स्वानंदासाठी

Submitted by हरिहर. on 25 May, 2018 - 05:07

नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा. आता या तत्वात बसेल अशी लावालावी करायची म्हणजे थोडा विचार करणे आलेच. नारद चालून थकले, विचार करुन शिणले आणि शेवटी एका केळीच्या बनात थंड हवेच्या आधारे विश्रांतीसाठी थांबले. सकाळपासून हातातल्या विणेवरुन बोटे फिरली नव्हती ना मुखाने ‘हरि नाम’ ऊच्चारले होते.

थकलेल्या नारदांनी सहज आजूबाजूला पाहीले. समोरच्याच केळीच्या प्रशस्त पानावर काही लिहिले होते. नारदांनी जवळ जाऊन पाहीले. पहिली ओळ वाचली. मग दुसरी वाचली. आणि मुनीजी वाचण्यात अगदी गढून गेले. पुर्ण पान वाचूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अजुबाजूला पाहिले. दुसऱ्या पानावर ऊर्वरीत मजकुर होता. नारद वाचत होते. पान संपल्यावर दुसरे पान शोधत होते. एकामागोमाग नारदांनी सात पाने वाचली. त्यांचे भान हरपले. कोण नारायण, कोण ब्रम्हा त्यांना काही आठवेना. डोळ्यातुन अश्रू वहात होते. अंतःकरण आनंदाने भरले होते. कधी अनुभवली नव्हती अशी चित्तात शांती अनुभवीत होते.
मागून आवाज आला “काय झालं मुनीवर?”
नारदांनी मागे वळून पाहिले. समोर मारुतीराया ऊभे होते.
नारद म्हणाले “हनुमंता, अरे मी आजवर खुप जनांनी लिहिलेली ‘रामायणे’ वाचली पण मनाला अद्भुत शांती देणारे तुमचे रामायण अगदी अलौकीक आहे.” हे ऐकुन हनुमंत फक्त हसले आणि आकाशात झेपावत नाहीसे झाले.
अतःकरणातील तो अलौकीक आनंद अनुभवत नारदांनी केळीचे बन सोडले. जसजसे केळीचे बन मागे पडले तसतसा नारदांच्या अंतःकरणातला आनंद कमी होत जाऊन ‘मुळ वृत्ती’ने डोके वर काढायला सुरवात केली. विचारचक्रांना चांगलीच गती मिळाली. चेहऱ्यावर छद्मी समाधान ऊमटले आणि मनात काही ठरऊन नारदांची पावले वाल्मीकींच्या आश्रमाकडे वळली.

सकाळच्या प्रसन्नवेळी आश्रमाच्या दारात प्रत्यक्ष नारदमुनींना पाहून वाल्मीकींना आनंद झाला. पुष्पहार घालून त्यांनी नारदांचे स्वागत केले. हाताला धरुन आश्रमकुटीत घेऊन नेले. दर्भासनावर आदराने बसवले. फलाहार-दुग्धाहाराची तबके समोर ठेवली. सर्व सोपस्कार झाल्यानंतर वाल्मीकींनी विचारले “मुनीवर, सर्व लोक क्षेम आहेत ना? विष्णूलोकाची काय वार्ता?”
नारद चेहरा गंभीर करत म्हणाले “तुमचे ‘पद’ सोडून सर्वकाही कुशल आहे आचार्य.”
वाल्मीकींनी गोंधळून विचारलं “जरा विस्ताराने सांगीतलं तर काही कळेल मुनीवर.”
नारद मनातला आनंद चेहऱ्यावर न दाखवता म्हणाले “कालच पृथ्वीलोकात फिरत असताना एक रामायण वाचनात आले. आपण लिहिलेल्या रामायणापेक्षा मला ते जास्त भावले. अर्थात हे माझे मत आहे.”
वाल्मीकींनी विचारले “कुणी लिहिले आहे?”
नारदांनी सांगीतले “श्री मारुतीरायांनी लिहिले आहे.”
नारद फलाहार वगैरे घेऊन, वाल्मीकींचे आदरातिथ्य स्विकारून मार्गस्थ झाले. जाताना वाल्मीकींची मनःशांती घेऊन गेले. त्यांना अतिव दुःख झाले. वाल्मीकींनी खुप विचार केला. नारदांचे कामच आहे लावालावी करणे, त्या मुळे दुर्लक्ष करावे असे त्यांनी ठरवले. पण मन काही ऐकत नव्हते. “माझ्यापेक्षा सुंदर रामायण लिहावे, आणि तेही एका माकडाने!” वाल्मीकी प्रचंड अस्वस्थ झाले. शेवटी तेही एक लेखकच ना! नारद खोटे बोलणार नाही हे नक्की. शेवटी वाल्मीकी नारदांनी सांगीतलेल्या ‘रामायणा’च्या शोधात निघाले.

काही दिवसांच्या अथक भटकंतीनंतर वाल्मीकींना नारदांनी वर्णन केलेले केळीचे बन सापडले. त्यांनी काही वेळातच केळीची ‘ती’ सात पानेही शोधून काढली. ते रामायण वाचता वाचता वाल्मीकींची अवस्थाही नारदांसारखीच झाली. केवळ अप्रतिम. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीने परिपुर्ण. भक्तीरसपुर्ण. असामान्य शब्दयोजना. अलौकीक लेखनशैली. सगळ्याच दृष्टीने परिपुर्ण असे ते रामायण वाचताना वाल्मीकींना अश्रू अनावर झाले. आनंदाचे आणि दुःखाचेही.
मागून आवाज आला “काय झाले आचार्य? आपल्याला रामायण आवडले नाही का?”
वाल्मीकींनी मागे वळून पाहीले. समोर मारुतींना पाहुन म्हणाले “वर्णनातित आहे हे रामायण.”
हनुमंताने आश्चर्याने विचारले “मग हे डोळ्यात अश्रू कशासाठी आले आचार्य?”
वाल्मीकी ऊत्तरले “तुझे रामायण निश्चितच माझ्या रामायणापेक्षा श्रेष्ठ आहे. आजवर रामायण म्हटले की माझी आठवण यायची सगळ्यांना. पण तुझे हे रामायण वाचून आता कोणी माझे रामायण वाचनार नाही आणि माझी रामायणकार म्हणुनही कोणी आठवण काढणार नाही.”
“बस् एवढेच ना?” असे म्हणून हनुमंताने समोरील केळीची पाने तोडली व तुकडे तुकडे करुन खाऊन टाकली.
वाल्मीकी हनुमानाचा तो वेडेपणा पाहून चकीत झाले. त्यांना वाटले ‘माकड ते माकडच शेवटी’ तरीही त्यांनी न राहऊन विचारले “हनुमाना, काय केले हे तुम्ही. तुमचेच रामायण नष्ट केले? कशासाठी?”
मारुतीराया हसत म्हणाले “तुम्ही रामायण लिहिले ते जगात तुमचे नाव ‘रामायणकार वाल्मीकी’ व्हावे म्हणून. लोकांनी तुम्हाला ओळखावे, कौतूक करावे म्हणून. पण मी जे रामायण लिहिले होते ते फक्त स्वानंदासाठी. माझ्या रामायणातील एक एक शब्द, एक एक ओळ लिहिताना मला अवर्णनिय आनंद झाला. प्रत्यक्ष प्रभुरामाच्या सान्निध्य असल्याचा अनुभव आला. आता जगात फक्त तुमचेच रामायण राहिल आणि ते तुमच्याच नावाने ओळखले जाईल. ‘वाल्मीकी रामायण’ म्हणुन दोघेही अमर व्हाल.”
खजील होऊन वाल्मीकींनी आपल्या आश्रमाचा रस्ता धरला.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता? Happy

(फार गांभीर्याने घेऊ नये Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घेतलेला या गोष्टीचा अर्थ इतकाच की स्वानंदासाठी केलेलं लेखन कधीच प्रकाशित करु नये. हनुमानाला आपले रामायण फाडून टाकावे लागले. नारदालाच हे रामायण पचले नाही म्हणून काडी टाकली.
एखाद्याने काडी टाकली की बाकी मुर्ख त्याच्या मागे लागून त्रास देतात हे दिनेशदांचे उदाहरण माहीतच आहे. काही अतिशय धुर्त अतिशयोक्ती युक्त गुडी गुडी लिहीतात व त्यांना भक्त मिळतात. कसं उल्लू बनवलं म्हणून उकळ्या फुटतात अशा बनेल ढोंगी लेखकांच्या मनात.
शाली जी तुम्हाला उद्देशून नाही तर इन जनरल मला वाटते ते बोललो. कृगैन.

व्वा मस्तच!
लिखाण आणि तात्पर्यही ...

पटले !

शालीदा, खूप सुंदर! माझ्यासाठी अंतर्मुख करणारं आहे. वेळेअभावी मी इथलं फारसं वाचलेलं नाही. आत्ता सुरुवात केलीय. कारण आपण इथे का लिहितोय याचं नेमकं कारण माझं मीच शोधत होते. मी खूप आधीपासून लिहिते पण अगदी जवळच्या माणसांखेरीज कोणालाही दाखवलं नव्हतं. तेव्हा खूप छान वाटायचं. आता उगाच शर्यतीत असल्यासारखं वाटतं. मला वाटतं अशी सवय लागायला नको. म्हणून काही काळ थांबले होते. माझ्या चार ओळीत सांगायचं तर...

मृग मी जरी का असे कस्तुरीचा
कुणा दूर झुलवीत पळायचे?
उडावे, पडावे उगा धडपडावे
असे काय हवे जे मिळवायचे?

मला इतकंच कळलं ... हनुमानाला त्याने लिहिलेलं भावलेला, कळलेला एक खरा रसिक मिळाला एवढं पुरेसं वाटलं असावं.... क्षण एक पुरे प्रेमाचा... कॉमेंट्स लाईक्स काही खरं नसतं. आपण सांगितलेलं जसंच्या तसं पोहोचलं तर आनंद मिळतोच. दुर्दैवाने ते प्रतिसादातूनच कळतं ... धन्यवाद! नकळत तुम्ही मला खूप मदत केलीय.
माफ करा थोडं व्यक्तिगत लिहिलंय.... पण सांगावसं वाटलं

माय बॅड!!! ही कथा मी 'रामनाम' ग्रुपवरती वाचली नाही. ती कथा हनुमानाने लिहीलेल्या रामायणाचीच होती परंतु वेगळ्या अर्थाची होती.
शाली माय अपोलॉजिज. मला माफ करा.

धन्यवाद मानसी! सुरेख प्रतिसाद आहे तुमचा.

शाली माय अपोलॉजिज. मला माफ करा............काहीही काय म्हणताय सामो.

दीपा जोशी प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!

Happy कथा आवडली.
____________
मानसी यांचा प्रतिसाद फार आवडला.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता?
(फार गांभीर्याने घेऊ नये
>>> हे तात्पर्य माझं खूप आवडते आहे.

....

बाळासाहेब ठाकरे असतील,राज ठाकरे असतील ,प्रमोद महाजन असतील
अशी किती तरी महान व्यक्ती भारतात आहेत की त्यांच्या कडे वक्तृत्व कला अशी होती की लाखो लोकांच्या मनावर ताबा मिळवण्याची ताकत त्यांचे वक्तृत्व मध्ये होती.
तसे खूप लेखक असे आहेत त्यांच्या कडे असामान्य प्रतिभा आहे.
त्यांचे लिखाण वाचताना व्यक्ती त्या कथेतील दुनियेत रममाण होतो त्याला तेवढ्या वेळा पुरत आणि नंतर सुधा आजूबाजू च्या सर्व गोष्टींचा विसर पडतो.
अशी जबरदस्त ताकत लेखनात असते.
पण ही जी प्रतिभा आहे ती अंगभूत असते ती अभ्यास करून निर्माण करता येत नाही.
तशीच प्रतिभा तुमच्या लिखाणात आहे.

Pages