गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ४था )

Submitted by मिरिंडा on 24 October, 2016 - 04:24

थोड्याच वेळात माई आल्या. त्यांचा पारा चढलेलाच होता. माईंची मुद्रा पाहून सरलाला जरा भीतीच वाटली. तरीही तिनी माईला पाणी हवय का विचारलं. त्यावर माई काहीच बोलली नाही. मग ती तात्याला म्हणाली, " इतका आतल्या गाठीचा निघशील असं वाटलं नव्हतं रे. बायकोच्या नादी लागून लगेच दावा दाखल केलास, काय? " तात्या खाली मान घालून म्हणाला, " माई, खरच, मला शर्मिला आणि जीवन असं काही करतील असं वाटलं नव्हतं. मला सुद्धा मागच्याच आठवड्यात कळलय. कसं सांगू तुला. हे.. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तात्या चिडून शर्मिलाला म्हणाला. त्यावर ती म्हणाली, " का मिळाली प्रॉपर्टी तर नको आहे का? मांजरासारखं चोरून दूध पिणारी मी नाही. वाईट पणा घ्यायला घाबरत नाही मी. माहीत नसल्याचा खोटा आव आणू नका. " तात्या त्राग्याने म्हणाला, " अगं!... काय बोलतेस काय? मला हे तू आणि जीवन असं काही कराल याची माहिती नव्हती. " आवाज चढवून ती म्हणाली, " माहिती नव्हतं? मृत्युपत्राचं वाचन झालं तेव्हाच तर बोलणं झालं होतं..... " तात्या काहिच बोलला नाही. ते पाहून ती कडवट पणानं म्हणाली, " असं करा, जे मिळालय ना ते देऊन टाका. आणि बसा हरी हरी करीत...... " ती हे म्हणाली, आणि तिरसटून तात्या म्हणाला, " त्यासाठीच तर आलोय. " मग त्याने आधीच तयार केलेला स्टॅंप पेपर काढला आणि तिला दाखवला. त्यात तात्याने मिळालेल्या सर्व मिळकतीवरचा हक्क सोडल्याचं लिहिलं होतं. तिने तो वाचला. तिचा चेहेरा रागाने लाल पिवळा झाला. ती काही न बोलता बसून राहिली. मग तो कागद तात्याने माईला दिला. पण माई अशी ऐकणार होती थोडीच.... तिने तो कागद परत करीत म्हंटलं, " तात्या बंद करा तुम्हा दोघांची ही नाटकं. दोघेही एकमेकाला सामील आहात. तू माहित नाही म्हणायचं, तिनी माहीती होतं म्हणायचं. मी मारतो तू रड, या पद्धतीचं तुमचं वागणं. बंद करा. आणि निघा आता....... आणि हो, ह्या वाड्याच्या चाव्या. इथे ठेवल्येत. पुढच्या महिन्यात आम्ही वाडाच काय, गावही सोडून जाऊ..... "

तात्या विव्हळून म्हणाला, " माई, अगं ऐक गं जरा. मला खरोखरीच काही नकोय. " त्याने माईचे पाय धरले...... तेवढ्यात पुढे होत शर्मिलाने मात्र त्या चाव्या उचलल्या. ते पाहून तात्याचा तोल सुटला, आणि त्याने शर्मिलाला कानफटात भडकावली. राग आणि शरम यानी लाल होत शर्मिलाने त्या चाव्या माईंच्या तोंडावर भिरकावल्या आणि तात्याकडे जळजळीत नजरेने बघत ती धावतच गाडीत जाऊन बसली. " मग माई म्हणाली, " जा. बायकोचा गुलाम ना तू. जा तिच्यामागे आणि जाऊन मनधरणी कर तिची " आता मात्र तात्या काही न बोलता निघाला आणि थोढ्याच वेळात गाडी सुरू करून मागे न पाहता निघून गेला........ थोडा वेळ असाच निः शब्द शांततेत गेला. मग शशांक म्हणाला, " माई, तू असं करायला नको होतस. शर्मिला वाईट असली तरी तात्या केवढा सरळ मनाचा आहे. "

"वा!, काय त्याचं ते सरळ मन? कोर्टाच्या तारखे आधीच येऊन नाही मग त्यानी सरळ मन दाखवलं? त्याची बाजू घेतोयस तू? पाहिजे तर तूही जा त्याच्याकडे. " मग शशांक म्हणाला, " काहीतरीच काय बोलतेस माई तू पण? माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाही. " माई काही न बोलता आत निघून गेल्या. सरला आणि शशांक यांना मात्र मोठ्ठी पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं. जणू काही आपल्याला काहीच भविष्य उरलं नाही अशी त्यांना भावना झाली. कशातच उत्साह वाटेना. तो दिवस असाच उदासवाणा गेला. रात्रीची जेवणं झाली. अंथरूणावर पडल्या पडल्या माईंना आणि शशांकला झोप लागली. सरलाला मात्र झोप लागेना. तिला सारखं तात्याच आणि शर्मिलाचं बोलणं आठवू लागलं. तसाच माईचा तऱ्हेवाईकपणाही आठवू लागला. माई हल्ली कशानं ही उत्तेजित होते आणि वाटेल ते बोलते. हिचा ताबा सुटत चाललाय की काय, असं तिला वाटू लागलं. पुढच्या अधांतरी आयुष्याची जाणीव असूनही माईला झोप कशी लागत होती, कोण जाणे. का तिनं काही ठरवलं होतं, आणि त्याप्रमाणे ती वागत होती. सरलाचं डोकं मात्र तेच तेच प्रसंग आणि संवाद घुमत असल्याने इतकं अस्वस्थ झालं की ती कधी दिवाण खान्यात फेऱ्या मारू लागली, तर कधी मागच्या पडवी मध्ये जाऊन बसू लागली. तिला नक्की असा मार्ग या सगळ्यावर पाहिजे होता. शेवटी ती कंटाळून अंथरूणावर पडली. आणि कधीतरी रात्री तिला झोप लागली...........

या प्रसंगाला आता महिना झाला. एक दिवस सकाळी सकाळी, म्हणजे सात साडेसातलाच पाटील आले. माई आणि ती ओटीवर बसून चहा घेत होत्या. अचानक आत शिरलेल्या पाटलांना पाहून माईंच्या कपाळावर आठ्या आल्या. पदर सावरून त्या औपचारिक पणे म्हणाल्या, " आज सकाळीच काय काम काढलंत? " घसा साफ करीत पाटील म्हणाले, " त्याचं काय आहे माई, न्हाई म्हनल तरी सरला आता लग्नाच्या वयाची आहे. काहीतरी बघाया पाह्यजे, न्हाई का? काल तालुक्याला गेल्तो. एक दोन स्थळं आहेत तुमच्यातलीच. न्हाई म्हनजे, तुमी ठरवायला मुख्त्यार आहात. पण सरला आम्हाला पोरीसारखी म्हनून........ " त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. माईंची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी ते थांबले. सरला आत गेल्याचं पाहून, माई म्हणाली,, " पाटील हल्ली फार काळजी वाटायला लागली आमची? अं?..... म्हणजे चिरंजिवांनी मध्यंतरी जे तमाशे केले ते विसरलात वाटतं? रात्री बेरात्री येऊन वाड्यासमोर धिंगाणे घालायचे आणि बापानं येऊन स्थळं सांगण्याचा शहाजोगपणा करायचा. पटतं का हे तुम्हाला? आम्ही आमची काळजी करू. निघा आता. तरी पाटील म्हणाले, " आमाला आपलं वाटतं म्हनून आल्तो. काई लागलं तर मागं पुडं पाहू नका, एवडच. चला रामराम. " असं म्हणून पाटील वाड्याच्या पायऱ्या उतरू लागले. सरला त्यांच्यासाठी हातात चहा घेऊन उभी होती, तिनी विचारलं, " हे काय माई, पाटील गेले पण. अगं, मी त्यांच्यासाठी चहा आणायला आत गेले. " त्यावर माई तिरसटली. " का, फार प्रेम उफाळून आलय वाटतं? का त्यांची सून व्हायची इच्छा आहे? " माईचा खवचटपणा सरलाला आवडला नाही, पण तिनी सकाळीच वाद नको म्हणून उत्तर न देताच ती आत गेली.

असेच काही दिवस गेले. शशांक आताशा तालुक्याला एका सी. ए. कडे अर्धवेळ कामाला जाऊ लागला. बेताचे का होईना पण त्याला पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. पण माई मात्र बरीचशी अबोल झाली. तिच्या मनात नक्की काय विचार चालू होते हे सरलाला कळत नव्हतं. रात्रीची माई बोलत असे ती पूर्णपणे बंद झाली. दिवसा ही ती जेवढ्यास तेवढ बोली. आजकाल ती पुजेला बसायची तीच मुळी दोन दोन तीन तीन तास. तर कधी ती दिवाणखान्याच्या खिडकीतून बाहेर अहेतुक पाहात बसायची. सरलाला मात्र तिच्या मनाला काही खातय की काय अस वाटे. तिच्या नजरेच्या टप्प्यात नजर मिळवून सरलानं काही वेळा खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. पण खास असं तिला काहीच दिसत नसे. ही वेगळ्याच विश्वात जगत्ये की काय असं तिला वाटे. माई आतून ढेपाळल्ये की काय असंही तिला वाटलं. काही दिवसांनी माईनी स्वतःचं अंथरूण दूर घालायला सुरुवात केली. तिला ती विचाराय्ला गेली तर माई केवढी भडकली. " का ग कार्टे? तुला काय करायचय? माझ्या मनात शिरायचा प्रयत्न करू नकोस. " मग माईचे डोळे एकदम दृष्टिहीन झाल्यासारखे तिला दिसले. ती कुठेच पाहात नव्हती आणि सगळीकडे पाहात होती. असली सैरटासारखी नजर सरलानी प्रथमच पाहिली. आणि घाबरून जाऊन ती अंथरूणावर पडली. दिवस असेच उदास वाणे आणि वेडेवाकडे जात होते. आता तिला जाणिव होऊ लागली, की माई, माई राहिली नाही तर, झपाटल्यासारखी वागत्ये. माईला वेड लागलं असावं असं तिला वाटू लागलं. शशांकचा मात्र यावर विश्वास व्बसत नव्हता. " तू जास्त वेळ घरात असतेस ना त्याचा हा परिणाम आहे. नसेल माईला बोलायच्ं आपल्याशी. माझ्याशी तरी कुठे बोलते? तशीही ती फार बोलणाऱ्यांपैकी नाही. "......... पण शशांक चुकत होता. माईत बदल होत होता. असेच काही दिवस गेले. आणि एका शनिवारी माईला न्हायचं होतं. म्हणून पाणी घेऊन ती बाथरूम मध्ये गेली. सकाळी दहाला गेलेली माई बारा वाजेपर्यंत आतच होती. अचानक सरलाला विचित्र वाटलं म्हणून ती बाथरूमच्या दार जवळ आली. आणि तिला आतू न शब्द ऐकू आले. "........ मी म्हंटलं ना, असू दे. सगळं करीन मी. अगदी एकटीनी. काळजीच करू नका..... ही : हीः हीः " हासण्याचा आवाज आला म्हणून सरलानी दार वाजवण्याचा प्रयत्न केला तर, दार उघडलं. ओलेती माई तिच्याकडे डोळे वटारून म्हणाली, " काय ग सटवे? माईला अशी कध्बी पाहिली नाहीस की काय? " तरी घाबरलेली सरला धीर एकवटून म्हणाली, " तसं नाही माई, पण फार वेळ झाला ना. " संभाषण एवढ्यावरच थांबलं. सरला पूढच्या ओटीवर जाऊन बसली. तिला ही अवस्था पाहून घाम फुटला. आता नक्कीच डॉक्टरांना बोलावल पाहिजे. पण गावात कुठला मनोवैज्ञानिक? तिनी हळूच दिवाणखान्यातून बाथरूम कडे पाहिलं. दार उघडं होतं. आत माई नव्हती. ती कपडे बदलीत असावी. पण सरलाला तिला पाहायला जायचा धीर झाला नाही.

असेच दोन तीन दिवस गेले. माईंचा अबोला संपत नव्हता. सरला पण शिवणाच्या क्लास मध्ये गर्क झाली. शशांकच्या म्हणण्याप्रमाणे जास्त लक्ष न देण्याचं ठरवलं. अर्थात, दुर्लक्ष करणं तिला कठीण जात होतं. पण करणार तरी काय? आता स्वैपाकाची जबाबदारी तिने स्वतःकडे घेतली. एकदोन वेळा पूर्ण दूध उतू गेलं तरी माईचं लक्ष गेल नाही. अशा अवस्थेत तिच्यावर कोणतीच जबाबदारी न देणं बरं असं तिला आणि शशांकलाही वाटलं. जास्त खोलात शिरूनही माईंच्या या अवस्थेचं कारण त्यांना सापडत नव्हतं. सीताराम सारख्या लोकांना सांगण्यात अर्थच नव्हता. त्यानी लगेचच मांत्रिक आणला असता. स्वतः बाबासाहेब तर असल्या उपायांची भंबेरी उडवीत. कोणाला सांगायचं?..... तिला समजेना. तात्याला सांगाव का? तो नुकताच नाराज होऊन गेला होता. त्यानी लक्ष नाही दिल तर आपलीच पंचाईत व्हायची. मग तिला एकदम दरेकर डॉक्टरांची आठवण झाली. ती दुसऱ्याच दिवशी क्लासहून येताना म्हणजे साडेबारा एक चा सुमार असेल तेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात शिरली. दवाखान्यात कोणीच नव्हतं. कंपाउंडर पण नव्हता. डॉक्टर आतल्या खोलीतल्या खिडक्या बंद करीत होते. बहुतेक दवाखाना बंद होण्याच्या वेळेला आपण आलो. असं वाटून ती थोडी शरमली. डॉक्टरांना मागे वळून पाहताच ती दिसली. ते म्हणाले " अरे सरला, ये. ये. काय ग इकडे कशी? आणि आजारी कोण आहे? बरं नाही का? " ती त्यांच्या समोरच्या खुर्चित बसली. प्रथम ती काहीच बोलली नाही. नक्की सांगावं तरी कसं? तिला उमजेना. मग ती म्हणाली, " डॉ. मी ठीक आहे, पण माई.... " असं म्हणून ती थांबली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. डॉ. घाबरून म्हणाले, " काय झालं माईना? बी. पी. वगैरे वाढलं का?.... " मग तिने माईच्या वागण्यातला बदल सांगितला. तिला आलेली शंकाही तिनी बोलून दाखवली. त्यावर गंभीर विचार करून डॉ. म्हणाले, " हे बघ सरला, खर तर ही माझ्या विषयातली केस नाही. पण अनुभवावरून एवढच सांगतो की माईंना अगदी मायनर पण वेडाचा झटका आला असावा. मी चुकतही असेन. पाहिल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही. पण त्यांना कसलतरी दडपण आलेलं असावं. मी उद्या येऊन बघून जाईन. मग बोलेन काय ते. " मग त्यांनी इतरही औपचारिक चौकश्या केल्या. ती घरी गेली.

दुसऱ्या दिवशी साडेदहा अकराच्या सुमारास डॉ. आले. सरला आज घरीच थांबली होती. माई, भेटायला डॉ. आल्येत सांगितल्यावर बाहेर आली म्हणाली, " अरे, दरेकर आज इकडे कसे काय? " त्यावर ते सावध होऊन म्हणाले, " काही नाही सहजच, तुम्हाला भेटायला आलो. इकडे देसाईंकडे आलो होतो, म्हंटलं तुमची खबर घ्यावी. कशी काय तब्बेत आहे? ".... माई जरा चकित होऊन म्हणालया, " म्हणजे? मला काय झालय? " मग तिला यांना मुद्दाम तर बोलवलं नाही अशी शंका आली. थोडा रागही आला. आवाजात थोडी धार आणून ती म्हणाली, " तुम्हाला कशी दिसत्ये? " त्यांचे मोठाले डोळे पाहून डॉ जरा वरमले, घाम पुसण्याच्या निमित्ताने त्यांनी तोडावरच्या भावनाही पुसल्या. वरकरणी हसत म्हणाले, " काय आहे माई, गावातले जुने आणि प्रतिष्ठित लोक तुम्ही, तुमची चौकशी नको करायला, नाही तर म्हणाल, बाबासाहेब नाहीत तर डॉ. अगदी फिरकतही नाहीत्त. "माई आतल्या आत धुमसू लागल्या.

डाँक्टरांनी पाह्यलं वातावरण ठीक नाही आता आवरतं घ्यावं. मग तपासण्याचं दुरच राहिलं. तेवढ्यात, संभाषण रुळावर यावं असं वाटून सरला म्हणाली, " डॉ. चहा टाकते, बसा ना. " पण डॉ. अस्वस्थ दिसले आणि जाण्याच्या तयारीने ते उठले व म्हणाले, " चला माई, मी येतो, काही लागलं तर सांगा. सरला त्यांना मुख्य दरवाज्यापाशी सोडण्यासाठी गेली. दबक्या आवाजात डॉ. म्हणाले, " उद्या ये, गोळ्या देईन" सरला मूकपणे हो म्हणाली. ते गेल्यावर ती आत वळली, आणि माई एकदम तिच्या अंगावर येत म्हणाली, "काय ग कार्टे, दरेकरला तू मुद्दाम बोलावलस ना? आणि म्हणून तू आज घरी राह्यलीस? जाताना तो काय म्हणाला ग? " त्यावर सरला म्हणाली, " कुठे काय? " माईच समाधान होईना. ती म्हणाली, "तुम्ही मुद्दाम करता का ग? मला वेड लागलय असं वाटतं ना? " त्यावर सरला काही न बोलता स्वैपाकघरात गेली. माईंची स्वतःशीच बडबड चालू झाली. दिवस अतिशय वाईट गेला. माई जेमतेमच जेवल्या. दोन तीन दिवस असेच, ओढल्यासारखे गेले. सरला डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेऊन आली. या गोळ्यांनी थोडीशी सुस्ती येईल असं ते म्हणाले. पण प्रश्न होता, त्या द्यायच्या कशा? सरला एक दिवस क्लास हून आली. दुपारचा एक वाजत होता. ती घरात आल्याचं माईंना कळलच नाही. ओटीवरून दिवाणखान्यात शिरताच तिला स्वैपाकघरातून मोठमोठ्यानी बोलण्याचा आवाज आला. "..... मी कोणाचं ही अक्षर ऐकून घेणार नाही. मी कोणचंही अक्षर ऐकून घे णार नाही...... मी कोणाचंही..... " माई स्वैपाकघरात दाणदाण पावलं आपटीत फेऱ्या मारीत होत्या आणि एकच एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होत्या. माईंच्या फेऱ्या थांबत नव्हत्या. ते पाहून सरला ओरडली, " माई अगं थांब जरा. हे काय चाललय? अशानं चक्कर येऊन पडलीस तर? " पण माई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. शेवटी ती माईंच्या मध्येच येऊन उभी राह्यली आणि तिला धरून रडवेली होत म्हणाली, " माई अगं काय झालय काय तुला? कोणाशी बोलतेस एवढं? इथे ऐकायला कोणीही नाही. हे बघ माई, ह्या गोळ्या मी आणल्येत, एक घे, म्हणजे बरं वाटेल. " असं म्हंटल्या बरोबर माई संतापून म्हणाली, " आण त्या गोळ्या इकडे, त्या डॉक्टरचं आणि तुझं हे कारस्थान आहे. कार्टे, तुला अनाथ म्हणून आम्ही वाढवली, आणि मला या गोळ्या खायला घालतेस? " असं म्हणून तिने दोन तीन गोळ्या तिच्या हातातून हिसकावून घेतल्या. आणि पटकन तोंडात टाकायला गेल्या. सरलाने त्यांचा हात मागे ओढला, म्हणून एकच गोळी तोंडात गेली. ती त्यांनी कडकडून चावून खाऊन टाकली. नंतर किती तरी वेळ त्या बडबडत बसल्या. निराशेने सरला खाली बसली. हळू हळू बडबड अचानक कमी झाली.
गोळीचा परिणाम होऊ लागला.................................

समोरच्या माठातलं पाणी त्यांच्या तोंडात ओतलं. त्यांचं शरीर आस्ते आस्ते ढिलं पडलं. आणि त्यांना एक प्रकारची सुस्ती आली. मग तिनी त्यांना कसतरी ओढत दिवाणखान्यात आणलं आणि सतरंजीवर झोपवलं....... आता तिनी सुटकेचा निश्वास टाकला. कपाळावर आलेला घाम पुसत ती थोडावेळ तिथेच बसली. मग तिला सांडलेलया गोळ्यांची आठवण झाली. स्वैपाकघरात जाऊन तिनी त्या गोळा केल्या. शशांक आल्यावर प्रथम तो तात्याला फोन करायला गेला. खरंतर सरलाला आवडल नाही, पण दुसरं कोणाला सांगण्यापेक्षा तात्याला सांगणं बरं असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी तिनी माईला समजावलं आणि स्वतःच्या हातानी जेवायला घालून गोळी दिली. माईनी झोपण्यापेक्षा भिंतीला टेकून बसणं पसंत केलं. त्या दिवशी माई अचानक शहाण्यासारखी वागली. म्हणजे ही सुधारू शकते अशी आशा सरलाला वाटू लागली. एक दोन दिवसानी ती डॉ. दरेकराकडे गेली. ते म्हणाले, " माझ्या ओळखीचे एक मनोवैज्ञानिक आहेत त्यांना मी एकदा बधून जायला सांगतो. म्हणजे आपल्याला हे किती गंभिर दुखणं आहे ते कळेल. ते उपायही सांगतील. त्यांचा विशेष म्हणजे ते विनाकारण औषधं देत नाहीत तर रोग्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचाही ते अभ्यास करून उपचार करतात. "..... त्यावर चार पाच दिवस गेले.

माईचे भ्रमिष्टासारखे चाळे अधून मधून चालूच होते. तात्याचा काही निरोप नव्हता. किंवा येऊन जाण्याबद्दल फोनही नव्हता. जीवन आणि पियूष तर काय आपल्याला आई आहे याची जाणीवही ठेवत नव्हते. साधं चौकशी करणारं पत्रसुद्धा ते लिहित नव्हते, फोन तर दूरच. आता मात्र शशांक आणि सरलाला कोणाच्यातरी आधाराची फार गरज वाटत होती. आणि एक दिवस तात्याचा फोन आला. शशांक तो घेण्यासाठी गेला. नाही म्हणायला तात्यानी उपचारासाठी लागतील ते पैसे देण्याची तयारी दाखवली. दुसऱ्याच दिवशी सकाळी आठलाच दरेकर आले. ते येताना एका गृहस्थांना बरोबर घेऊन आले. त्यांनी सरलाशी ओळख करून दिली. " हे डॉ सोबती. ह्यांच्या सल्ल्याप्रमाणेच आपल्याला सगळं करायचं आहे. " असं म्हणून त्यांनी डॉ. सोबतीना बसायला सांगितलं. सोबती एक बुटकासा माणुस होता. चेहेरा खप्पड, जेमतेम पाच फूट उंची, काळसर वर्ण, किडकिडित बांधा असलेल्या डॉ. सोव्बतींचे डोळे मात्र चांगलेच तेजस्वी आणि भेदक वाटले. प्रथम सरलाला तो माणूस जादुगार आहे की काय असच वाटलं. त्यांना बसायला सांगून दरेकर सरलाला आत घेऊन गेले, आणि हलक्या आवाजात म्हणाले, " काय ग? कुठे आहेत माई. आज नीट वागतील ना? नाहीतर एवढं जुळवून आणलय ते विस्कटायचं. " त्यावर ती अजून झोपली असल्याचं सरला म्हणाली. सोबती आत आले आणि म्हणाले, " प्रथम मला तुम्ही सगळा वाडा दाखवा. " असं म्हंटल्यावर दरेकरांनी त्यांना दिवाणखाना मागची ओटी, स्वैपाक घर, छोटी आणि मोठी पडवी आणि विहिरीचा भाग दाखवला. बाग तिथेच असल्याने दाखवली. मग दरेकर म्हणाले, " वाडा तसा एवढाच आहे, म्हणजे वापरात असलेला भाग. ".... " अहो, पण या खालच्या मजल्यावरची खोली अशी बंद का ठेवली?, " उत्तराची अपेक्षा न करता ते म्हणाले, " चला आपण वरचा मजला पाहू. ". त्यावर सरला म्हणाली, "तिथे पाहण्यासारखं काहीच नाही. चार खोल्या आहेत पण त्या बंद आहेत. " त्यावर ते म्हणाले, " तरी पण मला दाखवा. " सरलानी मग किल्ल्या घेऊन वरच्या मजल्यावरच्या खोल्या एकेक करून उघडून दाखवल्या. डॉ सोबती स्वतः आत जाऊन खिडक्या वगैरे उघडून बाहेर वाकून पाहात होते. नंतर ते सगळेच खाली आले. त्यांनी माईंना पाह्यले. माई थोडी फार जागी होण्याच्या बेतात होती. मग सोबती म्हणाले, " मला सांगा यांनी न झेपणारी काही कमिटमेंट केल्ये का? " त्यावर सरला म्हणाली, " तसं मला काही आठवत नाही. " मग त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि म्हणाले, " मी सांगतो तसं करा. या खोल्या अशा बंद करून ठेऊ नका. या पण उघडत चला, आणि सगळ्या खिडक्या पण उघडा. असं बघा, माईंना काही प्रमाणात त्यांचा आधार गेल्या सारखं वाटतय. त्यात त्या काहीतरी अशी गोष्ट बोलून बसलेल्या असाव्यात की जी त्यांच्याच्यानी होणारी नाही. तूम्ही नीट आठवा. तसच बाबासाहेब गेल्या पासून वाडयात असणारी गजबज नाहीशी झालेली आहे. त्यात तुम्ही खिडक्या आणि खोल्या बंद ठेवता. बाहेरची हवा आत येत नाही आतली कुबट हवा बाहेर जात नाही. या वातावरणाचा परिणामही त्यांच्यावर होत असणार. "....

"पण डॉ. सगळ्या खोल्या विनाकारण उघड्या ठेऊन साफ करणं कठीण आहे. " सरला मध्येच म्हणाली. डॉक्टर म्हणाले, " अगं असं नाही, अधून मधून त्या साफ करायच्या, नाहीतरी त्या बंद असताना खराब होतातच आहेत की. आपला हेतू एवढाच आहे की माईंना मोकळं वाटलं पाह्यजे. त्यांना सध्या कसं दुसऱ्याच्या घरात असल्यासारख्ं वाटत असावं. असो, तसं ही अवस्था थोडी गंभीरच म्हणायला हवी. त्या जर कोलॅप्स झाल्या तर त्यांना सावरणं आपल्याला कठीण जाईल. त्यांना एखादा वैचारिक धक्का देण्याची किंवा समजुतीनं घेण्याची गरज आहे. तू फक्त त्यांनी केलेली कमिटमेंट शोधून काढ. ती पूर्ण नाही झाली तरी चालण्यासारखं आहे, हे मग आपल्याला त्यांना पटवता येईल. कदाचित काही दिवस अजून त्या थोड्या भ्रमिष्ट पणानं वागतील.

हे सगळं फार हाताबाहेर गेलय असं समजण्याचं कारण नाही. या गोळ्या दे आणि मला एक आठवड्यानंतर कळव. तसच काही खास घडलं, तर आधी कळवलस तरी चालेल. असं म्हणून दरेकर आणि सोबती गेले.

मे महिना चालू झाल. उन्हाचे चटके चांगलेच वाढले. सरलानी तिचा क्लास संध्याकाळचा करून घेतला. त्यामुळे ती पाच वाजता जाऊन साडेसहा पर्यंत परत येऊ लागली. माई जवळ जवळ महिना दीड महिना घराबाहेर पडल्याच नव्हत्या. सरलाच्या मनात आलं तिला घेऊन बाहेर जावं. म्हणजे जरा बरं वाटेल. पण माई अजूनही तेवढी ठीक नव्हती जेवढी बाहेर जायला ठीक असायला हवी. शशांक एक दिवस तिला म्हणाला, " जून मध्ये कोर्टाची तारीख आहे. माई कशी काय जाणार? " त्यावर ती म्हणाली, " एवढं काय त्यात, जातील की वाडेकर, नाही तर आपण जाऊ. " सध्या शशांकचं बरं चाललं होतं. मनापासून काम करीत असल्याने तो आता त्याच्या मालकाचा आवडता झाला होता. हळू हळू त्याच्यावर ऑडिटची जबाबदारी टाकली गेली. ज्यानी त्याला लावला होता, त्याच्याकडून समजलं, की त्यानी जर असच काम केलं तर त्याला एक दोन महिन्यात पूर्ण वेळ कामावर ठेवलं जाईल, आणि अर्थातच त्याचा पगारही वाढेल.............

एक दिवस अशीच सरला क्लासहून घरी येत होती. संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते. स्वतःच्याच विचारात असलेल्या तिला वातावरणातला बदल चटकन जाणवला नाही. तिच्या येण्याचा रस्ताच नदीच्या बाजूनी असल्याने नेहेमीच खेळती हवा असायची. आत्ता मात्र जरा जास्तच वारा खेळू लागला. रस्त्यावरची धूळ आकाशात उंच उडू लागली. आणि ठिक ठीकाणी लहानसे घुळीचे भोवरे तयार होऊ लागले. रस्त्यावरचा कचराही त्याबरोबर गोल फिरायचा वर जायचा आणि पुन्हा खाली बसायचा. तिच्या अंगावरचा दुपट्टा एक दोन वेळा उडून जाण्याच्याच बेतात होता. तिनी सावरला म्हणून बरं. वारा एवढा वाढला की तिला वाऱ्याचा धक्का जाणवू लागला. तिनी आकाशाकडे पाह्यलं. परमेश्वरानी स्वच्छतेची मोहिम हाती घेतली असावी. तिच्या समोरची हवा धुळीनी इतकी भरून गेली, की तिला कुठेतरी थांबावसं वाटलं. म्ह्नणून ती रस्ता सोडून नदीकिनाऱ्याजवळ असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली उभी राह्यली. तिला वाटलं, वादळी पाउस येतोय की काय म्हणून तिनी परत आकाशाकडे पाह्यलं. पण तसं तिला वाटलं नाही. अचानक रस्ता निर्मनुष्य झाला. आता ती झाडाखाली एकटीच होती. तिथून ती निघण्याच्याच विचारात होती, थोडं फार अंधारूनही आलं. रस्त्यावरचे दिवे अजून लागले नव्हते. झाडाला टेकून ती उभी होती. वादळ अजून कमी होत नव्हते. वाऱ्याचा घूं घूं.......... असा आवाजही वाढला. तिला एकदम बाबासाहेबांना याच रस्त्याने नेल्याची आठवण झाली. पण तिला पुढच्या रस्ता पाहण्याचा धीर झाला नाही. तिनी मान वळवली....... आता अंधार चांगलाच झाला होता. तिला घरी जाण्याची हुरहुर लागली. माई घरी एकटीच आहे.. म्हणून तिनी दुपट्टा घट्ट आवळून घेण्यासाठी ओढला, पण तो मागे कुठेतरी अडकला असावा म्हणून पाहण्यासाठी मान वळवली....... मागे पाटलाचा वसंता तिचा दुपट्टा हातात घट्ट धरून उभा होता. अचानक तिच्या अंगाला कापरं भरलं...... तिनी किंकाळी फोडण्यासाठी तोंड उघडलं, पण वसंतानी चटकन तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला तशीच ओढली. तिचा तोल गेला. आता तो तिला, एखादं श्वापद जसं ओढून घेऊन जातं तसा तिला ओढू लागला. त्याच्या हातात आलेला दुपट्टा त्यानी ओरबाडून पहिल्यांदी काढून टाकला. तिचा छाती चा भाग उघडा पाहून तो जास्तच चेकाळला. तिला खाली पाडून तो तिच्या अंगावर बसला. अंधारामुळे सरलाला नीट दिसत नव्हतं. ती आता धक्क्यातून सावरली होती. वसंतानी तिचे केस धरले आणि तिच्या तोंडाशी तोंड आणण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या तोंडाचा दारूचा भपका येत होता. तिने मान वळवून तोंड बाजूला केलं. मग तिच्या लक्षात आलं, की आपला एक हात मोकळाच आहे........ " साली, शाणपणा करतेस काय? थांब तुला दाखवतोच....... असं म्हणून वसंता तिच्या कानफटात मारण्यासाठी हात वर करायला गेला. तेवढ्यात त्याची तिच्या केसांवरची पकड ढीली पडली. आपल्या मोकळ्या हातानी सरलानी हातात येईल तितकी माती घेतली आणि त्याच्या तोंडावर जिवाच्या आकांताने भिरकावली..... डोळ्यात धूळ गेल्याने वसंताने दोन्ही हात सोडले. तेवढयात सरलानी त्याला जोरात धका दिला..... तो बाजूला डोळे चोळीत भेलकांडला. ती त्वरेने उठली आणि पळत सुटली. पण बेभान पणामुळे घराची दिशा सोडून विरुद्ध दिशेला धावली. आता तिचे केस अस्ताव्यस्त उडत होते. वारा थांबायला तयार नव्हता. अंगावरती दुपट्टा नसलेल्या अवस्थेतच ती पळत होती. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिच्या लक्षात आलं, आपण वेगळ्याच रस्त्याला लागलोय. तिनी पायातल्या चपला भिरकावून दिल्या. नकळत ती धावत ती पोलिस चौकीच्या रस्त्यावर आली...... तिला श्वास लागला होता. छातीत एकदम घुसलेल्या श्वासाने उठणारी कळ दाबून ती चौकीच्या दारात आली. आत पोलीस शिपाई वाकणकर आणि दुसरे दोघे बसले होते. अजून इन्स्पेक्टर आलेले नव्हते. ती अशा विचित्र अवस्थेत आल्याने वाकणकरलाही धक्का बसला. तिला कशी तरी बाकड्यावर बसवून त्याने बाजूच्याच मटक्यातून पेला भरून तिच्या पुढे केला........

(क्र म श:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users