माझा सपशेल उडालेला फज्जा - BRM200

Submitted by limbutimbu on 30 March, 2015 - 06:59

यात सांगण्यासारखे, इथे लिहीण्यासारखे खरे तर काय आहे?
मी एका स्पर्धेत भाग घेतला, व अगदी सुरवातीच्या तासाभरातच मला स्पर्धेतून स्वेच्छेने बाहेर पडावे लागले, यात अभिमानाने सांगण्यासारखे खरे तर काहीही नाही. एका वाक्यात कळवता येते.
तरीही, वैयक्तिक अक्षमतेव्यतिरिक्तची बाहेर पडावे लागण्याची कारणमिमांसा माहित व्हावी म्हणून स्वतःच्याच फजितवड्याबद्दल हा लेखन प्रपंच.

दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेटपासून रात्री ७ वाजता BRM200 या रेसला सुरुवात होणार होती व १३ तासात २०० किमी अंतर कापून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला संपणार होती.

ही शर्यत अर्थातच व्यक्तिव्यक्तिंमधिल नसून, व्यक्तिची स्वत:शी व वेळेशी होती. सर्व प्रवास रात्रीचा करायचा होता. व मार्ग पुणे युनिव्हर्सिटी, पाषाण रोडमार्गे देहू-कात्रज बायपासला चांदणी चौकात मिळायचे व पुढे जाऊन नविन कात्रज बोगद्यांमधुन पुढे कापुरहोळ ला पोहोचायचे, तिथे कंट्रोल पॉईंट होता, तिथुन परत फिरुन नविन कात्रज बोगद्यांकडून, कात्रज-देहूरोडबायपासने जाउन, पुढे जुन्या पुणे-मुंबै हायवेने लोणावळा गाठायचे, तिथुन परत फिरुन परत पुण्यात यायचे असा मार्ग होता.

आजवर कधीही मिळालेला नसेल इतका प्रतिसाद या शर्यतीला मिळून मजसारखे काही चूकार हवशेगवशे धरून एकूण ३६ जणांनी सहभाग घेतला, पैकी ३ जणांनी सुरवातच केली नाही, १३ जण क्विट झाले, व २० जणांनी शर्यत पूर्ण केली, पैकी सर्वात प्रथम आलेल्याने जवळपास आठ तासातच हे अंतर कापले.

खरे तर या शर्यतीत भाग घेण्याचे मी योजलेले नव्हते. पण गेले काही महिने या विचारात होतो, व म्हणून माझ्या मुलाची, तो शाळेत असताना वापरायचा, ती सायकल डागडुजी करुन घ्यायला सुरुवात केली होती. दोन महिन्यापूर्वी मुलानेच दोन्ही चाकांना टायरट्यूब बसवुन दिले. मग मी व माझा एक मित्र गिअरच्या शोधात राहिलो, अन् सरतेशेवटी आमच्या इथल्या “रोडसाईड” मेक्यानिककडून मागिल चाकास गिअर बसवून घेतले. मागिल गिअर व्हिल्सच्या रुंदीमुळे पुढील पेडलचे एकेरी चेनव्हील अडचणीचे ठरू लागले, व एकतर मागिल सर्वात लहान व सर्वात मोठ्या गिअरव्हिलवर चेन नेऊ पाहिल्यास चेन पडू लागली, म्हणून मेक्यानिकने ती व्हिल्स लॉक करुन ठेवली (म्हणजे तिथवर चेन जायचीच नाही). सर्वात बारके व्हिल वापरताच येणार नसेल, तर गिअरचा उपयोग काय? असे म्हणुन मी त्याला पुढेही गिअर व्हिल बसवायला सांगितले, ते त्याने बसवले. पण म्हणे त्याच्याकडे शिफ्टर नव्हताच. तर बिना शिफ्टरचे ते वापरू लागलो, पण आता पुढच्या चाकावरुन चेन पडू लागली. सबब, पुढच्या लहान (मध्यम) दात्यांच्या चाकावरुन चेन वापरु लागलो. या गिअरच्या मोठ्या चाकाचे दाते केवळ ४२ होते, तर मला ज्या चाकाचा उपयोग करता येत होता तिचे दाते केवळ ३२ होते. केवळ ३२ दात्यांच्या चक्रामुळे सायकल चालविने साध्या अंतराकरताही वैतागाचे होत होते व अक्षरष: २०/२२ चा वेग घेण्यासाठीदेखिल मेहनत करावी लागत होती. तेव्हा साधारण दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात जाऊन पुढील बाजुस किमान ४४ वा ४८ दात्यांच्या मोठ्या व्हिलची सोय करण्याकरता शोध मोहिम घेतली, ती फसली. परत एकदा ८ दिवसांपुर्वीच्या शनिवारी पुण्यात गेलो, तर तब्बल तिन वेगवेगळ्या दुकानातुन तिन पार्ट्स खरेदी करावे लागले. ४८चे गिअर व्हील एका ठिकाणाहून, त्याचा खालचा शिफ्टर एका ठिकाणी, तर हॅंडलपासची लिव्हर एका ठिकाणाहून.
हे सर्व आणुन स्वत:च बसवले व पुढील दोनचार दिवस ऑफिसला रोज सायकलने जाऊयेऊ लागलो.
दरम्यान, वरील रेस जाहिर झालेली दिसली, तेव्हा करुन तर बघु, वाईटात वाईट काय होईल ? बाहेर पडावे लागेल.. असा विचार करुन घरात ही गोष्ट बोलल्यावर लिंबीची तत्काळ प्रतिक्रिया होती की “तू घरातला एकमेव कर्ता पुरुष, तुला काही झाले तर बाकिच्यांनी काय करायचे? काही नकोय भाग घ्यायला”……
मी शॉकमधे, पण कसेतरी तिची परवानगि घेण्यामधे यश मिळाले.

या रेसेस् मधे भाग घ्यायचाच म्हणुन मी तिनेक महिन्यांपूर्वीच माझे वेळापत्रक आखले होते नि त्यानुसार मी निगडी ते हिंजवडी/बापुजी देवाची खिंड/ कात्रज-बिबवेवाडी/ कात्रज बोगदा, असे टप्प्याटप्प्याने अंतर वाढवित नेऊन सराव करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात यापैकी एकाही ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. येऊन जाऊन निगडी ते आळंदी इतकेच एकदा जाणेयेणे झाले. रोजचा ऑफिसला जाण्यायेण्याचा घर ते ऑफिस हा साडेतिन किमीचा टप्पा इतकाच काय तो सराव(?) म्हणे.

रेसच्या नियमाप्रमाणे पुढिल व मागिल दिवे असणे जरुरीचे, तेव्हा ते घ्यायला वेळात वेळ काढून ते बुधवारी विकत आणले. तेव्हाच पंक्चरचे सामानही आणले.

तशात गुरुवारी ऑफिसबाहेर गाडी लावलेली असताना कुणीतरी हॅंडलपासच्या गिअरलिव्हरशी खेळ केला होता त्यामुळे आता चेन मोठ्या व्हिलवर ठरत नव्हती. 

शुक्रवारी एक चंडीयाग घेतलेला, तो सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० दरम्यान पुरा केला, तेव्हा जेवणखाण वगैरे काही झाले नव्हते, होमाचा धूर मात्र भरपूर प्यायला-खाल्ला होता.

त्याच दिवशी संयोजकांचा SMS आला, की तुम्ही whatsapp वर दिसत नाही, दुसरा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तेव्हा त्यांना कळविले की आता एका android चि सोय करतो व कळवतो. लगेच रात्री १० वाजता मुलिकडे जाऊन तिला दिलेला android तात्पुरता घेतला तो रात्री एक पर्यंत घरी पोहोचलो.

दुसरे दिवशी शनिवार, रेसचा दिवस, पाणी भरणे, चूल पेटवून पाणी तापविणे इत्यादी आन्हिके उरकून, सकाळी १०.३० नंतर सायकल तयार करण्याची सुरुवात केली.

विकतचे दिवे वाटेत पडू शकतात हे इथे वाचलेले असल्याने, स्पेअर दिवे/बॅटरीलाईट बसवले. बाटल्या अडकवायला तारेचे स्टॅन्ड असतात ते बसवले. मधल्या बारवर दोन पर्स लटकवल्या. हे बसविण्याकरताच्या प्लॅस्टिक स्ट्रीप्स व लाल जिलेटीन आदले रात्रीच आणले होते. गाडीची (सायकलची) परिस्थिती बघता यच्चयावत नटबोल्टना बसणारे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, पंक्चरचे पाने, ठ्यूब, व्हॉल्वट्यूब, हवा भरायचा भलाथोरला पंप, वगैरे घेतले. हे सामान इतके होते, की मी जर रेसच्या वाटेत सायकल दुरुस्तीचे दुकान टाकून बसलो असतो तरी चालले असते. Proud
त्याचवेळेस सायकलला पुढेमागे लावण्यासाठी वहीच्या पुठ्ठ्यांवर रायडर नंबरची दोन कार्ड्स तयार केली नाईट रिफ्लेक्टीव चिकटपट्टीने. ती लटकवली.

शनिवारी सर्व कामातुन/पाहुण्यांमधुन वेळ काढून एक क्षणभरही झोपता आले नाही. आदले दिवशी चंडीयागामुळे दुपारचे जेवण नाही, रात्री मुलिकडे जाऊन आलो, तेव्हाही जेवण नाही, व आज शनिवारी दुपारी केवळ एक पोळी खाल्लेली. या इतक्याच आहारावर मी दुपारी पावणेपाचला घरुन निघालो अन् वेळेत युनिव्हर्सिटीपाशी पोहोचलो. सोडवायला मुलगा आलेला.

तिथे यथावकाश सर्वजण गोळा झाले. मायबोलीकर केदार जोशीही भेटला. त्याचा पहिला प्रश्न होता, लिम्ब्या सराव काय केला आहेस? मी म्हणले अरे काहीच नाहीरे सराव  मग जमले नाही तर सोडून द्यायचा प्रयत्न या बोलीवर तो विषय संपला.

तिथे माझे कुणि फोटो काढले नाहीत, अगदी मुलानेही सजल्याधजल्या लिम्ब्याचा एकही फोटू काढला नाही, पण बरेच जणांनी माझ्या सायकलचे मात्र फोटो काढले. Proud

रेस सुरु होण्या आधी पाऊस झाला थोडासा, पण मुसळधार पाऊस होईल असे वातावरण होते. सबब, रेस सुरु होताना मी रेनसुटचा वरचा भाग अंगात चढवला. डोईचे हेल्मेट रस्त्यावर मिळते त्यातिल होते. त्यास व्हेन्टिलेशनची सुविधा (भोके असणे) नव्हती, व काल व आजच्या दिवसात मला भोके पाडणे जमले नव्हते. रेसला सुरुवात झाल्यावर मी तसाच निघालो, व पुढे दोन जण चालले होते त्यांना माझ्याही नकळत मीच फॉलो करू लागलो, व माझ्या नैसर्गिक ताकदीच्या कितीतरी पुढे जाऊन सायकल त्यांचेबरोबरीने वेगात दामटली. खरे तर मला श्वासाचा त्रास तेव्हा होत नव्हता, पण अंग घामाने निथळते आहे हे जाणवू लागले. थोड्या वेळाने पुढील सर्वजण दिसेनासे झाले व तोवर माझ्या शिंपीमधे जाम दुखायला लागलो, चढ सुरू झाला होता, तेव्हा श्वासही जोरजोरात होऊ लागला. हेल्मेट नजरेआड येते म्हणुन वर करावे लागायचे, तेव्हा आतिल स्पंजाला बोट लागल्यावर त्यातुन घामाची धार खाली पडू लागली. कपाळावरून ओघळून घाम डोळ्यात जाऊ लागला होता. इथेवर येईस्तोवरच पहिल्या साताठ किमीमधेच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. चक्कर येऊन तोल जाऊन पडतो की काय असे वाटू लागले. मागिल गिअर बदलायला डावी की उजवी लिव्हर वापरायची हे आठवेना, आठवले तर लिव्हर हाताला सापडेना. शेवटी चांदणी चौकाचा टॉप नजरेत् आला, पण मी इतका बधीर “एक्झॉस्टेड” झालो होतो की चक्क सायकलवरून उतरून तो पन्नास फुटांवरचा टॉप गाठला.

तिथे दम खात थांबलो. मुलाला फोन केला की अरे मला खूप त्रास होतोय. याची अपेक्षा नव्हती. पण त्रास तर होतोय, काय करू? मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेन. मुलगा म्हणाला, थोडा दम खा, अन् प्रयत्न करा, नाहीच जमले तर बाहेर पडा अन् मला फोन करा, मी आत्ता निगडीच्या वाटेतच आहे आहे.
मग मी थोडे पाणी प्यायलो, ते पितानाही एकदम पिऊन चालत नव्हते, अजुनच त्रास झाला असता.. अजुनही मला असे का होते आहे याचे कारण कळत नव्हते, कारण श्वास जोरजोरात फुलला तरी तो “दम्याचा” ऍटॅक नव्हता, दमाही नव्हता तेव्हा, पण हातपाय गळून गेले होते. इतकुश्श्या अंतरातच माझे असे का व्हावे याचा विचार करीत मी परत सायकल पुढ चांदणीचौकाच्या उतारावरून बायपासकडे काढली. तिथेन पुढे सिंहगडरोडवरील उड्डाण्णपुलापर्यंत उतार असल्याने झकासपैकी गेलो, मनात वाटले की आपण उगीच घाबरलो, हे काय, हां हां म्हणता पार करू अंतर….

झाले , सिंहगडरोडवरील/कॅनॉलवरील उड्डाण पुल सुरु झाला, अन् मला परत त्यापुलाचा चढही पार करवेना, सर्वात उंचावर जाऊन परत थांबलो, थोडे पाणी प्यायलो. पाणि प्यायचीही भिती वाटत होती कारण एकदम पाणि प्यायल्यास नळ भरु शकतात व पोटात दुखू लागते. शिंपीतील दुखणे आता थांबले होते पण श्वास ताब्यात येत नव्हता. नाकाने श्वास घेऊन तोंडाने भसाभसा सोडीत होतो. परत एकदा जीव धरुन पुढे निघालो. शिंदेवाडीचा पुल लागला, तिथुन उजवीकडे वळण घेऊन नविन कात्रज बोगद्यांकडे जायचे होते. तो पुलही मला निभावेना, त्यावरही थांबायला लागले. अतिशय निराश झालो. परत थोडे पाणी पिऊन तसाच पुढे निघालो तर लक्षात आले की आता तर पुलाच्या उतारावरही मला वेग घेता येत नाही इतका शक्तिपात झालाय. मला असे का होतय काहीही कळत नव्हते. पुढे कात्रज बोगद्याकडचा चढ सुरू झाला. व एका विशिष्ट वेळेस मी सायकल थांबवली. मेंदु कलकलला होता. चक्कर येऊन पडण्यापेक्षा स्वत:च थांबणे हा चांगला उपाय सुचण्याइतकी बुद्धी शाबूत होती.
थांबल्यावर पहिल्यांदा लिंबीला फोन लावला व परिस्थिती सांगितली. सुरवातीला विरोध करणारी लिंबी तेव्हा फोनवर मात्र म्हणाली, की तू घाबरलेला आहेस, थकलेला आहेस, तरीही पंधरावीस मिनिटे अर्धातास विश्रांती घे, अन पुढे हो, तू जाऊ शकशील”. तिच्या म्हणण्यात बरेच तथ्य होते. पण मी त्या मन:स्थितीत नव्हतो, सबब तिला सांगितले की मी क्विट करतोय, मला पुढे जाऊन रिस्क घ्यायची नाही, जरी त्यांचि पिक अप् व्हॅन वगैरे असली तरीही. लिंबी बरे म्हणाली.

मग संयोजकांना फोन करुन सांगितले की मला क्विट करावे लागत आहे, तसदी बद्दल सॉरी, मुलाला बोलावतो आहे, माझे मी मॅनेज करेन.

मग मुलाला फोन करुन सांगितले, तेव्हा तो पिंपरीपाशी ट्रॅफिकजाम मधे अडकला होता. निगडीला घरी जाऊन मग येतो म्हणाला….
यथावकाश दोनअडिच तासांनी मुलगा आला, तोवर मी शिंदेवाडीपुलाचे खाली येऊन उभाच्या उभा. दरम्यान दीडेक लिटर पाणी रिचवले अन मग वाटू लागले की अरे उगीच सोडली, घाई केली सोडण्यात.
लक्षात आले की टेललॅम्प पडून गेलाय.

मग मुलाने सायकल चालवित घरी नेली, त्याचे मागोमाग स्कूटीवरुन मी गेलो.
BRM200 मधिल सहभागाचा माझा पहिलाच प्रयत्न सपशेल फसला होताच, तो देखिल केवळ एक तासाचे आत, वीसेक किमीमधेच. 

नंतर विचार करता यास अनेक बाबी कारणीभूत झाल्या होत्या असे जाणवले, त्या पुढील प्रमाणे.

१. अजिबात सराव न करता / अपुऱ्या सरावानिशी रेसला उतरणे
२. शेवटच्या क्षणापर्यंत सायकलची डागडुजी करावी लागणे व त्यामुळे तिच्याशी वापरण्याबाबत/ हाताळण्याबाबत जवळीक निर्माण झालेली नसणे. अगदि सीटची उंची किती हे देखिल शेवटपर्यंत निश्चित झालेले नव्हते.
३. पावसाळी हवा म्हणुन घातलेले रेनसुटचे जाकिट व व्हेन्टिलेशन नसलेले हेल्मेट महाघातक ठरले. यामुळे अंगात निर्माण होत असलेली उष्णता आतच साठून राहून शरिराने घामाद्वारे त्याचा प्रतिकार केला, व एरवी अगदी क्वचितच घामाघुम होणारा मी त्यावेळेस मात्र नखशिखांत ओला झालो.
४. स्वत:च्या नैसर्गिक कमी गतिने न जाता पुढिल वेगवान एक्स्पर्ट लोकांना फॉलो करणे ही घोडचूक होती. त्यामुळेही एक्झर्शन वाढले.
५. आधिचे तिनचार दिवस अतिश्रम व अपुरा आहार, अगदी रेसच्या दिवशीही आहाराबाबत दुर्लक्ष,
६. रात्रीची रेस असुनही आधिच्या तिनचार दिवसात दिवसाची काय, रात्रीचीही पुरेशी झोप/विश्रांती नाहीच नाही.
७. चाराठ दिवस आधीपासून आईच्या पायावर सूज आलेली, तेव्हा त्या काळजीने मन चिंताग्रस्त, द्विधा मन:स्थितीत.
८. रेसकरता स्वत:स कुठल्याच पद्धतीने शारिरीक/मानसिक दृष्ट्या तयार करू न शकणे, अन् तरीही भाग घेणे.
९. “होय, तू मनात आणलेस तर ही रेस करू शकशील” अशा आशयाचे वाक्य नि:शंकपणे सांगणारी एकही व्यक्ति आजुबाजुला नाही. येऊनजाऊन मुलगा म्हणाला, “करा हो बाबा, जमेल तुम्हाला, नै जमले तर बाहेर पडा!” पण त्यात तितका जोर नव्हता हे त्याला अन् मलाही ठाऊक होते.

तर इतके असताना या प्रयत्नातून साध्य काय झाले? आत्मविश्वास कमावला की गमावला ? होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का? परत सुयोग्य प्रयत्न करणार का?

तर इतके असताना या फसलेल्या प्रयत्नातून साध्य काय झाले?
रेसची, रेसमधिल सहभागी, त्यांच्या सायकली, हत्यारे इत्यादी अनेक बाबींची ओळख जवळून झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण किती बारकाईने विचार करुन उतरायला हवे, किती प्लॅनिंग हवे, किती सराव हवा, किती तयारी हवी याचा अंदाज आला. एका चांगल्या ग्रुपबरोबर ओळख झाली. शिवाय केदारजोशीचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

आत्मविश्वास कमावला की गमावला ?
डिस्अपॉइंट नक्कीच झालो, उदास झालो, पण नाऊमेद नक्कीच नाही झालो. इतक्या कमी अंतरात मी बाहेर पडेन घरच्या कुणालाच अपेक्षित नव्हते. किमान कापुरहोळ करुन तरी येईल असे त्यांनाही वाटत होते.
मी आधी प्रेडिक्ट केले होते की जर मी अमुक वेळेपर्यंत कापुरहोळहून परत वारजे/चांदणीचौकापर्यंत आलो, अन् तेव्हा सुस्थितीत असलो, तरच पुढे जाऊ शकेन.
अन् मी रेस करीनच वा नाही याचा निर्णय बहुधा त्या आधीच शिंदेवाडी ओव्हरब्रीजपर्यंतच कदाचित लागलेला असेल. हेच भविष्य खरे ठरले.

होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का?
माहित नाही, कदाचित असेलही, मला पहिल्या पन्नास किमीची कात्रज चढ धरुन खात्री होती. पण ते शक्य झाले नाही.
सहभाग घेणे हा वेडेपणाही असेल. पण असे वेड लागल्याखेरीज हातुन काहीच होत नाही. यामुळे मी परत परत असे वेडेपणे करीत रहाणार हे नक्की.

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार.

याव्यतिरिक्तही एक गोष्ट साध्य झाली.... अन एक बाप म्हणुन ती साध्य होण्याला अपरिमित महत्व आहे.
काय झाले? की एकुणात त्या दिवशी माझ्या मुलानेच माझ्यापेक्षा जास्त किमी अंतर सायकल चालविली, ते देखिल आधी न ठरविता. त्यामुळे मग तोच म्हणाला, की मी एक सायकल बघितली आहे, ती घेणार अन मीच उतरणार रेसला.
मी त्याला म्हणालो, की अरे मी तरी हे का करतो? माझे बघुन तुम्हाला निदान थोडीजरी इच्छा झालि, अन त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केलेत तर किती चांगले? माझे बघुन तुम्हाला इतके जरी कळले की असाही वेडेपणा करता येतो, व केलाच तर अशाप्रकारचे वेडेपणेच करायचे असतात, तरी खूप झाले.
यामुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल.

माझा एक मित्र आहे, तो देखिल हेच म्हणाला, की नोव्हे/डिसेम्बरचे सुमारास आपण उतरू. आता पाहुया पुढे काय काय होते ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे माझ्या आईवडिलांनी आख्खे भारत भ्रमण केले, जिथे तिथे धर्मशाळेत रहायचे, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करुन रहायचे, दोघांच्या हातात दोन दोन पिशव्या, त्यात तिखटमीठगुळापासुन ते रॉकेलच्या फोल्डींग स्टोव्ह पर्यंत सगळे अत्यावश्यक, पण कमीत कमी सामान. आवडले तर मुक्काम वाढवायचा, नै आवडले तर पुढे सरकायचे! तिन तिन महिने ते बाहेर असायचे. अन् तेव्हा तर आतासारखे मोबाईल राहुदेच, फोनही नव्हते. ते तिकडे तिन महिने बाहेर, >>>

जबरदस्त...सॉलीड फॅमिली आहे तुमची....मानलं तुम्हाला

लिंट्या, हौस दांडगी आहे तुझी आणि हौसेला मोल नसते...

त्यामुळे मी म्हणेन (मीच काय आख्खी मायबोली म्हणेल) होऊ दे खर्च. सायकल नवीन घे फार जुगाड करत बसू नकोस. अर्थात एकवेळ सायकलच्या बाबतीत मी समजू शकतो पण हेल्मेटच्या बाबतीत हलगर्जीपणा नकोच नको.

मागे केदारने त्याची सायकल तुला अशा सफरी पुरती देऊ केल्याचे आठवत आहे. घ्यावी अशी मदत मित्रांची

>>>> चला मग आपण दोघेच कशाला..एक माबोकरांचे सायकल गटग होऊन जाऊ द्या...फुल टू धमाल करू सगळे.... <<<<
आयडीया छान आहे, पण तत्पूर्वी आपण दोघांनी जाऊन मार्ग, मुक्कामाच्या जागा/परिसर, तेथील सोई इत्यादीची पहाणी करुन येणे आवश्यक आहे, व त्यानंतर सायकल गटग ठरवू. शनिवार रविवार जोडून सुट्टी असेल असे पहायला हवे. एखादा दिवस जास्तही लागू शकतो, जर कुणी "राजगड" वरही जाऊन यायचे ठरविले. दरडोई खर्चाचा अंदाज घ्यावा लागेल. आपण दोघे जाऊन आलो तर प्रत्यक्ष साईट बघुन ठरवता येईल असे वाटते. ऑगस्टमधे आपण जाऊ शकतो. तुला शनिवारी सुट्टी असते का?

मी पण येणार

ऑगस्ट मधेच ठरवा म्हणजे आत्ता पासुनच सायकल ची प्रॅक्टीस करता येईल
लिम्ब्या तू असताना राजगड च्या ठिकाणी तिथल्या सोई पहाण्याची काय आवश्यकता ??
दरडोई खर्चाचा अंदाज घ्यावा लागेल. <<< असा कितीसा खर्च येईल

<<< असा कितीसा खर्च येईल.
<<
<<
+१००,
सर्व जण एकत्र जमुन निसर्गाच्या सानिध्याचा आनंद मिळत असेल तर तिथे पैशाचे काय मोल.

सशा, विजय, अरे भले आम्ही पिठलं भात्/भाजि केली, तरी एकवेळचे व्यवस्थित जेवण व चहानाष्टा यांचे तिथले दर बघुन यायला लागेल. आधी सांगूनही ठेवायला लागेल.
लिंबीच्या बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यापासून गेली दोन वर्षे तिथे रहाते घर नाहीये. जाणेयेणे होत नाही, नाहीतर बाहेरची सोय बघायचि गरजही पडली नसती. तरीही अंदाज यावा म्हणुन प्रत्यक्ष जाणे महत्वाचे. माझ्यामते दरडोई २००/- मधे भागले पाहिजे.

अन सशा, आतापासून प्रॅक्टिस सुरु कर अन आमच्याबरोबर रिहर्सलकरता चल.... Proud

परवाच्या २८ मार्चला माझ्या फज्ज्याला एक वर्ष पूर्ण झाले.
एक वर्षात पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले, एकदंर परिस्थिती अधिकच अडचणीची होत गेली, पण त्या तुलनेत दरम्यानच्या काळात माझ्या सायकलीची चाके मात्र रस्त्यावरुन जराही धावली नाहीत, हे वास्तव.
यावर मात करणे, हेच उद्दिष्ट.

छानच लिहीलंय !
<< पण असे वेड लागल्याखेरीज हातुन काहीच होत नाही. यामुळे मी परत परत असे वेडेपणे करीत रहाणार हे नक्की.>> मला तर हेंच सार वाटतं या लेखाचं !!

प्रिय लिम्बुजी,
आपल्या सायकल साहस प्रवासाचा वृतांत व त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. काल संध्याकाळीच हृदयविकारशास्त्राच्या परिषदेसाठी शिकागोला पोहोंचलो. येतानाच्या प्रचंड विमानाची आणि त्याने एका दमात कापलेल्या दोहा ते शिकागो प्रवासाची आठवण झाली. अबब, केवढे ते अजस्त्र धूड आणि त्याची ती चार इंजिने, प्रचंड इंधनसाठा! सगळेच काही या महाप्रवासाला साजेसे ! खरे म्हटले तर हा महासागर पार करणाऱ्या एका छोट्याशा पक्ष्याचे उदाहरण घ्या. हा पक्षी ह्या अथांग सागर्यात्रेच्या आरम्भीस भरपूर खावून पिवून घेतो आणि इप्सित किनारा येईपर्यंत त्याचे वजन निम्मे झालेले असते. हायझेन्बर्ग, मुकुंद, केदार व इतर सर्व मित्रांनी केलेल्या विश्लेषणपर सूचनांना थोडी पुस्ती जोडावीशी वाटते. आपल्या शरीरातील स्नायूंच्या उर्जा व्यवस्थापनासाठी देखील एक अतिशय प्रभावशाली यंत्रणा असते. या यंत्रणेचा वापर करीत असताना तुमच्या शरीररूपी यंत्रणेचा अत्युच्च वेग म्हणजेच तुमचा फिटनेस ! तुमच्या स्नायूंचा बल्क, तुमच्या शरीरातील उर्जेचा साठा, ही उर्जा वापरण्याची तुमच्या शरीराची क्षमता, तुमच्या रक्ताभिसरण संस्थेचे आरोग्य ह्या सर्व बाबींवर तुमचा परफोर्मन्स अवलंबून असतो. सायकल व मानवी शरीर यात हाच फरक आहे कि शरीर आपली क्षमता वाढवू शकते. पण म्हणून एकदम मोठा घास घेणे म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. बर्याच शारीरिक दुर्घटना आपली कुवत न ओळखता आल्यामुळे घडतात. एक्सरसाईझ कोठे सम्पतो व एक्झरशन कोठे सुरु होते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले शरीर आपल्याला याची सूचना देत असते. शरीराची ही भाषा समजून न घेतल्यास झालेल्या दुर्घटना आपण नेहमीच ऐकतो. अभ्यास न करता परीक्षेला बसल्यानंतर दुसरे काय होणार? एक गोष्ट सांगावीशी वाटते कि वाढत्या वयाबरोबर मन तरुणच रहाते पण शरीर तरुण रहात नाही. शरीराचे तारुण्य स्नायूंच्या क्षमतेवर अवलंबून असते व ते प्रयत्न्पुर्वक टिकवावे लागते. तुम्हाला परावृत्त करण्याचा उद्देश मुळीच नाही तरी कृपया राग मानू नका.
आपल्या पुढील अभ्यासाला शुभेच्छा !

डॉक्टर, वेळात वेळ काढूनही आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.
आपले वाक्य नि वाक्य लक्षात घेतो आहे, लक्षात ठेवतो आहे. ते महत्त्वाचे आहे.
खास करुन विमान व पक्षी यातील अप्रत्यक्ष तुलना. Happy खास करुन "एक्सरसाईझ कोठे सम्पतो व एक्झरशन कोठे सुरु होते "
एक नक्की, की मी अंग सांभाळूनच करतोय, अन म्हणुनच वेळेस दोन पावले मागे सरकायलाही मागे पुढे बघत नाही.
मागे सरकायला लागले/जमले नाही/अपयश आले म्हणून निराशही होत नाही.
काही "सोंगे" आणता येत नाहीत, त्यातिलच पैशाचे, अक्कलेचे याच बरोबर "तब्येतीचेही" सोंग आणता येत नाही हे नक्कीच.
पण म्हणूनच फारच मर्यादीत शारिरीक ताकद, उतरते वय अन उतरता कॉन्फिडन्स, जोडीने अक्षरषः ओनामा केल्या प्रमाणे सायकलची बेसिक्स (शरिराच्या अनुरुप गिअर्सचा योग्य वापर) शिकायला लागणे यात मी वेळ घालवतोय. स्टॅमिना वाढविण्यास चक्क रोज जोर बैठका मारतोय... संख्या तेव्हडी विचारु नका . Proud
कारण एके काळी पन्नास-शंभर सहज मारु शकायचो ते आता फक्त दहा/पंधरा मारु शकतोय. पण एकंदरीतच गेली तीस वर्षे "बिघडलेल्या" जीवनशैलित /आहारात्/व्यायामात अत्यंत हळूहळू पण सुनिश्चितपणे बदल/सुधरणा करीत राहुन मी काही अंशी तरी ती क्षमता परत मिळवु शकेन असा विश्वास आहे. या अभ्यासाला आपल्या शुभेच्छा आहेतच, त्याबद्दल धन्यवाद.
एक नक्की, की मी कदाचित "परीक्षेत" नापास होईनही..... पण "अभ्यास करण्यात / अभ्यास करताना" नापास नाही होणार... !
आजचीच गोष्ट.... लोणावळ्यात १०० किमीच्या रेसेस होत्या, अन रँडोनिअर्स ग्रुपचे बरेच जण सहभागी होते.
त्यांच्या निकालापैकी काहींच्या फिगर २ तास ४८ मिनिटात ते साडेतिन तास इतक्याच वेळेत १०० किमी अंतर पार करणार्‍या आहेत. जेव्हा की मी सध्या ५० किमी करता ३.३० तासाचे उद्दिष्ट ठेवुन आहे. ते देखिल होईल न होईल, त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबुन आहे. मी शरिराला मर्यादेपेक्षा जास्त ताण देणार नाही हे नक्की.
वरीलसारख्या फिगर्स बघुन वा माबोकर केदार आशुचॅम्प मार्गी इत्यादीक प्रभुतींच्या पराक्रमांची दखल घेऊन "इन्स्पायर" होणे हे एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे, अन त्या इन्स्पायरेशनमुळे "इर्ष्या" जाग्रुत होऊन काही करण्याचे वय अन तब्येत आता नाहीये हे मी पक्के समजुन आहे. तुम्ही म्हणता तशी काळजी मी नक्कीच घेईन.

सध्या इतके मात्र नक्की म्हणू शकतो की मायबोलीवर केदार / मनोज/आशु सारख्यांमुळे सायकलिंगची परत नव्याने ओळख झाल्यामुळे, इतकी वर्षे आजवर दुर्लक्षित केलेले/ठेवलेले शरीर आता फारच उशीरा मी समजुन घेऊ पहातो आहे. अर्थातच त्याच्या कला कलाने, माझ्या मनच्या इच्छेने नाही.

आवर्जुन बहुमोल प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

Pages