मुंबईकर.. स्साला जीवाला काही किंमतच नाहीये ईथे..

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2015 - 16:18

आताच हा विडिओ पाहिला व्हॉटसपवर. https://www.youtube.com/watch?v=WdgRPCi_nGU
गर्दीच्या ट्रेनमध्ये दारावर लटकत असलेल्या मुलाचा हात सुटला.
ही संबंधित बातमी - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/accident-...

विडीओ पाहताना अंगावर नाही आला. रोजचेच गर्दीचे द्रुश्य बघतोय असे वाटले. अगदी सहज पडला. त्याला स्वतालाही काही कळायच्या आधी हात सुटला. विडिओ पाहताना असे वाटले की रेल्वेट्रॅकलगतच्या झुडुपात पडला असेल, कपडे झटकेल आणि उठून पुन्हा मागची ट्रेन पकडेल. पण नाही. गेलाच. विडिओ बघून बातमी चेक केली. तेव्हा समजले की जागीच मेला. ऑन द स्पॉट. काय लाईफ आहे. एकीकडे देश असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून सुरक्षित आहे की नाही चर्चा चालू आहेत. एकीकडे हे.. रोजचा रेल्वेप्रवास इथे सुरक्षित नाही. जो पोटापाण्यासाठी करावाच लागतो. एक मुंबईकर म्हणून मी हे स्वत: अनुभवत नसलो तरी रोज ट्रेनच्या दाराला लटकलेल्या लोकांचे गुच्छ नजर मेल्यासारखे बघणे नशीबी असते. मग एके दिवशी हे असे काही घडते. आणि त्यातील गांभीर्य लक्षात येते. पण फारसा विचार करत बसायला वेळ कोणाकडे आहे ईथे. उद्याही त्या सर्वांचे हेच रूटीन असणार. एकाला ठेच लागल्याने दुसरा कोणी घाबरून दाराला लटकायचे बंद करणार नाहीये. कारण त्यांच्याकडे तसा पर्यायच नाहीये. थ्री ईडियटस मध्ये एक स्टुडंट अभ्यासाच्या प्रेशरने आत्महत्या करतो तेव्हा आमीर खान प्रोफेसर बोमन इराणीला म्हणतो, सर ये सुसाईड नही, मर्डर है मर्डर. इथेही तसेच म्हणावेसे वाटतेय. हा अपघात नाहीये, खून आहे खून. परिस्थितीने केलेला खून. आणि जे जे या परिस्थितीला जबाबदार आहेत त्या सर्वांवर हा आरोप आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने ट्रेनचे मासिक पास भाडे दुप्पट केले होते. मुंबईकरांनी एकजुटीने आवाज उठवलेला, भाडेवाढ मागे घेण्यात आली होती. तेव्हा एक मुंबईबाहेरचा मित्र म्हणालेला. ही भाडेवाढ नसून आधीच तुम्हाला मासिक पासात सूट दिली होती, ती काढली आहे, बस्स. तेव्हाही त्याला विचारले होते. नक्की कसले पैसे द्यायचे अपेक्षित आहे लोकांनी? जिथे साठ-सत्तर आसनक्षमता असेल तिथे दोनशे जणांनी चढायचे? असे दाराला लटकत जीव डावाला लावत प्रवास करायचे? आणि एक दिवस ही असली मौत मरायचे! बोलायला बरेच काही आहे, एक मुंबईकर म्हणून चीड दुख संताप हळहळ.. पण हे सारे व्यक्त करून काही फरक पडणार नाही ही हतबलताही सोबत आहे. पण तरी एका गोष्टीचा त्रास होतोच, स्साला जीवाला काही किंमतच नाहीये ईथे..
आजच्या त्या तरुणाला, आजवर ट्रेनमधून पडून मृत्यु पावलेल्यांना, आणि इथूनही पुढे जे कोणी असे जातील त्या सर्वांना श्रद्धांजली ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

< नक्की कसले पैसे द्यायचे अपेक्षित आहे लोकांनी? जिथे साठ-सत्तर आसनक्षमता असेल तिथे दोनशे जणांनी चढायचे? असे दाराला लटकत जीव डावाला लावत प्रवास करायचे? आणि एक दिवस ही असली मौत मरायचे!>

परफेक्ट. मुंबईचा लोकल रेल्वे प्रवास सब्सिडाइज्ड असतो, मुंबई लोकल तोट्यात आहे असं सांगताना हेही लक्षात घ्यायला हवं.

पण याला कारण निव्वळ रेल्वेच्या कारभारात नसून चुकीच्या शहरनियोजनात, प्रगतीच्या संकल्पनेत आहे.

आपल्या देशाततरी आहे का जीवाला किंमत ... मुंबैची हालत करून ठेवलीये पार Sad

शहरनियोजनात, प्रगतीच्या संकल्पनेत आहे.

>>

ही कसली शहर नियोजन, प्रगतीची संकल्पना?

यात डिस्टर्बिंग बाब म्हणजे, लटकणार्याला हात देउन आधार देण्याऐवजी विडियो शुट करण्याची मानसिकता एकात आणि त्याच्या सहप्रवाशात आढळली... Angry

२२ वर्षांपुर्वी अगदी हाच क्षण अनुभवलाय. अश्याच लटकत होतो दोघी, मी आणि ठाण्यालाच चढणारी माझी एक मैत्रिण. मधला दांडा आणि उजवीकडची कडी धरून मी आणि मधला दांडा आणि डावीकडची कडी धरून ती. खूप ओरडत होतो की जरा आत व्हा...पण....त्यातून फास्ट त्या मधल्या पुलावर पोचली की एका बाजूला झुकते आणि आख्ख्या डब्याचे लोड लटकणार्‍यांच्या अंगावर येते.

काल तो व्हिडीयो पाहीला आणि जीव थार्‍यावर नाहीये अगदी...नवरा म्हणाला की तुम्ही लोक ती ईतकी गर्दिची गाडी सोडून का देत नव्हतात..? पण मी ६.०९ पकडायचे, तेंव्हापासून रात्री ९ पर्यंत तितकीच भिषण गर्दी असायची. किती गाड्या सोडणार? आणि रोजच ती आणि तीच परिस्थिती..!

मी आणि मैत्रिण वाचलो त्यादिवशी....अजूनही २२ वर्षांनीही काहिही फरक पडला नाहीये हे मनाला विषण्ण करुन गेले...त्याचा चेहेरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.

व्हिडीयो काढणार्‍याचा हात कदाचित त्याच्यापर्यंत पोचूच शकत नसेल...

हा व्हिडिओ बघताना छातीत धस्स झालं. हे असं माझ्या बाबतीत कधीही घडू शकलं असतं.
अंगठा आणि करंगळी सोडल्यास बाकीची तीन बोटं दरवाज्याच्या वरच्या पाणी जायच्या पन्हाळीत अडकवून कित्येकदा लटकत प्रवास केला आहे. आजूबाजूच्या झुडुपांच्या फांद्या लागून शर्ट फाटणे किंवा दंडावर वळ उठणे हेही झालंय. पण वर म्हटलंय तसं ट्रेन सोडून देणं हा उपाय नव्हताच. किती ट्रेन्स सोडणार? २० पैकी १९ वेळा धक्का बुक्की करून आत शिरता यायचं.

काल रात्री हा व्हिडीओ बघुन अस्वस्थ झाले.प्रथम वाटले फेक व्हिडीओ असेल,पण आज पेपरमधे बातमी वाचली.

१-१.५ वर्षांपूर्वी कुर्ल्याला फास्ट ट्रेन पकडली.त्यावेळी माझ्यापुढची मुलगी मोबाईलमधे गुंग होती.आत सरका करून ओरडून, ढकलायचा अयशस्वी प्रयत्न करूनही हलली नाही.बाकीच्या बायकांनी तिला ओरडून ढकलले तर म्हणे लॅपटॉपला धक्का लागेल.एकदमच चढता येणार नाही अशी भरलेली ट्रेनही पकडली नव्हती.पण आधीची मुलगी हलायला कबूल नाही आणि साडीसारखा अशावेळी अनकंफर्टेबल पेहराव .त्यावेळची ५-७ मिनिटे बेक्कार गेली.

गर्दी एक मुख्य कारण आहे त्याचबरोबर लोकांना दरवाजात उभे राहून स्टंट करण्याची आवड सुध्दा एक कारण आहे. मोकळी लोकल असेल तरी काही लोक दरवाजात उभे असतात. या आधीही असा एक शालेय विद्यार्थ्याचा व्हिडीओ समोर आलेला होता. तो स्टंट करत असताना पडलेला.

भयानक घटना आहे. वीडियो पाहण्याची हिम्मतच झाली नाही.
ऑटोमॅटिक बंद होणारी दारे केली तर असे होणार नाही असे वाटते.

ट्रेनची रचना बदलायला हवी. मला काही वर्षांपुर्वी वाटायचे की आपोआप बंद होणारे दरवाजे भारतीय रेल्वेत अशक्य आहेत कारण अशक्य गर्दी. पण आता मेट्रोत ते शक्य झाले. मुंबईची मेट्रो जरी लिमिटेड धावत असली तरी मी दिल्लीला खुप गर्दि असुनही दरवाजे बंद होताना पाहिले.

मनावर घेतले तर अशक्य काहीही नाही.

विडिओ पाहावत नाही. वाटले तिथे जाऊन गाडी थांबवता आली असती तर..

झाले ते भयानकच होते, पण मुंबईकरांना याची सवयच झाली आहे. लोकलमधुन पडून होणारे अपघात जवळजवळ रोजच होत असावेत. या अपघाताचा विडियो वायरल झाला म्हणून इतर लोकांना कळले तरी!

बाकी सर्वसामान्य मुंबईकरांना हे नित्याचेच असल्यासारखेच आहे. लांबून सगळं बघुन लोकं आपापल्या मार्गाने निघुन जातात.

गर्दी एक मुख्य कारण आहे त्याचबरोबर लोकांना दरवाजात उभे राहून स्टंट करण्याची आवड सुध्दा एक कारण आहे. मोकळी लोकल असेल तरी काही लोक दरवाजात उभे असतात.

>>

हो. त्यामुळे गर्दी नसताना देखील गाडीत चढणे मुश्किलेचे होते. Angry

मुंबई स्मार्ट सिटी !! मेट्रो - ४५ हजार कोटी फक्त . AC ट्रेन किती हजार कोटी ? मुंबई सुरत बुलेट ट्रेन - ३० हजार कोटी फक्त. .. सरकारचा बेत एकदम जोरदार आहे सिंगापूर / बीजिंग स्टाइल चा .. हे म रे , हार्बर वाले काय कीस झाड कि पत्ती .. रोजच १० / १५ लोक मरतात. सरकार तिथे काही करणार नाही . सरकार ला प्रगती पाहिजे फक्त. लोकांचे जीव गेले तर ते त्यांचे नशीब.

अभि१ :
<<<<रोजच १० / १५ लोक मरतात. सरकार तिथे काही करणार नाही . सरकार ला प्रगती पाहिजे फक्त. लोकांचे जीव गेले तर ते त्यांचे नशीब. >>>>>

बर मग ? बंद कराव्या का लोकल ट्रेन्स ? का मेट्रो ट्रेन्स बंद कराव्यात ? उपाय सांगा !!

<<<<< चुकीच्या शहरनियोजनात, प्रगतीच्या संकल्पनेत आहे. >>>>>>

चुकीच शहर नियोजन केलय ? कोणी ? कधी त्या नियोजना वर विचार झालाय गेल्या ५० - ६० वर्षांत ?

>> उपाय सांगा !!

मुंबईतली गर्दी कमी होणं हा एकच उपाय आहे. आणि दुसऱ्यांकडे बोटं दाखवून उपयोग नाही म्हणून मग स्वतःच पुण्यात दाखल झालो.
<ट्रोलिंग सुरु>अर्थात दुधाची तहान ताकावर भागवणे सगळ्यांनाच जमणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. Wink <ट्रोलिंग पूर्ण>

–- एक मुंबईकर

Sad

तेवीस-चोवीस वर्षापूर्वी ठाण्याला काही महिने नोकरी केली. नेहेमी स्लो ट्रेन पकडायचे ठाणे-डोंबिवली प्रवासात, पण एकदा आई-बाबा बाहेरगावी गेले होते आणि जाऊन स्वयंपाक करायचा होता म्हणून fast ट्रेन पकडली. कम्प्लीट बाहेरच्या बाजूला लोंबकळत होते. आमच्या एरियातल्या एका काकुंनी ते बघितलं आणि मला फार ओरडल्या. नंतर कानाला खडा, मी तिथे जॉबला असेपर्यंत स्लो ट्रेन पकडायचे. त्याने आत तरी शिरता यायचं तेव्हा.

चुकीचे शहर नियोजन आहेच. शहर वसवताना पाणी वीज रस्ते या मूलभूत नागरी सोयींबरोबरच रोजगार देणे आणि त्या साठी अशी मैलांची पायपीट करावी लागू नये, वा जीव धोक्यात घालावा लागू नये ही सरकारचीच जबाबदारी आहे.

एकाच वेळी एका दिशेच्या ट्रेन रिकाम्या जात असतात तेव्हा एका दिशेचे लटकून प्रवास करत असतात. अर्थात हल्ली खाजगी ऑफिसेस पश्चिम उपनगरात तसेच नवी मुंबई साईडला उघडत आहेत. पण पुन्हा काही वर्षांनी तिथेही अशीच स्थिती होणार.

मुंबई ही सर्वांचे पोट भरते, इथे कोणी उपाशी राहत नाही, इथे तुम्ही रस्त्यावरही राहू शकता, कुठेही अनधिकृत झोपडे बांधू शकता, कुठेही ठेला लावून व्यवसाय काढू शकता, काहीच नाही तर भीक मागूनही इथे पोट भरते, ही बॉलीवूडची मायानगरी आहे, इथे लोक स्ट्रगल करतात आणि एक दिवस शाहरूखखान बनतात. ... असे कित्येक खरे वा खोटे समज गैरसमज असल्याने इथे रोजच हजारोंचे लोंढे येत असतात. त्यांचा परीणाम अर्थात रेल्वेवर पडणार्‍या अतिरीक्त भारातही होतोच.

धाग्यात राजकारण आणायची इच्छा नाही, पण मतांचे राजकारण करत झोपडपट्ट्या पोसणारे आणि मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा बनवत चारचौघांना फटकवायचे नाटक करत मूळ प्रश्न जैसे थे च राहू देणारे या सर्वांनीच मुंबईची वाट लावलीय.

अर्थात आजही मुंबईची दोन रुपे आहेत. ज्याकडे पैसा आहे त्याची जीवाची मुंबई आहे या शहरात, ज्याकडे नाही त्याला तो असाच मरमरत कमवायचा आहे.

टोळक्याच्या दादागिरीचा बळी?
भावेश गाडीत येण्यासाठी धडपडत असताना त्याला जागा कशी देण्यात आली नाही,
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/group-cause-of-young-man-dies-fall-f...

हे खरं असेल तर भयानक आहे.

मी बोरिवलीहून फक्त शनिवारी विरार लोकलने जायचो. (फर्स्टक्लासच्या डब्यात) आत मोकळी जागा असूनही दारात उभे राहिलेले लोक चढू द्यायचे नाहीत.

हे खरं असेल तर भयानक आहे. >> हो हे नवीन नाहि आहे. दारात लटकणार्‍यांचे टोळके, आतमधे जागा अडवणार्‍यांचे टोळके, आधीच्या स्टेशनवरून return होउन जागा ठेवणार्‍यांचे टोळके, विरार/बोरीवली लोकलमधे अनुक्रमे बोरीवली/अंधेरी आधीच्या लोकांना चढू न देणारे टोळके असे वेगवेगळे माफिया ग्रुप आहेत.

ओह.. खूप दुर्दैवी आणि संतापजनक आहे हे ..
नक्कीच हे खरे असू शकते..
तो विडिओ बघितल्यापासून नेमका याचा विडिओ काढायला कसा सुचणे याचे उत्तर घातपातापेक्षा वेगळे काही मिळत नव्हते

देवकी, आपण कालच्या पोस्टमध्ये क्लिप काढायचा उल्लेख केला नव्हता, आज करत आहात, नेमके कारण समजेल का काढायचे? डिस्टर्बिंग आहे म्हणून की आणखी काही? आणखी एकाला तसे वाटले तर नक्की काढतो.

ओ बोरिवलीकरांचं नाव का घेता? ते अगदी पराकोटीचे सहिष्णु आहेत.

बोरिवली लोकलमधल्या सीट्स मालाड, कांदिवलीवरून रिटर्न येणार्‍या लोकांनी अलंकृत केलेल्या असल्याने उभ्याने प्रवास करतात. वर स्लो अंधेरी लोकलमधला सुखाचा प्रवास सोडून बोल्रिवलीकरांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी आलेल्या अंधेरीकरांनाही सामावून घेतात.

मी तरी बोरिवली लोकलमध्ये हा प्रकार पाहिलेला नाही. अप किंवा डाउन. दोन्हीत.

डिस्टर्बिंग आहे म्हणून की आणखी काही?>>>>>> डिस्टर्बिंग आहे म्हणूनच.
आधीच्या प्रतिसादात क्लिप काढून टाकण्याविषयी खरंच सुचलं नव्हते.एक व्यक्ती जाते आणि आपण ती कशी गेली हे मुव्हीसारखे पहात बसतो,असं काहीतरी वाटत राहिले म्हणून ती क्लिप काढण्याविषयी लिहिलं.
मलाही वॉट्सअ‍ॅपवर हा मेसेज आला.प्रथम फेक वाटला,मग सत्यता कळली तरी मी, इतरांना शेअर केला नाही तो याच भावनेतून.
मला वाटलं ते लिहिलं.बाकी तुमची मर्जी!

व्हिडियोचं डिस्क्रिप्शन वाचूनच तो पाहायची हिम्मतच झाली नाही.

मीही केलाय असा प्रवास जेव्हा ऑफिसला उशीर झालेला असायचा. तो प्रवास संपल्यावर अंगावर काटा यायचा. की ह्या प्रवासात माझं काहीही झालं असतं. पहिल्या अशा प्रवासानंतर कमीतकमी इतरांना असा प्रवास माझ्यामुळे करायला लागू नये ह्याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली. जसे, मोठी बॅग सोबत असेल तर ती आतमध्ये रॅकवर ठेवायला द्यायची जेणे करून बाहेर लटकणारी एक बाई तरी आत येईल. पण बायका बॅग घ्यायलाही नकार द्यायच्या. मला हात उंच करताच येत नाही, माझा हातच पोहोचत नाही हे जरी जेन्युईन कारण असलं तरी दुसरे काही मार्ग असायचेच की.. ह्याशिवाय बाहेरून कोणी काही साम्गतं आहे मदत मागत आहे तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांची एक जमात. शीअर अ‍ॅरोगन्स. गाडीत आत डब्यात जागा असतानाही न सरकणे मध्येच उभे राहाणे. एक दिवस असे झाले की ह्या प्रवासाची भीती वाटू लागली आणि जवळपास नोकरी शोधाय्चा निर्णय घेतला. पण माझ्याकडे हा ऑप्शन होता. सगळ्यांकडेच असतो असं नाही. त्यानंतर पुन्हा जेव्हा जॉबसाठी लांबवर प्रवास करायची वेळ आली तेव्हा स्कूटरचा ऑप्शन निवडला. ते थोडं जास्त सेफ वाटलं वेळ घालवणारं आणि थकवणारं असलं तरी.

राजकारणी, त्यांच्या व्होट बँका, चित्रपटांनी उभी केलेली अवास्तवता, ह्याशिवाय खेड्यापाड्यात नसलेल्या बेसिक सुविधा अनेक अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आणि जोवर राजकारणी, बिल्डर्स ह्याशिवाय तुमच्या आमच्यासारखा प्रत्येकजण मनावर घेत नाही स्वतःला सुधारण्याचं तोवर हे बदलणार नाही.

मी काल हा व्हिडीओ पाहिला. पूर्णवेळ कॅमेरा त्याच्यावर आहे जणूकाही रेकॉर्डकर्त्याला हा पडणार हे माहितच असावं. त्यामुळे काही कळत नाहीये की असं का?
लोकांचीही काय मेंटॅलिटी झालीये. फोन काढून रेकॉर्ड करत बसतील पण मदतीकरता प्रयत्न करणार नाहीत.

देवकी ओके, पण तरी तुर्तास राहू देतो. कारण इथे तो देण्याचा हेतू कोणाच्या मृत्युचा तमाशा बघणे नक्कीच नाहीये. लोकं आपल्या ऑप्शनने बघू किंवा टाळू शकतात.

Pages