(व्यक्तिचित्रण स्पर्धेचा मजकुर वाचून हे लिहावे वाटले.)
तसं माझं लग्न दहावीला असतानाच ठरलं होतं म्हटलं तर वावगं होणार नाही. ठरलं होतं म्हणजे आमचं दोघांचंच ठरलं होतं. पुढे कॉलेजला असताना घरच्यांना थोडी कुणकून लागली होती पण त्यांची एकूणच प्रतिक्रिया पहाता त्यांचा फारसा विरोध नसावा हेही स्पष्ट झालं होतं. फक्त दोघांच्याही घरुन ‘अगोदर शिक्षण पुर्ण करा मग पाहू’ अशी अट घातली गेली होती. अर्थात त्यांनी नसतेही सांगीतले तरी आम्हादोघांचे ‘अगोदर पदवी’ मग लग्न हे ठरलंच होतं. दोघांनीही डिप्लोमा पदरात पाडून घेतला पण डिग्रीची ओढ दोघांनाही गप्प बसू देत नव्हती. पण आता परिस्थिती उलट झाली होती. घरचे लग्नासाठी मागे लागले होते. तिच्या घरचे तर जरा जास्तच. कारण आम्हा दोघांच्याही वयात फार तर दोन-तिन महिन्यांचेच अंतर होते. त्या काळाप्रमाणे तिच्या वडिलांना थांबणे अयोग्य वाटत होते. त्यामुळे दोन्ही घरुन “लग्नाचं पहा अगोदर. शिक्षण काय, आयुष्यभर सुरुच असते.” अशा सुचना सुरु झाल्या होत्या. त्यावेळी होस्टेलचं फारसं प्रस्थ नव्हते. अगदीच नाईलाज असेल तर होस्टेलचा विचार केला जाई. ॲडमिशन घ्यायच्या वेळी नातेवाईक ज्या शहरात असतील त्या शहराला प्राधान्य दिले जाई. (काका, मामा, मावशी आनंदाने शिक्षणासाठी मुलं ठेऊन घेत त्या काळी.) त्यामुळे तिने मुंबईला आणि मी पुण्याला ॲडमिशन घेतले. पुण्यात लहानपणापासूनच येणेजाणे असल्याने मला घरीच आल्यासारखे वाटले.
मी पुण्यात चांगलाच रमलो होतो. ते वयच वेडेपणा करायचं, झपाटून जायचं असल्याने आठवडाभर सपाटून अभ्यास आणि शनिवार रविवार दोघांनी सिंहगड, पुरंदर अशी पुण्याजवळची ठिकाणे पालथी घालायला सुरवात केली. लग्नानंतर कळालं की पाऊस रिपरीप पडतो. पण त्यावेळेस तो रिमझीम पडायचा. थंडीही कडाक्याची न पडता गुलाबी पडायची. एकूनच दिवस मखमली होते. एकमेकांच्या आवडीनिवडी पुरवण्यात कोण आनंद वाटायचा. मखमली दिवस फुलपाखरासारखे उडाले. दोघांनीही उत्तम मार्कांनी डिग्री मिळवली. पण मी स्कल्पचरला ॲडमीशन घेतले. म्हटलं निदान वर्षभर करु. मग आहेच जॉब किंवा व्यवसाय. लग्न वर्षभर लांबल्याने तिनेही मुंबईतच जॉब पाहीला आणि मीही मातीत रमून गेलो.
पावसाळा नुकताच सरला होता. निसर्ग खुलला होता. या शनिवार-रविवारी कोकणात उतरायचा प्लॅन होता. ती शनिवारी सिंहगडने पुण्यात पोहचली. पण तिला काही कामासाठी गावी जायचे असल्याने कोकण बारगळले. हातात फक्त शनिवारच असल्याने मग पानशेतला गेलो. चारपर्यंत भटकून, धाब्यावर जेवन उरकून पुण्यात पोहचलो. तिची तुळशीबागेतली किरकोळ खरेदी उरुकन तिला एसटी स्टॅंडवर सोडायला गेलो. बसला अजुन अर्धातास वेळ होता. त्यामुळे तेथेच गप्पा मारत बसलो.
बोलता बोलता तिने मधेच विचारलं “तुझी आणि पुलंची ओळख आहे ना रे?”
“हो, कागं?”
“माझं छोटसं काम करशील?”
“हो, सांग की.” मी तोंडभरुन होकार दिला तरी टेन्शन आलंच. पोरींचा काही भरवसा नाही, कधी काय मागतील सांगता येत नाही.
तिने पर्समधून पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ बाहेर काढले आणि म्हणाली “प्लिज, यावर पुलंची सही घेशील. मी मैत्रीणीला प्रॉमीस केलय तसं.”
माझा जीव भांड्यात पडला. “ह्या! एवढच ना. दे पुस्तक. पुढच्या शनिवारी येशील तेंव्हा सही झालेली असेल.”
तिने डोळे मोठे करत इतक्या कौतुकाने आणि अभिमानाने माझ्याकडे पाहीले की काय सांगू? तिच्या अश्या एका कटाक्षासाठी मी पुस्तकावरच काय पुस्तकाच्या प्रत्येक पानावर भाईंची सही घ्यायला तयार झालो असतो.(लग्नाअगोदरचा बावळटपणा हो, दुसरं काय?)
मी तिला गाडीत बसऊन दिले आणि रुमवर आलो. सवयीप्रमाणे सही घ्यायचे विसरुन गेलो. त्यादिवशी गावावरुन मित्र यायचा होता मला भेटायला. त्यामुळे त्याला आणायला कॉलेजवरुन सरळ एसटी स्टॅंडवर गेलो. पाच दहा मिनिटात गाडी आली. मित्र नेहमीप्रमाणे दोन्ही हातात भरपुर पिशव्या घेवून गाडीतुन उतरला. हा खुप जिवलग मित्र माझा. शाळेचे अन् याचे पटले नाही की गुरुजींशी ते त्यालाच माहित पण सातवीतून याने शाळेशी, सगळ्या गुरुजनांशी फारकत घेतली आणि वडीलांबरोबर शेतात नांगर धरला. आताही त्याच्या हातात असंच गावाकडून आणलेली भाजी भाकरी, इतर खाऊ, खरवस, लाडू, मध असं काही बाही असलेल्या पिशव्या होत्या. मला पाहूनच त्याला इतका आनंद झाला की भर स्टॅंडवरच त्याने भरतमिठी मारली. मलाही आनंद झाला होता. पण त्याने मिठी मारताच मला ‘भावी पत्नीने सोपवलेले’ काम आठवले. कंबख्तको भी किस वक्त खूदा याद आया.
“च्यायला, मेलो आता.” म्हणत मी मित्राला पिशव्या उचलायला घाई केली.
मित्र गोंधळून म्हणाला “कायरं, पुन्यात मिठ्या मारत नाय का कुनी दोस्ताला?”
“तू बस रे गाडीवर पटकन. रुमवर गेल्यावर सांगतो सगळं.” म्हणत मी बाईक एसटी स्टॅंडबाहेर काढली.
रुमवर पोहचलो. पुस्तक सॅकमध्ये टाकले. मित्राने आणलेला चिवडा थोडा थोडा खाल्ला आणि पटकन निघालो. खरं तर मध्ये थांबून भाईंना फोन करायला हवा होता ‘येतोय’ म्हणून पण टाळले. कॉलेजच्या आणि इतर बिनकामांच्या उद्योगांमुळे मी मालती-माधवला जवळ जवळ चार पाच महिने चक्कर मारली नव्हती. मध्ये ताईंनी निरोप पाठवला होता “भाईची तब्बेत बरी नाहीए” म्हणून पण त्यावेळीही काही तरी कामाच्या नादात राहूनच गेले होते. तसे दोन तिन वेळा फोन केला होता पण प्रत्येक वेळी भाई कसल्या ना कसल्या कामात असल्याने ताईच फोनवर आल्या होत्या त्यामुळे भाईंशी बोलणे झालेच नव्हते. मग आता कोणत्या तोंडाने फोन करणार होतो की ‘येतोय’ म्हणून. उशीर झाला होता. अभिनव चौकातून फुलांचा बुके घेतला, काही फळे घेतली आणि मग कुठेही न थांबता सरळ भांडारकर रोड गाठला. मित्राचे सारखे चालले होते “अरं पन चाल्लोत कुठं ते तं सांग.” पण त्याला काय सांगणार. गुरुजींनी ‘नको वैताग’ म्हणत याला वरच्या वर्गात चढवत चढवत सातवीपर्यंत आणला होता. नंतर यानेच ‘गुरुजींना दिला तेवढा त्रास खुप झाला आता हायस्कूलमधे सरांना वैताग नको’ म्हणत शाळाच सोडली होती. दोनशे पानांच्या पुस्तकाला तो ग्रंथ म्हणायचा. एव्हढं वाचून काय मिळतं तुमाला? असं विचारायचा. त्याला पुलंविषयी सांगून कुठं हसं करुन घ्यायचे, म्हणून त्याला “तू गप बस रे, अर्धा तासाचे काम आहे फक्त” म्हणत त्याला चुप करत होतो.
गाडी कशीबशी रस्त्यावरच लावली आणि मित्रासोबत मालती-माधवमध्ये घुसलो. पहिल्याच मजल्यावर भाईंचा फ्लॅट होता. मित्राला तोंड बंद ठेवायची सुचना देऊन मी बेल वाजवली. बेल वाजणार आहे हे अगोदरच माहीत असावे इतक्या पटकन काम करणाऱ्या बाईनी दार ऊघडले. तिच्या चेहऱ्यावर “आता कोण आलं?” असे भाव पाहून लगेच लक्षात आलं अगोदर कुणीतरी येऊन गेलं असणार. मी आत येऊन सोफ्यावर बसलो. मित्र आरामात सोफ्यावर टेकला. “कोणे गं?” म्हणत ताई बाहेर आल्या.
त्यांनी मला पाहील्यावर “आज वेळ मिळाला का तुला, की रस्ता चुकलास बाबा?” म्हणत पाणी आणायला सांगीतले. मी कसंनुसं हसलो.
माझं अवघडलेपण पाहून ताईच हसुन म्हणाल्या “अरे, होणारी बायको आणनार होतास ना दाखवायला? की केलं परस्पर लग्न?”
“नाही अजुन. असं कसं लग्न करेन तुम्हाला न सांगता?” मी जरा लाजतच म्हणालो.
“मग काही काम काढलय का?”
“नाही हो ताई. काम कसलं. आज सकाळपासुन भाईंकाकांना भेटावं वाटत होतं म्हणून आलो, इतकच.”
“बस थोडा वेळ. भाई बातम्या पहातायेत. येतील बाहेर इतक्यात.” म्हणत ताई उठून आत गेल्या. बुके आणि फळांची करंडी सोफ्यावरच राहीली. मला आश्चर्य वाटलं. मी जेंव्हा जेंव्हा मालती माधवला आलो होतो तेंव्हा तेंव्हा ताईंशी चार शब्द बोलून सरळ भाईंच्या खोलीत जायचो. बरेचदा ते हॉलमध्येच बसलेले असायचे. पण आज भाई हॉलमध्येही नव्हते आणि ताईंनी मला आत जावू न देता “बस थोडा वेळ” म्हणत बाहेरच थांबवलं होतं. मित्राची चुळबूळ सुरुच होती. आता मलाही अस्वस्थ झाल्यासारखं झालं. पाच दहा मिनिटेही मला तासाभरासारखी वाटली. इतक्यात ताई भाईंची व्हिल चेअर ढकलत बाहेर आल्या. हसल्या. मग त्यांनीच भाईंच्या तब्बेतीची माहीती सांगीतली. भाईंच्या फक्त डोळ्यात हालचाल दिसत होती. बाकी शरीराची फारशी हालचाल होत नव्हती. बोलणंही बंद होतं. मी नकळत उभा राहीलो. आवाक होऊन भाईंकडे पहात राहीलो. रस्त्यावरुन चालताना कल्पना नसताना पायाखाली खड्डा आल्यावर सगळ्या शरीराला जसा झटका बसतो तसा झटका मला बसला होता. मी गुडघ्यावर बसुन व्हिलचेअरच्या दांडीवर हात ठेवत विचारलं “कसे आहात भाईकाका?” खरं तर अत्यंत निरर्थक प्रश्न. पण मी मलाच अजुन सावरू शकलो नव्हतो. भाईंचं असं काही रुप कधी काळी पहावे लागेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझा प्रश्न त्यांच्या कानावर पडला होता की नाही माहीत नाही. बहुतेक त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण त्यांच्या डोळ्यांची फक्त केविलवाणी हालचाल झाली. आम्हा मित्रांना त्यांची ‘बटाट्याची चाळ’ अक्षरशः मुखोद्गत होती. अगदी संगीतकासकट. चाळीची व्हिडीओ कॅसेट आम्ही अगदी उगळली होती पाहून पाहून. भाईंची असंख्य रुपे डोळ्यापुढे येऊन गेली. ज्यांच्या घरी शब्द पाणी भरायचे त्यांच्या तोंडून एक शब्द ऐकायला जीव व्याकूळ झाला. ज्या जिभेवर सरस्वती ‘माहेरवाशीन पोरी’सारखी अवखळपणे खेळायची ती जीभ आता हलायलाही तयार नव्हती.
माझी अवघडलेली स्थिती सुनिताताईंच्या लक्षात आली. त्यांनी वेगळा विषय काढत विचारलं. काय आणलय रे? मी “काही नाही” म्हणत पुस्तक लपवलं. पण ते त्यांच्या लक्षात आलं. “सही हवीय की काय तुला? तू कधी पासून सह्या गोळा करायला लागला?” असं म्हणत त्यांनी पुस्तक मागीतलं. मी दिलं.
म्हणाल्या “मी पहाते, जमली तर करतील संध्याकाळी. नाहीच केली तर माझी चालेल ना?”
मी कसाबसा हसलो. मी अजून सगळ्यातून बाहेरच आलो नव्हतो. माझे डोळे सारखे भरुन येत होते. ताईंपुढे रडायचीही सोय नव्हती. मी बाहीने डोळे पुसत सोफ्यावर बसलो होतो. मित्र गोंधळला होता. काय चाललय हे त्याला काहीच समजत नव्हते. ताई काहीतरी ‘सरबत घेणार का?’ असं विचारीत होत्या. त्यांचा आवाज मला अगदी दुरुन यावा तसा ऐकायला आला. मी काय करतोय हे मलाच समजायच्या अगोदर मी ऊठलो आणि पंढरपुरच्या पांडूरंगाचे धरावेत तसे भाईंचे पाय धरले. दंडवत घातला आणि झपाट्याने चप्पल घालून बाहेर पडलो. खाली रस्त्यावर मित्राची वाट पहात थांबलो. तितक्यात तोही आला.
त्याने विचारलं “कोणी बाबा आहेत का रे हे? त्याच्या या प्रश्नावर मी एकतर खुप हसलो असतो नाहीतर रागावलो तरी असतो. पण मी त्याला म्हणालो “हो फार मोठे सत्पुरुष आहेत”
तो म्हणाला “चला, बरं झालं. तुझं पाहून मिही पाया पडलो ते”
दोन दिवसांनी ताईंचा निरोप आला. पुस्तक घेऊन जा म्हणून. सकाळी लवकर गेलो. दारातूनच पुस्तक घेतलं. येईन परत म्हणत मागे फिरलो. रुमवर येऊन पाहीलं तर पहिल्याच पानावर लाल स्केचपेनमधे भाईंची वेडीवाकडी सही होती आणि त्या खाली सुनिताताईंची निळ्या पेनमधे. अशा अवस्थेतही भाईंनी मला नाराज केलं नव्हतं.
दोन दिवसांनी मी एका वर्कशॉपच्या निमित्ताने पुणे सोडलं. आता महिनाभर तरी पुणे दिसणार नव्हतं. दहा बारा दिवस झाले असतील. सोमवार होता. रविवारचा कंटाळा अजुन गेला नव्हता. मित्राचा फोन आला “भाई गेले”
मला पुण्याला लगेच निघनं शक्य नव्हतं. एकच विचार मनात आला “भाई तुमचं ते हसरं, मिश्कील, रुपडं मनात ठसलं होतं तेच बरं होतं. का अशा अवस्थेत भेटलात?”
(फोटो आंतरजालावरून.)
निःशब्द....
निःशब्द....
ज्या दानशूराने आपलं सर्वस्व
ज्या दानशूराने आपलं सर्वस्व समाजकारणी लावलं असे पु . ल . शेवटी अशा परिस्थितीत सुध्दा स्वाक्षरी देतात या पेक्षा किमती ऐवज काय असावा . खरच खूप नशीबवान आहात .
पुलं म्हणजे हळवा कोपरा.
पुलं म्हणजे हळवा कोपरा. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात शालीजी. पंढरपुरच्या वारिला जाऊन आलेल्या वारकर्याचे पाय धरल्यावर विठू भेटतो म्हणतात तसंच काहिसं आहे. पु लं गेले तेव्हा मी सदाशिव पेठेत होते काही कामासाठी. तडक गाडी फिरवून डेक्कन वर आले तर गूड लक पर्यंत अख्खा भांडारकर रस्ता माणसांनी फुलून गेला होता. मला शिरता आलं नाही गर्दित. मनाला चुटपुट लागली आणि येऊन ढसढसा रडले.
माझी मुलगी तेव्हा तीन वर्षाची
माझी मुलगी तेव्हा तीन वर्षाची होती. तिला घेवून गेले होते मालती माधव मधे अंत्यदर्शनाला. पहिले व शेवटचे दर्शन होते ते तिच्यासाठी. तिला सांगितले, "नीट बघ. खूप मोठा माणूस आहे हा. तू मोठी होशीत तसं तुला त्यांची महती समजेल. तेव्हा, किमान पाहिलं तरी असं वाटेल कदाचित."
आज पुलंचा वाढदिवस. जयंती नाही
आज पुलंचा वाढदिवस. जयंती नाही म्हणत मुद्दाम. म्हणुन धागा वर काढतोय.
आज भाईंची खुप आठवण येते आहे.
लेख वाचून होताच शेवटी दीर्घ
लेख वाचून होताच शेवटी दीर्घ उसासा टाकला. अत्यंत ह्र्दयस्पर्शी आणि गहिवरून टाकणारी आठवण. इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अचानक अशा अवस्थेत पाहून त्या क्षणी तुम्ही स्वत:ला कसे सावरले असेल याची कल्पना करवत नाही. अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी सही दिली यावरूनच मोठी माणसे का मोठी झालेली असतात हे लक्षात येते.
वरती काही प्रतिक्रियांमधून उल्लेख झाल्याप्रमाणे तुम्ही नशीबवान आहात असेही वाटते. कारण यानिमित्ताने का असेना त्यांची शेवटची भेट झाली. ती झाली नसती किंवा प्रकृती अस्वस्थ्यामुळे भाईंची सही मिळालीच नसती तर अजून जास्त चुटपूट लागून राहिली असती. शाळेत असताना एकदा शरद तळवलकरांचे व्याख्यान होते. महाराष्ट्राच्या कला-साहित्य क्षेत्रातील हि मोठी माणसे पुणे-मुंबई पासून शेकडो शेकडो किलोमीटर अंतरावर आमच्या ग्रामीण भागात येणे हिच आमच्या दृष्टीने अहोभाग्याची गोष्ट होती. साहजिकच सगळ्या मुलांना त्यांची सही घ्यायची कोण उत्सुकता. व्याख्यान झाल्याझाल्या लगेचच मुलांचा गराडा त्यांना पडला. सहीसाठी मी दिलेला कागदपेन त्यांनी हातात घेतला खरा आणि आता त्यावर सही करणार तितक्यात अजून काहींनी पुढे होऊन आपापले कागद त्यांच्या आसपास धरले. ते पाहून ते थबकले. व्यथित झाले. अशी बेशिस्त असेल तर मी कुणालाही सही देणार नाही असे म्हणून सर्वांकडे नाराजीने पाहत त्यांनी तो कागद-पेन मला परत दिला.
त्यानंतर कित्येक वर्षे तो कोरा कागदच मी तसाच जपून ठेला होता. चुटपूट फार जिव्हारी लागते.
शाळेतल्या लहान मुलांकडून
शाळेतल्या लहान मुलांकडून शिस्त? कोणालाही सही न देणे फारच रुड वाटले.
हृद्य ! सुरेख लिहिलंय !
हृद्य ! सुरेख लिहिलंय !
धागा वर आणलात म्हणून आभार
किती हृद्य आठवण आहे. त्यांचे
किती हृद्य आठवण आहे. त्यांचे पाय धरायला मिळणं हेही खूप मोठं नशीब आहे.
खूपच अप्रतिम लिहिलंय आप्पा .
खूपच अप्रतिम लिहिलंय आप्पा . हा लेख वाचायचा राहून गेला होता
किती सुंदर लिखाण आहे! डोळॅ
किती सुंदर लिखाण आहे! डोळॅ भरुन आले वाचता वाचता! प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला! वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, पु, ल, हळवा कोपरा आहेत.
अचानक हि पोस्ट परत समोर आली.
अचानक हि पोस्ट परत समोर आली. आणि पुलं विषयी काहीही समोर आलं कि वाचल्याशिवाय राहवत नाही.
न रहावुन मी गेल्या वर्षी लिहून त्यांच्या सम्रीतीदिनाला लिहून काढलेली, एक माझी चुटपुट पोस्ट करते
पुलंच्या साहित्याशी माझी पहिली ओळख झाली ती चौथी पाचवीत असताना. आजोबांकडे त्यांच्या कथाकथनाच्या बऱ्याच कॅसेट्स होत्या . असामी असामी , अंतू बर्वा , हरितात्या ह्यांची पारायणं करून झाली. वाटायचं काय सुंदर आणि मजेशीर गोष्टी सांगतात . हळु हळू हे फार मोठे साहित्यिक आहेत ह्याची जाणीव झाली . त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली , अपूर्वाई , पूर्वरंग, खोगीरभरती अशा पुस्तकांशी ओळख झाली . ती फुलराणी, बटाट्याची चाळ , वाऱ्यावरची वरात ह्या नाटकांनी वेड लावलं. साधारण सातवीत असताना चतुरंग चा रंगसंमेलन कार्यक्रम होता आणि प्रमुख पाहुणे होते स्वतः पुलं. बरीच उत्कंठा होती त्यांना बघण्याची. सातवीआठवीच्या मुलांना असतो तसा मला पण स्वाक्षरी गोळा करायचा छंद होता. पुलंची सही घ्यायचीच असा पणचं करून ठेवला होता. परंतु कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी प्रयोजकांनी सांगितले कि पुलंकडे कोणीही स्वाक्षरी मागण्यासाठी किंवा भेटण्यासाठी गर्दी करू नये. मन थोडे खट्टू झाले पण म्हंटलं की ठीक आहे . मी काही कारणाने मागच्या दरवाज्याने बाहेर पडले आणि घाईघाईने जात होते. तर काळा चष्मा घातलेले एक आजोबा समोरून येत होते. ओळखीचे वाटले. ते माझ्याकडे बघून मिश्किल हसले. आणि मी जगाच्या जागी थिजले ."अरे हेच तर आपले दैवत! तासंतास ह्यांच्याच तर आवाजाने आपल्याला वेड लावले ! " लाखो विचार त्या क्षणी मनात येऊन गेले . ते गोंधळलेल्या माझ्याकडे माझ्याकडे बघत गोड हसत निघून गेले. आणि मी भानावर आले. मला चुटपुट लागून राहिली "माझ्याकडे ऑटोग्राफ बुक का नव्हतं ? उफ मला त्यांच्याशी दोन शब्द बोलावे हे कस नाही कळलं . त्यांना साधा नमस्कार पण नाही केला ." एक ना दोन हजारो विचारांनी कल्लोळ केला. पण तो सोन्यासारखा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला. दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मृतीला त्यांच्या जन्मदिवशी हटकून ह्या क्षणाची आठवण येते. त्यांचं एवढ्या जवळून दर्शन घडलं म्हणून खुप धन्य वाटतं पण ठोंब्यासारखं बघतच राहिले म्ह्णून स्वतःचा राग पण येतो. आज इतक्या वर्षांनी तो क्षण शब्दबद्ध करावासा वाटला.
Pages