जत्रा ( एक भयकथा ) संपूर्ण -२

Submitted by शुभम् on 22 October, 2018 - 23:20

पुढे चालू.....
.
मन्या व गण्या राम्याला घेऊन जात होते .त्या मशालीच्या पाठोपाठ . राम्या अजूनही बेशुद्ध होता . त्यामुळे दोघांनी मिळून राम्याला उचललं होतं . राम्याच्या ओझ्यामुळे त्यांची चाल मंदावली होती . मशाल असली तरी तिचा थोडा थोडका प्रकाश काळोखात हरवून जात होता . त्यातच वाटही व्यवस्थित नसल्याने सारखे धड-पडत होते दोघेही . ठेच लागून त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या . खोलीतून येताना भांड्याचं झाकण खाली पडलं होतं . त्यामुळे अजूनही थोडं थोडं रक्त उडत-उडत जाऊन तिथे पडत होतं . मात्र याची जाणीव त्यांना अजिबात नव्हती . त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की आपण येथून बाहेर पडणार.....।

" गन्या लगा तुझ्यामुळे आपण इथं फसलो , नाही तर लागा आतापतुर आपण ऑर्केस्ट्रात धमाल मस्ती करून घरी झोपलो असतो .....

" मन्या लगा मला तर काय माहित असं काय असेल म्हणून..

मात्र अचानक पुढे असलेली मशाल गायब झाली . दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला . इतका वेळ उजेडाला सरावलेले डोळे अचानक आलेल्या अंधारामुळे काही सेकंदासाठी आंधळेच झाले . मग हळूहळू थोड्या अंतरावर जत्रेसाठी लावलेले दिवे , गावातील घरातील प्रकाशाचा झगमगाट दिसू लागला आणि त्यांना हायसे वाटले . त्यांनी आपला वेग वाढवला व पटापट गावाकडे सरकू लागले . त्यांच्या जीवात जीव आला . त्यांनी देवाचे व त्या मुलीचे जिने स्वप्नात येऊन मार्ग दाखवला ,दोघांचेही मनापासून आभार मानले.

आता त्यांची खात्री पटली होती की भूत नावाची गोष्ट असते व त्याची भीती कितीही नाही म्हटलं तरी आपोआपच वाटते . पण आता ते सुरक्षित होते . जंगलातून बाहेर आल्यावर समोरच थोड्या अंतरावरती देऊळ होते . तिथेच बाजूला बसायला एक कट्टाही होता . त्याच कट्ट्यावर त्यांनी राम्याला झोपवले व दोघेही बसले.

" मन्या जा रं चांगलं बादली भरून पाणी आण, कसलं बेशुद्ध झालयं राम्या , त्याला शुद्धीवर आणायला पाहिजे .

" थांब गण्या . दोन मिनिटात आणतो .

मन्याने पाणी आणल्यावर त्याचा सपकारऱ्याने राम्याच्या तोंडावर मारले . तेव्हा राम्या शुद्धीवर आला .

गण्या म्हणाला "लेका राम्या तुला माहित हाय का आपण कसलं बेकार भुताच्या तावडीत सापडलो होतो .."

राम्या " पण पाद्री तर चांगलं भुत होत होतं ना
मुक्त झाला का ती पाद्री...."

मण्या " अरे कसला मुक्त होतोय तो . त्याचाच डाव होता सारा . दोन थेंब म्हणून किती रक्त काढलं बेशुद्ध करून कुणास ठाऊक ? "

राम्या " पण त्याला मारायचं तर त्यांना तेव्हाच आपल्याला मारलं नसतं का ? बेशुद्ध करून रक्त काढायचा काय उपयोग ?? "

गण्या " काय माहित काहीतरी प्रथा असेल बळी द्यायची वगैरे "

राम्या " अरे पण मग आपण वाचलो कसे ? "

मण्या " अरे गाण्याच्या स्वप्नात एक पोरगी आली बेशुद्ध असताना तिने सांगितलं काय करायचं ते ."

राम्या " कुठली पोरगी ?

गण्या " ते मला पण माहित नाही पण तिनं सांगितलं तसं केलं म्हणूनच आपण वाचलो . "

राम्या " गण्या रुमाल कशाला बांधलाय हाताला काय लागलं का काय ? "

गण्या " अरे बाबा काय सांगायचं तुला रक्ता वरती सुद्धा भुताटकी चालत होती रक्त हवेत उडत होतं .."

मण्या " गण्या जरा नीट बघ अजून पण रक्‍त पडतेच आहे..

अजुनही रक्त वाहत होतं जंगलाच्या दिशेने.

मन्या म्हणाला " पण ते कसं काय शक्य आहे ? आपण तर गावात आलो ना ? जंगलाच्या बाहेर "

राम्या म्हणाला " आपण कोणीतरी जाणकार माणूस गाठायला पाहिजे "

गण्या म्हणाला " आपण गावात आलोच नाही . गावात देऊळ कधी रिकाम नसतं . दोन-चार म्हातारी बारा महिने पडीक असतात देवळात . पण आता कोणीच नाही . "

" होय लगा आज ऑर्केस्ट्रा आहे पण कुठल्याच गाण्याचा आवाज येत नाही " मन्या म्हणाला

" अरे ती गोष्ट सोड कुत्रा , मांजर , किडा-मुंगी काय तरी दिसतय का तुला ..? " राम्या

" अरे तुम्ही सगळं सोडा रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत नाही . किती विचित्र आहे ...? " गण्या म्हणाला

" गण्या , मन्या दोस्तांनो ही चकवा तर नसेल ना चकव्यातून बाहेर कधीच जाऊ शकत नाही माणूस " राम्या

" चला आपण देवळात जाऊन मग कुठलं भुत देवळात येतंय ? " मन्या

" अरे येडाय काय तू ? ही देवळपण भुतानाचं बनवलेलं असणार ...? " गण्या

राम्या म्हणाला " मग आपण करायचं तरी काय ? आपण वाचणार तरी कसं ? "

पण अचानक कोलाहाल वाढला . चित्र-विचित्र आवाजा बरोबर अनेक मितीमध्ये अनेक घडामोडी सुरू झाल्या . पण त्यांच्या मानवी डोळ्यांना एवढंच दिसत होतं की सारे काही नष्ट होत होतं . व त्यांच्याकडे गोलाकार आकारात मध्ये येत होता तो काळोख , मिट्ट काळोख . तो काळोख त्यांच्याभोवती गोलाकार पसरत गेला होता . तो काळोख , त्यात काय होतं काय माहित ? पण जे काही होतं ते अमानवी , पाशवी आणि क्रूर होतं . जी काही शक्ती होती ती मानवी डोळ्यांना , मनाला , बुद्धीला न समजणारी होती . जे काही त्यांच्या मानवी ज्ञानेंद्रियांना जाणवत होतं ते त्या शक्तीचा थोडासा भाग होता . ज्याच्या पुढे मानव हतबल होता . इतका वेळ पुढे सरकणारा तो गोलाकार काळोख थांबला . कोलाहलाचा स्वर उच्च कोटीला पोहोचला . कोणतही हिंस्र श्वापद शिकारीला खाण्यापूर्वी मौज म्हणून तिच्याशी खेळ करते तोच खेळ आता त्या तिघांबरोबर होणार होता .

काळोखातून चित्र-विचित्र गलिच्छ स्वर उमटत होते . जे तिघांच्याही कानाला कर्णकर्कश्य वाटत होते . जो प्रसंग तिघांवर ओढवला होता तो अकल्पनीय होता . अचानक काळोखातील आवाज थांबला व त्याच बरोबर त्यांच्या आजूबाजूला एक भयानक दुर्गंधी पसरली . थंडी हळूहळू वाढू लागली व त्यांचे दात कडकडू लागली . नक्कीच काळोखातून कुणीतरी पुढे आलं होतं . त्यांच्यासोबत खेळ करण्यासाठी . आता हे शिकार करणार होतं . शिकारी ची मजा घेणार होतं . तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडले . त्यांना समोर एक भयानक , क्रूर , निर्घुन , बिभत्स मृत्यू दिसत होता . एक वेळ मृत्यू बरा पण हा अघोरी नरक होता . मृत्यू नंतरही अमर्याद काळासाठी दास्यत्व व भयानक वेदना.

भयानक शांतता जीवघेणी होत होती . त्यांच्या काळजाच्या ठोक्याच्या आवाजाने सुद्धा ते घाबरत होते . अचानक गण्याच्या हाताला हिसका बसला . त्याने पाहिलं राम्या काळोखाकडे खेचला जात होता .

" मन्या राम्याला ओढ "

मन्या जागचा हलला नाही . त्याच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही . तो स्तब्ध होता . एकाच अवस्थेत , पुतळ्यासारखा , आणि राम्या हवेत खेचला जात होता त्या काळोखाकडे . राम्याला मृत्यू समोर दिसत होता तो जिवाच्या आकांताने किंचाळत होता , ओरडत होता , वाचवा म्हणत होता पण एकटा गण्या काय करू शकत होता ?

अशाच वेळी मानवी भावनांचे रूपांतर होतं शक्ती मध्ये शस्त्रा मध्ये . तीच शक्ती , तीच शस्त्रे मानवाला बळ देतात कशाशीही युद्ध करण्याचे , कशाशीही लढा देण्याचे , तेच बळ गण्याच्या अंगी साकारले . त्याने एक जोरात हिसका देऊन राम्याला खाली ओढून घेतले . तेव्हा काळोखात एकच कल्लोळ माजला . नेहमी जिंकणाऱ्या खेळाडूला हरवल्यानंतर निघतो तसा आवाज असावा .

पुन्हा एकदा एक मोठी किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा निरव शांतता . या वेळी पुन्हा राम्या हवेत उडाला . ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे धाव घेते तसा राम्या काळोखाकडे ओढला जाऊ लागला . मात्र यावेळी गण्याची ताकद कमी पडली . राम्या काळोखात विलीन झाला आणि गणाच्या हातात राहिला त्याचा मनगटापासून तुटलेला हात . जो राम्याने गच्च आवळला होता गण्याच्या हाताभोवती . त्याच्यातून रक्त ठिपकत होतं .

पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची ....
. मन्या अजून पुतळ्यासारखा स्थिरच होता . गण्या त्याला ओरडत होता पण काही उपयोग नव्हता . पण तरीही गण्याने त्याचा हात सोडला नाही घट्ट दाबुन धरला . पण यावेळी गण्या काळोखाकडे खेचला जाऊ लागला .

आणि अचानक सर्वत्र प्रकाश चमकू लागला .नष्ट झाला काळोख आणि सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले . सामान्य माणसाला एवढचं दिसत होतं की जी काही दुष्ट शक्ती होती, ती नष्ट झाली होती . तिला नष्ट केलं होतं कुणी तरी चांगल्या शक्तीने . पण एका घटनेमागे हजारो वर्षापासून चालत आलेला चांगल्या-वाईटाचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता . त्या संघर्षात समावेश होता मानवाला न समजणाऱ्या गोष्टीचा . फक्त त्याला दिसत होता जय आणि विजय . पडद्यामागच्या घडामोडी त्याला न कळणाऱ्या होत्या .

आणि हवेत उडालेला गण्या धपकन खाली आपटला तो काळोख गेला होता . ते भुताटकी गाव गेलं होतं . ते पुन्हा जंगलात आले होते . मन्याही हालचाल करू लागला . पण हे सारं झालं कसं ? कुणी केलं ?

तेव्हाच त्यांच्या समोर राम्या उभा राहिला . त्याच्या सर्वांगाभोवती पांढर्‍या प्रकाशाचं वलय होतं . चेहऱ्यावरती समाधान होतं . तो राम्याचा आत्मा होता . राम्याचा मृत्यू झाला . पण त्याने दोघांचाही जीव वाचवला . दोघालाही अश्रू अनावर झाले . दोघेही मिठी मारायला पुढे सरले . पण शेवटी तो आत्मा होता .

" व्हायचं ते होऊन गेलं आता रडू नका " राम्या म्हणाला

" राम्या लगा माझ्यामुळे तू मेला , खरं म्हणजे मीच मरायला पाहिजे होतं " गण्या

" अरे गण्या घडायच्या असतात त्या गोष्टी घडून जातात स्वतःला दोष देऊ नको " राम्या

" लगा मला तर काहीच आठवत नाही "
मान्या रडत बोलला " गण्याने तुला वाचवायचा तरी प्रयत्न केला पण मी काहीच केलं नाही "

" असुदे हेच होतं माझ्या नशिबात तुम्ही स्वतःला दोष देऊ नका " राम्या

" अरे पण आपण जिवंतपणी त्याच्याशी सामना करू शकलो नाही , मृत्यूनंतर अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे त्यांना हरवलं . " गण्या

" अरे मी काहीच केलं नाही ही सगळी शेवंता ची जादू आहे "
राम्या

" काय " दोघेही एकदम ओरडले " म्हणजेच शेवताचं भूत आहे "

" अरे तुझ्या स्वप्नात आलेली दुसरी तिसरी कोणी नव्हती ती शेवंताच होती " राम्या

" होय गणेश मीच होते शेवंता "
गण्याने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पाहतच राहिला

" मला काहीच शक्य नव्हतं अरे शेवंता होती म्हणून हे शक्य झालं " राम्या

" मी फक्त तुला मदत केली तीही अगदी थोडीशी .तुझ्या मनात इच्छा होती तुझ्या मित्रांना वाचवायचे . म्हणूनच मी छोटीशी मदत करू शकले .आणखी एक गोष्ट आपण त्यांना नष्ट केलेलं नाही " शेवंता

" म्हणजे पद्रीचं भूत अजुनही आहे " तीघेही एकदमच म्हणाले

" हो अजून सारं काही जिथल्या तिथे आहे . तुम्हाला फक्त काही वेळ मिळालाय येथून जाण्यासाठी . आणि हे सारं काम जॉनचं नाही . " शेवंता

"जॉन म्हणजे ? "

" पाद्री तुमचा . त्याचं नाव जॉन . तो फक्त बाहुल आहे त्या विशाल शक्ती च्या हातातलं . जिचा काहीतरी उद्देश आहे . ज्या उद्देशासाठी मागच्या दीडशे वर्षांपासून मी या जंगलात भूत बनून फिरत आहे . माझी मुक्ती झाली नाही " शेवंता

" पण पादरी तर म्हणत होता की तुमच्या वडिलांनी डांबून ठेवलं होतं तुम्हाला . तुम्ही नंतर अन्नत्याग केला . त्यामुळे तुमचा मृत्यू झाला व तुम्ही मुक्त झाला . त्यानंतर पाद्रीच्या भुताने तुमच्या वडिलांना मारले . " गण्या

" बरोबर आहे तुमच्या वडिलांनी पाद्रीला मारलं नसतं तर हे सगळं झालं नसतं " मन्या

" कोण म्हणालं तुम्हाला बाबांनी जॉनला मारलं आणि मी आत्महत्या केली . हे सारं खोटं आहे " शेवंता

" पण मग झालं तरी काय होतं ? कोणी मारलं तुम्हाला नि तुमच्या बाबांना आणि पाद्रीलाही " गण्या

" मला एवढंच माहिती आहे की मला जॉनने मारलं . पण बाबांना व जॉनला कोणी मारलं हे माहीत नाही " शेवंता

" काय पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या

" हो "

" पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या
.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users