श्री संतराम (भाग तिसरा)

Submitted by मिरिंडा on 10 June, 2016 - 07:00

स्वेच्छेशी विवाह म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. याची पंडिताला जाणीव होती. प्रथम तिच्या मातापित्यांची निर्मिती करणं भाग होतं. प्रत्यक्षातले मातापिता इथे आणणं परवडणारं नव्हतं. त्यात कालापव्यय झाला असता. तिला त्याने तशी कल्पना दिली आणि अशी सोय तिलाच करण्यास सांगितले. तिच्या लक्षात आले की पंडित आपला चांगलाच वापर करून घेणार आहे. पण कोणत्याही खेळात प्रविण असलेल्या तिला आपला फायदा करून घेऊन त्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याची आता गरज भासू लागली. जरी याचे काम करीत असलो तरी जास्त लाभदायक जर महाराज असतील तर सोमूचा हात धरून काय हरकत आहे त्यांचा डाव खेळायला . असा विचार तिने केला. पण हा विचार अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याने तिने तो मनाच्या चोरकप्यात सांभाळून ठेवला. पंडिता बद्दल जे जे ऐकले होते ते कितपत खरे होते याची शहानिशा तिने करायचे ठरवले. अर्थातच कालावधी फार कमी होता. साधारणपणे तीनेक दिवसात डावाची सुरुवात व्हायलाच हवी होती. डोक्यातले विचार मुखकमलावर न दिसण्याची तिने यशस्वी कोशिश केली. ती पंडिताला म्हणाली. " आपण आजच्या दिवसात विवाहाची वार्ता पसरवण्याचे पाहावे, तो पर्यंत मी मातापित्यांची निर्मिती करते. " ........ तिने त्याच्या चर्येकडे एकदा पाहिले. कोणतीही प्रतिक्रीया न दाखवता तो म्हणाला, " उलटा डाव खेळण्याचे मनातही आणू नकोस. मी काय करू शकतो हे पाहणं म्हणजे स्वतःचा जीव गमावण्यासारखं आहे. " .... तिने काढता पाय घेतला. पंडिताला असल्या स्त्रिया पायलीच्या पन्नास मिळतात हे माहित होतं. पण तिला कमी लेखण्याची चूक करणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्याने मग टाळ्या वाजवून आपल्या खास दासास बोलावले. वीरदास त्याचं नाव. त्याला तो म्हणाला, " शब्द न शब्द नीट ऐक , चूक तुला फक्त मृत्यूकडे घेऊन जाईल. " तो खालच्या मानेनेच रुकार देऊन मान खालीच ठेवून उभा राहिला. पंडीत म्हणाला, " उत्तम नगरात जा , तिथे श्रीपाल नावाच्या भिक्षुकाचे घर आहे. तो अत्यंत लोभी आहे. जाताना थोडी रत्ने , एक हजार सुवर्ण मुद्रा, फळफळावळ सुगंधी फुलांचा हार घेऊन जा. गेल्याबरोबर त्याला तो हार घालून त्याचा यथोचित सत्कार कर. आणि तू माझ्या आज्ञेने आला आहेस व विवाह कार्य संपन्न करायचे आहे असे विशद कर . तसेच माझ्या संपर्कांतील दरबारी जनांना आपल्या सोबत घेउन येण्यास सांग. मगच परत फीर. त्याला बोलण्याची बिलकुल संधी देऊ नकोस. नाहीतर तो सतरा शर्ती घालील. हो आणि त्याही विनाकारण. " वीरदास पाठ न दाखवता मागे मागे चालत बाहेर पडला. आता पंडिताला जरा स्वस्थता आली.
वीरदास , एक सडसडित बांध्याचा पण चिवट तरूण होता. तो पंडिताने एका दरिद्री कुटुंबाकडून धन देऊन आपलासा केला होता. त्यामुळे तो गुलामासारखा त्याला वापरून घेत असे. वीरदासाला त्याच्या मात्या पित्यांनी सोडताना पंडिताला सुखी ठेवण्यास सांगितले होते. .........आवश्यक त्या चीजा वाहणारे दास त्याने बरोबर घेतले. स्वतः एका शिबिके मध्ये बसला. तो लवकरच उत्तम नावाच्या नगरात पोहोचला. तेव्हा सायंकाल होत होती. सोबत घेतलेल्या दासांकरवी त्याने श्रीपालचे निवासस्थान शोधून काढले. श्रीपालाचा देवडीवरचा दास लांबून त्यांना हेरीत होता. कुणा दरबारी माणसाची शिबिका पाहून आणि ती तिकडेच येत असल्याचे पाहून तो घाईघाईने श्रीपालाच्या बैठकीसमोर हात जोडून उभा राहिला आणि अनुनासिक स्वरात म्हणाला, "महाराज जी , आपल्या भेटीसाठी कुणी दरबारी सरदार दरकदार येतो आहे असे दिसते. आजचा आपला दिन सुदिनच म्हणावयास पाहिजे. म्हणजे सायंकाल म्हणतो मी. " भिक्षुकाला थोडा तवक आला आणि असली सलगी न आवडून तो म्हणाला, " तुझी जागा देवडीवर , येथे बैठकीवर येण्याचे तुज काही कारण नाही. चल नीघ. " निराश होऊन दास मागे फिरला. देवडीवर वीरदास त्याच्या सोबतच्या दासांबरोबर आला होता. शिबिकेतून उतरून उपरण्यात हात लपेटून तो लवकरच श्रीपाल पुढे संमुख झाला आणि त्याने श्रीपालाचा हार घालून व इतर चीजा देऊन यथोचित सत्कार केला. पंडितांची इच्छा त्याने विशद केली . श्रीपालच तो, त्याने आपल्या अनुनासिक स्वरात म्हंटले, " एवढयाने भागणार नाही, हो. सुदेश पंंडित काही लहान सहान आसामी नाही. त्यांचा विवाह म्हणजे महाराजांचा विवाहच. पण दिले आहे त्याच्या पन्नासपट धनाची आवश्यकता आहे. कारण इतक्या कमी काळात दरबारी खासे आणि विवाहाची बातमी पसरवणं हे साधारण कार्य नाही. याची त्यांना कल्पना द्यावी. " मग वीरदास म्हणाला, " आपणास दिलेल्या चीजा आणि धन हे केवळ आपल्या स्वागतासाठी आहे त्याचा विवाह कार्याशी संबंध जोडू नये. योग्य ते धन आपणास दिले जाईल . आपण त्याचा विचार करू नये. ठीक आहे आता आम्हाला निरोप द्यावा. " भिक्षुकाला जास्त बोलण्याची संधी न देता वीरदास शिबिकेमध्ये जाऊन बसला. आलेले सर्व जण लवकरच मार्गस्थ झाले. ....... ‌ श्रीपालला पंडिताच्या कामाची कल्पना होतीच. कारण एखाद चूक ही मृत्यूचे अथवा कायम कारावासाचे कारण होऊ शकेल ही भीती होतीच. त्यामुळे त्याने कपाळावर आलेले घर्मबिंदू अंगावरील उपरण्याने टिपले.
*********** *********************** ************************* **************** **************** ********************* **************** ****************

इकडे स्वेच्छा माता पित्यांची तजवीज करण्यासाठी नगरात फिरत होती. तसं तिचं मातुल घराणं याच राज्यातलं होतं. पण तिकडे जाणं म्हणजे बभ्रा होण्याची शक्यता होती. आता काय करावं याचा विचार करता करता ती नगरातल्या साधारण भागात आली. जिथे सामान्य जनांची वस्ती होती. सायंकाल होण्यास अजून दोन घटिका बाकी होत्या. एका कच्च्या भिंतीच्या घरासमोर ती आली. तिने दरवाज्यावर हाताची मूठ एक दोन वेळा वाजवली. आतून उत्तर न आल्याने ती निराश झाली. वळून ती निघणार तेवढ्यात दरवाज्या उघडला गेला. एक आजी दारात उभ्या होत्या. थोड्या क्रोधाविष्ट दिसल्या, कारण आज सकाळपासून दोन तीन वेळा तरी दरवाजा वाजला होता आणि तो उघडल्यावर बाहेर कोणिही नसल्याने अपशब्द उच्चारित त्या आत आल्या होत्या. जर थांबायला समय नाही तर निदान माणसाने दरवाज्या तरी वाजवू नये. पण आत्ता तसं झालं नव्हतं. बाहेर उभ्या असलेल्या स्वेच्छेला त्या म्हणाल्या, " काय ग, चांगली तरूण दिसतेस आणि वृद्ध माणसांना असा त्रास देऊन काय मिळवतेस ? " सकाळी पण तीच आली असणार असं समजून त्या म्हणाल्या. त्यांनी काही क्षण चांगलेच तोंडसुख घेतले. आत्ता तर तिने त्यांची वामकुक्षी भंग केली होती. तरी बरं आजोबा उठले नव्हते. त्यांनी तर नगररक्षकांनाच पाचारण केले असते. हे सर्व लक्षात घेऊन स्वेच्छा त्यांना मवाळ आणि आपल्या मधाळ आवाजात म्हणाली. " आजीबाई , सुंदरनाथाच्या दर्शनाला निघाले होते. सकाळपासून पायी आल्याने पायांना थोडी विश्रांती द्यावी असं वाटलं . म्हणून आपल्याला त्रास दिला. " का कोण जाणे पण आजीबाईंना हे पटलेलं दिसलं. आणि सुंदरनाथाचं नाव घेतल्याने कन्या कुणाची का असेना , भाविक वाटली. आतल्या अंधाऱ्या जागेमध्ये बाहेरील उजेड जेमतेमच येत होता. मग आजींनी तिचं नाव विचारलं आणि माता पित्यांची ओळखही विचारली. ते ऐकून आजींना आनंद झाला.
कारण आलेली कन्या त्यांच्या दूरच्या नात्यातच होती. अर्थातच आजींनी तिला थोडा अल्पोपाहरही दिला. मग स्वेच्छा आजी स्वस्थ झालेल्या पाहून म्हणाली, " आजी , माझा विवाह ठरलाय. आणि तोही या राज्यातल्या मोठ्या पंडीताशी. आता माता पिता तर दूर आहेत आणि वार्धक्यामुळे ते विवाहास येऊ शकणार नाहीत. मग कन्यादान कोण करणार ना ? माझी अशी इच्छा आहे की ते तुम्ही आणि आजोबांनी करावं."
ती मुद्दामच थांबली आणि तिने आजींचा चेहरा न्याहाळला. आजी म्हणाल्या , " मी इकडे विचारून सांगते हो. "असं म्हणून आजी आत वळल्या.
आजोबांना सांगितलं खरं , पण आतून आजोबांचा चढलेला आवाज आला . " कोणाच्याही बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता. कशावरून ती मुलगी आपल्याला कोणत्यातरी संकटात अडकवणार नाही ? " ......... थोडावेळ थांबून आजी म्हणाल्या," अहो असं कसं होईल , सुंदरनाथ आपलं कुलदैवत , त्याची शपथ घेऊन मुलगी जर सांगत्ये तर खोटं कसं असेल ? तुम्हीच येऊन पाहा, म्हणजे
पावलं. " शेवटी आजोबा बाहेरच्या खोलीत आले. आजोबा एक वाळलेले गृहस्थ होते. पण चांगलेच कणखर वाटले. आजोबांनी पुर्वी महाराजांच्या सेनेमध्ये सेवा केल्याने ते थोडे एककल्ली होते. पण मुलीचा विनय आणि बोलण्यातला गोडवा पाहून आजोबांनी रुकार दिला. मात्र ते म्हणाले , " आम्हाला काय करावं लागेल ? " स्वेच्छा म्हणाली, " आजोबा तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जाणारी शिविका येईल , त्यात आपण दोघांनी बसून यावं. कपडेलक्ते, जड जवाहीर आणि इतर सगळंच आपल्याला रात्री पुरवलं जाईल. फक्त उद्या लवकर उठून तयार व्हावं लागेल. बदल्यात आपल्याला राजधानी सारख्या नगरात राहण्यासाठी खास असा छोटेखानी महाल मिळेल. मग मी येऊ आता ? सुंदरनाथाचं दर्शन तरी व्हायला हवं नाही का ? " ......... आजोबा बघत राहिले, पण त्यांना तिचा कुणाशी विवाह होणार आहे हे न सांगता, ती निघाली आणि एकदाची बाहेर पडली. आजोबांच्या लक्षात आलं , की आपण तिचा कोणाशी विवाह होणार आहे हेही न विचारल्यामुळे त्यांना रुखरुख लागली. वार्धक्याचा परिणाम दुसरं काय . स्वेच्छा बाहेर पडली खरी , पण तिला कसलाही संशय आला नाही. तिच्या मागावर सोमू असल्याचं तिला लक्षात आलं नाही. आता ही कुठे जाते , हे पाहून महाराजांच्या कानावर हे सगळं घालण्याचं सोमूने ठरवलं. अजून त्याच्या हस्तकांकरवी येणाऱ्या माहितीचा पण विचार करणं भाग होतं. सुंदरनाथाला जाणं हा स्वेच्छेचा केवळ बहाणा होता. त्यामुळे आजी दारात निरोपासाठी उभ्या होत्या तोवर तिने सुंदरनाथाचा मार्ग कापला, पण एका वळणावर तिने थोडा समय वाया घालवून ती आल्या मार्गाने पंडिताच्या निवासस्थानी निघाली. सोमूला आश्चर्य वाटलं. अजून त्याला तिचा हेतू समजत नव्हता. मग त्याने आपले काही हस्तक ज्या घर स्वेच्छा गेली होती तेथे पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्वेच्छा ज्याअर्थी पंडिताच्या निवासस्थानी जात आहे त्याअर्थी काहीतरी वेगळ्याच प्रयासात पंडीत असणार हे सोमूने ओळखले. आणि तो स्वतः तिच्या मागावर राहिला. पंडिताच्या निवासस्थानी त्याने स्वतःचा असा एक खास हेर द्वाररक्षक म्हणून नेमला होता. त्याला फक्त मूक असल्यासारखे वागायला सांगितले होते. त्याची ही करूण अवस्था पाहूनच मुख्य द्वाररक्षण अधिकाऱ्याने त्याला सेवेत अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामील करून घेतले होते. स्वेच्छा लवकरच पंडिताच्या
शयन कक्षाकडे जाती झाली. खरंतर तिने या प्रहरी पंडिताच्या शयनकक्षाकडे वळणे योग्य नव्हते, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी सूर्योदयाला धरून मुहूर्त ठरवल्याने तिला व्यवस्थेची कल्पना पंडिताला देणे आवश्यक वाटले. .......................................................................पंडित नुकताच मंचकावर पहुडला होता. अजून शेजारच्या राज्यातून तिकडच्या मुद्रा घेऊन येणारा माणूस येथे न पोहोचल्याने तो अस्वस्थ होता. विचारात मग्न असलेल्या पंडिताला अचानक आलेल्या रक्षकाला पाहून थोडा क्रोध आला. पण त्याने विवेक केला, कारण शेजारच्या राज्यातून मुद्रा आलेल्या असण्याची शक्यता होती. पण आलेल्या रक्षकाने स्वेच्छा आल्याची वर्दी दिली. त्याला ते फारसे आवडले नाही. लगेचच आत येणाऱ्या स्वेच्छेला पाहून तो थोडा मोहात पडला. ..... तिची आकर्षून घेणारी देहयष्टी पाहून त्याला तिला आत्ताच भोगावेसे वाटले. कारण विवाह केवळ एक राजकीय खेळ होता. तरीही तो विवाह होता. मग पत्नीकडून सुखाची अपेक्षा करायला काय हरकत आहे असे त्याला वाटू लागले. आणि हे आत्ताच करणे आवश्यक होते . विवाहानंतर लगेचच ती पलायन करणार होती. त्याच्या एकूणच मुद्रेवरून स्वेच्छेने त्याचा विचार ओळखला. आता मात्र तिला आपण नसतो आलो तर बरे झाले असते असे वाटू लागले. पण ती स्वेच्छा होती. कमरेला असलेला खंजीर तिने एकवार चाचपून पाहिला आणि आवश्यकतेनुसार तो उपयोगात आणण्याचे ठरवले. छद्मी हासत पंडित म्हणाला, " ये, लवंगलतिके, तुझेच स्मरण करीत होतो. " मंचकावरून उठून त्याने मग तिच्या हाताला स्पर्श केला. एकीकडे डोळ्यांतील निग्रह कायम ठेवित ती जेमतेमच हासून म्हणाली, " अजून विवाह झाला नाही, पंडितजी. मी फक्त हेच सांगण्यास आले आहे की मातापित्यांची निकड मी भागवली आहे. उदईक ब्राह्ममुहूर्ती शिबिका पाठवून त्यांच्या आगमनाची व्यवस्था आवश्यक चीजवस्तूंसहित आपणासच करावयाची आहे. कशी ते आपणास सांगण्याची आवश्यकता दिसत नाही. " असे म्हंटल्याबरोबर पंडिताने तिला खसकन ओढली आणि म्हंटले , " अशी कशी जाशील ? इथे माझ्या आज्ञेखेरीज काहीच हालत नाही. " आपल्या बाहूंमध्ये घट्ट धरण्याचा प्रयत्न त्याने केला. तिचा स्पर्श आणि ऊष्ण स्वास यांखेरीज त्याल कशाचाही लाभ झाला नाही. स्वेच्छेने जवळचाच खंजीर उपसून त्याच्या कमरेला टोचेल अशा रितीने धरला आणि म्हणाली, " पंडितची हा विवाह एक राजकीय खेळ आहे, यापेक्षा जास्त असा वैवाहिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केलात तर खंजीर आत घालून आतडी काढण्यास ही स्वेच्छा मागेपुढे पाहणार नाही. " असे म्हंटल्यावर तिला त्याने सोडले...........
त्यावर ती म्हणाली, " मी प्रत्येक हालचाल विचार करूनच करते. माझ्या मागेही कोणीतरी आहे हे लक्षात ठेवावे. " त्यावर तो काहीच बोलला नाही. आत्ता जर आपल्या पुढे राजकीय खेळी नसती तर हिला बटकी बनवलीच असती. .......

(क्र म शः भाग ३रा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users