ताडोबा एक्स्प्रेस नावाची एखादी ट्रेन आहे याची मला तरी कल्पना नव्हती आणि आता हे नाव कायम लक्षात राहील,
असा अनुभव तिने दिला मला.
एका घरगुति समारंभासाठी मला नासिक ला जायचे होते. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी वाहतुकीची व्यवस्था
करायच्या मागे लागलो. सकाळी निघून संध्याकाळी परत यायचे होते. बस मला सोयीच्या नव्हत्या कारण त्या फिरत
फिरत जाणार होत्या. बर्याच दिवसात ट्रेनचा प्रवास केला नव्हता म्हणून ते बूकिंग करायला घेतले.
मुंबई ते नासिक साठी सकाळची गीतांजली एक्स्प्रेस मिळाली. सकाळी सहा ला मुंबई हून निघून साडे नऊ ला ती
नासिक रोड ला पोहोचते. तिचे कन्फर्म्ड बूकिंग मिळाले. संध्याकाळी येतानाचे मात्र तिचे तिकिट वेट लिस्टेड होते.
तसे घेतले असते तर मग शेवटपर्यंत टांगती तलवार आणि मग पर्यायी व्यवस्था ... असे त्रांगडे मला नको होते.
११०८४ ताडोबा एक्स्प्रेस चे तिकिट मात्र कन्फर्म्ड मिळत होते, तेच घेतले.
सकाळी साडेपाचलाच मी छ.शि.ट. ( हा शॉर्टफॉर्म मला फार विचित्र वाटतो, वाचायला आणि उच्चारायलाही ) पोहोचलो.
गीतांजली लागतच होती. मी यापुर्वी पण या गाडीने प्रवास केला आहे, त्यावेळी ती बरीच स्वच्छ असायची, आता तशी
राहिलेली नाही.
तिला सुटायला ५ मिनिटे उशीरच झाला. पण तरी ती नाशिकला वेळेआधीच पोहोचली. नाशिकला मी खुप वर्षांनी
जात होतो. पत्ता शोधण्यात बराच वेळ गेला. शेवटी मित्राच्या मेहुण्याला मला न्यायला यावे लागले.
तो समारंभ अगदी मजेत पार पडला. माझी एक खोड आहे, निघायच्या गाडीची वेळ मी कायम अर्धा तास आधीची
सांगतो पाहुण्यांना म्हणजे माझी वेळेवर सुटका होते. गाडीची वाट बघत स्टेशनवर थोडा टाईमपास करायला
आवडतो आणि अगदी वेळेवर स्टेशनवर पोहोचून धावत पळत गाडी पकडणे आवडत नाही.
यावेळेस मी तसेच केले आणि नाशकातून नाशिक रोड ला ऑटोनी यायला लागणारा वेळ लक्षात घेऊन निघायची घाई करू लागलो. पण ज्या घरी गेलो होतो, तिथली माणसं एवढी अगत्यशील होती, कि मला स्टेशनवर सोडायला गाडीच पाठवली.
त्यामूळे नी चार वाजताच स्टेशनवर आलो. ताडोबा एक्स्प्रेस ची वेळ १७.२५ अशी होती. मग स्टेशनच्या आजूबाजूला
भटकत चिवडा, बेदाणे, डाळिंब, पेरू अशी खरेदी करून बॅग पुरेशी जड करून घेतली.
पाच वाजता स्टेशनवर आलो.इंडीकेटर वर ज्या येणार्या गाड्या दाखवल्या होत्या त्यात ताडोबा एक्स्प्रेसचे कुठे
नावच नव्हते. स्टेशनवरचा जो रंगवलेला फलक आहे त्यावरही या गाडीचे नाव नव्हते. मी परत परत मोबाईलवरचा
मेसेज बघून खात्री करुन घेत होतो.
२ए चे बुकिंग होते म्हणून उच्च श्रेणीच्या प्रतीक्षालयात जाऊन चौकशी केली तर त्यांना पण या गाडीची कल्पना
नव्हती. त्यांनी स्टेशन मास्तरांना जाऊन विचारा असे सांगितले. तिथे गेलो तर त्यांनाही नावावरुन लक्षात आले नाही,
मग म्हणाले नंबर सांगा. ११०८४ असा नंबर सांगितल्यावर त्यांनी फोन वरून चौकशी करून सांगितले कि
गाडी मनमाड ला पोहोचली आहे. ( ही गाडी काझीपेठ ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशी आहे ).
१७.१५ झाले होते. आता इंडीकेटरवर ही गाडी दिसू लागली. तरी यायची वेळ १७.२५ हीच दाखवत होते. फलाट
क्रमांक ४ वर ही गाडी येणार होती. मी तिथे येऊन वाट बघत राहिलो.
नाशिक रोड चा फलाट क्रमांक ४ हा फारसा वर्दळीचा नाही. सर्व फलाटावर जेमतेम २५ माणसे होती. मी दोन चार
जणांकडे चौकशी केली तर त्यांच्याकडेही कनफर्म्ड तिकिटे होती. समदु:खी कुणी भेटलं तर फार सुख मिळतं नाही ?
माझ्या सवयीप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत मी दोन फेर्या मारल्या. स्टेशनवर वा विमातळावर मी सहसा बसत नाही. (गाडीत तर बसायचेच आहे, असा उच्च विचार ) बरेच जण बसून मोबाईल वर टाईमपास करत होते.
तर काहीजण उपरवाल्यावर हवाला ठेवून होते.
या फलाटावर लाईट अजून लावलेले नव्हते. हळूहळू अंधार पडू लागल्या होत्या. समोरच्या ३ नंबरवर मुंबईच्याच
दिशेने जाणार्या ६ गाड्या येऊन गेल्या ( त्यात वाराणसी, मनमाड, भुसावळ, वास्को अशा गाड्या होत्या. ) त्या
भसाभस येत होत्या, त्यांना झटपट सिग्नल मिळत होते आणि सटासट सुटतही होत्या. आमचा ताडोबा मात्र कुठेतरी
अडकला होता.
स्टेशनवरचे फिरते विक्रेते अधून मधून येत होते पण त्यांनाही या गाडीची कल्पना नव्हती ( ही गाडी आठवड्यातून
एकदाच येते ) ते मग ३ नंबरवर गाडी आली कि तिथे जात असत. तब्बल पावणेसात वाजता फलाटावरचे लाइट्स
लागले. तोपर्यंत गाडीसंबंधित कुठलीच घोषणा झालेली नव्हती. पावणेसात वाजता घोषणा होऊ लागला.. थोड्याच
वेळात....
अजूनही मला डब्यांचा क्रम कळलेला नव्हता. त्याची घोषणा होतच नव्हती. स्टेशनवरच्या दिव्यावर आधी
११०८४, मग पी. एफ ४ मग सी. आर. अशी अक्षरे झळकत होती. शेवटी तर चक्क एन. के. ( नॉट नोन ) अशी
अक्षरे झळकू लागली. माझ्यासारखेच सर्व जण गोंधळलेले होते.
शेवटी सात वाजून पन्नास मिनिटांनी गाडी फलाटावर आली तोपर्यंत डब्यांचा क्रम दाखवतच नव्हते. मग गाडीबरोबर चालत मी माझा ए १ डबा शोधला आणि नवल म्हणजे गाडी पुर्णपणे रिकामी होती. माझ्या डब्यात तर मी एकटाच
होतो. बाकी डबे पण तसेच असावेत. टी. सी. येऊन मला फक्त नाव विचारून गेला. जाता जाता म्हणाला
कि आज तूम्ही आमचे व्ही. आय. पी. पाहुणे. तिन्ही एसी स्लीपर डब्यात मिळून मी एकटाच प्रवासी होतो.
गाडी नासिक रोड स्टेशनवर तब्बल दहा मिनिटे ऊभी होती. मग तिला एकदाचा सिग्नल मिळाला. तो पर्यंत
चांगलाच अंधार पडला होता आणि खिडकीच्या काचाही चांगल्याच गडद रंगाच्या असल्याने बाहेरचे काहीच
दिसत नव्हते. मला बेड रोल दिला तो अंथरून मी डॉ. वर्षा जोशी या आवडत्या लेखिकेचे एक पुस्तक
वाचायला घेतले. गाडी अधे मधे थांबत होती, तेव्ह्या दरवाज्यात जाऊन मी बघत होतो तर कुठलेच स्टेशन
नसायचे.
मग कुणीतरी जेवणाची ऑर्डर घ्यायला आला. कोकण रेल्वेतले जेवण फर्मास असायचे, म्हणून मी व्हेज बिर्याणीची
ऑर्डर दिली शिवाय मला औषधाच्या गोळ्याही घ्यायच्या होत्या.
इगतपुरीला जेवण आले. बिर्याणी भयाण होती. तांदळासोबत काबुली चणे आणि पांढरी चवळी शिजवली होती.
आणि सर्वच अर्धे कच्चे होते. गोळ्या घ्यायच्याच होत्या म्हणून मी कसे बसे चार घास खाल्ले आणि बाकीची भूक
नासिकचे पेरू खाऊन शमवली.
इगतपुरीला पोहोचेपर्यंत साडे आठ वाजले होते. गाडी कधी पोहोचेल ते सांगता येत नव्हते. मला झोप लागली तर ठाणे आल्यावर मला उठवा असे सांगून मी मस्तपैकी ताणून दिली. ती मात्र छान लागली, संधी मिळताच गाडी भन्नाट
वेगात जात होती पण मधेच कुठेही बराच वेळ थांबतही होती.
टी. सी. ला वाटले असावे मला ठाण्याला उतरायचे आहे म्हणून त्यांने मला पारसिक टनेल आल्यावर उठवले.
मी आवरुन घेतले. ठाण्यालाही गाडी ५ मिनिटे थांबली.
रात्रीचे बारा वाजत आले होते. टाईमटेबल प्रमाणे गाडी सव्वा अकराला कुर्ला टर्मिनस ला पोहोचणे अपेक्षित
होते. नासिक रोड लाच दीड तास उशीर झाला असला तरी गाडीने बर्यापैकी वेळ भरून काढला होता.
पण परत घाटकोपर स्टेशनसमोर गाडी दहा मिनिटे थांबली. तोपर्यंत मी दरवाज्यात आलो होतो. तिथेही गाडी
रखडल्यावर ऊडी मारून लोकल पकडावी असे विचार मनात येऊ लागले होते. मग मी उभ्या उभ्या
उतरत असणारी विमाने बघितली ( १ गल्फ एअर, १ ब्रिटीश एअरवेज, १ एअर इंडीया, १ जेट कनेक्ट आणि २
जेट एअरवेज बघितली. ) तिथून सुटली तर विद्याविहार स्टेशनसमोर परत ५ मिनिटे रखडली. तेवढ्यात कुर्ला
टर्मिनस वरुन एक गाडी सुटली आणि आमच्या ताडोबाला फलाट मिळाला.
उतरल्यावर बघितले तर तोपर्यंत गाडीत निव्वळ दहा बारा माणसे उरली होती.
( लेखामागची प्रेरणा सांगायलाच हवी काय ? आणि त्या लेखांमधले डिटेलिंग आणि आमचा फाफट पसारा यांची तुलना करणे गरजेचेच आहे काय ?
दिनेशदा, नासिकला घरी जायचे
दिनेशदा, नासिकला घरी जायचे असेल तर, गीतांजली नाहीतर पन्चवाटी एक्स्प्रेस. पन्चवाटी एक्स्प्रेस सन्ध्याकाळी पकड्ली की रात्री ९.३० ला घरी. अगदी पर्याय नसेल तर दुपारची सेवाग्राम (ही पण ३ ला निघुन सन्ध्याकाळी ७.३० ला पोहोचते). ११०८४ ताडोबा एक्स्प्रेस हे नाव तर पहील्यान्दा ऐकले. बाकी तुम्ही प्रवास enjoy केला असे वाट्ते. माझी तर चिड्चिड झाली असती.
मस्त लिहिलंय दिनेशदा ताडोबा
मस्त लिहिलंय दिनेशदा
ताडोबा एक्सप्रेस पहिल्यांदाच ऐकली
अश्विनी, हेच लिहिणार होते.
अश्विनी, हेच लिहिणार होते. गोदावरी पण बरी पडायची पूर्वी.
या ट्रेनींव्यतिरिक्त दुसरी कोणती ट्रेन पकडली ना, की हाच अनुभव थोड्याफार फरकाने येतो!
दिनेशदा इगतपुरी ला दालवडे चांगले मिळतात. नेक्स्ट टाईम
आताच गुगल केले तर ही ट्रेन
आताच गुगल केले तर ही ट्रेन याच ऑगस्ट मधे सुरु झाल्याचे वाचले.
मस्त लेख . नविन माहीती दा...
मस्त लेख . नविन माहीती दा...
दिनेश चांगले वर्णन केले आहे
दिनेश चांगले वर्णन केले आहे सगळे.
//तो पर्यंत चांगलाच अंधार पडला होता आणि खिडकीच्या काचाही चांगल्याच गडद रंगाच्या असल्याने बाहेरचे काहीच दिसत नव्हते.//
म्हणूनच आयसीएफ बनावटीच्या वातानुकूलित २ टियरचा प्रवास मला धोकादायक वाटतो. डबा कोणत्या डिझाईनचा असेल, काहीच खात्री देता येत नाही. त्यापेक्षा वातानुकुलित ३ टियर चांगला वाटतो.
डब्यामध्ये एकटेच आणि ट्रेनचे
डब्यामध्ये एकटेच आणि ट्रेनचे नाव ताडोबा एक्स्प्रेस.. भारी.. थोडा काल्पनिक थरार ओतायला हवे होते
छ.शि.ट. ( हा शॉर्टफॉर्म मला फार विचित्र वाटतो, वाचायला आणि उच्चारायलाही )
>>>>>
खरंय, मलाही नाही रुचत.
आमच्याकडे मी आजच्या पिढीतील मुलगा सीएसटी बोलतो. आईवडील विटी बोलतात. तर आजोबा, मोठे काका हे बोरीबंदर बोलतात
मस्त लेख.
मस्त लेख.