अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी

Submitted by आनन्दिनी on 16 May, 2017 - 21:14

ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग !

शालिनीचा विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,” अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?” अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.” “साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.

कर्टसी म्हणून अंजलीने शालिनीलासुद्धा कॉल केला. “अंजू..... कशी आहेस?..... कित्ती दिवसांनी.......” अंजलीने फोन केला याचा आनंद शालिनीच्या आवाजात लपत नव्हता. “श्रुतीच्या वडलांचं सांगायला फोन केला होतास का?” अंजलीने तुटकपणे विचारलं. “हो, मी निघतेच आहे. तू आणि मोहनासुद्धा याल ना? श्रुतीला सपोर्ट वाटेल. तसंही त्यांना फार नातेवाईकसुद्धा नाहीत.” शालिनीने म्हटलं. “हो, आम्ही दोघी येतोय. तू असणार म्हणून मोहनाला नको वाटत होतं पण मी सामाजावलय तिला” अंजलीने रुक्षपणे सांगितलं. “अंजू, मी चुकले गं.... किती वेळा सांगू मी चुकले, तू तुझ्या दुःखात होतीस, मोहना तिच्या संसारात बिझी, आई तिकडे गावी. मी खूप एकटी पडले, किती पोकळ वाटतं माहितीये.... तुमची मुलं तरी आहेत. मला तेही सुख नाही. त्या एकटेपणाच्या दुःखाच्या भरात चूक झाली माझ्याकडून. मला माझ्या चुकीचं खरच खूप वाईट वाटतं ग. तू मोहनाला सांग ना अंजू. ती माझ्याशी बोलतच नाही.” शालिनीचा रडवेला आवाज ऐकून क्षणभर अन्जलीचं मन कळवळलं. पण तरीही शालिनीच्या वागण्याला क्षमा होती का? शेवटी चूक ते चूकच ना! आपण तिला माफ केलं तर मोहनाला कसं वाटेल असाही विचार अंजलीच्या मनात येऊन गेला. “तुझा एकटेपणा मला समजतो. दुर्दैवाने आपल्या तिघीन्च्याही आयुष्यात हा एकटेपणा आहे शालिनी. पण मैत्रिणीच्या नवर्याबरोबर अफेअर करणं मला तरीही पटत नाही. जाऊदे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. चल घाईत आहे. ठेवते मी.” असं म्हणून अंजलीने फोन कट करून टाकला.

घरी पोहोचल्यावर तिने आईला श्रुतीच्या वडलांची बातमी सांगितली. “आज शालिनीशीसुद्धा बोलले पाच मिनिटं” अंजली म्हणाली, “खूप सॉरी म्हणत होती.” तिने पुढे म्हटलं. “मग तू काय म्हणालीस?” आईने विचारलं. “मी काय म्हणणार! मी काही ठीक आहे, जाऊदे, असं नाही म्हटलं पण मला वाईट वाटलं खरं” अंजलीने खाली बघत म्हटलं. “अंजू, तुमची इतक्या वर्षांची मैत्री! अगदीच तोडून का टाकता एवढ्यासाठी?”
“एवढ्यासाठी म्हणजे? तूच म्हणत्येस ना एवढ्या वर्षांची मैत्री म्हणून मग अशा मैत्रिणीच्या नवर्याबरोबर असं?” अंजलीने चिडून विचारलं.
“अंजू, अगं चुका होतात कधीकधी, पण तिला पश्चात्ताप झालाय. इतके वेळा सॉरी म्हणतेय, बरं ती काही नेहेमी अशीच वागणार्यातली आहे असंही नाही. होतं गं एखाद वेळेस काही. आणि आपण कोण परफेक्ट आहोत सांग! आशिषच्या वेळी सावरायला तुला तिने किती मदत केली. आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे”
“मी माफ करेनही. पण मोहना? तिला काय वाटेल?”
“मोहना खूप समजुतदार आहे. तिलासुद्धा नक्कीच कळेल.”

घरचं आटपून अंजली श्रुतीच्या घरी निघाली. आईचं बोलणं तिच्या मनात रेंगाळत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. या तिघी मेडीकलच्या पहिल्या वर्षाला होत्या, श्रुती त्यांना दोन वर्ष सीनिअर. शालिनीची होस्टेलवरची रूममेट म्हणून आधी शालिनीशी तिची मैत्री झाली आणि मग अंजली आणि मोहनाशीसुद्धा. श्रुतीचे वडील सरकारी ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. श्रुती त्यांची अगदी लाडकी होती. घरी सगळे तिला चिऊ म्हणायचे. तिला एक मोठा भाऊ होता, शार्दूल. तो त्यावेळी इंजिनीअरिंगला होता. त्यांच्या घरचं वातावरण फार कडक शिस्तीचं होतं. श्रुती नेहेमी बाबांना हे चालत नाही, ते चालत नाही, असं सांगत असे. पण ती फायनल इअरला असताना सर्जरीच्या एका लेक्चररबरोबर तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. आधी उडत उडत कानावर येत होतं. पण मग श्रुती उघड उघड डॉक्टर भूषण शर्माबरोबर फिरू लागली. आणि फायनल इअरची परीक्षा झाल्यावर तर ती होस्टेल वरून बॅग पॅक करून त्याच्याबरोबर पळून गेली. लग्न झाल्यावर घरचे ऐकतीलच या विचाराने दोघे लग्न करून आले पण श्रुतीच्या वडलांनी तिचं तोंड बघायलासुद्धा नकार दिला. दहा वर्षानी मोठा, युपीचा भैया आणि स्वतःचा शिक्षक अशा माणसा बरोबर लग्न करून त्यांच्या मुलीने त्यांचं नाक कापलं होतं. त्यांनी जे तिचं नाव टाकलं ते टाकलंच. ते तिला भेटले नाहीतच पण त्यांनी पुढच्या पंधरा वर्षांत तिला कधी त्या घरी पाऊलही टाकू दिलं नाही. काही वर्षानी श्रुती भूषणबरोबर अमेरिकेला गेली. त्यांना मुलं झाली पण श्रुतीचं माहेर तुटलं ते कायमचंच.... भावाशी आणि आईशी तिचं बोलणं होत असे पण वडलांच्या नजरेआड. भारतात आली की ती बाहेर कुठेतरी त्यांना भेटत असे. रडून आता तिचे अश्रूही सुकले होते.

पंधरा वर्षांनी श्रुती आज पुन्हा तिच्या माहेरी आली होती. मोजकेच नातेवाईक होते. इतक्या वर्षांनी वडलांना पाहिलं ते असं! तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मोहना खरं तर श्रुतीहून लहान पण जात्याच प्रेमळ स्वभावाच्या मोहनाने श्रुतीला सावरलं, मायेने तिने तिला थोपटलं. श्रुतीला रडताना बघून शालिनी सुद्धा मैत्रिणीला सावरायला पुढे झाली. ती श्रुतीजवळ आल्याबरोबर मात्र मोहना तिथून दूर सरकली आणि नकळत अंजलीही. घरी करण्याचे विधी आटपून पुरुष मंडळी बॉडी घेऊन गेली. आता खोलीत श्रुती आणि या तिघीच उरल्या. निघता निघता श्रुतीच्या दादाने तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. “चिऊ, बाबांनी जायच्या आधी दोन दिवस मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की इतकी वर्ष मी चिऊला येऊ दिलं नाही. पण आता तिला बोलावून घे. ती नक्की येईल. भेट होईल असं वाटत नाही पण तिला माझा निरोप दे. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांना तुला सांगायचं होतं ते यात रेकॉर्ड केलं आहे. चिऊला लगेच ऐकव तोपर्यंत मला मुक्ती नाही म्हणाले होते.” रेकॉर्डिंग सुरु करून तो निघून गेला. श्रुतीला अवघडल्यासारखं व्हायला नको म्हणून तिघी जायला उठल्या पण श्रुतीने शालिनीचा हात धरून तिला थांबवलं. हो ना करत तिघीही थांबल्या.

रेकॉर्डिंग सुरु झालं. श्रुतीच्या वडलांचा तोच परिचित धीरगंभीर आवाज. “चिऊ, काय सांगू आणि कुठून सुरु करू. काय तोंडाने सांगू! किती दुखः दिलं मी तुला. तुझ्या एका चुकीसाठी केव्हढी शिक्षा दिली मी. तुला, तुझ्या आईला, शार्दूलला, भूषणला आणि मला स्वतःलासुद्धा. तू माझी इतकी लाडकी मग इतका कठोर कसा झालो मी! फार आशा लावली होती मी तुझ्यावर. तुझ्या पळून जाण्याने, लग्नाने, झालेल्या अपेक्षाभंगाचं, अपमानाचं दुःख पचवलच नाही मी. सतत राग केला की रागाचं सोंग केलं.” एवढ्या बोलाण्यानेसुद्धा त्यांना धाप लागली होती. पण अजून उशीर करून चालण्यासारखं नव्हतं. ते नेटाने बोलत राहिले. “तू लहान होतीस पण मी तर मोठा होतो ना, मग मी मोठ्यांसारखा का नाही वागलो! लहान वयात आमचे आबा गेल्यावर कुटुंबात मोठा, भावंडांत मोठा म्हणून जबाबदारीची झूल लवकर अंगावर घेतली. हळूहळू यशही मिळत गेलं. तसतसा माझा अहंकार वाढतच गेला. मग मला हे चालत नाही, ते आवडत नाही असं स्वतः भोवती तारांचं कुंपणच तयार करून घेतलं. आणि तुम्हालाही बळजबरीने त्या कुंपणात डाम्बून ठेवलं. स्वतःला नेहेमी इतरांपेक्षा वरचढ मानत गेलो. माझ्या भोवतीच्या प्रत्येकाची प्रत्येक चूक मी दाखवली. चुकीला क्षमा असते हे माझ्या पुस्तकात कुठे नव्हतंच. तुझी बाजू घेऊन भांडताना तुझी आई म्हणाली होती, “तुम्ही क्षमा कराल तरच परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत येईल” तेव्हा मी ते धुकावूनच लावलं. पण आता मला कळतंय की एकदा तुला बघायला, एकदा तुला भेटायला, तुला सांगायला की तुझ्या आठवणी शिवाय एक दिवस नाही गेला, मी काहीही करेन. पण आता ते शक्यच नाहीये. मी खूप वेळ लावला चिऊ, मी खूप वेळ लावला. तुझी आई नेहेमी म्हणते चिऊसुद्धा तुमच्या सारखीच हट्टी आहे. थोडा हट्ट ठीक आहे पण माझ्यासारखे grudge मनात नको ठेऊ. आपलं आयुष्य जे विस्कटलं, त्याला कारण तुझी चूक नाही तर माझं हे सल, आकस धरून रहाणं होतं. रोग गेला तरी जसे देवीचे व्रण रहातात, चेहरा विद्रूप करून टाकतात, तसे हे सल आपलं आयुष्य कुस्करून गेले. मी कायम राग धरून ठेवला त्यामुळे मला मागायचा काही हक्क नाही तरीही हा बाबा तुझ्याकडे माफी मागतो आहे. चिऊ, या गेल्या पंधरा वर्षांबद्दल गिल्ट तर अजिबात वाटून घेऊ नकोस, मोकळ्या मनाने मला निरोप दे आणि जमलं तर आपल्या बाबाला क्षमा कर, करशील ना?”
रेकॉर्डिंग संपलं होतं. श्रुती हुंदके देऊन रडत होती. शालिनीने तिला मिठी मारली. मोहना आणि अंजलीही तिला येऊन मिळाल्या. अंजलीने मोहनाकडे पाहिलं. श्रुतीबरोबर तिने शालिनीलासुद्धा कवेत घेतलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने मनातले सारे सल धुऊन टाकले होते.

आनन्दिनी
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/05/blog-post.html

Group content visibility: 
Use group defaults

अन्जलीची गोष्ट - तिघी नावाची एक कथा मी काही महिन्यान्पूर्वी लिहिली होती. ही कथा तिचा दुसरा भाग आहे. पहिली कथा इथे वाचता येइल.

http://www.maayboli.com/node/61660

छान !! पण मनांतले काही सल इतक्या पटकन जात नाहीत. काही काळानंतर त्यातली तीव्रता कमी होते, पण मने पहिल्यासारखी सांधली जात नाहीत हे तितकेच खरे!!

छान !! पण मनांतले काही सल इतक्या पटकन जात नाहीत. काही काळानंतर त्यातली तीव्रता कमी होते, पण मने पहिल्यासारखी सांधली जात नाहीत हे तितकेच खरे!!>>> +१ गाठ राहतेच.

छान लिहिलयं

मनांतले काही सल इतक्या पटकन जात नाहीत. काही काळानंतर त्यातली तीव्रता कमी होते, पण मने पहिल्यासारखी सांधली जात नाहीत हे तितकेच खरे!!>>> +१ गाठ राहतेच. >>>> +१

हे काही पटले नाही. वडिलांचा मुलीवरील राग वेगळा. फॅमिली कटटा सिनेमात ही सिचुएशन घेतली आहेच. पण अफेअर म्हणजे ब्रीच ऑफ ट्रस्ट इन रोमँटिक रिलेशन शिप. मैत्रिणीलाच काय नवृयाला पण माफ न करता पळवून लावले पाहिजे. क्षमा नाहीच. असल्या बोट चेप्या धोरणाने बायका काहीतरी सोसत बसतात ज्याची गरज नाही.

तुमची लेखन शैली छान आहे.

छान !! पण मनांतले काही सल इतक्या पटकन जात नाहीत. काही काळानंतर त्यातली तीव्रता कमी होते, पण मने पहिल्यासारखी सांधली जात नाहीत हे तितकेच खरे!!
>>>
+१

पण ज्याला ते जमलं त्याच्यासारखं सुखी कोणी नाही

मनांतले काही सल इतक्या पटकन जात नाहीत. काही काळानंतर त्यातली तीव्रता कमी होते, पण मने पहिल्यासारखी सांधली जात नाहीत हे तितकेच खरे!! >>>> +१

अमा तुमचे म्हणणे पटले. पण क्षमा दुसर्‍यासाठी नसते, स्वतःच्या मनःशांतीसाठी असते!! सतत ग्रजेस धरून राहिले तर आपलेच जगणे मुश्किल होते. अर्थात वरच्या केस मध्ये क्षमा करून पुन्हा पहिल्यासारखी मैत्री होईल (अथवा नवरा पहिल्यासारखा वागेल) असे वाटणे भाबडेपणाचे ठरेल. क्षमा करणे म्हणजे सोसत बसणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला न करून घेणे. हे मी नुसते लिहितेच आहे. आचरणात आणणे जमले तर माझे आयुष्य खूप बेटर होईल.

क्षमा दुसर्‍यासाठी नसते, स्वतःच्या मनःशांतीसाठी असते!! सतत ग्रजेस धरून राहिले तर आपलेच जगणे मुश्किल होते. >>>>>> + 1 मला अगदी हेच म्हणायचं होतं

पण ज्याला ते जमलं त्याच्यासारखं सुखी कोणी नाही >>> मग असे सुखी या जगात कोणी नसेल.

क्षमा करणे म्हणजे दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला न करून घेणे. >> हे पटले.

अमा +१००० सहमत

मग असे सुखी या जगात कोणी नसेल.
>>
नॉट रिअली.. असतात, होता येतं Happy

क्षमा करणे म्हणजे सोसत बसणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला न करून घेणे.
>>>
+११११११११११११११

खूप सुरेख लिहिलेय. आवडले.

शालिनीला पश्चाताप झालाय, हातून चूक झाली हे तिने वारंवार सांगितलंय, खरेतर अशी चूक होऊ नये पण एकटेपणाचा ताण असह्य झाला आणि हातून चूक घडली. मोहनाचा नवरा आता तिसरीच्या मागे आहे म्हणजे तो मुळचाच बाहेरख्याली आहे त्याने शालिनिच्या मनस्थितीचा गैरफायदा घेऊन तिला भुलवल्याची शक्यता आहे. अशा वेळी मोहनाने आपल्या मैत्रिणीला माफ करणे मला तरी पटले. मोहनाने नवऱ्याला माफ केले की नाही हा सध्याच्या कथाभागाचा विषय नाही, सध्याच्या कथाभागावरून तिने हा विषय सध्या बंद केलाय असे वाटते.

आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे

हे खूप महत्वाचे आहे. चुकीला माफी नाही म्हणत बसले तर आयुष्यात दुःखच वाट्याला येणार.

क्षमा दुसर्‍यासाठी नसते, स्वतःच्या मनःशांतीसाठी असते!! सतत ग्रजेस धरून राहिले तर आपलेच जगणे मुश्किल होते. >> असे माफ करून त्याच चीटर पार्टनर बरोबर सुखी राहणे किंवा तसे स्वतःला किं वा जगाला फ सवत जगणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक आहे. त्यापेक्षा शिक्षा देउन बाहेर पडून स्वतःचे जीवन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करणे जास्त ऑनरेबल आहे व त्यात लास्टिंग मनःशांती लाभेल. पण हा वैयक्तिक प्रश्न व चॉइस आहे. खूप लोकांना असे कॉन्फ्लिक्ट हेड ऑन डील न करता जगणे बरे वाटते. पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. Happy

अमा, कथेत मोहनाने मैत्रिणीला माफ केल्याचे आलेय, तिचा नवरा आता तिसरीबरोबर असतो हे तिच्या केवळ कानी आलेय, याचाच अर्थ ती त्याच्या संपर्कातही नाहीय हे कळते.

असे माफ करून त्याच चीटर पार्टनर बरोबर सुखी राहणे किंवा तसे स्वतःला किं वा जगाला फ सवत जगणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक आहे. >>>> अमा मी त्याच प्रतिसादात हे ही म्हट्ले आहे की "क्षमा करणे म्हणजे सोसत बसणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला न करून घेणे." बाहेर पडावे किंवा न पडावे, पुन्हा मैत्री करावी किंवा न करावी हा वैयक्तिक चॉइस / गरज आहे. पण किमान ग्रजेस न धरता स्वतःचा आनंद शोधण्यामध्ये काहीच चुक नाही. अर्थात ग्रजेस धरून बसणे किंवा तेचतेच उगाळत आपली मानसिक शांती बिघडविणे हा पण वैयक्तिक चॉइस आहे.

नेहमीप्रमाणे मस्त कथा..

क्षमा करणे म्हणजे सोसत बसणे नव्हे. क्षमा करणे म्हणजे दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा स्वतःला न करून घेणे. ..अगदी...!

चुकीला माफी नाही म्हणत बसले तर आयुष्यात दुःखच वाट्याला येणार. >>>>> अगदी. स्वतः ला खुप त्रास करून घेण्यापेक्षा माफ करणं चांगलं

खूप सुरेख लिहिलेय. आवडले.
शालिनीला पश्चाताप झालाय, हातून चूक झाली हे तिने वारंवार सांगितलंय, खरेतर अशी चूक होऊ नये पण एकटेपणाचा ताण असह्य झाला आणि हातून चूक घडली. मोहनाचा नवरा आता तिसरीच्या मागे आहे म्हणजे तो मुळचाच बाहेरख्याली आहे त्याने शालिनिच्या मनस्थितीचा गैरफायदा घेऊन तिला भुलवल्याची शक्यता आहे. अशा वेळी मोहनाने आपल्या मैत्रिणीला माफ करणे मला तरी पटले. मोहनाने नवऱ्याला माफ केले की नाही हा सध्याच्या कथाभागाचा विषय नाही, सध्याच्या कथाभागावरून तिने हा विषय सध्या बंद केलाय असे वाटते.
आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे
हे खूप महत्वाचे आहे. चुकीला माफी नाही म्हणत बसले तर आयुष्यात दुःखच वाट्याला येणार. >>>>> +1111

नेहमीप्रमाणे कथा आवडली.

प्रतिसाद आणि प्रत्येकाची मते पण योग्य आहेत... शेवटी काय निर्णय घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.. तो त्यालाच सोडवावा लागतो..

Pages