बादलीयुद्ध ४

Submitted by जव्हेरगंज on 9 August, 2016 - 05:45

बादलीयुद्ध एक , दोन , तीन
-------------------------------------------------------------------------------

मेसमधल्या जेवणात सुकी भाजी जास्त मिळत नाही या एकाच कारणास्तव आम्ही मेस बदलली. चांगली मेस गावात होती. म्हणूनच आम्ही काकाला दुपारी होस्टेलवर डबे घेवून यायची शिफारस केली.
डब्यात सुकी आणि पातळ अशा दोन्ही भाज्या जास्तच चविष्ट असायच्या. बहुदा मेस बदलल्याचा परिणाम.
चार चपात्या खाऊनसुद्धा मला नेहमीच एक चपाती कमी पडलीय असं वाटायचं.
त्यादिवशीही असंच झालं. दिलीपनं आणि मी सोबत जेवण केलं. खाऊन पिऊन उपाशी असं काहीतरी मला वाटायला लागलं. राहावलंच नाही. सरळ कागद घेतला. त्यावर लिहीलं, ' कृपया या डब्यात एक चपाती जास्त घालावी'. आणि तो कागद डब्यात ठेवून मी कॉलेजला गेलो.
त्यादिवशी गोरख ऊशिरा जेवला.

दुपारी लेक्चरला प्रचंड झोप आली. मास्तर नेमका शिकवतोय काय हे मला आजपर्यंत तसेही समजतच नव्हते. गणित सोडल्यास बाकी कुठल्याही लेक्चरला बसण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बाकीचे सगळे बसतात म्हणून मी ही बसत होतो.
कुणीतरी एक उठायचा. इंग्लिशमध्ये शंका विचारायचा. म्हणजे यांना शंका पडोस्तोर समजतं तरी कसं. आमच्या वर्गात खरंच काही बुद्धिमान प्राणी राहतात याची मला खात्री पटली.
शेवटच्या बाकावर बसून वेळ घालवण्यासाठी मी वहीवर डोंगर वगैरे काढण्यास आता दिवसाही सुरुवात केली.

संध्याकाळी पुन्हा एकदा मेसचे डब्बे आमच्या खोलीवर आले. डबा उघडून बघतो तो काय, फक्त दोनच चपात्या?
त्यादिवशी मी अर्धपोटीच जेवलो. साला चिठ्ठी पाठवली म्हणून काकानं मला शिक्षा दिली की काय. तसंही त्यांची पोरगी बीए करत होती कुठेतरी. भांडी तीच धुवायची. पण म्हणून मी तिला प्रेमपत्र थोडेच धाडले होते.

हा नवीन मेसवाला काय ठिक वाटत नाही. रात्री तो डबे न्यायला आला तेव्हा मी त्याला जिन्यात गाठलेच.
"काका, अहो मी एक चपाती जास्त द्यायला सांगितली होती"
"ही चिठ्ठी तुम्हीच लिहीली होती काय?" खिशातनं चिठ्ठी काढत काका म्हणाला.
मी म्हटलं, हो.
"मग बरोबराय, दोन चपात्या कमीच दिल्यात की"
च्यायला डोक्यावर पडलाय का हा. लोकं बहीरी असतात असं ऐकलं होतं. पण शुद्ध मराठीत लिहलेलं पण समजत नाही यांना.
मग मी चिठ्ठी उघडून त्याला दाखवत म्हणालो,
"हे बघा काय लिहीलंय, 'कृपया या डब्यात दोन चपात्या कमी द्याव्यात'?"
च्यायला हे काय! माझी बोलतीच बंद झाली.

मग त्याला तोंडीच सांगितलं की बाबा उद्यापासून माझ्या डब्यात पाच चपात्या देत जा.
मग तो कागद घेऊन मी रुमवर आलो. हे घडलंच कसं. कागद नीट वाचल्यावर समजलं ते अक्षर माझं नाहीच.
"साल्या गोऱ्या" म्हणत तणतणतच गोरखच्या रुमवर गेलो. अगोदरच टपून बसलेले चारपाचजण तिथे खदाखदा हसत होते.
"च्यायला ते चिठ्ठी बिठ्ठी कशाला पाठवतैस रे , सरळ सांगायचं की" म्हणून त्यानेच माझी कानउघडणी केली.
"पण तुला कसं कळलं मी चिठ्ठी लिहीलीय?"
"दुपारी जेवायला आल्यावर मी चुकून तुझाच डब्बा उघडला रे, पैल्याच डब्यात चिठ्ठी"
गोरखनं त्यावेळी हसून घेतलं खरं पण मी त्याच्याकडचा अर्धी पिशवी चिवडा फस्त केला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा डब्बे आले, तेव्हा दिलीपनं आपल्याला भूक नाही असं जाहीर केलं. एक तर तो सणासुदीचा दिवस होता. डब्यात बरंच काही गोडधोड होतं. जी एक दुर्मीळ गोष्ट होती.
मग मी दिलीपचा एक आणि माझा एक असे दोन्ही डबे फस्त केले. त्यादिवशी मी एवढा जास्त जेवलो की पुढचा आठवडाभर माझी भूकच मरुन गेली.
वर तो काका रोज डब्यात पाच चपात्या पाठवायला लागला.
----------------------

अशाच धामधुमीत आमची दुसरी सेमीस्टर जवळ आली. दिवस वैऱ्याचे होते. परिक्षेच्या अगोदर आम्हाला महीनाभर सुट्टी असते. तिला पीएल म्हणतात.
अचानक आपण कुठल्यातरी वैरान जागेवर येऊन पडलो आहोत असे वाटायला लागले. त्यादिवसांत कॉलेजवर कुत्रंसुद्धा फिरत नाही. तुम्ही सहज म्हणन चक्कर टाकायला गेलात तर तुम्हाला तिथे कोणीच दिसणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कॉलेज बंद पडलंय असंच तुम्हाला वाटेल. पण नीट नजर मारली तर अतिशय अडगळीतले कोपरे, गच्छीवरची पाण्याची टाकी, वर्कशॉपच्या पाठीमागच्या पायऱ्या, जिने, वगैरे ठिकाणावर एकांतवासातले एकटे जीव तुम्हाला हातात पुस्तकं घेऊन अभ्यास करताना दिसतील.

प्रत्येकाला या दिवसांत आपल्यातला एक 'स्व' सापडतो. कॉलेज हे एक तुरुंग आहे. आणि आपण त्यात डांबलेले कैदी. बाहेरच्या जगातला साधा एक गाडीचा हॉर्न जरी कानावर पडला तरी कधी एकदा हा तुरुंग भेदून त्या जगात जातोय असं होऊन जायचं.
रात्री मी कँटीगच्या बाजूलाच पायऱ्यांवर अभ्यास करत बसलो होतो. कितीही ओसाड वाटलं तरी या भागात थोडा उजेड असतो. थोडं पलिकडे वाळूच्या ढिगाऱ्यावर गोरख पुस्तक घेऊन पडलाय. मी हातातल्या पेन्सिलीनं जे काय महत्वाचं वाटलं त्या ओळींखाली खुणा करत जातोय. शेजारच्या गल्लीतून कुत्र्यांचा आवाज येतोय. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करुन आम्ही अभ्यासाला झोकून दिलंय.
तेवढ्यात एका कर्णमधुर गिताचा आवाज ऐकू येतोय.
"कूं कूं कूं कूं....
चोलीके पिछे क्या है,
चोली के पिछे...."
ही एक जबरदस्त विसंगती होती. एवढ्या तणावाच्या वातावरणात हे असलं गाणं! पण गोरखच्या हृदयाचं पाणी पाणी झालं.
ट्रॅक्टरचा भटार आवाज ऐकू येऊ लागला. आणि आम्ही पुस्तकं तिथेच ठेऊन रस्त्यावर आलो. भरगच्च दोन टायल्या घेऊन धावणारा तो ऊसाचा ट्रॅक्टर आमच्या पुढून "चोलीमे दिल है मेरा" म्हणून निघून गेला.
मी आणि गोरख साधारण एक किलोमीटरपर्यंत त्याच्यामागे धावत गेलो. साला ऊसंच तुटेना. शेवटी टायलीवर चढून कसेबसे चार कांडके पाडले. गोरखने मात्र एक आख्खा ऊसंच मोळीतून बाहेर ऊपसला.
त्या रात्री आम्ही भरपूर ऊस खाल्ला.
"आमच्या गावाकडे हे आस्सा ऊस खातो" म्हणून आमची गावाकडची चर्चा रात्रभर रंगली.

गोरख सध्या माझ्यावर चिडलाय. मी सोबत असल्यावर भरपूर टाईमपास होतो असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तो मला चुकवून अभ्यासाला जातो.

एके दिवशी सकाळी मी त्याच्या रुमवर गेलो तर तो एक तंगडी वर करुन पुस्तक वाचत पडला होता. हा त्याच्या प्रयोगाचा एक भाग होता. बरेच विचारमंथन केल्यावर अभ्यास कसा करावा यावर त्याने संशोधन केले होते.

मी त्याला भल्या पहाटे ऊठून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पहाटे वाचलेलं कधीच विसरुन जात नाही हे ही त्याला पटवून दिल.
त्यादिवशी गोरख पहाटे चारला उठला. सरळ कॉलेजच्या पोर्चमध्ये जाऊन अभ्यासाला बसला. पण त्याची झोप काही जाईना. मग त्याने निष्कर्ष काढला. आता आपण रनिंगला जाऊया. म्हणजे मग झोप जाईल. मग हा टेकडीवर पळायला गेला. परत आला तेव्हा तो बराच दमला होता. मग त्याने सरळ पुस्तके उचलली आणि रुमवर येऊन झोपला.
"पळून पळून पाय दुखायला लागले मर्दा" तो म्हणाला आणि पुस्तक वाचण्यात गढून गेला.

मात्र त्याचे संशोधन चालूच राहीले. रात्री माझ्या रुमवर येऊन नक्की मी कुठल्या दिशेला बसून अभ्यास करतोय हे तो पाहून जायचा. हे एक भलतंच.

या सगळ्या प्रकारात दिलीप नक्की कोठे आणि कसा अभ्यास करतोय याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मध्यरात्री साधारण दोन वाजता जेव्हा आम्ही सहज म्हणून लायब्ररीच्या मागे चक्कर टाकायला गेलो तेव्हा दिलीप तिघा चौघांना जमवून क्रिकेट खेळत बसला होता. मग मला त्यानं फिल्डींग करायला ऊभं केलं. आणि गोरखला बॉलिंग टाकायला लावली.
अर्थात दिलीप रात्रभर आऊट झाला नाही.
तेव्हापासून आम्ही त्याच्या वाटेला फारसं जात नाही.

एकदा असाच रुमवर अभ्यास करत बसलो असताना किसन नावाचा एक सीनीयर माझ्या रुमवर आला. हातातली तंबाखू मळत मला म्हणाला, "चिमूटभरच घ्यायची, पण अभ्यासाला अशी काय कीक बसते म्हणून सांगू"
मी म्हटलं, नको बाबा.
मग त्यानं दुसऱ्या हातानं मळलेली तंबाखू थोपटली. मला जोरदार शिंक आली.
"चार लोकं खोकल्याशिवाय मला तंबाखू खाल्ल्यासारखं वाटतंच नाय" म्हणून तो बार भरुन निघून गेला.

----------------------
"अब्बे ही बादली माझी आहे"
"अब्बे ही बादली माझी आहे"
"अब्बे ही मी विकत घेतली होती"
"अब्बे ही राजेशनं मला विकली होती"
"अब्बे कोण राजेश? राजेश बाजेश कोण मी वळखत नाय"
"अब्बे मी तुला बी वळखत नाय, चल फुट हितनं"
"अरे पण ती माझी बादली आहे"
"साल्या चोरी करताना लाज नाही वाटली"
"ए मला चोर म्हणू नको हा"
"मग काय तुझी पुजा करु?"
"बादली घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाय"
"आवो जावो घर तुम्हारा है, बसायचंय तेवढं बस, पण बादलीला हात जर लावला, तर मग बघ"

मग तो बसला. बराच वेळ बसला. खाटंवर हात टेकून पाय हलवत बसला.
मग तो उठला. म्हणाला,
"अब्बे पण ही माझी बादली आहे ना"

बोंबला.
-----------------------

दुसऱ्या सेमीस्टरला गोरखचे जवळपास सगळेच विषय उडाले. त्याच्यावर प्रचंड ताण आला. बोलला नाही दिवसभर. यातून केवळ एकच अर्थ निघत होता. पहिल्याच वर्षी तो नापास झाला होता.
मी जरी सहिसलामत निसटलो असलो तरी इंजीनीयरींगने मला गंडवलं होतं. आतापावतो स्कॉलर असणारा मी कसाबसा काठावरच पास होऊ शकलो. रात्र रात्र अभ्यास करुन डिस्टींगशनची स्वप्नं पाहिली. पण शेवटी सेंकड क्लासवर समाधान मानावे लागले.
दिलीपच्या मते मी सगळ्याच विषयात पास झालो म्हणजे खरंच मी स्कॉलर आहे. चॅकोचेही तेच मत पडले. ते मला अधिकच आदर देऊ लागले. मनातल्या मनात मी चिडून गेलो.
कशातच नाही किमान अभ्यासात तरी नाव गाजवावे तर इथे पहिल्याच वर्षी धक्का बसला.

-----------------------

दिवस कोलमडून पडण्याचे होते.
मी सकाळी खूप ऊशिरा उठायला सुरुवात केली. त्यावेळेस बाथरुमला रांगा लागलेल्या नसतात. त्यातल्या त्यात ही एक आनंदाची बाब आहे.

कुण्या एके काळी मी साडे सहाला उठायचो. त्यावेळची युद्धपरिस्थिती मी अगदी जवळून अनुभवलीय. आजकाल असे अनुभव माझ्या वाट्याला फारसे येत नाहीत.
आठ साडेआठ, नऊ, कधीकधी दहालापण मी आंघोळ करतो. तिथे कोणी काळं कुत्रंपण नसतं.
होस्टेलवर सगळ्यात शेवटी आंघोळ करणारा मी असं जर कोणी समजत असेल तर ते चूक आहे. कारण दुपारी दोनला आंघोळ करणारे काही महाभाग इथे वसतात. ते दुपारी उठतात. आंघोळ करतात. मेसला जाऊन जेवण करतात. आणि पुन्हा येऊन झोपतात.

गोरख मात्र अजिबातच कॉलेजला जात नाही. साहजिकच, नापास झालेल्या विद्यार्थ्याला कसलं आलंय कॉलेज. दिवसभर तो नुसता रुमवर पडून असतो. एक 'अभ्यास' सोडला तर त्याचे बरेच उद्योगधंदे सध्या जोरात चालू आहेत. एकंदरीत त्याची चंगळ आहे.
मी कॉलेजला जायचं कधी बंद केलं हे मलाही नीटसं आठवत नाही. पण प्रॅक्टीकल नावाचा प्रकार मला टाळता येण्यासारखा नव्हता.
तसं माझंही एक स्वप्न होतं. आपणही नापास व्हावं. दिवसभर लोळत पडावं. मन मानेल तिकडं भटकावं. पण ते माझ्या नशिबात नव्हतं.
गोरख आजकाल पुस्तकं आणून वाचतो. विशेषत: मराठी कादंबऱ्या. त्यासाठी त्यानं गावात खातंही उघडलंय. मला त्याचा हेवा वाटतो.

तर त्या दिवशी मी सकाळी उठलो. आंघोळ केली. आणि शाबुद्दीनच्या गाड्यावर नाष्टा करायला गेलो. त्याच्या गाड्यावर चविष्ट पोहे तीन रुपयाला मिळतात ही कमाल गोष्ट होती. मी डबल प्लेट पोहे खाल्ल्यावर चार रुपयाचा समोसाही घेतला. दहा रुपयात जेवणंच झाल्यासारखं वाटलं.
शेवटी मी चहा मागवला. आणि खिशात बारा रुपयाची जुळवाजुळव करत असताना एक गुळगुळीत टकला, आणि जवळपास म्हणायलाच पाहीजे असा जाडा, आणि ज्याला माणूसंच म्हटले पाहीजे असा सांड तिथे आला.
"खाते पे लिख देना बे" बहुदा त्याचा नाष्टा नुकताच झाला असावा.
"पैतीस हुआ ना?" असं शाबुद्दीननंच त्याला उलटं विचारलं. आणि पेनाच्या नावाखाली वापरत असलेल्या 'कांडी'नं वहीवर गिरवलं. ती कांडीसुद्धा सुतळीनं बांधून ठेवलेली. लोकं आठाण्याची कांडीसुद्धा चोरतात.

पस्तीस रुपयाचं या अवाढव्य मुलानं नक्की काय काय खाल्लं असावं, याचा विचार करत मी बराच वेळ चहा पीत उभा होतो. हा आमच्या कॉलेजमध्ये कसा हाही प्रश्न मला सुटत नव्हता. तो स्टुडंट आहे हे कळल्यावर मला प्रचंड यातना झाल्या.

तो गुळगुळीत टकला मुलगा साधारण आठ दहा खोल्या सोडून कोपऱ्यातल्या खोलीत रहात होता. एवढ्या दिवस तो कुठे होता याची मला माहीती नाही. त्याच्या मनात आलं म्हणून तो सरळ कॉलेजवर आला होता.
गेली बरीच वर्षे तो कोपऱ्यातली खोली अडवून बसलाय. वीरप्पनलाही सांगता येत नाही, नक्की तो कॉलेजमध्ये कधीपासून आहे.

तो जब्बार नावाचा गब्बर माणूस होता. आल्या आल्याच त्याने एका बिहारी पोराशी पंगा घेतला. सगळं होस्टेल जमलं. नक्की काय प्रकार झाला समजलंच नाही. मात्र जब्बारचा आवाज साधारण पंधरा मिनिटे पुर्ण होस्टेलवर घुमत राहीला. असेल कायतरी जुनं म्हणून आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी दिलीप त्याची सहज म्हणून चौकशी करायला गेला आणि त्यांचीही जोरजोरात भांडणे सुरु झाली. दिलीपनं टक्कर दिली खरी पण शेवटी तोही शरणागती पत्करुन परत आला.
मला म्हणाला, येडं आहे रे ते, छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडत बसतंय.
दिलीपनं त्याला फक्त काल काय झालतं एवढंच विचारलं. पण तू मला विचारणार कोण? म्हणून त्यांचही भांडण पेटलं.
नंतर तो गोरखकडं कसलंस कॅसेट मागायला आला. गोरखनं दिलं ही. पण जेव्हा गोरख परत मागायला त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्यांचही भांडण पेटलं.

एकूणच आजकाल रोज रात्री दहा वाजता कुठेनाकुठेतरी भांडणाचा प्रोग्राम हा ठरलेला असतो.

जब्बारला सगळेच घाबरतात. मी ही घाबरतो.नव्हे वॉचमनही घाबरतो. जब्बारने सगळ्यांवर दहशत बसवली आहे. पण त्याचा बांबू पोकळच आहे आम्हाला जरा ऊशिराच समजले.
त्याचं असं झालं की सुनीलच्या रुमवर आम्ही सगळे चिवडा खात असताना तो आला.
अर्थात खोली सुनीलची म्हणून त्याने सुनीलला नाव गाव विचारलं.
मग म्हणाला,
"तुझा बाप काय करतो?"
सुनील अचानक उठून त्याला धमकी देत म्हणाला,
"बाप नाही म्हणायचं, बाबा म्हणायचं"
मग जब्बार गोधळला, म्हणाला
"बाबाच म्हणालो मी, तुझा बाबा काय करतो असंच म्हणालो मी"
"तुझा नाय तुझे, तुझे बाबा काय करतात, असं नीट विचार"
मला इथे मराठी व्याकरणाचा तास सुरु असल्यासारखं वाटलं.
"तुझे बाबा काय करतात, असंच म्हणालो मी" जब्बारचा आवाज आता मांजरीएवढा झाला होता. कारण सुनीलचा हात कधीही त्याचं मुस्काट फोडू शकला असता.
"का?"
"काही नाही असंच विचारलं"
"ते शिक्षक आहेत"
"ठिक, चालेल" म्हणून जब्बार हार पत्करुन सुनीलच्या रुमबाहेर निघून गेला.
त्यानंतर आम्हालाच काय त्याने कुणालाच त्रास दिला नाही. त्याला कोणीच भाव देईनासे झाले. दिलीपने त्याला पोर्चमध्ये गाठून शिव्याही दिल्या. नंतर जब्बारने आमच्याशी मैत्री करण्याचाही प्रयत्न केला. पण कुत्र्याचं शेपूट सरळ थोडीच होणार. जर कधी समोर आलाच तर लाथ घालायची तयारी असावी असा मी मनोमन विचार केला.

अगोदर गोरखने त्याच्याशी मैत्री केली. तसंही गोरखला दिवसभर काम नसायचं. दिवसभर त्या जब्बारच्या रुममध्ये जावून तो गाणी ऐकायचा. त्याने जब्बारच्या बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत करुन घेतल्या. कॉलेजच्या जुन्या दिवसांतल्या गोष्टीही त्याने काढून घेतल्या ज्या नंतर गोरखने मला सांगितल्या. एकंदरीत त्या दिवसांत कॉलेजमध्ये बरीच लफडी अस्तित्वात होती.

तर असा हा जब्बार एक दिवस माझ्या रुममध्ये आला. कॉटखाली त्याने वाकून बघितले, आणि म्हणाला,
"अब्बे ही बादली माझी आहे"

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

जुने दिवस आठवले...
दहा रुपयात नाष्टा.. चहा आणि वडापाव..
PL मधला भर दुपारी तिन वाजताचा चहा... जेवणानंतर ते ह्या चहा पर्यंत काय वचतोय हेपण समजायचं नाही. जास्तित जास्त ४-५ पानं वाचुन व्ह्यायची (दोन तासात) पण तरी चहा नंतर पुन्हा वाचावी लागायचीच (ह्यावेळी ५-१० मिनिटात व्ह्यायची)
आणि हो नविन मेसच्या चवी बद्दल ही सहमत Happy
शेवटी पुलं नी म्हटलय ना ' नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी... दुसरी चांगली दिसते म्हणुन पहीली सोडण्यात काहीच अर्थ नसतो.शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्‍या सारख्याच" ह्यात मेस पण जोडता येईल. Happy
दुपारी दोन काय आमच्याइथे ४-६ वाजता आंघोळ करणारे पण होते..संध्याकाळी आंघोळ करुन कॉलेजच्या मेन गेट वर जायचं थोडं "पक्षी" निरिक्षण आणि नाष्टा करुन डायरेक्ट मेसलाच जायचं.
बाकी आमच्या होस्टेलला नापास (YD) झालं की प्रवेश नसायचा, मग बाहेर कॉट बेसिस वर जागा शोधायला लागायची..

<<<<<<<<<<<< इंग्लिशमध्ये शंका विचारायचा. म्हणजे यांना शंका पडोस्तोर समजतं तरी कसं. >>>