कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

Submitted by कुमार१ on 10 February, 2019 - 21:18

खनिजांचा खजिना : भाग ४

भाग ३ (पोटॅशियम) : https://www.maayboli.com/node/68990
*****************************************

आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो.

कॅल्शियम
हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.
कॅल्शियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत

sources-calcium-6376545.jpg

हे चार गटांत विभागता येतील:
१. दूध, दही ,चीज, इ.
२. हिरव्या पालेभाज्या
३. सोयाबीन्स व इतर द्विदल धान्ये, कठीण कवचाची फळे (nuts).
४. तसेच कॅल्शियमने ‘संपन्न’ केलेली काही धान्ये आणि सोयाबीन्स बाजारात मिळतात.

अशा विविध स्त्रोतांतल्या कॅल्शियमचे आतड्यांत शोषण मात्र कमीजास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्यावे. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. एकूण स्त्रोतांपैकी दुग्धजन्य पदार्थांतील शोषण चांगले होते. पण इतर स्त्रोतांतील कॅल्शियमच्या शोषणात मात्र काही अडथळे असतात.

प्रथम पालेभाज्यांचे बघू. पालक आणि काही इतरांतले कॅल्शियम हे oxalates शी संयुगित असते. त्यामुळे त्याचे शोषण खूप कमी होते. ब्रोकोली व कोबीतील कॅल्शियमचे शोषण तुलनेने बरे होते.

तर द्विदल धान्ये आणि nuts मधील कॅल्शियम हे phytatesशी संयुगित असते. त्यानेही शोषणाला अडथळा होतो.
कॅल्शियमचे शोषण हे वाढत्या वयानुसारही कमी होत जाते. बालके आणि मुलांत ते आहारातील प्रमाणाच्या तब्बल ६०% असते तर म्हातारपणी ते बरेच कमी होते. उत्तम शोषण होण्यासाठी आहारात त्याच्या जोडीने ‘ड’ जीवनसत्व असणे जरुरीचे असते. ‘ड’ आणि कॅल्शियम यांचा परस्परसंबंध जाणण्यासाठी वाचकांनी माझा ‘ड’ वरील स्वतंत्र लेख इथे वाचावा: https://www.maayboli.com/node/68623.

प्रौढ व्यक्तीत कॅल्शियमची आहारातील रोजची गरज १ ग्रॅम इतकी आहे. म्हातारपणी हे प्रमाण १.२ ग्रॅम करावे लागते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे हाडांना व दातांना बळकट करणे. हाडांच्या प्रथिनयुक्त गाभ्यावरती मिश्र खनिजांचा थर चढवला जातो. या मिश्रणात कॅल्शियमबरोबर फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट व फ़्लुओराइडचा समावेश असतो. यामुळेच हाडे व दात बळकट होतात.
इथे हे लक्षात घ्यावे की हा थर कायमस्वरूपी नसतो. रोज त्यातील काही भाग खरवडून रक्तात येतो आणि त्याचे जागी रक्तातून आलेल्या खनिजांचा नवा थर चढवला जातो. म्हणजेच रोज आपली हाडे ही अंशतः ‘कात’ टाकत असतात.

२. स्नायूंचे आकुंचन: या मूलभूत क्रियेमध्ये तो मध्यवर्ती नियंत्रकाची भूमिका बजावतो.
३. रक्त गोठण्याची क्रिया: जखमेनंतर रक्तस्त्राव थांबण्याची जी गुंतागुंतीची क्रिया असते त्यात त्याचाही वाटा महत्वाचा असतो.
४. याव्यतिरिक्त पेशींच्या मूलभूत क्रिया, एन्झाइम्सचे उत्तेजन आणि काही हॉर्मोन्सच्या कार्यात तो मोलाची मदत करतो.

कॅल्शियमची रक्तपातळी
ही पातळी ९-११ mg/dL इतकी असते. कॅल्शियमची शरीरातील अनेक महत्वाची कार्ये बघता ती कायम स्थिर ठेवावी लागते. त्यासाठी दोन हॉर्मोन्सचे योगदान खूप महत्वाचे असते:

१. पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) : मानेतील थायरॉइड ग्रंथीच्या बाजूस ४ छोट्या पॅराथायरॉइड ग्रंथी असतात त्यांत हे तयार होते. ते हाडातील कॅल्शियम रक्तात आणण्यास मदत करते.
२. ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप (Calcitriol) हे हॉर्मोन असते आणि ते मूत्रपिंडात तयार होते. ते आहारातील कॅल्शियमचे शोषण वाढवते आणि रक्तातील कॅल्शियमला हाडात जाण्यास मदत करते.

निरोगीपणात वरील दोन्ही हॉर्मोन्सचा सुरेख समतोल साधला जातो जेणेकरून कॅल्शियम हाडांत व रक्तात योग्य प्रमाणात राहते. आहारात कॅल्शियम व ‘ड’ ची दीर्घकाल कमतरता झाल्यास मात्र हाडांतील कॅल्शियम खूप खरवडले जाऊन रक्तपातळी टिकवली जाते पण त्याचबरोबर हाडे कमकुवत होतात. मुलांत या आजाराला मुडदूस म्हणतात.

कॅल्शियमची पातळी विविध आजारांत कमी व जास्त होऊ शकते. आता त्याचा आढावा घेऊ.

कॅल्शियम रक्तपातळी कमतरता
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता : यात आहारातील कॅल्शियमचे शोषण होत नाही.
२. PTH ची कमतरता
३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार : यात ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप तयार होत नाही.

या कमतरतेचे रुग्णावर परिणाम असे होतात:
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका, मानसिक स्थितीतील बदल आणि हृदयकार्यावर विपरीत परिणाम.

कॅल्शियम रक्तपातळी अधिक्य

ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. PTH चे अधिक्य
२. विविध कर्करोग : यांत PTH सारखे एक प्रथिन तयार होते आणि ते हाडांना पोखरून काढते. मग त्यांतील भरपूर कॅल्शियम रक्तात उतरतो.

अधिक्याचे परिणाम:
१. चेतासंस्थेचे बिघाड व मानसिक दौर्बल्य
२. मळमळणे, बद्धकोष्ठता
३. मूतखडे होणे
४. हृदयकार्यावर विपरीत परिणाम.
* * * * *

फॉस्फरस

कॅल्शियमचा जोडीदार असलेले हे खनिज. शरीरातील खनिजसाठ्यांमध्ये त्याचे स्थान कॅल्शियमच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा सर्वाधिक साठा अर्थातच हाडांत आहे. अल्प प्रमाणात ते रक्तात असते आणि तेथील त्याचे प्रमाण हे कॅल्शियमच्या सुमारे निम्म्याने असते.
पेशींतले फॉस्फरस हे उर्जा देणाऱ्या संयुगांच्या स्वरुपात असते. पेशीत तयार होणारी उर्जा ही ATP या ‘चलना’त साठवली जाते. त्यातील ‘P’ म्हणजे फॉस्फेट होय. तसेच DNA व RNA या मूलभूत रेणूंचाही फॉस्फरस हा घटक असतो.

त्याचे आहारातील चांगले स्त्रोत म्हणजे दूध आणि मांस. ज्या पदार्थांतून कॅल्शियम व प्रथिन उत्तम मिळते त्यांतून फॉस्फरसही आपोआप उपलब्ध होते. आहारातील कॅल्शियम :फॉस्फरसचे प्रमाण १.५ : १ या गुणोत्तरात असावे.


फॉस्फरसची रक्तपातळी

ही 2.5 to 4.5 mg/dL इतकी असते. मुलांत ती प्रौढापेक्षा अधिक असते कारण हे वाढीचे वय असते.
ही पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार. ती पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा कॅल्शियमशी अधिक प्रमाणात संयोग होतो. परिणामी त्या दोघांचे मिळून तयार होणारे ‘खडे’ शरीराच्या मउ भागांतही साठू लागतात.
*************************************************
चित्र जालावरुन साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. शाकाहारी असल्यामुळे ब१२ ची कमतरता असते. त्यामुळे ब१२ रोज घ्यावं असं ऐकलं. म्हणून घेत होते. कदाचित ८-१० महीने तरी घेतलीय रोज एक छोटीशी गोळी. कमतरता खरच होती की नाही हे मात्र माहिती करून घेतलं नव्हतं.
सध्या फिजियोथेरपी आणि काही पेनकीलर्स चालू आहेत.

स्व्तःच्या मनाने गोळ्या घेवू नका कोणी Sad

एकतर आपल्याला काही कळत नसतं, विनाकारण नको ते काहीतरी मागे लागायचं!

स्व्तःच्या मनाने गोळ्या घेवू नका कोणी >>>> हे अरण्यरूदन आहे विनीता. हल्ली इतके सर्रास झालेय ... घे गोळी आणि व्हा बरे. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी कशासाठीही. थोडे सहन करणे, नैसर्गिकरीत्या शरीराला बरे होऊ देणे, बाह्य उपचार करणे यासाठी वेळ / रजा नसते.
सामान्य व्यक्ती सोडाच पण मेडिकलच्या विद्यार्थिनीही अपवाद नाहीयेत ! शरीराचे काय आणि किती नुकसान झालेय हे कळेल तोपर्यंत उशीर झालेला असेल.

स्वप्नांची राणी -- माझे लिहीणे हे वैयक्तिक घेऊ नका. सगळीकडे हेच प्रकार आहेत. औषध विक्रेते अर्धे डॉ बनून एक - दोन गोळी कापून विकतात प्रिस्क्रिप्शन शिवाय. बोलून सांगून फायदा नाही.

@ कुमार १ --- रजोनिवृत्तीच्या वेळी येणारा / वाढणारा हाडांचा ठिसूळपणा येण्यात हार्मोन्स, कॅल्शिअम, फॉस्फरस यांचा परस्परसंबंध कसा असतो सांगाल का?

खरे आहे कारवी, त्या वेळी तेच योग्य वाटते. एका गोळीने काय होतेय असे म्हण्त आजार दाबायला पहातो.
काहीतरी भलतेच झालेले असते आणि तात्पुरते दमन केल्याने नंतर त्याची तीव्रता बरीच वाढलेली असते. Sad

रजोनिवृत्तीच्या वेळी येणारा / वाढणारा हाडांचा ठिसूळपणा येण्यात हार्मोन्स, कॅल्शिअम, फॉस्फरस यांचा परस्परसंबंध कसा असतो सांगाल का? ?>> मला पण हे जाणून घ्यायचे आहे. Happy

रजोनिवृत्ती व ठिसूळ हाडे

हे समजून घेण्यासाठी लेखातील हा मजकूर बघा:

*हाडांच्या प्रथिनयुक्त गाभ्यावरती मिश्र खनिजांचा थर चढवला जातो. या मिश्रणात कॅल्शियमबरोबर फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट व फ़्लुओराइडचा समावेश असतो.
इथे हे लक्षात घ्यावे की हा थर कायमस्वरूपी नसतो. रोज त्यातील काही भाग खरवडून रक्तात येतो आणि त्याचे जागी रक्तातून आलेल्या खनिजांचा नवा थर चढवला जातो.*

ही जी हाडे खरवडण्याची क्रिया असते, तिला इस्ट्रोजेन बरीच नियंत्रणात ठेवते. तसेच या हॉर्मोन मुळे आतड्यातून कॅल्शियम चे शोषण वाढते आणि लघवीतून उत्सर्जन कमी होते.
यावरून इस्ट्रोजेन हाडांच्या सशक्त पणास व शरीरातील Ca टिकवण्यास मदत करते ते कळेल. आता रजोनिवृत्ती नंतर हा फायदा जातो. मग खरवडणे अधीक प्रमाणात होते आणि Ca &P चा नाश होतो.

रोहिणी,
बाळंत झाल्यावर होणारी निव्वळ गुडघेदुखी तशी दुर्मिळ आहे. या प्रकारचा संधिवात हा autoimmune कारणाने होतो. त्याचा कॅल्शियम कमी होण्याशी संबंध नाही.

रोहिणी, यावर आपण योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे बरे. हा विषय या धाग्याच्या कक्षे बाहेरचा आहे.
शुभेच्छा !

दूध व कॅल्शियमची गरज : नवे संशोधन

मानवासाठी प्रौढावस्थेत दूध पिणे आवश्यक आहे का? हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सतत वैज्ञानिक काथ्याकूट होत असतो.

अलीकडील संशोधनातून चर्चेत आलेले काही मुद्दे :

१. प्रौढावस्थेत वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे रोज जेवढे कॅल्शियम खाल्ले जाईल, तेवढेच उत्सर्जित झाले पाहिजे.( शून्य समतोल पातळी).

२. सधन देशांत लोक भरपूर दुग्धजन्य पदार्थ खातात तर गरीब देशांत बरेच कमी खाल्ले जाते. इथे एक रोचक मुद्दा लिहितो. जेव्हा गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा शरीरातील त्याचे शोषणही बऱ्यापैकी कमी होते. या उलट जेव्हा अपुरे कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा तुलनात्मक शोषण अधिक होते.

३. गरीब देशांत दूध जरी कमी प्याले तरी २-३ धान्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यातून कॅल्शियमची गरज बऱ्यापैकी भागते.
४. अलीकडे दुधातून आपल्या पोटात जाणारी रसायने आणि हॉर्मोन्स हाही कटकटीचा विषय झालेला आहे.

५. हे सर्व पाहता प्रौढांसाठी दूध हे कॅल्शियमसाठी आवश्यक नाही. कॅल्शियमचे अन्य स्त्रोत ठीक राहतील.

६. सारांश: ज्यांना दूध आवडते त्यांनी प्या; ज्यांना आवडत नाही, त्यांना त्याचा आग्रह नको !

चांगला सल्ला डॉक्टर. पण मग विशेषतः महिलांना कॅल्शिअम डेफिशिएन्सी कोणत्या कारणाने निर्माण होते..बाळंतपण किंवा रजोनिवृत्तीनंतरच्या बदलांमुळे का?

प्राचीन,

* रजोनिवृत्तीनंतरच्या बदलांमुळे का?
>>>
होय, बरोबर. तेव्हाच्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे.

आपण कॅल्शियम युक्त आहार घेवू पण त्या मधून कॅल्शियम वेगळे काढून शरीर वापरेल ह्याची काय शास्वती.
शरीराने आहारातील कॅल्शियम वेगळे केलेच नाही तर
दूध,आवळे आवळे असे कॅल्शियम देणारे पदार्थ आहारात घेवून काय फायदा
बरीच लोकं आहार तज्ञान च्या सांगण्यावरून आहार घेतात आणि स्वप्नात जातात आता शरीराला सर्व पोष्टीक घटक मिळत आहेत.
पण तुमचे शरीर ते पोश्टिक घटक वेगळे करत असतील असे आपण गृहीत धरतो.
पण तसेच नक्की घडत का?

संजय,

* पण तुमचे शरीर ते पोश्टिक घटक वेगळे करत असतील असे आपण गृहीत धरतो.
पण तसेच नक्की घडत का?>>>

होय, आपल्या पचनसंस्थेत तशी सर्व सोय असते. जठरातील HCl हे आम्ल हे त्यापैकी एक महत्वाचे आयुध आहे.
पचनसंस्था निरोगी असेल तर अन्न व औषधांचे शोषण चांगले होते.

दुधाबद्दलची चांगली माहिती.
अजून एक शंका आहे. लहान बाळांना जर गाईचे दूध जास्त पाजले तर पुढे डायबेटीस व्हायची शक्यता वाढते का?

साद,
लहान बाळासाठी सर्वोत्तम दूध हे आईचेच असते. जर ३ महिने वयाच्या आत बाळाला गाईचे दूध दिले तर त्यातील काही अलर्जीक रसायनांचा त्रास होऊ शकतो.

जर अशा मुलांना वयाचे १ वर्षाचे आत एका विशिष्ट विषाणूचा संसर्ग झाला तर मग शरीरात autoimmune प्रतिक्रिया होते. त्यातून मधुमेह (प्रकार १) होऊ शकतो.

अर्थात यात बरेच जर-तर आहेत. अजून संशोधन चालू आहे.

कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या सतत घेऊ नये, मध्ये ब्रेक घ्यावा असं सांगितलं जातं. ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? असल्यास साधारण किती दिवसांनी ब्रेक घ्यावा?
तसेच मध्यंतरी मैत्रिणीकडून एक सल्ला देण्यात आला की, कॅल्शिअम सप्लिमेंट घेताना त्यात vit k असलेल्या घ्याव्यात. हे कितपत खरं आहे?

अनघा ,
चांगला प्रश्न.

१. Ca च्या गोळ्या घेत असताना किती काळ मध्ये खंड घ्यावा, याचे सर्वांसाठी एक उत्तर नाही. प्रकृती व आजार यानुसार संबंधित डॉ चे मत घ्यावे.

२. Ca आणि K जीवनसत्व : हा अलीकडील संशोधित विषय आहे. पारंपारिक Ca च्या गोळ्यामध्ये ‘ड’ जीवनसत्व घालतात. आता काहींत K ची भर घातली आहे. ती का, ते समजून देतो.

आपल्या हाडनिर्मिती पेशींमध्ये एक महत्वाचे प्रथिन असते. ते कार्यक्षम होण्यासाठी K ची गरज असते. आता जर आहारातून K व्यवस्थित मिळत असेल तर काही प्रश्न नाही. निरोगी व्यक्तीत समतोल आहार या सर्व गरजा भागवतो.
जेव्हा शरीरात Ca कमतरता होते तेव्हा त्याच्या गोळ्या देतात. त्या दीर्घकाळ दिल्यास रक्तवाहिन्यांत Ca चे थर साठू शकतात. ही प्रक्रिया पुरेसे K बरोबर दिल्यास मंदावते.

म्हणजेच K मुळे Caचा हाडांना होणारा फायदा चालू ठेऊन त्याचा रक्तवाहिन्यांवरील दुष्परिणाम रोखला जातो.

प्राचीन,
नाही होत. बिन्धास प्या !

धन्यवाद डॉक्टर!
कॅल्शिअम डेफिशिअन्सी असण्यात हेरिडीटरीचा भाग असू शकतो का, जसे लवकर केस पांढरे होणे, टक्कल पडणे किंवा हृदयविकार वगैरेंच्या बाबतीत असू शकतो ?
तसेच एकदा कॅल/ डी ची कमतरता निर्माण झाली की ती वारंवार होऊ शकते, ह्यात तथ्य आहे का?

हाडांच्या ठिसूळतेची अनेक कारणे असतात. त्यापैकी काही आजार जनुकीय बिघाडाने होतात.

*कमतरता निर्माण झाली की ती वारंवार होऊ शकते, ह्यात तथ्य आहे का
>>>

काही प्रमाणात आहे. मूळ बिघाडानुसार ठरेल.

Pages