सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व

Submitted by Rajesh Kulkarni on 1 December, 2015 - 12:53

सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व
.
अरोरा नावाचे पुण्यातल्या कॅंपातले गृहस्थ पूर्वी मोटीव्हेशन करणारे एकपात्री कार्यक्रम करत. कंपनीतील कर्मचा-यांसाठी हे कार्यक्रम असत.

नावे लक्षात ठेवण्यात काही अडचण येत असेल तर एखादे नाव एखाद्या संदर्भाला जोडून लक्षात ठेवावे, म्हणजे ते सहसा विसरत नाही अशी युक्ती त्यांनी सांगितली होती.. मी त्यांना विचारले, परंतु तो संदर्भच विसरला तर काय करायचे? त्यावर ते निरूत्तर झाले. गंमत म्हणजे आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ही युक्ती सांगितली जाते. नाही म्हटले तरी त्यात थोडे तथ्य आहे, पण तो काही अशा सवयीवरचा पूर्ण उपाय होऊ शकत नाही.

काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, म्हणजे ताजेतवाने वाटते असे त्यांनी सांगितल्याचे आठवते.

त्यांच्या कार्यक्रमात दृष्टीभ्रमाची काही चित्रे दाखवण्याचा एक भाग असे. एका चित्रामध्ये दोन चित्रे समाविष्ट असतात. एकदा एखाद्याच्या नजरेला एक चित्र दिसले, की सहसा दुसरे चित्र डोळ्यांसमोर येत नाही. फार अवघड जाते. पण त्यांनी दाखवलेल्या एका चित्रातली दोन्ही चित्रे माझ्या मित्राला दाखवता आली तर हे महाशय थोडे चिडले. अस्वस्थ झाले. म्हणून त्यांनी तावातावाने आणखी एक चित्र दाखवले, तेव्हा त्यातली दोन्ही चित्रे मला दिसली. त्यामुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.

आमच्या कंपनीसाठी तो कार्यक्रम करेपर्यंत कितीतरी हजार लोकांना मोटिव्हेट (प्रेरित) केले, अशी त्यांची जाहिरात असे. तरीही आमच्यासाठीच्या सत्रामध्ये तीन-चारवेळा असे झाल्यामुळे त्यांना याआधी खरोखर असे अनुभव आलेच नव्हते का, असे वाटले. की त्यांच्या अनुभवाची त्यांची जाहिरातच बोगस होती कोणास ठाऊक. अखेर जेथे लोकांशी थेट संपर्क होत असतो, अशा कार्यक्रमांमध्ये असे आणीबाणीचे प्रसंग येणारच. पण तरीही तुम्ही किती लगेचच सावरता यातले तुमचे कौशल्य महत्त्वाचे असते. तेथे अनुभवास आलेले अडचणीचे प्रसंग तुम्ही मनाला फारच लावून घेतले तर पुढच्या कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होणारच.

आजही वर्तमानपत्रात अधूनमधून त्यांची जाहिरात दिसते. असो.

या निमित्ताने आणखी एक प्रसंग आठवतो.

बी.एड.च्या लेसनसाठी उमेदवारांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाठ घ्यावा लागे. एका वर्गातल्या मुलांना त्याचा विषय आधीच कळला होता. चहा. प्रस्थापित दंडकांप्रमाणे थेट विषयाला हात घालायचा नसतो. त्यामुळे या शिकाऊ शिक्षकांनी विषयाची प्रस्तावना करताना मुलांना विचारले, मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता? मुले उत्तरली की ब्रश करतो, आंघोळ करतो, केस विंचरतो, धुतलेले कपडे घालतो, वगैरे वगैरे. खाण्यापिण्याकडे गाडी वळेचना. अखेर हे शिक्षक म्हणाले, छान, छान. बरे, आता मला सांगा, तुम्ही सकाळी आटोपून झाल्यावर काय खाता पिता? झाले, मुलांनी खाद्यपदार्थांची जी यादी सुरू झाली, ती संपेचना. शिक्षक अस्वस्थ. मुलांवर रूष्ट होऊनही फायदा नाही. शेवटच्या रांगेत बसलेले परीक्षक थेट नापास करणार. मग मुलांना मध्येच थांबवून ते म्हणाले, छान, ही झाली खाद्यपदार्थांची नावे. आता सांगा तुम्ही सकाळी सकाळी काय पिता. मुलांनी दूध, कॉफी, बोर्नव्हिटा अशी नावे सांगितली. ती यादी फार मोठी होईना. तेव्हा चक्क थांबली. पण कोणीही तोंडातून चहा हा शब्द काही काढला नाही.

अखेर शिक्षकांना या चक्रव्युहातून बाहेर पडण्याची युक्ती सुचली. अन्यथा प्रस्तावनेवर फार वेळ घालवला म्हणूनही गुण कमी होण्याचा धोका होता. ते म्हणाले, तुम्ही जसे दूध, कॉफी, वगैरे पिता, तसेच काहीजण चहा पितात. झाले. मुलांचा पराक्रम तेथेच संपला. त्यांना आणखी द्वाडपणा करणे शक्य नव्हते. मग देशात चहा कोठे पिकतो, चहाला कोणत्या प्रकारचे हवामान लागते, वगैरे मुद्द्यांवर ही शिकाऊ गाडी सुखरूप मार्गस्थ झाली.

वर्षभरानंतर ते उमेदवार शिक्षक म्हणून त्याच शाळेत रूजू झाले व मुलांवर त्यांचीच विद्या उलटवली गेली हे वेगळे सांगायला नको.

तुमच्या पाहण्यात असे चांगलेवाईट अनुभव आले आहेत का? अशा काही गमतीजमती तुमच्या स्मरणात आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ? Lol

भरत मयेकर,
तुम्ही म्हणता तसे या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्याचा धागा आहे त्याला त्याच्या धाग्यावरील अनावश्यक कमेंट्स काढून टाकता येण्याची सोय सदस्याला करून देण्याची विनंती संपादकांकडे केली आहे. अशी सोय फेबुवर असते, त्यामुळे सतत संपादकांकडे न जावे लागता अशांचा बंदोबस्त आपल्यालाच करता येतो.
केवळ अशी सोय नाही म्हणून या लोकांना दुस-याच्या धाग्यावर जाऊन मूळ धाग्याशी संबंध नसणारे चर्वितचर्वण करत बसण्याचे विक्ृत समाधान मिळवता येते, त्याचा गैरफायदा घेता येतो. हा आपला असभ्यपणा आहे याची जाणीवही यातल्या अनेकांना असते की नाही शंका आहे.
यातल्या कित्येक जणांच्या प्रोफाइल्सही स्वत:चे नाव नसलेल्या आहेत. ज्यांच्या कमेंट्स उपद्रवकारक, टवाळखोर नसतात, त्यांचे ठीक आहे, इतर मात्र याचा गैरफायदा घेतात.
अलीकडे केवळ पोलिसांत तक्रार करण्याचा अवकाश, अशा टवाळखोरांचा ताबडतोब बंदोबस्त करता येतो, यांची खरी नावे उघड होऊ शकतात. पण अापण तसे करत नाही याचाही गैरफायदा ते घेतात.

ओ बास करा आता.. नायतर अॅडमिनच्या विपूत सगळ्यांच्या नावाचा रेकाॅर्ड येईल. Happy

राजेश कुलकर्णी , छान लिखान .
बी एडच्या लेसनच्या त्या स्टेजला ' हेतुकथन ' म्हनतात. ज्या शाळांवर असे पाठ घ्यायचे असतात त्या शाळाना प्रॅक्टिसिंग स्कूल म्हणतात. तिथली मुले ही हमेशा वाह्यात असतात आणि ती पाठ घेणार्‍या शिक्षकाची नेहमीच हबेल हंडी उडवतात. ( काही ठिकाणी त्यांचे रेग्युलर शिक्षक मागच्या बाकावर बसून असतात ' बगतांय हां ' मोडमध्ये)

असो.
खरे तर प्रतिपाद्य विषयाकडे चातुर्य पूर्ण प्रस्तावना करीत ओघाओघाने यायचे असते व मुलानी दिलेल्या उत्तरातून एखाद्या क्ल्यूने आज आपण हे शिकू या अशा तर्हेने पाठात शिरायचे असते. ( अशा ५ स्टेजेस असतात त्याला हर्बार्टची पंचपदी म्हणतात )
असो.
चुकीच्या हेतुकथनाचे एक उदाहरण कॉलेजमध्ये दिले जाते.( ओ ढून ताढून असंबद्ध रीतीने विषयावर येण्याचे उदाहरण)
एका शिक्षकाला ' हवा ' ( एअर) हा विषय शिकवायचा असतो त्याचा हा किस्सा...

टीचर गुळाचा खडा घेऊन वर्गात शिरतात.
टीचरः मुलान्नो हे काय आहे.
मुले; गूळ
टी: तुम्हाला गूळ आवडतो का?

मुले: हो..
टीचर : हा गुळाचा खडा तुम्हाला हवा का?
मुले: हवा....
टीचरः तर मग मुलानो आज आपण ' हवा' हा विषय शिकू या........

राकुदा, पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक संकेतस्थळावर लिहिता (ते सुद्धा मोफत) तेव्हा त्यावर कोणत्या प्रकारचे प्रतिसाद यावेत येऊ नयेत अशी बंधने नाही घालू शकत.
असा कन्ट्रोल हवा असेल तर स्वतःचे एक संकेतस्थळ (ब्लॉग) चालू करून त्यावर लिहा ना. किसने रोका है ?

अ‍ॅडमिन, कृपया असे कोणतेही बदल करू नये ही विनंती.

महेश. Lol

मला वाटते "रंगीबेरंगी" पान जरी विकत घेतले तरी त्यात राकुना अपेक्षित असणारी "धाग्यावरील अनावश्यक कमेंट्स काढून टाकता येण्याची सोय" तिथेही उपलब्ध नाही.

>>मला वाटते "रंगीबेरंगी" पान जरी विकत घेतले तरी त्यात राकुना अपेक्षित असणारी "धाग्यावरील अनावश्यक कमेंट्स काढून टाकता येण्याची सोय" तिथेही उपलब्ध नाही.
ह्म्म ते खरेच, पण निदान तिकडे लेखन स्वातंत्र्य तरी मिळेल. आत्ता अनेक लोक त्यांना त्यांच्या लिखाणाबद्दल जे बोलत आहेत ते तरी कमी होईल.

हूडा, लई ब्येस... अरे तू पण लिही रे शिक्षाण खात्याच्या गमती जमती...

मी सातवीत असताना असेच वर्गावर आलेल्या शिक्षकांची टर उडवली होती, व मोठ्या कौतुकाने आईला सांगितले (त्या वयात सगळ्या बर्‍यावाईट गोष्टी आईला सान्गायचोच). तर मग आईने अशी काही तासम्पट्टी केली माझि की बास.... बाकिचे लक्षात नाही, पण तिने एकच वाक्य फारच महत्वाचे वापरले. की अशीच वेळ तुझ्यावर आली तर? कल्पना करुन बघ. अन लक्षात ठेव की आज तू जे जे करतो आहेस, ते ते सर्व तुलाच परत मिळणार आहे, चांगला वागलास तर चांगली माणसे भेटतील, आज कुणाशी वाइट वागलास, तर उद्या तुझ्याबरोबरही वाईट वागणारीच माणसे भेटत रहातील.
तेव्हा "अन्निसवाल्यांचा" इत्का बोलबाला नसल्याने या प्रतिपादनास कुणी अंधश्रद्धा म्हणण्याचे कारण नव्हते, व अन्निसचा गाढवगोंधळ सुरु व्हायच्या आधीच पापपुण्याच्या कर्मफलामार्फतच्या आमच्या कल्पना आईने तार्किक सुसंगतीने बर्‍यापैकी तासुन धारदार केल्या होत्या.

दाढीचा एक हात करावा म्हणजे मला वाटलं की दाढीवरुन एक्दा हात फिरवावा>>>> मला पण . मी फिरवूनही पाहिला. refreshing नाही वाटले.

सगळ्या कमेंट्स मस्त. हसून हसून पुरेवाट..

लाडु, तुम्ही स्त्री आहात ना? (प्रोफाइल पाहिला.) तरीही दाढीवरुन हात फिरवला? अ ओ, आता काय करायचं हाहा

>> त्यानी त्यांच्या 'ह्यांच्या 'दाढीवरून हात फिरव ला असेल कारण मूळ प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणाच्या दाढीवर फिरवाचा हे स्पेसिफाय केलेले नाही.

हात फिरवण्यासाठी तात्पुरती नाटकातली दाढी लावली तर काय हरकत आहे. मूळ प्रिस्क्रिप्शनमध्ये ती खरी आणि स्वतःची असावी असे काही स्पेसिफाय केलेले नाही...

Lol Lol Lol Lol Lol Lol

हात फिरवण्यासाठी तात्पुरती नाटकातली दाढी लावली तर काय हरकत आहे. >> आता कुठून आणायची ती? उद्या घेऊन पर्स मध्येच ठेवायला हवी. आला कंटाळा की फिरवायचा हात. Wink

लाडु, तुम्ही स्त्री आहात ना? (प्रोफाइल पाहिला.) तरीही दाढीवरुन हात फिरवला? अ ओ, आता काय करायचं हाहा >> Lol
त्यानी त्यांच्या 'ह्यांच्या 'दाढीवरून हात फिरव ला असेल कारण मूळ प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणाच्या दाढीवर फिरवाचा हे स्पेसिफाय केलेले नाही. >>
हात फिरवण्यासाठी तात्पुरती नाटकातली दाढी लावली तर काय हरकत आहे. >> आता कुठून आणायची ती? उद्या घेऊन पर्स मध्येच ठेवायला हवी. आला कंटाळा की फिरवायचा हात. डोळा मारा >>>> Rofl

राजेश कुलकर्णी, माफ करा. टवाळी करायचा उद्देश नाही पण लोकांचे प्रतिसाद बघून Rofl होतंय. तुमच्या धाग्यांची टवाळखोरांनी वाट लावली आहे पण वर बेफिकीर यांनी लिहिल्याप्रमाणे बर्‍याच धाग्यांवर असंच काहीतरी सुरु आहे. एकमेकांना शिव्याशाप देण्यापेक्षा इथे लोक निखळ आनंद तरी घेत आहेत हे ही नसे थोडके. Happy

तर ह्या अरोरांच्या एका फ्री सेमिनारला मी आणि माझ्या २ मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना गेलो होतो. त्यांनी काही तरी संमोहन वगैरे करायचा प्रयत्न केला. संमोहन गेलं दूर पण आम्हाला फक्त हसून येत होतं. अवांतर आहे पण आठवलं म्हणून सांगितलं.

Pages