पुण्यात काय कुठं

Submitted by राव पाटील on 18 July, 2018 - 01:35

इतर काही धाग्यांवर बेडेकर, पुरेपूर कोल्हापूर, वैशाली वगैरे बद्दल वाचून प्रश्न पडला की पुण्यात काय आणि कुठे खावं?
साधारण पुढील पदार्थ मला पुण्यात खायचे/ अनुभवायचे आहेत:
मिसळ
भेळ
मासे
मटण
चिकन
चायनीज
खान्देशी
कॉकटेलं

उगाच एखाद्या वाईट ठिकाणी खाऊन कायमचं त्या पदार्थासाठी नाक मुरडून बसायचे नाहीये म्हणून मायबोलीकरांच्या सूचनेनुसार अनुभूती घेण्याचे ठरविले आहे!

Group content visibility: 
Use group defaults

संभाजी पार्कातली भेळ, मानकर डोशाची चटणी डोशाहून जास्त छान असते>>+!११११११११११११११११११ तोपसु

अन्जली आता दुर्गाच्या पण खूप ब्रॅन्चेस आहेत. एक कमिन्स रोडला आहे. नक्की नाही सांगता येत पण कलमाडी शाळेकडून सी डी एस एस रस्ता आडवा लागतो तो ओलांडून समोरच्या गल्लीत गेलं की लगेच उजव्या हाताला.
आणि ए सिंहगड रोड ला खाऊ गल्लीत पण आहे त्यांची ब्रॅन्च.

आता दुर्गाच्या पण खूप ब्रॅन्चेस आहेत>> जाऊदेत मग .. पण आहे का त्यांची कॉफी मुळात चांगली ?

पूनम +१००००

भेळेसाठी - कल्पना भेळेला पर्याय नाही. लहानपणी त्या भेळेचे नाव दाढीवाल्याची भेळ असे होते. आता दाढीवाल्या आजोबांचा मुलगा, सून, नातू वगैरे ती चालवतात. टिळक रोड आणि सारंग अश्या दोन शाखा आहेत. टिळक रोड बेस्ट.
आता मुंबईत राहून खूप वर्ष झाली पण तरी मुंबईतली फुसक्या चुरमुर्‍यांची, मसालेयुक्त आणि दाण्यांचा मागमूसही नसलेली भेळ बोर होते.
आजवर तरी माझ्यामते जगातली उत्तम भेळ कल्पनाचीच.

पाणीपुरी - आजीची पापु, कल्पना भेळेच्या बाजूला. इथेही रगडा घालतात पापुमधे पण त्यांची टेस्ट लाजवाब आहे.
रगड्याला वरण म्हणत पुण्यात पापुमधे वरण घालतात म्हणणार्‍यांना वरण म्हणजे काय माहिती नसावे किंवा मग तूर आणि चणा डाळीतला फरक कळत नसावा किंवा पुणे आहे घाला शिव्या असा खास मुंबईकर अ‍ॅटिट्यूड ठासून भरलेला असावा.

बादशाहीचे पोटॅटो टोस्ट म्हणून प्रकरण असते. त्याबरोबर ताकातली चटणी मिळते. तिथेच खा किंवा पार्सल नेणार असाल तर चटणीसाठी डबा घेऊनच जा. प्लास्टिकबंदीनंतर चटणी देत नाहीत डब्याशिवाय. त्या चटणीशिवाय मजा नाही.
सांबारात इडली डुंबावी तसे ते पॉटेटो टोस्ट त्या चटणीत डुंबल्यावर एक तुकडा तोडून तोंडात टाकल्यावर जी अनुभूती असते ती कमाल असते.

खाऊखुशाल सुगरण

हॉटेलमध्ये जाऊनही सात्विक, चविष्ट आणि घरगुती चवीचे खाद्यपदार्थ खायचे असतील किंवा जेवण करायचं असेल तर एक चांगलं ठिकाण शहरात अगदी मध्यवर्ती भागात आहे. या ठिकाणाचं नाव ‘सुगरण.’ नारायण पेठेत केळकर रस्त्यावर केसरी वाडय़ाच्या शेजारी असलेलं ‘सुगरण’ पूर्वी ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना नव्या स्वरूपात आणि नव्या दिमाखात सुरू झालेल्या ‘सुगरण’मध्ये खूप बदल झाल्याचं जाणवतं. या केंद्राचं स्वरूप बदललेलं असलं तरी घरगुती चव जशी पूर्वी होती तशीच आजही आहे आणि हेच इथलं खास वैशिष्टय़ं.

खास महाराष्ट्रीय पद्धतीने तयार केलेले आणि मराठी चवीचे पदार्थ ही ‘सुगरण’ची खासियत. ‘खास महाराष्ट्रीयन चवीकरिता’ अशी पाटी आपल्याला ‘सुगरण’च्या दारातच दिसते. चवीची ही खासियत प्रत्येक पदार्थाच्या चवीत जपली जाते. अर्थात अन्य गावांमधून, प्रांतांमधून शिक्षणासाठी आलेला तरुण वर्ग लक्षात घेऊन, त्यांच्या मागणीनुसार तवा पुलाव किंवा मिसळ असेही दोन-तीन चमचमीत पदार्थ इथे दिले जातात. इतर सगळे पदार्थ खास घरगुती चवीचे. मुकुंद भागवत हे या केंद्राचं व्यवस्थापन बघतात. या क्षेत्रातला त्यांचा अनुभव चाळीस वर्षांचा आहे. केटरिंग हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. वडील दत्तात्रय भागवत हा व्यवसाय करत होते. गरवारे महाविद्यालयात शिकत असतानाच मुकुंद यांनी व्यवसायात कामाला सुरुवात केली आणि त्यातून खूप अनुभव त्यांना मिळाला. टिळक स्मारक मंदिरातील उपाहारगृह ते गेली चाळीस र्वष चालवत आहेत.
इथे मिळणारी किंचित कमी तिखट पण चटकदार मिसळ असेल किंवा चविष्ट बटाटे वडा असेल.. प्रत्येक पदार्थाची चव दाद मिळावी अशीच असते. इथली साबूदाणा खिचडीदेखील प्रसिद्ध आहे आणि खिचडी काकडी ही डिशही भरपूर खपाची आहे. मिसळ, दही मिसळ यांच्या जोडीला पोहे, उपमा, इडली सांबार, बटाटे वडा चटणी, बटाटे वडा सांबार असे नाश्त्याचे पदार्थ इथे मिळतात. सकाळी अकरानंतर इथे गर्दी सुरू होते ती जेवायला येणाऱ्यांची. ही गर्दी दुपारी तीनपर्यंत कायम असते. जेवायला आलेल्यांचे पहिले लक्ष जाते ते समोरच्या भिंतीवर. कारण तेथे आजचा मेनू म्हणजे मुख्यत: त्या दिवशीच्या भाज्या, उसळी यांची माहिती लिहिलेली असते. भाज्या, उसळी रोज बदलत्या असल्यामुळे आल्याआल्या आधी आपल्या आवडीची भाजी निवडायची आणि मग ऑर्डर द्यायची हा इथे येणाऱ्यांचा शिरस्ता. ज्यांना जेवण करायचं असतं, त्यांच्यासाठी इथे साठ रुपयांत राईस प्लेट दिली जाते. त्यात तीन पोळ्या, डाळ-भात आणि आवडीनुसार दोन भाज्या हे पदार्थ असतात. फक्त पोळी-भाजी घेतली तर तीन पोळ्या आणि दोन भाज्या येतात. या शिवाय इथली पिठलं भाकरी प्रसिद्ध आहे. तसंच मटकी-भाकरी, वांग-भाकरी यांचाही ऑप्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गरम गरम पराठेही इथे मिळतात. आणखी दोन लोकप्रिय डिशची ओळख करून द्यावीच लागेल. कढी- खिचडी आणि तवा पुलाव. मुगाच्या डाळीची खिचडी आणि मराठी चवीची कढी या डिशला इथे खूप मागणी असते. सोबत पापड, लोणचं वगैरेही असतंच. हे सगळे पदार्थ इथे रोज दिवसभर मिळतात. इथली पुरण पोळी, गुळाची पोळी असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थही अनेकांना आवडतात.
‘सुगरण’मध्ये कोणताही पदार्थ दिवसभरासाठी एकदाच करून ठेवला असं केलं जात नाही. जसजसे पदार्थ लागतात, ऑर्डर येते तसे ते बनवले जातात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला ताजा आणि गरम पदार्थ मिळतो. पोळ्या, पराठे हे तर थेट तव्यावरून आपल्या ताटात येतात. त्यामुळे ताजे, गरम पदार्थ आणि त्याला घरगुती चवीची जोड.. खवय्याला आणखी काय हवं..

सुगरण
कुठे : नारायण पेठेत, केळकर रस्त्यावर ‘केसरी वाडय़ा’शेजारी
केव्हा : रोज सकाळी आठ ते रात्री दहा, रविवारी दुपारनंतर बंद

वरील पोस्ट मध्ये मी ही जाहीरात केलेली नाहीये , तर भूक लागली असेल तर पटकन जवळपास कुठे बघता यावे म्हणून हे कॉपी पेस्ट केले आहे. आधी मी एकदा काही वर्षापूर्वी गेले होते, तेव्हा छोटे दुकान होते. आता हे मोठे झाले असेल .

खाऊखुशाल कृपासिंधू

थाळीतल्या पदार्थाकडे आता वळू या. गरम गरम, अगदी तव्यावरची पोळी आणि तेलकट नसलेली फुगलेली पुरी इथून आपण जेवणाची सुरुवात करू शकतो. थाळीत मटकी किंवा बिरडय़ा किंवा मटार, हरभरा, चवळी आदींपैकी एक उसळ असते. फ्लॉवर-बटाटा रस्सा, भेंडी फ्राय, भरलं वांगं, व्हेज कुर्मा, छोले, डाल पालक, मिक्स व्हेज, पालक पनीर यापैकी दोन भाज्याही थाळीत असतात. वेगवेगळ्या चवींच्या कोशिंबिरी ही देखील इथल्या थाळीची खासियत आहे. कैरीची डाळ, खमंग काकडी, बिटाची कोशिंबीर, कांदापात कोशिंबीर आदी अनेक प्रकार इथे चाखायला मिळतात आणि आपण न कळतच वा अशी दाद देऊन जातो. कोथिंबीर भात, मसाले भात, कोबी राइस, जिरा राइस, बिर्याणी यापैकी एक भाताचा प्रकारही थाळीत असतो. शिवाय जेवणाच्या शेवटी येणारा वरण-भातही आवर्जून घ्यावा असाच. दहीवडा, व्हेज कटलेट, मटार करंजी, कांदा भजी, छोटे बटाटेवडे यापैकी एखादा पदार्थ फरसाण म्हणून या थाळीत दिला जातो. शिवाय पापड आणि ताकही असते. नरसोबाची वाडी येथील बासुंदी तसंच श्रीखंड, आम्रखंड, आमरस, गुलाबजाम, मुगाचा शिरा यापैकी कोणताही पदार्थ आपण स्वीट म्हणून घेऊ शकतो. अर्थात ते आपल्या रुचीनुसार-आवडीनुसार. शिवाय चटण्या, लोणची हेही केवळ इथे शोभेपुरतं नसतं तर तेही चवीष्ट असतं. सगळेच पदार्थ वाखाणण्यासारखे आणि त्या त्या चवींचे असले, तरी आमटी, आळूची भाजी, कोशिंबिरींचा उल्लेख करायलाच हवा.
थाळीत जे पदार्थ द्यायचे ते दर्जेदार द्यायचे आणि जेवणाऱ्या प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे, हा राहुल यांचा आग्रह असतो आणि तो आपल्याला त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही सतत जाणवतो. ते स्वत: चोखंदळ आणि खवय्ये असल्यामुळे प्रत्येक पदार्थ चांगलाच बनेल, ग्राहकांना चांगली सेवा मिळेल याकडे तेोणि गौरी हे दोघेही लक्ष देत असतात. ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण थाळी संपवणं शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी इथे दरामध्ये सवलतही आहे. शिवाय ज्यांना जेवायला यायला जमत नाही अशांसाठी लंच बॉक्स, टिफिन यांचीही सोय लवकरच सुरू होत आहे. ‘कृपासिंधू’ची जागा प्रशस्त असल्यामुळे इथल्या पार्टी हॉलमध्ये वाढदिवस आणि अन्य अनेकविध छोटे समारंभही इथल्या थाळीसह छान रंगतात. जळजळीत मसाले किंवा भरपूर तिखट न वापरता तयार केलेले आणि तरीही चवदार पदार्थ या थाळीत मिळत असल्यामुळे इथे आलेला प्रत्येक जण थाळीचं कौतुक करतच बाहेर पडतो, हे सगळ्यात महत्त्वाचं.

कृपासिंधू
• कुठे – ६७२ नारायण पेठ, मोठी नूमवि प्रशालेसमोर
• कधी – सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० आणि सायं. ७:३० ते रात्री १०:००
• संपर्क- २४४४४२२३

हे वरचे दुसरे. खरे तर मला अगदी घरगुती जेवायला आवडते, कारण पुण्या बाहेर मिळणार्‍या पंजाबी चवी-ग्रेव्हीतल्या त्याच त्याच भाज्या खाऊन जाम वैताग आलाय. काय माहीत कधी इथे जाणे होतेय ते.

डीपी रोडची खाऊगल्ली

कर्वेरोड-कोथरूड-पौड रोड या परिसरात कुठंही असाल आणि पोटभर खादाडी करायची असेल, तर कोथरूडच्या न्यू डीपी रोडला भेट द्यायला हवी. इथं भन्नाट खादाडीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भजी, मसालापाव, वडापाव, कोल्ड चॉकलेट, क्रिमरोल, पेस्ट्री असे सगळे पर्याय आहेत. मोठा रस्ता असल्यानं निवांत गाड्या लाऊन तुम्ही खाऊ शकता. मुक्ताईतला चीज मसाला पाव आणि कॉफी हे कॉम्बिनेशन पोटभर होतं. क्राऊन बेकरीतही खाण्याचे खूपसारे पर्याय उपलब्ध आहेत. खिशात पन्नासाची नोट असेल तरी मस्त खाणं होईल.

हादडा पोटभर रोल

लज्जतदार रोल्स खायचे असतील, तर नळस्टॉपचा पेस्ट्री कॉर्नर या जागेला पर्याय नाही. वीस ते तीस रुपयांत मंचुरियन रोल, रशियन रोल, सिंगापूर रोल, पनीर सबमरीन, व्हेज बर्गर, व्हेज चिज टोस्ट आहेत. पन्नास रुपयांत पनीर टिक्का रोलतर भन्नाटच. बजेट शंभरापर्यंत असेल तर दोन रोल आणि एक पेस्ट्री खाऊ शकता. मित्रमैत्रीणींना बर्थ डे ट्रीट देणंही इथं परवडून जातं. साधारण तीस-पस्तीत रुपयांत वेगवेगळ्या पेस्ट्री आणि पुडिंग्ज इथं उपलब्ध आहेत.

पावभाजी आणि पुलाव

छत्रपती राजाराम पुल किंवा सिंहगड रोडवर असाल तर हिंगण्याच्या चौकातली भन्नाट पावभाजी आणि पुलाव टेस्ट करा. हिंगणे खुर्दच्या चौकात शिवसाई पावभाजी सेंटर संतोषी मातेच्या मंदिराला लागूनच आहे. पन्नास रुपयांत पावभाजी आणि थोड्याफार त्याच किमतीत पुलावही मिळतो. चौकात सिग्नलला थांबलात, की पावभाजीचा दरवळ तुम्हाला इथं थांबायला भाग पाडेलच. कोणताही एक पदार्थ खाल्लात तरी उदरभरण होतंच. राजाराम पुलाच्या डीपी रोडवर संध्याकाळी शेगावच्या कचोरीचा फूड ट्रक मातोश्री हॉटेलसमोर लागतो. दहा रुपयांत साधी कचोरी तसंच बर्गर कचोरी, कचोरी चॅट, दही कचोरी हे पर्यायही आहेत.

साउथ इंडियन तडका

खिशाला परवडणाऱ्या नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं काही आहिल्यादेवी शाळेजवळच्या 'मी पुणेकर'मध्ये उपलब्ध आहे. खास दाक्षिणात्य पदार्थांपासून पोळी भाजी ते पुलावापर्यंत सगळं काही इथं मिळतं. तीस रुपयांपासून त्याच्या किमती आहेत. एकदा आलात, की पोटभर खाणं होणार एवढं नक्की. पुलाव आणि मिसळ इथली खासियत आहे.

सुगरण स्वयंपाकघर

नावातच सगळं काही आलं. शनवारातल्या खडीवाले वैद्यांच्या दवाखान्यासमोर शनिवार-नारायण चौकात हे महाराष्ट्रीय आणि पंजाबी खाद्यपदार्थ मिळणारं स्वयंपाकघर आहे. अस्सल घरगुती जेवणाची चव इथं तुम्हाला मिळेल. होस्टेलाइट्स आणि विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम जेवणाचा स्पॉट. रोजचा मेनू मस्तच असतो. शिवाय ऑर्डर दिल्यावर मिळणाऱ्या गरमा गरम पोळ्यांची लज्जत न्यारीच.

सावजीज् फूड

शनिवार पेठेतच सावजीज् फूड हा हटके स्पॉट आहे. बिर्याणी, बर्गरपासून हलक्या नाश्त्यापर्यंत सगळं काही इथं उपलब्ध आहे. वर्तक बागेत जॉगिंगला येणाऱ्या मंडळींसाठी इथं नाश्त्याची वेगळी व्यवस्था आहे. दुपारपासून पोटभरीचं अन्न उपलब्ध होतं. चाळीस रुपयांपासून इथे खाण्याचे पर्याय आहेत.

सद्गुरू मिसळ

जंगली महाराज मंदिराशेजारीच असणारा मिसळीचा हा उत्तम स्पॉट. झणझणीत मिसळीसह इथं सांबार पोहे, पुलाव आणि बरंच काही मिळतं. खाद्यपदार्थांच्या किमती चाळीस रुपयांपासून पुढं आहेत. इथल्या एनसीआरच्या गल्लीत मालगुडी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन डिशेस उत्तम मिळतात. चव आणि दर्जाला तोड नाही.

शंकर महाराज अन्नछत्र

सहकारनगरपासून पुढं कुठंही जाणार असाल तर या ठिकाणा पर्याय नाही. वीस रुपयांमध्ये पोटभर जेवण या अन्नछत्रात मिळतं. दर्जेदार आणि चवीचं जेवण हे तिथल्या पदार्थांचं वैशिष्ट्य.

पुणे स्टेशन फोटो झिंको गल्ली

स्टेशनला उतरलात वा कुठूनही आलात तर हमखास पोटभरी करण्यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत जाच. कमी पैशात स्ट्रीट पोळी-भाजीचा आनंद इथं लुटता येतो. वीस-पंचवीस रुपयांपासून पुढं भाजी आणि पोळीचे अनेक पर्याय इथं आहेत.

एसपीच्या परिसरात

एसपी कॉलेज आणि ग्राहक पेठ या परिसरात खाण्याचे भन्नाट पर्याय आहेत. ग्राहकपेठेशेजारच्या गल्लीत 'पाच रुपये वडा पाव' असंच नाव असणाऱ्या ठिकाणी वडापाव आवर्जून खावा. ग्राहक पेठेला लागून असलेल्या खादाडीच्या दुकानातही पाच रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत उत्तम रोल, सामोसा, ब्राउनी, पॅटिस असं बरंच काही उपलब्ध आहे.

हडपसरची खाद्यभ्रमंती

हडपसर, मगरपट्टा, लोहिया उद्यान इथं कुठंही असलात, तरी पोटभर खाण्याचे पर्याय आहेतच. हडपसरची शिवम भेळ प्रसिद्धच. भेळेसह इथं खिशाला परवडेल अशा किमतीत (तीस ते चाळीस रुपयांपासून) डोसा, उतप्पा हे पर्याय आहेत. भेळ, पाणीपुरी, दहीवडा परवडेबल किमतीत आहेत. मगरपट्टा चौकात लोहिया उद्यानाजवळ एस. कुमार वडेवाले इथला 'जम्बो वडा' प्रसिद्ध आहे. पंधरा रुपयाचा हा वडापाव. दोन खाल्ले की पोट भरलंच समजा! पॅटिस आणि सामोसाही याच किमतीत आहेत. मगरपट्टा रोडवरच्याच कालिका डेअरीतला एक मिल्कशेक घेतलात की पोट फुल! मगरपट्ट्यातलंच कॅफेलिशिअस, गपशप एंड भन्नाट प्रकरण आहे. तीस रुपयांत मिळणारी सँडविचेस चवीला ए वन. रोल, कबाब हे पर्याय पन्नास रुपयांपासून आहेत.

खाऊखुशाल सुगरण
मधले
"आल्याआल्या आधी आपल्या आवडीची भाजी निवडायची आणि मग ऑर्डर द्यायची " हे वाचून क्षणभर थबकायला झाले. Proud

ते डहाणूकर च्या जवळ एक भाजीचं दुकान आहे. तिथे जरा भयंकर(पण हेल्थच्या दृष्टीने चांगल्या) भाज्या(पडवळ, शेपू वगैरे) असतात असे नवरा म्हणतो. तो तिथून बरेचदा जातो तेव्हा बोर्ड वर वाचतो.चवीला चांगल्याच असतील.
आम्ही गुरुगणेश नगर जवळ हर्षद च्या भाज्या खाल्ल्या आहेत.चांगल्या होत्या.

टिळक रोडवर - न्यू रिफ्रेशमेन्ट हाऊस -म्हणून आहे ते खूप छान आहे.

प्रभा विश्रांतीगृहची उपवासाची कचोरी आणि बटाटेवडा उत्कृष्ट असायचे. मात्र अगदी मोजक्या प्रमाणात बनत असल्याने खायला मिळाले तर तुमचे भाग्य!
नी, +1 आजींची पाणीपुरी फार छान!
तसा एक नॉस्टेल्जियामुळे आवडता पदार्थ म्हणजे एसपीच्या मागच्या एस एस कँटीनमध्ये मिळणारा ब्रेड मसाला!

Wow किती मस्त मस्त वर्णनं .... मला पुण्यात जायची संधी फक्त एकदा च मिळालेली. मगरपट्टा भागात माझी ऑफिस ची कॉन्फरन्स होती... मग वेळ होता म्हणून मी mg रोड वर फिरले होते. तिथे एक बेकरी आहे. नाव आठवत नाही.... तिकडे मी बर्गर खाल्लेला. व्हेज च कारण त्या दिवशी चतुर्थी की काही होतं... पण छान होतं फूड....

मला काय वाटतं की, मी मुंबई ची , मी पुण्याचा वगैरे मनात ठेवून आपण दुसऱ्या ठिकाणच्या हॉटेलात किंवा दुकानातील फूड ट्राय केले तर तुलना होणार च !

म्हणजे आमच्या मुंबईत असं मिळतं, आमच्या नाशिकला हे च छान असतं असे ग्रह मनात धरण्यापेक्षा त्या त्या वेळेस जिथे जिथे खाल ते एन्जॉय करा

पुण्यात संधी आहेत, हवा मानवणारी आहे आणि सेफ शहर आहे म्हणून पुण्याबाहेरून येणारे लोक प्रचंड संख्येने आहेत. ते इथेच शिकतात, नोकरी मिळवतात, घर घेतात, संसार थाटतात... थोडक्यात 'सेटल' होतात. पण 'पीअर प्रेशर'मुळे या पैकी कोणीच कधीच पुण्याचं कौतुक करत नाही. शिवाय, नॉस्टॅलजिया हा भाग आहेच, 'आमच्या गावी हे कस्लं भारी मिळतं, पुण्यातलं कस्ल बेकार आहे हे' असं वाटणंही साहजिकच आहे. त्यात काहीही चूक नाही.
तस्मात, पुण्यात काहीही चांगलं मिळत नाही, असं धरूनच चाला. पुण्याला खाद्यसंस्कृती नाही. पुण्यात प्रेक्षणीय स्थळं नाहीत. पुण्यात काहीही नाही, फक्त हाईप आहे सगळा. त्यामुळे इडली-डोसा, भेळ-मिसळ, चिकन-मटण-फिश, कोल्हापूरी, खानदेशी, चायनीज असं इथे काहीच चांगलं मिळत नाही हे सांगणारे लोकच येतील इथे. वैशाली हे हॉटेल कसं बेकार आहे- अशा आशयाचाही बाफ आहे इथे. तोही वाचा. त्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला पुण्यातलं काही कौतुकानं खावंसं वाटेल! >>> Lol परफेक्ट, पूनम! अगदी अगदी!!

मिसळ - अनेक ठिकाणी चांगली आहे. आनंदनगरला अमित हॉटेलच्या मागे
भेळ - बंडगार्डनचा अण्णा फेमस होता. त्याच्यासारखी भेळ पुण्यात कुठेच नाही मिळत. त्याचा मुलगा चालवतो आता.
मूगभजी - बंडगार्डनलाच सदानंद हॉटेलची मूगभजी. अलका टॉकीजसमोर कुमठेकर रस्त्याच्या सुरूवातीला एका टपरीवजा हॉटेलमधे मूगभजी मिळते
वडापाव - अर्थात जोशी. रोहीत वडापाव. शिंव्हगड रस्त्याला जगताप हाटेलशेजारी अन्नपूर्णा (बायकांनी चालवलेलं)
डोसा - मानकर डोसा. अलंकार सिनेमासमोरचं एक हॉटेल , स्टेशन रोडचं सागर, बाजीराव रोड - गजराज, सारसबाग
खान्देशी - कर्वे रस्त्यावर एक हॉटेल आहे चोटंसं
कॉकटेलं - काय करायचंय नको ते ?

भेळ आणखी ब-याच ठिकाणी चांगली मिळते. सिंहगडला जाताना धायरी फाट्यावर जे अमृत भेळ आहे त्यांच्या कडे भेळीचे अनेक प्रकार आहेत. यांच्या ब-याच शाखा आहेत आता.

मस्तानी - सुजाता मस्तानी, गुर्जर मस्तानी.

पंजाबी आणि इतर जेवणासाठी - चंदन हॉटेल (सेव्हन लव्हज चौक )

इथल्या सर्व वादांमधे मी पुणेकरांशी बाय डीफॉल्ट सहमत आहे Wink

आपण जेथे राहतो, नोकरी/धंदा करतो आणि पुढे अनेक वर्षे जेथे राहण्याची शक्यता जास्त आहे त्या भागाला नावे ठेवत आपण जेथून आलो तेथील आठवणी काढत इथल्या पेक्षा तिथले कसे भारी असते हे म्हणत राहणे हा कॉमन पॅटर्न आहे. मी "सनीवेल अगदी पुण्यासारखे आहे" असे आधी ऐकले इथे आलो तेव्हा Happy पण मग इथल्या भाजा, फळे आणि अगदी आइसक्रीम ला भारतातल्या सारखी चव नाही अशी कुरकूर करायचो. इथल्या देसी रेस्टॉ मधे भारतातल्या सारखे खाणे मिळत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे अमित ने लिहीलेले पटते.

मुंबईत गेल्यावर त्यातून पण पावसाळ्यात घाण वाटत राहते. तिथली सगळी हॉटेलं शेट्टींची आहेत. अगदीच नाईलाज झाला तर मग जेवतो. पुण्यात अनेक हॉटेल्स ऐसपैस आहेत. गर्दी असते पण मुंबई सारखी घाण नाही. पण पुण्यात दर काही पण चढे आहेत.

कोल्हापूर हे खेडंच आहे अजून. रस्त्यात म्हशी आणि तालेवार पैलवान उभे असतात. दोघेही साईड देत नाहीत.

बाकी पुण्यात अमुक गोष्ट चांगली मिळत नाही आणि इतरत्र मिळते यासारखे विनोदी वाक्य नसेल आता. गेल्या २०-२५ वर्षांत दुनियाभरचे लोक पुण्यात येउन स्थायिक झालेले आहेत (त्या आधीही येत होते पण गेल्या काही वर्षांत जास्त वाढले). त्या त्या चवींचा पुरवठा करणारी रेस्टॉरण्ट्स आणि अगदी रस्त्यावरच्याही गाड्या आहेत. महाराष्ट्रातीलच काय पण भारततील इतर ठिकाणच्या सारखे खाणे बनवणारे लोक आहेत.

कोल्हापूर हे खेडंच आहे अजून. रस्त्यात म्हशी आणि तालेवार पैलवान उभे असतात. दोघेही साईड देत नाहीत. >>> Lol पटल
कोणत्या भागात गेला होतात त्यावर अवलंबुन. जरा अजुन फिरला असतात. तर अनेक मंदिर, खेळ, निसर्ग पाहायला मिळाला असता.
. कोल्हापुरात अजुनही बर्याच प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे हे सर्व आलेच.

* फक्त देशी पदार्थांबद्दल धागा असेल तर खालील प्रतिसाद बाद समजावा

खडकी /औंध मध्ये एक "थाई हाऊस" नावाचे लहानसे हॉटेल आहे. 5 6 टेबल्स मावतील इतकेच
थाई नवरा बायको मिळून चालवतात.
अतिशय छान थाई फूड मिळते तिकडे. उगाच महाग सुद्धा नाहीये.
एकदा नक्की try करा.

पुण्यात अमुक गोष्ट चांगली मिळत नाही आणि इतरत्र मिळते यासारखे विनोदी वाक्य नसेल आता. गेल्या २०-२५ वर्षांत >>>>>
फारएन्ड , प्लिजच..
गेल्या 8 वर्षात मला चांगला उंधियो मिळाला नाहीये पुण्यात.
मुंबईत अगदी दर 5 दुकानाआड मिळतो.
एकतर पुण्यातले गुजराती घरीच उंधियो बनवत असावेत, किंवा पुण्यातल्या लोकांना उंधियो ची चटक अजून लागली नसावी.

नीधप >> भेळेसाठी - कल्पना भेळेला पर्याय नाही. लहानपणी त्या भेळेचे नाव दाढीवाल्याची भेळ असे होते. आता दाढीवाल्या आजोबांचा मुलगा, सून, नातू वगैरे ती चालवतात. टिळक रोड आणि सारंग अश्या दोन शाखा आहेत. टिळक रोड बेस्ट.
आता मुंबईत राहून खूप वर्ष झाली पण तरी मुंबईतली फुसक्या चुरमुर्‍यांची, मसालेयुक्त आणि दाण्यांचा मागमूसही नसलेली भेळ बोर होते.
आजवर तरी माझ्यामते जगातली उत्तम भेळ कल्पनाचीच.

पाणीपुरी - आजीची पापु, कल्पना भेळेच्या बाजूला. इथेही रगडा घालतात पापुमधे पण त्यांची टेस्ट लाजवाब आहे.
रगड्याला वरण म्हणत पुण्यात पापुमधे वरण घालतात म्हणणार्‍यांना वरण म्हणजे काय माहिती नसावे किंवा मग तूर आणि चणा डाळीतला फरक कळत नसावा किंवा पुणे आहे घाला शिव्या असा खास मुंबईकर अ‍ॅटिट्यूड ठासून भरलेला असावा.

>>> + १००० ही दोन्ही ठिकाणं अगदीच मागेपुढे आहेत. आणि एकदम बेस्ट !! त्या आजींकडे तर आम्ही रेग्युलर मेंबर्स झालो होतो. अजुनही बाहेरून पुण्यात आलो की तिकडे जाऊन पाणीपुरी / शेवपुरी खाल्ली जाते.

कर्वे नगर मध्ये पण एका गाडिवर भेळ मिळते ती ओली नसते. कुणी खाल्ली आहे का इथे?
पुर्वी ते एक डिमार्ट सारखं मोठं स्टोअर होतं त्याच्या डायगोनली अपोझिट मिळते म्हणे.
माझ्या घरी एका फन्क्शन ला माझे काका घेऊन आले होते, अफलातून होती ती.

ज्यांना वैशाली आवडत नसेल त्यांनी वैशालीत जाऊ नये. उगाचच तिथे जाउन गर्दी करायची आणि आमच्यासारख्या वैशाली प्रचंड आवडणार्‍या दर्दींची गैरसोय करायची, हे असं करू नये (ही नम्र विनंती) ................. Happy

तर वैशाली (हॉटेल) त गेल्यावर काय काय करावे किंवा खावे?

१. सर्वप्रथम तिथले निसर्ग (?) सौंदर्य. ते बघत बघत टेबल रिकामं होण्यासाठी प्रतिक्षा करावी.

२. त्यानंतर टेबल मिळाल्यावर निवांतपणे मेन्यू कार्ड चाळावे. चाळावे अशासाठी, की काय मागवायचे आहे, ते आधीच ठरलेलं असतं. इथे आपण निवांतपणा घेउन आलो असल्यामुळे घाई कायको ?

३. २-३ वेळा वेटर आणि १-२ वेळा काउंटरवरचा आप्पा येऊन गेला की मग ऑर्डर द्यायची. दिवसाच्या कुठल्या वेळात जात आहात त्यावर ही ऑर्डर ठरते. सकाळी ८-८:३० च्या आधी गेला असाल तर 'उपमा' मस्ट आहे. संध्याकाळी ६ नंतर गेल्यास स.प.ड.प. मस्ट आहे. इतर वेळेस काहीही मागवा.

४. ते झाल्यानंतर मग डोसा / उत्तप्पा यापैकी काहीतरी. नेहमी जाणार्‍या कस्टमर्स साठी काही स्पेशल डोसे / उत्तप्पे पण असतात, जे मेन्यूकार्ड वर नाहियेत. ते मागवले की मग कामच झालं.

५. डोसा / उत्तप्पा खाऊन पोट न भरल्यास (ते तसही एका डोशाने / उत्तप्प्याने भरतच नाही म्हणा), इडली किंवा वडा मागवावा. यात बरीच permutations and combinations करता येतात. वडा म्हणजे नुसता मेदुवडा नाही, तर बटाटावडा सुद्धा येतो यात.

६. हे सगळं खाऊन होईपर्यंत, पुढचे कस्टमर्स टेबल कधी रिकामं होणार याची काळजी करत उभे असल्याचं आपल्या लक्षात येतं. मग लगेच आपण शेवटची ऑर्डर म्हणजे कॉफी मागवावी. कॉफी घेऊन येताना, कधी कधी वेटर आपल्याला बिल पण आणून देतो. पण तेंव्हाच चतूरपणे आपण घरी नेण्यासाठी पार्सल मागवायची पण ऑर्डर द्यावी.

७. ती ऑर्डर येईपर्यंत निवातपणे आपण कॉफी प्यावी. कॉफी प्यायची पण इथे एक पद्धत आहे. कॉफी जरी तुम्हाला कप-बशीत दिली असेल, तरी अस्सल वैशालीकर ती कॉफी, कपातून काचेच्या पाण्याच्या रिकाम्या ग्लासमध्ये घालून पितो. ग्लास रिकामा नसेल, (म्हणजे पाण्याने भरलेला असेल) तर तो बाजूच्या झाडांच्या कुंडीत रिकामा करावा.

तर अशा तर्‍हेने वैशाली प्रॉग्रॅम पार पाडावा.

ज्यांना वैशाली आवडत नसेल त्यांनी वैशालीत जाऊ नये. उगाचच तिथे जाउन गर्दी करायची आणि आमच्यासारख्या वैशाली प्रचंड आवडणार्‍या दर्दींची गैरसोय करायची, हे असं करू नये (ही नम्र विनंती) >> +१

अरूण Lol

गेल्या 8 वर्षात मला चांगला उंधियो मिळाला नाहीये पुण्यात.>>>> सिंबा: जंगली महाराज रोडवर त्या गुजराथी समाजाच्या लोकांचे food trucks लागतात. त्यांच्याकडे सीझन मध्ये चांगला उंधियो मिळतो. ट्राय कर एकदा.

आणि हो, गणेश भेळेपेक्षा, कल्पनाची भेळ चांगली असते.

फारएन्ड , प्लिजच..
गेल्या 8 वर्षात मला चांगला उंधियो मिळाला नाहीये पुण्यात.>>> काही उंधियो फॅन्स आहेत विचारून सांगतो. १००% मिळत असणार चांगला.

Pages