सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.
गुंतवणुकीचे कितीही प्रकार असले, आणि शेअर बाजार व म्युच्युअल फंड यांचा बराच बोलबाला असला, तरी सर्वसामान्य गुंतवणूकदार मुदत ठेवींनाच सर्वाधिक प्राधान्य देतात. ठरावीक कालवधीसाठी ठराविक परतावा, गुंतवलेल्या रकमेत कोणतेही चढउतार नाहीत आणि डोक्याला फारशी कटकटही नाही.
या मुदत ठेवींमध्येही अनेक प्रकार आहेत, जसे की, बँकांमधील ठेवी, बिगर बँकिंग कंपन्यांमधील ठेवी, खासगी कंपन्यांमधील ठेवी, पोस्टातील ठेवी, इत्यादी. पोस्टातील तसेच सर्वसाधारणपणे बँकांमधील ठेवी व सुरक्षित समजल्या जातात, शिवाय बँकांमधील रु. १ लाखपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचेही संरक्षण असते.
परंतु बिगर बँकिंग तसेच खासगी कंपन्यांच्या मुदत ठेवींना असे किंवा इतर कोणतेही संरक्षण नसते, त्यामुळे अशा ठिकाणी मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना ठेवीदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
खासगी अथवा बिगर बँकिंग कंपन्यांमध्ये ठेव ठेवताना ती कंपनी चांगली नामांकित आहे का, तिचे व्यादर अव्वाच्या सव्वा नाहीत ना, ती कंपनी ठेवीदारांनी ठेव ठेवावी म्हणून कोणते प्रलोभन दाखवते का, अथवा काही ‘गिफ्ट’ देऊ करते का, इत्यादी गोष्टींचा विचार व्हावा. त्याचबरोबर त्या कंपनीचे पतमानांकन (Credit Rating) काय आहे, तेही आवर्जून पाहावे.
त्यासाठी पतमानांकन म्हणजे नेमके काय ते पाहुया- ज्या कंपनीने जनतेकडून ठेवी गोळा केल्या आहेत, ती कंपनी या ठेवींची रक्कम तसेच त्यावर देण्यात येणारे व्याज ठेवीदारांना वेळेवर देऊ शकेल का, कंपनीचा ताळेबंद, सध्याची आर्थिक परिस्थिती, कंपनीपुढील आव्हाने, भविष्यातील अपेक्षित कामगिरी, इत्यादींचा अभ्यासाद्वारे व विविध मापदंडाद्वारे (Parameters) जो निकष काढण्यात येतो, त्याला पतमानांकन असे म्हणतात. असे मानांकन देणा-या कंपन्यांना ‘Credit Rating Agencies’ असे म्हणतात व त्या ‘सेबी’कडे नोंदणीकृत असतात.
‘सेबी’ ने अशा एकूण सात कंपन्यांना परवानगी दिली असून त्यापैकी विशेषत्वेकरून क्रिसिल, इक्रा व केअर या तीन कंपन्या मुदत ठेवींसाठीही कंपन्यांचे मानांकन ठरवतात. ज्या कंपनीमध्ये आपल्याला मुदत ठेव ठेवायची आहे. तिला वेगवेगळ्या पतमानांकन कंपन्यांनी कोणता दर्जा दिला आहे त्याचा तुलनात्मक अभ्या करून मगच अशा ठिकाणी पैसे गुंतवावेत.
आता पतमानांकन कोणकोणत्या प्रकारचे असते व त्याचा अर्थ काय ते उदाहरणादाखल ‘क्रिसिल’ या कंपनीच्या म्हणण्यानुसार समजावून घेऊ या.
वरील तक्ता पाहिल्यानंतर जर आपण कंपन्यांच्या मुदत ठेवींचे अर्ज तपासले, तर एक गोष्ट लक्षात येईल की, ज्या कंपन्यांना चांगले मानांकन मिळते त्या कंपन्या मुदत ठेवींवर तुलनात्मकदृष्टया कमी व्याज देतात, तर ज्यांचे मानांकन फारसे चांगले नाही, त्या जास्ती व्याज देतात. कंपन्यांनी ठेवीच्या अर्जावर हे मानांकन व त्याचा अर्थ देणे आवश्यक आहे.
ज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत, वा ज्या व्याज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा कंपन्यांची माहिती मध्यंतरी वर्तमानपत्रात आली होती. त्यापैकी काही कंपन्यांचे मुदत ठेव अर्ज मी पाहिले होते तेव्हा असे लक्षात आले की, त्यांनी स्वत:चे मानांकन अर्जावर छापलेच नव्हते, आणि तरीही लोकांनी त्यात पैसे गुंतवले!
मात्र मानांकन पाहून पैसे गुंतवले की झाले, असे नाही. तर ज्या कंपनीमध्ये आपण ठेव ठेवली आहे, तिचे मानांकन दर सहा महिन्यांनी तपासावे आणि आपल्याला काही शंका आल्यास ठेव मुदतीपूर्वीच काढून घ्यावी. यासंबंधीची माहिती कंपनीने न दिल्यास ज्या कंपनीने (क्रिसिल /इक्रा/ केअर, इत्यादी) हे मानांकन दिले आहे त्यांच्याकडे विचारणा करावी. या कंपन्यांच्या संकेतस्थळावरसुद्धा ही माहिती मिळू शकते.
किंबहुना ही माहिती ठेव ठेवण्याच्या आधीसुद्धा घ्या. तुम्ही शेअरबाजारात गुंतवणूक करणारे असा वा नसा, ठेवी गोळा करणा-या कंपन्यांच्या शेअरचा बाजारभावही अवश्य पाहावा. ज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा उल्लेख वर केला आहे, त्या कंपन्यांच्या शेअरचा भाव तोळामासा होता. याशिवाय नेहमीचे तत्त्व म्हणजे कंपन्यांच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास ती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करा. आपल्या गुंतवणुकीचा फेरआढावा घ्या आणि जागरूक गुंतवणूकदार राहा.
- अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत
दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
pacl ने हजारो लोकांचे पैसे
pacl ने हजारो लोकांचे पैसे बुडवलेले आहेत ... बिचार्यांना कधी परत त्यांचे पैसे मिळणार ???
हा लेख वाचुन आधी हेच डोक्यात आल.