बोट - व्यसनं

Submitted by स्वीट टॉकर on 2 June, 2016 - 04:18

फार पूर्वी, जेव्हां बोटी फक्त शिडाच्या होत्या तेव्हांचा काळ. इंग्लंडच्या बोटी (Her Majesty’s Ships) जगभर फिरायच्या खर्या, पण त्यांच्यावर काम करायला खलाशी सहजासहजी मिळत नव्हते. खलाशांचं आयुष्य फारच खडतर असे. गोडं पाणी अतिशय मर्यादित. शीतकरण नसल्यामुळे आहारात थोडेच पदार्थ. रोज रोज तेच तेच. वार्यावर अवलंबून असल्यामुळे पुढच्या बंदराला पोहोचायला किती काळ लागेल काही सांगता येत नसे. काम अंगमेहनतीचं आणि जोखमीचं. वादळांचा धोका कायमच डोक्यावर. बोटी बुडण्याचं आणि खडकांवर आपटून फुटण्याचं प्रमाण बर्यापैकी. वर कित्येक सफरींमध्ये तर सत्तर टक्के खलाशी स्कर्वी (scurvy) ने मेल्याची नोंद आहे.

अधिकारी वर्ग स्वतःहून यायचा पण खलाशांना मारून मुटकून जमवायला लागायचं. असे लोक जमवून देणारे एजंट्स असंत. बोट इंग्लंडमधून निघायची वेळ झाली की ते रस्त्यारस्त्यात फिरून दारू पिऊन झिंगून पडलेल्या लोकांना उचलून सरळ बोटीवर आणून टाकत. नशा उतरेपर्यंत बोट बंदरातून निघालेली असे. मग सुटका नसे. सुरवातीला त्यांची स्थिती जवळजवळ कैद्यासारखीच असे. फरक एवढाच की त्यांना रोज दारू दिली जायची. हळुहळु रुळत.

तर आम्हा दर्यावर्दी लोकांचा असा हा उत्तुंग वारसा!

पुढे तांत्रिक प्रगती होत गेली खरी, पण दारू आणि सिगरेट पिणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार काही नाहिसा झाला नाही. साधारण साठीच्या दशकात नाविक कंपन्यांनी या सवयींवर अंकुश लावण्याचं धारिष्ट दाखवायला सुरवात केली. याचं कारण असं की अपघातानंतर केलेल्या विश्लेषणातून असं दिसायला लागलं की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ड्रग्स वा अल्कोहोलचा त्यांच्याशी संबंध आहे.

पहिला घाव ड्रग्सवर पडला आणि तो लगेचच यशस्वी झाला कारण या नशावीरांचं प्रमाण अगदी कमी होतं आणि पूर्वीपासूनच बाकीचे यांच्याकडे तुच्छतेनेच बघायचे. लपूनछपून कोणी सेवन करत राहिले असतील का? याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. याचं कारण असं की बोटीवर गुपित नावाची गोष्ट नसतेच. कॅबिन्स एकमेकाला चिकटून. काम करणं, जेवणखाण, ट्रेनिंग, मौजमस्ती, बाहेर जाणं, पिक्चर बघणं, सगळं एकत्र. एखादा डोस चुपचाप घेता येईल देखील, पण त्यानंतरचे नशीले डोळे सगळ्यांना दिसतीलच.

शिवाय दर आठवड्याला इन्स्पेक्शन असते. सगळ्या खोल्यांमध्ये कॅप्टन, चीफ इंजिनियर, चीफ ऑफिसर आणि बोसन (खलाशांचा म्होरक्या) चक्कर मारतात. बेकायदेशीर वस्तू तर सोडूनच द्या, खोलीत पसारा असला तरी त्याला धारेवर धरलं जातं.

बोटीवरचा माल आणि खुद्द बोट ह्यांचा इन्शुरन्स असावाच लागतो. तो असल्याशिवाय बोटीला बंदरातून बाहेर पडायला परवानगीच मिळत नाही. (बाहेर पडायलाच कशाला, आत यायला सुद्धा.) जसजसं प्रत्येकच बिझनेसमधील खर्चांकडे जास्त काटेकोरपणे पाहिलं जाऊ लागलं तसंच इन्शुरन्सदेखील. एखादा अपघात झाला आणि त्यात अल्कोहोलचा काही हात आहे अशी शंका आली की इन्शुरन्स कंपन्या पैसे द्यायला कां कूं करायला लागल्या.

शंकाच का? खात्री का नाही? याचं कारण असं की एखादा अपघात झाला की बोट समुद्रात असल्यामुळे विश्लेषण करण्यासाठी कोणी तज्ञ तिथे लगेच पोहोचण्याचा प्रश्नच नाही. कॅप्टन आणि चीफ इंजिनियरच ती जबाबदारी सांभाळणार! ते स्वतःच मदिराभक्त असले तर त्यांच्या अहवालात ते कशाला अल्कोहोलला दोष देतील? म्हणून शंका.

एकदा पोलंडमध्ये एक किस्सा झाला होता. आमच्या कंपनीच्या एका बोटीवर बोट ग्दांस्क (Gdansk) बंदरात असताना काही अपघात झाला. नशिबानी कोणालाही इजा झालेली नव्हती, पण मशिनरीचं बर्यापैकी नुकसान झालं होतं. बंदरात असताना काहीही अघटित घटना घडली की बंदरातील सेफ्टी ऑफिसरला कळवलं पाहिजे हा सगळीकडेच रिवाज असतो. त्याप्रमाणे कळवलं. लगेचंच त्यांच्या कोस्ट गार्डची (Coast Guard) टीम विश्लेषण करायला आली. ज्या दोन व्यक्तींमुळे तो अपघात झाला होता त्यांची breathalyzer चाचणी केल्यावर त्यांच्या श्वासात मर्यादेच्या दुप्पट अल्कोहोल असल्याचं आढळून आलं. त्या दोघांनी असा दावा केला की breathalyzer मशीन व्यवस्थित काम करीत नाही. Breathalyzer टेस्टला जर ग्राह्य धरायचं असेल तर त्या मशीनला दर वर्षी प्रयोगशाळेत कॅलिब्रेट करून घ्यावं लागतं. तसं कोस्ट गार्डनी केलेलं नव्हतं. मग त्या टेस्टला ग्राह्य धरण्यासाठी कोस्ट गार्डनी असं ठरवलं की बोटीवरच्या सर्वांची टेस्ट करावी म्हणजे हे सिद्ध होईल की जे प्यायलेले नाहीत त्यांचं रीडिंग व्यवस्थित दाखवत आहे. आश्चर्य म्हणजे सगळ्यांचंच अल्कोहोल कमीअधिक प्रमाणात मर्यादेच्या बाहेर! कोस्ट गार्डच्या वरिष्ठ अधिकार्यांना हे कळवल्यावर त्यांनी असा तोडगा काढला की कोस्ट गार्डची जी टीम विश्लेषण करायला आली होती त्यांचीच टेस्ट करावी. त्यांचं रीडिंग तर नक्कीच मर्यादेत असेल. तर ते टाळाटाळ करू लागले. कारण उघडच होतं. बोटीवर काहीही विश्लेषण वा कारवाई न करता टीम परत गेली. परत गेल्यावर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर काय कारवाई केली बोटीवरच्या लोकांना माहीत नाही. पण अंदाज मात्र आला. कारण दुसर्या दिवशीपासून बोटीच्या मागे इन्स्पेक्शन्सचा ससेमिराच लागला. निघेपर्यंत रोज कोणता ना कोणता इन्स्पेक्टर बोटीवर येऊन (कधी हेल्थ, कधी कस्टम्स तर कधी प्रदूषण) त्रास देत असे.

सांगायचा मुद्दा काय, तर तेव्हां नुसते बोटीवरचे खलाशीच नव्हे, तर बोटीशी संबंध असलेल्या सगळ्यांमध्येच दारूला राजमान्यता होती. शिवाय ‘Fools of the family go to sea.’ असा वाक्प्रचार रूढ होता आणि काही प्रमाणात खरा देखील. या दोन वस्तुस्थितींचं साटंलोटं छान चाले. एखादा मनुष्य बोटीवर काम करतो म्हटल्यावर तो सिगरेट ओढत असणार आणि दारू पीत असणार असं आपण म्हणू शकंत होतो.

ही परिस्थिती बदलण्याचं कारण पूर्णपणे कमर्शिअल होतं.

जी कंपनी बोट भाड्याने घेते तिला चार्टरर (charterer) म्हणतात. त्यांनी जगभरच्या कित्येक कंपन्यांचा ‘इतका इतका माल या तारखेपर्यंत या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत पोहोचवून देवू’ असं कंत्राट घेतलेलं असतं. ही कंपनी बोटी कधी एका सफरीकरता किंवा अमुक काळासाठी भाड्यानी घेतात. भाड्यानी घेण्याआधी ती बोट, त्यावरील लोक, बोटीचा मालक, त्याची कार्यपद्धती, बोटीची परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा शहानिशा केल्याशिवाय ते कसा आपला मौल्यवान माल त्या बोटीवर लादणार? त्यातून तेलवाहू बोटींवर आगीचा धोका जास्त आणि जर काही कारणानी हे तेल पाण्यात सांडलं तर प्रचंड प्रदूषण! त्यामुळे ते कित्येक बोटींचं इन्स्पेक्शन करतात. त्यांना मार्क देतात. त्या मार्कांच्या आधारावरच ती बोट घ्यायची की नाही, घेतली तर त्याला किती भाडं द्यावं वगैरे अवलंबून असतं. त्यांनी अशी पद्धत सुरू केली की ज्या बोटीवर दारुबंदी असेल त्यांना बोनस मार्क द्यावेत. आमदनीवर थेट परिणाम होणार म्हटल्यावर लगेचच बोटीच्या मालकांनी कल्पना उचलून धरली. पूर्वी बोटीच्या Tax Free स्टोअरमध्ये स्कॉच व्हिस्की वगैरे शेकड्यांनी असायच्या ज्या आम्ही विकत घ्यायचो. आणि रिचवायचो.

गेले ऽऽऽ तेऽ दिन गेऽऽलेऽऽ.

दारू बंद झाल्यावर कित्येक लोकांनी नोकर्या सोडल्या. कित्येकांच्या गेल्या. याचं कारण बोटींवर Unannounced Drug and Alcohol Tests नियमितपणे घेतल्या जातात. तो आता क्वॉलिटीचा अविभाज्य भाग बनलेला आहे.

सिगारेटींची कमी जास्त प्रमाणात तीच अवस्था झाली. पूर्वी कोणीही कुठेही कितीही फुंकू शकत असे. त्यावर निर्बंध आले. तेलवाहू जहाजांवर तर बंदरात असताना सबंद बोटीवर एक किंवा दोन खोल्या निर्धारित केलेल्या असतात (त्यांना स्मोक रूम म्हणतात) जिथे सिगारेट ओढायला परवानगी असते. आपापल्या केबिनमध्ये देखील ओढलेली चालत नाही.

मारून मुटकुन का होई ना, लोकांच्या सवयी सुधारल्या. आता मात्र तराजू दुसर्या बाजूला कलला आहे. म्हणजे काय?

जमिनीवर राहाणारा कोणताही मनुष्य आपल्या खाजगी वेळेत काय करतो ह्याबद्दल आपण ग्वाही देऊ शकत नाही. रात्री दारूच्या गुत्त्यावर गेलेला असो किंवा सट्टा खेळलेला असो. सकाळी कामावर वेळेवर आला म्हणजे झालं. मात्र बोटीवरचा खाजगी वेळ खर्या दृष्टीनी खाजगीच नसल्यामुळे त्या खलाशाच्या सवयींबद्दल मात्र आज आपण ग्वाही देऊ शकतो.

याच व्यसनांच्या भीतीनी पूर्वी मुलीचा बाप दर्यावर्द्याला जावई करून घ्यायला तयार नसे. आज ती परिस्थिती राहिली नाही पण आता मुलीच बोटीवर भटकू इच्छित नाहीत. त्या कारणांबद्दल पुन्हा कधीतरी बोलू.

तात्पर्य काय, तर सवयी सुधारून सुद्धा बिचार्या खलाशांची वैवाहिक आबाळ चालूच आहे.

बोटीवरच्या आधीच्या लेखांच्या लिंक्स
http://www.maayboli.com/node/52087
http://www.maayboli.com/node/56300
http://www.maayboli.com/node/56385
http://www.maayboli.com/node/56993
http://www.maayboli.com/node/58138

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेखमाला आहे.

सवयी सुधारून सुद्धा बिचार्या खलाशांची वैवाहिक आबाळ चालूच आहे. >>> रिग वर काम करणार्‍यां मधे तरी अशी परिस्थीती नाही. त्यात २८ दिवस रोटेशन असल्यामुळे बाजारात त्यांना चांगलीच मागणी आहे.

रिगवर काम करणार्यांना खलाशी म्हणणं अवघड आहे. नियमित आणि ठरलेले दिवसंच घरापासून दूर राहातात. त्यामुळे मुलांना एका हाती वाढवावं लागलं अशी वेळ साधारणपणे त्यांच्या बायकांवर येत नाही. वादळं, चाचे वगैरे त्यांना सोसावे लागत नाहीत. जेवणाचा किंवा पाण्याचा तुटवडा झाला असं कधी होत नाही.

अर्थात त्यांना काही वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल. नाहीतर सगळेच रिग्सवर दाखल झाले असते.

Pages