जीवन

Submitted by vaiju.jd on 12 July, 2013 - 14:45

॥ श्री ॥

चालता चालता पायात रुततो कधी काटा
म्हणून कां कोणी सोडून देतो चालत जाणं वाटा.

लखलखता विजेचा लोळ कधी उतरून जाळतो
सौंदर्यातला दाहकपणा त्यातूनच कळतो.

कधीतरी अडवणूक करतो कोसळणारा पाऊस
म्हणून ’पाऊस नकोच!’ असा करतं कां कोणी नवस?

मध्य़ान्हीचा तळपता सूर्य, पावलांना जाळी
पण जातं कां आयुष्य कॊणाचं बसून छपराखाली?

तापला तवा देऊन जातो चरचरीत चटका
आपसूकच पुढच्यावेळी फिरतो हात नेटका!

चुकुन फिरतं धारधार पातं लागते रक्ताची धार
म्हणून त्यावर आघात करून करत कां कोणी प्रतिकार?

नेमक्या वेळी हातातून सुटून जाते सुई
चडफडतो तरी शोधतो आपण वेळेवर कामास येई.

सोडतो कां आपण हे सारे, घेतो नां मिळतं जुळतं?
कारण हेच जीवन आहे, हे आपल्याला कळतं

मग, माणसासारखी माणसे, अडतील, पडतील, चुकतील.
दुखवलं तरी हवीच ती, सोडता कशी येतील?
Group content visibility: 
Public - accessible to all site users