आधुनिक सीता - २७

Submitted by वेल on 27 January, 2014 - 06:28

bhaag 26 - http://www.maayboli.com/node/47220

रफिकच्या नातेवाईक बायकांचा आनंदोत्सव चालूच होता. माझे जेवून आणि प्रार्थना करून झाल्यावर बडी अम्मीने मला झोपायला जाण्यास सांगितले. गरोदर असल्याने फार जागरण करू नये, याउलट सकाळी लवकर उठावे असे तिचे मत होते. माझे मत काय होते, मला काय हवे होते हे व्यक्त करण्याची संधी कुठेच नव्हती. सोन्याच्या पिंजर्‍यातला पक्षी झाले होते मी. पुन्हा एकदा विचार करून करून माझे डोके दुखू लागले. डोके चेपून पाहिले, पण दुखायची थांबेनाच. मग फातिमाची वाट पाहात बसले, ती आली की तिच्याकडे डोकेदुखीसाठी काहीतरी गोळी मागायची.

"फातिमा, आय अ‍ॅम हॅविंग हेडेक. कॅन यु गिव्ह मी मेडिसिन?"
"मेडिसिन? व्हाय? व्हॉट हॅपण्ड"
"हेडेक, माय हेड इज पेनिंग"
"श्श्श.. टॉक स्लो. यु प्रेग्नण्ट. नो मेडिसिन बडी अम्मी स्कोल्ड मी. यु रीड कुराण. हेडपेन गो."
"फातिमा प्लीज. आय विल क्राय नाउ. गिव्ह मी मेडिसिन."
"श्श्श... नो शाऊट. नो क्राय. यु क्राय रफिक अँग्री. आय गिव्ह यु मेडिसिन. नो टेल एनिवन. प्लीज. प्लीज. नो टेल."
फातिमाने मला कसली तरी गोळी आणून दिली. मी ती गोळी घेऊन नुसती बसून होते. मनात विचारांनी फेर धरला होता. सागरसोबत माझं लग्न ठरल्यापासूनचा सगळा काळ सगळे प्रसंग माझ्या भोवती नाचत होते. आणि मला जोराचा हुंदका फुटला. मला रडताना पाहून फातिमाने घाईघाईने दरवाजा बंद केला.
"सकिना, व्हाय क्राय. हेड्पेन नॉट गो? प्लीज नो क्राय. रफिक अ‍ॅंग्री."
फातिमाच्या बोलण्यासोबत माझे हुंदके अजून वाढले."
"सकिना नो क्राय प्लीज नो क्राय. व्हाय यु क्राय? रफिक लव यु सो मच. डू सो मच फॉर यु. व्हाय क्राय. ही नो लव मी. ही लव यु. आय क्राय. यु नो क्राय प्लीज नो क्राय. "
मी चमकून तिच्याकडे पाहिले. रफिकच फातिमावर प्रेम नाही? आणि माझ्यावर आहे?
"फातिमा, आय डोण्ट वॉण्ट टू स्टे हियर, आय डोण्ट वॉण्ट रफिक्'स लव. आय डॉण्ट वॉण्ट धिस बेबी. आय वॉण्ट टू गो बॅक टू माय फॅमिली. इफ आय काण्ट गो बॅक आय वॉण्ट टू डाय. आय डोण्ट वॉण्ट टू स्टे इन धिस जेल. ..." आणि मी काय बोलले मलाच आठवत नाही. पण त्यानंतर तिने मला खूप समजावलं न रडण्याबद्दल, हे असं न बोलण्याबद्दल, तिने मला माझ्या घरच्यांबद्दल विचारलं आई, आजी, बाबा, आजोबा, दादा. माझं शिक्षण माझी नोकरी. सागरचा विषय तिने शिताफिने टाळला मात्र. मी बोललेलं तिला किती कळलं होतं माहित नाही पण घरच्यांबद्दल बोलून मलाच खूप हलकं वाटायला लागलं. हळू हळू मला झोप लागली.

अगदी पहाटे मला फातिमाने उठवलं. सकाळची प्रार्थना म्हणून घेतली. तिनेच मला निकाहसाठी तयार केलं. "प्लीज नो क्राय इन निकाह. आय गिव्ह यु टू इट, यु फील स्लीपी देन यु नो क्राय, बट नो स्लीप. यु स्लीप अम्मी अँग्री, नो स्लीप. " अशी कळकळीची विनंतीसुद्धा केली. तिने मला कसलीतरी खीर खायला दिली, ती खीर खाल्ल्यावर मला झोप आल्यासारखं वाटू लागलं. फातिमा माझ्याशेजारीच होती. तिने सांगितले तेव्हा मी "कुबुल" असे म्हटले आणि रफिकची मी ऑफिशियल बीवी झाले. फातिमाने सांगितल्याप्रमाणे मला खूप झोप येत होती. मला बरं वाटत नाहीये असं सांगून फातिमाने मला निकाहनंतरच्या गोंधळातून बाहेर काढले आणि झोपायला नेले. रफिकच्या कुटुंबियांचा आनंदोत्सव चालूच होता.

मी दर आठवड्याला गायनॅकला भेटत होते. रफिक दर तीन आठवड्याला माझा युएसजी स्कॅन करून घेत होता. त्याने मला मस्करीत असेही म्हटले की त्याला शक्य असते तर त्याने दर चार दिवसांनी युएसजी स्कॅन करून बेबीला पाहिले असते. गायनॅककडच्या प्रत्येक फेरीबरोबर, प्रत्येक युएस्जी स्कॅनबरोबर मला हे बाळ नकोय. देवा माझी सुटका कर अशी भावना मनात वाढीला लागली होती. मला गायनॅकने रोज काय व्यायाम करायचा हे समजावून सांगितले होते. पण कुठले तरी उलटे सुलटे व्यायाम करून अ‍ॅबॉर्शन करून घ्यावं असे विचारही माझ्या मनात येऊ लागले होते. पण फातिमा सलमा आणि रफिकच्या चारही अम्मी सतत माझ्या आजूबाजूला असत. मी वेळच्या वेळी खाते की नाही, गायनॅकने सांगितलेला व्यायाम तसाच्या तसा करते की नाही, वेळच्या वेळी त्यांनी सांगितलेले अन्न खाते की नाही ह्यावर त्यांचे बारीक लक्ष असे. रफिकने आणि मी पोटावर हात ठेवून बाळाशी बोलावे, ह्याबद्दलही रफिकच्या अम्मी आग्रही असत. सतत सूचना सतत फक्त बाळाबद्दलचं बोलणं ह्यामुळे मी कंटाळून गेले होते माझ्यासोबत बाकी काही होऊ दे पण मला हे बाळ जन्मायला नको आहे ही भावना मनात वाढीला लागली होती. मी एकटी असताना स्वतःशीच हे बोलत बसलेली असे. श्लोक, गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं मन लावून चेस खेळणं हे सगळच बम्द झालं होतं. वेळ असेल तेव्हा मी सतत टीव्ही पाहात बसत होते. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझं वजन कमी झालं होतं. गायनॅकने त्याबद्दल चिंताही व्यक्त केली होती. आणि मग रफिकनेही माझ्या जेवणावर स्वतः लक्ष देण्यास सुरुवात केली.

त्या दिवशी रफिक माझ्याजवळ आला त्याचा फोन घेऊन.
"सुनु, कोणीतरी तुझ्याशी बोलतय फोनवर. फक्त कमी जास्त बोलू नकोस. तुला कळतय ना मी काय म्हणतोय"
रफिकने फोन स्वतःच्या हातात ठेवून स्पीकरफोन चालू केला."
"हॅलो"
फोनवर चिरपरिचित आवाज होता.
"सरीता, कशी आहेस ग."
"आजी ..." आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.
"तू आई होणारेस म्हणे"
"आजी तू, तू कशी काय फोनवर, माझा विश्वासच बसत नाहीये कानावर. आजी तू, तूच बोलते आहेस ना. आजी तू फोन केलास? कसा काय ग? तुला नंबर कुठून मिळाला."
"मी नाही फोन केला, रफिकने फोन केला आम्हाला, आणि तुझ्याशी बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं तू आई होणारेस, तू इस्लाम धर्म स्वीकारलास आणी रफिकसोबत निकाह देखील केलास. आम्हाला हेही कळलं की तुझं वजन कमी होतय. आणि तुझ्या डॉक्टरला त्याची भीती वाटते आहे."
'आजी मी काय बोलू ग, मला काही कळत नाही आहे"
"काही बोलू नकोस, तुझ्या मनात काय चालू आहे मला कल्पना आहे त्याची."
"आजी तुला बाबांनी माझ्याशी कसं बोलू दिलं ग. त्यांनी तर पत्रात लिहिलं होतं की..."
"तू काळजी करू नकोस त्याची, तू आत्ता फक्त स्वतःकडे लक्ष दे. मन आनंदी ठेव."
"आजी आइशी बाबाम्शी दादाशी आजोबांशी तुम्हा सगळ्यांशी बोलावसं वाटतं ग, तुम्हाला भेटावसं वाटतं ग."
"तुझ्या आणि देवाच्या मनात असेल आपल्या नशिबात असेल तर आपली भेट कधी तरी नक्कीच होईल."
"आजी परत बोलू का ग आपण?"
"रफिक म्हणालाय दर दोन तीन दिवसांनी तो आम्हाला तुझ्याशी बोलायला देईन."
"आजी खरच?"
"अग आता रफिक म्हणालाय ना मग देईलही कदाचित बोलायला. हे बघ तू जास्त विचार करू नको, स्वत:च्या तब्बेतीची काळजी घे. मन निरोगी तर शरीरही निरोगी. मनाला ताब्यात ठेव. मनाचे श्लोक ऐकत जा, दासबोध वाचत जा. आणि रफिक तसा चांगला माणूस आहे, त्याचं ऐकत जा. चल आता ठेवते फोन. दोन तीन दिवसांनी बोलू परत."
"आजी ..."
आणि रफिकने फोन बंद केला.
"आजीशी बोलून बरं वाटलं का?"
"थोडा वेळ अजून बोलायला मिळालं असतं तर."
"मिळेल मिळेल दोन दिवसांनंतर परत बोल."
"तू आजीला फोन कसा केलास."
"मला असं वाटलं तू घरच्यांशी बोललीस तर तुला बरं वाटेल."
"पण तुला कसं वाटलं आजी बोलेल माझ्याशी. आणि आता बोलले मी त्यांच्याशी तर मग त्यांना कळेल ना मी कुठे आहे कशी आहे. तुला भीती नाही वाटली."
"मुळात तुझं पत्र जेव्हा तुझ्या घरी पाठवलं होतं तेव्हाच मला कळलं होतं की तुला समजून घेणारं आणि शांत राहाणारं तुझ्या आजीइतकं दुसरं कोणी नाही. त्यामुळे घरच्या नंबरवर फोन केला तर तुझ्या आजीनेच उचलला. आणि कोणीच तुला इथे ट्रॅक करू शकत नाही. नंबर रीडायल केला तर कोणालाही लागणार नाही. आणि हे सगळं तुझ्या आजीला सांगूनच मी यांना तुझ्याशी बोलायला दिलं. तू त्यांच्याशी बोलू शकतेस. तुझ्या प्रेग्नंसीबद्दल विचारू शकतेस, त्यांचा सल्ला घेऊ शकतेस. त्यांना तुझ्या प्रेग्नंसीबद्दल सांगू शकतेस फक्त तू कुठे आहेस, कुठल्या डॉक्टरकडे जातेस, अशाबद्दल काहीही सांगायचे नाही."
"रफिक खरच तुझे खूप खूप आभार. खूप बरं वाटतय आजीशी बोलून."
"तुला आजीने काय काय वाचायला सांगितलं आहे ना, ते वाच. तुझी मानसशास्त्राची पुस्तकही तू किती दिवस झाले वाचली नाहीस. आजकाल गाणी सुद्धा ऐकत नाहीस असं ऐकलं मी. तू आनंदी राहयला पाहिजेस, तुझं वजन कमी होऊन नाही चालणार. बेबीला कसलाही धोका झालेला मला चालणार नाही." आणि मग त्याने विषय बदलला आणि तो मला बागेत फिरायला घेऊन गेला.

क्रमशः

पुढील भाग :- http://www.maayboli.com/node/48670

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो माझे पण अनुमोदन. हव तर सगळे भाग लिहुन मग एकत्र किंवा २/३ दिवसांच्या अंतरावर टाकावेत.

काल पुर्ण २७ भाग वाचुन काढले. अगदी मुळची कथा सुद्धा (शेवट खरा असला तरी फारच अस्वथ करुन गेला).
एक विनंती आहे. हि कथा आधुनिक सीते ची आहे. internet/media च्या काळातील आहे. कथेच्या शेवटी नायिकेला नाजुक/कमकुदत 'वेली' सारखं नका दाखवू. तिला मजबूत/चिवटं 'वेली' सारखं दाखवा, जी वेळ प्रसंगी कोणाचा गळा आवळायला ही कमी करणार नाही.

मा. बो. एक नियम केला पाहिजे कि "क्रमश:" कथा ठराविक कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक करावे . (माझ्यामते जास्तीत जास्त १ महिना). कथा अगदिच मोठी असेल तर फार तर २ महिन्यात पुर्ण करायलाच पाहिजे

. बो. एक नियम केला पाहिजे कि "क्रमश:" कथा ठराविक कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक करावे . (माझ्यामते जास्तीत जास्त १ महिना). कथा अगदिच मोठी असेल तर फार तर २ महिन्यात पुर्ण करायलाच पाहिजे>>>>

प्रचंड अनुमोदन!!!!
Proud

<समजा नाही पूर्ण झाली १-२ माहिन्यात तर माबो काय करेल?>

- admin ला ती कथा delete करण्याचा पूर्ण अधिकार राहील आणी वाचकांना ती कथा न वाचण्याचा ….

तुमचा उत्साह गेलेला इ. समजु शकते पण लेखिका काय माबोवर पगारी नोकर आहे का?
माबोवरचा प्रत्येकजण हा आपापली इतर कामे/ प्रायॉरिटीज इ. सांभाळून लेखनाची हौस भागवत असतो.
त्यांनाही काही पर्सनल अडचणी असु शकतात.
त्यामुळे त्या/तीच्यावर २०१३.. २०१४ इ. बोलुन दबाव आणणे मला तरी पटत नाही.

कदाचित अश्या दबावाखाली घाईघाईत पूर्ण केलेली कथा कलाकृती म्हणुन तेवढी छान असणार नाही.

जर तिने कथा १ महिन्याच्या आत पूर्ण करावी असा हट्ट असेल तर अ‍ॅडमीनना विनंती करून तसा ऑफिशिअल नियम आणुयात माबोवर. कारण माबोवर अनेक लेखकांची क्रमशः लिखाणे अपूर्ण आहेत. पण तिथे कोणीही अश्या प्रतिक्रिया दिल्याचे मलातरी आठवत नाही. (कदाचित प्रतिक्रिया देणार्‍यांना मुस्काट्फोड/ थुत्तरफोड प्रत्युत्तर मिळेल याची जाणीव असावी). लेखकांनीही पुढचा भाग कधी याचे काहीही स्पष्टीकरणही दिलेले नाही. इथे मऊ लागतंय म्हणुन कोपराने खणायची गरज नाही.

अर्थातच क्रमशः भाग टाकायला खुप दिवस लावले तर वाचकांचा उत्साह जाऊन वाचकाने कथेकडे पाठ फिरवणे घडु शकते आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी लेखिकेची राहील याची लेखिकेला जाणीव असावी अशी आशा आहे.

त्यामुळे कथा पूर्ण करा अशी लाडीक गळ घालणे वेगळे आणि पूर्ण करत नाही म्हणुन खिल्ली उडवणे/ दबाव आणणे वेगळे. अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. पण वरच्या काही प्रतिक्रिया अजिबात पटल्या नाहीत. त्यामुळे न राहावुन हा प्रतिसाद. (कोणालाही वैयक्तीक उद्देशुन नाही).

<कदाचित अश्या दबावाखाली घाईघाईत पूर्ण केलेली कथा कलाकृती म्हणुन तेवढी छान असणार नाही.> एक दोन महिने कथा रेगाळू शकते। एकदम मान्य …. पण ६ महिने. ऑगस्ट २०१३ ते जानेवारी २०१४ (जरा जास्तच होतात , असे नाही का वाटत?)

रेंगाळलेल्या कथा न वाचणे हे इष्ट. आणि त्या मा. बो. वरून काढून टाकणे हे सर्वात बेस्ट.

अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.

कोणालाही दुखावण्याचा हेतू अजिबात नाहि.

रेंगाळलेल्या कथा न वाचणे हे इष्ट. आणि त्या मा. बो. वरून काढून टाकणे हे सर्वात बेस्ट.

>> हो विप.. पण मग आपण हा नियम सरसकट सगळ्या क्रमशः कथांना घालुयात कि माबोवर.
मीही अश्या अनेक कथांकडे पाठ फिरवलीये वैतागुन. पण लेखक/लेखिकेला वैयक्तीकरित्या बोलणे मला पटत नाही. त्यांच्या वेळ घेण्याने त्यांच्या कथांचा टिआरपी कमी होतो एवढं त्यांचं त्यांना कळत असेलच कि.

विनिता.. वेलला दुखवायचा विचार नव्हता गं

>> मी कोणा एकाला उद्देशुन लिहिलं नाहीये गं. इन जनरल माबोवर सगळ्याच कथांना सारखेच नियम लावा असं म्हणतेय फक्त.

कथा किती वेळ दिवस महिने रेंगाळली याहीपेक्षा प्लॉटमध्ये खूप रेंगाळते आहे असा माझा आक्षेप आहे. कथा पुढे सरकत नाही हे गेल्या कित्येक भागांमध्ये लिहिलेले आहे.व्नवीन भाग आला तर कथा पुढे जाईल अशी आशा आहे.

तुमचा उत्साह गेलेला इ. समजु शकते पण लेखिका काय माबोवर पगारी नोकर आहे का?
माबोवरचा प्रत्येकजण हा आपापली इतर कामे/ प्रायॉरिटीज इ. सांभाळून लेखनाची हौस भागवत असतो.>>>

मायबोलीवर नियमित लिहिणारी लेखिका म्हणून उत्तर द्यायचे झाले तर पगारी नोकर नसला तरी तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सुरू करता तेव्हा वाचकांसोबत एक कमिटमेट देता. ती कमिटमेंट तुम्ही तुमच्या प्रायॉरीटीज सांभाळत पूर्ण करणे अथवा न करणे ही तुमची मानसिकता. पण म्हणून लेखिकलाहीकाही बोलूच नका असे मी म्हणणार नाही. प्रत्येक वाचक जेव्हा मी लिहिलेले काही वाचतो आणि नंतर "पुढे काय?" हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याला उत्तर देणे (मुस्काडफोड वगैरे नव्हे. कथेमध्ये) हे माझे मी स्वतः वैयक्तिकरीत्या कर्तव्य मानते. पर्सनल अडचणी असू शकताना किमान "पुढचा भाग कधी" वगैरे लिहू नये असे माझे मत. माझ्या वाचकांचा खिल्ली उडवणे, दबाव आणणे इतकंच काय, सल्ले देणे हादेखील मी हक्क मानते.

कदाचित अश्या दबावाखाली घाईघाईत पूर्ण केलेली कथा कलाकृती म्हणुन तेवढी छान असणार नाही.>>> घाई कुणी करत नाही. पण कथा पुढे तरी जायला हवी कीअनको...

पण २७ भागांमधे किधर तो ले चलो ना भई. उधर वो एकही रदीफमे घरमे कितना देर!!!!!

कथा किती वेळ दिवस महिने रेंगाळली याहीपेक्षा प्लॉटमध्ये खूप रेंगाळते आहे असा माझा आक्षेप आहे. + घाई कुणी करत नाही. पण कथा पुढे तरी जायला हवी कीअनको...

>> यातले मला फारसे कळत नाही त्यामुळे मी त्याविषयी बोलणे अयोग्य ठरेल. शिवाय मी स्वतः अजुन एकही कथा वै. लिहिली नसल्याने मला हा आक्षेप घ्यायचा हक्क नाही असं मला वाटतं.

पण २७ भागांमधे किधर तो ले चलो ना भई. उधर वो एकही रदीफमे घरमे कितना देर!!!!!

>> Rofl

लिहिणार्‍याला त्याचा त्याचा वेळ घेऊ दिला पाहिजे. लिहिण्याची प्रक्रिया असते. ती कुणाची कधी काय वेगाने होईल सांगता येत नाही.
वाचक म्हणून तुम्ही सुचवू शकता, हट्ट करू शकता, ओरडू शकता पण असे नियम वगैरे आणायचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे. अर्थात असे नियम येण्याची शक्यता मला तरी दिसत नाही त्यामुळे त्यावर जास्त बोलायची मला गरज वाटत नाही.
मागे पडलेल्या कथा न वाचण्याचा किंवा खूप काळाने पूर्ण केली गेली तर तिकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार वाचकाला असतोच की.

जेव्हा आपण एखादि कथा वाचायला सुरुवात करतो तेव्हा कधितारि तिचा शेवाट व्हावा हि अपेक्शा असते. आणि प्रत्येकाचि उत्सुकता त्या क्रमशः भागामधे दडपलेली आहे म्हणुन अशा प्रकरचे उद्गार येथे येत आहेत. त्यामधे कोणाचाहि कोणाला दुखावण्याचा किंवा त्यांचा उपमर्द करायचा उद्देश नसतो. येथे लिखिकेने वाचकांच्या भावना समजवून घ्यावे एव्हढिच अपेक्शा आहे.

काही लोकांनी २ -२ वर्ष लावलीत कथा पुर्ण करायला........एक कथा तर ४ वर्ष झालीय रेंगाळुन ती पुर्ण नाहीये...(( मी कोणाचे नाव घेणार नाहीये ))
पियु म्हणते तस तिथे ही हल्ला बोल करा.....इथे मउ म्हणुन कोपराने खणु नका......

Pls koni tari Tanya yanchyavar pan dabav Ana. Wari la gheun gelet ani sodun diley ardya vatet.

बिचारी वेल. आधी तिला काय ह्वं काय नको ते सांगुन गोंधळुन सोडलं. आता जर तिला गोष्ट कशी पुढे न्यायची हे कळत नसेल किंवा इंट्रेस्ट राहीला नसेल तर काय करु शकतो आपण.

प्लॉटमध्ये पुढे जात नाही मान्य आहे पण इथे एक मुसलमान नायक आणी एक अतिहुशार हिंदु नायीका ह्या एका प्लॉट वर कितीतरी कादंबर्यांचे रतीब घातले आहेत लोकांनी. ते सुद्धा महीनोंमहीने. वर्षेसुद्धा असु शकतील.

वेल तु जरापण मनाला लाउन घेउ नकोस बाई. लिहीत रहा.

पियू, अनि, गेहना - धन्स ग सख्यांनो (शेवटचेच प्रतिसाद वाचलेत. आधीचे नाहीत.)

तुमची उत्सुकता मला समजतेय पण तशीच काही वैयक्तिक कारणे आहेत ज्यामुळे माझा माबो वावर खूप लिमिटेड झालाय.

मी येईन लवकरच परत फुल्ल हॉर्मात जुन्या कथा पूर्ण करेन आणि नव्याही लिहेन. प्लीज कळ काढा माझ्यासाठी.

Pages