बळी, गुन्हेगार, रक्षक आणि इतर

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 March, 2015 - 03:30

निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या वक्तव्याचा समावेश असलेला लघुपट 'इंडियाज डॉटर' बीबीसी तर्फे प्रसारित झाला आणि देशभरात मोठी खळबळ माजली. त्याच्या वक्तव्यामुळे भारताची मान खाली गेली वगैरे असेही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ लागले. मुकेश सिंहचे "रात्री अपरात्री निर्जन स्थळी बाहेर पडणारी स्त्री बलात्कारपात्र आहे" हे मत त्याचे वैयक्तिक मत आहे. त्याचे हे मत व्यक्त झाल्याने भारतातील १३० कोटी जनतेची मान खाली कशी जाऊ शकते? यावर अनेकांनी असाही युक्तिवाद केला की मुकेश सिंहचे मत ही बहुसंख्य भारतीय पुरुषांची मानसिकता आहे. अनेक पुरुषही असेच महिला रात्र बेरात्र बाहेर फिरल्याने, त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असे आक्षेप घेतात त्यामुळे त्या तमाम पुरुषांना आणि आरोपी मुकेश सिंह याला एकाच तराजूत तोलले गेले. हे असे तोलणाऱ्यांनी मूलभूत फरक लक्षातच घेतलेला दिसत नाही.

कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा त्या अनुषंगाने आपण व्यक्तिंची चार प्रकारच्या घटकांमध्ये वर्गवारी करू शकतो.
बळीः- ज्या व्यक्तीसोबत गुन्हा घडला आहे व त्यामुळे तिचे काही नुकसान झाले आहे.
गुन्हेगार:- ज्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्याकरिता किंवा फायदा नसतानाही विकृत विचारसरणीमुळे बळीचे नुकसान घडवून आणले आहे.
रक्षकः- ज्या व्यक्तीने गुन्हेगाराला गुन्हा घडविण्यापासून आणि बळीला नुकसान होण्यापासून रोखले आहे किंवा तसा प्रयत्न केला आहे.
इतरः- या मध्ये उरलेले सर्व येतात. ते गुन्हा घडतानाचे मूक साक्षीदार असू शकतील. तिथे उपस्थित नसणारे बळीच्या नात्यातले / मित्रपरिवारातले किंवा तसे नसतानाही पण बळीविषयी कळकळ असणारे, किंवा या सर्वांशी काहीच संबंध नसणारे इतर त्रयस्थ नागरिक हे सर्व या चौथ्या घटकात येतात.

आता काही काळ बलात्कार हा गुन्हा बाजूला ठेवू. इतर कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्याचा विचार करू, जसे की चोरी.

एका व्यक्तीच्या स्कूटरच्या डिकीतून एक लाख रुपये चोरी झालेत. आता या प्रकरणात चोर हा गुन्हेगार. ज्याच्या डिकीतून रक्कम चोरी झाली ती व्यक्ती बळी. ती व्यक्ती पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेली म्हणजे पोलीस झाले रक्षक आणि उरलेल्या इतरांमध्ये त्या व्यक्तीचे काही हितचिंतक - जसे की त्या व्यक्तीचे सहकारी, नातेवाईक, मित्र इत्यादी. याशिवाय इतर त्रयस्थ म्हणून आपण ही बातमी वर्तमानपत्रात वाचणारे वाचक यांना धरूयात. आता सर्वांच्या या घटनेवर प्रतिक्रिया काय असतील ते बघूयात.

इतर त्रयस्थ वाचक वगैरे मंडळी मनात किंवा उघड एकमेकांशी म्हणतील - "काय माणूस आहे? स्कूटरच्या डिकीत एवढी रक्कम ठेवून स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केलीच कशी काय? " गंमत म्हणजे साधारण याच आशयाचे वक्तव्य त्या व्यक्तीशी त्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र आणि अगदी तक्रार नोंदवून घेणारे पोलिस देखील करतील.

समजा घटनेतला चोर सापडला तर तोही असेच सांगेल की "स्कूटर बाहेर रस्त्यावर उभी होती. डिकीचे झाकण फारच सहज उघडता आले आणि आतली रक्कम पाहून मला मोह झाला व मी चोरी केली. तशी बँकेतली सुरक्षित रक्कम सहजासहजी लुटायचे माझे धाडस होणार नाही पण हे कृत्य फारच सोपे व सहजसाध्य होते म्हणून मी केले. "

तसे पाहता बँकेतली सुरक्षित म्हणविल्या जाणाऱ्या अभेद्य तिजोरीतली रक्कम देखील लुटली जातेच पण म्हणून स्कूटरमध्ये एक लाखाची रक्कम ठेवणाऱ्याचे समर्थन कसे होऊ शकेल. तसेच बँकेतली रक्कम चोरणाऱ्याला निश्चितच शिक्षा जास्त होणार कारण त्याच्या गुन्ह्यात बळजबरीने तोडफोड (रॉबरी विथ फोर्सफूल हाऊसब्रेकिंग) झालेली असेल. याउलट स्कूटरच्या डिकीतून रक्कम घेऊन पसार होणारा भुरटा चोर समजला जाईल.

आता बलात्काराच्या घटनेत काय होते तर रक्षक जे सर्व वेळी सर्व ठिकाणी संरक्षण देऊ शकत नाहीत, इतर जण ज्यांना बळीविषयी आस्था आहे असे सारे जण बळीला काळजी घ्यायला सांगतात. बळी स्वतः ज्या ठिकाणी एकटी स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे तिला तिथे त्यावेळी एकटीला जाऊ नको असे सुचवितात. घटनेतला गुन्हेगार पकडला जातो तेव्हा तोही असेच म्हणतो की त्या ठिकाणी त्या वेळी बळी मला सहज उपलब्ध होती म्हणून मी गुन्हा केला. तसे पाहता बिहार, उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी घरात घुसून महिलांवर खुलेआम अत्याचार करणारे, तेवढी ताकद असणारे गुन्हेगार आहेतच की पण दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे निवासी क्षेत्र बऱ्याच अंशी सुरक्षित आहे अशा शहरांत निर्जन स्थळी अवेळी एकट्या दुकट्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशा गुन्हेगारांची मात्र त्या महिलेला घरात घुसून त्रास देण्याची क्षमता नक्कीच नसते.

प्रत्येक व्यक्तीकरिता काही क्षेत्र हे निश्चित सुरक्षित क्षेत्र (सेफ झोन) असते. या क्षेत्राच्या बाहेर त्या व्यक्तिची सुरक्षितता अनिश्चित असते. तेव्हा अशा असुरक्षित क्षेत्रात (अनसेफ झोन) जाऊ नये असा सल्ला देणारे हितचिंतक हे तो सल्ला काळजीच्या पोटी देतात तर बळी त्या क्षेत्रात सापडला म्हणून मी गुन्हा केला असे म्हणणारे गुन्हेगार हे स्वतःच्या बचावाच्या जाणिवेतून किंवा त्यांच्यात तेव्हा गुन्हा करण्याची इच्छा कशी झाली त्याचे स्पष्टीकरण देतेवेळी सांगतात पण या दोन्हींच्या उद्देशातला फरक कुणी समजून घेतच नाही.

आता पुन्हा स्कूटरच्या डिकीतून लाख रुपयांच्या चोरीचे उदाहरण पाहू. रक्षक व इतरांनी चोरी होण्याचे कारण हे रक्कम चोरास सहजसाध्य होती असे सांगितले. चोराने देखील हेच सांगितले. मग चोर, रक्षक व इतर एकाच मानसिकतेचे झालेत का? बळीने इतरांना असे सांगावे का तुम्ही मला का सांगताय की मी रक्कम सहजसाध्य ठिकाणी ठेवू नये. माझी स्कूटर आहे, माझी रक्कम आहे. मला डिकीत ठेवायचे स्वातंत्र्य का नाही? त्यापेक्षा तुम्ही चोरावर संस्कार करा की त्याने दुसऱ्याच्या वस्तुला हात लावू नये. बळीने असे विधान केले तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का या घटनेमध्ये?

मग बलात्काराच्या घटनेमध्ये रक्षक व इतर जण जेव्हा आपुलकीपोटी महिलेला सांगतात की बाई तू रात्री बेरात्री एकटीदुकटी फिरू नको. तर ती बळी ठरलेली किंवा संभाव्य बळी ठरू शकणारी इतर कोणतीही महिला लगेचच रक्षक व इतरेजनांनाही त्या गुन्हेगाराच्याच मानसिकतेचे ठरविते. तुम्ही माझी काळजी करण्यापेक्षा, मला रात्री बेरात्री फिरण्याचे, आवडीचा पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य नाकारण्यापेक्षा त्या गुन्हेगाराला संस्कार द्या असे सांगते.

स्कूटरच्या डिकीतून रक्कम चोरी होण्याच्या प्रकरणात बळी हे मान्य करतो की रक्षक व इतरेजन हे आपल्याला सल्ला आपल्या आपुलकी पोटी देत आहेत. ते व गुन्हेगार एका बाजूला नसून व ते आपल्या बाजूला आहेत व गुन्हेगार विरुद्ध बाजूला आहे. फक्त प्रत्येकच ठिकाणी आपल्याला इतरांकडून संरक्षण मिळणे अशक्य आहे तेव्हा तिथे आपली आपणच काळजी घ्यायची आहे व जिथे ते शक्य नसेल ते क्षेत्र टाळायचे आहे.

बलात्काराच्या घटनेमध्ये मात्र बळी फक्त महिलाच पडू शकतात आणि गुन्हेगार फक्त पुरूषच असू शकतात म्हणून त्या घटनेकडे एका बाजूला बळी + रक्षक + इतरेजन आणि विरुद्ध बाजूला गुन्हेगार असे सारासार न पाहता सरळ सरसकटीकरण करून एका बाजूला स्त्री (बळी व संभाव्य बळी) व विरुद्ध बाजूला पुरूष (गुन्हेगार व संभाव्य गुन्हेगार) इतक्या बेजबाबदारपणे पाहिले जाते. स्त्रीला आपुलकीपोटी सल्ले देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला संभाव्य गुन्हेगार समजले जाते. आम्हाला आपुलकी दाखविण्याऐवजी गुन्हेगार पुरुषच आहे म्हणजे तुमच्याच गटातला आहे तेव्हा त्याला संस्कार द्या असे सांगणाऱ्या महिलांना हा फरक ज्यादिवशी समजेल की सर्व पुरुष एकाच गटातले नसतात त्या दिवसापासून वेगळा महिला दिन करायची गरज पडणार नाही असे वाटते.

ता. क. :- बलात्कारासंबंधाने स्त्रियांच्या पोशाखाविषयी अभिप्राय व्यक्त करणाऱ्या पुरुषांना महिलांच्या संघटीत रोषास बळी पडावे लागले परंतु याच स्त्रियांना हे ठाऊक नाही काय की सिंधूताई सपकाळ या एका नामवंत महिलेनेच "आजच्या मुली असा पोशाख घालतील तर बलात्कार होणार नाहीत तर काय चमत्कार होतील काय? मी या वयातही अशा प्रकारे लुगडे नेसते की माझी टाच देखील दिसत नाही" असे वक्तव्य एकदा नव्हे तर अनेकदा व तेही जाहीररीत्या केले आहे.

बलात्काराला विरोध झाला नसता तर आम्ही तिचा खून केला नसता, तिने शांतपणे बलात्कार होऊ द्यायला हवा होता. या मुकेश सिंहच्या वक्तव्याने तर आगीत तेल ओतले गेले. प्रत्यक्षात हे प्रकरण झाल्यावर काहीच दिवसांत नेमके असेच वक्तव्य महिला शास्त्रज्ञ डॉ अनिता शुक्ला यांनी देखील केले होते तेव्हा त्यांच्यावर देखील टीका झाली होती. कायदा सुव्यवस्था व व्यक्तिस्वातंत्र्याकरिता ज्याचे जगात आदराने नाव घेतले जाते अशा अमेरिका ह्या देशांतही तुम्हाला शिकागोसारख्या शहरांत एखाद्या विशिष्ट वर्णाच्या गुन्हेगाराने अडविले तर आपल्या जवळील रक्कम, मौल्यवान वस्तू विनाप्रतिकार त्याच्या हवाली करा. प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका असा सल्ला आणि तोही तिथल्या पोलिसांकडून आजच्या काळातही दिला जातो. या सल्ल्याविषयी कधी कुणी हरकत घेतल्याचे अथवा असा सल्ला देणारे गुन्हेगारांच्याच मानसिकतेचे असल्याचा आरोप केल्याचे ऐकिवात नाही.

============================================================================
पुरवणी स्पष्टीकरण लेखनः- सुरुवातीच्या काही प्रतिसादांना मी माझ्या प्रतिसादात्मक लेखनातून नेमके स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरीही असे निदर्शनास आले आहे की, पुन्हा नव्याने प्रतिसाद देणारे अनेक प्रतिसादक माझ्या लेखाखालील प्रतिसादांमधील स्पष्टीकरणास न वाचता पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यांवर आक्षेप घेत आहेत ज्या मुद्यांवर आधीच इतर प्रतिसादकांचे आक्षेप घेऊन झाले आहेत व मी त्याचे स्पष्टीकरण केले आहे. तरी नवीन वाचकांकरिता हे माझे प्रतिसादात असलेले स्पष्टीकरण इथे लेखातच समाविष्ट करीत आहे. अर्थात काही प्रतिसादक तर लेखही पूर्ण न वाचताच प्रतिसादांतून आक्षेप घेत आहेत, त्यांच्या समाधानाकरिता मी काहीच करू शकत नाही.
============================================================================

इथे तूलना पैसे आणि स्त्री अशी किंवा चोरी आणि बलात्कार अशी नसून कुठल्याही गुन्ह्यातील बळींचे होणारे नुकसान व त्यांचे तसे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना रक्षक व इतरेजनांनी दिलेला सल्ला अशी आहे. इतर गुन्ह्यांमध्ये रक्षक व इतरेजनांनी बळींना (अथवा संभाव्य बळींना) दिलेला खबरदारीचा सल्ला गांभीर्याने ऐकला जातो. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये / गुन्हा होऊ नये म्हणून दिला जाणारा सल्ला रोषपात्र होतो इतकेच नव्हे तर सल्ला देणार्‍याची मानसिकता चूकीची असल्याचे सांगितले जाते.

<< चोरी करुच नये असे संस्कार करणे आणि घरात आपली आई, बहिण, वहिनी म्हणुन वावरत असलेल्या स्त्रीचा मान ठेवणे असे संस्कार करणे यात फरक आहे असे मला वाटते. आपल्या समाजात चोरी करु नये हा पाठ्यपुस्तकी धडा निदान नावाखातर दिला तरी जातो पण तुमच्या आई-बहिणीला थोडाफार मान द्या हे अजिबात सांगितले जात नाही. >>

ज्याविषयी लेख लिहीलाय तो मुद्दाच ध्यानात घेतलेला नाहीये. चोरी करू नका हे सर्वांना शिकविले जाते. काही जण ते पाळतात इतर काही पाळत नाही. जे पाळत नाहीत त्यांना आपण बदलू शकत नाही तर निदान त्यांच्यापासून सावध राह्यला हवे. असा सावधगिरीचा सल्ला देणारा चोरीचा साथीदार नक्कीच नसतो.

स्त्रियांना मान देण्याचेही पाठ्यपुस्तकांतून शिकविले जातेच की. निदान महाराष्ट्रात तरी इतिहासात प्रत्येकाला शिवाजी महाराजांचा कल्याण च्या सुभेदाराच्या सूनेला आई मानुन सन्मानाने परत पाठविण्याचा पाठ नक्कीच माहित आहे. तरीही सर्वजण हा पाठ ध्यानात ठेवत नाहीत. ज्यांची बलात्कार करायची प्रवृत्ती आहे ते तो करतात. त्यांच्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारे नक्कीच त्यांचे समर्थक नसतात हे समजून न घेतल्यास संभाव्य नुकसान कुणाचे हे पुन्हा वेगळे सांगण्याची गरज नाहीये.

माझ्या लेखावर पहिली प्रतिक्रिया देणारे श्री. प्रकाश घाटपांडे साहेब हे पुर्वी पोलिस दलात होते तेव्हा त्यांच्या मताला इथे मी विशेष महत्त्व देतो.

ता. क. :- काल दुपारी चार वाजता आम्ही सहा पुरुष व एक महिला माझ्या वाहनातून निगडीहून लवासास गेलो. जातेवेळी हिंजवडी मार्गे गेलो होतो. येताना लवासाहून निघण्यास रात्रीचे साडे अकरा वाजले. सव्वा बाराच्या सुमारास पिरंगुट येथे पोचलो असता मी पुन्हा हिंजवडी मार्गेच जाण्याचा आग्रह धरत होतो. परंतु इतर सर्वच्या सर्व जणांना रस्त्याने परतताना चहा पिण्याची तल्लफ आली होती व हिंजवडी मार्गाने कुठलेही हॉटेल उघडे नसल्याने त्यांना चांदणी चौक मार्गे यायचे होते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे भूकुम / भूगाव परिसर फारसा सुरक्षित नसल्याने मला त्या मार्गे येणे प्रशस्त वाटत नव्हते. शेवटी सहा विरुद्ध एक अशा मतांनी माझा पराभव होत वाहन अखेर चांदणी चौक मार्गेच नेण्यास सुरुवात केली. वाटेत भूकुम व भूगाव च्या दरम्या एक चारचाकी वाहन व काही दुचाकी यांच्यात अपघात झाला असल्याने मोठ्या संख्येने दुचाकी स्वार तिथे जमा होऊन तेथून जाणार्‍या चारचाकी वाहनांची तोडफोड व प्रवाशांस मारहाण करीत होते. मी हे दुरून पाहिले परंतु मागे फिरणे अशक्य असल्याने चटकन वाहन रस्त्याच्या खाली मातीवर आणले तसेच रस्ता सोडून काही अंतर पार केले. त्या समाजकंटकांना अशा प्रकारे लांबूनच वळसा व दंडवत घालत आपली हिरोगिरी न दाखवता मी तिथून चक्क निसटलो. या घटनेत आमच्या सोबतच्या स्त्री प्रमाणेच आम्ही पुरुष मंडळी देखील मारहाणीचे बळी ठरू शकलो असतो. बळी न ठरण्याकरिता त्या क्षेत्राला टाळणे हेच उचित नव्हे का?

शिर सलामत तो पगडी पचास हे पूर्वजांनी सांगितलेले सूत्र महत्त्वाचे. शिवाय माझा पूर्वीचा अनुभव देखील मला हेच सांगतो. १९९६ साली मी मुंबई पुणे रस्त्याच्या बाजून शिवाजीनगर रेल्वे स्थानकात शिरण्याकरिता तिथल्या बकाल वस्तीत असलेल्या एका जवळच्या मार्गातून पायी जात होतो. वेळ रात्री ९:१५ ची होती. अचानक दोन्ही बाजूंना पत्र्याची घरे असलेल्या त्या अरूंद मार्गात एका अस्ताव्यस्त केस व दाढी वाढलेल्या घाणेरड्या इसमाने माझ्यावर हल्ला केला. मी देखील त्याच्याशी पूर्ण ताकदीनिशी मारामारी केल्यावर तो पळून गेला, पण या गडबडीत माझा चष्मा तुटला. १९९६ साली तीनशे रुपयांचे नुकसान फार मोठे वाटत होते. म्हणून मी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेलो. ते उलट मलाच म्हणाले, "एवढ्या रात्रीचे तुम्हाला तिथून जायची काय गरज होती? आम्ही कसं शोधणार त्याला? त्या वस्तीत तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे पन्नासएक जण तरी सापडतील. गर्दुल्ले असतात ते. नशीब समजा तुमचं जिवंत आहात आणि विशेष म्हणजे काही इजादेखील झाली नाहीये तुम्हाला. चष्म्याच्या नुकसानीचं काय घेऊन बसलात? डोळे फुटले नाहीत हीच त्याचे आभार मानण्यासारखी गोष्ट आहे." मी पुढे अनेकांना हे अन्यायकारक असल्याचे बोलून दाखविले. परंतु पोलिसांचा सल्ला व्यवहार्य असल्याचे मला अनेकांनी सांगितले. पुढे २००२ साली मी दिल्लीत गेलो असता पुरानी दिल्ली या भागात अनेक ठिकाणी सायंकाळी ७:०० नंतर दुकाने बंद होत असून त्यानंतर स्त्रिया तर सोडाच चांगल्या घरचे पुरुष देखील तिथे फिरकत नाहीत.

कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहेच, पण ती फक्त बलात्कार या गुन्ह्याकरिता नव्हे तर चोरी, खून, वाटमारी, दरोडेखोरी, बेदरकार वाहन चालविणे अशा सर्वच गुन्हेगारी कृत्यांकरिता. सर्वच जण बळी पडू शकतात. कायदा सुव्यवस्था सुधारायची तेव्हा सुधारेल त्याकरिता पाठपुरावा करणे हा वेगळा विषय आहे पण निदान तोपर्यंत आपण बळी पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. मी तर हल्ली पिंपरी चिंचवड नवनगरातून रात्रीचा पायी शक्यतो फिरत नाही आणि फिरावे लागलेच तर अतिशय सावधगिरी बाळगतो कारण प्रत्येकच ठिकाणी चालण्याकरिता पदपथ नाहीत. आहेत तिथे अतिक्रमणे झालेली आणि रस्त्यावरून कितीही कडेने चालले तरी एखादे चारचाकी / दुचाकी वाहन आपल्याला बेदरकारपणे चिरडून जाणार नाहीच अशी खात्री देण्याजोगी परिस्थिती नाही. आता त्यांनी तसे वाहन चालवू नये याकरिता कारवाई करणे आपल्या हातात नाही. ज्यांच्या हातात आहे ते ती करीत नाही. आपण ती केली तर कायदा हातात घेतला म्हणून आपल्यालाच तुरुंगात जावे लागेल. दुर्घटना घडून गेल्यावर त्याला जबाबदार कोण आणि त्याला शासन काय व्हावे ह्या लांबच्या गोष्टी आधी आपल्यासोबत दुर्घटना घडू नये ही खबरदारी घेणे महत्त्वाचे.

**************************************************************************************************************************
इथे स्त्री विरुद्ध पुरुष असे समजणे हेच चूक आहे. इथे गुन्हेगार विरुद्ध बळी असा लढा आहे. गुन्हेगारांमध्ये पुरुषांचा भरणा असला तरी बळींमध्येही पुरुष असू शकतात हे समजून घ्या. निर्भयाच्या घटनेत तिच्या मित्रालाही अमानुष मारहाण झाली होती. तेव्हा कुठल्या पुरुषांच्या मनोवृत्तीतल्या बदलांविषयी आपण सुचवित आहात? पुरुषांमध्येच चांगले आणि वाईट असे दोन ढोबळ गट आहेत. चांगले असं काही करत नाहीत आणि जे वाईट आहेत, अशी कृत्ये करतात त्यांना बदलता येणार नाहीच. चांगल्यांनी आपण वाईटांच्या वाईट कृत्याला बळी पडू नये याविषयी खबरदारी घेणे हाच उपाय. (जोवर कायदा सुव्यवस्था सुधारत नाही निदान तोपर्यंत तरी)

*************************************************************************************************************************

मी २००४ साली अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या साकूर या गावी तीन महिने कामानिमित्त वास्तव्य केले. अल्पकाळाचा अतिथी असल्याने माझी सोय गावाबाहेर असलेल्या शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. तिथून गावातल्या गावात कुठेही जायचे असले तरी एक, दीड किमी पेक्षा जास्त अंतर पार करावे लागत नसल्याने माझ्यापाशी कुठलेही वाहन देण्यात आले नव्हते. सर्वत्र पायीच संचार असे.

गावातले नव्वद टक्के लोक हे मांसाहार करणारे असल्याने बुधवारी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मांसाची विक्री होत असे. नंतर उरलेली घाण बाजार भरतो त्या आवारात फेकून देण्यात येत असे. सायंकाळी बाजार संपल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात (संख्येने सहज पन्नास एक तरी असायचे) भटकी कुत्री त्या उरलेल्या घाणीचा फडशा पाडण्याकरिता जमत व मग मध्यरात्रीपर्यंत त्यांचा धुमाकूळ चाले. गावातल्या कुणाला याचा फारसा त्रास नव्हता कारण त्यांना तिकडे फिरकण्याचे कारण नसायचे. मला मात्र त्याच रस्त्याने गावात जावे लागायचे त्यामुळे मला भयानक उपद्रव होत असे. ती कुत्री (त्यात काही पिसाळलेली देखील असावीत)अंगावर धावून येत. त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता मी एका माजी सैनिकाकडून छर्‍याची बंदूक मिळविण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु गावच्या लोकांचा विरोध होता. त्यांच्या मते ही कुत्री खंडोबाचा अवतार, त्यांना मारणे पाप उलट त्यांचे पोट भरावे म्हणून मुद्दामच तिथे मांसाचे तुकडे व हाडे टाकण्यात येत.

कुत्र्यांना मारणे मला अशक्य असल्याने शेवटी मीच बुधवारी रात्री सायंकाळी ०७:०० नंतर बाहेर जाणे टाळायचो. विश्वास ठेवा कुत्र्यांना मारणे मला शक्य असते तर मी तेच केले असते परंतु केवळ तो पर्याय उपलब्ध नसल्यानेच स्वतःची काळजी म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेणे मला सोयीस्कर वाटले.

सहसा हिंसक जनावरांना पिंजर्‍यात ठेवले जाते. परंतु कधी अशी वेळ येते की हिंसक जनावरे मुक्तपणे मोठ्या संख्येने तुटून पडतात. स्वतःचे रक्षण करण्याची पुरेशी क्षमता नसल्याने मग माणसेच एका रिकाम्या पिंजर्‍यात जाऊन बसतात आणि स्वतःला त्या हिंस्त्र जनावरांपासून सुरक्षित ठेवतात असे एका इंग्रजी चित्रपटात पाहिल्याचे आठवते.

बलात्कार व इतर कुठलेही गुन्हे करणारे हे गुन्हेगार या पिसाळलेल्या कुत्र्यांसारखे किंवा हिंस्त्र जनावरांसारखेच आहेत. त्यांना ठार मारण्याची अनुमती कायदा आपल्याला देत नाही (वर एका प्रतिसादकाने लिहीले आहेच की अरूणा शानबागचा अपराधी केवळ सात वर्षांची शिक्षा भोगून मोकाट फिरतोय. तो इतर महिलांकरिताही तितकाच धोकादायक आहे, पण आपण काही करू शकत नाही) व स्वतः कायदादेखील त्यांचा पुरेसा बंदोबस्त करू शकत नाही. शिवाय त्यांच्यापासून बचाव करणेही तितकेसे स्वस्त नाही (निर्भयाच्या नावाने खास महिलांकरिता काढलेले एक पिस्तुल साधारण लाख रुपयांच्या आसपास आहे. किती जणींना ते परवडू शकेल? असो).

तेव्हा आपल्या हातात जे पर्यायनिवडीचे मर्यादित स्वातंत्र्य त्यात काय करता येईल हे या लेखात लिहीले आहे. गुन्हेगाराने शहाणे व्हावे, सरकारने त्यांना वठणीवर आणावे वगैरे अपेक्षा आहेतच. पण त्या पूर्ण होतील असे मानणे भाबडेपणा आहे. आपणाला काय करता येईल तेवढेच आपण करू शकतो. इतरांच्या कृती आपल्या मर्जीनुसार आपण करवून घेऊ शकत नाही.

**************************************************************************************************************************
लेख व त्याखालील प्रतिसादात्मक लेखन यांमधून मी कुठेही स्त्रीची वस्तुबरोबर तूलना केलेली नाही. कुणाला तसे वाटत असल्यास तो त्या वाचकाचा निव्वळ गैरसमज आहे. मी गुन्हेगार / हल्लेखोराच्या मानसिकतेचे विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे. स्त्री / पुरुष यापैकी कुणाजवळही मौल्यवान चीजवस्तू असेल तर गुन्हेगार हल्ला करू शकतो. यावेळी त्यांच्यावर चीजवस्तूच्या गमावण्याबरोबरच जीवितहानीचा देखील धोका असतो. स्त्रीजवळ मौल्यवान चीजवस्तू नसतानादेखील गुन्हेगार हल्ला करू शकतो - कारण अर्थातच गुन्हेगाराला तिच्या शरीराचा तिच्या मर्जीविरुद्ध उपभोग घ्यायचा असतो. तेव्हा गुन्हेगार / हल्लेखोरापासून स्त्री व पुरुष दोघांनीही सावध राहण्याची गरज आहे. स्त्रियांनी थोडे अधिक प्रमाणात.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दरवेळी ही सावधगिरी ती व्यक्तीच बाळगेल असे नाही तर तिच्या वतीने इतर कोणीतरी. सहसा लहान मुलांच्या वतीने त्यांचे पालक, स्त्रियांच्या वतीने त्यांचे आईवडील, भाऊ अथवा पती. त्यामुळेच लहान मुलांसोबत दुर्घटना घडली तर समाज त्यांच्या पालकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवतो आणि स्त्रियांसोबत असे काही घडले तर त्यांच्या आईवडिलांवर, भावावर किंवा पतीवर. याच कारणास्तव स्त्रियांचे पालक, पती त्यांना संरक्षण पुरवितात, सोबत येतात जे काही स्त्रियांना पारतंत्र्य वाटते.

आता ही सावधगिरी तुमच्या वतीने एखादी व्यावसायिक संस्था देखील घेते. जसे की, प्रवासी मोठ्या विश्वासाने एखाद्या नामवंत टॅक्सी एजन्सीला फोन करून टॅक्सी बुक करतात तेव्हा त्या टॅक्सीचा चालक गैरवर्तन करणार नाही ही सावधगिरी प्रवाशाच्या वतीने घेणे हे त्या टॅक्सी एजन्सीचे काम असते. जर टॅक्सी एजन्सीने ते केले नाही तर त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. उबेर टॅक्सी एजन्सीवर याच कारणाकरिता ठपका ठेवला गेला जेव्हा त्यांच्या एका चालकाने प्रवासी महिलेसोबत भयंकर वर्तन केले. या प्रकरणी वातावरण ढवळून निघावे इतका प्रचंड जनक्षोभ उसळला होता.

पण त्याच दरम्यान याच्या अगदी उलट झाले होते तेव्हा समाजाची संवेदनशीलता कुठे हरविली होती? जरा खाली दिलेल्या लिंकवरील बातमीकडे देखील लक्ष द्या.

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/pune-murder-kiran-sona...

http://aplapune.com/defaultcontroller/detail/1485

किरण नारायण सोनवणे (वय २८, रा. दादाची वस्ती, लोहगांव) या चालकाने आपणांस चांगला व्यवसाय मिळण्याच्या आशेने ओला टॅक्सी एजन्सीत नाव नोंदविले. १४ डिसेंबर रोजी ओला कंपनीतून त्यास भाडे देखील मिळाले. प्रत्यक्षात या प्रवाशांनी त्याचा खून करून त्याची झायलो टॅक्सी पळविली.

उबेर कंपनीच्या चालकाने महिला प्रवाशासोबत अपराध केला तर उबेर चा परवाना रद्द करण्यापर्यंतची वेळ आली आणि दुसरीकडे ओला च्या प्रवाशांनी चालकाचा खून करून त्याची टॅक्सी पळविली तरी समाजात काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. हा समाजाचा दुटप्पीपणा नव्हे काय? याचे कारण असे आहे की समाजाने काही गोष्टी ठरवून टाकल्या आहेत. स्त्री विरुद्ध पुरुष प्रकरणात स्त्रीच्याच बाजूने आंदोलन केले पाहिजे. प्रवासी विरुद्ध चालक प्रकरणात प्रवाशाच्याच बाजूने आंदोलन केले पाहिजे. स्त्री + प्रवासी असेल तर दुप्पट संवेदनशीलता दाखवायला हवी. पुरुष + चालक असेल तर अजिबात संवेदनशीलता दाखवायची गरज नाही. महिला प्रवासी बळी पडली तर हाय तोबा करणार्‍यांना पुरुष चालक बळी पडला त्याचे सोयरसूतक अजिबात नसते का? का हा सगळा असा प्रकार आहे की, पुरुषावर हल्ला करणारे पुरुषच होते आणि तुम्ही पुरुष - पुरुष आपापसांत बघून घ्या, आम्हाला काय त्याचे? बळीही तुम्हीच आणि गुन्हेगारही तुम्हीच तेव्हा आम्ही काय यात मध्ये पडणार?

अशी जर कुणाची मानसिकता असेल तर त्यांच्या माहितीकरिता पुण्यातील एक प्रकरण सांगतो. डॉ. महाजन नावाच्या एका सद्गृहस्थाची दोन महिलांनी अपहरण करून हत्या केली व त्याचे प्रेत तुकडे तुकडे करून कात्रजच्या घाटात टाकले व नंतर त्याच्या कुटुंबियांकडे खंडणी मागितली.

कालचीच एक बातमी अशी, दोन स्त्रियांनी दागिन्यांकरिता एका महिलेचा गळा आवळून खून केला.

तर लेखाचे तात्पर्य असे की,
गुन्हेगार पुरुष आणि बळी स्त्री,
गुन्हेगार पुरुष आणि बळी पुरुष,
गुन्हेगार स्त्री आणि बळी स्त्री,
किंवा
गुन्हेगार स्त्री आणि बळी पुरुष

यापैकी कुठलीही शक्यता असू शकते. इथे स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नसून चांगला विरुद्ध वाईट अशी लढाई आहे. प्रत्येकच वेळी जो कुणी संभाव्य बळी ठरण्याची शक्यता असते त्याने आवश्यक ती खबरदारी / सावधगिरी बाळगली पाहिजेच.

लेख लिहीताना -

  1. इंडियाज् डॉटर आणि महिलादिनाचा संदर्भ होता
  2. तसेच जेव्हा गुन्हेगार पुरुष आणि बळी स्त्री असते तेव्हाच कायदा सुव्यवस्थेवर आणि एकूणच समाजरचनेवर जोरदार टीका होते ह्या अनुभवाची पार्श्वभूमी होती.
  3. तूलनेने सामान्य पुरुष (इथे डॉ. दाभोळकर किंवा कॉ. पानसरे या प्रसिद्ध व्यक्तिंना तूर्तास बाजूला ठेवले आहे) बळी पडतात त्याप्रकरणी फारशी निदर्शने आणि समाजमन ढवळून निघाल्याचे दिसले नसल्याचा अनुभव आहे.

यामुळे बळी पडणार्‍या स्त्रियांना नजरेसमोर ठेवून काही त्यांच्या हिताच्या बाबी सुचविल्या होत्या. बळी पडू शकणार्‍या पुरुष मंडळींना देखील ही सावधगिरी घेणे अर्थातच लागू पडतेच (वर माझे स्वतःचे लवासाहून रात्री उशिराने परतीच्या प्रवासाचे व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे सायंकाळी घराबाहेर न पडण्याचे उदाहरण दिले आहेच). परंतु कुठेतरी फक्त महिलांचे स्वातंत्र्य संकुचित केल्याच्या थाटात काही आक्रमक प्रतिसाद आल्याने हे पुरवणी स्पष्टीकरण जोडावे लागले.

============================================================================
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दीपिका पदुकोणच्या माय चॉईस या व्हिडीओ विषयी:-

<< ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा. >>

मी तो व्हिडीओ पाहिला. मला अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्‍या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.

दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.

स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.

या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्‍यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्‍याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्‍या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर लेखाचे तात्पर्य असे की,
गुन्हेगार पुरुष आणि बळी स्त्री,
गुन्हेगार पुरुष आणि बळी पुरुष,
गुन्हेगार स्त्री आणि बळी स्त्री,
किंवा
गुन्हेगार स्त्री आणि बळी पुरुष

यापैकी कुठलीही शक्यता असू शकते. इथे स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नसून चांगला विरुद्ध वाईट अशी लढाई आहे. प्रत्येकच वेळी जो कुणी संभाव्य बळी ठरण्याची शक्यता असते त्याने आवश्यक ती खबरदारी / सावधगिरी बाळगली पाहिजेच.

वर जे पुरवणी स्पष्टीकरणात लिहीले होते त्या अनुषंगाने आजच एक बातमी वाचनात आली.

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=04/01/2015&pageno=1&editio...

विद्यार्थ्यावर महिलेचे लैंगिक अत्याचार !
तीन दिवसांनंतरही ना गुन्हा, ना कारवाई
आत्महत्येची होती तयारी
बेशुद्ध पाडून छळ : जबरदस्ती केला वैदिक विवाह

शीतपेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळून एका ४0 वर्षीय महिलेने दहावीतल्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. इतक्यावरच न थांबता या महिलेने ते क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. त्या जोरावर तिने शारीरिक मुलावर अत्याचार सुरूच ठेवले. तुझ्यासकट कुटुंबाला संपवेन, अशी धमकी देत या महिलेने त्या कोवळ्य़ा मुलासोबत नवी मुंबईतल्या एका मंदिरात लग्नही केले.
हा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला. महिलेच्या अत्याचारापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्याने तक्रार देऊन तीन दिवस लोटले, तरी अद्याप चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदविलेला नाही. चौकशी करू आणि मग कारवाई करू, असे सांगून पोलिसांनी या विद्यार्थ्याची व त्याला पोलीस ठाण्यापर्यंत आणणार्‍या त्याच्या वडिलांची बोळवण केली. आरसीएफ पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरात हा विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. याच परिसरात आरोपी महिलेचेही घर आहे. हा विद्यार्थी आणि आरोपी महिलेचा मुलगा मित्र. घट्ट मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी त्यांची ये-जा होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हा विद्यार्थी मित्राला शोधण्यासाठी त्याच्या घरी गेला. मित्र घरी नव्हता. मात्र त्याच्या आईने विद्यार्थ्याला थांबवून ठेवले. शीतपेय प्यायला दिले. ते पिताच विद्यार्थ्याची शुद्ध हरपली. ही संधी साधत महिलेने त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. या गडबडीत महिलेने विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो आपल्या मोबाइलने काढले. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेल्या विद्यार्थ्याला घडला प्रकार लक्षात आला. त्याने विचारणा केली तेव्हा महिला भडकली. तिने त्याला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर ती रोजच या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करू लागली.
मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र दहावीच्या परीक्षेचे टेन्शन असल्याचे सांगून तो वेळ मारून नेत होता. काही दिवसांनंतर त्याने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली. त्यानुसार त्यांनी आरसीएफ पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. मात्र त्यावेळी महिलेच्या तक्रारीला घाबरून मुलाने पोलिसांसमोर तोंड उघडले नाही. त्यामुळे पोलिसांनीही या महिलेला समज देत सोडून दिले.
त्यानंतर तर या महिलेचा कहर आणखी वाढला. ती विद्यार्थ्याला बाहेर विविध ठिकाणी भेटू लागली. त्याच्यावर अत्याचार करू लागली. तिने नवी मुंबईतील एका मंदिरात जाऊन या मुलासोबत जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर ती मुलाला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागली. तिची मागणी पूर्ण करण्यासाठी हा विद्यार्थी घरी चोर्‍या करू लागला.
मात्र काही दिवसांनी त्याने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्याने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.

आत्महत्येची होती तयारी
आरोपी महिलेने या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने अनेक दिवस ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र महिलेचा अत्याचार वाढतच असल्याने या मुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने घरात एक सुसाइड नोट देखील लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने आपल्या मृत्यूला ही महिलाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र ही नोट त्याच्या आईच्या हाताला लागल्याने तिने तत्काळ त्याच्या वडिलांना ही बाब सांगितली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुलाचे वडील रोजच त्याच्यासोबतच राहतात. तीन दिवसांनंतरही ना गुन्हा, ना कारवाई विद्यार्थ्याचा जबाब नोंदवून तीन दिवस लोटले तरी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदविला नाही. अल्पवयीन मुलांच्या तक्रारी प्राधान्याने व गांभीर्याने हाताळा, असे आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. मात्र आरसीएफ पोलीस या तक्रारीबाबत गंभीर दिसत नाहीत. तक्रारदार अल्पवयीन असल्याने या प्रकरणात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांना तत्काळ गुन्हा नोंदवून तपास करणे अपरिहार्य आहे. असे असूनही पोलीस चौकशीच्या नावाखाली गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत. आमच्याकडे मुलाच्या वडिलांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आम्ही मुलाचा जबाब नोंदवून घेतला आहे. चौकशी सुरू असून, लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल. - दिलीप राऊत, वरिष्ठ निरीक्षक, आरसीएफ

धक्कादायक बातमी ! अजुन याच्यावर फारशी चर्चा झाल्याचे वाचण्यात, बघण्यात आलेले नाहीय. अशीच एक विचित्र बातमी काही काळापुर्वी माझ्या वाचण्यात आली.

N_Clip_2Mn01.jpg

खरंच, कोण कुणाला कधी बळी बनवेल सांगता येत नाही

धन्यवाद चौथा कोनाडा,

तुम्ही दिलेल्या बातमीतली तक्रार सहसा महिलेकडून पुरुषाविरुद्ध केली जाते. या ठिकाणी पुरुषाने अशी तक्रार केली आहे. अनेकदा पुरुष अशी तक्रार करणं कमीपणाचं समजतात व तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करतात. इथे हा पुरुष अशी तक्रार करण्यास पुढे सरसावला आहे हे उदाहरण स्वागतार्ह आहे.

====================================================================================

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दीपिका पदुकोणच्या माय चॉईस या व्हिडीओ विषयी:-

<< ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा. >>

मी तो व्हिडीओ पाहिला. मला अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्‍या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.

दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.

स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.

या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्‍यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्‍याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्‍या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Pages