जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस

Submitted by आशुचँप on 2 October, 2016 - 18:10

http://www.maayboli.com/node/60334 - (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना
======================================================================

नवा दिवस उजाडला, आणि कालची मरगळ झटकून टाकत मनाला सज्ज करत उठलो. आज त्यातल्या त्यात कमी त्रास व्हावा अशी मनापासून प्रार्थना केली. पण असे लक्षात आले की त्या जगन्नियंत्याला माझी परिक्षा संपवायची काय फारशी घाई नसावी.

याचे कारण प्रातविधींच्या दरम्यान मला जोरदार ब्लीडींग झाले. इतके की अक्षरश धास्तावलो मी हे काय प्रकरण?. बाहेर आल्यावर कुणालाच काही बोललो नाही पण तातडीने गुगलबाबाला विचारले. म्हणले रे बाबा, सायकलीस्टना असे होते का?
तर बाबा उवाच -
वत्सा, शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने तसेच आहारात फायबर पुरेसे न गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तरी वेळीच योग्य ती उपाययोजना करावी.

आणि असे होणारा मी एकटाच नाही असे पण कळून आले कारण बरेच लोकांनी हे विचारले होते. ठीक आहे, फार काळजीचे कारण नाही, आज भरपूर पाणी प्यायचे आणि फायबर युक्त पदार्थ खायचे. चहा, कॉफी शक्यतो टाळायची. राजस्थानातली शुष्क हवामान कदाचित कारणीभूत असावे, त्यामुळे आता कसलाही धोका पत्करायचा नाही.

याच विचारात खाली आलो आज चक्क वेळेवर. पण हाय रे कर्मा, बाकी सगळे सुद्धा एकत्रच जमले, त्यामुळे आज बळीचा बकरा कोणच नव्हता. हॉटेलवाला मॅनेजर इतक्या पहाटेसुद्धा प्रसन्नचित्त होता. त्याने आज कुठे मुक्काम करणार, वाटेत काय काय लागेल याची साद्यंत माहीती दिली. (काय काय म्हणजे गावे, असेही प्रेक्षणीय काय नव्हतेच). आमचा एक मस्त ग्रुप फोटोही काढून दिला. चक्क चहासोबत ब्रेड बटर पण मिळाले. खरेतर मी ठरवले होते की आजपासून चहा प्यायचा नाही. पण त्या वेळी गरमागरम चहाचा कप नाकारण्याचे धाडस झाले नाही.

बाहेर पडलो, मस्त धुकट सकाळ, गार हवेची झुळुक शिरशिरी आणत होती आणि हेमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी वॉर्मअप केले. तो एखाद्या कडक शाळामास्तरासारखा सगळ्यांकडून सगळे प्रकार करून घ्यायचा आणि त्याचा उपयोग होत असल्यामुळे आम्हीही आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे करायचो. (अर्थातच मास्तरांची टिंगलटवाळी करत).

इतक्या छान वातावरणात मला पायाच्या दुखण्याचा विसर पडल्यासारखेच झाले होते. आणि सुरुवातीच्या काही किमी मध्ये तर दुखले नाही त्यामुळे असा खुशीत होतो. आणि झपाझप पॅडल मारत सुसाट गँगला गाठायचा प्रयत्न करत होतो. पण लुसलुशीत हिरव्यागार गवतातून जात असताना भुजंग फणा काढून उभा रहावा तसे दुखण्याने अचानक उग्र स्वरूप धारण केले. इतके की कळ अक्षरश डोक्यात गेली.
आईग..असे करत मी सायकल बाजूला घेतली, कसाबसा उतरलो आणि सायकल सोडून चक्क रस्त्यावर लोळण घेतली. काका मागून येत होतेच आणि मी असा वेदनेने गडाबडा लोळताना पाहून ते एक क्षण भांबावलेच. काय करावे हे त्यांना समजेच ना. त्यांनी पटापट सायकल लावली आणि मला पायाला मालिश करायला पुढे सरसावले, पण मला पायाला हात लावला तरी कळ जात होती.

त्यांना म्हणल, मला तातडीने रेलीस्प्रे द्या, एक पेनकिलर द्या, काहीतरी द्या पण दुखायचे थांबवा. त्यांनी मग घाईगडबडीने स्प्रे शोधून दिला, मी तो भसाभस मारला पण दुखायचे थांबेना. गोळी घेतली आणि तसाच रस्त्यावर उताणा पडून राहीलो. नशिबाने एकही गाडी त्यावेळी जात नव्हती. किती वेळ असा पडलो लक्षात नाही पण डोळे उघडले तेव्हा काकांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरलेले पाहून मी सावरलो, उठून बसलो. पाय तपासला, क्रेप बँडेज बांधले.

पेनकिलरच्या प्रभावाखाली होतो तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापायचा माझा मानस होता. पण वाटेत डावीकडे एक सुंदर मंदिर दिसले. त्याचे बांधणी इतकी घाटदार होती की मला थांबल्याशिवाय राहवलेच नाही.
फार जुने नसावे, कारण रंग नवाच वाटत होता, पण प्रवेशद्वारावर मस्त शिल्पे वगैरे एकंदरीतच थाट मस्त होता. ते मंदिर होते इच्छापूर्ण बालाजीचे. आता आमचे कुलदैवतच बालाजी त्यामुळे मला फारच छान वाटले. म्हणलं,
"देवा रे ही इच्छा पूर्ण कर की काही विघ्न येऊ नयेत."
बूट काढावे लागले असते आणि वेळही गेला असता म्हणून आत न जाता बाहेरूनच काही फोटो मारले.

तिथे शेजारीच एक स्वी़टमार्ट होते, काका म्हणे त्यांच्याकडे ब्रेड बटर मिळाले तर पहा, आपल्याला मधल्या वेळेत होईल. पण हाय, कट्टर स्वीट मार्टवाला होता तो. फक्त मिठाई, गुलाबजाम आणि बर्फी. घ्यावे तरी एक पाप. त्याला तरी सुनावलेच, म्हणलं
"हमारे यहा पुणे मे स्वीटमार्टवाले ब्रेड, बटर, जॅम के साथ कोल्ड्रींक्स भी बेचते है. जरा कुछ तो व्हरायटी रख्खा करो भय्या."

त्यावर त्याने ओशाळे हसून नुसतीच मान डोलावली. अर्थात त्याचेही बरोबर होते, तिथल्या वैराण प्रदेशात च्यायला लोक दिसायची मारामार. तिथे रोज ताजा ब्रेड आणि बटर घ्यायला कोण येणार. मंदिराच्या शेजारी असल्यामुळे प्रशाद म्हणून मिठाई घेत असणार लोक.
शहरात रहात असल्यामुळे आपल्याला कितीतरी गोष्ट गृहीत धरायची सवय असते याची त्यावेळी प्रकर्षाने जाणीव झाली.

त्यानंतरचा पुढचा प्रवास हा कालचीच पुनरावृत्ती होती. तेच रुक्ष उजाड माळरान, तीच खुरटी झुडपे, तशीच घरे आणि तसलाच उकाडा. राजस्थानातून येण्याची चूक केली का असे प्रकर्षाने वाटून गेले. कारण आज फक्त तिसराच दिवस होता, आणि या उन्हाला विटलो होतो. अजून तीन दिवस याच फुफाट्यात सायकल चालवायची होती. आता सायकलिंग हा मजेमजेचा प्रवास न राहता कुठून आलो इथे, गप्प घरी फॅन लावून पडलो असतो, नस्ती खाज या वळणावर चालला होता. पण प्रवासाची हिच गंमत असते, त्यावेळी असे प्रकर्षाने वाटून जाते कशासाठी हे सगळं, पण तो खडतर प्रवास संपून घरी आल्यावर मन पुन्हा पुन्हा तिकडेच धाव घेते. आत्ताही हे लिहताना मला तो प्रवास, तीच धूळभरली घरे, तोच उन्हाचा तडाखा, डोळ्यात घामाच्या धारा जाऊन होणारी चुरचुर, फुलून आलेली छाती, भरून आलेल्या मांड्या आणि ऐकू जाणारे दिर्घ श्वासोश्वास सगळे काही आठवतयं. जणू ते सगळं अनुभवतोय.

तर याच विचारात असताना पाय ओढत चाललो होतो. आज माझा भरवशाचा साथीदार हेम माझ्यासोबत नव्हता. तो आज एकदम बांगबुंग करत पुढे गेलेला. काकाही मला आता बरे वाटत आहे बघून हळूहळू पुढे गेले. मी मग माझ्या गतीने रमतगमत सायकल चालवत राहीलो. तर कोण भेटावा तर सुह्द. त्याचा फिटनेस कमालीचा होता त्यामुळे तो इतक्या मागे कसा असा मला प्रश्न पडणार तोच त्याने मला बोटाने रस्त्याच्या बाजूला दाखवले. एक मोर निवांत धुळीत किडे टीपत चालला होता.

आता राजस्थानात मोर आणि चिंकारा दिसणे फार नाविन्याचे नाही असे मला त्याला सांगायचे होते. हे दोन्ही तिथे अतिशय पवित्र समजले जातात त्यामुळे त्यांना माणसांचे भय नसते आणि अक्षरश कळपाच्या संख्येत हरणे दिसतात हे मला माहीती होते. अर्थात त्याच्या चेहऱ्यावर इतका उत्साह ओसंडून चालला होता, मग काहीच बोललो नाही आणि हळूहळू पुढे सरकत राहीलो. पुढे ४० एक किमीवर रतनगढ ओले. इथे जैसलमेर- बिकानेर मार्गे फतेपुर (राजस्थानातले फतेपुर, फतेहपुर सिक्रीवाले नव्हे) जाणारा नॅशनल हायवे पार झाला तिथल्या तिठ्यावर सगळी गँग वाट पाहत थांबली होती.

धाबा इतक्या आत होता की वाळूतून मला सायकल आत नेताच येईना आणि मग तिथेच पार्क करून जायला लागलो तेव्हा लक्षात आले की आता सायकलसोबत चालणेही अवघड होत चालले आहे. पावलागणिक पाय दुखत होता आणि वाळूत पावले रुतवत चालताना अजूनच अवघड होते. कसाबसा धाबा गाठला आणि तिथल्या बाजल्यावर अंग टाकले.

खायला काय आहे विचारले तर सगळेजण चिप्स, कुरकरे तत्सम काहीतरी पदार्थ पोटात भरत होते आणि वर मसालेदार चहा. मी वैतागलोच, एकतर इतके सायकलींग करा आणि पोटात भरायला हा असला कचरा. सकाळचे ब्लींडींग आठवून मी चहा नकारून दुध प्यालो ग्लासभर. आणि पुढचा प्रवास आता फळांवर काढावा लागणार याची खूणगाठ बांधली कारण फायबर अजूनही काहीही पोटात गेलेले नव्हते. पाणीही वाटेत कुठे नसल्याने पुरवूनच पीत होतो.

त्या तिठ्यावर चुकण्याची शक्यता असल्याने आम्ही सुह्द येईपर्यंत थांबायचे ठरवले, पण बेटा त्या मोराच्या नादात चांगलाच गुंगला होता कारण बराच वेळ तो उगवालाच नाही. त्याला फोन करणार तोच ओबीचा फोन वाजला. आम्ही हनुमानगडला ज्या आरके पॅलेसला मुक्काम केला होता त्याच्या मॅनेजरचा फोन.
तो म्हणे "सर तुमच्याबरोबर एका रुमची चावी आलीये चुकून."
आयला, हा किस्साच झाला म्हणत सगळ्यांनी आपापले सामान तपासले तर ती वेदांगकडे निघावी का. आम्हाला खात्री होती की हे काम सुह्दचे असणार कारण तो वेंधळेपणा करण्यात पटाईत होता. असेही तो त्याच्या या खासीयतीमुळे हमखास बकरा व्हायचाच. तो अमृतसरला सायकलचे लॉक विसरला होता. ते तिथल्या मॅनेजरला फोन करून मुक्तसरला पाठवायला सांगितले. पण ते पोचायच्या आधीच आम्ही मुक्तसर सोडले मग तिथल्या माणसाला अजून पुढे कुठे पाठवता येईल का याची चाचपणी चालली होती.

बिचारा तो मॅनेजर त्याची टूव्हीलर घेऊन निघाला होता पण आम्ही रतनग़ढ गाठल्याचे कळताच पुन्हा माघारी गेला. पण आमची भंकस चालली होती त्यात सुह्दची खेचणे मेन होते. आम्ही सुहदच्या वेंधळेपणावर भरपूर तोंडसुख घेतले. आमच्या या हशाच्या खकाण्यात एक व्यक्ती आज सामिल नाहीये याची त्यावेळी जाणिव झाली नाही. ते होते घाटपांडे काका. एरवी ते खिलाडूवृत्तीने हसून दाद द्यायचे पण आज ते काहीच बोलत नव्हते.
सुह्द आला तो पण थोडा तणतणत. म्हणे मी इतका मागे राहीलो होतो तर कुणीतरी थांबयला हवं होतं पण कुणीच थांबले नाही. म्हणलं सगळ्यात शेवटी मी होतो, मी थांबलो असतो तर अजून उशीर झाला असता. त्यावर तो काहीच बोलला नाही.

रतनगढ तसे बऱ्यापैकी फेमस असावे कारण तिथे बऱ्याच जुन्या हवेल्या आणि वाडे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर देवळेही आहेत. इतकी की राजस्थानची वाराणसी असा उल्लेख आंतरजालावर सापडला. बिकानेरच्या महाराजांनी आपला मुलगा रतन याच्यानावे इथे किल्ला बांधला आणि गावाचे नाव पडले रतनगढ. अर्थात किल्ला नामक काही तिथे शिल्लक नाही. मला हे सगळे बघायला जाम आवडले असते, पण आजही १४० चा पल्ला होता. वेळही नव्हता आणि आता उत्साहही नव्हता.

त्यामुळे गावाला बायपासकरून पुढे निघालो. आता हेम माझ्या सोबत होता. पुढे २० एक किमी अंतरावर एक वळण लागले, तिथे छापर गावाच्या इथे वेदांग आणि सुह्द थांबून फोटो काढताना दिसले. बघितले तर काळवीटांचा एक कळप निवांत चरत होता.

सोबत चिंकाराचाही कळप होता

तशी बरीच लांब होती त्यामुळे फोटो काढायचा निष्फळ प्रयत्न केला आणि माझ्या विश्रांतीदरम्यानच्या उद्योगाला लागलो. ते म्हणजे बँडेज सोडणे, पायाला मोकळा श्वास घेऊ देणे, जरा हलक्या हाताने मसाज आणि मग पुन्हा रेलिस्प्रे मारून, बँडेज बांधून शुज चढवून पुढच्या टप्प्यासाठी सज्ज व्हायचे.

असेच थांबत चालवत लळत लोंबत सायकल चालवत राहीलो. पुढे सुजनगढच्या अलीकडे एका धाब्यावर गँग थांबलेली दिसली. चला काहीतरी खायला मिळेल याआशेने मी ही गेलो तर पुन्हा तोच प्रकार. चिप्स, फरसाण. च्या गावात असलं डोकं सणकलं. म्हणलं हे काय आहे, वैताग. दुध द्या म्हणलं तर नाहीये म्हणे. आधीच उन्हाने जीव नकोसा झाला होता, पायाच्या दुखण्याने हैराण आणि त्यातून नीट खायला नाही मग या त्रिवेणीसंगमाचा परिणाम झालाच. तडकाफडकी उठलो आणि सायकल काढून निघालो सुद्धा.
काका मागून आले, म्हणे "अरे थांब सगळेच निघू." मी रागाच्या भरातच होतो, म्हणलं "तुम्हाला काय करायचे ते करा, मी चाललोय. या पद्धतीने मी सायकल चालवू नाही शकत उपाशीपोटी."

आणि त्या सणकीतच सायकल चालवत निघालो. असा राग खदखदून आला होता की अजून कुणी काही बोलले असते तर भांडणेच झाली असती. मनात निगेटीव्ह विचारांनी पूर्ण गर्दी केली होती. झक मारली आणि आलो. अशाच मनस्थितीत एक मोठे रेल्वे क्रॉसिंग पार करून पुढे आलो. दहा-पंधरा किमी झाले असावेत. सुजनगढचा बायपास होता तो, आणि रस्त्याचा घोळ होता.
त्यामुळे झक्कत मला मागच्यांची वाट बघत थांबणे आले. रस्त्याच्या बाजूला सायकल लावली, तिथेच बसलो आणि आजूबाजूला कुणी नाही हे पाहिले आणि गुढग्यात मान घालून हमसून हमसून रडलो.
गेल्या दोन तीन दिवसांच्या तीव्र वेदना, अशा परिस्थितीत रोज १५० किमी सायकल चालवण्याचा शीण, अपुरी झोप, त्यातून ब्लिडींग, उष्णता वाढत चाललेली आणि मनावर या सगळ्याचा आलेला ताण, बाकी कुणाला नाही आपल्यालाच एवढा त्रास होतोय म्हणजे आपण अशा मोहीमा करायला योग्य नाही, अशी एक कमीपणाची भावना यामुळे मला अश्रू आवरताच येईनात.

हीच ती जागा, हाच तो क्षण

पण त्याने एक बरे झाले, मनावरचे मळभ साचले होते त्याचा निचरा व्हायला थोडी मदत झाली कारण डोळे पुसुन जेव्हा इकडे तिकडे पाहिले तेव्हा बरेच हलके हलके वाटले. घरच्यांची तीव्रपणे आठवण झाली आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावरच घरी कळवायचे हा नियम मोडून पहिल्यांदाच दुपारी घरी फोन लावला. तोपर्यंत मी माझ्या पायाच्या दुखण्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नव्हता. पण आज त्यांना परिस्थीती सांगितली आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारून काहीतरी उपाययोजना करता येईल का विचारले. आधीच रडून बिडून घेतल्यामुळे आता मी मोकळेपणे बोललो. कारण फोनवर असे काही केले असते तर स्ट्रेट घरी यायचा हुकुम मिळाला असता.

त्यानंतर माझ्या एका पुण्यातल्या मैत्रिणीला फोन लावला. तिचे डॉक्टर फेमस ऑर्थोपेडीक होते. तिलाही त्यांचा सल्ला विचारायला सांगितला. दरम्यान गँग आलीच आणि आम्ही पुढे निघालो. पण पुढे एक धाबा लागताच त्यांनी सायकली वळवल्या आणि मला म्हणे चल जेवण करून घेऊ.

त्याच्या लक्षात होतं तर. मलाच मग मघाशी उगाच चिडल्याबद्दल वाईट वाटलं. मग झकास तुंबडून जेवलो, इथेही राष्ट्रीय खाद्य पंजाबी जेवणच होतं. त्याला आता काय पर्याय नाही. पण सगळ्यात भारी होती ती हॉटेलची पाटी.

पाटी लिहीणाऱ्याची बाई पास झाली असणार परिक्षेत त्याचा आनंद त्याने पाटीवरच लिहून काढला असणार अशी आमची भंकस सुरु झाली. बर आम्ही का हसतोय याचा हॉटेल मालकाला पत्ता लागायचे काहीच कारण नव्हते त्यामुळे आम्हाला अजूनच हसायला येत होते.

आम्ही जेवायला थांबलो होतो तेव्हा आकाश असे मस्त दुलई घेऊन पहुडले होते

उरलेली भाजी पार्सल करून घेतली, वाटेत कुणी मिळाला तर द्यावी म्हणून. तर वल्ली म्हातारा भेटला. दिसताना गरीब वगैरे दिसत होता. मी त्याच्यापाशी थांबलो, त्याला म्हणलं,
"भैया ये थोडी सब्जी है, खराब नही है, ज्यादा वाली है, आप खायेंगे क्या?"
तर एक नाही दोन नाही, नुसताच टकामका माझ्याकडे बघत राहीला.
आयला, म्हणलं याला आता हिंदी कळत नसेल तर राजस्थानीत कसे समजाऊन सांगणार.
मी मनात वाक्य तयार करत होतो, भाजीला साग म्हणतात ते पंजाबीत पण मारवाडीत काय म्हणतात. आपणो सब्जी आपो के, नाही हे तर गुजराथी झालं. Lol
मरुंदे म्हणत त्याला पिशवी उघडून दाखवली आणि मुकाभिनयावर काम चालवलं. ती भाजी घेऊन पोळीबरोबर खाल्लाची अॅक्शन करून दाखवली. आणि घेऊन जाणार का असे विचारले. मला कन्याकुमारीच्या त्या हिरोची आठवण झाली. आपल्याच देशात आपण किती असहायय् होतो अशा वेळी.

असो, तर माझा हा डंबशेरज म्हातारबुवांना कळला असावा कारण त्यांनी चेहर्यावरची सुरकुतीही न हलवता पिशवी हस्तगत केली आणि दरम्यान तिथे जमलेल्या जनतेशी चाललेला संवाद ऐकत निवांत बसले.

लडनूनच्या इथे आम्ही नागूरमार्गे जोधपूरला जाणारा हायवे सोडून डावीकडे वळलो. माझ्या आधीच्या प्लॅनमध्ये हा रस्ता होता. पण त्यात पुढे माऊंट अबूच्या बाजूने जाणारी तीव्र चढाई होती म्हणून आम्ही अलीकडेच वळलो आणि चित्तोडगढलाही स्कीप करून मध्येच भिलवारा-नाथद्वारा करत गुजरातेत घुसणार होतो.

सावल्या लांब होऊ लागल्या तसे लक्षात आले की अजूनही २५ किमी अंतर बाकी होते. त्यामुळे आजचाही सूर्यास्त रस्त्यातच बघावा लागणार होता. त्यात लान्सची सायकल पुन्हा एकदा पंक्चर झाली. तेव्हा काकांनी तोडगा सुचवला, मला म्हणे तु पुढे हो, गावात कुठे कुणी डॉक्टर मिळाला तर पहा, तोपर्यंत आम्ही येतोच. मलाही ते पटले आणि एकटाच पुढे निघालो. एकटाच असल्याने मी असाही रमत गमत जात होतो. वाटेत भास्कररावांना बाय बाय केले आणि अंधार दाटून आला तसा गावाच्या वेशीवर एका चहाच्या टपरीवर थांबलो.

ही अशी पाट्यांवरची अंतरे वाचून पोटात गोळा यायचा. अजून लई जायचय ही भावना यायची

सूर्यास्त झाला की लगेच गार वारे सुरु व्हायचे त्यामुळे अशा वेळी गरमागरम चहा हवा हवासा वाटायचा. सकाळचे गार वारे आणि संध्याकाळचेही अशा मुळे मी सगळे गरम कपडे आत पॅनिअरमध्ये न टाकता कॅरीअरवरच ठेऊन बांधून टाकायचो. त्यात जॅकेट, कानटोपी, हँडग्लोव्हज, स्वेटर असे सगळे असायचे. तर मी तिथे मस्त चहाचा आस्वाद घेत असताना एक जण चालत आला आणि सायकलवरच्या कपड्यांना हात लावून पहायला लागला.
मी म्हणलं, "क्या है?"
तर म्हणे "कैसा दिया?"
"क्या कैसा दिया?"
"ये जॅकेट"
"कैसा दिया बोले तो?"
"अरे कितने में बेचोगे?"
"अरे ओय वो बेचने के लिये नही, मेरा खुदका है"
"तो ये बॅग मे क्या है, कपडे है क्या बेचने को?"

आयला हा मला काय दारावर येऊन कपडे विकणारा समजला का. च्यायला याच्या काकाने इतक्या महाग सायकलवर कपडे विकले असतील. मी मग शिस्तीत त्याला माझी ओळख दिली. तर एकदम शरमिंदा होऊन म्हणे, अरे मुझे लगा ऐसे शो केलीये कपडे रख्खे है, आणि पसार झाला. Lol

तोपर्यंत सगळे आलेच आणि आम्ही पुनश्च एकवार अंधाऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करू लागलो. डीडवाना आले तरी आमचे मुक्कामाचे हॉटेल काही येईना. थोडे राहीले थोडे राहीले करत पूर्ण शहर पार झाले तरी च्यायला हॉटेलचे नाव नाही. आता पुन्हा हायवे सुरु झाला आणि शहरातले दिवे जाऊन पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले. रस्ता चुकलो का काय अशी शंकाही यायला लागली. त्यात लान्स, वेदांग आणि ओबी हॉटेल शोधायचे म्हणून पुढे निघून गेले. मागे राहीलो, मी काका, हेम आणि सुह्द. आम्ही आपले दोन दोनच्या जोड्या करत कसेतरी पाय ओढत निघालो. पुढे तब्बल तीन एक किमी बाजूला हॉटेल दिसले पण या ओढाताणीमुळे सगळेच वैतागले होते. त्यात ते हॉटेल अतिशय दिव्य निघाले.

इतके कळकट मळकट हॉटेल होते. त्यात सायकली बाजूला कशातरी लावल्या आणि वरच्या मजल्यावर गेलो. लक्षात आले की वरचा पूर्ण मजला आमचाच होता. कारण एक भला मोठा डायनिंग हॉल आणि त्याच्या तीन कोपऱ्यात तीन खोल्या. खात्रीने हा लग्नासमारंभांचे ठिकाण होत आणि वर आणि वधुच्या खोल्या रहायला म्हणून दिल्या होत्या.

सुह्द आणि त्याचे बाबा एका खोलीत, हेम आणि ओबी एका आणि उरलेले आम्ही एक अशी वाटणी झाली. आमच्या वाटेला आलेली खोली इतकी दिव्य होती की माझ्याकडे अक्षरश शब्द नाहीत तिचे वर्णन करायला. त्याहून दिव्य होते तिथले टॉयलेट. ज्याने कुणी हे बांधले असेल त्याला भे़टून लकडीपुलावर जाहीर सत्कार करण्याची नितांत आवश्यकता होती. एका अरुंद (इतके अरुंद की सरळ न चालता आडवे जावे लागेल इतके अरुंद) बोळकांडी, तिच्या एका टोकाला कमोड आणि या टोकाला दार. आणि तिथेच बाथरुम, एक बारकी बादली, आणि नळ आणि गिजरही. दारही पूर्ण उघडत नव्हतेच. त्या सांदटीतून आत गेलो आणि आतून कडी कशी लावावी हेच कळेना, कारण त्याचा निम्मा भाग इकडे निम्मा तिकडे असा काहीतरी होता.

मी लान्सला मदतीला बोलावले, म्हणलं जरा ही कडी कशी लावायची याचे जरा मार्गदर्शन कर पाहू. आम्ही कसेबसे आत मावलो आणि कडी लावण्याचे प्रात्यक्षिक करायला लागलो तर दारच जाम बसले. हायला, आता आम्ही दोघे आत आणि दार घट्ट बंद. जोराने ओढू म्हणले तर मागे जायला जागाच नव्हती. भिंतीला पाठ लावली तर पोट दरवाजावर येत होते. शेवटी शक्य तितके बोळकांडीत सरकलो आणि वेदांगला हाक मारून लाथ मारायला सांगितली, त्याने ताकदीने दरवाजा उघडून दिला म्हणून बरे. तेव्हाच खूणगाठ बांधली म्हणलं काहीही झालं तरी परत इथे आत येणार नाही.

काकांच्या खोलीत जाऊन मग विधी अंघोळ आदी उरकले आणि जेवायला खाली निघालो. तत्पूर्वी त्या डायनिंग हॉलचा सगळ्यांनी कपडे वाळत घालून धोबीघाट केला. असेही आमच्याशिवाय तिथे कुणी नव्हतेच त्यामुळे काहीच चिंता नव्हती.

खाली निघालो तर काकांच्या खोलीत जोरदार भांडणाचे आवाज. सुह्द आणि काका दोघांचेही आवाज एकदम चढलेले होते. बर काय झाले याचा काही पत्ताच लागत नव्हता. दारही बंद होते, त्यामुळे काय करावे हेच कळेना तसेच चुळबुळत थांबलो. मग ओबी म्हणला की आपण खाली जाऊन वाट पाहू. त्याप्रमाणे जेवायला म्हणून खाली गेलो.

दरम्यान, मला घरून फोन आला, आमच्या डॉक्टरांना नुसत्या सांगण्यावरून निदान करणे अवघड होते, पण वर्णनावरून त्यांनी अकीलीज टेंडन (achilles tendon) असावे असे सांगितले.

म्हणलं, याला उपाय काय तर म्हणे विश्रांती हेच सध्या प्रमुख. आता माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीला किंबहुना मोहीमेतल्या सहभागावरच प्रश्नचिन्ह उभे राहीले. कारण अशा प्रकारे अजून ११ दिवस रेटून नेणे सर्वथा अशक्य होते. आणि जास्तीचा ताण दिला असता आणि काही मेजर दुखापत झाली असती तर पुढे आयुष्यभर ते बाळगत रहावे लागले असते. माझे डोळे पुन्हा डबडबायाला आले, कारण कुठल्याही परिस्थितीत मला अर्धवट मोहीम सोडून माघारी जायचे नव्हते. आजतागायत मी हे कधीच केलेले नव्हते. भले त्याला माझा अघोरी अहंकार म्हणा, पण असे अर्धवट सोडणे मला वैयक्तिक पराभव झाल्यासारखे वाटत होते. आणि दुसरे म्हणजे ही संधी परत येणार नाही हे मला माहीती होते. पण मी इतका पक्का कोंडीत सापडलो होतो की काय करावे सुचत नव्हते.

दरम्यान, काका आणि सुह्द खाली आले, निवळले असावेत असे वाटले कारण त्यांनी मग तोडगा सुचवला की आख्खी मोहीम ड्रॉप करण्यापेक्षा मी उद्या टेंपो करून डायरेक्ट अजमेर गाठावे, तिथल्या डॉक्टरला दाखवावे आणि पूर्ण दिवस आणि रात्र विश्रांती घ्यावी. जर त्याने बरे वाटले तर ठीक आहे नाहीतर मग तिथून पुण्याला जाणारी गाडी मिळवणे हाच एक पर्याय होता. अर्थात हेही मला फारसे मान्य नव्हते कारण तो बट्टा शेवटपर्यंत राहीलाच असता पण आता आख्खी मोहीम जाण्यापेक्षा ते बरे म्हणून मी तो पर्याय स्वीकारला.

त्यावर ओबी आणि वेदांगचे खेचणे सुरु झाले, म्हणे उद्या मॅच आहे, तु काय आख्खा दिवस लोळून मॅच बघत राहशील आणि आम्ही उन्हातान्हाचे सायकल चालवत राहू. तर तुला सोबत म्हणून आम्ही येतो, असेही तुला डॉक्टरकडे जायला मदत लागेलच. मलाही त्यांची गंमत कळत होती म्हणून आम्ही त्यावर भरपूर हसून घेतले. पण काका गंभीरच होते आणि जेवणानंतर मिटींग घेणार असल्याचे जाहीर केले.

वादळापूर्वीची शांतता

वरती गेलो खुर्च्या मांडल्या आणि गोल करून बसलो. आणि इतक्या दिवसात प्रथमच काकांचे एक नवीन रुप पाहिले. कितीही चेष्टा केली तरी खिलाडूपणे ती घेणारे काका आज प्रथमच चिडलेले पाहिले. पहिल्यांदा त्यांनी त्याचे व सुह्दचे काय वाजले ते सांगितले. सुह्द कायम सुसाट गँगमध्ये असायचा आणि त्यावरून काकांची बोलणी खायचा की तो मागच्या लोकांसाठी थांबत नाही. आणि आज तो मागे राहीला होता आणि त्यासाठी कुणीच थांबले नाही, त्यामुळे त्याचे म्हणणे होते की सगळ्यांना एकच नियम का नाही. मी जर रोज ओरडा खातो तर आज तुम्ही बाकीच्यांना का नाही ओरडत. त्याचेही बरोबर होते पण रोख अप्रत्यक्षपणे वेदांग आणि लान्सवर गेल्यामुळे तेही वादात उतरले. त्यांनी हिरीरीने आपली बाजू मांडली आणि शब्दाने शब्द वाढत गेला आणि आवाजही.

कन्याकुमारीच्या आधीपासून आम्ही एकत्र होतो आणि कितीही वाद झाले तरी असे आवाज, आरोप प्रत्यारोप कधीच झालेले नव्हते. आख्खा टीमच्या एकसंघपणालाच एक तडा जात असल्याचे जाणवत होते. वेदांग आणि लान्सचा फिटनेस प्रचंड होता आणि सातत्याने सराव करत असल्याने त्यांचा वेग चांगलाच होता. त्यांना गाठता गाठता आमची दमछाक होत होती. यावर त्यांचे म्हणणे होते की आम्ही प्रॅक्टीस केली आणि बाकीच्यांनी नाही केली ही आमची चूक कशी. आम्ही अजून किती हळू चालवायची सायकल. जर माहीती होते की इतके लांब जायचे तर प्रॅक्टीस करायला नको का. आता हे माझ्यावर आले. कारण मी आणि ओबीच सर्वात कमी प्रॅक्टीस करणारे. पण ओबीचा फिटनेस चांगला होता त्यामुळे तो वेग राखू शकत होता. सो, सगळ्यात दुबळा घटक मीच आणि मी ते खूपच वैयक्तिकरित्या घेतले.

आधीच मी दुखण्याने हैराण, त्यातून मोहीम सोडायची वेळ आल्याने चिड आली होती त्यात हे आरोप त्यामुळे सारासार विवेकाने सोडचिठ्ठी घेतली आणि मी मग मागचे सगळे उकरून काढले. त्यात सुह्द बाजू मांडायला लागला तर अतिशय हार्शपणे त्याला गप्प बसवले. एकंदरीतच जे चालले होते ते अतिशय वाईट होते. आम्ही इतक्या जीवाभावाचे मित्र असे एकमेकांना आरोपीच्या पिजंऱ्यात उभे करत होतो ते काळजाला चरे पाडणारे होते. Sad

काकांनी मग सुह्दवरून पण झापले, म्हणले तो काय लाफिंग स्टॉक नाहीये, सारखा बकरा करायला. तो काही बोलत नाही याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असा नाही. ते बरोबरच होते आणि मग ओबीने वातावरण निवळण्यासाठी सुह्दची माफी मागीतली आणि यापुढे त्याची चेष्टा करणार नाही असे आश्वासन दिले, पाठोपाठ वेदांगने माघार घेतली आणि मग मी देखील. कारण कितीही झाले तरी अजून पुढे मोहीम शिल्लक होती आणि एकत्र जाणे ही आमची गरज होती आणि मूळ स्वभाव देखील. सगळ्यांनी मग गळाभेट घेऊन झालेगेले विसरायचा प्रयत्न केला.

मग मी माझ्या खदखदत्या विषयावर तोंड फोडले म्हणलं आपण काहीतरी पौष्टिक आणि भरपूर खाणे आवश्यक आहे. हे असे उपाशी पोटी मी १५० किमी सायकल चालवू शकत नाही. मला खायला द्या आणि मगच पुढे येईन मी. त्यावर वातावरण एकदमच निवळले आणि हशाचे कारंजे उसळले. Lol

मिटींग नाही म्हणली तरी इतका वेळ चालल्यामुळे ओबीची चुळबुळ सुरु झाली. त्याला झोप प्रचंड प्रिय आणि तिचा वेळ कमी होत चालल्याने त्याने सांगता केली आणि रुमकडे पसार झाला. त्याच्याकडे एक केरळीय तेल असल्याचे म्हणाला होता म्हणून ते घ्यायचा तिकडे गेलो तर हॉटेलचा एक पोरगा हजर. म्हणे ते रुमचा हिशेब करायाला मॅनेजरनी बोलावले आहे. ओबी तोपर्यंत बेडवर पसरला होता. म्हणे उद्या सकाळी करू आता. बरं, म्हणून गेला,आणि थोड्यावेळाने परत हजर, म्हणे आत्ताच बोलावले आहे. ओबीने परत त्याला पाठवले आणि दहा मिनिटात परत हजर.

आता ओबीचा फ्युज उडाला. च्यायला म्हणला या मॅनेजरच्या बघतोच त्याचा हिशेब. तिरमिरीत गेला आणि तब्बल १५-२० मिनिटांनी उगवला म्हणला मॅनेजरला चांगलेच महागत पडले मला खाली बोलावणे.
काय झाले तर म्हणे, "मी इतका घसघशीत डिस्काऊंट घेतलाय की आता खाली रडत बसला असेल. रुम प्रत्येकी दोन हजार आणि त्यात आठ लोकांचे जेवण इतके बील मागत होता. मी त्याला सगळे मिळून तीन हजार दिलेत."

हायला मी आणि हेम पडायचेच शिल्लक राहीलो, म्हणलं अरे काय मारामारी केलीस का काय.

तर म्हणे "नाही त्याला धमकी दिली आत्ताच्या आत्ता एकही पैसा न देता रुम सोडतो. इतके भिकार हॉटेल, इतके भिकार जेवण आणि लाज वाटत नाही इतके पैसे मागायला. मी जे दिले ते घेतले मुकाट्याने." Lol Lol

मी केवळ दंडवत घालायचेच बाकी ठेवले होते त्याला.

असो, तर अशा प्रकारे आजचा दिवस बराच इव्हेंटफुल झाला होता आणि उद्याची चिंता भेडसावत होतीच. पण उद्या आता मला टेंपो करून जायचे होते त्यामुळे निवांत झोपलो. उद्या परिस्थिती कशी आणि काय वळण घेईल याबद्दल मला त्यावेळी मुळीच कल्पना नव्हती.

=================================================

आजचा हिशेब....

आजही आम्ही चढावरच होतो. अगदी मंद चढ म्हणला तरी कस काढत होता. उन्ह, चढ आणि दुखणे मिळून सुपर कॉम्बो होते.

============================================

http://www.maayboli.com/node/60472 - (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झ्या कैलास ट्रेक मध्ये मी अन पग्या सकाळी बर्‍याच वेळा १०-११ पर्यंत मुक्कामी पोचायचो. पण उरलेले पब्लिक पार संध्याकाळच्या चहा पर्यंत येत राहायचे. दुसरे दिवशी परत ते थकलेले असायचे अन आम्ही ५-६ लोकं एकदम फ्रेश
या वाक्याचा मला उलगडलेला अर्थ तोच आहे. आता अजून काही वेगळा असेल तर माहीती नाही. >>>

वरही तू "ज्याच्या त्याच्या स्वभाव" लिहिले होते पण मी त्यावर मुद्दाम लिहिले नव्हते पण परत उल्लेख करत आहेस म्हणून लिहितोच. ..

सेल्फ बोस्टींग साठी लिहिले असे तुला वाटत असले तरी तसे नाही. कारण तो ट्रेकच मुळी दिवसभराचा नसतो. १६- २० किमी चढाई करायला दिवसभर लागत नाही. "एक्झपेडिशन" असे नाव दिले की "तयारी" ही लागतेच. न करता आलेले लोक संध्याकाळपर्यंत येत होते. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते माझे बोस्टिंग नाही हे तुला कळेल असे वाटले होते. पण तसे दिसत नाही.

हर्पेनलाही विचार वाटल्यास, तो ही तोच ट्रेक करून आला आहे. ते उदाहरण हे मल्टी डे प्रकारात येणारे ताण म्हणून दिले होते. त्याच्यापुढे रेस्ट, खाणे हे त्यामुळेच लिहिले आहे. ज्यावरून तू दोन पोस्ट मध्ये ते आणलेस. Happy

रप्पारप सायकल मारत जाणे, आणि निवांत पणे गप्पा मारत, सायकल चालवण्याचा आनंद घेत जाणे यात फरक आहे. इथे तुम्ही किती वेगात गेला किंवा किती राईड टाईममध्ये पूर्ण केले याला महत्व नसून तुम्ही त्यादरम्यान काय अनुभवले याला आहे. >>

सिरियसली आशिष ?? तुला असे म्हणायचे आहे का? की मल्टी डे / मल्टी अवर्स अगदी स्पर्धेत भाग घेणारे एन्जॉय करत नाहीत? सायकल वर बसण्याचा आनंद त्यांना नसतो? हे असे म्हणजे, " तुमच्याच फास्ट गँग पेक्षा, तू जास्त राईड एंजॉञ केली", असे दुसर्‍या शब्दात लिहिणे आहे मित्रा.

तुझ्याच सर्व लिखाणात, नेहमी तुच लिहिले आहेस की, सगळे पुढे गेले, मी एकट्याने सायकल चालवली. मग ह्यात गप्पा मारणे कसे होईल?

निवांत गप्पा मारणे, राईडचा आनंद घेणे हे तू लिहितोय आहेस, जे आम्ही आमच्या सो कॉल्द रपारप सायकलच चाल्वण्याच्या BRM मध्ये पण केले आहे. ग्रूप वर सर्वांना विचार. ते पण सांगतील.

तुला डिमोटिव्हेट करणे हा उद्देश नव्हता, आणि नाही. तर ह्या राईडस मधून शिकणेही अभिप्रेत असते, असे मला वाटते, कारण एक्झपेडिशनची योग्य तयारी करणे तेवढे महत्त्वाचे असते. इट सिम्स, मी लिहिलेले तुला आवडले नाही. ! मी हे लिहायला हवेच होते का? तर .. मे बी नसते लिहिले तर चालले असते. मी लिहिले, कारण तू ही आमच्या ग्रूप मध्ये आहेस. सो बाय नाऊ, कोण का? कश्यामुळे लिहितो ते माहिती झाले असावे, असे वाटले होते.

सो तुला थोडाका होईना, उगीच मानसिक त्रास दिल्याबद्दल सॉरी !

सिरियसली आशिष ?? तुला असे म्हणायचे आहे का? की मल्टी डे / मल्टी अवर्स अगदी स्पर्धेत भाग घेणारे एन्जॉय करत नाहीत? सायकल वर बसण्याचा आनंद त्यांना नसतो? हे असे म्हणजे, " तुमच्याच फास्ट गँग पेक्षा, तू जास्त राईड एंजॉञ केली", असे दुसर्‍या शब्दात लिहिणे आहे मित्रा.

हा तर पूर्णपणे विपर्यास झाला. मी लिहीले की मला निवांत जायला आवडते. आता तुम्हाला रपारप जाऊन आनंद मिळत असणारच, त्याशिवाय कुणी सायकल चालवत नाही. जितके म्हणून सायकलपटू आहेत ते आनंदासाठीच येतात, कुणी जबरदस्ती केली म्हणून नाही.

तुम्हाला वेगात जातानाही गप्पा मारता येत असतील ते तुमचे कौशल्य आहे. पण म्हणून प्रत्येकाने वेगानेच गेले पाहिजे असे काही नाही ना. आणि वेगाने जाताना तुम्ही आजूबाजूला किती पाहता, किती नोटीस करता हे मला वाटत वेगळं सागायची गरज नाही.

तुझ्याच सर्व लिखाणात, नेहमी तुच लिहिले आहेस की, सगळे पुढे गेले, मी एकट्याने सायकल चालवली. मग ह्यात गप्पा मारणे कसे होईल?

जर कदाचित पूर्ण वाचले असतेस तर लक्षात आले असते की एखादा अपवाद वगळता काका आणि हेम सातत्याने माझ्या सोबत असत. आणि ओबी देखील, नंतर बाकी गँग आली तेव्हा शिरीष सुद्धा. आणि आमच्या छान गप्पा, वादविवाद चालत. हे मधले काही दिवस मी दुखण्याने अतिशयच तस्र होतो त्यामुळे मुळीच बोलण्याच्या मूड मध्ये नव्हतो. अन्यथा आम्ही छान एन्जॉय केली. आणि वदवूनच घ्यायचे असेल तर होय, फास्ट गँगपेक्षा जास्त केली, कारण मधले काही इन्सीडन्ट त्यांनी पूर्णपणे मिस केले होते. (किंबहुना झाले होते असे म्हणता येईल).

इट सिम्स, मी लिहिलेले तुला आवडले नाही
मी आधीच लिहीले, आवडण्याचा न आवडण्याचा प्रश्नच नाही. इथे दृष्टीकोनाचा फरक आहे.

सो तुला थोडाका होईना, उगीच मानसिक त्रास दिल्याबद्दल सॉरी !

छे सॉरी कसलं, मला काही त्रास झालेला नाही. पण हे मुद्दे यापूर्वीही चर्चीले गेले आहेत आणि मला वाटतं मी माझे व्हर्जन मांडले.

आणि तुझ्या लेखी 6 तास हि योग्य वेळ आहे. आता पुण्याचे काही जण कन्याकुमारीला 9 दिवसात गेले. दिवसाला 200-250 किमी एव्हरेज. ते म्हणतील तुम्ही 150 किमी पाच तासातच करायला हवे होते. याला काही अंतच नाही ना.
का आणि कशासाठी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. मला आनंद कशात मिळतो हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.
आणि वेगानेच जायचे असेल तर त्याला बीआरएम्स आहेतच की.

का आणि कशासाठी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. मला आनंद कशात मिळतो हे त्याचे त्याने ठरवायचे आहे. आणि वेगानेच जायचे असेल तर त्याला बीआरएम्स आहेतच की.

आशू हे पुर्णतः मान्यच आहे. किंबहुना ह्याच कारणाने मी अजून पर्यंत एकही बीआरएम केलेली नाही.

केदारच्या प्रतिसादातून घ्यावा असा (मला वाटलेला) मुद्दा हा आहे की अशा प्रकारच्या मोहिमेकरता (रोजचे १५० किमी असो वा ३०० किमी, जे काही अंतर ठरवले असेल त्या नुसार त्याप्रमाणात) स्वतःचे शरीर बळकट /सक्षम बनवण्याकरता मोहिम सुरु व्ह्यायच्या आधी मेहनत घेतली असेल तर प्रत्यक्ष मोहिमेत राईड करताना अधिक आनंद मिळेल. दुखापती होणार नाहीत / कमी होतील. जेणेकरून आपल्यावर आणि ओघाने इतरांवरही ताण येणार नाही / कमी येईल.

अरे हा मुद्दा पूर्णपणे मान्य आहेच की. याच कशाला कुठल्याही अगदी 10 किमी रनिग लाही ते आवश्यक आहेच. अजिबात दुमत नाही.
माझा विरोध सहा तासात राईड टाइम करायला हवी होती या प्रकार आहे. आणि केदार ने लिहिले म्हणून असे नाही पण हे यापूर्वीही अनेकदा ऐकले आहे. वेग आपल्या इतका नसानसात भिनलाय कि हळु सावकाश जाणं जणू दुबळेपणा आहे. मान्य आहे की या राईड हवा तितका फिटनेस माझा मुळीच नव्हता. आणि त्याबाबत मी पहिल्याच भागात स्पष्टपणे लिहिले आहे. मला कसलेही समर्थन द्यायची हि गरज नाही तरीही

आशुचँप, मागच्या प्रवासवर्णना एवढेच हे पण आवडत होते आणि अचानक खूप मोठा ब्रेक आला. मग अनेक दिवसांनी अचानक पुढचे दोन भाग आलेले बघितले आणि माबो वरचे बाकि सगळे सोडून ते पहिले वाचले. प्रवासवर्णन आणि अनुभव छान लिहीतोस तू.. पण परत ब्रेक नको बाबा. हे लवकर पूर्ण कर आणि अलिबाग सफरीचे वर्णन लिहायला घे Happy
पिकासा गेल्यामुळे तुला होत असलेल्या कष्टांची कल्पना आहे त्यामुळे रोज एक भाग वगैरे अपेक्षा करणार नाही पण तरिही खूप मोठी गॅप नको ही विनंती.
पु. ले.शु.

आशु मस्त लिहिला आहेस हा भाग ... या एकाच भागात आम्हाला खूप कांही शिकवलंस
अश्या मोठ्या EXPEDITION ला येणाऱ्या अडचणी त्यावर वेळीच मात कशी करावी वगैरे वगैरे ...

कांही पिक्चर अशे असतात कि आपल्याला वाटते कि अरे हि आपलीच कहाणी आहे मग आपण स्वतःला
त्या हिरोच्या जागी गृहीत धरून तो पिक्चर पाहतो तशी गत माझी झालीय ... सायकलिंग मधला c हि माहित नाहीये पण मीही आज डिडवानाला पोहचलो बरंका ....

वेग आपल्या इतका नसानसात भिनलाय कि हळु सावकाश जाणं जणू दुबळेपणा आहे. >>>>> पण ह्याची उलट बाजू म्हणजे "वेग आहे म्हणजे फोटो नाहीत, आजुबाजूचा परिसर पाहिलेला नाही, गप्पा मारणं नाही, अनुभवांची कमतरता" वगैरे तू पण गृहीत धरतो आहेस की. Happy

बापरे, वर्णन ऐकुनच काटा उभा रहातो अंगावर....
वरती कसले वाद आय मीन चर्चा चाललेत? Wink मला काय कळल नाही ( अन तेच बर आहे).
सायकलिंग बाबत नाही, पण स्कुटर्/बाईक वरुन जाताना मी दोनही प्रकारचे अनुभव घेतलेत.
म्हणजे असे की, एका वेळेस, पहाटे निघुन पुसेगावच्या तिकडे जायचे होते, तर जोडीदार , त्त्यास थंडीचे वावडे नाही म्हणून ८०/९० ने बाईक ताणित होता, अन एकत्र रहावे म्हणून मी देखिल त्याचे मागे चालवित राहिलो, ते हिंजवडी पासुन कात्रज पर्यंत (तेव्हा शिंदेवाडी बोगदा/रस्ता नव्हता) पोहोचेस्तोवरच स्वेटर मफलर वगैरे असुनही थंडी आत हाडापर्यंत पोहोचली की कात्रजच्या तिठ्ठ्यावर मी कुडकुडून थडथडू लागलो होतो. जोडीदार तसाच पुढे गेला होता. (तो त्याची बायको, मी माझी बायको असे गाडीवर होतो, तेव्हा संगतीत जाणे महत्वाचे हे सांगायला नकोच, नाही का?) याचा परिणाम इतकाच झाला की दुपारी दोनचे सुमारास मला सडसडुन ताप भरला, व नंतर चारचे सुमारास तसेच निघुन परत घरी यावे लागले, अन तेव्हाही हे सोबतीचे वीर गाडी ताणतच चालले होते. इतके की सातारा सोडल्यावर खिंडींचा उतार मिलतो तिथे मी चक्क १०० चे पुडेह काटा नेला होता. शेवटी खंबाटकीचे अलिकडे मी त्याला फॉलो करण्याचा नाद् सोडला, व एकटाच (बायकोसोबत) निघालो.
हायवेवरुन गाडी अत्यंत जोसात रानटीपणे मारीत जाणे यात त्याला आनंद होता, त्यात गैर काहि नाहि, (तेव्हा रस्ता विभागलेला नव्हता) पण गाडीत कोणताही बिघाड होऊ न देता/अपघात होऊ न देता, मजेमजेत आजुबाजुला बघत जाणे हा माझा आनंद होता.
तेव्हाचे त्याचे वागणे हे "टीम स्पिरिटला" धरुन नक्कीच नव्हते. असो.
याचे उलट, एकदा (हे वर्णन माबोवर आले आहे) चिपळूनहून कुंभार्लि मार्गे कराड-कोल्हापुरकडे येत असताना, चिपळूणला जॉइन झालेला जोडीदार ४० चे वर वेग घेत नव्हता. व वेळेचे गणित जुळत नसल्याने त्याने वेग घ्यावा असे सुचवुनही (अरे मूठ पीळ की....) तो मंदगतिनेच जात होता, तेव्हा त्याचे बायकोस माझ्या गाडिवर घेऊन, माझे मागिल मित्रास ती गाडी चालवावयास देऊन गतिचा तालमेल राखला. पण हे होईस्तोवर चिपळून ते पाटण येईस्तोवर आम्ही त्याचे पुढेमागेच नजरेच्या टप्प्यात ठेवुन गाडी चालवित होतो , पुढे निघुन जात नव्हतो. याच ट्रीपचे वेळेस, भुईंजपाशी, थांबलो असताना, ओव्हरटेक करणार्‍या दोन ट्रकना डावी ठेउन ते पुढे निघुन गेले ते दिसलेच नाहीत व आम्ही वाट बघत बसलो, तेव्हा उलटे उडतारे/लिंब खिंडीपर्यंत बघायला गेलो होतो, शेवटी तरणोपाय न राहिल्याने परत फिरलो, हे त्यांचे ते पिंपरीत पोहोचले देखिल, व नंतर माझेकडुन बोलणीही खाल्ली. हे देखिल टीम वर्क नव्हते.
मी एकेकट्यानेही फिरलो आहे, माझे गतिने/माझ्या आवडीच्या गतिने/ माझ्या वाहनाच्या क्षमते इतक्या गतिने... तेव्हा हे प्रश्नच येत नाहीत, पण जेव्हा एकत्र जायचे असे ठरवतो, तेव्हा वेगाशी/स्वतःच्या वेगाच्या क्षमतेशी तडजोड करावी, तरच ते "टीमवर्क" अन्यथा, उगाच नावाला एकत्र निघायचे, वेगवेगळ्यावेळी पोहोचायचे, तर त्यास एकत्र म्हणूच शकत नाही, असे आपले माझे मत.
हे पटणार नाही. पण मग एखादेवेलेस पत्नी/मुलगी यांना एक गाडी चालवायला देऊन आपण त्यांचे बरोबर निघावे . हिंमत होईल का त्यांना तसेच मागे सोडून एकट्याने पुढे निघुन जायची? माझी तर नाही होणार....
मग जो न्याय पत्नि/मुलिला, तोच मित्रांनाही....
(लिंबी स्कूटीवर अन मी बाईक वर असे अनेकदा अनेक ठिकाणी प्रवास केला आहे, तो लिंबी स्कुटीला पळवुन पळवुन किती वेगात पलवेल, तितकाच वेग बाईकचाही राखित केला आहे. )

पण ह्याची उलट बाजू म्हणजे "वेग आहे म्हणजे फोटो नाहीत, आजुबाजूचा परिसर पाहिलेला नाही, गप्पा मारणं नाही, अनुभवांची कमतरता" वगैरे तू पण गृहीत धरतो आहेस की.

>>>>>नाही हे नुसतेच गृहतक नाही. मी कधीच जोरात सायकल चालवली नसती तर त्याबद्दल काही बोललोही नसतो. ज्यातले मला फारसे कळत नाही, त्यात मी स्पष्टीकरण द्यायला जातही नाही. पण मी मारल्यात अशा काही राईड. लोणावळा वगैरे जाताना आम्ही इतक्या बुंगाट जायचो की घाटपांडे काका वैतागायचे मागे पडतात म्हणून. गोवा राईडलाही मी बरेच वेळेस सुसाट ग्रुपमध्ये होतो. हेमची पहिलीच राईड होती आणि ती जड जात होती म्हणून मग त्याच्यासाठी मागे थांबायचो. अनधिकृत का होईना पण नाईट बिआरएस (२००किमी) पूर्ण केली आहे. (पुणे सातारा पुणे). त्यामुळे मला अनुभव आहे की तेव्हा आपण किती आजूबाजूला लक्ष देतो. त्याच रूटवरून निवांत जातानाच अनुभव आणि वेगात जाण्याचा अनुभव पूूर्णपणे वेगळे आहेत.

आणि मी अजिबात असे म्हणले नाहीये की जे वेगात जात नाहीत ते मज्जा करत नाहीत. पण केव्हापासून तेच क्लिअर करतोय, जर तुम्हाला कोणी सावकाश जा म्हणून अट्टाहास करत नाहीये, तर सावकाश जाणाऱ्यांनी वेगात जाण्याचा अट्टाहास का. ज्याला त्याला त्याच्या वेगाने जाऊ दे ना. ठीक आहे, आम्ही उशीरा पोचू, जास्त दमलेले असू, विश्रांती कमी मिळेल पण ते आमचे आम्हाला ठरवू दे ना.

हे लवकर पूर्ण कर आणि अलिबाग सफरीचे वर्णन लिहायला घे

>>>>हे पूर्ण करतो, पण अलिबागचे इतकेही वर्णन करण्यासारखे काही नाही. इट वॉज अ लीजर राईड.

कांही पिक्चर अशे असतात कि आपल्याला वाटते कि अरे हि आपलीच कहाणी आहे मग आपण स्वतःला
त्या हिरोच्या जागी गृहीत धरून तो पिक्चर पाहतो तशी गत माझी झालीय ... सायकलिंग मधला c हि माहित नाहीये पण मीही आज डिडवानाला पोहचलो बरंका ....

>>>>धन्यवाद, मस्त वाटलं

मनोज, धन्स रे...टाकतो पुढचा भाग लवकरच

लिंबुदा तुमचा प्रतिसाद वाचला मी दोनदा, पण मला नीटस उलगडला नाही.

त्यामुळे मला अनुभव आहे की तेव्हा आपण किती आजूबाजूला लक्ष देतो. त्याच रूटवरून निवांत जातानाच अनुभव आणि वेगात जाण्याचा अनुभव पूूर्णपणे वेगळे आहेत. >>>>> ओके. म्हणजे हे तू फक्त स्वतःपुरतं लिहित आहेस. तुझ्या आधीच्या पोस्टींमधून ते जेनेरिक वाटलं.

नाही रे, मी पूर्णपणे माझ्याबद्दलच बोललोय, कि मला हे जमणार नाही, कि मी सावकाश जाणारा आहे, मला रमत गमत जायला आवडत आणि राईडला असे जावे असे मला वाटतं.

किती (आणि काय काय) लिहितो हा लिंटी !

मला खात्री आहे, पराग केदार आणि आशू हे तिघे म्हणतील "आमची सायकलीचा वेग किती राखावा, फोटो किती काढले म्हणजे राईड चा आनंद घेतला, फिटनेस कोणत्या पातळीचा राखावा ह्या सगळ्या बाबतीत सहमती आहे" असे जाहीर करतो पण पोस्टींना आवर घाल Wink Light 1

>>> लिंबुदा तुमचा प्रतिसाद वाचला मी दोनदा, पण मला नीटस उलगडला नाही <<< Uhoh बर झालं....

>>> किती (आणि काय काय) लिहितो हा लिंटी ! <<< Proud

Pages