गावाकडची दुपार ....

Submitted by अजातशत्रू on 14 June, 2016 - 09:21

गावाकडे उन्हाळ्यातली रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त अशी वृद्ध माणसेच असतात. घरातली गडी माणसे अन धडधाकट बाया बापड्या घराबाहेर असतात. स्वतःचे शेत शिवार आणि तिथं पिकपाणी असेल तर लोक तिथं जातात नाही तर दुसरयाच्या शेतात कामाला जातात.
पाण्याची ओरड वाढलेली असेल तर सरकारी कामावर जातात नाही तर पंचक्रोशीत आसपासच्या शेतशिवारात जातात.

पण घरात उन्हामुळे जीवाची काहिली होते, थकलेली कुठेही जाऊ न शकणारी म्हातारी माणसे या कष्टकरी लोकांची वाट बघत उंबरठ्याकडे डोळे लावून बसतात . रांगणारी तान्हुली त्यांच्या आईबरोबर जातात अन पोरसवदा असणारी चिल्लर पोरे गावातच घरी असतात. ही पिकली पाने या नव्या अंकुरांकडे लक्ष पुरवतात. लाल केशरी, विटकरी, हिरवी पिवळी, नारिंगी, जांभळी विविध रंगातली चेहरयावर सुरकुत्यांचे मखमली जाळी असणारी ही वृद्ध फुले मला कधी म्लान वा कोमेजलेली वाटत नाहीत, त्यांच्यात विश्वनिहंत्याने स्वतःचेच प्राण फुंकलेले आहेत त्यामुळे त्यांचे तेज काही औरच आहे ...

थोडे ऊन, थोडी सावली, थोडी शिरवळ, थोडी शांत हवा तर थोड्या उन्हाच्या झळा सोसत प्रत्येक दुपार अग्निपरीक्षा घेत राहते अन विझलेल्या चुली अन खोल गेलेले रांजणांचे तळ याचे मूक साक्षीदार बनून राहतात.

दारापुढून ओरडत गेलेले लेकरू नाहीतर घरात आलेली शेजारची जीवाभावापेक्षा जास्त असणारी एखादी वृद्धा इतकेच ओळखीचे आवाज असतात. पूर्वी सुया, बिब्बे, पिना, दोरे विकत फिरणाऱ्या कोल्हाटीणी यायच्या त्या आता येत नाहीत. एखादा गारेगार विकणारा मात्र बर्फ खिसत खिसत गल्ल्या पालथ्या घालतो.

वेशीत सगळी रिकामटेकडी मंडळी गोळा होऊन चकाट्या पिटत बसतात नाही तर एखाद्या दिवशी पत्त्यांचा डाव रंगतो. एखाद्या दुपारी कुणाच्या तरी भांडणांचा आगडोंब उठतो, अन सगळा उनाड गाव त्यांच्या दारात येतो नाहीतर घरातली भांडणेच वेशीत येतात. या भांडणातली मजा ओसरली की जो तो पुन्हा आपल्या बिनकामाच्या गुताड्यात गुंतून जातो.

चावडीत निराळीच चर्चा चालू असते. तंबाखू मळत मळत कुणाच्या घरी काय चालले आहे अन कुणाच्या फडात काय शिजतंय याचा सगळा चाखाचोळा दबत्या आवाजात तिथे चालू असतो. मध्येच एखादी मेख हाती लागली की दे टाळी म्हणून मोठा गलका होत राहतो. पुन्हा आवाज बारीक होत राहतो अन पान सुपारीची चंची हलकी होऊन जाते.

देवळाजवळ काही म्हातारी माणसे बसलेली असतात. तिथल्या लिंबाच्या पिंपळाच्या सावलीत बसून गळणारी पाने निरखीत राहतात, पार चवचाल असतो अन चावडी शिंदळकी असते तर देवळाची ओसरी मर्मबंधाची सोबती असते कारण तिथे इतर सर्व ठिकाणांपेक्षा जास्त शांतता असते. देवळात पाकोळ्या देखील त्यांची भिरभिर थांबवून एका कोनाड्यात निजलेल्या असतात. एखादे पोर आज्जी आजोबाच्या मागे हट्ट करून देवळात आलेलं असते ते अगदी बिनसुध झोपी गेलेलं असतं. भोवतालच्या सुकलेल्या झाडांवरची पाखरेही चिडीचूप होऊन गेलेली असतात. आत गाभारयात सकाळी लावलेल्या उदबत्तीचा मातकट ओलसर दर्प आणि सुकून गेलेल्या फुलांचा वेगळाच गंध यांचे तरंग अधून मधून देवळाबाहेरून चालत जाणारया माणसालाही भुलवत राहतो. तिथून चालत जाणारा एखादा अनामिक या वासासरशी पायातल्या वहाणा बाजूला काढतो, उभ्या उभ्या हात जोडतो आणि हळूच काही क्षणासाठी का होईना तिथे आपले बुड टेकतो.

बघता बघता सावल्या लांब होत जातात, अन निरस दुपार सरल्याची पहिली खुण पाखरांच्या गलबलाटाने सगळ्यांच्या चेहरयावर स्मितहास्याने उमटते. सगळं चराचर अंग झटकून जागं होतं अन चुलीच्या पोटातल्या काटक्या पेटून उठतात, मातीने सारवलेल्या जर्मनच्या भांड्यात बघताबघता चहाचे आधण चढते अन दुपार संपल्याचे जणू सगळीकडे जाहीर होते. जिकडे तिकडे नुसती एकच लगबग होते, मावळतीचा सूर्य मिश्किलपणे हसत हसत आपल्या डोळ्यात कललेल्या सांजेचे उधाणलेले रंग साठवत अस्ताकडे जाऊ लागतो...

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2016/02/blog-post_19.html

sameerbapu noon.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम प्रत्ययकारी वर्णन...

( तपशीलात दोन बाबी: सुया बिब्बे,पिना ह्या वस्तू कोल्हाटिणी विकत नसून वैदू स्त्रिया - वैदिणी म्हणत त्याना - विकतात. दुसरे, खेड्यात शेतकरी कुटुम्बात तरी एकदाच चहा सकाळचा. नन्तर नाहीच. दुपारचा चहा नोकरदार, वाणी, सोनार इत्यादि सुखवस्तु घरातच...)

डोळ्यासमोर उभी राहिली दुपार

लाल केशरी, विटकरी, हिरवी पिवळी, नारिंगी, जांभळी विविध रंगातली चेहरयावर सुरकुत्यांचे मखमली जाळी असणारी ही वृद्ध फुले मला कधी म्लान वा कोमेजलेली वाटत नाहीत, त्यांच्यात विश्वनिहंत्याने स्वतःचेच प्राण फुंकलेले आहेत त्यामुळे त्यांचे तेज काही औरच आहे ...>> हे अगदी आवडलं Happy

अगदी टिपीकल...पर्फेक्ट!
डोळ्यासमोर उभे राहिले सगळ!

समीर गायकवाड तुमचे लिखाण भिडते...फार भावते.
लिहित रहा!
पुलेशु!

सुरेख वर्णन! अगदी समोर घडतय असचं वाटतं .:स्मित:

समीर गायकवाड तुमचे लिखाण भिडते...फार भावते.
लिहित रहा!
पुलेशु! >>>>>>>>>>+१११११११११

गावाकडची दुपार मी कधी अनुभवली नाहिये, पण तुमच्या लेखनातून ती डोळ्यासमोर तंतोतंत उभी राहिली.
अप्रतिम लिहिता तुम्ही.
पुलेशु!