काल सकाळी दिवस उजाडलाच ते एक टेंशन घेऊन. मी काम करत असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये एक गोंधळ झाला होता. काही लाख युरोंचा क्लेम येण्याची शक्यता दिसत होती. ज्यात चूक कोणाची म्हणून पाठपुरावा करायचा झाल्यास सारी बोटे माझ्याच दिशेने येऊन थांबली असती. आणि ती चूक माझीच होती. छोटीशीच होती, थोडासा धांदरटपणा, थोडा हलगर्जीपणा. पण त्याचे परीणाम फार मोठे होते. जर युरोचे रुपयांत गुणोत्तर मांडले तर मला आयुष्यभर याच कंपनीत फुकट राबावे लागले असते ईतके मोठे.
सकाळचा चहा माझ्या घश्याखाली एवढ्यासाठीच उतरला की अजून त्या गोंधळाचा मेल तीन लोकांच्या बाहेर गेला नव्हता. तातडीने प्रोजेक्ट मॅनेजरने संध्याकाळी एक ईंटरनल स्काईप मिटींग ठेवली. ज्यात एक मी, दुसरे माझे सर, तिसरा तो प्रोजेक्ट मॅनेजर स्वत: आणि क्लायंटची दोन वरच्या लेव्हलची माणसे असे पाचच जण असणार होते. त्या मोठ्या लोकांसमोर काय घोळ झालाय, कश्यामुळे झालाय, कोणामुळे झालाय, हे सारे मलाच सांगावे लागणार होते. त्यानंतर आम्ही सर्व मिळून तो घोळ कसा निस्तरावा याची चर्चा करणार होतो.
दुपारचे जेवण एवढ्यासाठीच घश्याखाली उतरले की माझ्या बॉसने मला सांगितले की वाईटात वाईट म्हणजे तुझी नोकरी जाईल. "यूह कॅन लूज युअर जॉब !".. पण पैश्याचा क्लेम आल्यास कंपनीचा इन्शुरन्स असतो. नुकसानभरपाईसाठी कोणी तुझी कॉलर धरणार नाही.
नोकरी गेली अशी मनाची तयारी केल्यावर जेवण तर घश्याखाली उतरले. पण पोटात ढवळू लागले. दुपारी मी नेहमी जेवल्यावर एकटाच वॉल्कला जातो. हल्ली अॅसिडीटीचा त्रास वाढल्याने ही चांगली सवय लावली आहे. दहा मिनिटे चालतो, दहा मिनिटे एका बाकावर बसतो, दहा मिनिटे पुन्हा परतीचे चालून ऑफिसला पोहोचतो. टोटल अर्धा तास. आज मात्र दोन मिनिटे चालत होतो, दोन मिनिटे बसत होतो. फार काळ स्वस्थ बसता येत नव्हते. दोन मिनिटांनी पुन्हा उठून चालत होतो. चालता चालता डोक्यात त्याच नकारात्मक विचारांना पुन्हा चालना मिळत होती आणि डोके शांत करायला पुन्हा दोन मिनिटे बसत होतो. बसल्यावर पुन्हा दोनच मिनिटांत, ‘आपण असे हातावर हात धरून स्वस्थ बसूच कसे शकतो’ या विचाराने, या भितीने उठून पुन्हा चालत होतो. अगदी वेडा झालो होतो. "आता पुढे काय?" हे विचार डोक्यात येताच छातीतील धडधड वाढत होती. पण ते विचार थोड्याच वेळात प्रत्यक्षात घडणार असल्याने डोक्यातून काढूनही टाकता येत नव्हते.
एखाद्या वडिलधार्या माणसाने पाठीवर आश्वासक थोपटावे, आईने कुशीत घ्यावे, गर्लफ्रेंडने ‘सारे काही ठिक होईल रुनम्या’ म्हणत हात हातात घ्यावा, असे आणि बरेच काही वाटत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही आता माझ्या जवळ नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रोज मी एक ते दिड फेरफटका मारतो, पण आज दोन वाजत आले तरी ऑफिसबाहेरच होतो. ठिक पाच वाजता मिटींग होती. पण मला आज पाच वाजूच नये असे वाटत होते. शेवटी सर मला शोधत बसतील आणि जागेवर न दिसल्यास आणखी चिडतील म्हणून नाईलाजाने उठलो आणि पावले ऑफिसच्या दिशेने वळली.
आता पर्यंत ऑफिसमध्ये सर्वांना हे समजून गोंगाट झाला असेल का? लंचटाईममध्ये सोबत जेवताना सरांनी सेक्शन मॅनेजरला याबद्दल सांगितले असेल का? ऑफिसमध्ये पाय ठेवताच मला केबिनमध्ये बोलावणे येईल का? कोणाच्या नजरेत सहानुभुती असेल, कोणाच्या नजरेत कुत्सितपणा, कोण अरेरे म्हणत असेल, कोण म्हणत असेल बरे झाले जिरली याची... एखाद्या फाशीच्या कैद्याला वधस्तंभाकडे जाताना जे काही वाटत असेल अगदी तसेच मला ऑफिसमध्ये परतताना वाटत होते. पावले जड होत होती, छातीतील धडधड कुठल्याही क्षणी मी हार्ट अॅटेक येऊन जमिनीवर कोसळेन ईतकी वाढली होती. मला खरेच त्याक्षणी गरज होती ती कुठल्यातरी मानसिक आधाराची. अजून काही वेळ ही धडधड अशीच राहिली तर माझी छाती फाडून बाहेर येईल. नाही नाही, नोकरी जाईल ते परवडले.. पण जीव नाही गेला पाहिजे.. माझी आई, माझे बाबा, माझी गर्लफ्रेंड... माझे कित्येक मित्र.. या सर्वांना मी हवा आहे. आयुष्यात आलेला हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. आज आहे तर उद्या नसेल. मी मात्र असलोच पाहिजे. ही छातीतली धडधड कमी झालीच पाहिजे. सारे काही समजंसपणाचे सुचत होते, पण ती धडधड त्या विचारांनी काही कमी होत नव्हती. कारण मी स्वत:च स्वत:ला मुर्खासारखा धीर देतोय हे जाणवत होते. आयुष्य फार किंमती आहे हे माझ्या मनात येणारे विचार अगदी बरोबर असले तरी माझे मीच मला पटवून देऊ शकत नव्हतो. येणार्या संकटाशी लढायची हिंमत, मानसिक बळ मला कुठूनही मिळत नव्हते, आणि अश्यातच त्याची आठवण झाली...
हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून गौरवल्या गेलेल्या परमेश्वराची. सर्व शक्यतांचा विचार करता आता एखादा देवाचा चमत्कारच मला यातून बाहेर काढू शकत होता. पण जगात देव नाही यावर माझा ठाम विश्वास असल्याने तसे होणार नाही हे देखील मला माहीत होते. आणि अचानक मला फार वाईट वाटले. कारण आज जर माझा देवावर विश्वास असता, तर त्याचा मी धावा केला असता. त्याला साकडे घातले असते. आणि अद्रुश्य रुपात तो आपल्या पाठीशी उभा आहे असा विश्वास स्वत:ला मिळवून दिला असता,. आणि भले प्रत्यक्षात कोणीही देव नसला तरी, निव्वळ त्या देवावरच्या विश्वासाने माझ्या छातीतील धडधड नक्कीच कमी झाली असती.
एक क्षण असेही वाटले की हीच योग्य वेळ आहे देवावर विश्वास ठेवायची. आज आत्ता ताबडतोब, बोलूयाच देवाला नवस. आणि ठेवूयाच त्यावर विश्वास. घेऊया तर आज देवाची परीक्षा. काढ मला या संक्टातून बाहेर. मग मानतो तुला...
पण मुळातच विश्वास नसल्याने उगाच आव आणून खोटा विश्वास भासवण्यात अर्थ नव्हता. कारण ते स्वत:लाच पटणारे नव्हते. स्वत:च स्वत:ला असे फसवता येत नाही. थोडक्यात छातीतली धडधड काही कमी होणार नव्हती. आणि ती शेवटपर्यंत झाली नाहीच.
आजवर मी समजायचो की नास्तिक लोकं म्हणजे फार डेअरींगबाज. त्यांना देव नावाच्या कुबड्यांची गरज पडत नाही. पण आज मला समजले, संकटात सापडले की ज्याची गाळण उडायची त्याची ती उडतेच. मग आस्तिक असो वा नास्तिक. फरक ईतकाच, की आस्तिक लोकं देवाचा जप करत मन:शांती मिळवतात. पण त्याचवेळी नास्तिक विचारांचा माणूस छातीतील धडधड टाळू शकत नाही. भले देव जगात नसला तरीही आस्तिकांना मिळणारी मन:शांती मात्र खरीखुरी असते. पण तीच नास्तिक ईतक्या सहजी मिळवू शकत नाही. खर्रंच, नास्तिकत्व हा एक शाप असतो.
__________________________________________
लेख ईथेच संपला, पण किस्सा अनुत्तरीत राहायला नको.
__________________________________________
छातीतल्या त्याच धडधडीसह मी ऑफिसला पोहोचलो. क्लायंटची माणसे संध्याकाळी हजर राहू शकत नसल्याने मीटींग दुसर्या दिवशी संध्याकाळी ठेवण्यात आली असे समजले. छातीतली धडधड तात्पुरती थांबली. दुसर्या दिवशी म्हणजे आज पुन्हा एकदा ती मिटींग तासभर पुढे ढकलली गेली. अखेर सहा वाजता एकदाची झाली. अर्ध्या तासांतच संपली. निव्वळ आश्चर्यकारकरीत्या मी यातून सहीसलामत सुटलो. या आधी मला कल्पना नसलेली काही नवीन माहीती समोर आली, ज्यानुसार फार मोठा आर्थिक फटका बसला नव्हता. आणि जो थोडाथोडका बसला होता त्यात माझी एकट्याचीच चूक नव्हती, थोडीफार क्लायंटचीही चूक असल्याचे पुढे आले. तसेच माझी चूक देखील "बडे बडे प्रोजेक्ट मे ऐसी छोटी छोटी गलतिया होती रहती है" म्हणून सोडून देण्यासारखी होती.
मिटींग संपल्यावर मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मी तसाच बॉसच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांच्यासमोर केवळ एक समाधानाचा सुस्कारा टाकून परत आलो. एकीकडे आनंद होत होता, तर दुसरीकडे मनात विचार येत होते.. जर मी काल देवावर विश्वास ठेवायचा असे ठरवून त्याचे नामस्मरण केले असते, तर आजच्या चमत्कारानंतर माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला असता. आणि कदाचित ते चांगलेच झाले असते. कारण नास्तिक असणे हा शाप असतो हे मला काल उमगले होते.
- समाप्त -
ईतर नास्तिकांनी आपापले विचार झरूर मांडा
शुभरात्री शब्बाखैर....
शुक्रिया,
- ऋन्मेष
आता वाटतंय, ज्ञानेश्वर,
आता वाटतंय, ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांना खरंच काही कळत नसावे,नाही का?????>>> अगदी अगदी...श्रद्धा व अंधश्रद्धा यात काहीच फरक नसतो असा नास्तिकांचा समज असतो का? कारण बहुसंख्य नास्तिक लोक आस्तिकांना अंधश्रद्धाळू समल्यासारखे हिणकस उपदेश करताना दिसतात...
ज्ञानेश्वर महाराजांवरुन आठवले
ज्ञानेश्वर महाराजांवरुन आठवले दाभोलकर सरांनी एक मस्त किस्सा सांगितला होता जेव्हा ते आमच्या काँलेजात आले होते. एकदा एका आस्तिकाने सरांना विचारले ज्ञानेश्वर महाराज एकेठिकाणी म्हणतात भुत आहे तुम्ही म्हणता भुत नाही आम्हि कुणाचे ऐकायचे तुमचे की त्यांचे. तेव्हा सर त्याला म्हणाले की एकदा एक बाप मुलाला घेउन जत्रेत जातो. एके ठिकाणी खुप गर्दी जमलेली असते लोकांचा घोळका असतो बापाला काय चालले ते दिसत नाहीत. तो मुलाला खांद्यावर घेतो मुलगा आत काय चालले आहे ते त्याला सांगतो . याचा अर्थ असा नाही की बापाला काही कळत नाही फक्त त्याला ते दिसत नाहीत. ज्ञानेश्वर हे महान होते मात्र त्या काळात त्यांना जे दिसत नव्हते ते विज्ञानाची शिडी वापरुन वर चढलेल्या आम्हा लेकरांना दिसते असाच काहीसा सांगण्याचा मतितार्थ होता आता निटसे आठवत नाही.
संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज ह्या धाग्यावर आणलेच आहात तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडुन वेद म्हणवले, तुकाराम महाराजांना न्यायला पुष्पक विमान आले ह्या गोष्टिंवर तुमचा विश्वास आहे का?
सचिनजी, दाभोळकरांचे आचार
सचिनजी, दाभोळकरांचे आचार विचार समाजाच्या कल्याणासाठी नक्कीच महत्वाचे ठरलेले आहेत तरीही ते विचार प्रमाणभूत किंवा अंतिम नाहीत!! त्या व्यक्तीविषयी आदर आहे कारण भोंदूगिरीतून होणार्या फसवणूकींना काहिसा लगाम बसला आहे. जातपंचायतींचा समाजाला असलेला वेढा मोडण्याचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
पण तो मुद्दा येथे नाही.
आपण म्हणता,
>>> ज्ञानेश्वर हे महान होते मात्र त्या काळात त्यांना जे दिसत नव्हते ते विज्ञानाची शिडी वापरुन वर चढलेल्या आम्हा लेकरांना दिसते असाच काहीसा कथेचा मतितार्थ होता आता निटसे आठवत नाही.>>>
याला माझं उत्तर,
ज्ञानेश्वरांना जे दिसत होतं ते दाभोळकरांना, तुम्हा आम्हाला दिसणं कधीच शक्य नाही, तोपर्यंत जोपर्यंत आपण त्यांच्या ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या सहाव्या आध्यायातील योगसाधनेच्या मार्गावर चालणार नाहीत.
योगसाधनेच्या मार्गावर चालायला सुरूवात करायला आस्तिकच असावं लागतं असंही नाहीये. शरीर हे माध्यम आहे. जे शरीर चमत्कार करणार्यां ज्ञानेश्वरांना मिळालं होतं तेच तुम्हाआम्हाला मिळालं आहे, काहीच कमी नाही! मार्ग दिलेले आहेत. चालून तर बघा एकदा. सातत्य असू द्या. मग एक एक धागा उलगडत जाईल! आणि नंतर आपले स्वत:चे नास्तिकतेविषयीचे विचार तपासून बघा... चमत्कारही दिसतील, फसव्या निसरड्या वाटाही दिसतील, चमत्कार करताही येतील आणि जर योग्य मार्गावर राहिलांत तर ज्ञानेश्वरादीकांच्या पंगतीतही जाऊन बसाल!
(मी कोणत्याही धार्मिक संस्थेशी संबंधित नाही. स्वत:च्या प्रज्ञेनं,मिळालेल्या साधनमार्गानं अभ्यास करू पहाणारा आहे. कृपया लेबल मारू नये.)
वर आपण उल्लेखलेले चमत्कार मी स्विकारतही नाही आणि नाकारतही नाही कारण ते मी स्वत: बघितलेले नाहीत. (स्थूल चक्षूंनी अगर आंतरचक्षूंनी)
ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत
ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडुन वेद म्हणवले, तुकाराम महाराजांना न्यायला पुष्पक विमान आले ह्या गोष्टिंवर तुमचा विश्वास आहे का?>> याचे (सध्याच्या काळात) सारासार विचार करुन मला तरी वाटणारे उत्तर 'नाही' असेच आहे. परंतू यामुळे माझी त्यांच्यावरील व त्यांनी वर्णिलेल्या निर्गुण निराकार (व सगुण साकारही) एका शक्तीवरील 'श्रद्धा' जराही कमी होत नाही. हीच माझ्यासाठी तरी माझी आस्तीकता. याच शक्तीला काही लोक परमेश्वर मानतील, काही परमात्मा मानतील, काही निसर्ग मानतील तर काही असलं काही नसतंच मानतील. त्याने काय फरक पडतो? काहींना हवेचे अस्तित्व जाणवण्यासाठी पंख्याची वा एखाद्या झुळुकेची गरज भासते. तसेच काहींना (आस्तिकांना) प्रार्थनाग्रुहांमध्ये देवाचे अस्तीत्व जाणवते. असे वाटणार्यांना चूक म्हणणे मला तरी पटत नाही.
मला वाटते संतांच्या नावावर
मला वाटते संतांच्या नावावर चमत्कार खपवले गेले असावेत. तो काळ असा होता की एखद्याला देवत्व दिल्याशिवाय त्याला महान कसे म्हणायचे ..
ज्या संतानी अभंग लिहिले, ओव्या रचल्या, ग्रंथ लिहिले, अश्यांच्या बुद्धीमत्तेवर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
माझ्यामते हे संत मुळात समाजसुधारक असावेत. त्यांचे विचार काळाच्या पुढचे असावेत. पण त्यांनी चालू काळाचेही भान ठेवले असावे. एखादी चांगली गोष्ट देवाचे नाव घेत लोकांना समजवली तरच ते आचरणात आणतील हे त्यांनी ओळखले असावे. आणि त्या मार्गानेच समाजप्रबोधन केले असावे.
अन्यथा जे चमत्कार रामायण काळात घडायचे, जे चमत्कार ज्ञानेश्वरांच्या काळात घडायचे, ते आजच्या काळातही घडले असतेच की... पण वर्तमानात चमत्कार घडत नाही हेच खरे
तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू
तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका देव त्याचे काम करून गेला आहे.
>>>>
हा तर देवाचा मोठेपणा झाला,..
पण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या आयुष्याचा किंमती वेळ त्याच्या पूजाअर्चेत घालवतात, जे त्याला नवस बोलतात, अश्या सर्वांवर हा अन्याय नाही का झाला?
सॉरी बॉस, पण हे पॉलिटीक्स आहे. देव मला ईम्प्रेस करायला माझे काम करतोय
<<<संत ज्ञानेश्वर व तुकाराम
<<<संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज ह्या धाग्यावर आणलेच आहात तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडुन वेद म्हणवले, तुकाराम महाराजांना न्यायला पुष्पक विमान आले ह्या गोष्टिंवर तुमचा विश्वास आहे का?>>>
आत्ता!
अहो गांधीजी आस्तिक होते हे तुम्हाला पसंत नाही, त्यांचे इतर गुण बघा म्हणता. अहो तुमच्या डोक्यात जसा गांधीजींबद्दल विचार येतो तसे विचार इतरांच्या मनात येतच नाहीत का?
मग इतरांनी संतांच्या या गोष्टींवरच विश्वास ठेवला नि त्यांनी सांगितलेले इतर काही ऐकलेच नाही असे समजता की काय? कदाचित आस्तिक पण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्या ऐवजी इतर गोष्टींकडे बघून संतांना आदर्श मानत असतील. असे वाटले नाही तुम्हाला?
कसले हुषार तुम्ही नास्तिक! किती ढोंगी पणा करावा, असलेच नास्तिक का सगळे?
जरा शास्त्रज्ञांची चरित्रे वाचा नि मग कळेल आस्तिक असले तरी तुम्ही सरसकट सगळ्या आस्तिकांबद्दल म्हंटले ते खरे नाहीये.
मी इथे अनेकदा लिहीले होते - चांगले वाईट सगळ्यात असते, जसे चिखलातून सुंदर कमळ उगवते. फक्त काही लोक चिखलाकडे बघून घाण घाण म्हणतात तर काही लोक त्यातले सुंदर कमळ बघून छान आहे म्हणतात - तुम्ही यातले कोण?
"ते" "सुंदर" कमळ बघूनच
"ते" "सुंदर" कमळ बघूनच बोलताहेत पगारे.
आता धागा राजकीय चर्चा समुहात
आता धागा राजकीय चर्चा समुहात हलवावा लागणार की काय?
महात्माजी, संत सर्व ह्या
महात्माजी, संत सर्व ह्या धाग्यावर आणले गेलेत.
पण एक गोष्ट नक्कि वाटते की देशाला संतांपेक्षा समाजसुधारकांची जास्त गरज आहे.
आपण ज्या आकाशगंगेत आहोत तिथे
आपण ज्या आकाशगंगेत आहोत तिथे आपल्यासारख्या अनेक सूर्यमाला आहेत. अशा अनेक सूर्यमाला आणि तारे (अब्जावधी) मिळून एक आकाशगंगा बनते. अशा अब्जावधी आकाशगंगा मिळून हे विश्व बनते. आता समजा हे विश्व भौतिक शास्त्राच्या नियमाने चालत नसून कुणी जगन्नियंता हे सगळे चालवत आहे असे समजू या. तर अशा अब्जावधी आकाशगंगांतील एक, त्यातील अब्जावधी तार्यात एक, त्या तार्याच्या अनेक ग्रहांपैकी एक ग्रहावर एक प्रगत प्राणी आहे. तो प्राणी आपल्या नावाचे गुणगान करतो का, आपल्यावर विश्वास ठेवतो का, आपल्या नावाने व्रतवैकल्ये, उपास, गंडेदोरे, यज्ञ, बळी वगैरे उपचार करतो का ह्याचा हिशेब हा जगन्नियंता का बरे ठेवेल? तमाम विश्वाच्या घडामोडीत ह्या कुण्या एका ग्रहावरील कुण्या एका प्राण्याची श्रद्धा काय स्थान आहे? त्याकरता एक सेकंद तरी हा विश्व चालवणारा का घालवेल? बरे ह्या जगन्नियंत्याविषयी माहिती देणारे प्रेषित, महंत इतके वेगवेगळ्या प्रकारे माहिती का देतात? कुणी म्हणतो अहिंसा हाच धर्म तर कुणी अमक्या सणाला चार पायांचा प्राणी बळी द्या असे सांगतो. कुणी म्हणतो मानवाला अनेक जन्म आहेत तर कुणी सांगतो हा जो आहे तो एकमेव जन्म. एकदा मेलात की न्यायदानाच्या दिवसाची वाट पहात रहा. कुणी सांगतो की क्ष हा देवाचा शेवटचा प्रेषित तर कुणी सांगतो य हा देवाचा खरा प्रेषित. मानव जात पृथ्वीवर येऊन २ लाख वर्षे झाली. पण प्रेषित मंडळी २००० ते ३००० वर्षे पूर्वी पाठवण्यात आली. जगन्नियंत्याच्या दरबारीही अशी सरकारी दिरंगाई का? प्रगत मानवजात निर्माण होताच त्या परमेश्वराची साद्यंत माहिती देऊ शकेल असा प्रेषित का नाही धाडला? आणि इतके वेगवेगळे प्रेषित आमचाच देव खरा असे ठासून कसे सांगतात? त्यांच्यात एकवाक्यता का नाही?
शेंडेनक्षत्र, तुम्ही कितीही
शेंडेनक्षत्र, तुम्ही कितीही कठीण प्रश्न विचारले तरी त्याचे एकच ऊतर आहे जे मी आस्तिकांतर्फे देऊ ईच्छितो, आणि ते म्हणजे श्रद्धा
किंबहुना तुम्ही म्हणत आहात तो विश्वाचा पसारा ईतका अफाट असूनही व्यवस्थित चालतो म्हणजेच कोणीतरी देव आहे हे सिद्ध नाही का होत
>>किंबहुना तुम्ही म्हणत आहात
>>किंबहुना तुम्ही म्हणत आहात तो विश्वाचा पसारा ईतका अफाट असूनही व्यवस्थित चालतो म्हणजेच कोणीतरी देव आहे हे सिद्ध नाही का होत ?
विश्वाचा कारभार व्यवस्थित चालतो? मग रोगाच्या साथी येऊन असंख्य लोक मरतात, प्रचंड ज्वालामुखी होऊन जगातील अर्धी जीवसृष्टी नष्ट होते, कुठे उल्का आदळून कोट्यावधी जीव कायमचे नष्ट होतात. भूकंप, सुनामी, वादळे, आगी, वणवे, दुष्काळ, पूर हे सगळे भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे होतेच. ते होते तेव्हा कुठल्या धर्माचे, किती संख्येने, किती श्रद्धा पाळणारे लोक रहातात हे बघितले जात नाही. ह्या नैसर्गिक आपत्तीचा वरवंटा सगळ्या लोकांवर सारखाच फिरतो. शिवाय आमचाच देव खरा म्हणणारे हिंस्र टोळ्या घेऊन अन्य समूहावर तुटून पडतात त्यांची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करतात, लोकांना ठार मारतात, बायकांवर अत्याचार करतात, लहान मुलांवर अत्याचार करतात, मुंडक्यांचे मनोरे रचतात, त्यांच्या मते अश्रद्ध असणार्या लोकांची मालमत्ता लुटतात, लोकांना गुलाम करतात, भोगदास्या बनवतात, त्यांची एखाद्या वस्तुप्रमाणे वाटणी करतात हे ही त्या जगन्नियंत्याच्या मर्जीनेच होते काय? असेल तर त्याला व्यवस्थित कारभार असे म्हणवत नाही.
वैश्विक पातळीवरही ग्रहतार्यांच्या उलाढाली चालूच असतात. हे सगळे कुण्या अती बुद्धीमान देवाच्या देखरेखीखाली चालत असेल असे वाटत नाही. निव्वळ भौतिक शास्त्राच्या नियमावर चालते असे दिसते आहे.
शेंडेनक्षत्र, तुम्ही कितीही
शेंडेनक्षत्र, तुम्ही कितीही कठीण प्रश्न विचारले तरी त्याचे एकच ऊतर आहे जे मी आस्तिकांतर्फे देऊ ईच्छितो, आणि ते म्हणजे श्रद्धा Happy
>>> रुन्मेषभाऊ, तुम्ही आस्तिक का नास्तिक ते आधी कलेयर करा... एकदा इकडे, एकदा तिकडे ... नॉट गुड भाऊ
shendenaxatra, तुम्ही
shendenaxatra, तुम्ही नास्तिकतेतून आर्ग्युमेंट केलंत तर धागाकर्ता विरोधी झेंडा घेऊन येणार. नारसिसिस्ट व्यक्ती आहे ही. आपल्या भोवती चर्चा फिरवत राहिली पाहिजे या नादात धाग्याच्या मूळ गोषवाऱ्याच्या संपूर्ण विरोधी मत दिले तरी चालते.
अर्थात नास्तिकता हा शाप आहे का काय असले प्रश्न फक्त आणि फक्त मनोमन आस्तिकालाच पडतात. असो.
अमितव, धाग्यावर स्वागत
अमितव, धाग्यावर स्वागत
च्रप्स, अख्ख्या मायबोलीला ठाऊक आहे. ऋन्मेष नास्तिक आहे.
माझी पोस्ट पुन्हा वाचा. मी फक्त कठीण प्रश्न येता आस्तिकांचा सोपा युक्तीवाद सांगितलाय ईतकेच
आस्तिक असणारी व्यक्ती
आस्तिक असणारी व्यक्ती स्वतंत्र विचार करू शकणारी नसते म्हणजे काय? काही नास्तिक कंपूमधून आस्तिकांची टवाळी तर नेहमीचीच. जणू काय आस्तिक म्हणजे विचारशून्य माणसे आणि जगात नास्तिकच काय ते प्रगल्भ विचारवंत. दुसरीकडे काही आस्तिक मंडळी तर नास्तिकांना अशा विचित्र नजरेने पाहतात की नास्तिक असणे गुन्हा आहे. शेवटी नास्तिक-आस्तिकतेपेक्षा मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी महत्वाची होय. समाजसुधारकांचे म्हणणे तरी यापेक्षा काय वेगळे होते? आणि हो, नास्तिक असणे हा काही शाप नव्हे. बाकी हमीद दलवाईंच्या नास्तिकतेवरची नास्तिकांची मते काय आहे हे वाचायला आवडेल.
सचिनजी, आपल्या प्रतिसादात एक
सचिनजी, आपल्या प्रतिसादात एक फार फार महत्त्वाचा शब्द आहे बघा. "कंपू."
सारे फसाद की जड हा कंपूच आहे.
वैचारिक रग जिरवायला असे धागे
वैचारिक रग जिरवायला असे धागे फार उपयोगाला येतात.
शेवटी नास्तिक-आस्तिकतेपेक्षा
शेवटी नास्तिक-आस्तिकतेपेक्षा मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी महत्वाची होय.
>>>>>
हे खरे असले तरी एखाद्या प्रसंगात तुमच्या डोक्यात सुरू होणारया विचारप्रक्रियेवर तुमच्या आस्तिक नास्तिक असण्याचा प्रभाव पडत असेलच.
एक प्रश्न पडलाय, कोणी जाणकार
एक प्रश्न पडलाय, कोणी जाणकार असल्यास सांगा.
देव किंवा एखाद्या अद्रुश्य शक्तीवर विश्वास ठेवणे ही मनुष्याची मानसिक गरज आहे हे नक्की. मलाही वरच्या लेखाच्या प्रसंगात हेच जाणवले.
पण हि गरज फक्त मनुष्यांमध्येच आढळते की पशूपक्ष्यांनाही ही गरज भासते. अर्थात प्राण्यांचा मेंदू वा मन कसा विचार करते त्यावर हे अवलंबून आहे. प्रत्येक प्राण्याबाबत याचे उत्तर वेगळे असू शकेल. पण असा अभ्यास कधी झाला आहे का?
खूप लिहिलंय रे याच्यावर.. परत
खूप लिहिलंय रे याच्यावर.. परत परत तेच तेच टंकत बसायचा कंटाळा येतो.
थोडक्यात सांगतो. मनुष्य हा प्रचंड अहंकारी प्राणी आहे. (बाकीच्या प्राण्यांबद्दल आपण काहीच बोलु शकत नाही, षडरिपु त्यांच्यातही असतीलच)
अहंकारी असल्याने प्रत्येक गोष्टीला नियंत्रण करु पाह्तो, आपल्या म्हटल्याप्रमाणे गोष्ट झाली पाहिजे असे त्याला वाटते, सगळी कायनात आपल्या इशार्यावर चालली पाहिजे असे वाटते. जेव्हा असे होत नाही तेव्हा आपल्यापेक्षा ताकदवान कोणाच्या तरी इशार्यावर कायनात चालत असेल असं वाटतं. तीच ती देवाची संकल्पना. सांप्रत देवाबद्दल लोक जे जे विचार करतात तो मनुष्याच्या अहंकाराचेच विस्तृत स्वरुप आहे.
वाह.. नाना जबरी प्रतिसाद..
वाह.. नाना जबरी प्रतिसाद.. जियो !!!
प्राण्यांमध्ये देव, भगत नसतात
प्राण्यांमध्ये देव, भगत नसतात. याचा अभ्यास झाला आहे. ते अगदी लगेच काय घडणार आहे / घडु शकते या व्यतिरीक्त भविष्याचा विचार, योजना करु शकत नाहीत. त्यांचा मेंदू तेवढा विकसीत झालेला नाही. त्यामुळे त्यांना गरज नसल्याने त्यांच्या मेंदूत श्रद्धा उत्पन्न झाली नसावी असे मानतात.
संदर्भ: संभव असंभव - निरंजन घाटे.
होय. सद्सद्विवेकावर
होय. सद्सद्विवेकावर नास्तिकास्तिकतेचा प्रभाव पडतो.
वैचारिक रगासोबतच 'धग' जिरवायलाही असे धागे उपयोगी.
मनुष्याने प्राण्यांनाच देवस्वरूप मानले आहेत तिथे माणसांतील बाबा, बुवा, फकीरांची गोष्टच वेगळी.
रिप्लायसाठी काय सेटींग आहे हे माहीत नाही. त्यामुळे एकत्र पोस्ट केले. सेटींग सांगावी.
रिप्लायसाठी काय सेटींग आहे हे
रिप्लायसाठी काय सेटींग आहे हे माहीत नाही.
>>>>>
असे प्रतिसादा खाली रिप्लाय होत नाही.
ज्याला रिप्लाय द्यायचाय त्याचे नाव वा त्याचे वाक्य कोट (कॉपीपेस्ट) करत प्रतिसाद द्यायचा.
मानव, धन्यवाद ईण्टरेस्टींग
मानव, धन्यवाद ईण्टरेस्टींग माहिती आहे. आणि या निमित्ताने देवाची गरज का आहे याचाही एक मुद्दा समोर आला.
@ नानाकळा, अहण्काराचा मुद्दा तितका पटत नाही. कारण तो सर्वच मनुष्यजातीला एकजात लागू होत नाही.
त्याउलट असलेला असुरक्षिततेचा आणि अनिश्चिततेचा मुद्दा मात्र पटतो.
ऋ, मी जे लिहिलंय ते उथळपणे
ऋ, मी जे लिहिलंय ते उथळपणे वाचून विचार केलात तर पटणार नाहीच. तेव्हा असो.
काही प्रतिसाद तर्कविसंगत अथवा
काही प्रतिसाद तर्कविसंगत अथवा व्यंगोक्ती आहेत ते सोडून देतो.
स्वानुभव विचार करण्यासारखे आहे. नास्तिक आस्तिक वादात पडण्याइतके तत्त्वज्ञान नसल्याने मी बाहेर. एका चुकीच्या प्रसंगावरचे मंथन आहे.
नानाकळा काही हरकत नाही. तुमचा
नानाकळा काही हरकत नाही. तुमचा तर्कसिद्धांत पटला नाही म्हणून समोरच्याने ते उथळपणे वाचले आहे ही कसलीही तर्क नसलेली श्रद्धाच एकप्रकारे देवाला जन्म देते
देव आहे ही आपली श्रद्धा आहे ना, मग कोणाला ते पटो न पटो, मी सिद्ध करायच्या भानगडीत पडणार नाही, ज्याने त्याने आपापले अनुभव घ्यावेत, पण मला कोणी चुकीचे ठरवू नये, कारण जे मला समजलेय ते समोरच्याला समजले नाहीये, म्हणून मी देव मानतो आणि समोरचा मानत नाही
Pages