श्री संतराम (भाग ६ वा)

Submitted by मिरिंडा on 7 August, 2016 - 07:56

सोमू आणि त्याचे सहकारी यांनी आत शिरल्या शिरल्या प्रथम ब्राह्मण वेष काढून ठेवले. डोक्यावर बांधलेले खोट्या जटांचे बुचडेही काढले. नेहमींच्या लढाऊ वेषात ते तयार झाले. ते उतरलेला भाग तसा अंधारलेलाच होता. शेवटी तो जमिनीखालचा भाग होता. चढ उतार असलेली जमीन केवळ सरावलेल्या माणसाला जाण्यासारखी होती. अंधुक प्रकाशात हळू हळू डोळे सरावले. त्यांना आता दूरवर एक दगडी कमान असलेले मुख्य प्रवेशद्वार दिसले. अर्थातच ते बंद होते. तिथे होते पंडिताने बांधून घेतलेले कारागृह. त्यात वेगवेगळे राजकीय अधिकारी जे पंडिताच्या मोहाला न भुललेले आणि ज्यांचे रुपांतर त्याने पशू पक्ष्यांमध्ये केले होते. त्यात त्याचे साधनागृह पण होते. असे म्हणत असत. कारण आत पंडीताखेरीज कुणालाच प्रवेश नव्हता. त्यातल्या प्रवेशद्वाराच्या झरोक्यांमध्ये काही पक्षी त्याने मंत्र तंत्र करून रक्षणासाठी तयार केले होते. सोमू आणि त्याचे सहकारी काही अंतरावर दबा धरून बसले होते. ते वाट पाहत होते. परदेशी मुद्रा घेऊन येणाऱ्या पेटाऱ्यांची. अंदाजाप्रमाणे आता पेटारे घेऊन येणारे उष्ट्र आणि अश्व दुरवरचा अंधार गडद झाल्याने दिसले. ते संथ आणि शांतपणे येत होते. त्यांना खात्री होती की कोणताही विरोध होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे त्यांना घाई करण्याची गरजही नव्हती. पेटारे घेऊन येणारी सर्वच पंडिताची माणसे होती. अश्या ह्या गुप्त जागी येणार कोण आणि विरोध करणार तरी कोण. उष्ट्र अश्वांच्या रक्षणासाठी येणारे रक्षक सशस्त्र होते. ते जवळ जवळ पंचवीस एक होते. ते कारागृहाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचणार तेवढ्यात दबा धरून बसलेल्या सोमूच्या साथिदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने ते बावचळले. त्यांच्यातले एक दोघे जखमी झाले. पण त्यांनी सर्वांनी मिळून प्रतिहल्ला केला. त्यात आठ पेटारे घेऊन निघालेले उष्ट्र आणि त्यांना सांभाळणारे हशम मुख्य दरवाज्याजवळ पोहोचण्यात यशस्वी झाले. मंत्रशक्तिने भारलेले मुख्य प्रवेशद्वार आपोआप उघडले गेले आणि जवळ जवळ आठ पेटारे उष्ट्रांसहित कारागृहात शिरले. आत मिट्ट अंधार असल्याने पलित्यांच्या उजेडात काहीच दिसण्यासारखे नव्हते. त्यामुळे बाहेरील व्यक्तीस आतला अंदाज येणे शक्य नव्हते. आत शिरल्याबरोबर प्रवेशद्वार परत पूर्वीप्रमाणे लागले. ...सोमूच्या सात आठ साथिदारांनी समोरच्या तीन चार रक्षकांना यमसदनास पाठवले. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेले दोन पेटारे सोमूच्या ताब्यात आले. आता झरोक्यात बसलेले पक्षी व्हँव व्हँव असा आवाज करीत सोमूच्या साथिदारांवर झेपावले आणि त्यांना जखमी करू लागले. सोमूने आपल्यातल्या दोघांना मिळालेले दोन पेटारे बाजूला नेऊन मंदिराच्या गोमुखी खालच्या भागात नेण्यास फर्मावले. त्याप्रमाणे ते करू लागले , तेवढ्यात उरलेले तीन चार पक्षी त्यांना जखमी करू लागले. आता पक्षांचा सामना करीत त्यांनी यशस्वी रित्या एक पेटारा गोमुखी खालच्या भागात नेऊन ठेवला. पण दुसरा पेटारा जमिनीवर बऱ्याच वेळा आदळल्याने एका बाजूने फुटून त्यातल्या मुद्रा जमिनीवर पसरल्या. तिकडे लक्ष देण्यात वेळ न घालवता सोमूने आपल्या साथिदारांना निघण्याचे आदेश दिले. ब्राह्मण वेष त्यांनी तिथल्याच एका विवरामध्ये टाकून दिले. परंतु त्यांच्यामागे पंडिताचे दोन रक्षक लागले. त्यांना मारून घेतलेला पेटारा आणि कपडे सांभाळित सोमूने चलाखीने गोमुखी फिरवली व वरच्या मार्गाने ते सगळे बाहेर आले. आता त्यांना ब्राह्मण वेष धारण करण्याची आवश्यकता नव्हती. आता प्रश्न होता खजिन्यापर्यंत जाण्याचा. काहीवेळ त्यांनी मंदिराच्या मागच्या बाजूसच काढला. पंडिताकडे अजून विवाहाचा समारंभ चालूच होता. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी खास माणूस लक्ष देईल याची शक्यता नव्हती. आत्ता कुठे संध्याकाळ होत होती. सामान्य माणूस सोमूसारख्या योद्ध्याच्या वाटेला जाणं शक्यच नव्हतं. तरीही जमेल तेवढी सुरक्षितता घेत त्यांनी जवळच असलेल्या एका अश्व विक्रेत्याकडून चार अश्व विकत घेतले. त्यातल्या एकावर पेटारा लादून ते बाजूने राजवाड्यातील खजिन्याच्या भागाकडे निघाले. रस्ते तसे कमी वर्दळीचे होते. एक दीड घटकेतच ते राजवाड्याच्या पार्श्वभागात आले. जिथे खजिनदाराचे कार्यालय होते. आता रात्रीच्या समयाची सुरुवात होत होती. रस्त्याने जाणारे विवाहसमारंभाहून स्वगृही परतत होते आणि ते सगळे पंडिताने दिलेल्या चमत्कारिक भेट वस्तूंवर खूष होऊन त्यावर चर्चा करीत होते. त्यांना त्या भेटींचे फार अप्रूप होते . कारण त्यातल्या बऱ्यचश्या भेटी विशिष्ट मंत्रांनी भारलेल्या होत्या . अर्थातच ते भारणे फार काळापुरते राहणार नव्हते. पण भेटवस्तूच ती. .....

खजिनदाराच्या कार्यालयात प्रवेश करणार एवढ्यात सोमूला त्याचा मेहुणा सृष्टार्क येऊन भेटला. त्याने सोमूला बाजूला घेऊन त्याच्या हातावर मिळालेली खास राज घराण्यात वापरात असलेली अंगठी ठेवली. आणि स्तुतीसुमने ऐकण्यास तो आतुर होऊन अदबीने उभा राहिला. हातातली अंगठी पाहून सोमूने ती कोणाची आहे ते ओळखले. पण ते न सांगता त्याने मेहुण्याला रागे भरली. "ज्या
स्त्रीची अंगठी होती तिचा माग काढून तिला रात्रीच्या प्रहरी ती कुठे गेली याची चौकशी न करता अथवा तिला चौकशी साठी ताब्यात न घेता तसेच सोडून जाऊ का दिलेस ? " यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. केवळ आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर स्वतःच्या बळाचा वापर करून त्याने त्याला या खास पथकात नेमले होते. जिथे बुद्धिमत्तेच्या कसोट्या पार केल्याशिवाय प्रवेश दिला जात नसे. असले बेकायदेशीर कृत्य त्याने त्याच्या जिंदगीमध्ये प्रथमच आणि शेवटचे केले होते. आणि तेही महाराजांच्या अपरोक्ष . त्याला त्याची खंत होती. कारण महाराज्यांच्या विश्वासातला तो खास व्यक्ती होता. त्याने प्रथम खजिनदाराला त्याची स्वतःची खुणेची अंगठी दाखवली. खजिनदार कैवल्य एक सज्जन आणि प्रामाणिक माणूस होता. तसेच त्याला त्याच्या घराण्यातल्या परंपरेनेच हे पद मिळाले होते. महाराज घराण्यांचं महत्त्व जाणून होते. खजिनदाराने अश्वांवरले पेटारे उतरवण्यास त्याच्या दासांना सांगून त्याची व्यवस्था त्याने जातीने केली. मग सोमूला प्रणाम करून त्या व्यवहाराची गोपनीय पावती हातात ठेवली व निरोप दिला. सोमू आणि इतर सहकारी यांच्या जवळ अजून परराज्यातल्या गोळा केलेल्या मुद्रा होत्या त्या सोमूने महाराज्यांना वानगीदाखल सादर करण्याचे ठरवले. मग सृष्टार्काकडे वळून तो म्हणाला " प्रातःकाळी मला त्या तपासणी चौकीवर घेऊन चल
जिथून त्या दोन्ही स्त्रिया गमन करत्या झाल्या. मग ते सगळेच मार्गस्थ झाले . खरंतर त्याचा आता काही उपयोग नव्हता. देवी आपल्या महाली केव्हाच पोहोचल्या होत्या. पण एकदा पहारेकऱ्यांना सज्जड दम देऊन त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई केल्याशिवाय सोमूला स्वस्थ बसवणार नव्हते. तसंच ज्या ठिकाणाहून त्या नाहीश्या झाल्या तिथे एखादे विवर, वा कूप तर नाही हेही पाहणे आवश्यक होते. आता त्याला अंदाज आला त्या दोघी स्त्रिया दुसऱ्या कोणी नसून किस्त्री आणि देवी होत्या. सदर वार्ता महाराज्यांकडे त्वरित पोहोचवणे आवश्यक झाले होते. तो त्या दिशेने मार्गस्थ झाला. महाराज निद्रेच्या आधीन होण्यापूर्वी नेहमी सोमुला बोलावून त्याच्याकडून आलेल्या दिवसभरातल्या गुप्तवार्ता ऐकत असत. आजच्या दिवसाच्या बातमीसाठी ते त्यांच्या गुप्तवार्ता कक्षात प्रवेशले होते. बराच वेळ झाला पण सोमू आलेला नसल्याने त्यांना त्याची चिंता होऊ लागली. लवकरच सोमू आला . त्याने देवींबाबतची सर्व माहिती महाराज्यांना विशद केली. आता देवी संतरामांकडेच गेल्या असल्या पाहिजेत याची त्या दोघांना खात्री होऊ लागली. तिथे नक्की काय घडलं याची माहिती सोमूने त्यांना दुसऱ्या दिवशी देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्या तपासणी चौकीत असणाऱ्या रक्षकांना योग्य ते शासन नंतर करण्याचे त्यांनी सोमूला आदेश दिले. अशी बरीचशी कारवाईची कामे सोमू करीत असे. पण महाराजांना जागृत करुनच.

************* *************** **************** ********

विवाह संपन्न झाल्याबरोबर होम हवनांसाठी श्रीपालाने त्वरा केली. त्याला माहित होतं की पंडीत आता अगदी घायकुतीला आलेला आहे. तो फार वेळ देणार नाही. आणि धर्मशास्त्राप्रमाणे जर विवाहकार्य पुरे झाले नाही तर त्याला निष्कारण राज्यांतर्गत विवाह कायद्याप्रमाणे वितंडराज न्यायाधिशापुढे उभे राहण्याची वेळ येईल . आणि तो भली मोठी पुंजी घेतल्याशिवाय मग हे प्रकरण गुंडाळणार नाही. या वितंडराजाचे हस्तक दिवस रात्र सगळ्या राज्यभर फिरत असतात की काय कोण जाणे. त्यातले काही त्याला माहीत होते. पण म्हणून त्याने आजूबाजूला पाहिले तर कोणी दिसेनात . असो , घाबरत घाबरत त्याने होम हवनाचे विधी सुरू केले. मंत्रोच्चारात कुणालाच रस नसतो हे त्याला अनुभवाने माहीत होते. अजून निदान दोन घटिका तरी लागणार. आणि तो पर्यंत भोजन मिळणार नाही आणि माझी भूक काही मला भागवता येणार नाही. तसे त्याने पंडिताने जे काही फराळाचे जिन्नस त्याला दिले होते , ते बकाबका पोटात ढकलले होते. पण घरचे भोजन , ते घरचेच. पंडित विधींमध्ये ज्या ज्या समयी स्वेच्छेचा हात हातात घ्यावा लागे त्या त्या समयी तो अगदी अधाशीपणे तिच्याकडे पाही. कशीतरी घटिका गेली. आता सप्तपदी चालू झाली. वयोमानानुसार पंडित झुकायला हवा होता. पण तो अगदी वेतासारखा कडक आणि ताठ होता. ते पाहून विधी पाहणारे अचंबित होत होते. काहींना त्याचं हे रहस्य मंत्र आणि तंत्र शक्तित दडल्याचे वाटते होते. तर काहींना ते त्याच्या वाम मार्गी साधनांमध्ये असल्याचे वाटत होते. आज कारण कळत नव्हते. काही वऱ्हाडी तर आपसात असेही कुजबुजत होते की पंडित जिवंत मानवाचे , विशेषतः मुसमुसणाऱ्या कन्यांचे रक्त शोषून घेतो, वगैरे वगैरे. .... पण पंडिताच्या तोंडावर एक प्रकारचे वेगळेच ते चमकत होते. बसलेल्या सर्वांना पंडीताचे पहिल्या रात्री कसे होणार असे कोडे पडले होते. आणि असले रत्न आपल्या संग्रही हवे अशी अभिलाषा तिथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनात होती. स्वेच्छेच्या हे लक्षात येत नव्हते असे नव्हते. पण तिने ठरवलेल्या समयी तिचे काही हस्तक या विवाहाच्या भाऊगर्दीत पसरून ठेवले होते. फक्त ते पंडिताच्या हस्तकांसारखेच वस्त्र ल्यायले असल्याने कुणालाही अजून तरी संशय आला नव्हता. तेवढ्यात दोन घटना अगदी अघटित घडल्या. त्यातली पहिली म्हणजे, एक काठी टेकत आलेले आजोबा कुणाचेही लक्ष नसताना वेदीवर चढले आणि त्यांनी मंत्रोच्चारात मग्न असलेल्या श्रीपालाच्या कानाशी येऊन " वधूला काही वेळापुरते मुक्त करा आणि हातातल्या सुवर्ण पेटिकेचे दान स्वीकारा " असे सांगितले. त्याप्रमाणे श्रीपालाच्या हातात ती लहानशी सुवर्ण पेटिका पडली , ज्यावेळी सप्तपदीत हातातल्या स्वेच्छेच्या हाताच्या स्पर्शाचा स्वर्गीय अनुभव पंडित घेत होता. त्यामुळे पंडिताच्या करड्या नजरेतून हे कृत्या सुटले. अर्थातच ते जरी घडले असले तरी अचानक अवकाशातून झेपावलेल्या ससाण्याच्या नजरेतून ते सुटले नाही. त्याने त्याला पढवल्या प्रमाणे ज्या आजोबांनी हे कृत्या केले त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवून त्यांना रक्तबंबाळ केले. फार कशाला त्याने प्रथम त्यांचे मस्तक विदीर्ण केले.आता तर अवकाशातून आणखी काही पक्षी आले . मग त्यांनी वेदनेने कळवळणाऱ्या आजोबांना वेदीवरून थेट मंडपातल्या देवतांच्या स्थानासमोरील प्रांगणात ओढत आणले. आता सगळेच मोठमोठे सरदार दरकदार धक्का बसून नुसतेच पाहू लागले. तेव्हा पंडिताच्या लक्षात आले की आपल्या रक्षकाला ज्याअर्थी भक्ष्य सापडले आहे त्याअर्थी काही तरी अनुचित चलाखी झालेली आहे. तो संशयाने श्रीपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे पाहू लागला. कारण वेदीवर त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते. फार कौशल्याने श्रीपालाने ती सुवर्ण पेटिका त्याच्या आंतर्वस्त्रामध्ये सरकवल्याने कुणासही संशय आला नाही. उलट त्याने पंडिताला आणि स्वेच्छेला आसनावर विराजमान होण्याची आज्ञा दिली व केवळ लहानसाच विधी शेष राहिल्याचे सांगून त्या मंत्रतंत्रास सुरुवात केली आणि एकीकडे पंडिताला वधूस विधी संपताच तिच्या कक्षात काही क्षणांसाठी गमन करण्याची शास्त्रानुसार आवश्यकता आहे असे सांगून आज्ञा दिली. नाइलाजाने पंडीताने ती मान्य केली. मग स्वेच्छा तिच्या वेदीखाली उभ्या असलेल्या तिच्या सख्या आणि दासींसहित तिच्या कक्षात जाती झाली.
आत्तापर्यंत वेदनेने तडफडणाऱ्या आजोबांना पक्षांनी ओढत विवाह मंडपाबाहेर नेले. पंडिताने एकदा आपली भेदक संशयी नजर मंडपात हजर असलेल्या बऱ्हाड्यांवरून फिरवली. पण त्याला अंदाज येईना. श्रीपाल आणि त्याचे सहकारी सगळं साहित्य एकत्र करण्यात रमले होते. त्याला कधी एकदा या पंडिताच्या नजरेतून सुटून स्वगृही जाऊन विवाहामुळे झालेली प्राप्ती आपल्या अंगवस्त्राला अर्पण करीन असे झाले होते. म्हणजे आजची रात्र तो अपूर्व असं शारिरिक सूख भोगू शकला असता. जे त्याला स्वतःच्या स्त्रीकडून मिळाले नसते. पंडिताच्या नजरेतून श्रीपालाची लगबग सुटली नाही त्याने तिथेच उभ्या असलेल्या त्याच्या खास टेहेळणी रक्षकांना श्रीपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांना विवाहगृहाबाहेर जाताना ताब्यात घेण्याचा इशारा केला. सगळ्यांना दृकगोचर होईल असं सध्या काहीही न करण्याचं त्याने ठरवले. त्याप्रमाणे तैनात छुप्या रितिने रक्षक श्रीपालाच्या कच्छपी लागले . आता पंडित फक्त प्रतीक्षा करीत होता स्वेच्छा येण्याची. कारण अजून बऱ्याच वऱ्हाडी जनांनकडून नजराणे येणे बाकी होते. जवळ जवळ अर्धी घटिका होत आली तरी स्वेच्छा वेदीजवळ आली नाही. मग तो स्वतःच तिच्या कक्षाकडे निघाला. त्याला पाहून एक खास राजकारणी धुरंधरजी त्याला हटकीत म्हणाले, " अहो पंडितजी , इतकी वासना बरी नव्हे. पहिल्याच रात्री तिला प्रणयाच्या रुपातच तुम्हाला बाहूंमध्ये घ्यावी लागेल. " धुरंधरजींवर मद्याचा अंमल थोडा अधिक असल्याने पंडिताने फक्त हसण्याची प्रतिक्रिया दिली. खरंतर त्याला क्रोध आला होता. ............ तो स्वेच्छेच्या कक्षाजवळ पोहोचायला आणि स्वेच्छा तिथून चौर्य मार्गाने गमन करण्याला एकच वेळ आली. स्वेच्छेने त्याला आधीच येताना पाहिले असल्याने तिची दासी उत्कंठा हिला तिने इशारा केला. त्याप्रमाणे उरलेल्या दासी आणि सख्या कक्षाबाहेर गेल्या. कक्षातल्या मंचाला एका बाजूने जोर लावून ढकलल्याबरोबर समोरच्या भिंतीतला चौर्यमार्ग खुला झाला. एका अंधाऱ्या पण विचार करून बांधलेल्या मार्गावरून स्वेच्छा तिच्या उत्कंठा या दासी बरोबर निघाली . आता ........तिच्या हातात फार मर्यादित समय होता. तिला हा मार्ग तसा परिचयाचा होता. पूर्वी ती ह्या मार्गाने पंडिताच्या महालात पोहोचली होती. खरंतर तिला ह्या देशाबद्दल फारच आकर्षण होते. ते केवळ न्यायनिष्ठुर महाराज्यांमुळे. ती जरी बाजूच्याच पण परक्या देशात राहात असली तरी तिच्या मातापित्यांच्या गोष्टीमध्ये या देशातली वर्णनं येत असत. त्यामानाने तिच्या देशात जुलमी सत्ता होती. ती स्वतः आणि तिचे मातापिता यांना जुलमी राजसत्तेचा वीट आला होता. त्यासाठी तर ती तेथील गुप्तचर यंत्रणेत सामिल झाली होती. असो. पाव घटिका मार्गक्रमण करून झाला होता. अचानक त्यांना पुष्करणीच्या बाजूने काही उष्ट्र व अश्व रक्षकांच्या समवेत येताना दिसले. स्वेच्छेने त्यातल्या काही रक्षकांना ओळखलेही. पण तिला अंदाज आला नाही तो त्यांच्या हेतूचा. ती एका मोठ्या शिळेच्या आड लपली. येणाऱ्या स्वारांचे आपसात चाललेले विचार विनिमय तिने ऐकले. त्यावरून तिला अंदाज आला की ते तिच्या मागावर नसून त्यांना कारागृहाकडे जायचे आहे. तिला तिचा माग काढला जाईल याची कल्पना होती. पंडित स्वस्थ बसणार नाही.
ते स्वार गेल्यावर अतिशय वेगात त्या दोघी चालू लागल्या . पण अचानक एक श्वापद त्यांना दिसले. . त्यांना कळेना त्याचा सामना कसा करणार ? हे श्वापद पंडिताने तर नाही पाठवले ? समोरच्याच बाजूने राजवाड्याकडे जाणारा गुहेसारखा मार्ग त्यांना दिसू लागला होता. पण या श्वापदाचे काय करावे . ...... सुचेना . स्वेच्छा शस्त्रास्त्र चालवण्यात निपुण होती. पण जवळ असलेला एक खंजीर कितिसा कामी येणार ? त्यात त्या श्वापदाने आपल्याला जखमी केले तर ? अनेक विचारांनी घेरलेल्या तिच्या समोर अखेरिस श्वापद येऊन उभे राहिले. त्याने तिचा मार्ग अडवला होता. अणकुचीदार शिंगे असलेल्या आणि मोठमोठ्या नख्या असलेल्या त्या श्वापदाकडे दोघी भीतीने पाहत राहिल्या. ते आता जोरज्रात श्वासोच्छ्वास करीत होते. लांबलचक शेपटी आपटीत त्याने अंगावर झेप घेण्यासाठी पवित्रा घेतला. पण ती गुप्तचर यंत्रणेमध्ये असताना जंगली श्वापदांचा सामना कसा करायचा हे शिकली होती. त्याने स्वेच्छेच्या अंगावर रोंरावत झेप घेतली. तिने ती चुकवण्यासाठी एका शिळेचा आडोसा मिळवला. उत्कंठेने चपळाईने पायाजवळ पडलेला पाषाणाचा तुकडा उचलून श्वापदावर फेकला . पण श्वापदाने तो जोरात मान हालवून चुकवला. पण शिळेवर श्वापद आपटल्यावर त्याला जास्तच क्रोध आला. मग त्याने परत झेप घेतली . ती चुकवण्यासाठी स्वेच्छा थोडी बाजूला झाली. पण तिने त्याला निसटता का होईना खंजिराचा वार केला. पण तिलाही त्याच्या नख्या लागल्याने तिच्या हातातून रक्त येऊ लागले आणि अंधुक उजेडात खंजीर तिच्या हातून सटकला. उत्कंठेला मात्र त्याने फार जोरात पंजा मारल्याने ती विव्हळत खाली पडली. आता ते श्वापद उत्कंठेच्या मागे लागले. तिला त्याने पंजावर पंजे मारून घायाळ करून सोडले. ती बेशुद्धावस्थेत खाली पडली. तिच्याकडे पाह्ण्यात वेळ न घालवता स्वेच्छा पुढे निघाली. आता ते पुन्हा स्वेच्छेच्या अंगावर येऊ लागले. मग मात्र तिने समोरच दिसणाऱ्या गुहेवजा गुप्त मार्गाकडे जिवाच्या आकांताने धाव घेतली. हातातला एकमेव खंजीर नसल्याने तिला दुसरा पर्याय उरला नाही. काही पावले जवळच असलेल्या मार्गाकडे असताना परत ते श्वापद तिच्याकडे येऊ लागले. तिने आता मात्र चपळाईने जिवाचा धोका पत्करून उड्या मारीत गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेचे मुख इतकेच मोठे होते की माणूस कसातरी प्रवेश करू शकेल. त्यामुळे महाकाय श्वापद तिथे येऊन आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. पण आता ती पळत पळत त्या मार्गावरून निघाली. हाताची जखम आता तिला जाणवू लागली. ती दाबून धरित ती राजवाड्याच्या अशा भागात शिरली जिथे जवळच देविंचा कक्ष होता. त्याच्या प्रवेशद्वारापाशी ती घुटमळु लागली. उत्तररात्रीचा प्रहर सुरू झाला.
महालाची थोडी फार माहिती असल्याने ती एका मोठ्या सभामंडपाला जाण्याच्या मार्गावर पोहोचली. तेवढ्यात तिला समोरून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने ती एका मोठ्या नक्षिदार खांबा आड लपली.

*****************************
देवी आपल्या कक्षात येऊन बऱ्याच घटिका झाल्या होत्या. अजूनही त्यांना आलेला चुंबनानुभव त्या विसरू शकत नव्हत्या. जो जो त्या विचार करीत होत्या , तो तो त्या त्यात गुरफटत जात होत्या. संतरामांबरोबर त्या वेगवेगळ्या रतिक्रीडांचे स्वप्नरंजन करून करून स्वतःचा काळ व्यतित करत होत्या. आता त्यांना आपल्या कक्षाच्या प्रवेशद्वाराशी कोणी घुटमळत असल्याची अजिबात जाणिव झाली नाही. संथ गतीने पदरव न करता ती व्यक्ती कक्षाची पाहणी करीत होती. तिला नक्की काय हवं होतं कळणं कठीण होतं. ती होती स्वेच्छा. नुकताच जिचा पंडिता बरोबर विवाह झाला होता. तिच्या योजनेप्रमाणे ती पंडिताच्या तावडीतून निसटली होती. पण इथे तिला कोण स्वीकारणार होतं ? अचानक समोरून येणाऱ्या एका तरूण पुरुषाच्या दर्शनाने ती स्तिमित होऊन जरा बावचळली. पण घाबरली नाही. घाबरली असती तर ती स्वेच्छा नसतीच. चलाखीने तिने एक नक्षीदार खांब जवळ केला. त्या मागे राहून तिने समोरून येणाऱ्या व्यक्तीला टाळले. तो होता." सृ ष्टा र्क " सोमूचा शालक. पुरुषी सौंदर्याचा उत्तम नमुना . एखादं शिल्प कोरावं तसा असलेला चेहरा आणि त्याला लाभलेला तितकाच सुडोल आणि सडसडीत पण चपळ देह. कमरेच्या तलवारीच्या मुठीवर डावा हात ठेवलेला तो कोणताही नाद न करता जाता झाला. त्याला आत्ता सोमूला भेटायचं होतं. त्याला घेऊन राजमार्गाच्या त्या चौकीवर जायचं होतं जिथून त्या दोघी स्त्रिया अदृश्य झाल्या होत्या. तरीही तो इथे कालापव्यय करित होता. प्रमादावर प्रमाद त्याला कोणत्या कारवाईकडे नेणार होते ते समजणं कठीण होतं. तो हेतुपूर्वक हे करीत नव्हता, तर त्याच्या हातून ते आपोआप घडत होतं. एकदा का आपलं सोमूच्या पथकामधलं स्थान पक्कं झालं की तो त्याच्या वृद्ध मातेचा त्याच्या विवाहाचा आग्रह पूर्ण करणार होता. त्याचे दुर्लक्ष झाल्याने स्वेच्छाचा महालातला मार्ग सुलभ झाला. तिचा एक हस्तक महालात आधीपासूनच कार्यरत होता. त्याचं नाव होतं पिंगलाक्ष . पिंगल एक तपकिरी रंगाचा काळ्या डोळ्यांचा , जाड भुवयांचा माणूस होता. त्याचा कक्ष शोधणं जरा कठीण होतं. आता स्वेच्छेने अंगावरले उत्तरीय वस्त्र अशा रितिने मस्तकावरून पांघरले, की एखादी दासीच दिसावी. अजून तिचा वधूचा साजशृंगार उतरलेला नव्हता. सकाळचा समय असला तरी महालात उजेड व्हायला थोडा अवधी लागत असे. कुणातरी येणाऱ्या दासीला तिने खालच्या मानेने पिंगलाच्या कक्षाबाबत पृच्छा केली. सांगणाऱ्या दासीने तिला विचारले, " कुणाची दासी आहेस तू ? आणि तू तर इतकी सुंदर आहेस नक्कीच कुणा उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या पदरीच असणार. तो पाहा पिंगलाक्षांचा कक्ष " असे म्हणून तिने दूरवर असलेला एका कक्षाकडे अंगुलीनिर्देश केला. परत खाली मान घालून स्वेच्छा त्या दिशेने जाती झाली. लवकरच ती पिंगलाक्षासन्मुख उभी राहिली. त्याला ती येणार असल्याचे ज्ञात होतेच पण ती इतक्या थोड्या अवधीत येईल याची कल्पना न आल्याने तो विस्मयचकीत झाला आणि म्हणाला, " आपली योजना महाराज्यांच्या खास दासीमध्ये केलेली आहे. ज्यांच्यावर माझंच अधिपत्य असेल. " त्याने तिला तिचा कक्ष दाखवला. आणि तो निघून गेला. त्याला स्वेच्छा गुप्तवार्ता विभागात भूषवीत असलेले पद कोणते आहे याची कल्पना होती. कारण त्याचा संबंध परक्या राज्याच्या त्या विभागाशी होता.

(क्र म शः भाग ७वा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म.. उत्कंठावर्धक आहे कथा. Happy पण गुंतागुंतीची होत चाललीये अन ब-याच दिवसांनी भाग आला म्हणून काही पात्रे विसरायला झाली .

जाई , कृशनन्त , प्रितम, आणि अनघा यांचा प्रतिसादाबद्दल आभारि आहे. लवकरच पुढील भाग पाठवीत आहे.

मिरींडा...तुम्ही एक नोटीस केले का..... तुमच्या लेखनावर प्रतिक्रिया देणार्‍यांची नावेही तुमच्या कथानकाला साजेशीच असतात! Happy

कथानकाला साजेशी, म्हणजे त्यातील पात्रांची जशी नावे आहेत ना तशीच. जशी तुमच्या पात्रांची नावे आहेत ना स्वेच्छा, श्रीपाल, पिंगलाक्ष इ इ.... तर प्रतिसाद देणार्‍यांची नावेही पहा जाई, क्रिश्नंत, प्रीतम, रायबागान.....
Happy

साधीसुधी नाहीत!

ममता हिमानि , पलक, सध्या संतराम तयार नाही. तसेच नवरात्र चालु असल्याने जरा कठीण आहे. पण
" स्वप्नातलं भविष्य " ही तयार कथा आहे ती पाठवीत आहे. बहुतेक आपण वाचली नसेल. तिचा आस्वाद घ्यावा
हि विनंती. बाकी रायबागान यांचाही प्रतिसादाबद्दल आभारी आहे.