रस्त्यावरची वाढती असहीष्णूता

Submitted by घायल on 12 December, 2015 - 10:12

जवळपास बहुतांश मोठ्या शहरांमधे वाहतुकीला शिस्त नाही. पुण्यासारख्या ठिकाणी तर बेशिस्तीने कळस गाठलेला आहे. दिल्लीत तर विचारू नका. पण एक फरक जाणवतो. तो म्हणजे दिल्लीत एव्हढी बेशिस्त असून रस्त्यावर भांडणे चालू आहेत हे दृश्य फारसं दिसत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांमुळे तारांबळ उडते. गर्दीच्या वेळी एकंदरच युद्धाचे वातावरण असते.

पुणे आणि अन्य काही शहरात अगदी सुशिक्षित दिसणारे लोकांच्या बाबतीत देखील दुस-याची चूक दिसताच त्याचा उद्धार करण्यातून रस्त्यावर तू तू मै मै सुरू होते हे दृश्य नेहमी दिसते. त्याचा शेवट कसा होतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण एखादी पार्टी उक्ती पेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारी असेल तर मात्र प्राणाशी गाठ येते. त्यातून ज्याने भांडण उकरून काढलं तो माघार घेणार नसेल तर बाका प्रसंग उद्भवताना दिसतो.

एरव्ही मित्रांशी, आप्तांशी सहका-यांशी हसून खेळणारे बोलणारे आपल्यातलेच लोक रस्त्यावर का एव्हढे हिंस्त्र होतात ? लोक रस्त्यावर आल्यानंतर इतके असहीष्णू का होत असतात ? काही बोलून संताप व्यक्त करतात तर काही वेडेवाकडे वाहन चालवून. एखाद्याला रागाने कट मारणे हा ही त्यातलाच प्रकार. पादचारी रस्त्यावरून चालतो म्हणून त्याच्या जवळून जाताना "कळत नाही का, दिसत नाही का " असे प्रश्न विचारून पसार होणे हा ही त्याचाच प्रकार आहे.

रहदारीत डोकं शांत ठेवायच्या ऐवजी लोक असे का वागतात ?
शासन काय करू शकते ? सामाजिक संघटना, पक्ष कार्यकर्ते याकडे लक्ष देऊ शकतील का ? सर्वांच्याच जिवाशी खेळ असल्याने यावर काही उपाय असू शकतो का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहंकार!
ड्रायव्हिंग करताना चार शिव्या हासडणे, रस्त्यावर दादागिरी करणे, ट्रेनमध्ये आपल्यात भांडायची धमक आहे हे दाखवणे वगैरे वगैरे खूप भारी असल्याचे लक्षण समजले जाते.
समजूतदारपणा हा मिळमिळीतपणा समजला जातो इथे.
आपण समोरच्यावर नाही चढलो तर तो आपल्यावर चढणार, इथे असेच वागलो तर तग धरू शकू असा समज असतो लोकांचा.
आणि मग या समजाने सगळेच तसे वागतात, आणि त्या अनुभवांनी समज पक्का होत जातो.
शांत स्वभावाचे समजूतदार लोकंही मग कळत नकळत हाच मार्ग स्विकारतात.
एखाद्या शहराची मग हळूहळू तीच ओळख तीच संस्कृती बनू लागते.
बाहेरून आलेलाही मग तिथे तसे अनुभव घेत तसाच वागू लागतो.
हे चित्र सहजी बदलणार नाही. जोपर्यंत सर्वच स्तरातून एकाचवेळी या वृत्तीचा विरोध होत समजूतदारपणाचा पुरस्कार होणार नाही. हे मग बरेच कठीण आहे.

१.वाहत्या रस्त्यात एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी दोन दुचाक्या संथ पॅरलल मधे चालविणे.
२. अरुंद रस्त्यात गाडी बाजुला थांबवुन खरेदीला जाणे किंवा कोणाची वाट पाहणे.
३. लकडी पुलावरुन किंवा दांडेकर पुलावरुन बायकोला गाडी चालवायला (गाडी थांबवुन) शिकवणे
४. गाडी थांबली असताना पुढच्या आणि मागच्या गाडीत ६ ते ९ इंच अंतर असताना दुचाकी आडवी करुन त्यातुन जायचा प्रयत्न करणे.
५. सिग्नल ग्रीन व्हायच्या ५ सेकंद आधी (लाल असतानाच) जाणे.
हे बंद करा. बक्कळ सहिष्णुता मिळेल सगळयाना.

६. सिग्नलला थांबलेले असतना पुढचा केवळ २-३ फुट मागे उभा आहे म्हणून त्याला जोरजोरात होर्न वाजवुन गाडी २-३ फुट पुढे उभी करण्यास भाग पाडणे
७. डीवायडर नसलेल्या रस्त्यात सिग्नल लागलेला असतना दुस-या बाजु रस्त्याने अतिक्रमण करुन सगळ्यात पुढे जाउन थांबणे
८. असे करण्या-यांची त्या दुस-या बाजुच्या रस्त्यावर नवीन लेन तयार करणे
९. कोणी असे करताना तुम्हाला अडवल्यास त्याच्या खांदानाचा उद्धार करणे आणि हॉर्न वाजवुन त्याला बाजुला होण्यास भाग पाडणे
१०. एवढे करुन तो ऐकत नसेल तर सरळ पायाने त्याची मोटरसायकल बाजुला दाबुन आपली मोटरसायकल मधे घालणे
ई.ई.

११. पादचार्‍यांना सरकार आणि वाहनचालक ह्या दोघांनीही कस्पटासमान वागवणे.
बर्‍याच रस्त्यांना फुटपाथ नसणे, असले तरी ते दु:स्थितीत, अतिक्रमण झालेले असणे, क्रॉस करण्यासाठी योग्य सुविधा नसणे ( तुरळक ठिकाणी असलेले ओव्हरहेड ब्रिज हे सुविधांमध्ये येत नाहीत. शिवाय सिग्नल ठीकठाक पाळले जाणार्‍या ठिकाणी ते उभारणे म्हणजे तर विनोदाचा कळस आहे. )
रस्ता क्रॉस करणारा दिसल्यावर वेग कमी करण्याऐवजी वाढवणे, सिग्नल सुद्धा न पाळून पादचार्‍यांना क्रॉस करु न देणे ह्यासारखे गंभीर अपराध बरेच वाहनचालक करतात.

पादचार्‍यांनीही काही नियम, संकेत पाळायची गरज असते. वरच्या गोष्टी कधी सुधारल्याच तर त्याबद्दलही बोलता येईल.

११. कोरोलरी Light 1 : मोकळ्या असलेल्या आणि ही मोटरसाकयल दोन मिनीटात गेल्यावर कधीही आरामत पार करता येण्याजोग्या राष्ट्रीय महामार्गावर ८० च्या वेगाने जाणा-या मोटरसाकलसाठी बायको थांबलेली आहे हे बघुन मागुन येणा-या नव-याने तिला हाताला धरुन जबरदस्ती त्या भरधाव मोटरसायकलच्या समोरुन आरामात चालत चालत रस्ता ओलांडायला शिकवुन मी किती शुर आणि तू काय बावळटासारखी थांबली होतीस असा लुक देणे + हातवारे करणे.

चुकीच्या बाजूने भरधाव हायबीम लावून जाणे आणि समोरून जाणाऱ्या कशाबशा अपघात चुकवलेल्यानी काय आहे वगैरे खुणा केल्यास त्यांना दुप्पट मोठे डोळे करुन काय म्हणून दटावणे

हायबीम... हे राम.. पूर्ण प्रकाशमय रस्त्यावर हॅलोजन लाईट्सचे हायबीम लावून भरधाव जाणे.

>>७. डीवायडर नसलेल्या रस्त्यात सिग्नल लागलेला असतना दुस-या बाजु रस्त्याने अतिक्रमण करुन सगळ्यात पुढे जाउन थांबणे
८. असे करण्या-यांची त्या दुस-या बाजुच्या रस्त्यावर नवीन लेन तयार करणे>>

नळस्टॉप चा चौक डोळ्यासमोर उभा रहिला लगेच. लॉ कॉलेज कडून येणारे लोक असे दुसर्‍या बाजूला जाउन उभे रहायचे आणि मग म्हात्रे पुलाकडून लॉ कॉलेज ला जाणारी बस आली कि भर चौकात उभी रहायची. पोलीस जवळच उभा असायचा पण तो खांदे उडवायचा!

लोक लाल सिग्नलला उभे असताना तो हिरवा होण्याआधी हॉर्न का वाजवतात? भर गर्दीच्या मध्यभागी असताना, पुढे १०० वहाने आहेत जी हलल्या शिवाय आपल्याला इंचभरही हलता येणार नाही हे दिसत असतानाही वाजवतात. त्यांच्या हॉर्न वाजवण्याने सिग्नल लवकर हिरवा होईल असं वाटतं का ?

तसं नसतं ते , मागच्या लोकांना वाटतं की पुढचा तंबाखु मळत टाईमपास करतोय म्हणुन ते त्याला भानावर आणण्याचं सत्कृत्य करत असतात.

काही वर्षांपूर्वी आळंदीच्या जवळपासच्या परिसरात तसेच अन्यत्रही एक गोष्ट आढळायची, चुकीच्या पद्धतीने येणा-या वाहनचालकाला लोक "माऊली " अशी हाक मारायचे. त्यामुळे तो वाहनचालकही वरमून चूक सुधारायचा, माफ करा म्हणायचा. अलिकडे हे दृश्य दुर्मिळ होत चाललेय. इथे पण आता " ए दिसत नाही का" ऐकू येऊ लागले आहे.

दुसरा प्रकार म्हणजे मला एकट्यालाच सगळे कळते या वृत्तीतून येणारा रस्त्यावरचा ऑरोगन्स पण भांडणाला कारणीभूत होत असतो. अनेकदा पाठीमागचे वाहन हॉर्न देतेय म्हणजे तो बिनडोकच असणार या ग्रहातून अत्यंत त्रासिक आर्विभावात हात बाहेर काढून क्वेशन मार्क करणे किंवा हाताने झुईंं अशी खूण करून वरून जा असे सुचवणे हे त्या वाहनचालकाला अरे मूर्खा कळत नाही का असे विचारण्याइतकेच असहीष्णू असते. ते वाहन डावीकडून मधेच घुसलेल्या कुणाला तरी हॉर्न देत असू शकते किंवा अन्य ब-याच गोष्टी असतात.

काही दिवसांपूर्वी शामराव कलमाडी कॉलेज कडून येऊन एरंडवण्याच्या रस्त्याला येणारा जो सिग्नल आहे तिथे पाहीलेला प्रसंग.

एक कारवाला या रस्त्याने येऊन अलंकार पोलीस चौकीच्या दिशेने जाण्यासाठी मधल्या चौकात येत होता. त्याला सिग्नल होता. पण पवित्रा हॉटेलकडून सरळ येणारी वाहने सिग्नल न जुमानता सरळ चालली होती. त्याने सिग्नल दिला तर पुढच्या दुचाकी वरील एकाने आधी क्वेश्चन मार्क केला, नंतर रस्त्यात भर चौकात वाहन थांबवून " काय हॉर्न देतात ?" अशी विचारणा केली. मग बाचाबाची सुरू. कारवाल्याचे म्हणणे " तुला सिग्नल तोडून चाललेली बाहनं दिसत नाहीत का ?" तर याचे एकच " अहो पण म्हणून हॉर्न ? कैच्याकै ?" दोन्ही बाजूंनी गर्दी तुंबलेली. याचा शेवट अलंकारीक भाषेत एकमेकांचा उद्धार करण्यात झाला हे सांगायला हवेय का ?

आपल्याला नियम समजतात याचा दुराभिमान हे पण वादावादीचे कारण होत चाललेय. मुळात आपल्याला कुणाला वेडावून दाखवायचा, जाब विचारायचा हक्क आहे काय ? आपण अथॉरिटी आहोत का ? पूर्वी लोक ऐकून घेत, पण आता त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात.