दिसत असेल .. असो .

Pages